गाईच्या शेणाचे प्रामाणिक संशोधन करण्यात काय गैर आहे?

Submitted by माने गुरुजी on 7 August, 2017 - 16:03

मायबोलीवर इतर काही धाग्यांवर आय आय टी मधे पंचगव्याचे संशोधन चालू होणार यावरून काही मते वाचली. त्यात असेही मत होते की आय आय टी सारख्या संस्थेत हे होणे हे संस्थेची क्रेडिबिलिटी नष्ट होण्यासारखे आहे. मी मुद्दाम "गाईचे शेण" हा शब्द वापरला आहे, पंचगव्य हा नाही. मला केवळ आपल्या पुर्वजांनी किंवा थोर भारतीय संस्कृतीने म्हटले आहे म्हणून हे संशोधन करा असे अपेक्षीत नाही. केवळ सरकारमधल्या कुणीतरी सांगितले म्हणून हे करा हे ही मला अभिप्रेत नाही. कृपया राजकारणाच्या नजरेतून त्या धाग्याकडे पाहू नका.

तर गाय हा एक प्राणी आहे आणि त्याच्या विष्ठेतून काही उपयोगी (औषधे किंवा रसायने) मिळतात का यावर वैज्ञानिक निकष वापरून हे संशोधन केले तर काय चूक आहे असा माझा प्रश्न आहे.

घोडीच्या लघवीपासून केलेले स्त्रीरोगांवरचे अ‍ॅलोपॅथिक औषध फायझर कंपनी तर्फे बाजारात उपलब्ध आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Premarin

एमआयटी मधे माणसाच्या विष्ठेपासून उपयुक्त औषधे मिळतील का यावर संशोधन चालू आहे. इतकेच नाही तर त्यातल्या काही औषधांना अमेरिकेत FDA कडून परवानगीही मिळाली आहे.
http://www.cnn.com/2015/08/26/health/fecal-transplant-poop-medicine/inde...
https://www.theatlantic.com/health/archive/2014/09/when-feces-is-the-bes...

कॅनडात कॅलगरी विद्यापीठातही माणसाच्या विष्ठेपासून तयार केलेल्या औषधांवर संशोधन चालू आहे.
https://idsa.confex.com/idsa/2013/webprogram/Paper41627.html
http://www.foxnews.com/health/2013/10/03/pills-made-from-poop-could-cure...

इंग्लंडमधे न्यूकॅसल विद्यापीठात लामाच्या विष्ठेचा उपयोग पाण्याचे प्रदुषण कमी करण्यासाठी कसा करता येईल यावर संशोधन चालू आहे
http://news.bbc.co.uk/1/hi/england/1793381.stm

ऑस्ट्रेलियात फ्लिंडर्स विद्यापिठात व्हेल माशाच्या विष्ठेबद्दल संशोधन सुरु आहे (हे औषधांसाठी नसून पर्यावरण वृद्धी संदर्भात आहे)
http://rspb.royalsocietypublishing.org/content/277/1699/3527

युके मधे नॉटिंगहॅम विद्यापीठात झुरळांच्या मेंदूपासून तयार केलेल्या औषधांवर संशोधन चालू आहे.
http://healthland.time.com/2010/09/17/new-weird-source-of-antimicrobial-...

जर्मनीत ब्रेमेन विद्यापीठातले पेंग्विन च्या विष्ठेबद्दलचे हे संशोधन (हे औषधांसाठी नसून पेंग्विनला त्या विधीसाठी किती जोर लागत असेल यावर आहे Happy या संशोधनाला यूसलेस रिसर्चसाठी असणारे इगनोबल पारितोषिकही मिळाले. हे गंभीर संशोधन नाही )
https://link.springer.com/article/10.1007/s00300-003-0563-3

सगळ्यात शेवटचे ब्रेमेन विद्यापीठातले सोडले तर हे सगळे गंभीर संशोधन आहे. ब्रेमेन विद्यापीठातलेही यूसलेस असले तरी ते छद्मविज्ञान नाही. या कुठल्याही संशोधनामुळे त्या त्या विद्यापीठाची क्रेडीबिलिटी कमी झाली नाही.

