शिवाजी

Submitted by अभिषेक देशमाने on 28 February, 2018 - 05:18

नक्की वाचा...
शिवचरित्र, आपण आणि सद्यस्थिती:
जयंती म्हणजे जयंती नसून जागृतीकडे जाणे आहे.
दर्शनाकडून प्रदर्शनाकडे जाणे म्हणजे जयंती
चित्राकडून चरित्राकडे जाणे म्हणजे जयंती,
नाचण्याकडून वाचण्याकडे जाणे म्हणजे जयंती आहे.
प्राचीन भारताचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. भारत हा देश ज्ञानाचे माहेरघर आहे. पहिला ज्ञानाचा गौरव तथागत बुद्धाने केला. भिखु संघाच्या माध्यमातून धम्माचे ज्ञान सर्वत्र प्रवाहित केले. बौद्ध साहित्यात त्याचा उल्लेख जागोजागी आहे. सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये तक्षशिला सारखी जगविख्यात विद्यापीठ या भारतात होती.
चरिथ भिक्खव्वे चारिक, बहुजन हिताय बहुजन सुखाय । लोकांनु कंपाय , आत्तानु हिताय । आदि कल्याण, मध्य कल्याण, अंत कल्याण !!
या पाली भाषेतील बुद्धांची शिकवण देणाऱ्या ओळी छत्रपती शिवाजीच्या शिवराज्याचे वैशिष्ट्य सांगून जातात.
आज आपण शिवजयंती साजरी करतो, जयंती म्हणजे फक्त फोटोला हार घालून डॉल्बीच्या तालावर नाच करणे नाही, जयंती म्हणजे फक्त भगवे फेटे आणि झेंडे घेऊन जय शिवाजी जय भवानी घोषणा देणे म्हणजे जयंती नाही. जयंती म्हणजे जागृतीकडे जाणे आहे. जयंतीचा अर्थच जागृती आहे. आज समाजाला जयंतीकडून जागृतीकडे नेण्याची गरज आहे. म्हणून आज समाजप्रबोधनाची गरज आहे. आज फक्त शिव, शंभू, शाहू, फुले, आंबेडकर, बसव यांच्याच जयंती साजऱ्या होतात आपल्या पूर्वजांच्या जयंती का होत नाहीत ? हा विचार आपण केला पाहिजे.
जे स्वतःसाठी जगतात ते कायमचे मरतात, जे समाजासाठी जगतात, ते मरूनही नेहमीच जिवंत राहतात.
हाच ओजस्वी इतिहास आहे माझ्या राजाचा. मरावे परी किर्तीरूपे उरावे, ही पंक्ती सत्यात उतरविणारे आदर्श स्वराज्य संथापक म्हणजे छ. शिवाजीराजे. या राजाने सोने, मोती माणिक, हिरे नाही कमविले तर सोन्यासारखी माणसे कमविली. धर्मासनावर सत्तासनाची राजवट निर्माण करणारी आदर्श राजवट म्हणजे म्हणजेच शिवशाही.
भारताच्या इतिहासात नेहमीच दोन शाही होत्या एक होती एक होती सरंजामशाही आणि दुसरी होती राजेशाही. शिवरायांची राजवट ही सरंजामशाहीची राजवट होती. राजेशाहीत राजाच कौतुक नेहमीच होते पण लोकशाहीत राजाच कौतुक गौरव व्हावा असा एकमेव माझा छत्रपती शिवाजी राजा.
राजेशाहीत, सरंजामशाहीत लोकशाही निर्माण करणारा एकमेव राजा, राजा शिवछत्रपती. सर्वांस पोटास लावणे हाच स्वराज्याचा सरनामा होता.
शिवशाही म्हणजेच लोकशाही, शिवराज्य म्हणजे बुद्ध- बसव- भीम यांच्या स्वप्नातील लोकसत्ताक लोकशाही पद्धती.
