मुक्त मी !!!

Submitted by स्मिता दत्ता on 23 August, 2018 - 08:02

आज वयाच्या साठाव्या वर्षी मी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि बॉम्बच पडला सगळ्या घरात !नवरा-बायको म्हणून पटत नव्हतंच कधी., ते सारे ओढून ताणून चाललंय हे तर जगजाहीर होते. पण एकदम घटस्फोट? इतकी वर्ष एकत्र काढल्यावर हा असा विचित्र निर्णय घेण्याचं कारण काय? सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला. इतकी वर्ष जमवून घेतलं ना त्याच्याशी ? मग आयुष्याच्या या टप्प्यावर जेव्हा आपल्याला एकमेकांची ,एका साथीदाराची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा आता हे असं वेगळं राहून काय मिळवणार आहेस तू ? आणि प्रमोद चा काही विचार करशील की नाही? नातवंडं, मुलं ,सुना ,नातेवाईक मंडळी, समाज, बापरे किती लोक? इतक्या सगळ्यांना समजवायचं ... आणि काय सांगणार मी का वेगळी होती आहे ?? असं आत्ताच काय घडलं की मी हा निर्णय घ्यावा? यापुढे आयुष्यात काय मिळवायचे आहे? त्याच्यासाथीनं इथंवर आलीस ना ? सर्व काही मिळालं ना? मग आता हे नवीन काय ? बरं करिअरिस्ट आहेस म्हणावं तर तसंही नाही चारचौघींसारखं नोकरी घर मुलं आयुष्य तुझं. स्वतःचे असे काही अस्तित्वच नाही. मग आता यापुढेही राहिलीस तर काय बिघडणार आहे ? केवढे प्रश्न ? सगळे नुसते चाव चाव करतायेत. मला कोणी समजावून घेणार नाहीये हे तर मी गृहीतच धरलय. पण माझ मलाही आश्चर्य वाटते आता या वयात आपल्यात ही हिम्मत आली कुठून ? आणि खरच हे सारं नंतर निभावणार आहे का आपल्याला? म्हणजे पदोपदी विचारले जाणारे प्रश्न, समाज काही इतका पुढारलेला नाही आपला. तुला सहज जगू देईल का ?मग आत्ताच का हा अट्टाहास? काय हशील होणार यातून?

गेल्या पस्तीस चाळीस वर्षांचा पट असा सर सर डोळ्यापुढून सरकायला लागला... कॉलेजला ऍडमिशन घेतली तेव्हा कशी धीट होते मी. माझ्या मनाप्रमाणे वागणारी ,शिक्षणासाठी म्हणून हट्टाने गावाकडून शहरात परवानगी काढून करिअर करायला आलेली बीकॉम करायचं आणि मग पुढे काहीतरी पोस्ट ग्रॅजुएशन असा ठरवलेलं . गणित चांगलं होतं माझं त्यामुळे बरेच ऑप्शन्स होते. सिए पण करता येणार होते.कॉलेजात आल्यावर ऊत्साहात अभ्यासाला लागले प्रोफेसरांवर पण छान इंप्रेशन पडलं. नव्या मैत्रिणी झाल्या. तशी सेट झाले कॉलेजमध्ये! मजा येत होती नवीन वातावरणात. कॉलेजात मैत्रिणी नवं नवीन फॅशन करायच्या , मी पण त्यांच्यासारखे कपडे घालायला शिकले दोन वेण्या जाऊन एक वेणी आली कधी कधी पोनी टेल पण बांधायला शिकले . असं सगळं नवं नवं ते हवं हवं असं चालू होतं. तशी दिसायला वगैरे बरी असल्यामुळे मुलं पण मागे लागायची पण एक दोनदा मुलांनी छेड काढली तर त्यांना चांगलंच सुनावलं होतं. त्यामुळे नंतर कॉलेजात चांगला दरारा निर्माण झाला हिच्यापासून चार हात लांब राहायला हवं, नाहीतर कोणासमोर काही बोलेल आपल्याला अशी भीती बसली होती त्यांना, त्यामुळे मुलांशी तशी हटकून राहायला लागले नाही म्हणायला ग्रुपमध्ये कधीमधी मुलंही येत. काही कॉलेज इव्हेंट, ग्यादरिंग असलं तर ओळखी व्हायच्या. नंतर तसा ग्रुप झाला आमचा पण ते तेवढ्या पुरतच म्हणजे कधी चहा भज्जी खायची, गप्पा मारायच्या कधी कधी कुठल्या विषयावर तावातावाने भांडायचं. आपली मतं मांडायची .. म्हणजे अगदी धर्मेंद्र जितेंद्र हेमा, रेखा बच्चन पासून इंदिरा गांधी यशवंतरावांपर्यंत सारं काही चर्चा व्हायच्या आमच्या .. मजा यायची आमचे काही प्रश्न कॉलेजात मांडयायचे असले की मीच नेतृत्व करायची जशी काही लीडरच होते मी! अन्याय झाला की त्याची बाजू घेऊन भांडायला पण जायची. थोडक्यात काय तर मी भीत नव्हते होते कोणासमोर बोलायला. घाबरायचं कशाल आपली बाजू खरी असेल तर? शेवटी विजय सत्याचाच होतो असं माझ मत होते. म्हणजे तशी मी प्रसिद्ध होते,. हुशार असल्यामुळे प्राध्यापक पण चांगले ओळखायचे. डिग्री घेतली आणि पुढे शिकायला मास्टर्स ला ऍडमिशन पण घेतली.

