चूक कोणाची ?

Submitted by प्राजक्ता निकुरे on 6 November, 2018 - 06:08

चूक कोणाची ?

“ अगं , थांब किती पळतेस तू दम लागत नाही का गं तुला , जरा माझा तरी विचार कर गं मी काही तुझ्यासारखी तरुण नाही आता वय झालं आहे माझं “

“ हो आई पण मी कुठे पळत होते तूच तर हळू हळू चालत होतीस आता मला नाही जमत हळू हळू चालायला , चल ना गं पटापट घरी “

“ तुला का घाई झाली आहे पण लवकर घरी जायची “

“ अगं आई , मावशी आली आहे ना घरी खूप दिवस झाले मी मावशीला नाही भेटले “

“ हो हो भेटशील तुझ्या लाडक्या मावशीला चल लवकर “ हे सांगताना आईच्या डोळ्यात टचकन पाणी आले पण ते तिने तिच्या मुलीपासून लपवून ठेवले होते. घरी गेल्यावर काय होणार आहे हे फक्त तिच्या आईला माहित होते त्या निष्पाप मुलीला पुढे काय वाढून ठेवले आहे याची जाणीव देखील नव्हती.

सतत हसणारी दुसर्यांना हसवणारी सतत इतरांच्या मदतीसाठी धावून जाणारी प्रत्येक ठिकाणी आघाडीवर असणारी , अभ्यासात हुशार असणारी , खेळात चुणचुणीत असणारी अशी ही सरस्वती इयत्ता नववीमध्ये शिकणारी शाळेत नेहमी आघाडीवर असणारी सर्वांची लाडकी चंचल अशी. कोणालाही लगेच आवडेल असे सौदर्य तिच्याकडे होते आणि याच गोष्टीचे टेन्शन तिच्या घरच्यांना होते . एका झोपडीवजा घरात त्यांचा संसार चालू होता . घरात पाच जणे सरस्वती तिच्या दोन लहान बहिणी आणि आई वडील . आई - वडील दोघेही शेतमजूर ज्या दिवशी शेतात काम नसेल त्या दिवशी बाहेरगावी जाऊन ते काम करत होते . सरस्वती देखील कामात तरबेज होती. सुट्टीच्या दिवशी ती देखील काम करण्यास जात होती . घरात असणारी गरिबी आणि मुलीचे सौदर्य , तिच्यावर पडणाऱ्या लोकांच्या वाईट नजरा या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या आई वडिलांना खूप त्रास होत होता . त्यातच सरस्वतीची शहरात राहणारी मावशी तिच्या घरी आली होती तिने एक उपाय देखील सांगितला सरस्वतीच्या आई वडिलांना आणि त्यांना तो उपाय पटला देखील . सरस्वती घरी आल्या आल्या मावशीला जाऊन बिलगली तिला भेटून खूपच आनंद झाला होता ना तिला.

“ मावशी, कशी आहेस गं तू आणि इतक्या दिवसांनी का आलीस मला भेटायला तुला तर वेळच नसतो ना आमच्यासाठी “ गाल फुगवून सरस्वती म्हणाली .

“ अगं असं काही नाही पण कामामुळे मला वेळच नाही भेटत आणि माझ्या पिल्लूला मी भेटायला येणार नाही असं कस होइल आणि तुझी आठवण तर नेहमीच येत असते ना राजा ” लडिवाळपणे तिची मावशी तिला म्हणाली .

“ हो ना मावशी मग आता रहा चांगले १५ दिवस मस्त मज्जा करू आपण चालेल ना “

“ हो तर , मी चांगले महिनाभर थांबणार आहे येथे तू जा म्हणालीस तरी मी जाणार नाही येथून , बर मला चहा करून आणशील का ? आणि लवकर तयारी करून ये आपल्याला खरेदीला जायचं आहे “

“ हो चालेल मावशी, मी आलेच लगेच आवरून “

“ ताई , मी जाते तिला खरेदीला घेऊन तू घरी तयारी करून ठेव मी इतर कामे करून घेतली आहेत ठीक आहे ना निघू मग मी लवकर येतो आम्ही काळजी नको करुस ”

