कधी शांत, कधी उसळते !

Submitted by कुमार१ on 8 July, 2019 - 02:05

पित्तखडे आणि पित्ताशयदाह

तेल आणि तूप हे आपल्या आहारातले प्रमुख मेद पदार्थ. स्वयंपाक रुचकर होण्यात त्यांचे मोठे योगदान असते. मांसाहारातून अन्य काही मेद मिळतात. एकंदरीत मेदपदार्थ पचण्यास तसे जड असतात. त्यांचे पचन सुलभ होण्यासाठी आपल्या पचनसंस्थेतील पित्ताची (bile) खूप गरज असते. पित्त हा पाचकरस मुळात यकृतात तयार होतो आणि नंतर तो पित्त्ताशयात साठवला जातो. पित्तरसामध्ये अनेक घन पदार्थ असतात. त्यातील काही घटकांचे एकमेकाशी असलेले तुलनात्मक प्रमाण हे महत्वाचे असते. जर काही कारणाने यात बिघाड झाला तर पित्तखडे निर्माण होतात. त्यातून पुढे अन्य काही समस्या निर्माण होऊ शकतात. हा आजार समाजात बऱ्यापैकी आढळतो. त्याची मूलभूत माहिती करून देण्याचा या लेखाचा उद्देश आहे.

लेखातील विवेचन खालील मुद्द्यांच्या आधारे असेल:

१. पित्ताशय : रचना व कार्य
२. पित्तातील घटक पदार्थ
३. पित्तखडे : निर्मिती आणि प्रकार

४. आजाराची कारणमीमांसा
५. लक्षणे व रुग्णतपासणी
६ .आजाराचे दीर्घकालीन परिणाम

७. प्रयोगशाळा व प्रतिमा चाचण्या
८. उपचार आणि प्रतिबंध

पित्ताशय : रचना व कार्य
आपल्या पचनसंस्थेतील यकृत, पित्ताशय (gall bladder) आणि लहान आतडे यांचा संबंध खालील चित्रात दाखविला आहे. यकृत आणि पित्ताशयांच्या नलिका एकत्र होऊन अखेर लहान आतड्यांत उघडतात. त्याद्वारे पित्तरस हा पचनादरम्यान आतड्यांत सोडला जातो.

gall b.jpg

पित्तरस प्रथम यकृतात तयार होतो. पुढे तो नलिकांद्वारे पित्ताशयात पोचतो. तिथे सुमारे ५० मिली रस एकावेळेस साठवलेला असतो. पित्ताशयात त्यातील पाणी शोषले जाऊन तो अधिक दाट होतो.
जेव्हा अन्नातील मेद लहान आतड्यांत शिरतात तेव्हा तिथून CCK हे हॉर्मोन स्त्रवते. त्याच्या प्रभावामुळे पित्ताशयाचे आकुंचन होऊन त्यातील रस आतड्यांत सोडला जातो. त्याच्यातील विशिष्ट क्षारांमुळे मेदाचे पचन होण्यास मदत होते.

पित्तातील घटक पदार्थ
यकृतातील पित्ताचे घटक असे:
• पाणी : ९७%
• पित्तक्षार : ०.७%
• बिलीरुबीन : ०.२%
• मेद पदार्थ : ०.५%
• अन्य क्षार

वरील मेद पदार्थांत कोलेस्टेरॉल, मेदाम्ले व लेसिथिन यांचा समावेश होतो. त्यापैकी कोलेस्टेरॉलचा एक मूलभूत गुणधर्म असा आहे की त्याचे छोटे खडे सहज तयार होऊ शकतात. पण, असे होऊ नये याची दक्षता लेसिथिनकडून घेतली जाते. या दोन्ही घटकांचे प्रमाण असे राखलेले असते की कोलेस्टेरॉल हे नेहमी विरघळवलेल्या स्थितीत राहते.

