पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २४. महबूबा (१९७६)

Submitted by स्वप्ना_राज on 9 November, 2018 - 11:07

वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोsपराणि
तथा शरीराणि विहाय जीर्णा
न्यन्यानि संयाति नवानि देही

गीतेच्या दुसर्‍या अध्यायातला बाविसावा श्लोक. अर्थ आपल्या सगळ्यांना माहित असलेला. जसा माणूस जुने कपडे टाकून देऊन नवे परिधान करतो तसाच आत्मा जुनं शरीर टाकून देऊन नवं धारण करतो.

माणसाला पुनर्जन्माच्या संकल्पनेचं एव्हढं आकर्षण का? मृत्यूनंतर आपलं काय होतं हे कोणालाच माहित नाही. आपलं अस्तित्व एक दिवस - कदाचित आपल्या ध्यानीमनी नसताना - कायमचं संपून जाणार ही कल्पनाच भल्याभल्यांना घाबरवून सोडते. उलट मृत्यूनंतरही नव्या रुपात, नव्या शरीरात का होईना पण आपण ह्या जगात परत येणार हा केव्हढा दिलासा वाटतो. शिकल्या-सवरलेल्या मनाला ह्यावर विश्वास तर ठेवावासा वाटतो पण तो अंधविश्वास आहे की काय ही शंकाही पाठ सोडत नाही. मग शाळेत शिकलेला एक शास्त्रीय नियम आठवतो - उर्जा निर्माण करता येत नाही किंवा तिचा नाश करता येत नाही. फक्त ती एका रूपातून दुसर्यात रूपांतरित करता येऊ शकते. अत्यंत गुंतागुंतीची रचना असलेलं मानवी शरीर एक यंत्र मानलं तर आत्मा म्हणा किंवा प्राण म्हणा ते यंत्र चालू ठेवणारी उर्जाच. मग ती माणसाच्या मृत्यूनंतर दुसर्‍या रुपात जाऊ शकते का? प्रश्नाचं होय किंवा नाही असं ठाम उत्तर देता येणं कठिण. देव किंवा भूत मानणारे आणि न मानणारे ह्या तटांसारखेच पुनर्जन्मावर विश्वास असणारे आणि नसणारे असे दोन तट जे एकमेकांना कधीच भेटू शकत नाहीत.

पैकी अस्मादिक पुनर्जन्मावर विश्वास असणारया अलिकडल्या तटावर. त्यामुळे ही संकल्पना मध्यवर्ती असलेले हिंदी चित्रपट मला भारी आवडतात. मग तो मधुमती असो, कुदरत असो, ऋषी कपूरचा कर्ज असो किंवा एरव्ही ज्या शाहरुखचं तोंडही पाहायला मला आवडत नाही (त्याच्या पंख्यांनी माफ करावं!) त्याचा ओम शांती ओम असो. ह्या सगळ्या चित्रपटांमध्ये कथा इथून तिथून सारखीच. एक प्रेमी युगुल. आधीच्या जन्मात जन्मजन्मांतरी सोबत राहायच्या आणाभाका घेऊन झाल्यावर कोणीतरी काडी घातल्याने किंवा नियतीच्या दशावताराच्या खेळामुळे त्यांची ताटातूट होते. काही वर्षांनी दोघे पुन्हा जन्म घेतात, पुन्हा भेटतात, पुन्हा प्रेमात पडतात. आता त्यांच्या प्रेमात बिब्बा घालायला कोणीतरी परत सज्ज असतंच. पण हे नाटक सहसा दोन अंकी असल्याने दोन जन्मांत आटपतं. मग सुखांत. And they lived happily thereafter. क्कचित एखादा 'करन-अर्जुन' किंवा 'कर्ज' अपुरा राहिलेला सूड पुरा करण्यासाठी घेतलेल्या जन्माची कहाणी सांगतो. त्यात प्रेम हा कळीचा मुद्दा नसतो. बाकी सगळ्या चित्रपटांत मात्र पुनर्जन्माचा हा सारा खेळ असतो तो हरवलेलं प्रेम परत मिळवण्यासाठी, अर्धवट राहिलेला डाव पुन्हा मांडण्यासाठी. १९७६ साली आलेला शक्ती सामंतचा 'महबूबा' सुद्धा ह्या नियमाला अपवाद नाही.

इथे कहाणी सुरु होते ती दुसर्‍या जन्मात. सूरज हा नावाजलेला गायक आणि संगीतकार. त्याचे सगळे शोज अगदी हाऊसफुल होणारे. त्याचा पुढला कन्सर्ट जयपूरला होणार असतो. अगदी फ्लाईटची तिकिटं, हॉटेल सगळं बुकिंग झालेलं असतं. अचानक त्याला भेटायला त्याचा डॉक्टर मेहुणा विनोद येतो. तो शहरात काही औषधं घ्यायला आलेला असतो. बहिणीच्या मृत्यूनंतर सूरजला आपल्या व्यस्त दिनक्रमामुळे विनोद आणि आपला भाचा बंटू दोघांना भेटायला जायला फारसा वेळ मिळालेला नसतो. सूरज विनोदला एक रात्र राहायचा खूप आग्रह करतो पण विनोदच्या पेशंटला औषधाची गरज असल्याने त्याचं जाणं आवश्यक असतं. तो सूरजला आपल्याकडे यायचं निमंत्रण देऊन निघून जातो आणि सूरज आपल्या सेक्रेटरी सिन्हासोबत रीटाच्या घरी पार्टीसाठी रवाना होतो. ही रीटा त्याची चाहती असते आणि आता प्रेयसी. सूरजला मागच्या आठवड्यात मिळालेल्या अ‍ॅवॉर्डच्या आनंदाप्रीत्यर्थ तिने ही पार्टी आयोजित केलेली असते. तिचे वडील सूरजला बक्षीस म्हणून एक तानपुरा भेट देतात. हा तानपुरा चंदनगढच्या राजनर्तकीचा, रत्नाचा, असतो. त्यावर तिचं नावही कोरलेलं असतं. सूरज तो तानपुरा घेऊन घरी येतो.