“ हम्म , ठीक आहे नीट जा आणि नीट या मी तयारी करून ठेवते “ - आई

मावशी आणि सरस्वती शहरात जाऊन मस्तपैकी खरेदी करून येतात त्यात साडी , दाग - दागिने, सॅंडल यासारखी खरेदी करून ते घरी परततात . सरस्वतीला काय चालू आहे याची कल्पना देखील नसते. घरी आल्यावर तिला घरी काही पाहुणे दिसतात काय चालू आहे कसला कार्यक्रम आहे का ? हे देखील तिला कोणी सांगत नाही .घराच्या अंगणात तिला छोटासा मंडप टाकलेला दिसतो . दुसऱ्या दिवशी तिला छान तयार करून अंगणांत आणले जाते तेथे तिची ओटी भरली जाते . बाहेर सनई चौघड्यांच्या आवाज घुमत असतो . ती सर्वाना विचारायचा प्रयत्न करते पण तिला कोणीही काहीच नाही सांगत . तीची आई डोळ्याला पदर लावून फक्त एका कोपऱ्यात उभी असते बहिणी, वडील काम करण्यात व्यस्त होते .

दारात पाहुणे आल्यावर तिची आई मावशी आरतीचं ताट बाहेर घेऊन जातात आणि त्या पाहुण्यांना ओवाळून आत आणतात . त्यांची उठबस केली जाते त्यांना काय हवं नको ते बघितलं जात . थोड्यावेळाने सरस्वतीला बाहेर आणलं जात तिच्या समोर आणि त्या पाहुण्यांसमोर अंतरपाट धरून मंगलाष्टका म्हटल्या जातात . अंतरपाट दूर केल्यानंतर सरस्वतीला तिच्या वयापेक्षा १० ते १२ वर्षाने मोठा असलेला नवरदेव तिच्यापुढे उभा असलेला दिसतो . या गोष्टी अचानक कळल्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकते . आपल्याला काहीही न सांगता आपल्या आई वडिलांनी आपले लग्न आपल्यापेक्षा १० ते १२ वर्ष वयाने मोठ्या असलेल्या माणसाशी लावून दिले हे तिच्या मनाला पटत नाही पण तिच्यापुढे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात पण त्याचे भान कोणालाही नसते तिच्या विश्वासघाताची कल्पना पण नसते कोणाला.

पाठवणीच्या वेळेस तिची मावशी तिला चार गोष्टी समजावून सांगत होती .

“ हे बघ बाळा , आम्हाला तू चुकीचं समजू नको आम्हाला समजून घे आम्ही असं का केलं ते आणि तुला मुद्दामच नाही सांगितलं आम्ही .आम्हाला वाटलं कि तू नकार देशील लग्नाला तू आपली परिस्थिती समजावून घेशील ना बाळा , तुझ्यासाठी निवडलेला मुलगा खरंच खूप चांगला आहे . चांगली नोकरी पण आहे शहरात घर आहे आणखी काय हवे आहे आपल्याला . बाळा , तू चांगली राहा त्यांच्यासोबत त्यांचं सगळं ऐकायचं त्यांना उलट उत्तरे द्यायची नाहीत कळेल ना तुला . आम्ही जे काही केलं ते तुझ्या चांगल्यासाठीच केलं हे लक्षात ठेव आम्हाला वाईट समजू नकोस आनंदी रहा बाळा “

मावशी असं बोलल्यानंतर आपण काय बोलणार कोणाला आणि काय जाब विचारणार हाच विचार सरस्वती करत होती . कोणाला काही विचारावे या मनस्थितीत पण ती नव्हती .

तिच्या आई वडिलांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला .

“ तुझ्याकडे असलेले सौदर्य , आपली गरीब परिस्थिती , तुझ्या मागे असलेल्या तुझ्या लहान दोन बहिणी तुझ्यावर असणारी ती घाणेरडी नजर यामुळे आम्ही तुझं लग्न लावून दिल गं आम्ही चुकीच वागलो तुझ्याशी पण आम्हाला समजून घे आणि माफ कर बाळा आम्हाला “ सरस्वतीची आई रडत होती आता , तिलाही हि गोष्ट पटली नव्हती पण ती तरी काय करणार तिच्या दुसऱ्या मुलींची पण तिला काळजी होती .