महाराज्यांच्या पूर्वी कोणतेही मराठा राजवट भारतात नव्हे तर जगात कोठेच नव्हती. बौद्ध, जैन धर्माला अनेक राज्यानी राजाश्रय दिला होता. अनेक बौद्ध, जैन राजे भारतात होऊन गेले आहेत. शिवाजी महाराज म्हणजे पूर्वी कोणीतरी स्थापन केलेल्या गादीवर बसून राज्यकारभार करणारे राजे नव्हते. सर्वांस पोटास लावणे हाच स्वराज्याचा सरनामा हृदयाशी कवटाळून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे प्रजाहितदक्ष राजे म्हणजे शिवछत्रपती. ते एक स्वतंत्र राज्यसंस्थापक होते. शिवशाहीत मावळे इमानदार होते. आजच्या नेत्यासारखे आणि कार्यकत्यासारखे पैशाला, मद्याला आणि मांसाहारी जेवणाला विले जाणारे नव्हते. शिवरायांशी, स्वराज्याशी इमान ठेवणाराच खरा मावळा. मावळा एका जाती धर्मापुरता मर्यादित नव्हता. मावळा म्हणजे मावळ प्रांतात राहणारा, गडकपाऱ्यात भटकणारा, स्वराज्य स्थापनेत रक्त सांडणारे अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार लोक म्हणजे मावळे. मावळे आणि मराठे ही व्यापक संकल्पना आहे. मराठा जातीचे नाव नसून, कार्याचे , कर्तृत्वाचे आणि शौर्याचे नाव आहे. मावळप्रांतात राहणारे सर्व कुणबी खऱ्या अर्थाने शिवरायांचे मावळे आहेत.
शिवरायांचे कार्य आणि राज्य , हे त्यांच्या राज्यात राहणाऱ्या सामान्य माणसाला - रयतेला आपले राज्य वाटत होते, हेच शिवशाहीचे वैशिष्ट्य आहे. माझ्या मते उत्तम राज्याच्या सर्व संकल्पना शिवशाहीत पूर्ण झाल्या, खरे तर तेच उत्तम राज्य आहे.
सध्या चित्र फार वेगळं आहे. लोकशाही, लोकशाही म्हणून गौरव करणाऱ्यांनो, खरी लोकशाहीची मूल्ये तुम्हाला माहिती आहेत का ? आज आपण आणि शिवशाही यात जवळजवळ ३५० वर्षाचे अंतर आहे. आता सरंजामशाही काही उपयोगाची नाही हे जरी खरे असले तरी लोकशाहीचा पुरेपूर फायदा लोकांना मिळत नाही, हेही तितकेच खरे आहे. बिकाऊ नेते आणि कार्यकर्ते यांनी सामान्य माणसाची गळचेपी केली आहे.
खुद को बुलंद कर इतना, या कवितेच्या ओळी फक्त कवितेतच राहिल्या. मन- मेंदू- मनगट असक्षम असणारी ही रयत आज सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक गुलाम बनत आहे.
पन्हाळ्याला सिद्धी जोहार आणि फादरखान यांनी वेढा दिला. हा वेढा तोडण्यासाठी नेताजी पालकरांनी सिद्धी हिलालच्या साह्याने दिलेला लढा नाकामयब ठरला. स्वराज्यातील सेनापतीला हार मानावी लागली होती. जेथे वेढा पातळ असेल तेथून वेढ्यातून बाहेर पडायचे असे ठरले. त्यासाठी खोटा शिवाजी तयार करण्यात आला. त्याला महाराजांसारखी वेशभूषा केली, कपाळाला चंद्रकोर लावली. गळ्यात कवडीची माळ घातली आणि हा खोटा शिवाजी पालखीत बसला. पुढे निघून गेला. तो सिद्धी जोहरच्या हाती सापडला. त्याला माहिती होते की खान आपल्याला पकडणार आणि मारणार. किंबहुना खानाने त्याला पकडावे आणि सैन्य गाफील होऊन वेढा सैल व्हावा. त्या संधीचा फायदा घेऊन महाराज पन्हाळगडावरून निसटले ते विशाळगडाकडे गेले. पकडलेल्या खोट्या शिवाजीचा खानाने खातमा केला. तो खोटा शिवाजी होता, शिवा न्हावी. आपल्या मृत्यूची पूर्वकल्पना असतानाही मृत्यूला हसत हसत कवटाळणारा शिवा न्हावी एकटाच नव्हता. शिवरायांच्या घोडदळ, पायदळ यात असंख्य मावळे स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावायला तयार होते.
महाराज पन्हाळगडावरून निसटले, विशाळगडाकडे निघाले. बाजीप्रभूसह मूठभर मावळ्यांनी घोडखिंड अडवली. महाराजांना विशाळगड गाठायला उसंत मिळाली. महाराज विशाळगडावर पोहचले. बाजीप्रभूंना वीरमरण आणि अनेक मावळे गतप्राण झाले. आज इतिहासाला त्यांची नावेही माहीत नाही.
बाजीप्रभु आणि मूठभर मावळे का लढले ? तीच भावना, मेलो तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे.
