पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २६. राजकुमार (१९६४)

Submitted by स्वप्ना_राज on 25 November, 2018 - 09:23

220px-Rajkumar_(1964).jpg

एक आटपाट नगर होतं. त्या नगरात किनई शूरसेन नावाचा राजा राज्य करत होता. राजा आणि राणी कुसुमावतीला चंद्रसेन आणि शुभांगी अशी दोन मुलं होती. प्रजा राजाच्या कारभारावर खुश होती. लोक खाऊन-पिऊन सुखी होते. सगळीकडे आबादीआबाद होती. पण एक दिवस अचानक .......

राजे-राजवाडे आणि त्यांची संस्थानं खालसा होऊन इतकी वर्षं लोटली तरी सर्वसामान्य भारतीयांचं गोष्टीतल्या राजघराण्याबद्दलचं आकर्षण कायम आहे. रणांगणात पराक्रमाची शर्थ करणारा राजा, त्याची सौंदर्यवती राणी, सुकुमार राजकुमारी, राजस राजपुत्र, हत्ती-घोडे, सशस्त्र सैन्यबळ, जडजवाहीराने खचाखच भरलेला खजिना, आलिशान राजवाडे, त्यांच्यातले चोरदरवाजे, भुयारं, भव्य राजसभा, मंत्रिमंडळं, त्यांची खलबतं, स्वाऱ्या, मोहिमा, लढाया.......लहानपण संपलं तरी ह्या गोष्टी अजून तुम्हां-आम्हांला मोहात पडतात. आता हेच बघा ना......’एक आटपाट नगर होतं' असं म्हटल्यावर तुम्हीसुध्दा उत्साहाने वाचायला सुरुवात केलीत. हो की नाही? Happy मग आज अश्याच एका राजकुमाराची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ऐकणार ना?

हं तर आपल्या ह्या सूर्यवंशी राजकुमाराचं नाव आहे कुमार भानूप्रताप. तो ११ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला परदेशी शिकायला पाठवलेलं असतं. आता तब्बल दहा वर्षांनी तो परत येणार असतो. मधल्या काळात त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलेलं असतं. त्यांच्या ह्या राणीचं नाव असतं कलावती. त्यांना एक छोटा मुलगासुध्दा असतो. राजेसाहेब म्हणजे भानूचे वडील, हा छोटा भाऊ आणि लहानपणी त्याचं संगोपन केलेली त्याची दाई पद्मा सगळ्या प्रजेसोबत त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. नाखूष असतात त्या दोनच व्यक्ती - एक महाराणी कलावती आणि दुसरा राजाचा मुख्य सल्लागार असलेला तिचा भाऊ नरपत. आपला मुलगा आधी युवराज आणि मग राजा व्हावा म्हणून कलावतीने नरपतला हाताशी धरून भानू प्रतापचा येतानाच काटा काढायची योजना आखलेली असते. सावत्र आईच ती. पण पद्माने आपल्या मुलाला, कपिलला, आधीच भानूला सावध करायला पाठवलेलं असतं बरं का. त्यामुळे भानूला आपल्याविरुद्ध शिजत असलेल्या कटकारस्थानांची खडानखडा माहिती असते. तो आपण एकदम नालायक आणि बेजबाबदार असल्याचं नाटक करायचं ठरवूनच आलेला असतो. ह्या नाटकात कपिल त्याला साथ देणार असतो. भानू पद्माने पाठवलेलं चिलखत घालूनच येतो त्यामुळे नरपतच्या माणसांनी मारलेली गोळी लागूनही त्याला काहीही होत नाही.

