हिंदुस्थानी ठगुल्या

Submitted by मकरंद गोडबोले on 14 November, 2018 - 03:11

आम्ही लक्ष्मी रस्त्यावर रहायचो. हे काही वाटते इतके वाईट नाही. त्याकाळी लक्ष्मी रस्त्यावर घर असणे ही खास पुणेकर स्वाभिमानाची गोष्ट होती. कुणाला पटणार नाही, पण सोमवारी आम्ही लक्ष्मी रस्त्यावर क्रिकेट खेळलेलो आहोत. ही वल्गना किंवा अतिशयोक्ती नाही, आणि मी अजून डायनोसाॅर काळात जमा झालेलो नाही.
पण सांगायचा मुद्दा हा नाहीच आहे. त्याकाळी नव्या सिनेमाची जाहिरात, ही रिक्षा आणि हातगाडी अशा दोन भक्कम माध्यामातून केली जायची. दोन फलक एकमेकांना लावून केलेला एक तंबू, हातगाडीवर लादत असत. त्यात कर्णा घेतलेला एक माणूस लपून बसायचा. आधी सिनेमाची थोडक्यात गोष्ट सांगून, मग कलाकारांची यादी असायची. त्यात आम्ही काही ठराविक नावे यायची वाट बघत असू, “आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽणि हेलेन” असे शेवटी आले, की सिनेमा बघणे नक्की व्हायचे. या जागी हेलेन बदलून, मेहमूद, प्राण किंवा जाॅनी वाॅकर पण चालायचे. ही माणसे असली की सिनेमा नक्की मनोरंजक असायचा. हमखास शिट्ट्या घ्यायचा. ठरलेले हशे घ्यायचा. आणि सिल्व्हर ज्युबिली तरी घ्यायचाच.
पण सांगायचा मुद्दा हा नाहीच आहे. लहानपणी सिनेमा बघायला बाबांच्या खिशातून न सांगता पैसे घेतले, तर त्याला देव सुद्धा चोरी म्हणत नसे. त्याला वारसाहक्क असे गोंडस नाव आहे. एखाद दुसरेवेळा सिनेमासाठी खोटे बोलले तरी ते चालायचे. तो गुन्हा नव्हता. ते पाप तर मुळीच नव्हते. हे असे मीच काय पण बऱ्याच जणांनी केले असेल.
पण सांगायचा मुद्दा हा नाहीच आहे. आम्हाला सिनेमातले कळते. सवाई गंधर्व ऐकायला राग काय सा सुद्धा कळायची गरज नसते. जातिच्या श्रोत्याला चुकलेला सुर, आणि सजलेली तान, ही बरोबर कळतेच. शास्त्रीत संगीत कशाशी खातात हे माहीत नसून. तसे चोरिमारी करून आणि खोटे बोलून सिनेमा बघणाऱ्या जातिच्या सिनेमाखोराला, सिनेमातले काहीही कळाले नाही, तरी डोळ्यातून पाणी काढणारा क्षण, आणि त्याच्या नावाखाली, झालेली काॅमेडी ही नीट कळते.
पण सांगायचा मुद्दा हा नाहीच आहे. आम्हाला इतके फाटके समजू नका राव. आम्ही फार मोठ्या माणसांच्या चुका पाठीशी घातल्यात. आवडत्या नटाच्या सुमार डायलाॅगला डोक्यावर घेतलंय. अमितजिंना कूली, मर्द पर्यंत सांभाळून घेतले. पण म्हणून आम्ही त्यांना नंतरही झेलू असे नाही. फारच झाले की आम्ही डोक्यावरून कधीही फेकून देउ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा डोक्यावर घ्यायला आम्ही तयार आहोत, नाही ती आमची हौसच आहे. पण म्हणून तुम्ही काहीही आमच्या माथी मारू नका हो. आणि मारले ते मारले, तर ते आम्ही गोड मानून घेउ अशी अपेक्षा तर मुळीच ठेवू नका. कळले ना?
पण सांगायचा मुद्दा हा नाहीच आहे. काय झाले आज ठग्स आॅफ हिंदुस्तान नावाचा सिनेमा बघितला. तेव्हापासून हे असे होते आहे बघा. म्हणजे हिंदी सिनेमा म्हटला की आम्ही काही गोष्टी गृहित धरतो. तमिळ सिनेमा म्हटला का आम्ही बऱ्याच जास्ती गोष्टी गृहित धरतो. गोष्टी गृहित धरणे, आमच्या एकंदरीत बुद्धीची काही प्रमाणात अवहेलना करून घेणे हे आम्हाला मान्य आहे. दक्षिणेतला सिनेमा म्हटले की अजून थोडी अवहेलना आम्हाला मंजूर आहे. आम्ही तितके सहनशील आहोत. आम्हाला राग त्याचा नाही येत. ताणता येते म्हणून किती ताणायचे? हा प्रश्न आहे.
