ॐ सर्वे भवन्तु सुखिनः अर्थात दु:ख दूर कसे होईल ?

Submitted by शिष्योत्तम रामभाऊ on 10 August, 2018 - 05:45

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

वाचकगण प्रणाम
आपण वर दिलेला जो श्लोक वाचला आहे त्याचा अर्थ आपणास ठाऊक आहे काय ?
नाही ना ? हरकत नाही. आपल्या सोयीसाठी इंग्रजीतून अर्थ देता येईल.

Om, May All become Happy,
May All be Free from Illness.
May All See what is Auspicious,
May no one Suffer.
Om Piece, Piece, Piece.

अर्थ आपल्याला समजला. आपणास आवडला का ? नक्कीच आवडला. परंतु या श्लोकाचा अर्थ आपल्याला का समजला नाही हे जाणून घेतले पाहीजे. तरच आपल्याला सर्वांचे कल्याण कसे होणार हे समजणार आहे. सर्वांचे दु:ख कसे दूर होणार हे समजणार आहे.
आपल्याला श्लोक समजला नाही कारण आपणास संस्कृत समजत नाही. आपणास मराठी येत नाही. कारण आम्ही इंग्रजी शाळेत शिकतो. घरी इंग्रजी बोलतो आणि बाबांना डॅडा आणि आईला ममी म्हणतो.
अरे पण डॅडा म्हणजे डेड आणि ममी म्हणजे मृतदेह.
अरेरे ! आपल्या आईवडिलांना डेडबॉडी म्हणून अशिर्वाद लाभतात का ? नाही ना ?
आपण आईला आई आणि बाबांना बाबा म्हणायला हवे. हिंदीत माता पिता म्हणायला हवे. प्रत्येक भाषेत अत्यंत सुंदर संबोधनं आहेत. हे सर्व आपण हरवून बसलो. हे बदल न जाणवणारे आहेत. तेच आपल्या दुं:खाचे मूळ आहेत.

का झाले हे बदल ?

अहो सोप्पं आहे. घरात आजोबा आजी नाहीत. मग कोण करणार संस्कार ? संस्कार नाही. कानावर काही पडत नाही. ममा चालली कामाला, डॅडा चालला टूरला . मग घरी कोण संस्कार करणार ?
तर ड्रायव्हर आणि मोलकरीण. ते जे काही बोलतात त्यातून संस्कार होतात. किती वाईट ?
पण त्यांना का दोष द्यावा ? आपण आपल्या हाताने ही अवस्था करून घेतली नाही का ? होय. आपण करून घेतले आपले वाटोळे.
आजच्या मुलींना घरात आईवडील नकोत कि सासू सासरे नकोत. किंवा काही मुलींना फक्त आपली आई पाहीजे . आणि ती आई म्हणवून घेणारी आणि दोन दोन पोतं मेकप फासलेली विशाल महिला घरात डेरेदाखल येते आणि मुलीला बिघडवते. आजच्या आयांनाच काही ठाऊक नाही. आडातच नाही य्तर पोह-या कुठून येणार ? ही मेकपवाली आई जर पुढारी बिढारी असेल तर बघायलाच नको. त्या बिचा-या जावयाचा असा काही छळ मांडते कि ज्याचे नाव ते.
आणि तो तरी काय करणार ? आपल्या आईवडीलांना दु:खात लोटून कालच्या नटव्या मुलीबरोबर संसार थाटून बसला. आता सांगतो कुणाला ?
हीच जर आई जरा जुन्या वळणाची असती तर काय म्हणाली असती ?
"बाई गं, मुलीच्या घरात पाण्याचा थेंब सुद्धा घेऊ नये."
"बाई गं, भरल्या घराची दोन घरं करायचं पाप कधीही करू नकोस"

पण नाही नाही नाही. असे ती कधीही सांगत नाही. आणि यातून दु:खाची सुरूवात होते.
मुलीने मुलांची बरोबरी करण्यासाठी नोकरी करावी आणि नव-याकडून घरकामाची अपेक्षा करावी हे अधोगतीचे कारण आहे. यातून धूसफूस सुरू होते. काय गरज आहे बाहेर पडायची ?

