कातिलों के कातिल

Submitted by श्रद्धा on 14 October, 2009 - 11:04

'कातिलों के कातिल' हे अ नि अ सिनेम्यांच्या इतिहासातले एक गौरवशाली पान आहे. अशा सिनेम्याची निर्मिती केल्याबद्दल हिंगोरानी बंधूंना दंडवत घालून हे पुराण पुढे सुरू करते.

प्रदीप कुमार आणि निरुपा रॉय हे एक सद्गुणी, श्रीमंत, दोन मुले असलेले जोडपे. त्यांच्याकडे एक रथ असतो. रथामुळेच सिनेमा घडतो म्हणजे रथाची किंमत आकारमानाच्या व्यस्त प्रमाणात असणे ओघाने आलेच. छोट्या पाटाइतका परीघ असलेला आणि घरी बसवायच्या गणपतीच्या मूर्तीएवढ्या उंचीचा रथ 'करोडों का' असतो.

(दृश्यबदल.) एका ठिकाणी गुंडांच्या अड्ड्यावर मासिक सर्वसाधारण सभा भरलेली असते. काखेत धरलेल्या काळ्याकुळकुळीत मांजराला गोंजारत अमजद खान प्रवेश करतो आणि त्यादिवशीची बोहनी म्हणून एका माणसाला गोळी घालून यमसदनाला पाठवतो. अर्थात, तो माणूस पोलिसांचा खबर्‍या बनलेला असणे ओघानेच आले.

पहिल्या दोन परिच्छेदांमध्ये जर आपल्याला सिनेम्याची अख्खी ष्टोरी कळली (त्याला लई अभ्यास लागतो पण! :फिदी:) तर पुढे यातली अमुक एक कल्पना अमिताभाच्या कुठल्या सिनेम्यात आहे, ते ओळखायचा खेळ खेळता येतो.

मुख्य खलनायकाचे एखाद्या माणसाला अचानक मारणे, नंतर तो माणूस 'खबर्‍या होता' असे सांगणे - डॉन
दोन भाऊ लहानपणी हरवणे, एक मुसलमान एक हिंदू म्हणून वाढणे - अ अ अ‍ॅ
खलनायकाने नायकाच्या बापाला मारणे - जंजीर, परवरिश
सिनेम्यात एक फकीर गात गात कुठेही प्रकटणे - लावारिस
आई निरुपा रॉय असणे - अ अ अ‍ॅ, दीवार
इत्यादी.

अमजद खानाला संघटनेची आर्थिक ताकद वाढवायला रथाची गरज असते. पण अर्थातच प्रदीप कुमार तो देत नाही. (बाकी या सिनेम्यातही कुमाराची हेअरस्टाईल 'ताजमहल' सिनेम्यासारखीच. 'हा कायम 'चांदोबा' मासिकातला जयवर्मन, विक्रम वगैरे दिसतो.' -नवर्‍याचे निरीक्षण!) तो रथ वाचवण्याच्या भानगडीत दोन्ही मुले हरवतात, निरुपेचा नवरा मरतो. तरी निरुपा हातीपायी धड, कुठलेही शारीरिक व्यंग, दारिद्र्य, विटा वाहण्याचे काम करावे लागणे, मशिनावर कपडे शिवणे इत्यादी काहीही न होता आलिशान बंगल्यात राहायला परत येते. (तिलाही चुकल्याचुकल्यासारखे वाटत असावे.)

तिथे शक्ती कपूर येतो आणि तिला 'रथ दे, नाहीतर जिवे मारीन' असे धमकावतो.
'ज्या रथासाठी माझ्या नवर्‍याने जीव गमावला, माझी दोन्ही मुले हरवली, तो मी जिवाच्या भीतीने तुला देईन होय????' ती बाणेदार आई उद्गारते. (परफेक्ट लॉजिक!) यानंतर तिची बुद्धी तिला सोडून जाते. मुलांचा शोध घेण्यासाठी पेप्रात जाहिराती, आपण यांना पाहिलंत का? असे कोणतेही सामान्य माणसांचे उपाय न वापरता ती थेट आकाशातल्या देवाला, देऊळ दिसेल तिथे साकडे घालून आपली मुले परत मिळवण्याचे स्वप्न पाहू लागते.

एक रहस्यमय दृश्य:
शक्ती कपूर हेलिकॉप्टरात बसून अमजद खानाकडे येत आहे. 'रथ मिळाला असून मी तो घेऊन येत आहे' असे तो हर्षभराने त्याला सांगत आहे. अचानक हेलिकॉप्टराचा स्फोट होतो. अमजदाच्या व्याकुळ चेहर्‍यावर कॅमेरा असताना दृश्य संपते.
(या दृश्याचा क्ल्यू कुणाला आधीच बरोब्बर लागल्यास त्या व्यक्तीला साक्षात मातेचे दंडवत!) Proud

वीस वर्षांनंतर...