राज्याच्या वाटेवर असताना तिथल्या कबिल्याचा सरदार भानूचं स्वागत करायला येतो. तो भानूला त्यांच्या देवीचं दर्शन घ्यायची विनंती करतो. पण आता वेळ नाही म्हणून भानू त्या विनंतीचा अव्हेर करतो. आता हे कोणत्या सरदाराला आवडेल, सांगा बघू? भानू तिथून निघणार एव्हढ्यात एक बाण लागून त्याच्या गाडीचा टायरच पंक्चर होतो. हा बाण आला तरी कुठून म्हणून भानू आसपास बघतो तेव्हा त्याला एक सुंदर तरुणी हाती तीरकमान घेऊन उभी असलेली दिसते. ही असते त्या सरदाराची मुलगी राजकुमारी संगीता. मग काय विचारता! आपला राजकुमार तिच्यावर एकदम लट्टूच होतो. पण त्याच वेळी संगीता नरपतच्याही नजरेत भरते. आपल्या नाटकाचा एक भाग म्हणून भानू संगीताचा हात धरतो. झालं! सरदार भडकतो पण नरपत मध्यस्थी करून भानूला राजवाड्यात घेऊन जातो.

राजवाड्यात भानूचं एकंदर बेताल वागणं पाहून बिचारे राजेसाहेब अतिशय दु:खी होतात. आपल्यामागे आपला मुलगा आपलं राज्य सांभाळेल ही त्यांची आशा धुळीला मिळते. भानूचं वडिलांवर खूप प्रेम असतं. त्यांना दु:खी झाल्याचं पाहून तो सगळं खरं खरं सांगून टाकायचं ठरवतो पण नरपत आणि कलावती नेमके त्याच वेळी तिथे टपकल्यामुळे त्याला काहीच बोलता येत नाही. धाकटा भाऊ कुमार मात्र भानूवर निरागस प्रेम करत असतो. पद्मादाई भानूला राजवाड्यातून निसटून पुन्हा विदेशात निघून जायची विनंती करते. त्यासाठी महालात असलेला एक चोरदरवाजासुध्दा त्याला दाखवते. पण भानू सध्या तरी कुठेही जायला नकार देतो.

कपिल आणि भानूला नरपतच्या कारवायांचा अंदाज घ्यायचा असतो. मग ते काय करतात तर वेश बदलून नरपतच्या जंगलातल्या वाड्यात जातात. तिथे संगीताच्या कबिल्यातला एक माणूस आलेला असतो. त्याला कबिल्याचा सरदार बनायची इच्छा असते आणि त्याला हाताशी धरून जनता भानूचा तिरस्कार करेल असं काहीतरी घडवून आणायचा कट नरपत रचत असतो. लोक एकदा भानूच्या विरोधात गेले म्हणजे त्याला काही झालं तरी बंड वगैरे होणार नाही अशी त्याची अटकळ असते. पण हे सगळं चोरून ऐकताना कपिल आणि भानू नरपतच्या दृष्टीस पडतात आणि त्याचे लोक त्यांना पकडायला त्यांच्या मागे लागतात. त्यांच्यापासून वाचायच्या प्रयत्नात ते दोघे नदीत पडतात. ते बुडून मेले असावेत असं समजून नरपतची माणसं निघून जातात. पण हे दोघे नेमके संगीता आणि तिचा कबिला राहत असतो ना त्या भागात जाऊन पोचतात आणि आपण राजकुमाराला भेटायला आलेले होतो अशी थाप मारून भगतराम आणि जगतराम ह्या नावाने तिथे काही दिवस राहतात.