अरे विधात्याने तुला सुंदर घडवले आहे. एक सुंदर असे कारण दिले आहे. तू का गं बाई त्याच्या विरोधात जातेस ? त्याच्या विरोधात गेलीस तर सुखी कशी होणार ? पावसाचे पाणी नेहमी वरून खाली पडते. झाड नेहमी जमिनीतून वर उगवते. पक्षी आकाशात उडतात. मासे पाण्यात राहतात. हा निसर्ग आहे गं बाई.

पक्षी म्हणाले मी पाण्यात राहणार, मासे म्हणाले मी जमिनीवर येणार , तर काय होईल ?
कपाळमोक्ष !

मग हेच चालू आहे.
बाई घराबाहेर पडते. मग मूलं होत नाहीत. मूल होत नाही म्हणून घाला डॉक्टरच्या डोक्यावर दहा बारा लाख रूपये. करा कर्ज. मग ते फेडायला ओव्हरटाईम करा. मग मूल होतं. मूल झालं नाही कुठं की चालले त्याला सोडून करीयर करीयर खेळायला. त्या बाळाला आई हवी. हे निसर्गाने ठरवले. सर्व पाण्यांमधे आई आणि बाळात नातं असतं. ज्यांचा मेंदू लहान असतो अशा प्राण्यांनाही माया समजते. पिल्लू आईवर अवलंबून असते तेव्हां ती सर्व जगापासून त्याचे रक्षण करते. त्याला दूध पाजते. जवळ घेते. त्यामुळे बाळाची भावनिक गरज पूर्ण होते.

परदेशातलंच आहे म्हणून बरं. एक संशोधन म्हणतेय की जी मुलं लहानपणी आईला चिकटून असतात त्यांच्यात आत्मविश्वास असतो. ज्या मुलांना पूर्ण स्तनपान मिळते ती मुलं सुदृढ असतात. त्यांना ९९९ आजारांशी लढण्याचे औषध आईच्या पोटातून आणि स्तनातून मिळत असते. आणि आम्ही ? घेतलं अमूलचं घी आणि घातलं बाटलीत. मग ते मूल तिकडे रडू दे, पडू दे. आम्हाला काही म्हणजे काही फिकीर नाही.

आम्हाला टेण्शन कसले ? बॉस आपले प्रमोशन शेजारच्या टेबलवरच्या माधवीला देईल का ? नटवीच आहे. बॉसला काही बाही जाऊन सांगते. मग नको गं बाई रजा घ्यायला. काही होत नाही बाळाला नाही घेतलं तर. मग कामवालीला सांगून जायचे. कामवाली कशाला बघतेय ? तिचं लक्ष ड्रायव्हरकडे . मॅडम गेल्या की ड्रायव्हर घरात. इकडे ते मूल रडले तरी कुणाला काही नसते. अहो, मग ते मूल कसे हुषार होणार, ते कसे निरोगी निपजणार. मग अपत्याच्या समस्या सुरू होतात. मग घाला त्याला पैसे. डॉक्टर सांगतात, गॉल ब्लॅडर मधे स्टोन आहे. ऑपरेशन करावे लागेल. काढा पुन्हा पैसे. घाला त्याच्या डोक्यावर. अहो स्टोन होईल नाही तर काय ? त्याची काय काळजी घेतली तुम्ही ? आणि अजून तरी घेताय ? मुलाला खेळू द्या. तो ठणठणीत राहील. त्याचबरोबर त्याला सकस अन्न द्या. त्याच्या आहाराकडे लक्ष द्या.

मुलाला कामवालीवर सोपवून आणि डॉक्टरांच्या भरवशाने तुम्ही देशाचे नागरीक कसे काय घडवणार आहात हो ?
आमच्याकडे निसर्गाला अनुकूल असे कायदे होते. पण ते सर्व पायदळी तुडवले. देशोदेशीचे संदर्भ घेऊन देशाचे कायदे केले. मग काय होणार ? ते आपल्या संस्कृतीला का पूरक असतील ?
आमचे कायदे म्हणतात. मुलीला शिकू द्या. बाहेर पडू द्या. हो ठीक . लग्न झाल्यावर घटस्फोट घेऊ द्या ? अहो कसे टिकतील संसार ? अशी पळवाटच काढून दिली तर संसार सुखी होत नाहीत. पाहतोय आपण.