पित्तखडे : निर्मिती आणि प्रकार

gall stones.jpg

पित्ताशयात पित्तातील पाणी शोषले जाऊन ते दाट होत असते. या प्रक्रीयेदरम्यान पित्तातील काही घन पदार्थ न विरघळलेल्या अवस्थेत राहू शकतात. जर त्यांचे प्रमाण वाढते राहिले तर मग ते लहान स्फटिकांच्या रुपात वेगळे जमा होऊ लागतात. पुढे ते तिथल्या म्युकसमध्ये पकडले जाऊन तिथे गाळ तयार होतो. कालांतराने अनेक छोटे स्फटिक एकमेकात विलीन होऊन पित्तखडे तयार होतात. हे खडे २ प्रकारचे असतात:
१. कोलेस्टेरॉलयुक्त आणि
२. . बिलिरूबिनयुक्त.

आता या दोन्ही प्रकारांची कारणमीमांसा पाहू.

कारणमीमांसा
कोलेस्टेरॉलयुक्त खडे: हे तयार होण्याची प्रक्रिया मध्यमवयानंतर वाढू लागते तसेच ते तुलनेने स्त्रियांत अधिक होतात. एखाद्या व्यक्तीत खालील घटक किंवा आजार असल्यास खडे होण्याची प्रक्रिया अधिक संभवते:

१. लठ्ठपणा
२. गरोदरपण : अनेक वेळा आल्यास
३. आजाराची अनुवंशिकता
४. मधुमेह व उच्चरक्तदाब
५. काही औषधांचे परिणाम: मुख्यत्वे गर्भनिरोधक गोळ्या आणि रक्तातील मेदाचे प्रमाण कमी करणारी काही औषधे.

हे खडे स्त्रियांत अधिक प्रमाणात का होतात हा कुतूहलाचा विषय आहे. स्त्रीच्या शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही हॉर्मोन्स त्यास जबाबदार आहेत. त्यांच्या प्रभावाने पित्तरस अधिक दाट होतो, त्यातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते तसेच पित्ताशयाचे आकुंचनकार्य देखील मंदावते. अनेक वेळा गरोदर राहिलेल्या स्त्रियांत प्रोजेस्टेरॉनची पातळी सातत्याने वाढलेली राहते.( स्त्रीमध्ये पित्तखडे होण्याची ४ प्रमुख कारणे ‘F’ या अक्षराशी संबंधित आहेत : Fat Fertile Females ऑफ Forty ! ).

दीर्घकालीन मधुमेहात कोलेस्टेरॉलची रक्तपातळी वाढलेली राहते आणि पित्तात जाणाऱ्या कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढते राहते.

बिलिरूबिनयुक्त खडे
बिलिरूबिन हे रंगद्रव्य हिमोग्लोबिनच्या विघटनातून तयार होते. निरोगी अवस्थेत शरीरात रोज ठराविक प्रमाणात लालपेशी मृत होतात आणि मग त्यातल्या हिमोग्लोबिनच्या विघटनातून बिलिरूबिन तयार होते. लालपेशींच्या काही आजारांत नेहमीच्या कित्येक पट पेशी मरतात आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणात बिलिरूबिन तयार होते. अशा वेळेस त्याचे पित्तातील प्रमाण वाढलेले असते. पुढे त्याचा कॅल्शियमशी संयोग होऊन काळ्या रंगाचे खडे तयार होतात.

काही रुग्णांत वरील दोन प्रकारच्या खड्यांचे मिश्रण होऊन ‘मिश्रखडे’ देखील बनू शकतात.

लक्षणे व रुग्णतपासणी

पित्तखड्यांची निर्मिती प्रक्रिया आपण वर पहिली. आता संबंधित रुग्णास त्याचा काय त्रास होतो ते पाहू. हा आजार झालेल्या सुमारे ५५% रुग्णांना या खड्यांचा कोणताच त्रास होत नाही. ते खडे पित्ताशयात शांत पहुडलेले असतात !

बाकीच्या रुग्णांत मात्र परिस्थिती बिघडते. पचनादरम्यान जेव्हा पित्ताशय आकुंचन पावते, तेव्हा त्याच्यात साठलेल्या खड्यापैकी १-२ खडे सरकून पित्तनलिकेत अडकतात. आता मात्र रुग्णास वेदना (colic) होते. ती सुमारे तासभर टिकते. नंतर पित्ताशय जेव्हा सैल पडते तेव्हा खडे पुन्हा नलिकेतून मागे जातात आणि त्यामुळे वेदना थांबते. एकदा का अशी प्रवृत्ती झाली की अशा प्रकारचा त्रास (attacks) अधूनमधून होत राहतो. तो किती काळाने होईल याचा काही भरवसा नसतो. जेव्हा जेवणात मेदांचे अधिक्य असते तेव्हा हा त्रास बळावतो.