इथे राजवाड्यात दिवाणजी राजेसाहेबांना सल्ला देतात की भानूला युवराजाभिषेक करून त्याच्यावर जबाबदारी टाका म्हणजे तो सुधारेल. भानूच्या उचापती बघून आपला मुलगा महामूर्ख आहे अशी राजेसाहेबांची अगदी पक्की समजूत झालेली असते बघा. तरी दिवाणजी आणि नरपत दोघांच्या सल्ल्याने ते हे करायला तयार होतात. पण आपला भानू अभिषेकाच्या दिवशीही संगीताची छेड काढतो. मग राजेसाहेब आणि कबिल्यातले लोक संतापतात. दुष्ट राणी पूजेचा बहाणा करून भानूला काली मंदिरात घेऊन येते. ते दोघं बोलत असताना तिथे एक बाण येऊन पडतो. त्याच्यावर एक चिठ्ठी लावलेली असते. त्यात राणीचं एक गुपित उघडं करायची धमकी देऊन खंडणी मागितलेली असते. भानू खोदून खोदून विचारतो तेव्हा राणी सांगते की माझी आई नाचणाऱ्या बायकांपैकी एक होती हे तुझ्या वडिलांना माहित नाही. अर्थात हा सगळा नरपतच्या कटाचा भाग असतो हे तुम्हाला सांगायला नकोच म्हणा. राणी भानूला त्याच्या दिवंगत आईची शपथ घालते आणि 'तू माझ्यासोबत देवळात होतास हे कोणाला सांगू नको' असं विनवते. तो मान्य करतो.

त्याच वेळी कबिल्यात काही लोक राजकुमाराकडून आलो असल्याची बतावणी करत येतात. 'राजकुमाराला संगीताचा नाच पहायची इच्छा आहे म्हणून त्याने तिला आपल्या महालात पाहुणी म्हणून घेऊन यायला सांगितलंय. राजीखुशीने आली तर ठीकच नाहीतर जबरदस्ती करून घेऊन या' असला निरोप ऐकून अर्थातच सरदाराच्या तळपायाची आग मस्तकात जाते. संधी साधून नरपत त्याला गोळी मारतो आणि ही गोळी राजकुमारने मारली अशी हूल उठवली जाते. सरदार प्राण सोडताना संगीताला आपल्या हत्येचा बदला घ्यायला सांगतो. तर त्याच्या कबिल्यातला नरपतला मिळालेला माणूस लोकांना भानूविरुध्द भडकावतो. कबिल्यातले लोक भानूचा बदला घ्यायला राजमहालात येऊन पोचतात तेव्हाही तो राजेसाहेबांसमोर 'आम्ही भानूला सरदारला मारून पळताना पाहिलं' असं धडधडीत खोटं सांगतो.

राजेसाहेब भानूला दरबारात बोलावतात. संगीताच्या वडिलांचा खून झालाय हे ऐकून तो अवाक होतो. अर्थात तो केल्याचा आळ आपल्यावर येतोय हे पाहिल्यावर त्याला धक्का बसतो. 'मी हा खून केलेला नाही' असं तो परोपरीने सांगायचा प्रयत्न करतो. राजेसाहेब त्याला विचारतात की 'हा खून झाला तेव्हा तू कुठे होतास'. पण राणीला दिलेल्या वचनामुळे बिचाऱ्या भानूला काही उत्तर देता येत नाही. संगीता तर 'भानूला कबिल्याच्या हवाली करा’ म्हणून हटून बसलेली असते. तेव्हा राजेसाहेब आदेश देतात की भानूला त्या दिवशी कैदेत ठेवून दुसऱ्या दिवशी सर्व प्रजेसमोर त्याचा निवाडा करण्यात येईल. भानूला महालात एका खोलीत कैदेत ठेवतात. पण पद्मादाई आणि कपिल त्याला तिथून सुटायला मदत करतात. राजकुमार पळून गेलाय हे संगीताला कळतं तेव्हा भडकून ती त्याला पळून जायला राजानेच मदत केली असा आरोप त्यांच्यावर करते. तर राजेसाहेब पण करतात की काहीही झालं तरी भानूला शोधून आणून शिक्षा करायची.

