उन्हाळ्यात मातीच्या माठातील पाणी खूप थंड होऊन बर्फ बनू शकेल का?

Submitted by अतुल. on 8 April, 2019 - 14:35

न्हाळा सुरु झालाय. पाणी साठवण्यासाठी मातीचे माठ विक्रीस आलेत ते अनेकांनी विकत घेतले असतील, तर इतर अनेक जणांनी मागच्या वर्षी उन्हाळ्यानंतर पोटमाळ्यावर ठेऊन दिलेले माठ वापरायला काढले असतील. आजकाल घरोघरी फ्रीज आहेत. पण माठातल्या नैसर्गिकरित्या थंड झालेल्या पाण्याची गोडी वेगळीच. गमतीचा भाग असा कि फ्रीजमध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी उर्जा लागते (इलेक्ट्रिसिटी) पण हेच या मातीच्या माठात मात्र कोणतीही उर्जा खर्च न करता अगदी फुकटात पाणी थंडगार करून मिळते. असे काय असते बुवा या माठात? उन्हाळ्यात मातीच्या माठातील पाणी थंड का राहते? तसा हा जुनाच प्रश्न आहे. आपल्यापैकी अनेकांना शाळेत असताना याचे उत्तर अभ्यासलेले आठवतही असेल. एक ठराविक साच्यातले उत्तर असायचे. "मातीच्या सछीद्र भांड्यातून झिरपत बाहेर आलेल्या पाण्याच्या थेंबांच्या बाष्पीभवनासाठी या भांड्यातील पाण्यातून उर्जा घेतली जाते. त्यामुळे भांड्यातील पाणी थंड होत जाते". आठवते हे उत्तर? माध्यम कोणतेही असो. इंग्रजी असो वा मराठी. उत्तर मात्र तेच. शाळा कोलेजात असताना मी जेंव्हा जेंव्हा हे उत्तर वाचले होते तेंव्हा तेंव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते:

१. बाहेरच्या वातावरणात इतकी उष्णता उपलब्ध असताना या झिरपत आलेल्या पाण्याच्या थेंबांना बाष्पीभवनासाठी माठातल्या पाण्यातून उर्जा घेण्याची गरज का भासावी?
२. उन्हाळ्यात शेतात झाडाखाली ठेवलेल्या माठातील पाणी घरात ठेवलेल्या माठातील पाण्याहून अधिक थंड होते. ते का?
३. पाणी ठराविक प्रमाणातच का थंड होते? अजून अजून अजून थंड होत जाऊन अखेर त्याचे बर्फ का बनत नाही?
४. बाहेर जितके उष्ण वातावरण असेल तितके आतले पाणी अधिक थंड होत जाते. असेच जर घडत असेल तर यामागे जे काही मुलभूत तत्व दडले आहे ते शोधून काढून त्याचा पुरेपूर वापर करून, "उष्णता देऊन पाण्याचा बर्फ करता येईल" असे एखादे उपकरण वजा भांडे का बनवता येऊ नये?

माझ्याच काय किंबहुना अनेकांच्या मनात हे व अशासारखे प्रश्न आले असतीलच. त्यातल्या त्यात पहिल्या प्रश्नाने तर डोके अगदी भंडावून सोडले होते. आणि शेवटच्या प्रश्नातील कल्पना तर भन्नाटच होती. या तंत्रावर आधारित बनवलेल्या विशिष्ट अशा भांड्यात/उपकरणात पाणी भरायचे. ते चुलीवर/गॅसवर ठेवायचे. उष्णता द्यायची. कि पाच मिनिटात झाला बर्फ तयार. आहे ना भन्नाट? पण महाशय, असे भांडे आजवर तरी कोणी बनवलेले नाही. म्हणजे उन्हाळ्यातल्या उष्म्याने भलेही माठातील पाणी थंड होत असले तरी त्याच तत्वाचा उपयोग करून पाणी चुलीवर ठेऊन त्याचा बर्फ बनवणे हि गोष्ट इतक्या थेटपणे साधता येण्याजोगी नक्कीच नसणार.