मग आय आयटी किंवा इतर कुठल्याही संस्थेने गायीच्या शेणाचा वैज्ञानिक निकषांवर अभ्यास केला तर काय हरकत आहे?

कुठ्ल्याही अतर्क्य वाटणार्‍या संकल्पनेला , खुल्या मनाने पाहणे आणि त्या वैज्ञानिक निकषांवर उतरतात का नाही ते पाहणे प्रत्येक वैज्ञानिकाचे आद्यकर्तव्य आहे. त्या आधिच आपण त्या कल्पनांना राजकारण्यांच्या कलुषीत द्रूष्टीतून पाहतो आहोत का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रामाणिक संशोधन करण्यात काहीच गैर नाही पण ते संशोधन करण्यामागे प्रामाणीक हेतू नसून सरकार/वातावरण सध्या गो-फ्रेंडली असल्यामुळे आपल्या संसकृती बाबत रेलेवंट (असं त्यांना वाटतं) असलेल्या गोष्टींवर रिसर्च व्हावा हा हेतू असणे गैर आहे किंवा देशाकरता हिताचं नाही असा मुद्दा आहे मानेगुरजी.

जरूर संशोधन करावे. अगदी सरकारी खर्चाने करावे. शेण, गोमुत्रच काय पण आपल्याकडे जनरल समज जे आहेत एखाद्या गोष्टीच्या गुणधर्माचे, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल संशोधन व्हावे. अगदी भाजीत कडीपत्ता घातल्याने कसे ते जास्त पाचक होते याचे सुद्धा.

हे खवचटपणे लिहीलेले नाही. इतर गोष्टींचा निधी इकडे वळवावा असे मी म्हणत नाही. ज्याचे लोकांच्या दृष्टीने जितके महत्त्व आहे त्याप्रमाणे त्याला प्राधान्य द्यावे.

पण "प्रामाणिक" हा शब्द महत्त्वाचा आहे. ग्राफ आधीच काढून मग त्यावर रीडिंग्ज लिहील्यासारखे होउ नये.

संशोधनाचे गोल्स नेमके व मोजण्यासारखे असावेत. त्याची पद्धत शास्त्रशुद्ध, म्हणजे जगात संशोधनाकरता जी प्रचलित आहे ती असावी. त्या संशोधनाबाबत, निष्कर्षाबाबत कोणालाही शंका काढण्याची मुभा असावी व त्याला उत्तरे मिळावीत. ते निष्कर्ष कोठेही पडताळून पाहता येतील असे असावेत. आणि मुख्य म्हणजे त्यापेक्षा वेगळे निष्कर्ष कोणी काढून दाखवले, तर आधीची विधाने बदलायची तयारी असायला हवी.

हे सगळे करून जर कोणती संस्था जुन्या भारतीय गोष्टींबद्दल संशोधन करणार असेल तर माझा पूर्ण पाठिंबा असेल.

संशोधनाचे गोल्स नेमके व मोजण्यासारखे असावेत. त्याची पद्धत शास्त्रशुद्ध, म्हणजे जगात संशोधनाकरता जी प्रचलित आहे ती असावी. त्या संशोधनाबाबत, निष्कर्षाबाबत कोणालाही शंका काढण्याची मुभा असावी व त्याला उत्तरे मिळावीत. ते निष्कर्ष कोठेही पडताळून पाहता येतील असे असावेत. आणि मुख्य म्हणजे त्यापेक्षा वेगळे निष्कर्ष कोणी काढून दाखवले, तर आधीची विधाने बदलायची तयारी असायला हवी.

हे वरचं सर्व fundamental research ला पण लागू होईल का? कारण त्यात गोल्स असणं व ते मोजता येणं जर शक्य असेल तर प्रश्नच मिटला. मग त्याप्रमाणे funding देता येईल. पण गोमाता वाल्याना फक्त accountability ची सक्ती आणि बाकीच्यांना ती नाही , असं असेल तर नॉट फेअर ना!

