वळीव-२

Submitted by हरिहर. on 17 June, 2019 - 10:51

वळीव-१

दिवसभर मग उगाचच मळभ दाटून आल्यासारखं झालं. रवीवार असुनही दिवस अगदी गोगलगाईसारखा सरकत राहीला. पार्थनेही बाहेर कुठे जाणे टाळले. तो उगाचच गार्गीच्या आजुबाजूला वावरत राहीला. गार्गीही नेहमीपेक्षा जास्त अवखळ वागत राहीली. पण हे सगळं ओढुन-ताणून चाललय हे सारखं जाणवत होतं. दुपारी जेवतानाही पदार्थांचे जरा जास्तच कौतुक झाले. पण एकुन हे असं नाटकी वागणे कुणालाच झेपेना. शेवटी “पडतो ग जरा” म्हणत पार्थ बेडरुममधे निघून गेला. मीही मग चटक्या हाताने किचन आवरले आणि स्टडी निट लावायला घेतली. स्टडीरुम आवरायची म्हणजे तिनेक तासांची निश्चिंती होती. पार्थच्या फाईलींचा पसारा, ड्रॉईंग शिट्सच्या गुंडाळ्या, पेन्स, ड्राफ्टर, पुस्तके-मासिके हे सगळं आवरताना नकळत एकतानता येते मला. त्यातही जर वेळच काढायचा असेल तर मग पुस्तके आवरताना जराशी चाळायची, ड्रॉईंग्ज त्या त्या होल्डरमधे सरकवताना त्यांच्यावरुन नजर टाकायची हे उद्योग केले की मग हवा तेवढा वेळ स्टडी आवरताना काढता येई. पाच दहा मिनिटे झाली असतील. गार्गी स्टडीमधे आली. तिने न बोलता मला मदत करायला सुरवात केली. मला उगाचच अस्वस्थ झाल्या सारखे झाले. मी चेअरवर बसुन नुसतीच ड्राफ्टरचे व्हिल कधी उजवीकडे तर कधी डावीकडे फिरवत राहीले. मी व्हिलबरोबर चाळा करत असतानाच गार्गीने मागुन माझ्या गळ्यात हात टाकले आणि माझा नाकाचा शेंडा हलकेच हलवत म्हणाली
“इतकी काय अपसेट होतेस अनू? काही झालेलं नाहीए एवढं अस्वस्थ होण्यासारखं”
तिने गळ्यात टाकलेले हात न काढताच मी म्हणाले “हे बघ जीजी, तुला जे काही सांगायचेय ते तू बाबाला सांग. तशीही तू मला कधी काही महत्वाचे सांगतेस का? तुला कुठे अॅडमिशन घ्यायचेय, तुझे मार्क-रँक सगळं काही मला पार्थकडून कळायचं. अगदी तुझ्या लग्नाचा निर्णय सुध्दा मला पार्थकडुनच कळवलास तू. मी काय बापडी, तुझी शाळा कॉलेजातली मैत्रीणींची भांडणे सोडवण्यापुरतीच होते”
गार्गीने माझी चेअर आर्मला धरुन गर्रकन फिरवली आणि मला तिच्या सामोरी घेतले. क्षणभर मला तिच्या चेहऱ्यावर दुखावल्याचे भाव दिसले. पण ती चटकन हसतमुख होत म्हणाली “अनू, मी गेले आठ-दहा दिवस पहातेय. तू जरा जास्तच विचार करायला लागली आहेस कुठल्याही गोष्टींचा. म्हातारी झालीस बघ तू आता. बस मी कॉफी आणते दोघींसाठी छान जायफळ घालून. मग बोलूयात”
मला काय वाटत होते ते मलाच समजत नव्हते. गार्गीला नक्की काय प्रॉब्लेम आहे हे जाणूनही घ्यायचे होते आणि दुसऱ्या बाजुला तिने पार्थशी बोलावे, माझ्याशी नको असेही वाटत होते. सकाळपासुन जी अनामीक भित वाटत होती ती काही केल्या कमी व्हायचे नाव घेत नव्हती. मी अडचनींपासुन दुर पळत होते का? गार्गी किचनकडे वळाली आणि मी तळहातांना आलेला घाम वेंधळ्यासारखा मांडीवरच साडीला पुसला. हात पुसतानाच लक्षात आले की मी किचन आवरताना बांधलेला अॅप्रन अजुन तसाच कंबरेला होता. “रे देवा” म्हणत मी चेअरवर मागे रेलून बसले.