संपली आपली गोष्ट. काय म्हणताय? अशी कशी संपेल? भानूचं काय होतं? त्याला आपण खून केला नाही हे सिद्ध करता येतं का नाही? त्याचं आणि संगीताचं लग्न होतं का नाही? राजेसाहेबांना आपला मुलगा मूर्ख नाही हे कळतं का नाही? नरपतला शिक्षा होते का नाही? मी एव्हढंच सांगेन की पाचा उत्तराची ही कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली की नाही हे कळायला तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. आणि 'एक होतं आटपाट नगर' हे वाक्य ऐकून तुमचे कान टवकारत असतील तर तुम्ही तो नक्की पहा. Happy

मला माहित आहे ही गोष्ट ऐकल्यावर तुम्ही विचार करत असाल की हा राजकुमार भानुप्रताप साकारलाय तरी कोणी? उत्तर आहे शम्मी कपूर. आणि मंडळी तो अगदी every inch राजकुमार दिसलाय हो. त्याला एव्हढा सडपातळ निदान मी तरी ह्याआधीच्या कुठल्याच चित्रपटात पाहिला नव्हता. जोडीला सणसणीत उंची, त्याचे ते पिंगट डोळे, दाट केस, मोहक चेहेरा आणि खट्याळ हसू. और क्या चाहिये जी? भारतातल्या कुठल्या राज्यात एखादा राजकुमार भानुप्रताप असलाच तर तो अगदी असाच असला पाहिजे अशी माझी खात्री आहे. त्यातून काही मोजके प्रसंग सोडले तर त्याने ह्या चित्रपटात उड्या मारणं, चेहेरा वेडावाकडा करणं वगैरे फारसं केलेलं नाहीये. त्यामुळे तो ह्या भूमिकेत अगदी शोभलाय. त्याला तोडीस तोड संगीता उभी केलेय साधना शिवदासानीने. भिल्ल राजकुमारीच्या रंगीबेरंगी पोशाखात ती विलक्षण सुंदर दिसलेली आहे. तिच्या अभिनयात कमालीची सहजता आहे (असं आपलं माझं मत हो!). कुठे नाटकीपणा नाही की फुकाचा लडिवाळपणा नाही. राजेंद्रकुमारसारखे पोट सुटलेले मध्यमवयीन किंवा विश्वजितसारखे 'लाजरीच्या रोपट्याला' टाईप्स नायक आणि भलत्याच खात्या-पित्या घरच्या दिसणाऱ्या नंदा किंवा कृत्रिम अभिनयाचा रतीब घालणाऱ्या शर्मिलासारख्या नायिका बघून दमलेल्या माझ्या डोळ्यांना ही परफेक्ट जोडी कमालीची सुखावून गेली. भानूच्या वडिलांची भूमिका करणाऱ्या पृथ्वीराज कपूर ह्यांचा अभिनय त्यांच्या 'ये रात फिर ना आयेगी' मधल्या प्रोफेसरच्या भूमिकेतल्या अभिनयासारखाच, थोडक्यात प्रचंड एकसुरी, वाटला. No marks for guessing who plays Rani Kalawati. Happy सावत्र आईच्या भूमिकेसाठी मनोरमा किंवा ललिता पवार ह्यांच्याखेरीज पर्याय नाही. इथे मनोरमा आहेत. प्राणने खलनायक नरपत आवश्यक त्या विखारासह उभा केलाय. बाकी भूमिकांत ओम प्रकाश (संगीताच्या कबिल्यातला नरपतला सामील झालेला माणूस), टूनटून (ओम प्रकाशची मुलगी), अचला सचदेव (दाई पद्मा) आणि राजेंद्रनाथ (कपिल) दिसतात.