शाळेत असताना त्या काळात फार फार मर्यादित माहितीस्त्रोत उपलब्ध होते. त्याद्वारे या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे कधीच मिळाली नाही. पण आजच्या इन्टरनेट युगाला धन्यवाद द्यावे तितके थोडेच. या विषयावर वेगवेगळे फोरम्स, ब्लॉग्स तसेच विकिपीडिया, युट्युब सारख्या वेबसाईट्सवर विविधअंगांनी विश्लेषण करणारे जे विवेचन उपलब्ध आहे ते वाचून माठातले पाणी थंड होण्याची हि प्रक्रिया अणुरेणूंच्या पातळीवर नक्की कशी घडते हे मी समजून घेतले व वरील प्रश्नांची वैज्ञानिकदृष्ट्या तर्कसंगत आणि समाधानकारक उत्तरे मिळवली. तीच इथे आपल्यासमोर मांडत आहे.

पदार्थाचे तापमान आणि त्याची अवस्था या गोष्टी अणुरेणूंच्या पातळीवर नक्की काय असतात?
प्रत्येक पदार्थाच्या मूलकणांत(अणू/रेणू) आकर्षणाचे बंध असतात. या बंधांची ताकद किती आहे त्यानुसार त्या पदार्थाची अवस्था अवलंबून असते. जसे कि घनपदार्थातील मूलकणांत हे बंध मजबूत असतात तर वायूच्या बाबतीत ते फार क्षीण असतात. या आकर्षणाच्या बंधांबरोबरच हे मूलकण सदोदित हालचालसुद्धा करत असतात (Brownian motion). एकमेकांवर आदळत असतात.
brownian-motion-vivaxsolutions.gif
पदार्थ उष्ण होतो (किंवा तापमान वाढते) तेंव्हा या कणांची उर्जा वाढते. ते अधिक वेगाने हालचाल करू लागतात आणि त्याचमुळे त्यांच्यातील बंधसुद्धा कमकुवत होतात. मूलकणांतील बंध कमकुवत झाल्याने पदार्थाची अवस्था बदलते. उष्णतेमुळे घनपदार्थाचे द्रव किंवा वायूत रुपांतर होते, तसेच द्रवपदार्थाचे वायूत रुपांतर होते. उदाहरणार्थ, उष्णतेमुळे बर्फाचे पाणी होते आणि पाण्याची वाफ होते इत्यादी. (याच्या अधिक तपशिलात जायला नको कारण हा मोठा आणि वेगळा विषय आहे. पण आपल्या विषयासंदर्भात इतके समजणे पुरेसे आहे)

पाणी नेहमी खोलीच्या तापमानापेक्षा थंड का असते?
आपण नेहमी अनुभवतो कि आपण राहत असलेल्या खोलीतील सर्व वस्तूंचे तापमान जवळजवळ सारखेच असते. पण याच खोलीत जर पाणी ठेवले असेल (बादलीत, तांब्यात वा पेल्यात) तर ते मात्र खोलीतल्या सर्वसाधारण तापमानापेक्षा थोडे थंडच असते. असे का बरे होत असेल? पाणी नेहमीच आजूबाजूच्या तापमानापेक्षा थंड का असते? याचे कारण वरच्या परिच्छेदात दडले आहे. पाण्याचे मूलकण (रेणू) एकमेकांवर आदळत राहतात. जे रेणू बादली, तांब्या वा पेल्याच्या बाजूला धडकतात ते त्या बाजूच्या धातूच्या कणांना धडकून पुन्हा मागे येतात. अशा रीतीने पाण्यातली उर्जा (तापमान) पाण्यातच राहते.