एक केस इकडचा तिकडे न होता निरुपाबाईंचा अंबाडा किंचित पांढरा झाला आहे. त्या अजूनही श्रीमंतच आहेत. आणि अजूनही देवळांतून त्या आपल्या मुलांसाठी साकडे घालतच आहेत. (हिंदी सिनेमे पाहिले असते, तर हरवलेली मुले देवळात अज्जाबात सापडत नाहीत; सापडायची तर ती गुंडांचे अड्डे, जुगार खेळण्याच्या जागा वगैरे ठिकाणीच सापडतात, हे तिला कळले असते.)

मोठा मुलगा (मोठा होऊन धर्मेंद्र) - हा एका मुसलमान बाईला सापडतो. त्याला काहीही आठवत नसते. बाईकडे एका मुलाच्या कलेवराजवळ बसून दोन बायका शोक करत आहेत, असा फोटो भिंतीवर लावलेला असतो. (घरात कुठले फोटो दिवाणखान्यात लावावेत, याला काही सीमा???) तर तिचा मुलगा आता हयात नसल्याने अल्लाने रिप्लेसमेंट पाठवली असे समजून ती त्याला आपला मुलगा 'बादशाह' असे समजू लागते आणि त्यालाही तसेच सांगते.

धाकटा मुलगा (मोठा होऊन ऋषी कपूर) - हा मुक्रीला सापडतो. मुक्री खिसेकापू असतो. तो मुलाचा प्रतिपाळ करायला त्याला घरी घेऊन जातो. त्याच्या गळ्यात एक लॉकेट असते. पण खिसेकापू असला तरी तो मुळात प्रामाणिक असल्याने तो लॉकेट अजिबात उघडूनही बघत नाही, विकत तर नाहीच नाही.

दोघे भाऊ साध्यासुध्या चोर्‍यामार्‍या करताना एकमेकांना भेटतात. तसेच थोरल्याचे जमिलाबाई कोठेवाली (झीनत अमान) आणि धाकट्याचे रश्मी खिसेकापू (धीरुभाईंची धाकटी सून) यांच्याशी सूतही जुळलेले असते.

रहस्यमय दृश्याचा रहस्यभेद:
एका पेट्रोलपंपावर सगळेच केस पांढरे झालेला शक्ती कपूर कष्टाची कामे करत असतो. कुठेतरी लांब जायचे असल्याने त्याआधी पेट्रोलाची टाकी फुल्ल करायला आलेला अमजद नेमका याच्याच पेट्रोल पंपावर येतो. एकाच शहरात राहत असून हे असे तब्बल वीस वर्षांनी घडावे, म्हणजे शक्ती कपुराचे नशीब जोरावर असावे.

जीवशास्त्राला आव्हान: रीछा
(पेट्रोलपंपावरचे दृश्य!)
शक्ती: तो क्या तुमने मुझे माफ कर दिया?
अमजद: जिनी डार्लिंग (मांजराचे नाव! अमजद कायम 'लेकी बोले सुने लागे' पद्धतीने मांजराशीच बोलत असतो) मै तो इसे माफ कर दू, पर शायद रीछा (उच्चार 'रिचा' असा!) माफ न करे...
प्रेक्षकांसकट शक्ती कपूरही नॉनप्लस्ड...
शक्ती: ये रीछा कौन है? (प्रेक्षकांनाही तेच विचारावेसे वाटते. ही जी कोण रिचा असेल, तिचा आणि शक्ती कपुराचा काय संबंध? शक्तीच्या चेहर्‍यावरून त्यालाही ते कळलेले दिसत नाही.)
अमजद 'रिचाSSSSS' अशी हाळी देतो आणि त्या गाडीतून आधी अजिबात न दिसलेला, त्यात कसा मावला असेल असा प्रश्न प्रेक्षकांना पाडणारा, केवळ सातआठ फूट उंचीचा, आडवातिडवा, केसाळ 'रीछा' उतरतो.
अमजदाने दिलेल्या इंट्रोनुसार 'एका अस्वलाने एका गावातून एका वेड्या बाईला पळवून नेले. रीछा ही त्यांच्या प्रेमाची निशाणी आहे.' (इथे हिंगोरानी बंधूंच्या मेंदूंना माझा सलाम!)

रीछा हा बहुभाषिक प्राणी असतो. तो अमजदाशी इंग्लिशीतून ('रिचा हिअर, मास्टर!') आणि इतर सर्वांशी हिंदीतून संवाद साधत असतो.
असो. तर शक्ती कपुराची त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारी बायको या झटापटीत बळी पडते आणि शक्ती तिच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी साहजिकच जिवंत राहायचे ठरवतो.