त्या रात्री सूरज संगीताच्या, गाण्याच्या सुरांनी जागा होतो खरा . पण तो आवाज कुठून येतोय हे मात्र त्याला कळत नाही. भरीत भर म्हणून त्याचा सेक्रेटरी जेव्हा वाईट हवामानामुळे फ्लाईट रद्द झाल्याचं सांगत येतो तेव्हा त्याला काहीच ऐकू येत नाही. कन्सर्ट रद्द करता येणं शक्य नसल्याने दोघे कारने जयपूरला जायला निघतात. धुंवाधार पाऊस कोसळत असतो. वाटेत एके ठिकाणी एक माणूस त्यांची कार अडवतो आणि नदीला पूर आल्यामुळे पुढचा रस्ता बंद झालाय असं सांगतो. आता अश्या अनोळखी जागी रात्र कुठे काढणार असं सिन्हा त्याला विचारतो तेव्हा तो चंदनगढचा डाकबंगला जवळच आहे म्हणतो. तू पुढे जा, मी मागून सामान घेऊन येतो असं सिन्हाने सांगितल्याने सूरज एकटाच पुढे जाऊन डाकबंगल्याचा दरवाजा ठोठावतो. एका सुंदर तरुणीने दार उघडलेलं पाहून तो चौकीदार आहे का असं विचारतो. ती सांगते की आहे पण ह्या वेळी इथे नाहीये. ती चौकीदाराची मुलगी रत्ना असते. तिने दाखवलेल्या खोलीत विश्रांती घेत असताना सूरजला पुन्हा तेच गाण्याचे सूर ऐकू येतात. ते गाणं, रत्नाचं रहस्यमय अस्तित्त्व, तिचं त्याच्याकडे गूढ रीतीने पाहणं सगळं त्याला अतिशय अस्वस्थ करतं पण कश्याचाच अर्थ लागत नाही.

सकाळी तिचा, त्या गूढ गाण्याचा पाठलाग करत करत तो चंदनगढच्या राजमहालात पोचतो. पण तिथे पोचल्यावर अचानक गाणंही बंद होतं आणि रत्नाही कुठेतरी गायब होते. तिला शोधत फिरणाऱ्या सूरजला एक वृद्ध माणूस दिसतो. तो जेव्हा त्याला 'मला रत्नाने इथे आणलंय' असं सांगतो तेव्हा त्या वृद्धाचा विश्वास बसत नाही. तो म्हणतो की रत्नाचा मृत्यू होऊन अनेक वर्ष उलटली आहेत आणि तिचा आत्मा इथे राजवाड्यात भटकतोय. अर्थात ह्यावर सूरजचा विश्वास बसत नाही तेव्हा तो माणूस त्याला एका खोलीत नेऊन तिथे भिंतीवर टांगलेली रत्नाची तसबीर दाखवतो. ती बघून सूरजच्या पायांखालची जमीन सरकते कारण तसबिरीतली तरुणी थेट त्या चौकीदाराच्या मुलीसारखी दिसत असते. आणि मग त्या तसबिरीतली रत्ना जणू त्याच्याशी बोलू लागते. त्यांच्या आधीच्या जन्माची कथा त्याला उलगडून सांगते.

आधीच्या जन्मातलं त्याचं नाव असतं प्रकाश. त्याची आणि रत्नाची भेट त्याच महालात झालेली असते. ती राजनर्तकी असते. आणि तो असतो एक गायक. दोघांची जुगलबंदी होते. ती पाहून राजासकट राजसभेतले सर्व लोक खुश होतात आणि राजा त्याला राजगायक म्हणून नेमतो. त्याच्यावर मोहित झालेली रत्ना तानपुरा वाजवताना त्याची बोटं जखमी झाल्याचं गौरीकडून कळताच त्याला मलम पाठवते.