शैलेन्द्र-हसरत जयपुरी ह्यांनी लिहिलेली, शंकर-जयकिशन जोडीने संगीतबध्द केलेली आणि लता-आशा-सुमन कल्याणपूर-मोहम्मद रफी ह्यांच्या स्वरांनी सजलेली गाणी हा ह्या चित्रपटाचा हायलाईट आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये. ‘आ जा आयी बहार', ‘तुमने पुकारा और हम चले आये', ‘दिलरुबा दिलपे तू' आणि ‘इस रंग बदलती दुनियामे' ह्या सगळ्या गाण्यात संगीत, स्वरसाज आणि चित्रीकरण ह्या सर्व बाजू उत्तम जमल्या आहेत. ‘दिलरुबा दिलपे तू' हे तर भलतंच रोमँटिक वाटतं. ‘तुमने किसीकी जान को जाते हुए देखा है' हे आणखी एक अप्रतिम गाणं युट्युबवरून डाऊनलोड केलेल्या चित्रपटाच्या व्हर्जनमध्ये कापलं होतं ह्याचं मला फार दु:ख झालं. ‘नाच रे मन बदकम्मा' मधली ही 'बदकम्मा' कोण आहे ते कोणाला माहित असेल तर तेव्हढं सांगा बुवा. Happy ‘जानेवाले जरा होशियार यहांके हम है राजकुमार' ठीक आहे.

aajaaaibahar.jpg

अर्थात मेंदू पूर्णपणे बाजूला काढून ठेवायची कला अजून आपल्याला अवगत झालेली नसल्यामुळे काही गोष्टी खटकतात. उदा. भानूला विलायतेत शिकायला कशाला पाठवलेलं असतं? १० वर्षांच्या काळात तो एकदाही घरी का आलेला नसतो? त्याला मारणं आवश्यक असताना नरपत फक्त एकच हल्ला का करवतो? त्या दिवशीही बंदुकीने केलेला हल्ला यशस्वी झाला नाही तर काही बॅकअप प्लान का केलेला नसतो? नुसती दाढी लावल्यावर अगदी संगीतासकट कोणी भानूला का ओळखत नाही? भानूला महालात लपवून ठेवलंय ह्या शंकेने त्याला शोधायला रात्री आत गेलेली संगीता बाहेर पडेतो सकाळ कशी होते? भानू आणि कपिल महालातून पळाल्यावर जवळच कसे लपून राहू शकतात? भानू आणि संगीता गाता गाता जंगलातून एकदम चहाच्या मळ्यात कसे जाऊन पोचतात? वगैरे वगैरे वगैरे Happy बाकी चोचीत चोच घालणारी कबुतरं आणि एकमेकावर आपटणारी फुलं बर्‍याच दिवसांनी पाहिली Wink आजकाल ही अनुक्रमे कबुतरखाना आणि मुंबईतल्या (उरल्यासुरल्या!) बागा इथेच (दिसली तर!) दिसतात.

हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा माझ्या आईनेच काय पण बाबांनीही विशी पार केलेली नव्हती. ‘पिक्चर बघायला जायचं म्हणून आई आधीच जेवण, आवराआवर सगळं आटपायची. रात्रीचा शो असायचा ना. सरळ चालत जायचो थिएटरला. तेव्हा एसी वगैरे काही नव्हतं. जव्हारला एव्हढी थंडी असायची की शाल घेऊन गेलो होतो. आता मिळतं तसे खाण्याचे पदार्थ-कोल्ड ड्रिंक्स वगैरे काही मिळायचं नाही तेव्हा. लोक जेवून पिक्चर बघायला यायचे.’ आता घरच्या दिवाणखान्यात रात्रीच्या ९ च्या शोला (!) बसून आई चित्रपट बघता बघता मधूनच हसत लहानपणच्या आठवणी सांगत होती.....आणि मी?

मी काळाच्या न थांबणार्या लाटेसोबत वाहून गेलेल्या त्या ६०-७० च्या दशकात आता जाता आलं तर काय बहार येईल ह्याचा विचार करत होते. सावत्र आईच्या दुष्टपणाची गोष्ट रामायणाइतकी जुनी आहे. राजकुमार आणि राजकुमारीच्या प्रेमाच्या कथाही जुन्याच की. तरी पण एसी नसलेल्या छोट्याश्या थिएटरमध्ये साध्याश्या खुर्चीत बसून शाल अंगाभोवती घट्ट लपेटून घेऊन ह्या राजकुमाराची कथा पुन्हा बघायला मी अगदी एका पायावर तयार आहे. Happy तुमचं काय?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलंय.
आमच्या गावात एकुलत्या एक थेटरात एकदा अचानक जुन्या चित्रपटांची लाट आली. तेव्हा अकरावीत होतो त्यामुळे बरीच पहाता आली. हा चित्रपट तेव्हाच पाहिला. पण आता अजिबात आठवत नाहीये, कहाणी वाचूनही.