पण जे रेणू वरती पाण्याच्या पृष्ठभागावर असतात त्यांचे काय? पाण्याच्या पृष्ठभागावर असलेल्या रेणूंना आजूबाजूला व खाली असलेल्या इतर रेणूंचे बंध ओढून धरत असतात. यालाच पाण्याचा पृष्ठभाग तणाव (Surface Tension) असे म्हटले जाते. पण काही रेणूंमध्ये हे बंध तोडण्याइतकी उर्जा असते. असे रेणू पाण्याच्या पृष्ठभागावरील हवेला जेंव्हा धडकतात त्यातले बरेचसे हे बंधन तोडून हवेमध्येच मिसळून जातात. खोलीतली हवा कोरडी असेल तर त्यात पाण्याच्या रेणूंसाठी भरपूर जागासुद्धा उपलब्ध असते. मग असे उसळी मारणारे पाण्याचे रेणू तिथे सहज सामावून जातात. असे उर्जा असलेले रेणू एकदा पाण्याबाहेर निघून गेले कि मागे उरतात ते कमी उर्जा (हालचाल) असलेले रेणू. पण एकमेकांतील बंधांपुढे त्या क्षीण उर्जेचा निभाव लागत नाही व हे रेणू पाण्यातच राहतात. अशा रीतीने पाण्याचे तापमान (म्हणजेच पाण्यातील रेणूंच्या ठायी असलेली उर्जा) खोलीच्या तापमानापेक्षा थोडे कमी होऊन स्थिर होते. यालाच इंग्लिशमध्ये Evaporation Cooling असा शब्दप्रयोग आहे. हेच पाणी जेंव्हा आपण आपल्या अंगावर ओततो तेंव्हा त्वचेवर त्याचा पातळ थर तयार होतो. जाडी पातळ असल्याने रेणूंमधील बंध अजून क्षीण होतात आणि त्वचेच्या मूलकणांच्या उर्जेमुळे (साध्या शब्दांत 'त्वचेची उष्णता') पाण्याचे सर्व रेणू भराभर हवेत मिसळून जातात (बाष्पीभवन). त्वचेतील उष्णतेचा असा ऱ्हास झाल्याने आपल्याला थंड वाटते. निसर्ग हेच तत्व आपल्या शरीरात सुद्धा वापरतो आणि आपले शरीर थंड ठेवतो. उन्हाळ्यात घाम येतो त्याचे कारण हेच आहे. या घामाच्या पाण्याच्या रेणूंचे बाष्पीभवन होते व आपल्याला थंड वाटते.
water_evaporates.gif
काही द्रवपदार्थांमध्ये हे रेणूंमधले बंध अजून क्षीण असतात. उदाहरणार्थ अ‍ॅसिटोन, स्पिरीट इत्यादी. असे पदार्थ जेंव्हा उघडे ठेवले जातात तेंव्हा हि क्रिया अजून जलद गतीने होते आणि भांड्यातील सर्व द्रव भरभर उडून जाऊन अखेर भांडे थंडगार होते.

मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी अजून थंड का होते?
इतके सगळे मुलभूत ज्ञान मिळाल्यानंतर आता येऊ मूळ प्रश्नाकडे. मातीच्या भांड्यात पाणी अजून थंड का होते?
mud_pot_remain_cool.serendipityThumb.JPG
हातात हात घालून ग्रुपने जेंव्हा तुम्ही जत्रेतील गर्दीत वाट काढत घुसता तेंव्हा गर्दीमुळे आपसूकच सर्वांचे एकमेकांना पकडलेले हात सुटतात. अगदी तसेच इथे घडते. इथे गंमत अशी होते कि भांड्याच्या मातीच्या रेणूंमधून वाट काढत पाण्याचे उर्जायुक्त रेणू जेंव्हा बाहेर येतात तेंव्हा त्यांच्यातील बंध आपसूकच कमी होतात. आणि वर सांगितल्याप्रमाणे बाहेर असलेल्या कोरड्या हवेत हे रेणू पट्कन मिसळून जातात (कारण बंध खूप क्षीण झालेले असतात). उर्जा असलेले रेणू असे निघून गेल्याने भांड्यातील पाण्याची उर्जा (उष्णता) कमी होते. पाणी थंड होते. हि क्रिया वारंवार घडत राहते. सर्वाधिक हालचाल करणारे उर्जा असलेले पाण्याचे रेणू जसजसे बाहेर जात राहतात, तसतशी पाण्यातली उर्जा (उष्णता) कमी कमी होत जाते. पाणी थंड होते. एका क्षणी पाण्यातील रेणूंची उर्जा इतकी कमी होते कि ते मातीच्या कणांमधून वाट काढत बाहेर येऊ शकत नाहीत. तिथे तापमान स्थिर होते. पाणी त्याहून जास्त थंड होऊ शकत नाही.