ही वेदना जेवणानंतर साधारण तासात सुरु होते. रुग्णास पोटात मध्यभागी किंवा उजव्या बाजूस दुखते. ही वेदना सतत होत राहते आणि काही तास टिकते. त्याच्या जोडीला रुग्णास भरपूर घाम येऊन मळमळ व उलट्या होऊ शकतात. सुरवातीस बरेच रुग्ण हा acidity वा पचनाचा त्रास आहे असा तर्क करून त्यावरील सामान्य औषधे स्वतःच घेतात. पण त्याने काही फरक पडत नाही.

आजाराचे दीर्घकालीन परिणाम

एकंदरीत पाहता हा आजार कधी निद्रिस्त तर कधी उफाळून येतो. त्यामुळे आतड्यांत मेदांचे पचन बिघडत जाते. ज्या रुग्णांत खडे पित्तनलिकेत वारंवार अडकू लागतात त्यांच्यात कालांतराने काही अनिष्ट परिणाम दिसतात. पित्ताशय हळूहळू आकाराने मोठे होते आणि पुढे त्याचा दाह होतो. वेळप्रसंगी त्यात जंतूंची वाढ होऊ लागते. आजार खूप काळ वाढता राहिल्यास पित्ताशय कडक होते आणि त्याचे कार्य संपुष्टात येते. काही रुग्णांत हे खडे मुख्य पित्तनलिकेत वारंवार अडकू लागतात. जर का अशा अडकण्याने ती नलिका बंद झाली तर मग पित्त उलट्या मार्गे रक्तात उतरते. अशा रुग्णाच्या रक्तातील बिलिरूबिनचे प्रमाण वाढते आणि त्याला कावीळ झाल्याचे दिसते. क्वचित काही रुग्णांत स्वादुपिंडाचाही दाह होऊ शकतो.

प्रयोगशाळा व प्रतिमा चाचण्या
रुग्णास निव्वळ पित्तखडे झालेले असतील तर रक्त-लघवीच्या तपासण्यांची गरज नसते. मात्र जर त्याच्या जोडीने पित्ताशयदाह झाला असल्यास रक्तचाचण्या उपयुक्त असतात. त्यामध्ये रक्तपेशी, बिलिरूबिन आणि काही एन्झाइम्सची मोजणी यांचा समावेश होतो. आजाराच्या तीव्रतेनुसार या घटकांच्या पातळीत वाढ होते.

प्रतिमा चाचण्यांपैकी सोनोग्राफी (USG) ही चाचणी निदानासाठी सर्वोत्तम आहे. गरोदर स्त्रीवरदेखील ती निर्धोकपणे करता येते. या तपासणीत मध्यम व मोठ्या आकाराचे खडे सहज समजतात. तसेच दाहप्रक्रियाही समजते.

उपचार
(या लेखाची व्याप्ती फक्त आधुनिक वैद्यकातील उपचारांपुरती मर्यादित आहे. तथापि वाचकांनी त्यांना अन्य पद्धतीचे अनुभव असल्यास प्रतिसादांत जरूर लिहावेत).

आपण वर पहिले की बऱ्याच जणांना पित्तखडे झालेले असतात पण त्याचा कोणताही त्रास होत नसतो. किंबहुना त्या व्यक्तीत या खड्यांचा शोध अन्य काही कारणासाठी पोटाची सोनोग्राफी करताना लागतो ! अशा रुग्णांवर उपचाराची गरज नसते. फक्त नियमित काळाने सोनोग्राफी करून खड्यांचा अंदाज घेतात.
ज्या रुग्णांना आजाराची लक्षणे वारंवार जाणवू लागतात त्यांच्यासाठी उपचारांची गरज असते. आता उपचारांची फक्त रूपरेषा देत आहे.

या आजारासाठी ३ प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत:
१. औषधे
२. लिथोट्रिप्सी
३. पित्ताशय शस्त्रक्रियेने काढून टाकणे.
प्रत्येक रुग्णाच्या आजाराचे स्वरूप आणि गांभीर्य बघून योग्य त्या उपचाराची निवड केली जाते.