तर इथे प्रकाशच्या गुरूकडे ठाकूर हिम्मतसिंग येतात. त्यांनीच प्रकाशला १५ वर्षांपूर्वी गाणं शिकायला त्यांच्या आश्रमात आणून ठेवलेलं असतं. त्यांच्या मुलीशी, जमुनाशी, प्रकाशचं लहानपणी लग्न झालेलं असतं. हे लग्न व्हावं अशी त्याच्या वडिलांचीच इच्छा असते. अर्थात प्रकाश आश्रमात येतो तेव्हा तो लहान असल्याने गुरुजींनी अजूनपर्यंत त्याला ह्याबद्दल काहीच सांगितलेलं नसतं. महाशिवरात्रीच्या रात्री ते जमुनाला शिवमंदिरात घेऊन येतात जेणेकरून तिची आणि प्रकाशची भेट होईल. रत्ना प्रकाशसोबत फिरायला गेलेली असताना तिच्या बोलण्यातून त्याला कळतं की तिला फक्त आईच होती जी लखनौमध्ये एक तवायफ होती. रत्नाला रुढार्थाने कोणी पिता नाही हे कळूनही तो आपलं तिच्यावर प्रेम असल्याचं तिला सांगतो. दोघं जन्मजन्मांतरी एकत्र रहायची शपथ घेतात. पण तिचे उस्ताद बंदे अली खान ह्यांना तिची प्रकाशशी वाढती घसट अजिबात पसंत नसते. ते तिला त्याचं लग्न आधीच झालंय हे सांगतात. दरम्यान प्रकाशलाही आपल्या गुरुकडून आपलं लग्न लहानपणीच झाल्याचं कळतं. पण वडिलांच्या मृत्यूनंतर ठाकूर हिम्मतसिंगचे आपल्यावर अनंत उपकार आहेत ह्याची जाणीव ठेवूनही तो त्यासाठी आपल्या प्रेमाची कुर्बानी द्यायला तयार नसतो. तर एकुलत्या एका लेकीच्या भविष्याच्या काळजीने हैराण झालेला ठाकूर त्यांचं लग्न लावून द्यायचंच ह्या इरेला पेटतो.

प्रकाश रत्नाला भेटून आपण ५ वर्षांचे असताना आपलं लग्न झालं होतं आणि अश्या लग्नाला आपण मानत नाही हे सांगतो. पण आपल्यामुळे प्रकाशची समाजात छी-थू होईल ही भीती रत्नाला असते. तेव्हा प्रकाश सगळं सोडून दूर निघून जायचा प्रस्ताव मांडतो. त्या संध्याकाळी शिवमंदिरात येऊन तो तिची वाट पाहणार असतो. आता फैसला रत्नाने करायचा असतो. ती संध्याकाळी मंदिरात येते पण पेश्याने नाचणारी असल्याने पुजारी तिला गाभाऱ्यात प्रवेश नाकारतो. त्याच वेळेस तिथे आलेली जमुना तिला ओळखते आणि मध्यस्थी करून गाभाऱ्यात घेऊन जाते. ती जेव्हा आपली ओळख 'प्रकाशची पत्नी' अशी करून देते तेव्हा मात्र व्यथित झालेली रत्ना प्रकाशला न भेटताच तिथून निघून जाते. इतकंच काय तर प्रकाश तिला न्यायला तिच्याकडे येतो तेव्हा ऐषोआराम, संपत्ती, कीर्ती, वैभव सोडून मी तुझ्याबरोबर येणार नाही असं त्याला सांगते. दुखावलेला प्रकाश तिला टाकून बोलतो. आणि घरी जाऊन आपण जमुनाशी लग्न करायला तयार आहोत असं गुरुजींना सांगतो.

प्रकाशच्या लग्नात मुजरा सादर करायचं आलेलं आमंत्रण रत्ना स्वीकारते. लग्नाच्या रात्री 'पूरणमाशी'च्या रात्री रत्ना शिवमंदिरात आली होती हे सत्य जमुनाच्या तोंडून निघून जातं. प्रकाश तिला सांगतो की ती मला भेटायला आली होती, आम्ही पळून जाणार होतो पण तुझ्यासाठी तिने आमच्या प्रेमाचं बलिदान दिलं. प्रकाश रत्नाकडे जातो तेव्हा ती आणि तिचे उस्ताद शहर सोडून गेल्याचं गौरी सांगते. रत्नाने जाताना आपला तानपुरा प्रकाशसाठी भेट म्हणून ठेवलेला असतो. प्रकाश तिच्या शोधार्थ जातो तर ठाकूर आणि त्याचे लोक त्याला अडवायला त्याच्यामागे जातात. प्रकाश रत्नाला गाठून तिला आपल्याबरोबर येण्यास राजी करतो पण ठाकूरने त्याला अडवायला मारलेली गोळी लागून त्याचा बग्गीवरचा ताबा सुटतो. बग्गी दरीत पडते आणि रत्ना-प्रकाश दोघांचा मृत्यू होतो.

चंदनगढच्या महालातल्या रत्नाच्या तसबिरीसमोर उभा असलेल्या सूरजला हा सगळा पूर्वजन्म आठवतो. रत्ना अजून आपली वाट बघतेय हेही जाणवतं. पण हा सगळा धक्का त्याच्या सहनशक्तीपलिकडचा असतो. तेव्हढ्यात तिथे त्याला शोधत आलेला त्याचा सेक्रेटरी त्याला सावरून तिथून घेऊन जातो. पण आता रोजच्या दिनक्रमात सूरजचं लक्ष लागत नाही. रत्नाचा आवाज सतत त्याचा पाठलाग करत असतो. तो रत्नाचा तानपुरा जवळ घेऊन बसू लागतो. हवालदिल झालेला सिन्हा रीटाला आता लग्न करून टाका असं सुचवतो. पण त्याच्या आतच सूरज आपल्या मेहुण्याकडे निघून जातो. तिथे नियतीने त्याच्यासाठी एक वेगळंच कोडं घालून ठेवलेलं असतं. त्या गावातल्या पाणवठ्यावर त्याला हुबेहूब रत्नासारखीच दिसणारी एक तरुणी दिसते. ही खरं तर असते झुमरी. पण सूरजला ती आपली रत्नाच वाटते. सूरजच्या सुरांनी झुमरी त्याच्याकडे खेचली जाते. तिला काहीच आठवत नसतं तरी तो तिला परोपरीने तिचा आधीचा जन्म आठवून द्यायचा प्रयत्न करतो. अर्थात ह्या प्रयत्नात तो तिथल्या सरदाराच्या मुलाचा, अप्पाचा, रोष ओढवून घेतो कारण झुमरीच्या वडिलांनी मरताना सरदाराला तिचं लग्न अप्पाशी करायचं वचन दिलेलं असतं. शेवटी तो तिला चंदनगढच्या महालात नेऊन रत्नाची तसबीर दाखवतो. तो महाल, ती तसबीर पाहिल्यावर मात्र झुमरीच्या गतजन्मीच्या स्मृती जाग्या होतात. सूरज हाच प्रकाश आहे आणि आपण रत्ना आहोत हे तिच्या लक्षात येतं. पण तोवर सूरजच्या शोधात सिन्हा आणि रीटा गावात येऊन पोचलेले असतात. आणि सूरज-झुमरीच्या जवळीकीने सरदार आणि इतर गावकरी संतप्त झालेले असतात. नियतीने सूरज-झुमरीला पुन्हा एकदा त्याच वळणावर आणून उभं केलेलं असतं.