हे वरचं सर्व fundamental research ला पण लागू होईल का? >> फंडामेंटल रिसर्चला यातलं काय लागू होतं नाही असं तुम्हाला वाटतं? म्हणजे नक्की वार कुठल्या बाजुने आहे ते कळलं नाही.
गोमाता रिसर्चला फंडिंग करायचं असेल तर सुरुवात अगदी स्मॉलस्केल ( दोन ज्युनिअर आणि एक पार्ट टाईम फॅकल्टी इन सम लॅब ) पासुन करावी. त्यात तथ्य दिसलं तर मग पुढे बघु टाईप. जे इतर कुठल्याही रिसर्चला केले जाते. डायरे़क्ट विद्यापीठ काढू नये.

वार कसला अमित, प्रश्न आहे.

{{मूलभूत संशोधनावर होणारा खर्च आणि त्यातून होणारा ’फायदा’ हा एखाद्या आर्थिक वर्षातल्या नफ्यातोट्याच्या परिमाणात मोजायचा नसतो. त्या संशोधनाचे परिणाम दिसायला बराच कालावधी लागू शकतो, शिवाय त्याचं तत्काळ, ढोबळ मूल्यमापनही शक्य नसतं. कारखान्यांना आणि उद्योजकांना लावले जाणारे निकष मूलभूत संशोधनासाठी वापरणं हे नक्कीच योग्य नाही.}}

हे वरचं त्या धाग्यात आहे. मग इथे goal setting, measuring plan versus actual , timeline - हे कसं काय करणार? मग उद्या गोमातावाले काका म्हणाले की हे पहा, माझ्या गोमूत्र संशोधनाचे परिणाम दिसायला खूप वेळ लागेल, शिवाय यशाचं प्रमाण अत्यल्प असेल पण मलापण निधी द्या , तर काय करायचं?

मी संशोधनामधला एक्स्पर्ट नाही, पण मला ढोबळ जे कळते त्यातून - संशोधन नक्की कशा प्रकारचे आहे ते गोमाताकाकांना विचारायचे:
१. गोमुत्राचे जंतुनाशक म्हणून उपयोग - हे अ‍ॅप्लाइड रिसर्च चे उदाहरण होईल. व त्याचे निकष त्याप्रमाणे लागू होतील.
२. गोमुत्रातील जीवाणू, त्यांचे जेनेटिक कोड ई. बद्दलचे संशोधन - हे कदाचित मूलभूत प्रकारचे होईल. व त्याचे निकष त्याप्रमाणे.

यातील कोणत्या कामाला काय निधी द्यायचा ते सरकारी धोरणाप्रमाणे. पण मुख्य म्हणजे मी वरती ज्या कंडिशन्स लिहील्या आहेत त्या दोन्हीला लागू आहेत.

इतर कोणकोणत्या विषयात सं होते ढळल्यावर डोके चक्रावणार नाही का?

* वशिंवाल्या देशी गाईंचं/परदेशी जास्ती दूध देणाय्रा गाईंचं?
* गुणवत्तेत थोडासाच फरक आहे म्हणून फक्त शेणासाठी गाय ठेवावी लागेल.

प्रामाणिक संशोधन करण्यात काहीच गैर नाही पण ते संशोधन करण्यामागे प्रामाणीक हेतू नसून सरकार/वातावरण सध्या गो-फ्रेंडली असल्यामुळे आपल्या संसकृती बाबत रेलेवंट (असं त्यांना वाटतं) असलेल्या गोष्टींवर रिसर्च व्हावा हा हेतू असणे गैर आहे किंवा देशाकरता हिताचं नाही असा मुद्दा आहे मानेगुरजी≥>>>>>>>>>>>>>

हा मुद्दा डोक्यात ठेऊन या संशोधनाला विरोध करणे म्हणचे पूर्वग्रह दूषित विरोध असे नाही होणार का? जर संशोधनातून हे सगळे खोटेच आहे हे बाहेर आले तर सरकारही थोडे शहाणे नाही का होणार? वर उदाहरणे दिलेली संशोधने जर सुरू आहेत तर हे संशोधन केलेले का नको? देशी गाईच्या शेणात , दुधात, अमुक तमुक आहे हे शेवटी संशोधन करूनच कळणार आहे ना? ह्या असल्या फालतू संशोधनात वेळ व पैसा घालवण्यात अर्थ नाही असेही वाटणे स्वाभाविक पण संशोधन केल्याशिवाय तर ते कळणार नाही ना.

