(महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून जुनीच गजल प्रस्तूत करतोय. या आधी कंही समूहावर प्रकाशित केली आहे. ज्यांनी वाचली नसेल त्यांच्या साठी प्रस्तूत.}
जिंकणे हा धर्म अपुला हार आम्हा ठाव नाही
हार जेथे वास करते आमुचा तो गाव नाही
मर्द शिवराया विराजे सर्वदा ह्रदयी मनाच्या
शौर्य नांदे त्या प्रदेशी, भेकडांना भाव नाही
विठ्ठलाचे भक्त आम्ही रंगतो भजनी, अभंगी
भाकरी पिठले भुकेला जास्त मोठी हाव नाही
घेतली हाती पताका ऊंच धरण्या संस्कृतीची
दूर रस्ता एकमार्गी, जीवनी घुमजाव नाही
श्री भवानी दैवताचा ठेवतो आदर्श आम्ही
आज महिषासूर येथे शांत, त्याला भाव नाही
शेत कसण्या घाम अमुचा, पण इथे परकेच चरती
टोळधाडीला जरासा का इथे मज्जाव नाही?
लावुनी खांद्यास खांदा, जिंकली शिखरे हजारो
ध्येयमार्गी चालताना रंक कोणी राव नाही
कष्ट करणे पोट भरणे तत्व हे जोपासताना
मी कधी काळ्या धनावर मारलेला ताव नाही
या महाराष्ट्रात जन्मुन धन्य "निशिकांता"स वाटे
रांगडा झालो मराठी वेगळे मज नाव नाही
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
प्रत्येक शेर सुरेख आहे.
प्रत्येक शेर सुरेख आहे. गझलेतच एक छान मस्ती आहे? वाह!
मस्तच, सुरेख.
मस्तच, सुरेख.
सहज सोपी ! आवडली
सहज सोपी ! आवडली
सहज सोपी ! आवडली
डबल !