गार्गी दोन कॉफीचे भले थोरले वाफाळते मग घेऊन आली. एक माझ्या हातात देत म्हणाली “नुसता मग कुरवाळत बसू नकोस. तुला आवडते तशी केलीय. अगदी अगोड. बरे वाटेल तुला जायफळाने”
मी मग हातात घेऊन खरचं नकळत कुरवाळत विचार करत बसले. कसं वागतात आजकालच्या या मुली? हिला काहीतरी टेंशन आहे आणि उर माझं दडपलय. तिच्या चेहऱ्यावर मात्र त्याचा मागमुसही नाही. की खरच गार्गी म्हणतेय तसं मी आजकाल जरा जास्तच विचार करतेय का सगळ्याचा? रोजच्या अडचणींना सामोरं जायची ताकद कमी झालीय का माझी? आज आई असती तर म्हणाली असती “तुला सुख खुपतय अनू, दुसरं काही नाही” खरच आज आई असायला हवी होती. विचार करता करता माझी कॉफीच्या मगावरची पकड उगाचच घट्ट झाली. त्यामुळे हाथ थोडे थरथरलेही.
गार्गीने माझा खांदा हलवत विचारलं “असं काय बघतेस माझ्याकडे एकटक? कॉफी पी बरं अगोदर. मग बोलू”
काय करावं बाई या मनाला. किती वेळ बघत होते मी गार्गीकडे कुणास ठाऊक. हातातली कॉफी अजुन छान वाफाळत होती म्हणजे जास्त वेळ नसणार. मी अगदी झडझडून चेअरवरुन उठले आणि मनातील सगळे विचार निपटून काढत टेबलला टेकून उभी राहीले. अगदी मनापासुन आनंद घेत मी कॉॅफीचा एक घोट घेतला. कॉफीच्या कडवट स्मोकी चवीअगोदर जायफळाचा सुगंध जिभेवर पसरला. नाकाच्या शेंड्याला वाफेमुळे छान उबदार गुदगुल्या झाल्या. त्या एका घोटाने सगळं शरीर सैलावल्यासारखं झालं. मला कॉफीची खरच किती गरज होती ते त्या एका घोटाने लक्षात आले. मी गार्गीकडे “गुणी माझी पोर ती” अशा अर्थाचा कटाक्ष टाकला. तिनेही सगळं समजल्यासारखं छानसं हसून चिअर्स केल्यासारखा मग वर केला.
कॉफी पिऊन झाली. मी गार्गीच्या हातून मग घ्यायला हात पुढे केला तर माझाच हात धरुन म्हणाली “राहूदे मग. मी विसळेन नंतर. तू बस बरं येथे अशी”
वाघोबा म्हटलं तरी खाणारच आहे, वाघ्या म्हटलं तरी खाणारच आहे असा विचार करुन मी चेअरवर बसले. सैलावलेले शरीर पुन्हा अवघडले. डोळ्यात जगभराची चिंता, उत्सुकूता दाटून आली. गार्गीने तिची चेअर माझ्या समोर आणून अगदी गुडघ्याला गुडघे लावून बसली. माझे हात हातात घेत म्हणाली “अनू, तुला सकाळपासून आठवण येतेय ना अाज्जीची? होतं ग असं कधी कधी. कशाला किचनमधे राबत बसलीस मग आज? त्याने काय आठवण यायची थांबणारे का? जीव शिणवलास उगीच. इतकी हळवी नव्हतीस गं तू कधी”
लहानपणापासुन ही पोर अगदी अशीच. आईच्या मनातला आनंद एक वेळ नाही लक्षात यायचा तिच्या पण आतली खळबळ तिच्या नजरेतून सुटली नाही कधी. पार्थला जे समजावं असं मला वाटायचं ते नेहमी हिला अगोदर समजायचं. आज दुपारीही स्वतःला काय खुपतय ते बाजुला ठेऊन बाबाच्या मागे लागली ‘आईला बाहेर ने’ म्हणून. माझ्या हाताची बोटे तिच्या दोन्ही मुठीत होती. मग मीही मुठी घट्ट करत म्हणाले “माझं राहुदे गं जीजी. आजकाल होतं अधुनमधून थोडं असं सैरभैर झाल्यासारखं. तू गेलीस ना कबीरच्या मागे मागे त्याचं, तुमचं घरटं सजवायला. तेंव्हापासुन जरा जास्तच होतय असं. माझ्या मेलीचं राहूदे. तू सांगत होतीस ना काहीतरी?”