सूरज-झुमरीच्या प्रेमाची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होते का नाही ह्याचं उत्तर तुम्हाला माहित आहे. त्यामुळे पुनर्जन्माच्या संकल्पनेचं खास आकर्षण नसलेल्यांना हा चित्रपट 'शिळ्या कढीला उत' आणण्याचा प्रकार वाटू शकतो. पण 'जनम जनम का बंधन' आणि राजेश खन्ना ह्यापैकी एक किंवा दोन्हीचे चाहते असाल तर गुलशन नंदाच्या 'सिसकते साझ' ह्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट चुकवू नका. Happy

आता एव्हढं सांगितल्यावर सूरज आणि प्रकाश ह्या दोन्ही भूमिका राजेश खन्नाने केल्या आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. प्रकाशच्या भूमिकेत त्या उपरया मिशीसोबत तो थोडा अवघडलेला वाटत असला तरी सूरज म्हणून बेसनाच्या लाडवातल्या बेदाण्याइतका फिट्ट बसला आहे. पावसाळी रात्री धुवांधार पाऊस कोसळत असताना एकाकी रानात बसून वारयावर भुरूभुरू केस उडवत गिटारचे सूर छेडत तो बोलावणार असेल तर मी कितीही जन्म घ्यायला एका पायावर तयार आहे. Wink हेमामालिनीने राजनर्तकी रत्ना आणि गावातली तरुणी झुमरी दोन्ही भूमिका व्यवस्थित रंगवल्या आहेत. फक्त दोघींच्या संवादफेकीत थोडा फरक आणला असता तर बरं झालं असतं. मला नृत्याची काही जाण नाही. पण 'गोरी तोरी पैंजनिया' आणि 'आपके शहरमे' ह्या दोन्ही गाण्यात तिने सुरेख नृत्य केलं आहे. अप्पाच्या भूमिकेत प्रेम चोप्रा आणि डॉक्टर विनोद म्हणून सुजितकुमार आपापली कामं चोख करतात. बाकी भूमिकांत योगिता बाली (जमुना), असरानी (सेक्रेटरी सिन्हा), आशा सचदेव (रीटा), हरीन्द्रनाथ चट्टोपाध्याय (रीटाचे वडील), चंद्रशेखर (ठाकूर हिम्मतसिंग), नझीर हुसेन (प्रकाशचे गुरु), मदन पुरी (सरदार), मनमोहन कृष्ण (रत्नाचे उस्ताद), लीला मिश्रा (झुमरीची आई), मीना टी (गौरी) आणि मास्टर अलंकार (बंटू) दिसतात.

ह्या चित्रपटातलं 'मेरे नैना सावन भादो' हे गाणं - लताच्या आणि किशोरच्या आवाजातलंसुध्दा - माझं एव्हढं लाडकं आहे की अनेक दिवस चित्रपटाचं नाव 'सावन भादो' आहे असंच मला वाटत होतं. पुढे त्या नावाच्या चित्रपटात रेखा आहे हे कळलं. Happy आर. डी. सिंपली रॉक्स! 'बात पुरानी है, एक कहानी है, अब सोचू तुम्हे याद नही है, अब सोचू नही भूले, वो सावनके झुले' ह्या ओळींत आनंद बक्षीने पुनर्जन्मावरच्या सगळ्या चित्रपटांचं सार सांगून टाकलं आहे. Happy ह्या गाण्याबद्दलचा किस्सा विकिपीडियावर नक्की वाचा. ‘पर्बतके पीछे चंबेदा गाव' आणि 'चलो री' हीसुद्धा माझ्या लाडक्या गाण्यांच्या लिस्टमध्ये आहेत. ‘पर्बतके पीछे चंबेदा गाव' ह्या गाण्यात एका शॉटमध्ये मागच्या बर्फाच्छादित पर्वतात एक गोठलेला पाण्याचा प्रवाह (ह्याला हिमनदी म्हणतात का?) अक्षरश: कुंचल्याने रंगवल्यासारखा दिसतो हे आवर्जून सांगावंसं वाटलं. 'आपके शहरमे', 'जमुना किनारे आजा' आणि 'गोरी तेरी पैंजनिया' ऐकण्यासारखीच. राजेश खन्ना म्हणजे किशोरचा आवाज हे समीकरण असतानाही 'गोरी तेरी पैंजनिया' हे सूरजच्या आधीच्या जन्मातलं गाणं असल्याने राजेशने त्यासाठी मन्नाडेंचा आवाज सुचवला अशी माहिती विकिपीडियावर मिळते. त्यामानाने टायटल सॉंग 'महबूबा' मला तरी फारसं आवडलं नाही.