या सिनेमातील स्फूर्तीस्थाने हा जागोजाग जाणवत रहातात. (हल्ली चोरिला चोरी म्हणता येत नाही, त्याला स्फूर्तिस्थान म्हणावे लागते) मी सुरुवातीला ती मोजायचा प्रयत्न केला. पण पहिल्या काही मिनिटातच ती संख्या हजाराच्या वर गेली. (अतिशयोक्ती मी पण करू शकतो ना) मग मी ते सोडून दिले. नंतर नंतर तर शंका यायला लागली, की स्टोरी एका स्फूर्तीस्थानावरून दुसऱ्या स्फूर्तीस्थानावर सारख्या उड्या मारत्ये, आणि कदाचित मूळ कथा, जर असे काही जगात असेल तर, या स्फूर्तिस्थानांमधे कुठेतरी हरवून गेली असावी.
सिनेमाची सुरुवात तर चांगली होते. रोनीत राॅय नी छान भूमिका वठवली आहे. या अख्ख्या सिनेमामधे तो एकटाच कन्व्हिन्सिंग वाटतो. आणि दुसरा ब्रिटिश आॅफिसर. याला कायम छोटे रोल्स का मिळतात हे मात्र अजून कळत नाही. तसा हा कलाकार गुणी आहे. याला जास्त एक्स्पोजर मिळायला हरकत नाही. याच्या मुलिची भूमिकाही चांगली वठली आहे. फक्त प्राॅब्लेम किल्ल्याचा आहे. दिवाळी असल्यामुळे आम्ही तो किल्लासुद्धा कबूल करून घेतला हो. लहान मुलिनी केलेला इतका प्रोफेशनल किल्ला, साॅफ्टवेअरच्या इनबिल्ट इफेक्ट प्रमाणे विरून जातो. मला प्रत्यक्षात वाळूचा किल्ला असा पार्टिकल इफेक्टनी नाहिसा होतो, का ढेकळा ढेकळामधे विभागून पडतो, हे ही बघायला आवडेल. स्पेशल इफेक्टसवर लक्ष देता देता सिनेमाला काही मुळ स्वतःचा असा गाभा लागतो, एक स्वतःची अशी स्टोरी लागते, ही गोष्ट ही गुणी माणसे विसरली असावीत.
खरेतर स्टोरी आहे. चांगली आहे. ती दिलपकुमार नी आधी अजरामर करून ठेवलेली आहे. त्यातले त्याचे कामही खूपच सुंदर आहे. तो सिनेमाही सुंदरच आहे. पण इथे स्टोरी उलगडण्यापेक्षा, स्पेशल इफेक्ट, हे मूळ धोरण असावे असे वाटते.
तवायफ, ही हिंदी सिनेमाला, आणि पर्यायानी आम्हाला मान्य आहे. मुकद्दर का सिकंदर मधली रेखा आम्हाला मान्य आहे. तिला आम्ही डोक्यावर घेतले आहे. पाकिझा मधली मीनाकुमारी अजून दिलावर राज्य करते. त्यामुळे ही कल्पना आम्हाला मान्य आहे. पण या सिनेमात तिचे जे काही प्रदर्शन मांडले आहे, त्यावरून हे कळते, की सिनेमात रोल फक्त या प्रदर्शनासाठी निर्माण केला आहे. नाहीतर सगळी पात्रे १७६५ च्या वेशभूषेत, आणि फक्त तवायफ जवळपास नग्न, हे असे का? माझी खात्री आहे, की ती ड्रेपरी १७६५ नंतर २५० वर्षांनी झीनत अमान नी वापरली. तोवर ती त्या आझादच्या गुहेत तशीच पडून राहिली होती. ही तवायफ जर सिनेमात नसतीच, तर स्टोरिचे काय झाले असते? असा मला एक प्रश्न बरीक पडतो. तर आमच्या गरीब बिचाऱ्या मेंदूला काही हे कळत नाही. जाउंदे. हा सिनेमा बघितल्यापासून मेंदूला बऱ्याच गोष्टी कळत नाहियेत.
प्राण नी काही भूमिका अमर केल्या आहेत. त्यात हातावर घार असलेला वफादार, शूर आणि बेदरकार सरदार, लोन वूल्फ ही भूमिका तर फारच वरच्या दर्जाला आहे. अमिताभच्या वयानी मार खाल्ला. नाहीतर कदाचित त्यालाही हे जमले असते. मुळात प्रेक्षकांची सहानुभूती खेचणारी ही भूमिका. पण प्रत्येकवेळा एंट्री खुदाबक्षची आहे हे विसरून, ती अमिताभची आहे, हे लक्षात ठेवले, तर सगळ्या एंन्ट्र्यांचे कसे बारा वाजतात, याचे हे चांगले उदाहरण आहे. अगदी