खरेतर कोणी प्रायव्हेटली संशोधन करून सुद्धा हे मुद्दे खरे की खोटे हे मांडू शकते. पण हे खरे की खोटे यावर जनमत इतके विभागलेले आहे की अर्ध्याचा 'हे आमच्या पूर्वजांना माहीतच आहे, संशोधन कशाला हवे' यावर ठाम विश्वास आहे, तर उरलेल्या अर्ध्यांचा 'हे फालतुच आहे, संशोधनात पैसे का घालवावे' यावर ठाम विश्वास आहे.

पण मुख्य म्हणजे मी वरती ज्या कंडिशन्स लिहील्या आहेत त्या दोन्हीला लागू आहेत.

Agree...पण हे त्या manifesto च्या विरोधात होईल कारण fundamental research ला perfomance review plus accountability लावता येत नाही असा सूर तिथे दिसला.

मला तसा सूर नाही वाटला. त्याला लावले जाणारे निकष अ‍ॅप्लाइड रिसर्च ला जे लावले जातात तसे नसतात अशा अर्थाने ते लिहीलेले आहे. मूलभूत संशोधन म्हणजे लोकांना पैसे देउन मोकळे सोडून दिले जात असेल असे नाही. फक्त त्याचे निकष वेगळे असतात अकाउण्टेबिलिटीचे. एक मिनीट वादाकरता असे गृहीत धरले, की भारतात हे काही होत नसेल, तरी अमेरिकेसारख्या पारदर्शक लोकशाही असलेल्या देशात किंवा चीन सारख्या हुकूमशाही असलेल्या देशात तरी दिलेला निधी योग्य कामाकरता वापरला जात आहे का हे बघितले जात असेल.

निधी द्या आणि प्रश्न विचारू नका असे कोणी म्हणणार नाही. म्ह्ंटले तर ते कोणी मान्यही करणार नाही.

fundamental research & applied research , मूलभूत संशोधन आणि उपयोजित संशोधन असे दोन भेद आहेत.
गाईच्या शेणावरचं संशोधन हे दुसर्‍या प्रकारात येतं (असं मला वाटतं. शास्त्रज्ञ, विज्ञानाचे अभ्यासक नक्की सांगू शकतील).
मूलभूत संशोधन हे अज्ञाताचा शोध घेतं. उपयोजित संशोधनाचं तसं नाही. त्यामुळे त्यातला नफातोटा मोजता यायला हवा.

असं संशोधन व्हायला हवं. पण ते गाईच्याच विष्ठेचं का ? हेडरमध्ये दिलेल्या दाखल्यांवरून अनेक प्राणीमात्रांच्या उत्सर्जितांवर संशोधन होतं. जर कोणी म्हणत असेल की अन्य प्राण्यांपेक्षा गाईच्या उत्सर्जितांत विशेष गुण असतात, अन्य प्राण्यांच्या उत्सर्जितांत ते असत नाहीत, तर ते म्हणणं विज्ञानाला धरून होईल का?

खरे तर गंगेच्या पाण्यावर संशोधन होणे गरजेचे आहे, नाशिकला जे बाबूशाहीने रामकुंड बुजवून टाकले परत खोदून त्यावर संशोधन व्हायला हवे. रामकुंडाच्या पाण्यात हाडं सुद्धा विरघळतात असं प्रत्यक्षदर्शी जुन्या लोकांनी सांगितले आहे.. अशा अनेक चमत्कारिक आणि खऱ्या गोष्टी भारतात आहेत, त्यावर खरोखर संशोधन व्हायला हवे.... शिवथर घळी चे प्रकरण व्यवस्थित अभ्यास होऊन निकालात निघाले तसे झाले तर हरकत नाही...

पण पंचगव्यसंशोधन हे राजकीय हेतूने प्रेरित आहे त्याचा उपयोग कशा तऱ्हेने होईल हे कोणालाही समजण्यासारखे आहे

बाकी काही नाही, अतिगोप्रेमामुळे गोवंश नष्ट होईल फक्त...