या सर्व भानगडीत 'रथ अजूनही निरुपेकडेच आहे' हे अमजदाला समजते. आता काहीही करून तो रथ मिळवणे आले.

निरुपेला कळते की, एका पर्वतावर एक बाबा बसलेले असून ते जे बोलतील ते खरे होते. सरळसोट उभ्या कड्यावर निरुपा साडी नेसून, ट्रेकासाठी आवश्यक कुठलीही साधने न घेता, अनवाणी चढून जाते (तेही उतारवयात!) आणि बाबांचा आशीर्वाद मिळवते. बाबा सांगतात, 'उद्या शंकराच्या मंदिरात तुला गळ्यात सोन्याचा त्रिशूळ घातलेला तरुण भेटेल. तो तुझा छोटा मुलगा आहे.' निरुपा निघताच बाबांचे खरे रूप उघडकीस येते. तो अमजदच असतो आणि दुसर्‍या दिवशी त्रिशूळ घालून आपल्याच एका माणसाला तिथे पाठवतो. पण... किंतु... परंतु... निरुपेची वीस वर्षांची तपश्चर्या फळाला येते आणि सगळ्या गोष्टी जुळून येऊन ती बरोब्बर ऋषी कपुरालाच घरी घेऊन जाते.

मग एकदम तिचा मेंदू काम करू लागतो आणि ती पेप्रात मोठ्या मुलाला शोधण्यासाठी जाहिरात देते. त्यात वर्णिलेली जन्मखूण ही धर्मेंद्रालाच लागू पडत असल्याने तोही घरी येऊन पोचतो. ते दोघे खरेच भाऊभाऊ आहेत याबद्दल निरुपेच्या मनात शंकाच नसते. पण त्या दोन्ही भाबड्या जीवांना ते जाणवलेले नसते.

या दोघांचा उद्देश तिच्याकडचा रथ चोरणे, हाच असल्याने भाऊभाऊ एकमेकांवर कुरघोडी करून रथ मिळवू बघतात. रथ प्रचंड कडेकोट बंदोबस्तात, टेलिफोन, घड्याळातल्या वेळा, विजेची घंटा अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बंगल्यातच लपवलेला असतो.

अखेर ऋषी, टीना तो रथ चोरून आणतात. त्यांचा कोणी शोध घेऊ नये म्हणून लांब कुठेतरी जायचे ठरवतात. मुक्रीला लॉकेट द्यायला याहून चांगली वेळ कुठली सापडणार? त्यातले फोटो पाहून ऋषीला कृतकर्माचा पश्चात्ताप होतो. दरम्यानच्या काळात धर्मेंद्राने तो रथ चोरून अमजदाला द्यायचे कबूल केलेले असते. तो ऋषीच्या मागावर अमजद आणि काळ्या मांजरासकट येऊन पोचतो. तिथे मारामारी होताना त्यालाही गतायुष्य आठवते आणि अखेर दोन्ही भाऊ अमजदाला संपवून रथ आणायच्या कामगिरीवर निघतात.

अमजदाच्या अड्ड्यात दोघे भाऊ शक्ती कपुरासकट प्रवेश करताना आणि वंडर-अस्वल रीछा यांचे कै. होणे

http://www.youtube.com/watch?v=NhATezul0mA
(ही लिंक 'शोकेस मे इतना, तो गोडाऊन मे कितना' छाप आहे. लिंक पाहून झाल्यावर सिनेमा अख्खा पाहायची इच्छा होणे शक्य आहे. यूट्युबेवर सिनेमा पूर्ण उपलब्ध! त्वरा करा!!!)

यानंतर रथाचा सौदा होताना डान्सपार्टीमध्ये जमिला-रश्मीचा नाच, ऋषी-धर्मेंद्राचे वेषांतर करून (म्हणजेच फक्त दाढीमिशी लावून) प्रसंगाशी अगदीच विसंगत असलेले गाणे म्हणत नाचणे वगैरे सगळे यथासांग होते. अमजदाने त्यांना आधीच ओळखलेले असते. पण तो नृत्यगायनादी कलांचा भोक्ता असल्याने ते पूर्ण होईपर्यंत तो थांबतो.

नंतर देमार मारामारी होऊन अमजद उर्फ ब्लॅक कोब्रा देवाघरी जातो. त्याच्यामागे त्याचे लाडके मांजर मात्र उरते. रथ पुन्हा एकदा तिजोरीत येऊन पोचतो आणि कहाणी सुफळ संप्रूण होते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यक ब यक कोई कही मिल जाता है
दिल से दिल मिल के दिल खिल जाता है

एक नया वार हुआ यार मिला प्यार हुआ..
मार गयी तेरी एक झलक अचानक ..
Happy हे गाणे खरतर छान आहे. लहानपणी ऐकलेले अजुन आठवतेय.