चित्रपटात मला जाणवलेली सर्वात मोठी त्रुटी म्हणजे जर झुमरी हा रत्नाचा दुसरा जन्म असतो तर सूरजला चंदनगढच्या डाकबंगल्यात भेटलेली तरुणी कोण असते आणि चंदनगढच्या राजमहालात त्याला रत्नाच्या तसबिरीजवळ कोणाचा आवाज त्याच्या पूर्वजन्मीची कथा सांगतो ह्याचं काहीही स्पष्टीकरण मिळत नाही. त्या राजमहालात सर्रास कोणालाही जाऊ-येऊ देतात, तिथली तसबीर घेऊन जाऊ देतात हे पटत नाही. ठाकूर हिम्मतसिंगने १५ वर्षांपूर्वी प्रकाशला आश्रमात सोडलेलं असतं. मग जमुना आपल्या १० वर्षांच्या तपस्येचा उल्लेख रत्नाजवळ का करते? उरलेली ५ वर्षं ती काय करत असते? मरायच्या आधी सगळ्यांचे आई किंवा वडील आपल्या मुलांच्या लग्नाबद्दलचं वचन देऊन त्यांची मान का अडकवून ठेवतात हे हिंदी चित्रपटातलं प्राचीन अगम्य कोडं कल्पांतापर्यंत सुटेल असं काही वाटत नाही. शेवटला घोड्यांवरचा पाठलाग मात्र मस्त वाटला.

चित्रपटातल्या नायिकांनी केलेल्या देहप्रदर्शनाबद्दल मागच्या काही लेखांवरच्या प्रतिक्रियांत बराच उहापोह झाला होता. ह्या चित्रपटात राजेश खन्ना आणि प्रेम चोप्रा दोघांनीही अहमहमिकेने दाखवलेली chest hair पाहून नायकांनासुध्दा तसं करायला सांगावं लागतं का ते स्वत:हून करतात असा एक मजेशीर प्रश्न मात्र पडला. है कोई जवाब? Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परीक्षण छानच! Happy
<< चित्रपटातल्या नायिकांनी केलेल्या देहप्रदर्शनाबद्दल मागच्या काही लेखांवरच्या प्रतिक्रियांत बराच उहापोह झाला होता. ह्या चित्रपटात राजेश खन्ना आणि प्रेम चोप्रा दोघांनीही अहमहमिकेने दाखवलेली chest hair पाहून नायकांनासुध्दा तसं करायला सांगावं लागतं का ते स्वत:हून करतात असा एक मजेशीर प्रश्न मात्र पडला. है कोई जवाब? >>

है! जरूर है! " नायिकानी अंगप्रदर्शन केलेले (बहुतांश पुरुषाना) ज्या कारणाने आवडते , तेच कारण पुरुषानी छातीवरचे केस दाखवण्यामागे आहे." सभ्यांच्या भाषेत त्याला 'सेक्स अपील' म्हणतात.

है! जरूर है! " नायिकानी अंगप्रदर्शन केलेले (बहुतांश पुरुषाना) ज्या कारणाने आवडते , तेच कारण पुरुषानी छातीवरचे केस दाखवण्यामागे आहे.सभ्यांच्या भाषेत त्याला 'सेक्स अपील' म्हणतात.
नवीन Submitted by sulu on 9 November, 2018 - 22:25
>>>
मग अनिल कपूरच्या केस मधे अपिल पे अपिल, अपिल पे अपिल म्हणावे लागेल.

मरायच्या आधी सगळ्यांचे आई किंवा वडील आपल्या मुलांच्या लग्नाबद्दलचं वचन देऊन त्यांची मान का अडकवून ठेवतात हे हिंदी चित्रपटातलं प्राचीन अगम्य कोडं कल्पांतापर्यंत सुटेल असं काही वाटत नाही. . } Ho

छान, नेटकं. खरतर चिरफाड करण्यासारखं बरच आहे यात.

मेरे नैना... च गारूड कित्येक वर्ष आहे.

गोरी तेरी पैंजनीया... गाण मात्र हसवतं.
काय ते खन्नाचे हातवारे!! किती तो आटापिटा
विषेश फजिती गोरी तेरी.. हां!! गोरी तेरी.. हां!! भयंकर हसू येतं.
चाहत्यांनी माफ करा पण हेमा वाईट नाचली आहे. ती अवघडल्या बाईसारखी नाचते. जरा लवचिकपणा चापल्य नाही.
हे गाण तिच्यावर वाया घालवलं आहे.
उदा: आम्रपाली मधलं साधारण तशाच पोषाखातल "जब नील गगन की छावं मे" पहा आणि मग हे परत पहा. सगळ्या चुका कळतील.
तसही इतर तिची नृत्ये पाहिली तर सगळ्या स्टेप्स सारख्याच वाटतात.

मी हा चित्रपट दोनेक महिन्यांपूर्वी बघायला घेतला होता, पण टायटल सॉंग बोअर झाल्याने बंद केला होता.
काल रात्री पाहिला. ठीक ठीक, प्रेडिक्टेबल.

*******स्पॉईलर अलर्ट********
शेवटल्या मारामारीत मला वाटलं की प्रेमचोप्रा चाकू फेकणार आणि राजेश खन्नाला वाचवायला मदनपुरी मध्ये येऊन हुतात्मा होणार. पण गोड शेवट आहे.