शेवटची, तो जिवंत असणार आणि शत्रूच्या ताब्यात असणार, हा अपेक्षित शेवट सुद्धा, त्याला बांधून ठेवलेले असतानाही, आमच्या मनात तो सुटणार, याची यत्किंचितही आशंका नव्हती. त्यामुळे त्या संपूर्ण घटनेची गंमतच निघून गेली. वर अमिताभची फाईट हा त्याचा खास गुण. दिवार पासून आम्ही त्या फाईटचे दिवाने आहोत. पण आता तो वयस्कर झालाय. त्याचा खाकी, हा या वयाचा सिनेमा, त्यात फार असे फाईट सीन नसताना, आम्ही डोक्यावर घेतला. अक्स तर अफलातूनच होता. त्यामुळे आता आम्हाला तो म्हातारा झालेला आहे, आणि वाट्टेल तशा मारामाऱ्या करू शकत नाही, हे कळलेले आहे, आणि ते आम्ही ॲक्सेप्ट केलेले आहे हे कळायला हवे. त्यात या वयाचे सैनिक युद्ध करतात, पण त्याच्यात वेग आणि कौशल्य यापेक्षा अनुभवाचा मोठा हात असतो, तो तसा दिसायला हवा ना? पण याच्यात सारख्या दोरिवरून इकडे तिकडे जाताना, सरळ उभ्याने जायचे, हा कवायती नियम बघायला ओंगळ वाटतो हो. मागे एका इंग्रजी सिनेमात तलवारिचा ॲक्शन बघताना, तलवारिचे हात करताना, हिरो अचानक दुसऱ्या हातात पिस्तोल घेउन एकाला त्यानी उडवतो हा इफेक्ट लै भारी वाटला होता. पण ते इतक्या वेळा वापरले आहे, की ती जुन्या काळची पिस्तोल, जिच्यात बॅरलमधून दारू ठासून, वरून शिसाची गोळी आत दाबायला लागते, मग ती उडते, ही अशी इतके काम करायला लागणारी पिस्तोल, दोनदा फायर करायच्या आधी, कोण भरून देतो? हे कळलेलेच नाही. कदाचित माझी अपेक्षा जरा जास्तच आहे. हा आपला काही लोकांनी एक मस्त सिनेमा काढलाय आणि त्याचे कौतुक करायच्या ऐवजी आम्ही त्याची थट्टा करतोय, हे ही चुकिचेच की खरे?
या सिनेमात कुणाच्या कामाबद्दल काहीच खोट नाही. कामे सुंदरच आहेत. गोची फक्त स्टोरिची आहे, आणि अगणित स्फूर्तिस्थानांची. अमिरखान त्याच्या त्याच्या कुवतिने काम चांगले करतो. पण पटत नाही. इतक्या कमी वेळात संपूर्ण मतपरिवर्तन झालेला माणूस. जो दुसरा हिरो आहे. हे मी आजपर्यंत बघितले नाही. त्याचे मतपरिवर्तन हे पूर्णपणे खोटे वाटत रहाते. तरी डोळ्यात काजळ घालायची काही गरज होती का?
बाहुबलीत एकावेळी तीनच बाण सोडले आहेत. या सिनेमाने त्याच्यावर कडी केली आहे. याच्यात चार बाण सोडले आहेत. हे तरी आम्ही प्रगती म्हणून घ्यावे का नाही? पण छे, आम्हाला आपल्याकडचे सिनेमे कायम दुय्यमच वाटतात हो त्याचे काय. आम्ही विलायती सिनेमेच डोक्यावर घेतो ना. पण तरिही गीता फोगाट, साॅरी, फातिमा साना शेख हिचा स्क्रिन प्रेझेन्स बरा आहे. निदान तिच्या भूमिकेसाठी ती योग्य कास्ट आहे असे तरी वाटते. कॅटरिना कैफ समोर ती छान उभी रहाते. पण हिच्या बाबतीत सुद्धा गलबतावरची दोरी पकडून गोल फिरत उलट्या उड्या मारत शत्रूची कत्तल करायची, हे जरा जास्तच वाटते. एकूणात काय सगळेच फाईट सीन्स हे युद्धाऐवजी रॅंपवर जास्त योग्य वाटतील असे आहेत.
पण सांगायचे ते नाहीच आहे. आणि हे मला चांगले माहीत आहे. कारण माझ्यासारखेच यांनासुद्धा काय सांगायचे आहे हे अजून कळले नाहीच आहे. आणि मुळात काय? तर मूळ मुद्दा हा नाहीच आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भारी लिहिलंय.
पण असले सिनेमे बघायला जा यचंच का? Happy
<<<<तरी डोळ्यात काजळ घालायची काही गरज होती का?>>>> Lol
आमीर ओव्हरअ‍ॅक्टींगचं दुकान आहे.

