जादुई माजघर

Submitted by मनीमोहोर on 10 February, 2018 - 04:34

ओटी, पडवी आणि सैपाकघर यांच्या कोंदणात बसवलेलं माजघर म्हणजे कोकणातल्या आमच्या घराचा प्राण आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही .

आमचं घर तसं मोठंच असल्याने साहजिकच माजघर ही मोठंच आहे . पु लं च्या शब्दात सांगायच तर एका वेळेला पंचवीस पानं सहज उठेल एवढं मोठं . माजघरात सगळं सामान भिंती कडेलाच असल्याने ते जास्तच मोठं आणि मोकळं वाटतं. घराच्या मधोमध असल्याने फार सूर्यप्रकाश आणि उजेड यायला वाव नाहीये पण काचेच्या कौलांमुळे दुपारी मात्र भरपूर प्रकाश असतो माजघरात . भिंतीमध्ये कोनाडे आणि खुंट्या अजून ही आहेत .भिंतीतल्या कोनाड्यात नेलकटर, पावडरचे डबे, टिकल्यांची पाकीट, रोज लागणारी औषधं, मुलांचे छोटे मोठे खेळ, त्यांची पेनं, गोष्टींची पुस्तकं अशा एकमेकांशी संबंध नसलेल्या अनेक वस्तू सुखेनैव नांदत असतात. आणि खुंटयांवर मुलांची दप्तर, पिशव्या, शर्ट, हात पुसायचे टॉवेल पावसाळ्यात कंदील, वैगेरे वगैरे ...

आमचं घर तसं फार जुन्या वळणाच नाहीये पण तरी ही माझ्या तिथल्या सासूबाईंचा वावर सैपाकघर आणि माजघर इथेच जास्त असे . त्यांना खरं तर झोपाळा फार आवडत असे, पण फक्त दुपारी जेवण झालं की जेव्हा पुरुष मंडळी वामकुक्षी घेत असत तेव्हाच फक्त त्या थोडा वेळ ओटीवरच्या झोपाळ्यावर येऊन बसत असत . एरवी कधी त्या ओटीवर फारशा येत नसत. अगदी टीव्ही ही त्या माजघरातूनच बघत असत. जणू काही माजघराचा उंबरठा ही मर्यादाच घालून घेतली होती त्यांनी स्वतः साठी.

आमच्या जॉनी ने मात्र उलटी मर्यादा घालून घेतली आहे . तसा त्याचा घरात अगदी मुक्त आणि सर्वत्र संचार असतो . मुलं सुट्टीच्या दिवशी उशीरापर्यंत झोपलेली असली किंवा बराच वेळ खोलीत अभ्यास करत असली आणि याला दिसली नाहीत तर एखाद्या मोठया माणसासारखं दार उघडून मुलांची खबरबात घ्यायला खोलीत ही जातो. पण कधी ही माजघराचा उंबरठा ओलांडुन आत येत नाही . अगदी भुकेने व्याकुळ झाला असला तरी उंबरठ्यावर बसून रहातो पण माजघरात मात्र पाऊल टाकत नाही.