म्हणजे अधिक उर्जा असलेले पाण्याचे रेणू बाहेर काढायचे आणि त्यांचे बाहेरच्या बाहेर बाष्पीभवन करून टाकायचे, कि पाण्यात फक्त कमी उर्जेचे रेणू राहतील म्हणजेच पाणी थंड होईल. असे ते तंत्र आहे. असेच असेल तर मग यासाठी मातीचेच भांडे कशाला हवे हा प्रश्न तुमच्या मनात येईल. अगदी बरोबर आहे. आपल्यापैकी अनेकांनी उन्हाळ्याच्या दिवसांत काही मोठ्या वाहनांना बाहेर समोरच्या बाजूला अडकवलेल्या पाण्याने भरलेल्या कापडी पिशव्या पाहिल्या असतील. त्यांना Desert water bag किंवा Canvas water bag असे म्हणतात.
canvaswaterbag.jpg
या पिशव्यांमध्ये हिच क्रिया घडते. पण वाहनाच्या वेगामुळे हवा प्रचंड वेगाने या पिशवीला धडकत राहते आणि बाहेर आलेले पाण्याच्या थेंबांचे त्वरेने बाष्पीभवन होते. त्यामुळे आतील पाणी वेगाने थंड होत जाते.

हुश्श्य! सगळे तत्व कळले तर एकदाचे. आता आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आपणच देऊ.

प्रश्न १. बाहेरच्या वातावरणात इतकी उष्णता उपलब्ध असताना या झिरपत आलेल्या पाण्याच्या थेंबांना बाष्पीभवनासाठी माठातल्या पाण्यातून उर्जा घेण्याची गरज का भासावी?
उत्तर: माठातल्या पाण्यातील उर्जा पाण्याच्या रेणूंना बाहेर ढकलण्यासाठी वापरली जाते. प्रत्यक्ष बाष्पीभवन बाहेरची हवा किती कोरडी आहे व तिचे तापमान काय आहे यावर अवलंबून असते. म्हणूनच थंड व दमट हवेत माठातील पाणी थंड होऊ शकत नाही.

प्रश्न २. उन्हाळ्यात शेतात झाडाखाली ठेवलेल्या माठातील पाणी घरात ठेवलेल्या माठातील पाण्याहून अधिक थंड होते. ते का?
उत्तर: घरात वाहती हवा नसते. त्यामुळे माठाबाहेरच्या थेंबांचे बाष्पीभवन झाले कि माठाभोवताली आर्द्र हवेचा थर जमतो. खोलीतल्या मंद हलणाऱ्या हवेने हा थर लवकर हलत नाही. परिणामी बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. हेच उन्हाळ्यात शेतात झाडाखाली कोरड्याठाक हवेचा झोत सतत वाहत असतो. अशा हवेत माठ असेल तर माठाबाहेर येणाऱ्या पाण्याच्या थेंबांचे वेगाने बाष्पीभवन होते व त्यामुळे माठातील पाणी अधिक थंड होते.