घरात पाऊल नाही टाकलं की वेगळं घर पाहीजे नाहीतर द्या घटस्फोट. वर पोटगी द्या. नाहीतर पोलिसात तक्रार करते. या बायांनी घरंच्या घरं दहशतीखाली ठेवलेली आहेत. हे असे कायदे असल्यावर आणखी काय होणार ?
शिकवा की मुलीला. चांगली डबल ग्रॅज्युएट करा. बालीष्टर करा. पण चूल मूल हे तुझं प्राधान्य आहे हे आयांनी सांगायचं त्यांना. त्यात तिचंही भलंच आहे. कशाला नाही ते भरवता मुलीच्या डोक्यात ? लहान मुलांचा मेंदू ही रिकामी पाटी असते. त्यात हे तथाकथित सुधारणावादी विचार लिहून दु:खी करू नका आणि होऊ ही नका.

एक निरीक्षण आहे. या स्त्रीवादी बायका कधीही खूष नसतात. त्या स्वतःही आनंदी नसतात आणि त्यांना कुणी आनंदी राहीलेलं चालत नाही. त्यांचे संसार तर भगवान भरोसे असतातच पण चांगले चालू असलेले संसार यांच्या नुसत्या संसर्गाने धोक्यात येतात. कशाला पाहीजे आपल्याला ते नको ते विकतचे दुखणे ?

पुरूषाने कामाला जावे. बायको, मुलाला सुखी ठेवता येईल एव्हढे कमावणे हाच खरा पुरूषार्थ आहे. कशाला रे बाळा तुला बायकोच्या कमाईची गरज पडते ? तुझ्यात काही कमी आहे का ? मेहनत कर. अक्कलहुषारीने पैसा कमाव. मागच्या पिढ्यांनी नाही मुलं वाढवली ? त्या वेळी होतं का रे राजा दोघांनी बाहेर पडायचं फॅड ?

त्यातून अनेक महान कलाकार निपजले. महान तत्त्वज्ञानी निपजले. महान शासक, विचारवंत, शास्त्रज्ञ, सेनानी, स्वातंत्र्यसैनिक झालेच कि नाही ? कारण या पिढीचे संगोपन शास्त्रीय पद्धतीने झाले.

थोड्या लाभासाठी सोन्यासारख्या क्षणांची माती केल्याने आणखी रे काय होणार ? काहीही नाही. पैशाच्या मागे धावू नका. थोडं पोटापुरतं सर्वांनी कमवावं. अधिक धनाची लालसा असू नये. त्याने दु:ख निर्माण होते. भगवान बुद्ध सुद्धा हेच सांगतात. हेच ऐकून भूतान जगातला सर्वात आनंदी देश झाला. बुद्धाने काही वेगळे सांगितले ? त्याने भारतीय तत्त्वज्ञान बाहेरच्या देशांना सांगितले. ते देश झाले सुखी आणि आपण घे तले बाहेरचे ज्ञान.

मानवाला आवश्यक विद्या परमेश्वराने प्रत्येकास दिल्या. त्याप्रमाणे त्याची विभागणी केली. एकाने विद्या कमवावी. ती सर्वांना द्यावी. त्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालावे आणि सर्व समा़जाचे कल्याण कशात आहे याची चिंता वहावी. कुणी तरी गावाच्या पोटाचा प्रश्न सोडवावा. त्यासाठी अन्न पिकवावे. प्रत्येकाला द्यावे. त्या बदल्यात त्याला त्याची कामे करून द्यावीत. कुणी तरी शेतीची अवजारे बनवावी. त्याच्या पादत्राणाचा प्रश्न कुणीतरी सोडवावा. कुणी गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वतःहून घ्यावी. ज्याला जे काम येते त्याने ते करावे. असे सामंजस्य असल्याने दु:ख मानवी समूहाच्या आसपास फिरकत नाही.

ही ग्रामसंस्कृती ही आपली परंपरा. ती बदनाम केली गेली. चुकीचा इतिहास शिकवला आणि आदर्श समाजव्यवस्था उद्ध्वस्त झाली. परिणाम ?
पाहतोच आहोत आपण, आहे का कुणी सुखी ?