पूर्वी आंमच्याकडे दुपारची आणि रात्रीची जेवणं तर माजघरात पंगत मांडून होत असतच पण सकाळची भात पिठल्याची न्याहारी ही पंगत मांडूनच होत असे. दुपारची पंगत वाढताना घरच्या सगळ्यानी कपडे बदलून तयार व्हायचं हा आमच्या घरचा शिरस्ता. कामा करताना सकाळपासूनची साडी खराब झालेली असते म्हणून माझ्या सासूबाई ही साडी बदलत असत. आणि आम्ही कधी कंटाळा केलेला ही त्यांना चालत नसे. पानं मांडून तयारी झाली की माझे तिथे राहणारे सासरे घंटा वाजवत असत. त्या आवाजाने दोन मिनटात सगळी जण पानावर हजर होत असत . आता त्यांच्या नंतर मात्र ही डिनर बेल बंद झाली आहे . मध्यंतरी माझ्या मुलीने मला परदेशातून एक डिनर बेल भेट म्हणून आणली आहे . सगळयांना 'जेवायला चला ' असं सांगणारी ती बेल इथल्या भातुकलीच्या संसारात काही वापरली जात नाही, पण तरीही मी ती जेवणाच्या टेबलावर ठेवली आहे . तिच्याशी माझ्या सासऱ्यांची आणि माजघरातल्या पंगतींची आठवण जोडली गेली आहे म्हणून. ... आता बदललेल्या काळानुसार रोजची माजघरातली पंगत बंद झाली असली तरी अजूनही सणावरी, कार्यप्रसंगी किंवा कोणी पाव्हणे आले असतील तर माजघरात पंगत मांडूनच जेवणं होतात. वाढायच्या वेळी कपडे बदलून तयार होण्याची परंपरा अजून ही आवर्जून पाळली जाते. मुख्य अतिथीचे पान सर्वाना त्यांच्याशी बोलणे सोईचे होईल असे मांडले जाते. बाकीची मंडळी वयाच्या जेष्ठतेनुसार बसतात. एरवी स्वतःच्या हाताने जेवायचा कंटाळा करणारी लहान मुलं ही आनंदाने पंगतीत बसतात आणि छान व शिस्तीने जेवतात . हसत खेळत जेवणं होतात. अशी पंगत बघणं हा ही माझ्या आनंदाचे निधान आहे.

गणपती, नवरात्र ह्या उत्सवांच्या दिवसात माजघरात एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो . कारण गणपतीची स्थापना देवघरात न होता माजघरातच केली जाते . किती ही आधी पासून तयारी करू या असं ठरवलं तरी रात्री जागून गणपतीची सजावट करणं ही आमच्या घरची रीत आहे त्यामुळे त्यादिवशी माजघराला ही झोप मिळत नाही. असो . गणपतीच्या दिवसात गणपतीपुढे काढलेल्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या, हौसेने केलेली सजावट, मंदपणे तेवणाऱ्या समया, उदबत्त्या, फुलांचा माजघरात भरून राहिलेला वास, पेटी, तबला, झांजा, मृदंग यांच्या साथीमुळे रंगलेल्या आरत्या, भजनं, अथर्वशीर्षाची केली जाणारी आवर्तनं , जेवणाच्या उठणाऱ्या पंगती, दर्शनासाठी येणारे परिचित, या सगळ्या मुळे माजघरात एक वेगळंच चैतन्य नांदत असत .

हरतालिका पूजन, हळदीकुंकू, डोहाळजेवण, बारसं, महालक्ष्मी पूजन असे खास स्त्रियांचे समारंभ माजघरातच साजरे होतात. पण खऱ्या अर्थाने माजघर दणाणून जातं ते घरात कोणाची मंगळागौर असेल तर. एरवी ही माजघरावर सत्ता असते ती स्रियांचीच पण मंगळागौरीच्या दिवशी पुरुषांना मज्जावच असतो माजघरात. चौरंगावर फुलांच्या सजावटीत विसावलेली देवी आणि आजूबाजूला चेष्टा मस्करी, हास्य विनोद, उखाणे, झिम्मा, फुगड्या, नाच ग घुमा, बस फुगडी, कोंबडा असे निरनिराळे खेळ खेळण्यात रमलेल्या बायका आणि मुली ... ह्या सगळ्यात रात्र कधी सरते ते कळत ही नाही . पहाटे पहाटे खास जायफळ घातलेली कॉफी घेऊन मगच सगळ्या आपापल्या घरी जातात तेव्हाच माजघराला विश्रांती मिळते .