प्रश्न ३. पाणी ठराविक प्रमाणातच का थंड होते? अजून अजून अजून थंड होत जाऊन अखेर त्याचे बर्फ का बनत नाही?
उत्तर: याचे उत्तर वरील चर्चेच्या ओघात येऊन गेले आहे. पाण्याच्या रेणूंच्या ठाई असलेल्या गतीज ऊर्जेमुळे हे कण माठाबाहेर येतात. त्यामुळे आतील पाण्याची एकूण उर्जापातळी कमी होते. पाणी थंड होते. असे वारंवार घडते. एका क्षणी पाण्यातील रेणूंची उर्जा इतकी कमी होते कि ते मातीच्या कणांमधून वाट काढत बाहेर येऊ शकत नाहीत. तिथे तापमान स्थिर होते. पाणी त्याहून जास्त थंड होऊ शकत नाही. याशिवाय काही प्रमाणात उष्णता उर्जा बाहेरील वातावरणातून भांड्यात जाते. हे सुद्धा त्यामागचे एक कारण आहे. खोलीत शून्याला थोडेफार जवळपास तापमान असेल आणि हवेत अजिबात आर्द्रता नसेल तर माठातल्या पाण्याचे बर्फ होऊ शकते.

प्रश्न ४. बाहेर जितके उष्ण वातावरण असेल तितके आतले पाणी अधिक थंड होत जाते. असेच जर घडत असेल तर यामागे जे काही मुलभूत तत्व दडले आहे ते शोधून काढून त्याचा पुरेपूर वापर करून, "उष्णता देऊन पाण्याचा बर्फ करता येईल" असे एखादे उपकरण वजा भांडे का बनवता येऊ नये?
उत्तर: याचे उत्तर वरील दीर्घ चर्चेतून कळण्यासारखे आहे. त्यामुळे हे वाचकांवर सोपवतो Happy

(लेखात वापरलेली सर्व प्रकाशचित्रे अंतरजालावरून साभार)

संदर्भ:
1. https://en.wikipedia.org/wiki/Brownian_motion
2. https://www.new-learn.info/packages/clear/thermal/buildings/passive_syst...
3. https://physics.stackexchange.com/questions/256189/will-water-cool-faste...
4. https://physics.stackexchange.com/questions/64716/how-does-an-earthen-po...
5. https://www.quora.com/How-does-the-water-kept-in-an-earthen-pot-become-c...
6. https://physics.stackexchange.com/questions/97959/how-does-a-canvas-wate...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जमिनीची उष्णता वाहून नेण्याची क्षमता खूप कमी आहे त्यामुळे उन्हाने दुपारी जरी बाहेरची जमीन तापली तरी खालच्या पाण्यापर्यंत ती उष्णता पोहोचायला फार वेळ लागतो. दिवसभरातल्या उन्हाची झळ सुद्धा विहिरीच्या पाण्यापर्यंत तुलनेने फार कमी प्रमाणात पोहोचते. परिणामी पाणी थंडच राहते. हेच हिंवाळ्यात सकाळी बाहेरचे वातावरण थंड असले असले तरी विहिरीभोवतीची जमीन अद्याप उबदारच असते. म्हणून हे पाणी हिंवाळ्यात उबदार राहते>>>>>

सकाळी तलाव, नदीचे संथ पाणी उबदार असते. कित्येकदा त्यावर वाफ पाहिलीय (तितके गरम नसते अर्थात) याचे कारणही हेच आहे का? तलाव , नदी चे पाणी उबदार असले तरी पोहण्याच्या तलावातले मात्र थंड असते.

बर्फाचे आकारमान जास्त आहे पाण्यापेक्षा. वस्तुमान नाही Happy
१ किलो पाण्याचे आकारमान १ लिटर
१ किलो बर्फाचे आकारमान १ लिटरपेक्षा जास्त.

पाण्याचा बर्फ झाला तरी माठ फुटणार नाही माझ्या मते. कारण झिरपून पाणी कमी होणार ना. तेवढी जागा रिकामी झाली.

माठ फुटतो. मी लडाखमधे पाहिलेली गोष्ट आहे. लोखंडी पिंप वाकडे झाले होते. अर्थात त्या बर्फाचे तापमान शून्यापेक्षा कमी असते. कडक बर्फ असतो हा. बर्फ झाले आणि सभोवताली उणे तापमान असेल तर हे होईल.

