जब तक धोनी आऊट नही होता मॅच खतम नही होता !

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 July, 2019 - 23:42

जब तक धोनी आऊट नही होता मॅच खतम नही होता !

साल २०१७ ऑगस्ट २४
वर्ल्डकपला दोन वर्षांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक.
संघातील सिनिअर खेळाडू या नात्याने धोनी पुढचा वर्ल्डकप खेळणार का या चर्चांना सुरुवात.
धोनी स्लो झालाय, धोनी थंडावलाय, तो आता पहिल्यासारखे मोठे फटके मारू शकत नाही, त्यांचे रिफ्लेक्सेस मंदावलेत, ब्लाह ब्ला ब्लाह..
अश्या पार्श्वभूमीवर भारत श्रीलंका एकदिवसीय सामना रंगतो.
श्रीलंका २३६ धावांवर गुंडाळली जाते. भारताची १०९ धावांची दमदार सलामी होते.
सामना एकतर्फी आणि नीरस होतोय असे वाटत असतानाच अचानक लंकन फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाज फसू लागतात. शर्मा धवन कोहली जाधव राहुल पांड्या अक्षर पटेल.. निव्वळ २२ धावात ७ गडी बाद आणि भारताची स्थिती १३१ ला ७. विश्वचषक १९९६ च्या आठवणी जाग्या होतात. हो, तीच श्रीलंकेविरुद्धची सेमीफायनल मॅच. सचिन बाद होताच भारताची उडालेली घसरगुंडी आणि लोकांनी हुल्लड माजवून सामना बंद पाडल्याने रडलेला कांबळी..
पण तेव्हा लोकांनाही माहीत होते की आता ईथून आपण सामना जिंकू शकत नाही. आणि खुद्द कांबळीलाही याची कल्पना होती की आता आपण हरल्यातच जमा आहोत.

पण पुढे मात्र काळ बदलत गेला. एक नवे समीकरण उदयास आले. जोपर्यंत धोनी बाद नाही होत तोपर्यंत आपण सामना हरलेलो नसतो.
एक काळ होता जेव्हा भारताचा स्कोअर विचारतानाच लोकं सचिनचाही स्कोअर विचारायचे.
मग एक काळ आला जेव्हा भारताची बिकट परीस्थिती पाहून लोकं धोनी खेळतोय का हे विचारू लागले.

आणि याची प्रचिती पुन्हा एकदा त्या श्रीलंकेच्या सामन्यात आली. भुवनेश्वर ५३ नाबाद आणि धोनी नेहमीप्रमाणे ४५ नाबाद. भारताने त्यानंतर एकही विकेट न गमावता तो सामना तीन विकेटने जिंकला.

असे कैक सामने त्याच्या कारकिर्दीत सापडतील. अर्थात, धावांचा पाठ्लाग करताना विजयी सामन्यात १०० पेक्षा अधिक सरासरी हे अदभुत आकडे बोलके आहेत. पण हा सामना लक्षात राहिला कारण त्याने सोकॉल्ड टिकाकारांचे तोंड काही काळापुरते बंद केले. आणि त्यानंतरही करत राहिला. कधी आपल्या बॅट्च्या तडाख्याने तर कधी आपल्या चपळ यष्टीरक्षणाने. याऊपर त्याला खेळाची जी जाण आहे त्याबद्दल तर बोलायलाच नको. तो क्रिकेटच्या अकलेचा एक बेंचमार्क आहे. बाकीचे त्यानुसार मोजले जातात. क्रिकेट हा खेळ बुद्धीबळाच्या पटावर खेळला गेला असता तर धोनी हा जगातला सर्वोत्तम ग्रॅण्डमास्टर असता. पण हा खेळ मैदानावर खेळायचा आहे. वय कधी ना कधी आडवे येणारच होते. जे ना सचिनला चुकले होते ना कपिलपाजींना. पण त्याच्या टिकाकारांना हे कळत नव्हते की सिंहाचे वय झाले म्हणून तो गवत खात नाही किंवा शिकार करणेही सोडत नाही. फक्त शिकारीची पद्धत बदलतो. अगदी या वर्ल्डकपपूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियन मालिकेतही त्याने मालिकावीराचा मान पटकावत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात व्हाईटवॉश द्यायचा पराक्रम केला होता. स्वत:ला नव्याने सिद्ध करूनच या वर्ल्डकपला प्रवेश मिळवला होता.