पण दोन दोन-चार महिन्यातच घरून बोलावणे आले घरी गेले तर पाहुणे आलेले मला बघायला आलेले मी नाराज तच सगळा कार्यक्रम पार पाडला ... वाटलं आपण इतक्याआखडू पणा केला आहे,त्या मुळे समोरची माणसं नाराज होऊन जातील आणि आपल्याल ना पसंत करतील पण समोरनं पसंती आली आणि माझ्या लग्नाचा बार उडाला .

घरी सासुबाई लग्न झालेली नणंद आणि हे त्यामुळे वाटले की फार काही मोठा कुटुंब नाही त्यामुळे आपल्याला थोडं स्वातंत्र्य असेल असा वाटलं, पण लग्नानंतर थोड्याच दिवसात माझा भ्रमनिरास झाला . एकतर हे लोकं कुणाशीच जास्त संबंध ठेवत नसत. अगदी कोणी नातेवाईक नाही, मित्रमंडळी नाही . हेच तिघे फक्त .नणंदेच्या घराचे पण कधी यायचे नाहीत . एवढच कशाला तिचा नवरा पण फार कधी फिरकायचा नाही . शेजार पाजाऱ्यांशी पण संबंध नाहीं त्यामुळे मला फारच विचित्र वाटायचं.तसं फिरायला पण फारच क्वचित जाचो आम्ही ,तेपण सासूबाई बरोबर असायच्याच,एकदा याना सहजच म्हटले आपण दोघेच जाऊ या का सिनेमाला तर यांनी जाऊन त्यानं सांगितलं कि आपण दोघेच जाऊ म्हणते तर तू बैस घरात. झालं जे तोंडसुख घेतले त्यांनी "यांच्या मागे दोघांना मी एकटीने वाढवले कसली म्हणता कसली हौस नाही केली आणि आता मुलाच्या राज्यात जरा सुख मिळतेय तर बघवत नाही हिला."

कुठून कुठे घेऊन गेल्या सगळं ! बापरे..एकदा म्हणलं मिक्सर घेवू या का? तेव्हाही असच टोमणे मारले,"आम्ही नाही केले का पाट्या वरवंट्यावर हिलाच कशाला पाहिजेत हि सारी थेरं ? जरा तोशीस नको जीवाला ..." झालं विषयच संपला . तेव्हाच कळलं आपल्याला काहीच महत्त्व नाही तेव्हापासून ठरवल, त्यांच्या भानगडीत पडायचे नाही. त्यामुळं आता मी काहीच बोलत नव्हते ना कुठे बाहेर जाऊ म्हणत होते. त्याचे ह्यांनांहि फार वाईट वाटलं नाही. म्हणजे फार आनंदाने माझ्या सोबतीला येतच नव्हते म्हणा रविवारी कधीतरी आपल जायचं म्हणून जायचं पण आता तेही बंद झालं.