ठोस वस्तू (दुर्वाहक नसलेली) लवकर तापते आणि लवकर निवते. कारण अणू रेणू घट्ट असल्याने उष्णतेचे वहन त्वरेने होते. पाणी किंवा द्रव पदार्थामधे अणू रेणू हे इतके घट्ट नसल्याने एका अणूकडून दुस-या अणूकडे उष्णतेचे वहन होण्यासाठी वेळ लागतो. वायूच्या बाबतीत तर हे अगदीच कठीण होत जाते कारण बंध अगदीच लूज असतात.

बरोबर, आकारमान. मघाशी शब्द आठवत नव्हता.

काचेची बाटली पाणी भरून चुकून फ्रीजर मध्ये ठेवली. दुसऱ्या दिवशी बाटली फुटलेली आढळली. माठ असा फुटलेला पाहिला नाही पण आतले पाणी प्रसरण पावताना त्याला आतून ढकलणार. तो प्लास्टिकसारखा फ्लेक्सिबल नसल्याने फुटणार.

याचे उत्तर वरील चर्चेच्या ओघात येऊन गेले आहे. पाण्याच्या रेणूंच्या ठाई असलेल्या गतीज ऊर्जेमुळे हे कण माठाबाहेर येतात. त्यामुळे आतील पाण्याची एकूण उर्जापातळी कमी होते. पाणी थंड होते. असे वारंवार घडते. एका क्षणी पाण्यातील रेणूंची उर्जा इतकी कमी होते कि ते मातीच्या कणांमधून वाट काढत बाहेर येऊ शकत नाहीत.

गुरुत्वाकर्षण शक्ती सुध्दा माठ मधील पाण्यावर क्रिया करत असेल ना ती शक्ती पाणी माठ बाहेरच खेचत नाही ka

किरणुद्दीन,

>> उष्णता जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते हा सिद्धांत आहे.

मान्य आहे पण केवळ इतक्याच्या सहाय्याने Evaporation Cooling स्पष्ट करता येत नाही.

१. रूम टेम्प्रेचरला पाण्याचे तापमान दोन-तीन अंशाने कमीच असते. असे पाणी आपण माठात ओततो त्यानंतर उष्णतेचे वहन या पाण्यातून (कमी तापमानकडून) बाहेरच्या वातावरणात (जास्त तापमानाकडे) होते हि वस्तुस्थिती आहे. हेच पाणी समजा माठाच्या बाह्य आकाराच्या क्षेत्रफळाइतक्या उघड्या स्टीलच्या भांड्यात ठेवले तर मात्र ते थंड होणार नाही. म्हणजेच माठाच्या पृष्ठभागाचा केवळ पाणी बाहेर आणण्यासाठी वापर होत नाही तर तिथे अजूनही काही क्रिया घडतात.

२. वातावरणाच्या सामान्य दाबाखाली रूम टेम्प्रेचरला अ‍ॅसिटोनचे बाष्पीभवन होते आणि कंटेनर थंड होतो. याचे कारण अ‍ॅसिटोनमधील रेणूंचे बंध पाण्याच्या रेणूंच्या बंधांपेक्षा कमकुवत असतात असे दिले गेले आहे.

वरील #१ आणि #२ चा एकत्रित विचार केल्यास माठातून बाहेर आलेल्या पाण्यातील रेणूंमधले बंध कमकुवत होतात म्हणून त्यांचे बाष्प होते हाच निष्कर्ष निघतो. त्यामुळे रेणूंचे बंध हे विचारात घ्यावेच लागतील. तांब्याच्या (धातू) कळशीला ओले कापड बांधून सुद्धा अगदी माठातील पाण्यासारखे पाणी थंड केले जाते. कारण कापडातील पाण्याचे रेणूबंध दुबळे झालेले असतात म्हणून त्याचे रूम टेम्परेचरला भराभर बाष्पीभवन होते.

>> तलाव , नदी चे पाणी उबदार असले तरी पोहण्याच्या तलावातले मात्र थंड असते.

इथे आपण पोहण्याचे तलाव तुलनेने (नैसर्गिक तलाव वा नदीपेक्षा) उथळ असतात हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे बाजूच्या जमिनीच्या तपमानापेक्षा वातवरणाच्या तापमानाचा जास्त परिमाण होईल.