माझा एक हात सोडून दुसरा हात थोपटत गार्गी म्हणाली “नको अनू, आज राहूदे. तूच सांग ना आज्जीच्या काही आठवणी. तू आणि मामा कैऱ्या चोरताना तू झाडावरुन पडली होतीस ती. आणि मामाला शाळेत रागावले म्हणून तू गुरुजींना पट्टी मारली होतीस आणि मग घरी माळ्यावर लपली होतीस अंधार पडेपर्यंत ती सांग. कसली होतीस ग तू लहानपणी. मामाने तुला सांभाळायचे तर तुच त्याला सांभाळत होतीस. मामा ऐवजी तुलाच घाबरायचे ना शाळेत सगळे?”
गार्गीच्या बोलण्याने सगळं बालपण क्षणात डोळ्यांपुढून सरकुन गेलं. आई बाबांच्या आठवणीने अगदी व्याकुळ व्हायला झालं. पण स्वतःला सावरत मी हसले. गार्गीचा गाल जोरात ओढत म्हटलं “जीजी आईय्ये मी तुझी समजलं! समजतय मला सगळं. मी ठिके. तू सांग बरं काय झालय ते. ऑफिसमधे काही प्रॉब्लेम आहेत का?”
गार्गी जरा विचारात पडल्यासारखी झाली. मग एकदाचं घडा घडा बोलून मोकळं व्हावं तसं म्हणाली “अनू माझं आणि कबीरचं भांडण झालंय खुप. काही झाले तरी मी परत जाणार नाहीए आता त्याच्याकडे. तू ही गळ घालू नकोस”
गार्गीचे बोलणे ऐकले आणि मला एकदम हुश्श झालं. कार्टीने सकाळपासुन माझ्या उरावर धोंड ठेवली होती जणू. मी अगदी सकाळपासुन श्वास घेतच नव्हते असा मी दिर्घ श्वास घेतला आणि गार्गीच्या हातातून हात सोडवून घेतले. हसुन म्हटलं “छान! अजुन काही?”
डोळे मोठ्ठे करत गार्गी म्हणाली “बरी आहेस ना अनू? अगदी डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं काय हसतेस? मी जाणार नाहीए परत कबीरकडे. तुला नको असेल तर येथेही नाही राहणार”
मी फक्त तिच्याकडे पहात राहीले. गार्गी आणि कबीरची भांडणे काही नविन नव्हती. लग्नाला दोन वर्ष झाली तरी अजुन लहान मुलांसारखं भांडण सुरुच. या वेळी गार्गी जरा जास्त अस्वस्थ वाटत होती एवढंच.
मला शांत बसुन तिच्याकडे बघताना पाहुन गार्गी पुन्हा धुसफूसली “मी बाबाबरोबरच बोलायला पाहिजे होतं. तू कितीही जगापेक्षा दोन पावले पुढे असली विचारांनी तरी कबीरचा विषय निघाला की तू टिपीकल सासू होतेस हे काय मला माहीत नाही का? आणि तोही आई आई म्हणत चोंबडेपणा करत राहतो तुझ्यापुढे”
भांडणे आजची नसली तरी गार्गीला एवढं चिडताना मी कधी पाहिले नव्हते. तिला शांत करत मी म्हणाले “अगं ऐक तर जीजी. असं काय करतेस वेड्यासारखी”
माझं बोलणं मधेच तोडत गार्गी म्हणाली “काय ऐकू? तुझा लाडका जावई आहे ना तो! नेहमी त्याचीच बाजू घेतेस अनू तू”
तिने रागाने मागे ढकललेली तिची खुर्ची मी जवळ ओढली आणि विचारले “जीजी शांत होणारेस का? मला सांग काय झाले ते. कधी येणारे कबीर दिल्लीहून? कशावरुन भांडला तो तुझ्याशी? आणि असं भांडून गेल्यावर त्याचे लक्ष लागणार आहे का तिकडे कामात? एवढी शहाण्यासारखं वागतेस जीजी तू मग अशा वेळेस काय होतं ग तुला? मला सगळं व्यवस्थित सांग म्हणजे तो आला की तुझ्यासोबत मीही भांडते त्याच्याबरोबर”
गार्गी माझ्याकडे काही क्षण अविश्वासाने पहात राहीली मग गोड हसुन म्हणाली “खरच अनू?”
डोळ्यात पाणी ओठांवर हसु असलेली गार्गी किती गोड दिसत होती.