‘नाच रे मन बदकम्मा' मधली ही 'बदकम्मा' कोण आहे ते कोणाला माहित असेल तर तेव्हढं सांगा बुवा. >>>
साधनासोबतची नर्तकी आहे के. व्ही. शांती, मल्याळम नटी.
काही हिंदी चित्रपटात नर्तकी म्हणून झळकली.
https://www.veethi.com/india-people/k._v._shanthi-profile-8006-14.htm

बापरे
पाहिले मी घाबरून किंचाळले की ही निळ्या लेन्स लावलेल्या माधुरी आणि अनिल कपूर च्या राजकुमार ची कथा आहे की काय.
कथा रंजक वाटतेय.आणि खूप गुंतागुंतीची.बघायला युट्युब वर जायचं तर एक नोटपॅड घेऊन माईंड मॅप काढून ठेवून पॉज करत करत बघावे लागेल.तरच समजेल.
गाणी ऐकलेली आहेत.मस्तच आहेत.
तू असं छान लिहिल्यावर मगच पिक्चर पाहावे वाटतात.

स्वप्ना मलाही तुम्ही केलेलं परीक्षण खूप आवडतं. सगळा सिनेमा बघितल्याचा आनंद मिळतो पुढील लेखाची आतुरतेने वाट पहात आहे.

स्वप्ना मलाही तुम्ही केलेलं परीक्षण खूप आवडतं. सगळा सिनेमा बघितल्याचा आनंद मिळतो पुढील लेखाची आतुरतेने वाट पहात आहे.

मस्त! यात मला साधना खूप आवडली होती.

'तुमने किसी की जान को' हे माझ्या आवडत्या रोम्यांटिक गाण्यांपैकी एक आहे. `आजा आई बहार' गाण्याचा वाद्यवृंद अफलातून!

स्वप्ना,
नेहमीसारखं मस्त लिहिलंयस. आवडलं.
सिनेमा पाहिलाय पुर्वी. आवडलेला आहे.
मला श्म्मी कपूर, शशी कपूर वै चे सिनेमे आवडायचे. आवडतात.
गाणी सगळीच आवडती.
तुमने पुकारा और आणि तुमने किसी की जान को जास्त आवडीची. Happy

मानव, माहितीबद्दल खूप धन्यवाद! पण 'बदकम्मा' ह्या शब्दामागचं प्रयोजन विचारत होते मी. Happy
mi_anu, ह्या नामसाधर्म्यामुळेच तर मी कंसात चित्रपटाचं साल लिहिते Happy
pintee, मला 'अहो,जाहो' करायला कायद्याने बंदी आहे Proud

प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार! तुम्ही वाचताय म्हणून लिहितेय. नाहीतर 'जंगलमे मोर नाचा किसीने ना देखा' अश्यातली गत. Proud

मस्त परीक्षण !!! मी, ट्युशन बुडवुन हा सिनेमा बघीतला होता. आणी सरांचे टोमणे पण ऐकले होते. Proud

त्या वेळी शम्मी कपुरची फॅन असल्याने बरेच पिक्चर पाहीले. आता टिव्हीवर बघते. राजेंद्रनाथने पण धमाल केली होती.

हा चित्रपट मी १०- वयाची असताना कधीतरी टीव्हीवर पाहिला आहे. आता थोडेफार सीन आठवतात फक्त. साधनाच्या प्रेमातमात्र तेव्हापासून आहे Wink

> No marks for guessing who plays Rani Kalawati. > कोण आहे? निरुपा राय?