रोहीत शर्माच्या झंझावातापुढे यावेळी सारेच काही झाकोळून गेले. शर्मा अफाट खेळला यात वादच नाही, पण वर्ल्डकपमधील प्रेशर गेम अजून यायचा होता. भारताच्या दुर्दैवाने तो सेमीफायनललाच आला.

शर्मा राहुल कोहली ... या विश्वचषकात खोरयाने धावा काढणारे आपले टॉप थ्री फलंदाज प्रत्येकी एक धाव काढून तंबूत परतताच पाठोपाठ कार्तिकही हजेरी लाऊन गेला. पंत आणि पांड्याही फार काळ किल्ला लढवू शकले नाहीत. आधीच अवघड वाटणारा सामना आता अशक्य झाला होता. पण तरीही भारतीय क्रिकेटप्रेमींनी सामना बघणे सोडले नव्हते. कारण धोनी अजूनही खेळत होता.

त्या दिवशी जडेजा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग खेळून गेला. पण समोर धोनी श्रीकृष्णाच्या भुमिकेत नसता तर हे झाले नसते हे त्यालाही मान्य असावे. या कृष्णासोबतचे अर्जुन दरवेळी बदलत राहतात. त्यादिवशी तो जडेजा होता.

भारताला सामन्यात आणून जडेजा बाद झाला. तरीही न्यूझीलंड कर्णधाराच्या कपाळावरची चिंतेची रेष काही छोटी झाली नाही. कारण धोनी बाद होत नाही तोपर्यंत आपण जिंकू शकत नाही हे त्यालाही पक्के ठाऊक होते. धोनीच्या गिअर चेंज करत आलेल्या षटकाराने ती चिंतेची रेष आणखी जाड केली. पण अखेर तो दुर्दैवी क्षण आला. नुसते मैदानावरच नाही तर संपुर्ण भारतात एकाच वेळी सन्नाटा पसरला. शोले चित्रपटातील ए के हंगल आठवला. "पता है दुनिया का सबसे बडा हार्टब्रेक क्या होता है?" जगभरातल्या क्रिकेटप्रेमींनी तो त्या दिवशी अनुभवला. किवी क्षेत्ररक्षकाने थेट थ्रो करत उडवलेले स्टंप आणि धोनीची दोन ईंच कमी पडलेली बॅट. आयुष्यात कधी हे चित्र डोळ्यासमोरून पुसले जाणार नाही. धोनी बाद झाला आणि भारतही विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडला.

धोनी आता निवृत्ती घ्यायचा विचार करत आहे असे कानावर आलेय. हा त्याचा शेवटचाच वर्ल्डकप ठरेल. कदाचित एखाददुसरी मालिका खेळून तो निरोप घेईन. ती वेळ कदाचित आता आलीही असेल. पण तरीही मन हेच सांगतेय की नको करूस असे मित्रा, निदान तोपर्यंत तरी नको करूस जोपर्यंत आम्हाला वाटतेय, जब तक धोनी आऊट नही होता मॅच खतम नही होता !

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< "पता है दुनिया का सबसे बडा हार्टब्रेक क्या होता है?" जगभरातल्या क्रिकेटप्रेमींनी तो त्या दिवशी अनुभवला. किवी क्षेत्ररक्षकाने थेट थ्रो करत उडवलेले स्टंप आणि धोनीची दोन ईंच कमी पडलेली बॅट. आयुष्यात कधी हे चित्र डोळ्यासमोरून पुसले जाणार नाही. >>

--------
आयुष्यात कधी हे चित्र डोळ्यासमोरून पुसले जाणार नाही असे दोन क्षण (अ) पाकला विजयासाठी हव्या होत्या चार धावा, शेवटचे षटक, शेवटचा चेंडू होता. चेतन शर्माच्या या शेवटच्या चेंडूवर जिगरबाज जावेद मियांदादने मारलेला षटकार मला आजही आठवतो.... पुढे कितीतरी वर्षे त्या चटका लावणार्‍या पराभवाचे दु:ख सलत होते.
(ब) कपिलची १७५ नाबाद खेळी माझ्यासाठी अविस्मरणिय... भारत ५ बाद १७ होता.

बाकी खेळ आहे. हार- जित होतच रहाते....