>> गुरुत्वाकर्षण शक्ती सुध्दा माठ मधील पाण्यावर क्रिया करत असेल ना ती शक्ती पाणी माठ बाहेरच खेचत नाही ka

गुरुत्वाकर्षणमुळे फक्त पाणी माठात साठून राहते. गुरुत्वाकर्षणमुळे पाणी बाहेर आले असते तर ते माठाच्या वरच्या भागातून बाहेर आले नसते.

इथे आपण पोहण्याचे तलाव तुलनेने (नैसर्गिक तलाव वा नदीपेक्षा) उथळ असतात हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे बाजूच्या जमिनीच्या तपमानापेक्षा वातवरणाच्या तापमानाचा जास्त परिमाण होईल.
हे उत्तर पटण्या सारखे नाही

अतुल पाटील
रेफ्रिजरेशन असा सर्च देऊन वाचावे असे मी सुचवीन. मला सहा महीने समजले नव्हते. तुम्हाला कदाचित चटकन समजेल.
(माठाच्या पाण्यातील बाहेर आलेल्या थेंबांचे रूम टेम्परेचरला बाष्पीभवन होते हे अत्यंत महत्वाचे आहे. भाजलेल्या मातीची सच्छिद्र भिंत मध्ये असते. माठाच्या कडेला दोन पृष्ठभागांमधे (पाणी आणि भाजलेली माती) जी क्रिया होते ती तुम्ही वर दिलेली आहे. सच्छिद्रतेमुळे काही थेंब बाहेर येतात. तिथून पुढे तापमानाच्या फरकाने जे परिणाम होतात ते तुम्ही लिहीलेले आहेत. ते परिणाम आहेत. मुख्य क्रिया नव्हे. बाहेरचे तापमान हा घटक क्रिया घडवून आणणारा आहे.

>>>> इथे आपण पोहण्याचे तलाव तुलनेने (नैसर्गिक तलाव वा नदीपेक्षा) उथळ असतात हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे बाजूच्या जमिनीच्या तपमानापेक्षा वातवरणाच्या तापमानाचा जास्त परिमाण होईल.
>> हे उत्तर पटण्या सारखे नाही

नैसर्गिक तलाव, नदी आणि जलतरण तलाव या सर्व वॉटर बॉडीजचा पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या जमिनीच्या आणि हवेच्या क्षेत्राचे प्रपोर्शन पहा म्हणजे लक्षात येईल. (थंडी कितपत आहे त्यावर सुद्धा अवलंबून आहे. आपल्याकडे थंडीत तलावाचा उबदारपणा टिकून राहतो तर ज्या प्रदेशांत प्रचंड थंडी आहे तिथे तलाव गोठून जातात)

>> मठाच्या आतील गतीज ऊर्जा sampali तरी गुरुत्वाकर्षण पाणी pruthvi च्या बाजुला khechnarch

माठाच्या बाहेर येणारे पाणी गुरुत्वाकर्षण पेक्षा त्यातील त्यातील रेणूंच्या गतीज ऊर्जेमुळे येते (धाग्याच्या खाली संदर्भासाठी हा जो दुवा दिला आहे त्यामध्ये हे स्पष्ट केलेले आहे)

>> रेफ्रिजरेशन असा सर्च देऊन वाचावे असे मी सुचवीन.. मला सहा महीने समजले नव्हते.

रेफ्रिजरेशन मध्ये सुद्धा Evaporation Cooling चेच तत्व आहे. हा मुद्दा वर येऊन गेला आहे.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद _/\_

अतुल, रेणूंमधील ऊर्जा कमी केली की पदार्थाचे तापमान कमी होते हे खूप सुंदर प्रकारे समजावून सांगितले आहे.
बाष्पीभवन होताना आतली ऊर्जा वापरली जाते हेच लक्षात होतं पण त्यातील बाष्पीभवन हे जास्त प्रमाणात गती असलेल्या रेणूंचे होते आणि नसलेले रेणू जास्त काळ आत रहातात हे शाळेत शिकलेलं असलं तरी विसरायला झालेलं.
तुम्ही वाचून विचार करून खूप सुंदर उदाहणे देऊन समजावले आहे. लेख खूप खूप आवडला.
वेळ मिळेल तसं नक्की लिहीत रहा.