१. औषधे: ज्या रुग्णांत खड्यांचा आकार खूप लहान आहे, ते कोलेस्टेरॉलयुक्त आहेत आणि पित्ताशयाचे कार्य चांगले आहे, अशांमध्ये याचा विचार करता येतो. यासाठी पित्तक्षाराच्या गोळ्या खाण्यास देतात. त्याने खडे विरघळू शकतात. त्या दीर्घकाळ घ्याव्या लागतात आणि जेमतेम ४०% रुग्णांत त्याचा उपयोग होतो. त्यांच्यातही उपचार बंद केल्यावर खडे पुन्हा उद्भवण्याची शक्यता बरीच असते. हे सर्व पाहता या उपचारास डॉक्टर सहसा पसंती देत नाहीत. मात्र ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया अन्य काही कारणाने करता येत नाही अशांसाठी याचा विचार करतात. तसेच जे रुग्ण शस्त्रक्रियेस खूप घाबरतात त्यांच्या समाधानासाठी वेळप्रसंगी याचा तात्पुरता वापर करता येतो !

लिथोट्रिप्सी
हा उपचार शस्त्रक्रियेस पर्याय म्हणून काही रुग्णांत वापरता येतो. खडे जर लहान असतील आणि पित्ताशयाचे कार्य चांगले असेल तर याचा विचार करतात. या तंत्रात उच्च उर्जेच्या ध्वनीलहरी वापरून शरीरावर shocks दिले जातात. त्यामुळे आतील खडे फुटून त्यांचा भुगा होतो, जो पुढे पित्तनलिकेतून आतड्यांत पोचतो आणि त्याचा निचरा होतो. हे तंत्र रुग्णास भूल न देता सहज वापरता येते. पण, या उपचारानंतर खडे पुन्हा निर्माण होण्याची शक्यता राहतेच. काही रुग्णांत याच्या जोडीला औषधे देता येतात.

पित्ताशय शस्त्रक्रिया
वरील दोन उपचारांच्या मर्यादा पाहता हा उपाय सर्वोत्तम ठरतो. जेव्हा खड्यांचा त्रास वारंवार होऊ लागतो तेव्हा पित्ताशय काढून टाकण्याची शिफारस आहे. ही शस्त्रक्रिया आता बहुसंख्य रुग्णांत Laparoscopic पद्धतीने करतात. यात पोटावर अगदी लहान छेद देऊन सुटसुटीत शस्त्रक्रिया करता येते. काही ठराविक रुग्णांत मात्र पारंपारिक जुन्या पद्धतीची शस्त्रक्रिया करतात. दोन्ही पद्धतींचे आपापले फायदे-तोटे असतात. पित्ताशय काढून टाकल्यानंतर काही रुग्णांत पित्तनलिकेत पुन्हा खडेनिर्मिती होऊ शकते. थोडक्यात, एकदा का हा आजार झाला की तो आयुष्यभर पिच्छा पुरवतो !

प्रतिबंध
पित्तखडे निर्माण होऊच नयेत यासाठी कोणताही ठोस उपाय नाही. परंतु ज्या रुग्णांत ते होण्याचा धोका अधिक असतो त्यांना पित्तक्षाराच्या गोळ्या देऊन पाहता येते. ज्या रुग्णांत खडे झालेले आहेत त्यांचा भावी त्रास (वेदना) कमी होण्यासाठी आहारातील मेदांचे प्रमाण मर्यादित ठेवणे आणि नियमित व्यायाम करणे फायद्याचे ठरते.