माझ्यासाठी सगळं धक्कादायकच होतं कारण मी अशी भरपुर माणसात वावरलेली आणि इथे तर सारा कोंडवाडाच होता ..ना कुठे जायची सोया होती ना शेजाऱ्यांची बोलायची सोय नव्हती. हे तर माझ्याशी जास्त बोलायचेच नाही जेवढयास तेवढं इतर वेळी मी बोलायला गेले तरीही हं हूं याच्या पलीकडे जास्त बोलायचे नाहीत त्यामुळे मोकळेपणानं आलाच नाही नात्यात!! वर्षभरात मुलाचा जन्म झाला त्याचे नाव काय ठेवायचं तेही त्या तिघांनीच ठरवलं खरंतर नंदेनच! मला विचारायचा प्रश्न नव्हता! तिचाच प्रभाव होता साऱ्या कुटुंबावर.पण ताशा या साऱ्याची सवयच झालेली मला. नोकरी वरून परत जाताना यायची संध्याकाळी बऱ्याचदा मग तिच्याशि थोडाफार बोलायचे हे कधी असले घरी तर ! तिघे गप्पा मारत बसायचे. मी आपली स्वयंपाक घरात काही बाही करत असायची नाहीतर खोलीत वाचत बसत असे. तसा मला काही सांगायची विचारायची सवय नव्हती म्हणा किंवा गरज नव्हती बहुदा. अगदी बंगल्यातल्या शेजारच्या दोन खोल्या भाड्याने द्यायची गोष्ट सुद्धा मला नाही विचारलं. त्यांनी तिघांनींच ठरवलं कोणाला द्यायचे.

मुलाचा जन्म झाला. तसे. आता मला माझे असा कुणीतरी हक्काचे माणूस मिळालं. . त्याचं करण्यात आता दिवस बरा जात होता यथावकाश मुलीचा जन्म झाला तिचे नाव ठेवलं त्यांनी साई! मुलं थोडी मोठी झाली बालवाडीत जाऊ लागली. मला आता थोडी फुरसत पण मिळाय लागली. जरा धीर धरून मी माझ्या नोकरीचा विषय काढला यांच्याकडे. आणि आश्चर्य म्हणजे मला पटकन होकार मिळाला. मला फारच आनंद झाला आता या घुसमटवणाऱ्या वातावरणातून थोडी तरी सुटका होणार होती माझी! चार लोक भेटणार होते रोज. मी एका बँकेत रीतसर अर्ज केला. क्वालिफिकेशन चांगलं असल्यामुळे मला नोकरी मिळाला फार त्रास झाला नाही. तसं बर्‍यापैकी चालू होतं समीर आणि सई दोघांना सासुबाई दिवसभर सांभाळायच्या. हे एक बरं होतं. नाही म्हणता माझा पैसा पण यायचाच ना घरात कदाचित त्यामुळे असेल, काही का असेना मला त्यांची मदत होत होती हे खरं! पैसे मात्र सरळ नवऱ्याच्या ताब्यात जायचे. मला थोडेफार खर्चाला दह्याचे ते . मी पण फार चौकशी करायची नाही.इथून सुटका मिळाली आहे हेच माझ्यासाठी खूप मोठं होतं .

मुलांशी पण ह्यांचं कधी फार जुळले नाहीच. त्यांच्याशी खेळातील, गप्पा करतील, असं काही फार नसायचंच. मुलांनी जास्त डांग केला की डोळे मोठे करून करायचे बस तेवढचं मुलांना पुरेसं होतं दरारा निर्माण करायला त्यामुळे ती बिचारी बाबा येईपर्यंत दंगा मस्ती करून घेत. एकदा बाबा घरी आले की चिडीचूप बसायची बिचारी. वाईट वाटायचे मला खूप सर्वसामान्यांसारखा माझ्या मुलांना पण बापाचा सुख मिळावे असा वाटायचं मला. पण ते वेगळ्याच मातीचे बनलेले होते. अतिशय अलिप्त स्वभाव. मुलांबददल प्रेम नव्हतं असा नाही. ती आजारी पडली कि त्यांची काळजी करायचे दवाखान्यात घेऊन जायचे. पण ते तेवढंच. नाही म्हणायला मुलीशी जरा बरं जमायचं कधीतरी तिला अभ्यासाला घेऊन बसायचे. ती म्हणाली तर बागेत फिरायला, जत्रेला, सिनेमाला,घेऊन जायचे. पण फार आपणहून काही करायचे नाहीत.

साधारण दहा-बारा वर्षांनी सासूबाई गेल्या. आता घरात आम्ही चौघच . मुलं बर्‍यापैकी मोठी होती. त्यामुळे शाळेतून घरी आल्यावर तशी राहू शकत होती एकटी थोडावेळ मी किंवा हे येईपर्यंत. शेजाऱ्यांची मला बऱ्यापैकी मदत झाली तशी नाही म्हणायला!