आज बघायला पाहिजे पिक्चर!

'हा कायम 'चांदोबा' मासिकातला जयवर्मन, विक्रम वगैरे दिसतो.' >>> १००% अचून निरीक्षण Lol

शेवटी वैतागून आम्हालाच लिन्क देउन मोकळी झालीस का? मस्त लिहीले आहे Happy

मी त्याकाळी हा चित्रपट थिएटर मधे पाहिलेला आहे. ते सुदर्शन चक्र उडून अमजद ला लागते ते, यक बा यक, सरे बाजार करेंगे प्यार आणि तो रीछा अश्या काही गोष्टी लक्षात होत्या. मी शोधत होतो बरेच दिवस हा चित्रपट, यू ट्यूब वर पूर्वी सापडला नव्हता.

हा खरोखरच एक गौरवशाली पान आहे. आपण याबद्दल येथे लिहील्याने अ. आणि अ. बीबीचीच शोभा वाढली आहे Happy

आणि अजून एक 'अमिताभ च्या चित्रपटात पाहिलेले' राहिले - मुसलमान स्त्रीने मुलगा हयात नसल्याने धर्मेद्र हाच आपला मुलगा मानणे - हे म्हणजे 'सिकंदर' चा 'बादशाह' केलेला दिसतो.

नृत्यगायनादी कलांचा भोक्ता असल्याने ते पूर्ण होईपर्यंत तो थांबतो. >>> हे सर्वात भारी Lol

आईशप्पथ!!! असेही सिनेमे होऊन गेलेत? माते, यांचा लाभ आम्हाला करून दिल्याबद्दल नतमस्तक आहेत माझ्यासारखे अज्ञ भक्त!! Lol

घरात कुठले फोटो दिवाणखान्यात लावावेत, याला काही सीमा???) >>> Rofl
हो ना आणी खास बोलावुन फोटोग्राफरकडुन असा फोटो त्याही परीस्थितीत हे लोक काढुन घेतात.

नृत्यगायनादी कलांचा भोक्ता असल्याने ते पूर्ण होईपर्यंत तो थांबतो. >>> Lol

जबरदस्त. Lol

:ड शेवटी टाकलसच! खूप मजा आलि वाचताना, मला कालच रिछा बद्दल सांगून तू गोउप्यस्फोट केला नसतास तर अजुन मजा आलि असति.
खिसेकापू असला तरी तो मुळात प्रामाणिक असल्याने तो लॉकेट अजिबात उघडूनही बघत नाही, विकत तर नाहीच नाही.////////
घरात कुठले फोटो दिवाणखान्यात लावावेत, याला काही सीमा???) ........धमाल!!!
तू हे दिव्य बघायचे परीश्रम घेतलेस आणि आम्हाला आयता मसाला दिलास त्याबद्दल आभार!!

Rofl सॉलिड लिहिलय.
कायम 'चांदोबा' मासिकातला जयवर्मन, विक्रम वगैरे दिसतो.' >> अगदी अचुक निरिक्षण... :d
घरात कुठले फोटो दिवाणखान्यात लावावेत, याला काही सीमा???>> तो फोटो आणि रिछा पहायला तर हा सिनेमा पाहिलाच पाहिजे.

आत्ताच हि वरची क्लिप पाहिली.. अशक्य हसले... त्या रिछाने पत्थर फेकला तेव्हा हे दोघे टोणगे जे शक्ति ला सांभाळुन नेत होते आणि शक्ति त्यांना my strong boys म्हणत होता ते सरळ त्याला सोडुन मागे पळाले. :d कायच्याकाय अ. अ. आहे तो रिछा.. Lol

Rofl
हिंदी सिनेमे पाहिले असते, तर हरवलेली मुले देवळात अज्जाबात सापडत नाहीत; सापडायची तर ती गुंडांचे अड्डे, जुगार खेळण्याच्या जागा वगैरे ठिकाणीच सापडतात, हे तिला कळले असते..
रीछा
घरात कुठले फोटो दिवाणखान्यात लावावेत, याला काही सीमा???)
नृत्यगायनादी कलांचा भोक्ता असल्याने ते पूर्ण होईपर्यंत तो थांबतो. > Lol

मला रहस्यमय दॄष्याचा अर्थ कळला नाही! Uhoh

__/\__ तुफ्फान हसले. आता कधी हा पिक्चर लागला टीव्हीवर तर तुझी आठवण काढून पाहेन. पुढलं परिक्षण कधी? Proud

लागतात नंदिनी. औलाद (जितेन्द्र), यल्गार, जाँबाज, एकेक जबरी लागत आहेत. रेकॉर्डिंगची सुविधा घेतली पाहिजे म्हणजे वेळ काढून बघता येतील Happy

Pages