समारोप

पित्तखडे हा मध्यमवयीन प्रौढांमध्ये बऱ्यापैकी आढळणारा एक पोटविकार. स्त्रियांत तो पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात आढळतो. आधुनिक आहार आणि जीवनशैलीने जे काही आजार वाढत्या प्रमाणात आढळू लागले त्यापैकी हा एक. पित्तखड्यांच्या २ प्रकारांपैकी कोलेस्टेरॉलयुक्त खडे जास्त प्रमाणात आढळतात. पोटावरील अतिरिक्त चरबी, मधुमेह, उच्चरक्तदाब आणि मेदांची वाढलेली रक्तपातळी या समूहाचाच पित्तखडे हा एक सदस्य आहे. बऱ्याच रुग्णांत हे खडे निद्रिस्त असतात. पण जर का ते त्रास देऊ लागले तर त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे हितावह असते.
**************************************************************************************************
(चित्रे जालावरून साभार).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
@साद,

चांगला प्रश्न. काही अवयवांच्या गंभीर आजारांत ते शस्त्रक्रियेने काढून टाकावे लागतात. त्यापैकी काही काढल्याने जीवनमानात फरक पडत नाही. तर काहींच्या काढण्याने तडजोडी स्वीकाराव्या लागतात.

शरीरातील काही महत्वाचे अवयव काढून टाकले तरी माणूस जगू शकतो. यानिमित्ताने त्यांची यादी सादर करतो:
१. पित्ताशय
२. आन्त्रपुच्छ्
३. टॉन्सिल्स
४. प्लीहा
५. जठर व मोठे आतडे
६. गर्भाशय
७. स्त्री व पुरुषाची अंडाशये, शिस्न
८. फक्त १ फुफ्फुस
९. फक्त १ मूत्रपिंड

(यादी १००% पूर्ण नाही; फक्त महत्वाचे अवयव घेतले आहेत).

डॉक्टर, माहितीबद्दल अनेक धन्यवाद.

जठर काढून टाकल्यावर पचनाची क्रिया कशी चालते, याबाबत उत्सुकता आहे.

गजानन, चांगला प्रश्न.

जठराच्या काही कर्करोगात पूर्ण जठर काढले जाते. त्यानंतर असे सुघटन करतात. (चित्र पाहा. शस्त्रक्रियेयेपूर्वी व नंतर )

Gastrectomy-Before-and-After.pngअन्ननलिका थेट लहान आतड्याला जोडली जाते. आता यानंतर उद्भवणारे प्रश्न आणि त्यावरील उपाय :

१. शस्त्रक्रियेनंतर ५ दिवस तोंडाने काहीच देत नाहीत.
२. पुढे जेव्हा रुग्णाचे जेवण चालू होते तेव्हा त्याला उलट्या, पोटात मुरडा व जुलाब हे त्रास होतात.
३. आता एका वेळेस मोजके असे दिवसातून ६-८ वेळा जेवायचे. पाणी जेवणाबरोबर न घेता तासभर आधी वा नंतर प्यायचे.

४. प्रत्येक घास खरेच ३२ वेळा चावून गिळायचा !!
५. दरमहा ब-१२ जीवनसत्वाची इंजेक्शन्स घ्यायची .

एक गम्मत बघा !
जठर काढल्यावर काही काळ शरीर-वजनात प्रचंड घट होते. त्या काळात मेदसाठ्यांचे झपाट्याने विघटन होते. त्यात कोलेस्टेरॉल खूप प्रमाणात पित्तात सोडले जाते. त्यातून पित्तखडे तयार होतात !! Bw

Discovery channleवर अतिलठ्ठ लोकांचा बारीक होण्यापर्यतचा प्रवास दाखवतात. त्यात दाखवली जाणारी सर्जरी जठराचीच असते का?
कारण तो प्रवास साधारण 1 ते 3 वर्षाचा दाखवलेला असतो.

मन्या,

होय, ती जठराची शस्त्रक्रिया असते. त्याची माहिती:
१. यात जठराचा फक्त काही भाग काढतात.
२. लहान आतड्याचा शेवटचा भाग वरील छोट्या जठरास जोडतात.

३. अन्नशोषण हे लहान आतड्याच्या पहिल्या भागात होत असते. म्हणून या शस्त्रक्रियेने ते खूप कमी केले जाते.

...वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेचे अन्य काही प्रकारही असतात.