मुलं हुशार निघाली म्हणून अभिमान वाटायचा यांना! पण म्हणून खूप लाड वगैरे करतील तर तसं नाही मुलं डोक्यावर बसतील, बिघडतील अशीच धारणा. सतत बायको डोक्यावर डोक्यावर बसेल,मुले डोक्यावर बसतील अशीच किती त्यांनाअशीच भीती त्यांना, बहुदा त्यामुळेच तुटकपणा होता कि काय न कळे. त्यांच्याबद्दल मुलांच्या मनात प्रेम असलं तरी तशी अढी पण होती. माझा तर प्रश्नच नव्हता कधी चार शब्द प्रेमाने बोलतील , काळजी घेतील तर कसलं काय. असो. माणूस विक्षिप्तच होता हेच खरं . ना कधी मोकळेपणी माझ्याशी बोलले ना काही सांगितले. एक विचित्र गूढपणा व्यापलेला. त्याच्या मनात काय चाललंय कधीच कळले नाही मला.जगावेगळाच संसार होता आमचा.

यथावकाश मुलीचेहि लग्न झालं. मुलगाही परदेशी गेला शिकायला. तिकडेच लग्न ठरवले त्याने. त्यामुळे आता घरात आम्ही दोघंच.हे पण आता रिटायर्ड झाले. मी जायची नोकरीवर सगळे करून मग हे एकटेच असायचे घरी. सकाळ संध्याकाळ फिरायला जायचे. नाही म्हणायला एक मित्र होता तो असायचा फिरायला यांच्यासोबत. कधीमधी घरीहि यायचा तेवढाच काय तो संवाद.

इकडे नणंदेचे मिस्टर पण गेले त्यामुळे तीही एकटीच असायची. दर दिवसाआड यायची नेहेमीप्रमाणे. तिचाही मुलगा परदेशी गेलेला नोकरी निमित्ताने तो परतण्याची शक्यता च नव्हती त्यामुळे तीहि एकटीच राहायची. अशातच मीही रिटायर झाले. आता आम्ही दोघच दिवसभर घरी एकटे असायचो , त्यामुळें तर आता मला घर खायला उठाय लागलं.

आता माझा पूर्वीचा स्वभाव उचल खायला लागला. आयुष्यभर मी अशी कोंडवाड्यात राहिल्यागत राहिले. कुणाकडे जायचे नाही यायचे नाही. कुठे फिरायला जायचे नाही कसली मौज नाही. आता हे बंधन मला तोडायचं होतं. मला हव्या असलेल्या गोष्टी मला करायच्या होत्या. खूप फिरायचं होतं , लोकांशी मिसळायचे होते. पैंटिंग करायची होती,लहान मुलांना घरी बोलावून त्यांना शिकवायचे होते, साऱ्या नातेवाइकांना ,मित्र मंडळींना घरी बोलवायचे होतं . दुर्दैवाने किंवा माझ्या सुदैवाने नणंद पण एकटीच राहत होती त्यामुळे ती आणि हे राहू शकणार होते, ती त्यांची काळजी घेऊ शकणार होती. नाहीतरी माझ्यापेक्षा तिच्याही त्यांचं तसे बर जमायचे ना , त्यामुळे हीच योग्य वेळ आहे मला माझं जे करायचं होतं खूप दिवसा पासून ते करायची समाजात मुक्तपणे वावरायची. माझे समाजप्रिय मन आता बंड करून उठत होते! मोकळा श्वास घ्यायचा होता. मला मुक्त व्हायचं होतं!

Group content visibility: 
Use group defaults

छान कथानक पण अजूनही काही टाइपो आहेत.
डांग (दंगा) >>>जास्त डांग केला की डोळे मोठे करून करायचे<<<<
ताशा (आताशा) इत्यादि
---------
डिवोर्स साठी काहीही रीजन असू शकते आणि ते त्या दोन व्यक्ति सोडून इतराना पूर्णतः पटेल असेही नसते त्यामुळे कथेची थीम भरकटली असे नक्कीच जाणवत नाही अन थोड्याफार अंदाजाने टाइपो असलेला मजकूरही सहज योग्य शब्द काय असतील ह्याचा अंदाज लावून वाचता नक्कीच येतोय.
पुढील लेखनास शुभेच्छा !