पर्फॉरमन्स घसरलाय म्हणुन शिव्या घालणारं पब्लिक पण त्या सामन्यानंतर धोनीच्या तारीफचे पुल बांधुन राहिलेत.
फेबु वर तर काय खोर्‍याने पोस्टी पडताहेत.
समोर धोनी श्रीकृष्णाच्या भुमिकेत>>> Lol
पता है दुनिया का सबसे बडा हार्टब्रेक क्या होता है?>>>> हेच ते फेबु पोस्ट Happy
धोनीने आता निवृत्त व्हावे.
सब घोडे बारा टक्का आणि सबका दिन आता है हे पुन्हा नव्याने जाणवले. Happy

शेवटी शेवटी सर्वच खेळाडू मंदावतात. कपिलदेवला विकेट्स मिळत नव्हत्या, सचिनची शतके होत नव्हती. मात्र त्यांना कुणी निवृत्त व्हा असे म्हटले नाही. धोनीला समजत असेल केव्हां निवृत्त व्हायचे ते.

पता है दुनिया का सबसे बडा हार्टब्रेक क्या होता है?" जगभरातल्या क्रिकेटप्रेमींनी तो त्या दिवशी अनुभवला. किवी क्षेत्ररक्षकाने थेट थ्रो करत उडवलेले स्टंप आणि धोनीची दोन ईंच कमी पडलेली बॅट. आयुष्यात कधी हे चित्र डोळ्यासमोरून पुसले जाणार नाही. >> अगदी अगदी!

ऋनमेष अगदी मनातलं बोललात.धोनी अजुन एक तरी वर्ल्डकप खेळायला हवा.
सेमीफायनलला जडेजा चांगली खेळी खेळु शकला कारण समोर धोनी होता साथ द्यायला.

धोनीच्या मंदावलेल्या हालाचालीमुळेच ते दोन इंच गाठु षकला नाही हे मान्य करुया की
>>>>>
मलाही आधी तशी शंका आलेली. पण रिप्ले पाहिले. तो सुसाटच धावला होता. बॉल कुठे गेला हे न कळल्यने स्टार्ट थोडी लेट झालेली. ते सुद्धा वावगे नव्हते. कारण त्याला नुसते बॉल कुठे गेला आहे हेच बघायचे नव्ह्ते तर दोन धावा होतील का तरच धावायचे याचाही निर्णय घ्यायचा होता.

सेमीफायनलला जडेजा चांगली खेळी खेळु शकला कारण समोर धोनी होता साथ द्यायला.
>>>>>

ज्या व्यक्तीने गेले बारापंधरा वर्षे क्रिकेट पाहिले आहे त्या कोणालाही हे सांगायची गरज नाही.
मॅचची चिरफाड करताना दादा हे सुद्धा म्हणाला की पंतसोबत धोनी असता तर त्याला असा हवेच्या विरुद्ध दिशेने चुकीचा फटका मारू दिला नसता.
धोनीचा वापर तुम्ही कसा करता हे धोनीवरच सोडून देणे उत्तम.

गंमत ऐका, काल क्रिकबझवर उथप्पा आणि नेहराने यंदाची वर्ल्डकप टीम काढलेली पाहिली.
शर्मा वॉर्नर कोहली विल्यमसन शाकीब बुमराह स्टोक्स स्टार्क वगैरे प्लेअर होते.
दोघांच्याही टीमचा कप्तान हा धोनीच होता Happy

आणि हे पटलेही. कारण निव्वळ फलंदाजी गोलंदजी क्षेत्ररक्षण या एव्ढ्याच क्रिकेटींग स्किल नाहीत. यापलीकडे आणि सर्वात महत्वाचे असते ते कॅप्टनशिप स्किल. आणि तिथे धोनीला तोड दोघांनही सापडले नाही.

आज सहज युट्यूब सर्फ करताना धोनी विरुद्ध अख्तर सामना सापडला.
बाप आखीर बाप होता है मोमेंट
शेवटपर्यंत बघा
https://www.youtube.com/watch?v=Fy6NEm4gcOI

धोनी सर्च केले, हा धागा सापडला म्हणून ईथेच लिंक टाकतोय.
आपल्या चुम्मा फलम्दाज ऋषभ पंतची आठवण झाली. धोनीचे सुरुवातीचे दिवस, माही मार रहा है.. आहाहा