हा चित्रपट मी अजून पाहिला नाही, आता कदाचित पाहीनही.

राजेश खन्नाचे केस डोक्यावर कमी व दोन्ही कानांवर भरगच्च असे कुडाच्या छपरासारखे झाल्यानंतरचे चित्रपट मी मुद्दामहून पाहिले नाहीत. ती जुनी इमेज मनात जपत राहिले. अपवाद आपकी कसम. त्यात दोघेही past their prime आहेत तरी चित्रपट सुसह्य आहे.

बाकी लिखाण झक्कास झाले आहे. मला मात्र पुनर्जन्म बोअर करतात....

हेमा एक सामान्य नटी व नर्तकी होती. तिचे लाईव्ह कार्यक्रम सुद्धा पाहिलेत. ती प्रचंड ग्रेसफुल आहे पण नाच मात्र अगदी सामान्य. केवळ अफ़ाट सौंदर्याच्या बळावर तिने उच्चासन गाठले व टिकवले. मला हेमा प्रचंड आवडते. मी तिच्याकडून अभिनय, नृत्य या खात्यातून कधीही अपेक्षा ठेवली नाही त्यामुळे तिचे सिनेमे आनंदाने पाहू शकते.

वैजयंतीची हेमाशी तुलना होऊच शकत नाही. नृत्य व अभिनय दोघातही ती लखलखत्या तलवारीसारखी तळपत राहिली. राज तिलक नावाचा एक साठाव्या शतकातला चित्रपट केवळ तिच्या नृत्यासाठी मी पाहिलाय.

वैजयंतीला थोडीफार टक्कर, थोडीफारच, फक्त पद्मिनी देऊ शकली. वैजयंती दिसायला एक नंबर होती पण ती खूप लवकर जाड झाली. हेमा आजही स्वतःला मेंटेन करून आहे.

स्वप्ना, आम्रपाली बघ ग नक्की. कसली दिसलीय वैजयंती आणि नृत्ये तर अफाट. तिची पावले जमिनीवर टिकत नाहीत.

त्या चित्रपटात भानू अथैयानी सर्वप्रथम तो पोशाख डिझाइन केला, जो त्यानंतर प्रत्येकाने कॉपी केला. आम्रपालीत तिचे तीन चार पोशाख आहेत, प्रत्येकात खूप सुंदर दिसते.

. ती प्रचंड ग्रेसफुल आहे पण नाच मात्र अगदी सामान्य. केवळ अफ़ाट सौंदर्याच्या बळावर तिने उच्चासन गाठले व टिकवले. > सहमत.

का कुणास ठाऊक पण मला वैजयंती माला आवडत नाही. मधुमती आणि नया दौर बघितले, पण इतर गाजलेले जुने चित्रपट - संगम, गंगा जमुना वगैरे ती असल्यामुळे बघितले नाही.

अरे वा महबूबा का? हा ही चित्रपट मी पूर्ण कधीच पाहिलेला नाही. जेव्हा रिलीज व्हायचा होता तेव्हा आम्ही वय बारा. सिनेमे दाखवत नसत. पण विविध भारतीवर रात्री साडे नऊ व पावणे दहा अश्या पंधरा पंधरा मिनिटांच्या स्लॉट मध्ये रेडिओ प्रोग्राम ह्या नावाचे रेडिओ प्रोग्राम येत. हवा महल नावाच्या स्किट नंतर. हे चित्रपटाचे प्रमोशन असत. ह्यात ह्या सिनेमाचा रेडिओ प्रोग्राम ऐकला आहे. त्यात ते रात्रीच्या अंधारात लताचे ओ ओ ओ मेरे नैना ( भूत आहे ती) एकदम खरेच हॉटिंग वाटत असे. गाणी एकदम मोहवून गेली.

संगीत रिलीज झाल्यावर मैत्रीणी कडे एक रेकॉर्ड प्लेअर होता त्यावर त्यांच्याक डे एल पी होती गाण्यांची ती अनेक वेळा दुपारची ऐकली आहे.
त्यामुळे सर्व गाणीच पाठ झाली व गोरी तोरी एकद्म फेवरिट. चलोरी, आप के शहर मे ही त्या खालो खाल. मेरे नैनाच जरा लांबडे व बोअर वाटे.
जसे यूट्यू ब आले गोरी तोरी पहिल्यांदा दृश्य स्वरूपात पाहिले. नाच भयानकच आहे. नक्की कुठल्या शैलीत आहे ते शेवट परेन्त कळत नाही.

सिनेमा एकदा बघायचा प्रय्त्न केला. पण तो व ती हे निदान चाळीशीचे पस्तिशीचे ग्रोन अप अ‍ॅड्ल्ट दिसत असून ही पेरंट ल अप्रुव्हल साठी
का बरे जीवनचा सत्यानाश करून घेतात असा प्रश्न पडला. योगिता बाली म्हणजे तिला गोरी रेखा म्हणत तेव्हा. उगीच भाव खाते. सेकंड पार्ट काही बघितला नाही. व्हिलनचे नाव आप्पा? हे काही पटले नाही. तो तर खिचडी काक डी वाला प्रेमळ बाप्या आहे.

आप के शहर में एक उत्तम मुजरा नाच आहे. हे मला आवड तात. हेमा माळणीला कोण नाकारेल लाइफ मध्ये? असा जेनाइन प्रश्न पडला.