“ पण आई , तू हे मला आधी का नाही सांगितले मला न सांगताच तू हा निर्णय का घेतलास ? मी इतकी जड झाले होते का गं तुमच्यावर कि असं मला न सांगता न विचारता परस्पर माझं लग्न लावून दिल तेही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या माणसाशी , का आई बाबा तुम्ही असे का वागलात सांगा ना मला , मी जड झाले असं सांगितलं असत तर कुठेतरी दूर निघून गेले असते पण तुम्हाला त्रास नसता दिला मी पण अशी फसवणूक का केली माझी आई बाबा “ सरस्वतीचे रडून रडून डोळे सुजले होते आता तिचा कंठ दाटून आला होता जाब विचारण्यासाठी आता एक अक्षरही बाहेर पडत नव्हते तिच्या तोंडातून . तिच्या आई वडिलांनी तिच्या सौदर्याला आणि त्यांच्या गरीब परिस्थितीला दोष देऊन ते नामानिराळे राहिले. त्या निष्पाप मुलीकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता तिच्या नवऱ्यासोबत जाण्याशिवाय आणि वऱ्हाडी म्हणजे तरी कोण तर फक्त तिचा नवरा तो एकटाच आला होता त्याच्या लग्नाला आणि घरी जाताना तो सरस्वतीला घेऊन चालला होता. आज सरस्वतीची सगळी स्वप्ने धुळीला मिळाली होती शिकून चांगल मोठं व्हावं आई बाबांना आनंदी ठेवावं पण आज शिक्षणाचं स्वप्न तर पायदळी तुडवलं होत . सरस्वती तिच्या नवऱ्यासोबत तिच्या घरी आली . घर तरी कसे पुलाखालील एका झोपडपट्टीत तो राहत होता त्याच्या बद्द्लच एक खर खोट निघालं होत . हेही स्वीकारलं तिने . काही दिवस तिच्या नवऱ्याने तिची खूप चांगली काळजी घेतली . तिला काय हवं नको ते तो बघू लागला तिची मर्जी सांभाळू लागला तिला समजावून घेत होता ती देखील त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिसळून गेली होती . सरस्वती आधीपासूनच बोलायला खूप लाघवी होती बडबडी होती काही दिवसातच ती आजूबाजूला सगळ्याची लाडकी झाली . गल्लीतली पोर तिच्याशी बोलायला यायची ती पण निरागसपणे सगळ्याशी आपुलकीने वागायची . हळूहळू तिच्या नवऱ्याचा स्वभाव बदलू लागला तो तिच्यावर संशय घेऊ लागला तिला वाटेल तस बोलू लागला . तीच इतरांशी बोलणं त्याला आता खटकू लागलं होत . फुलासारखी काळजी घेणारा तो आता खूप बदलला होता . त्यात त्याला दारूचेही व्यसन होते कामदेखील नीट चालले नव्हते त्यामुळे ती चार घरची धुणी भांडी करायची आणि घर चालवायची दारूच्या व्यसनाने त्याचे काम देखील सुटले होते. दारूसाठी तो तिला पैसे मागू लागला आधीच घर कस बस चालायच त्यात त्याचे पैसे मागणे चालूच होते , ती तरी त्याला कुठून पैसे देणार ज्या दिवशी तिने त्याला पैसे नाही दिले त्या दिवशी तो तिला मारझोड करू लागला . तिच्या मनाविरुद्ध तिचा उपभोग घेऊ लागला . सकाळ संध्याकाळ तो दारू पिऊन तर्र होऊन राहू लागला . त्याच्या मनात येईल तस तेव्हा तिला मारहाण करुन तिच्याशी लगट करत तिला शिवीगाळ करन चालूच होत. त्यातच तिला दिवस गेले होते दोन वेळच जेवण मिळणेही खूप अवघड झाले होते तरीही ती आपल्या बाळासाठी कष्ट करत होती. यात सर्वात तिचे बालपण कुठेतरी आधीच हरवले होते पण आता तिचे तारुण्यही कुठेतरी हरवल्यासारखे वाटत होते. २० वर्षाची मुलगी आता चाळीशीची दिसत होती . कमी वयातच तिच्यावर मातृत्व लादलं गेलं होत . तरीही तिची तिच्या नवऱ्याला दया येत नव्हती. सकाळी उठायचं दारू ढोसायची तिच्याकडून पैसे हिसकावून घ्यायचे हेच काम सुरु होते त्याचे .