मनोरमा म्हणजे कोण बाई तेपण गुगलाव लागलं. फोटो बघून बहुतेक आठवल्यासारखं वाटतंय.

> राजेंद्रकुमारसारखे पोट सुटलेले मध्यमवयीन किंवा विश्वजितसारखे 'लाजरीच्या रोपट्याला' टाईप्स नायक आणि भलत्याच खात्या-पित्या घरच्या दिसणाऱ्या नंदा किंवा कृत्रिम अभिनयाचा रतीब घालणाऱ्या शर्मिलासारख्या नायिका > Rofl पण शम्मी कपूर आवडत नाही मला. तुमसा नही देखा बघितलाय का? त्यातपण तो बारीक आहे.

बदकम्मा/बत्कम्मा (दभा स्पेलिंग : bathukamma)
हा तेलंगणातला उत्सव आहे, जो नवरात्रात होतो, सती देवीचा. यात ताटामध्ये फुलांचा डोंगर रचतात त्यालाही बदकम्मा म्हणतात. एक ठिकाणी सगळ्यांच्या बदकम्मा ठेवून त्याभोवती बदकम्माची गाणी म्हणत, नाचतात.
आणि मग बदकम्मा डोक्यावर घेऊन तलाव / नदी / विहिरीत शिरवायला घेऊन जातात. त्यावेळेस ट्राफिक जाम होते, आणि काहीजण अचानक लक्षात येऊन "ओह! आज ड्राय डे आहे, श्या! " असे ओरडतात.

पण हे गाणे व नाच बदकम्मा शब्द नसला तर बदकम्माची आठवण पण येणार नाही एवढा वेगळा आहे.

https://m.youtube.com/watch?v=JR3wMMvFdTg

क्या लिखा है! वाह!
चित्रपट मी अगोदर एकदा पाहिला आहे कोल्हापूरात ते पण थिएटर मध्ये. एक थिएटर होतं तिथे असे जुने सिनेमे अधून मधून दाखवत. तेव्हा मला सुद्धा जाणवलं होतं की नुसती दाढी/मिशी लावली की लोक ओळखत कसे नाहीत? Uhoh पण तेव्हा हे नव्हते कळत की चित्रपटात हे सर्व चालते. Proud

बाकी शम्मी माझ्या आवडीचा असल्याने या सिनेमाची गाणी मला तोंडपाठ आहेत. दिलरूबा दिल पे तू.. नुसतंच रोमँटिक नाही तर सेन्शुअल आहे. आशा भोसले मेक्स इट मोअर सो Happy

आता हा चित्रपट पाहणे आले .. Happy

बदकम्मा/बत्कम्मा (दभा स्पेलिंग : bathukamma)
हा तेलंगणातला उत्सव आहे>>> हो का, मला लहन्पणी बाबा बदकम्मा म्हणायचे Lol
अजिबात चन्चल नव्हते म्हणून.. अवांतराबद्दल क्षमस्व स्वप्ना

किल्लि आता तुला मी बदकम्मा म्हण्णार>>>>>>>>
नको नको हो दक्षिणा Happy
तुमच्यासाठी या नावाने डू आयडी काढावा का Proud :विचार्मग्न भावली:

"पाहिले मी घाबरून किंचाळले की ही निळ्या लेन्स लावलेल्या माधुरी आणि अनिल कपूर च्या राजकुमार ची कथा आहे की काय." - राजकुमार म्हटल्यावर तुम्हाला शम्मी कपूर चा हा सिनेमा न आठवता, अनिल कपूर-माधुरी दिक्षीत चा राजकुमार आठवला हे वाचून गंमत वाटली. तसंही तो सिनेमा कुणाला 'आठवावा' इतका काळ सिनेबारीवर टिकला नव्हता. Happy

त्या सिनेमातली गाणी आणि निळे डोळे वाली माधुरी ही दोन्ही दुःस्वप्नां होती.त्यामुळे तो आठवला.मीपण फक्त ट्रेलरच पाहिलाय ☺️☺️