Lol भन्नाट! धमाल लिहीले आहे! मजा आली वाचताना.

बाकी मुकद्दर का सिकंदर मधली रेखा, बच्चन च्या करीयर मधला कुली चा "ट्रान्झिशन" माइलस्टोन वगैरे वरून बहुत दिनों के बाद कोई असली बच्चन फॅन देखा! रिस्पेक्ट.

होप तो दिलीपकुमार च्या चित्रपटाचा संदर्भ "क्रांती" चा नसावा. तो ही इतकाच विनोदी चित्रपट आहे.

१७६५ + २५० = २०१५. त्या साली अमानांची झीनत तशी ड्रेपरी का वापरेल आणि वापरली तरी तिला कोण बघेल ? Wink

पण सांगायचा मुद्दा हा नाहीच आहे. लेख प्रचंड आवडलाय.

भारी लिहीलेय Lol

तरी डोळ्यात काजळ घालायची काही गरज होती का?>>>> Lol
आमीर ओव्हरअ‍ॅक्टींगचं दुकान आहे.
>>>>>>
दरवेळी आपण काहीतरी वेगळे कॅरेक्टर उभे केले पाहिजे हा हट्ट त्यालासुद्धा रंगरंगोटी कलाकार बनवू लागलेय.. सावरायला हवे त्याने.

मस्त.