आमचं घर आहे मोठं पण पै पाव्हणे ही असतातच. अगदी छोटासा समारंभ असेल तिकडे तरी ही सगळे जीवाचा आटापिटा करून घरी जातात. त्यामुळे पाव्हणे असले की जागा कमीच पडते झोपायला . अशा वेळी मग मध्ये जायला यायला वाट सोडून दुशीकडे लायनीत गाद्या घातल्या जातात . गादीवर पडून गप्पा मारत मारत मंडळी झोपी जातात. पण एक आहे रात्री मांजरांचा मुक्त संचार असतो माजघरात आणि ती हमखास आपल्या गादीत येऊन आपल्याला चिकटतात. हे ज्याला सहन होत नाही तो नाही झोपू शकत माजघरात.

घरात चिमुकल्या बाळाचं आगमन होणार असलं की आधीच मायाळू असलेलं माजघर जास्तच मायाळू बनत. तसं तर बाळंतिणीची खोली आहे सेपरेट पण बाळाचा पाळणा टांगायचा मान माजघरातल्या वाशालाच मिळतो. बाळा बरोबरच आईला ही विश्रांती मिळावी म्हणून एखादा माचा ही टाकला जातो पाळण्या शेजारी. आधीच शांत आणि काळोखं असलेलं माजघर मग अधिकच शांत बनत, बाळाची झोपमोड होऊ नये म्हणून . आपली सगळी माया त्या लहानग्या जीवावर पाखरत राहत . उदाधुपाचा आणि वेखंडचा वास,खुळखुळ्याचा आवाज, थोड्या मोठ्या मुलांचा बाळाला खेळवण्यासाठी वाढलेला माजघरातला मुक्काम, हळू आवाजात म्हटलेल्या ओव्या आणि अंगाई, बाळाचं वेळी अवेळी सुरू होणार रडणं आणि मोठयांचं त्याला शांतवणं ... माजघराला ही ह्या सगळ्याची भुरळ पडत असेल.

कधी तरी आपल्याला उदास, एकट वाटत असेल तर माजघरात थोडा वेळ बसलं तर आपली उदासी नाहीशी होते. एरवी काळोख आपल्याला जास्त उदास करतो पण काय जादू आहे माहीत नाही माजघरातला काळोख, तिथला गारवा , तिथली शांतता आपल्या मनाला मायेने थोपटत रहातात आणि आपलं मन थोड्याच वेळात शांत होत ...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म.मो., किती गोड...दोन दिवसांपूर्वीच वाचला होता पण वाचून झालं की सारखं मन भरून यायचं...आज प्रतिसाद देतेय. तुम्हाला एक जादूकी झप्पी .>>> सुलक्षणा , काय बोलू ?

नँक्स, पंकजा,जागू, सुमुक्ता आभार प्रतिसादाबद्दल.

नेहमी प्रमाणेच खुप सुंदर लेख. आमचे मसुर्यातील घर आठवले:-) माजघर अस्सेच आहे . एका कोपर्यात गणपती बाप्पा साठी मांड्णी आहे आणि मागे रंगवलेली भिंत.

छान लिहिलंय.

मीपण गंध सिनेमातच पाहिलं असलं घर.

मस्तच लिहलयं!
आमचा वाडा डोळ्यासमोर उभा राहिला! असाच प्रशस्त माजघर असलेला! दोन भागात उभा विभागला गेला तरी एकावेळी २०-२५ लोकं जेवायला बसु शकतील एवढा!
आज मोडकळीला आलाय पण त्याच्या भव्यतेच्या सगळ्या खुणा शाबूत आहेत!

कृष्णा , खर आहे . गावाकडच्या बहुतेक घरांची स्थिती अशीच आहे. नोकरीची,विकासाची संधी नाही म्हणून गाव सोडून शहरात यावं लागत . त्यामुळे तिथे रहायला कोणी नाहो मग खर्च कशाला करायचा त्यावर ह्या विचाराने मेंटेनन्स नाही होतं त्यामुळे घरांची अवस्था दयनीय होते . अर्थात ह्यात चूक बरोबर अस काही नाही . जो तो आपापल्या ठिकाणी बरोबरच आहे.

आमचं तरी काय , घर नांदतं आहे म्हणून डागडुजी आणि मटेंनन्स होतोय.

Pages