मला वा टते चित्रपटाचे दिग्दर्शक का निर्माते मुशीर रियाझ आहेत. हे नाव तेव्हा खूपच वेगळे व रोमँटिक वाटायचे. रेडिओ प्रोग्राम च्या सुरुवाती व शेवटी मुशीर रियाझ का मेहबूबा देखना न भुलीये की लगेच मागून भूतनी ओ ओ ओ. वो भी क्या दिन थे. Wink

हा सिनेमा मी गुंजन ला शिवछत्रपती सिनेमाची तिकिट न मिळाल्याने नाईलाजाने पाहिला होता. अगदीच लहान होतो. तरीही ते भूत वगैरे आणि मेरे नैना लक्षात राहीले. आता पुन्हा काही वर्षांपूर्वी ( जुने सिनेमे रिलीज होण्याचा शेवटचा काळ) पाहिला. गाणीच आवडली. राजेश खन्ना सहन होण्याच्या पलिकडे आहे. हेमा मालिनी तोंड बंद ठेवते तेव्हां अतिशय सुंदर दिसते. पण संवाद म्हणायला तोंड उघडले की हाय रे हाय...

यातली काही गाणी माझ्या आवाजात रेकॉर्ड केली आहेत. पैकी एक

वैजयंती मालाचा विषय चालू आहे म्हणून अवांतर
जुन्या पोशाषी सिनेमातले गाजलेले नगारा नृत्य कुठले ? त्या चित्रपटाचे नाव काय आहे ? नायिका वैजूआंटीच आहेत का ?

अरे! मला वाटलं होतं ह्या चित्रपटाबद्दल लिहिलं म्हणून जाम शिव्या पडतील Happy पुढचा लेख ज्या चित्रपटावर आहे तो पाहिल्याबद्दल नक्कीच पडतील ही खात्री आहे Happy बाकी मला नृत्यातलं काहीही कळत नाही हे तुमच्या प्रतिकियांवरून सिध्द होतंय. घरच्यांनी लहानपणी नृत्य शिकायला पाठवायला हवं होतं असं आजही वाटतं. असं म्हणतात की आपल्या अपुर्‍या राहिलेल्या इच्छा पूर्ण करून घ्यायला आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. बघू पुढल्या कुठल्या जन्मात जमतंय ते.

sulu, ते सो-कॉल्ड सेक्स अपील आहे मान्य. पण chest hair सेक्स अपिल वाटायला बाकीचं पॅकेज पण सेक्सी हवं ना. उदा. मोहरातला अक्षय कुमार Wink राजेश खन्ना क्यूट होता पण मला तरी कधीच सेक्सी नाही वाटला. प्रेम चोप्रा तर व्हिलन. सो जाने दो. आणि मला प्रश्न हा पडला होता की त्यांना असं करायला सांगितलं जायचं का फॅन फॉलोईंग वाढवायला ते स्वतःच करत असतील.

गुगु, हो चिरफाड करण्यासारखं खूप आहे. पण लेख अजून मोठा झाला असता म्हणून मोह आवरला. एका प्रसंगात सूरज झुमरीला सांगतो की प्रकाश-रत्नाला इथे पुरलं होतं तेव्हा विचारावंसं वाटलं की बाबा रे, तू तर मेला होतास. तुला कसं कळलं?? Uhoh

साधना, राजेश खन्नाच्या केसांबद्दल अनुमोदन. त्याने हेअर स्टाईल का बदलली काय माहित. थोडा अजागळ दिसतो त्यामुळे. वैजयंती जाड झाली लवकर? हे नव्हतं माहित. पद्मिनी मला जाडच वाटत आली. जिस देशमे गंगा बहती है मध्ये तर राज कपूरला कडेवर घेऊन त्या डाकूंच्या अड्ड्याला न थांबता १० फेर्‍या मारेल असं वाटतं. आम्रपालीत वैजयंती प्रचंड मस्त दिसते. पण अग हा चित्रपट यूट्यूबवर नाही. अजून कुठे मिळेल?

मानव, मलाही मदन पुरी शहीद होणार अशीच खात्री होती. पण वाचला तो. त्याला सरदार झालेला बघून 'कारवां' आठवला.

किरणुद्दीन, हेमा खरंच तोंड उघडलं नाही तर सुरेख दिसते. पण रोहन कन्हायचा रेफरन्स कळला नाही.

अमा, मस्त माहिती. अप्पा हे नाव मलाही विचित्रच वाटलं.

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार Happy

पण रोहन कन्हायचा रेफरन्स >>> संवादांदरम्यानचे तिचे कन्हणे कुथणे .. म्हणून कन्हाय. (रोहन कन्हाय हा वेस्टैंडीजचा प्रसिद्ध फलंदाज होता).

चांगलं लिहिलंय धागा आणि कमेंट पण.हा पिक्चर बऱ्याच लहानपणी बस मध्ये पाहिला होता.
उगीचच माझे डोळे श्रावण भाद्रपद, तरीही मन तहान तहान असे फालतू भाषांतर करत बसायचे. ☺️☺️☺️
किर्णूद्दीन तुमचे गाणे 10 सेकंद ऐकल्यावर त्या साईट ला पूर्ण सबस्क्राईब करा असा मेसेज येत असल्याने तिथपर्यंतच ऐकले.आवाज भरदार आहे.

https://youtu.be/cvjtYKraj0c
सुरवातीच्या पहिल्या मिनिटातच धर्मेंद्र आणि हेमा यांच्या नृत्य आणि अभिनय कौशल्याची प्रचिती येते.