शरीरामधील काही अवयव निकामी झाले किंवा ते काही कारणांनी काढून टाकले तरी माणूस जगतो वर डॉक्टर साहेबांनी सविस्तर सांगितलेले च आहे .
पण त्या साठी त्या रुग्णाला बाहेरून supportive उपचार आयुष्य भरासाठी घेणे भाग असावे अस मला वाटत. .
शरीरातील सर्व अवयव महत्वाचे आहेत त्यांचं काही ना काही काम असते शरीर निरोगी राहावे आणि सुरळीत चालावे म्हणून .
हे माझे मत चुकीचं आहे का

राजेश,
तुमचे बरोबर आहे. वरचे माझे एक वाक्य अधोरेखित करतो:

काही अवयवांच्या गंभीर आजारांत ते शस्त्रक्रियेने काढून टाकावे लागतात. त्यापैकी काही काढल्याने जीवनमानात फरक पडत नाही. तर काहींच्या काढण्याने तडजोडी स्वीकाराव्या लागतात.

जे अवयव काढल्याने काही फरक पडत नाही
मग डॉक्टर ते अवयव शरीरात असण्याचे प्रयोजन काय असेल अशी शंका तर सामान्य लोकांना येणारच

माहितीपूर्ण लेख.
पित्त सतत खूप काळ झाल्याने किंवा खूप जास्त झाल्यामुळे दात पिवळे होतात का?

राजेश,
मग डॉक्टर ते अवयव शरीरात असण्याचे प्रयोजन काय असेल अशी शंका >>>

बरोबर, येणारच. काही मुद्दे:

१. निसर्गाने दिलेले सर्व अवयव जर कायम ठणठणीत निरोगी राहिले तर आपली कार्यक्षमता सर्वोत्तम असते.
२. काही महत्वाचे अवयव ‘दोन’ असण्यामागे निसर्गाचा हेतू ‘backup‘ असा असावा (ढोबळ अंदाज). अर्थात उत्क्रांतिचे अभ्यासक यावर भाष्य करू शकतील.

३. आन्त्रपुच्छ् सारखे अवयव हे उत्क्रांतीदरम्यानचे ‘अवशेष’ आहेत, असा बराच काळ समज होता. परंतु नव्या संशोधनाने हे मत बदलले आहे. या छोट्याशा अवयवात आपल्या आतड्यासाठी ‘उपयुक्त जिवाणू’ तयार करण्याची क्षमता आहे.

४. म्हणून ते जर रोगट झाले तरच काढतात वा त्यावर औषधे देतात.
५. ज्या लोकांत आन्त्रपुच्छ् काढलेले आहे त्यांना विशिष्ट प्रकारच्या जंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता खूप वाढते.

शरिराबद्दल आणि त्यातल्या वेगवेगळ्या अवयवसंस्थांबद्दल जितका विचार करू तितके थक्क व्हायला होते. किती ते परिपूर्ण सुसूत्रीकरण!

पीनी,
पित्त सतत खूप काळ झाल्याने किंवा खूप जास्त झाल्यामुळे दात पिवळे होतात का? >>>

१.इथे तुम्ही ‘पित्त = Bile’ असे समजूनच विचारत असाल असे समजतो.
२. पित्ताचा पिवळा रंग बिलीरुबिनमुळे असतो.
३. रक्तातील बिलीरुबिनची बरीच वाढ म्हणजे कावीळ

४. प्रौढांच्या काविळीत दातांवर रंग येत नाही.
५. बालकांत जोपर्यंत दातांची वाढ चालू असते त्याकाळात कावीळ झाल्यास दात पिवळे-हिरवे होऊ शकतात. पण असे रुग्ण कमी आढळतात.

डॉक्टर, hyper acidity वर एखादा विस्तृत तुमच्या खास शैलीमध्ये लेख येऊ द्या..

धन्यवाद डॉक्टर. पित्त ही संज्ञा मी खूपच सैल पणे वापरत होते हे हा लेख वाचून लक्शात आले. पण अजुन शंका देखिल आहेत. वेळ झाल्यास क्रुपया मार्गदर्शन करावे
साधारण पणे लक्शणांचे २ ग्रूप आहेत
१> पित्त चढ्ल्याने खूप डोके दुखणे, मळमळणे, दात आम्बणआ, उलट्या होहुन हिरवे पित्त पडून गेले कि आराम पडणे
२> छातीत जळजळणे, रात्री आडवे झाल्या वर diaphram वर दाब येणे (heart burn)
यातिल कुठ्ले Hyperacidity आणि कुठले Bile?

antacid (chalky tums etc) vs heart burn meds(omeprazole/nexium) या पैकि कोणति औषधे नक्कि कशा
साठी आहेत?