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान जमलिये कथा..भावनिक गुंता, नाते अगदी छान दाखवलंय.कुठेच नकलिपणा नाही जाणवला, वास्तविकतेच्या जवळ जाणार वाटलं.आणि लेखनशैलीपण खूप छान आहे..
पु.भा.प्र.

खूप छान जमलिये कथा..भावनिक गुंता, नाते अगदी छान दाखवलंय.कुठेच नकलिपणा नाही जाणवला, वास्तविकतेच्या जवळ जाणार वाटलं.आणि लेखनशैलीपण खूप छान आहे..
पु.भा.प्र.

आवडलं. हे लिखाण वाचून मला गौरी देशपांड्याची इन्डीयन समर ही कथा आठवते आहे. Happy

शैली सारखी आहे दोन्हीची!

प्रतिसादासाठी सगळ्यांचे धन्यवाद!
खरे तर असे लेखन हा माझा प्रांत नाही. त्यात कथानकही नक्की नाहीए. तरीही सगळ्यांनी आवडून घेतले म्हणून आभार.
ही कथा पुर्ण केल्यानंतर पुन्हा असला वेडा उद्योग करणार नाही हे नक्की. Happy

इंडियन समर मी वाचली नाही, वाचतो. काही साम्य आहे का?
कुठे वाचता येईल? गुगलवर उल्लेख मिळत नाहीए.

शाली - गौरी देशपांडेंच्या 'आहे हे असे आहे' ह्या पुस्तकातली 'इंडियन समर' ही कथा आहे. माझं आवडतं पुस्तक आहे ते.

मला तरी साम्य शैलीत आणि पात्र रचनेत जाणवलं , त्याहुन जास्त नाही!

@वावे, मग ठिक आहे. असा काही प्रतिसाद आला माबोवर तर भिती वाटते हो. Happy
गौरी देशपांडे यांचा मी प्रचंड फॅन आहे. आहे हे असं आहे मधे शोधतो ही कथा.
वरील दोन्ही भाग मी एकटाकी आणि डोक्यात काहीही कथासुत्र नसताना लिहिले आहेत. अगदी प्रांजळपणे सांगायचे तर दुसरा भाग चक्क ‘आज काहीतरी प्रकाशित करणे गरजेचे आहे’ असं वाटून तासाभरात खरडलाय. या भागामुळे आपले हसे होणार याची भिती वाटत असताना टाकला.
एखादा आठवडा असा येतो की किबोर्डवर एक वाक्य लिहिणे सुध्दा जमत नाही. तोच काळ सुरु आहे बहुतेक माझा.
असो. प्रतिसादासाठी धन्यवाद!

धन्यवाद पल्वली
प्रतिसादाबद्दल आणि घाबरवल्यासाठीही! Happy Wink

शालीदा,
माफ करा पण मला पहिला भागही आवडला नव्हता आणि दुसरा तर आजिबात नाही.
प्रकाशित करण्याआधी जर तुम्हाला हे मनासारखे ऊतरलेले नाही असे वाटत होते तर का प्रकाशित करावे. तुम्ही देत असलेली कारणेदेखील केविलवाणी आहेत. वाचकांची डिमांड पुर्ण करण्यासाठी लिहिणार असाल तर दर्जा घसरणार.
मला वाटते तुमच्याकडे ललित आणि कथा लिहिण्याचे जबरदस्त आर्ट आहे पण ह्या दोहोतले सायन्स तुम्ही मिस करता आहात. कल्पनेतल्या लोकांची रोजनिशी किंवा दिनक्रम लिहून काढणे म्हणजे ललित वा कथा नव्हे.
तुम्ही कथा लेखनाचा प्रयत्न जरूर चालू ठेवावा. पहिलीच कथा आहे तर ती एका भागात संपणारी असती तरी चालले असते.