प्रत्येक जण आऱक्षणासाठी रस्त्यावर येतो. आरक्षणाने जात बळकट होते. मग हल्ले होतात. मग कडक कायदे होतात. त्याने गाव भयभीत होते. कोण सुखी आहे यात ?
शेवटी आपणास आपल्या परंपरा याच सुखी करू शकतात.
त्यासाठी त्याचे अध्ययन गरजेचे आहे. अध्ययन करून ते पाच जणांना सांगायचे. त्या पाच जणांनी पंचवीस जणांना सांगायचे आहे. अशा पद्धतीने हा विचार सर्वत्र जायला हवा.

आणि का न जावा ?
दु:खी रहायचेय की काय कुणाला ? नाही ना ?
मग लागा पाहू कामाला.
चला तर मग सत्याच्या शोधात. सुखाच्या शोधात.

ॐ असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा अमृतं गमय ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

( हा लेख शेअर करायला परवानगी आहे. नावाचा आग्रह नाही. वृत्तपत्रातून छापून आणला तरी चालेल. )

कळावे आपला नम्र

शिष्योत्तम रामभाऊ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शंका, निषेध नोंदवणे हे लेख समजण्याचे लक्षण होय. इतर वाचकांना एकतर लेख पूर्णपणे पटला असावा किंवा काहीच समजले नसावे असे वाटते.

जागृती परिवारातर्फे मनुष्याच्या आयुष्यात निर्माण झालेले कृत्रिम दु:ख निवारण केले. जाते. दु:ख दूर झाले कि मनुष्य सुखी होतो. जागृती परिवार कोणत्याही चमत्काराचा दावा करत नाही. कोणत्याही जातीधर्माला नावे ठेवत नाही. प्रचार करीत नाही. फक्त दु:ख दूर करण्याचे काम आपण हाती घेतले आहे. कुणाला खारीचा वाटा नोंदवावासा वाटला तर दरवाजे सताड उघडे आहेत. त्यासाठी आपण सक्ती वा आग्रह करत नाही.

आपण आपल्या सभ्यतेपासून दूर होऊन दु:ख विकत घेतले आहे. त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. अशा पीडीत कुटुंबांचे दु:ख दूर करण्यासाठी जागृती परिवाराचे साधक व शिष्य काम करत आहेत. त्या अनुभवावर आधारीत लिखाण पत्रिकेत येत असते. (पत्रिकेत मनोरंजन, करमणूक, राजकारण यावरचे भाष्य टाळले जाते). पत्रिकेसाठी केलेल्या लिखाणातील एक लेख आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित झाला. काही कारणाने तो पोहोचला नसावा अथवा वाचकांना अद्याप सत्य उमगले नाही असे वाटते.

लेखक जागृती परिवार संस्थेमार्फत प्रकाशित होणा-या नियतकालिकासाठी नियमित लेखक आहेत.
आपल्याला पत्रिकेतील इतर लेख वाचावयास आवडतील का ? स्कॅन छायाप्रत चालेल का जेणेकरून पुनःटंकणदोष टाळता येईल. अर्थात वाचकांना हवे असल्यास त्याची तयारीही आहे.

बन्याजी आपले मनःपूर्वक आभार. आपल्याला लेखातील विचार पटला. आपल्याला कुठला आग्रह अवास्तव वाटला हे अवश्य कळवावे. योग्य वाटल्यास सुधारणेसाठी त्याचा लाभ होईल.

अजबजी, अहो मनाला लावून घेऊ नये. जेव्हां जी गोष्ट घडायची असते तेव्हांच ती गोष्ट घडते. महापातक कसले त्यात ? मनाला लावून घेऊन आपण दु:खी होऊ नये. तो आपणास बळ देण्यास समर्थ आहे.

राजसीजी, दुसरा भाग असे नाही. पत्रिकेतले जुने लेख आपल्या अवलोकनासाठी देऊ शकेन. त्यासाठी आवश्यक तो वेळ आपण द्याल ही आशा.

परिवार वाले का? मग बरोबर आहे. अहो परिवार वाले अलीकडे असे सकस विनोदी साहित्य वाचायला मिळत नाही. कृपया आपला लेख ललित मधून विनोदी साहित्य विभागात ढकलाल का जेणेकरून सगळे विनोदी लेख एकत्र वाचता येतील.