शिरीन,

१. तुम्ही क्रमांक २ मध्ये लिहिलेली लक्षणे hyperacidity ची आहेत. जठरातील HCl हे तीव्र आम्ल असते, त्यामुळे जळजळ होते.
२. Antacid चा अर्थ HCl neutralize करणारी औषधे. त्यांनी तात्पुरते ‘बरे’(?) वाटल्याचा आभास होतो. ही सामान्य दर्जाची आहेत.

३. Omeprazole हे HCl चे पेशींमधले उत्पादन थांबवते. ते अर्थात वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावे.
४. उलट्या जेव्हा तीव्र होतात तेव्हाच bile बाहेर पडू शकते.

५. लक्षणे कुठलीही असोत, प्रथम सल्ला घ्यावा, निदान समजून घ्यावे आणि त्यानुसार औषधे.

अतिशय उपयुक्त लेख!
धन्यवाद डॉक्टर.
मला अलीकडे पित्ताचा त्रास वाढला आहे.
सविस्तर लिहिते.

काव्यात्मक शीर्षक - मला कवितेच्या ओळी वाटल्या Happy
आधी लेख कोणत्या विषयावर असावा हे समजले नाही पण तुमचे नाव बघून अंदाज आला.

आटोपशीर लिहिण्याची आणि चर्चेत आलेल्या प्रश्नांना झटपट मुद्देसूद उत्तरे देण्याची तुमची हातोटी खास आहे.

पु ले शु.

एमी, वत्सला : आभार !

अनिंद्य, धन्यवाद.

शीर्षकात थेट आजाराचे नाव लिहिणे जरा रुक्ष वाटते म्हणून एक प्रयोग.
मला सुद्धा कधीकधी आजार, औषध, रिपोर्ट्स ...यातून बाहेर पडावेसे वाटते ना.
शीर्षक वाचून वर शालींनी लिहिले आहे की, मी काय गझल लिहिली आहे का !

समारोप:

आपणा सर्वांच्या सहभागाने चर्चा चांगली झाली. लेखाचा विषय जरी पित्तखडे असला तरी 'पित्ताचा त्रास' हा विषय अधिक चर्चेत आला. आता 'पित्त' या बद्दलचे गैरसमज दूर झाले असतील ही आशा.

वाचकांनी सुचवल्यप्रमाणे Hyperacidity ह्या विषयावर सवडीने लिहीन.
धन्यवाद !

धन्यवाद डॉक्टर! फार फार सुन्दर, माहितीपूर्ण लेख.
एक उत्सुकता म्हणुन विचारते. अर्धशिशी(मायग्रेन्)चा त्रास ही पित्तामुळेच होतो ना?
मला अगदी शाळेत असल्यापासुन हा त्रास होता. सकाळी दिवस उगवल्यापासुन कपाळाची एकच बाजु, कधी कधी फक्त एक भुवई दुखायची... ते थेट संध्याकाळी ५ नन्तरच डोके उतराय्चे.. ते ही कडु उलटी होउनच.
सध्या बन्द झालाय हा त्रास.

माहितीपूर्ण लेख.
मलाही पित्ताचा त्रास बरेचदा होतो.
Hyperacidity ह्या विषयावर सवडीने लिहीन.>>>> कृपया सवड काढुन लिहावे.

अवांतरः मला शीर्षक वाचुन सारखं कभी नीम नीम कभी शहद शहद गाणं आठवतंय Happy

सुंदर!लेख.आधी वाचला आहे.प्रतिसाद आज देतेय.
२००८ साली गावी असताना,फालुदा आईस्क्रीम खायला गेलो.१-१.५ खाल्ले.दुकानातून बाहेर पडल्यावर प्रत्येक पावलागणिक डोक्यात घण बसावेत तसे ठणकायला लागले.रात्री उशीरा उलट्या,झाल्यावर डोकेदुखी थांबली.कळायला लागल्यापासून कधी उलटी झालेली आठवत नाही.ती कसर त्यावेळी भरून निघाली.भरीस भर जुलाब सुरू झाले होते.
डोक्यात घण वाजणे म्हणजे काय होते ते अनुभवले.हे सारे पित्ताचे प्रताप ना?

Pages