सरस्वती २० वर्षाशी असून देखील कमी वयात आलेल्या मातृत्वाने आणि अपार कष्टाने आता चाळीशीची वाटत होती . शरीराचा पूर्ण सापळा दिसत होता पोट आणि पाठ एका सरळ रेषेत आल्यासारखे वाटत होते , चेहऱ्यावर काळे पडलेले व्रण , अकाली पिकलेले केस तिला जर या अवस्थेत तिच्या आई वडिलांनी पाहिले असते तर त्यांनी ओळखले पण नसते तिला . गेल्या ६ वर्षात ती कधीही तिच्या माहेरी गेली गेली नव्हती कि तिचे आई वडील कधी तिची विचारपूस करायला आले असतील तिच्या घरी . लग्न झाल्यानंतर तिने जो उंबरठा ओलांडला होता तो कायमचाच अस वाटत होत. तिचे मूल देखील आता ४ वर्षाचे झाले होते तरी तिच्या नवऱ्याचे बेताल वागणे अजूनही सुरूच होते आणि आता या सर्व गोष्टी तिच्या सहनशक्ती पलीकडे गेल्या होत्या आजपर्यंत तो फक्त तिच्यावर हात उचलत होता पण आता तो मुलालाही मारू लागला . पैसे नाही भेटले तर तिच्या मुलाला विकण्यापर्यंत त्याची मजल गेली होती .

इतकी वर्षे अत्याचार सहन करून ती थकली होती तिला काहीही झाले तरी चालणार होते पण तिच्या मुलाला काही झालेले तिला आवडणार नव्हते . ती जेथे कामाला जात होती त्या ताईची मदत घेऊन तिने पोलीस केस करायची ठरवली आणि घटस्फोट घ्यायचा ठरवलं तिने तिच्या नवऱ्यावर पोलीस केस केली . पोलिसानी काही दिवस त्याला आत पण टाकले पण काही दिवसांनी तो सुटून परत आला आणि तिला त्रास देऊ लागला . तिने परत एकदा पोलिसांना सांगितले त्यांच्या भीतीने तो हे शहर सोडून निघून गेला. ती आता काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली पण तेथे तिला ओळखायला पण कोणी तयार नव्हते . एका अनोळखी माणसासारखी वागणूक मिळाली तिला . तिच्या आईने तर तिला स्पष्ट सांगितले तुझा आणि आमचा आता काहीही संबंध राहिला नाही तशीच हताश होऊन ती परत आपल्या घरी आली. सगळ्याच गोष्टी तिच्या हातातून निसटल्या सारख्या वाटत होत्या तरीही तिने माघार नाही घेतली . ती आणि तिचा मुलगा दोघेच आता घरी राहतात लोकांची धुणी भांडी करून ती मुलाला शिकवत आहे . तेच दोघे आता एकमेकांचा आधार झाले आहेत आता पोलीस केस करून १२ वर्षे झाली तरीही तिला अजून न्याय मिळाला नाही ज्यादिवशी तारीख असेल त्या दिवशी तिचा नवरा फरार असतो आणि कोर्ट पुढची तारीख देते तारखेवर तारीख पडत आहे पण तिला न्याय काही मिळत नाही अजूनही ती तिला न्याय मिळेल या अपेक्षेमध्ये आहे घटस्फोटाची वाट बघत आहे. शेवटी चूक झाली कोणाची ? तिच्या आई वडिलांची, नातेवाईकाची , समाजाची कि तिची , शेवटी चूक झाली कोणाची ? काय चूक झाली होती सरस्वतीची काहीच नाही तरी देखील तिच्या वाट्याला हे भोग का आलेत ? प्रत्येक वेळी चूक करायची दुसऱ्याने आणि शिक्षा भोगायची दुसऱ्याने किती दिवस हे असेच चालू राहणार आहे कधी बदलणार आहे समाजाची मानसिकता . काहीही चूक नसताना निष्पाप सरस्वतीला दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा भोगावी लागत आहे त्यात शेवटी चूक कोणाची होती ?

- प्राजक्ता निकुरे
Email Id. – prajaktanikure@gmail.com

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतं, चूक आई वडलांची.
ती मुलगी तर समोर आलेल्या सर्व परिस्थितीला खंबीरपणे सामोरी गेली.

बाय द वे... या कथेला प्रतिक्रिया का नाहीत?

eka sadhya saral mansachi pratikriya chuk nashibachi ahe.
pan nashib he aapan badalu shakto .....kahi veles kalte pan valat nahi yala aapan dusryachi chuk mhanto .
samajachi kahi bandhan astat ,tyatch gharachi abru ,aai vadilanchi man sambhalun he asha prakarche nirnay ghyave lagatat . by the way mala hi maaz lagna aadlya divshi sampunra tayari(lagnachi) zhalyavar kalale hote.