या अमरहुतात्म्यांच्या प्रेरणा घेऊन आज शिवइतिहासाची पाने चाळत आहोत. तरीही आज युवकांकडे पाहिले तर वाटते , आजचा युवक नक्की कोठे हरवला आहे. व्हाट्सअप्पच्या, फेसबुकच्या युगात जगणाऱ्या युवकाला आज महापुरुष वाचण्यासाठी वेळ नाही. शीला, मुन्नी, शालू आमचं सगळंच काम हळूहळू. बाप कामातून बाहेर येत नाही आणि बाहेर आलाच तर नशेत बुडून जातो. आईच्या मागचे अवडंबर, व्रतवैकल्ये, सण-समारंभ सुटत नाहीत, सुटलीच तरी घर-घर की कहाणी कधी संपत नाही. मुलीचा निम्म्याहून अधिक वेळ व्हाट्सअपवर चाॅटिंग आणि मोबाईल फोनवरच जातो. सकाळी एकाशी पॅचअप, संध्याकाळी एकाशी ब्रेकअप, यातच माझ्या युवापिढीचा वेळ जातो. आम्ही महापुरुष वाचणार कधी ?
शेतकऱ्यांच्या बाबतीत महाराजांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आजपर्यंत सत्तेत आलेल्या कोणत्याही राजकिय पक्षाने अशी भूमिका आजपर्यंत घेतली नाही. उदध्वस्त झालेली गावे महाराजांनी कौलनावे देऊन पुन्हा वसवली. शेतकऱ्यांना शेतीसाठी बी- बियाणे औतफाटा देऊन मदत केली. शेतीला प्रोत्साहन दिले. शेतीवरील महसूल कमी केला, शेतसारा कमी केला.
दुष्काळात महसूल माफ केल्या याउलट दुष्काळात शेतकऱ्यांना मदत केली. स्वराज्यातील एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करण्याऱ्याच्या नावे लावून तिची नोंद महालकऱ्याच्या दप्तरी असे. जमीन मोजण्यासाठी काठी केलेली असे ती पाच हात पाच मोठी लांब असे एका हाताची लांबी १४ तसू काठीची लांबी ८२ तसु असे. प्रत्येक शेतकऱ्यास किती पीक व्हावे, हे पिकाची पाहणी करून ठरवीत. एकूण शेतीच्या उत्पन्नाचे ५ भाग करून त्यापैकी ३ भाग शेतकऱ्यांना आणि २ भाग सरकारला असा करार होता. सरकारदेणे शेतकऱ्याला नगदी किंवा धान्याच्या रुपात द्यावे लागत असे. नापीक जमिनीच्या शेतकऱ्याला गुरे ढोरे सरकारातून दिली जात असे. अवर्षण, दुष्काळ प्रसंगी शेतकऱ्यांना मदत केली जात असे.
खऱ्या अर्थाने महात्मा बसवण्णांच्या स्वप्नातील राज्यकारभार कसा असावा, हे शिवरायांनी दाखवून दिले. महात्मा बसवण्णा एका वचनात म्हणतात, राजा हा जनतेच्या मालक नसून, सेवक आहे. ही शिकवण शिवरायांनी आपल्या राज्यकारभारात तंतोतंत उतरवली.
शिवचरित्राचे अनेक पैलू मांडता येतील, पण वेळेअभावी त्यासर्व पैलूंचे आपण स्मरण करू.
जहागिरी-इनामदारी- वतनदारी व गावगाडा, रयतेची कणव असणारा राजा, शिवाजी महाराजांची स्त्रियांच्या गौरवार्थ भूमिका, शिवाजी महाराज आणि राज्यकारभार, सुखी समाधानी रयत, शेतकऱ्यांचे सैन्य, व्यापार उद्योगास संरक्षण, गुलामांच्या व्यापारास बंदी, महाराजांची सर्वधर्मसमभाववृत्ती, शिवरायांच्या इतिहासाचा विपर्यास का ? इ मुद्यांवर विस्तृत विवेचन करता येईल.
लेखक: अभिषेक देशमाने, ९८२२०५४२९१.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो अतीशय छान लिहीलय. पण विनोदी लेखनात हे सामिल करण्या ऐवजी ललित मध्ये टाकायचे होते. हेडिंग मुळे गैरसमज झाला ना! आणी शिवाजी काय? शिवाजी महाराज असे लिहा हो, नुसते शिवाजी म्हणले की नाही आवडत. ते एकमेव होते आणी राहतील.

छान जमलाय लेख. Happy रश्मीजींशी सहमत. भ्रमनिरास होतो अशाने वाचकांचा.

मी मायबोलीवर नवीन आहे>>>>> नवीन? चांगला दोन वर्षांचा गुटगुटीत आयडी दिसतोय की! Happy