दु:ख दूर करण्यासाठी काही लोक साहीत्य जमवत होते आणि दु:ख नष्ट करण्यासाठी स्फोट करण्याच्या तयारीत होते. अशा शिष्यांना खाकी कपडे घातलेल्या काही गरजू लोकांनी नालासोपारा आनि पुणे येथून आग्रहाने आपल्यासोबत नेले. कदाचित फक्त आपल्यावरच अनुग्रह व्हावा असा दुष्ट हेतू असावा

तलब = शोधक, सत्याचा शोध घेणारा (साधक)
तलब चे अनेक वचन तालिबान, साधकचे अनेक वचन साधक
सत्याचा शोध घेऊन जागृती करणे हा दोन्हीचा हेतू.

<>

नशीब Piece लिहिलेत.
तसा दुसराहि एक शब्द आहे ज्यात दुसरे एक स्पेलिंग आहे. लहान बाळाला सू करायला सोपे व्हावे म्हणून तो मंत्र आया वापरतात! ओळखा बघू काय स्पेलिंग आहे ते!

या लेखातल्या अनेक गोष्टी पटल्या नाहीत. एकूण सगळा दोष बायकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न वाटतो.
उदा. चूल मूल हे तुझं प्राधान्य आहे. आता मूल हे स्त्रीचे प्राधान्य आहेच. नवर्‍याला होत नाही मूल. पण चूल?? नवर्‍याला नाही वेळ काढून चांगला स्वयंपाक करतात येत? जाऊ द्या ना स्त्रीला जरा घराबाहेर - कदाचित जे काम करायचे ते त्या पुरुषांपेक्षा चांगले करतील

खरे दु:खाचे कारण षड्रिपु. ते ताब्यात ठेवता नाही आले तर दु:ख निर्माण होते, स्वतःला नि इतरांना. ते पूर्णपणे ताब्यात असायला हवे. लोभ असतो म्हणून पैसे मिळवावेसे वाटतात, पण तो अति असू नये. त्या पायी इतर गोष्टींचा विसर पडू नये. हीच गोष्ट काम, क्रोध इ. ची!

नि भावनांचे काय? केवळ भावना ताब्यात न ठेवता आल्याने. बरीच दु:ख्खे होत असतात. पुनः किती दु:ख्ख, विषाद असावा? एकदम सगळे अर्जूनच होतात! काम करण्याचे सोडून देतात. वर क्रोध. खांडववन जाळून टाकतात! मग स्वतः दु:ख्खी होतात नि इतरांना करतात!

उपाय सांगताना ते उपाय करता येण्याजोगे आहेत का, त्या उपायातहि काही उणीवा रहातील का? याचा विचार करायला हवा. ग्रामसंस्कृतीत राहून मनुष्याचे समाधान होणार आहे का? तो सुखी राहिलच का? ज्ञानाची, इतर काही करण्याची इच्छा मारून, जनावरांसारखे रहाणे हेच आयुष्य का? मनुष्यप्राण्याला हे जास्त काळ शक्य नाही. लोकसंख्या वाढत गेली की असलेले अन्न, जमीन पुरे पडत नाही - मग गावाचा विस्तार होऊ लागतो. नि त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात, बदल घडतात. तसेच घडत आले नि आज ही स्थिती आहे.

तुम्हाला आंबेडकरांनी लिहिलेली घटना आवडत नाही. तुम्ही लिहीली घटना, की आपले गाव सोडून बाहेर जाऊ नये. आज जेव्हढे आहे तेव्हढेच ज्ञान ठेवावे, वाढवू नये. बायकांनी फक्त चूल मूल करावे, तर ती इतर अनेकांना आवडणार नाही, मग?

पुर्ण लेखाला लोल
पहील्या पँराला लेख वाचायचा सोडुन सरळ खाली येऊन प्रतिसाद वाचले एकदम भन्नाट
लेखकसाहेब असले भंगार विचार तेही मायबोलीवर मांडले त्याबद्दल कौतुक तुमचे
पाँपकाँर्ण द्या रे कुणी

हे जे काही महान लिखाण आहे ते बहुदा अतिउच्च श्रीमंत वर्गाला टार्गेट करून लिहिले आहे. कारण सरसकट सर्वांकडे गाडी, बांगला, नोकर, ड्राइवर, मोलकरीण, मेकअप चे थर फासणारी सासू, प्रमोशनसाठी मुलांना बाजूला सारून बॉसच्या मागे लागणाऱ्या मम्म्यां etc etc असे मनामध्ये धरून हा लेख पाडला आहे. तद्दन फालतू.

Pages