नगारा नृत्य बहुतेक चंद्रलेखा मधले आहे. त्यात सौथी हिरविन आहे.

https://youtu.be/nZehXSjHg90

हा टीव्हीवर आलेला तेव्हा माझ्या बाबांनी नगारा नृत्यासाठी आम्हाला बघायला लावलेला.

आता कुणी पाहिले तर खास वाटणार नाही पण जुन्या जमान्यात खूप प्रसिद्ध होते हे गाणे व चित्रपट.

नंतर चंद्रकांता मालिका आली तेव्हा मला वाटले याच चित्रपटावर आधारित आहे..... खूप निराशा झालेली Happy Happy

सुरवातीच्या पहिल्या मिनिटातच धर्मेंद्र आणि हेमा यांच्या नृत्य आणि अभिनय कौशल्याची प्रचिती येते,>>>

जाउद्याहो, ती जोडी इतकी गोड दिसायची की नृत्य अभिनय इत्यादी किरकोळ गोष्टी कुणी मनावर घ्यायचे नाही. तुम्ही उतारा म्हणून 'गीर गया झुमका' बघा ...

amra1pali is actually on netflix. Vaiju looks ultimate Indian oomphy girl in the traditional clothes. i think even now that dress is called amrapali dress by Bollywood costume designers.

मानव
हेमामालिनी शास्त्रीय नृत्य शिकलेली आहे.
धर्मेंद्राचे नृत्याचे विश्वविद्यालय खूप थोड्या लोकांना माहीत आहे. तिथला पहिला विद्यार्थी स्वतः धर्मेंद्र आणि शेवटचा सनी देओल. बॉबीने या परंपरेला बट्टा लावला.

डोक्यावरचे छप्पर उडायला लागल्यावर काय करणार बिचारा...

तेव्हा हिरोईनी नैसर्गिकरीत्या सुंदर असत. पण त्या स्वास्थ्यावर तितके लक्ष देत नसत. त्यामुळे बहुतेक जणी खात्या पित्या घरच्या दिसत.

हिंदी चित्रपटांना विज्ञानाचे कुठलेच नियम मान्य नसतात. त्यात जेनेटिक्सही आलेच. आधिच्या जन्मातले हे अत्रुप्त आत्मे पुढच्या जन्मात पहिल्यासारखेच दिसतात. पुढच्या जन्मातल्या आईबापाचे रंगरुप, जाडी उंची, जीन्स don't matter!

सिने क्षेत्रात जिथे केतकी माटेगावकर सगळीकडे मोठी झाल्यावर स्पृहा जोशी न बनता प्रिया बापट बनते त्या सृष्टीत असे नगण्य नियम पाळायचेच नसतात ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

हा चित्रपट पाहिलेला नाही.
राजेश खन्ना हेमाचा पलकों की छाँव में आवडलेला.
प्रेमनगर आणि अंदाज पाहिलेत.
पुनर्जन्मावर आधारित लव्हस्टोरी - हमेशा- सैफ, काजोल, आदित्य पांचोली

हेमा मालिनीचे किनारा मधले नृत्य छानच आहे मीठे बोल बोले बोले पायलीया गाणे ऐका. ती आंधळी झालेली असते तरी खूपच छान नाचते. कथकची प्रॅक्टिस आहे. आणि नाच हे कथेच्या अंगातच आहे त्यामुळे संगीतही तसेच आहे. आपले श्रीराम लागू बहुतेक टीचर आहेत. शी इज गुड इन सम वेज . त्यात बसंती, खुश्बूतली बायको किनारा मधली नर्तकी हे तिचे मला आवडणारे रोल. त्यात ड्रीम गर्ल हे तर आहेच. सपनो का सौदागर मध्ये आली. जॉनी मेरा नाम मध्ये काय दिसते. चरस ड्रीमगर्ल जानेमन काहीही तिचे पिक्चर बघितलेत. गाण्यां साठी.

हा चित्रपट फारपूर्वी अधूनमधून पाहिला आहे बहुतेक. नीट आठवत नाही.

पुनर्जन्मावर विश्वास ठेवायचा कि नाही हे अजून ठरवले नाही पण कर्ज, ओम शांती ओम फार आवडले होते. मधुमती, गाणी सुंदर आहेत पण चित्रपट मला आवडला नव्हता. कुदरत बघितलाच नाही.

> ह्या चित्रपटातलं 'मेरे नैना सावन भादो' हे गाणं - लताच्या आणि किशोरच्या आवाजातलंसुध्दा - माझं एव्हढं लाडकं आहे की अनेक दिवस चित्रपटाचं नाव 'सावन भादो' आहे असंच मला वाटत होतं. पुढे त्या नावाच्या चित्रपटात रेखा आहे हे कळलं. > +१ Lol Lol

> ह्या चित्रपटात राजेश खन्ना आणि प्रेम चोप्रा दोघांनीही अहमहमिकेने दाखवलेली chest hair पाहून > अरे बापरे Sad

> धर्मेंद्राचे नृत्याचे विश्वविद्यालय खूप थोड्या लोकांना माहीत आहे. तिथला पहिला विद्यार्थी स्वतः धर्मेंद्र आणि शेवटचा सनी देओल. बॉबीने या परंपरेला बट्टा लावला. > लॉल बॉबी खरंच त्यांच्या घरातला वाटत नाही.

Pages