मी अश्विनी, हे येथे टाकले म्हणून तर आता या टिप्स मिळत आहेत ना. तुम्हीच बोलता बोलता छान टिप दिलीत. पुर्वी लेख साभार परत येत, आता प्रतिसाद येतात. आपण कुठे आहोत ते समजते त्यामुळे. काय करावे या पेक्षा काय करु नये ते वाचकांमुळेच समजते.
प्रतिसादासाठी खुप धन्यवाद!

शाली : घाबरवण्याचा उद्देश अजीबातच नव्हंता. Happy आवडत्या लेखीकेचं स्मरण होईल असं लिखाण वाचून मस्तं वाटलं मला.

तुम्ही इतके बॅकफूटवर का खेळता आहात हे समजत नाहीये, विशेषत: ह्या कथेच्या लिखाणाबाबत!! लिहा बिनधास्त, लोकाश्रय नाही तरी आत्मानंद नक्की आहे ह्या प्रोसेसमधे!

पल्वली, माझं लिखाण वाचून जर तुम्हाला आणि वावे यांना गौरी देशपांडे यांच्या कथेची आठवण झाली असेल तर ते माझ्या लेखनाचे मोठेच कौतुक आहे असं मला वाटतं. (मी गौरी यांचा प्रचंड फॅन आहे)
माझ्या लेखनाची पहिली वाचक म्हणजे माझी बायको. तिला ही कथा मी आजवर जे लिहिलय त्यात सगळ्यात जास्त आवडली म्हणून मी प्रकाशित केली. तसेच मला आवडो न आवडो मी शक्यतो माबोवर माझे लेख टाकतोच कारण अनेक प्रतिसादातून कळते काय चुकले, काय बरोबर आहे. यात बॅकफुटवर खेळण्याचा प्रश्न येत नाही. उलट वर जे मी दोन तिन प्रतिसाद दिले आहेत त्यामुळे ज्यांना हे लेखन आवडले आहे त्यांचा मी अपमान करतो आहे असच मला वाटत राहीलं आहे. पण खरं सांगायचे तर ही कथा लिहिताना मला स्वतःला मजा आली नाही. लेखन सदैव स्वानंदासाठी असावे असे मिच एके ठिकाणी म्हटले आहे. पण तसे काही हे लिहिताना मला वाटले नाही, त्यामुळे नकळत माझे प्रतिसाद तसे आले असावेत. मला याची जाणीव आहे की कुणीही सातत्याने उत्तम देऊ शकत नाही. त्यामुळे मला फारसे वाईट वाटत नाही हेही खरं आहे.
पुनःप्रतिसादासाठी खुप आभार पल्वली!

वयामध्ये गोंधळून गेलो..... नंतर समजले.. शालिदा फारच खिळूवून ठेवलेत... आवडली..... पुढचा भाग लवकर येऊ द्या......

काल पासून वाचेन म्हणते आज मुहूर्त मिळाला.
हा भाग ही छान जमलाय. पात्रांची नावं नवीन पिढीतील आहेत हे विशेष.

मलाही आवडला हा भाग.

मला तर वाटलेल दुसरा भाग येणारच नाही. पण हे बेश्ट केलतं Happy

मला तर आप्पांची ही कथा सर्वात जास्त आवडली आहे. त्यांना स्वतःला का आवडली नाही कळेना.

Submitted by वैशाली हरिहर on 20 June, 2019 - 15:40 >>> शाली, सगळ्यात मोठी पावती तर ही आहे Happy , मग का खंत वाटते तुम्हाला

असो,

पुभाप्र.

पावत्यांचा मोठ्ठा गठ्ठा साठलाय घरी. Wink>> म्हणजे शालीजी तुम्ही याही बाबतीत भाग्यवान आहात हं. (संदर्भ - मैत्र)

Pages