आपल्याकडे थंडीत तलावाचा उबदारपणा टिकून राहतो तर ज्या प्रदेशांत प्रचंड थंडी आहे तिथे तलाव गोठून जातात) >> तलावाच्या जवळच्या हवेचे तापमान कमी झाले की वरून गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. पाण्याचा बर्फ बनला की त्याचे आकारमान वाढते आणि घनता कमी होते आणि तो पाण्यावर तरंगतो. त्याने आतील पाण्याचा हवेशी संपर्क तुटून गोठण्याची प्रक्रिया मंदावते आणि पाण्याच्या आतील जीवसृष्टी टिकून रहाते.

त्तर: याचे उत्तर वरील चर्चेच्या ओघात येऊन गेले आहे. पाण्याच्या रेणूंच्या ठाई असलेल्या गतीज ऊर्जेमुळे हे कण माठाबाहेर येतात. त्यामुळे आतील पाण्याची एकूण उर्जापातळी कमी होते. पाणी थंड होते. असे वारंवार घडते. एका क्षणी पाण्यातील रेणूंची उर्जा इतकी कमी होते कि ते मातीच्या कणांमधून वाट काढत बाहेर येऊ शकत नाहीत. तिथे तापमान स्थिर होते. पाणी त्याहून जास्त थंड होऊ शकत नाही.

आपण सुरवातीला च अतिशय थंड पाणी माठात भरले तर ते तुमच्या मता प्रमाणे mathachya बाहेर झिरपत नाही पण प्रतक्षत तसे घडत नाही खूप थंड पाणी सुध्दा झिरपत राहत .
म्हणजे अजून काही तरी कारण असेल .तापमान स्थिर राहण्या साठी

पाण्याचे बाष्प हे ते पूर्णत: वायुरूपात असते तेव्हा रंगहीन असते आणि आपल्याला दिसत नाही.
वातावरणात पाण्याचे बाष्प नेहमी असते पण आपल्याला दिसत नाही. वातावरणात बाष्पाचा आशिंक दाब किती (म्हणजेच बाष्पाचे हवेतील प्रमाण किती) आणि वातावरणाचे तपमान किती यानुसार बाष्पाचे द्रवीकरण होते.

अशा द्रवीकरणाची सुरवात होते तेव्हा द्रवाचे अगदी सूक्ष्म कण तयार होतात जे हवेत तरंगतात. हे कण पांढुरके असतात आणि आपल्याला दिसतात, जशी वाफ आपल्याला दिसते.

नदी / तलावाच्या पाण्याचे बाष्पीभवन होत असते. परिणामी नदीवरील हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते. हिवाळ्यात हवा थंड असते. बाष्प जसे पाण्याच्या पृष्ठभागावरून वर जाऊ लागते तसे हवे मुळे थंड होऊ लागते. जेव्हा हिवाळ्यातील तपमान हे त्या बाष्पाचे द्रवीकरण करण्याइतपत कमी होते, तेव्हा द्रवाचे असे सूक्ष्मकण तयार होतात आणि ते आपल्याला वाफेच्या रुपात दिसतात.

हवेचं तापमान कमी झाले की हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी होते. म्हणून हिवाळ्यात धुके दिसते.
असं एक शाळेत शिकलेलं आठवलं Happy

मानव धन्यवाद....जानेवारीत गावी गेले तेव्हा बघितले आणि अजूनही पाण्यावर वाफा येतात याचे आश्चर्य वाटले.

हवेचं तापमान कमी झालं की डेन्सिटी वाढते म्हणून धुकं दिसते. तापमान वाढलं की हवा विरळ होऊन उष्ण हवा वर जाऊ लागते. त्यासोबत बाष्प वर जाते.

Pages