शेणावर संशोधन होण्यात काहीच गैर नाही,
मात्र जे संशोधन करून हाती काही पडेल की नाही याची खात्री नाही त्या संशोधनाला डायरेक्ट नॅशनल प्रोग्रॅम जाहीर करणे, त्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संशोधकांची समिती गठीत करणे, डायटेक्ट टोपमोस्ट संशोधन संस्थेस रिसर्च करायला सांगणे हे प्रकार गायीच्या शेणाला अवास्तव महत्व आल्याचे द्योतक आहेत.
सरकार चे उद्दिष्ट, वर म्हटल्या प्रमाणे , छोट्या स्केल वर रिसर्च सुरू करून, त्यातून उत्साहवर्धक finding मिळाल्यानंतर मोठा प्रोग्रॅम सुरू केला असे असते तर जास्त विश्वासार्ह ठरले असते,

शेणावर किंवा पंचगव्यावर आजवर संशोधन झालं नाही, या संशोधनासाठी निधी मिळाला नाही, हे चूक आहे.
अगदी १९७० सालापासून पंचगव्यावर संशोधन अनेक संस्थांमध्ये सुरू आहे. तसे शोधनिबंधही प्रकाशित झाले आहेत.
त्यामुळे अगोदरच्या सरकारांनी गायीकडे, पारंपरिक भारतीय विज्ञानाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, असा समज कोणी करून घेऊ नये. याबद्दल संशोधनच झालं नाही, असा समजही अर्थातच करून दिला जातो आहे, जो योग्य नाही.

आता जो विरोध होतो आहे, तो संशोधनाला नसून त्यासाठी ज्याप्रकारे आणि ज्या लोकांना निधी उपलब्ध करून दिला जातो आहे, त्याला आहे.
पंचगव्यावर जर संशोधन करायचं असेल, तर क्लिनिकल ट्रायलांची सोय हवी. तशी सोय असणार्‍या काही संस्था असताना, तिथे याबाबतचं ज्ञान असणारे उपलब्ध असताना दिल्लीच्या आयआयटीला पैसे देऊन मोठं केंद्र का उभारायचं? तिथे बाहेरची माणसं का आणायची? तर, आयआयटीचा शिक्का बसतो आणि काहीही आणि कसंही संशोधन केलं तरी शोधनिबंध न वाचणार्‍यांकडून मान्यता मिळते.

भारतात नेहरूंच्या काळात दूरदर्शीपणानं प्रत्येक विषयाचा अभ्यास होईल अशी योजना करून प्रयोगशाळा व संशोधनसंस्था उभारल्या गेल्या. तिथे त्या त्या प्रकारचं संशोधन होणंच अपेक्षित होतं आणि आहे. आता मात्र अनेक संस्थांना यासाठी वेठीस धरलं गेलं आहे. पैसा उपलब्ध झाल्यानं लोक 'संशोधन' करतीलही. मात्र यात त्या प्रयोगशाळेचं नुकसान नाही का? ज्या प्रयोगशाळांमध्ये काम सुरू होतं, तिथेच सोयी उपलब्ध करून हळूहळू निधी उपलब्ध करण्यापेक्षा सर्वांना भरपूर पैसे देऊन 'राष्ट्रीय महत्त्वाचं संशोधन' म्हणणं हे खेदकारक आहे.

शिवाय मूलभूत संशोधनासाठीचा निधी इकडे वळवला जातोय. तेही आक्षेपार्ह आहे. आधीच निधी अपुरा. त्यात पुन्हा अशा संशोधनासाठी पैसे वळते केले जाण्यानं विरोध होतोय.

मजा म्हणजे, हा पैसा उपलब्ध करून देताना जी उद्दिष्टं लिहिली गेली आहेत (ती वाचण्यासाठी सर्वांना उपलब्ध आहेत का, याची कल्पना नाही. ऑनलाईन असतीलही), ती वाचली की वाटतं, आजवर या विषयात संशोधन झालेलंच नाही. त्यामुळे अनेक प्रकल्प हे आधीच प्रकाशित झालेल्या कामाची नक्कलही असतील, याबद्दल मला शंका नाही. गेल्या एकदोन वर्षांत प्रसिद्ध झालेले तीनचार पेपर वाचले. त्यांतले निष्कर्ष, शोधपद्धती वाचून वाईट वाटलं. अ-शास्त्रीय भाषेत अ-शास्त्रीय संशोधन कसं करावं आणि लिहावं, याचे ते उत्तम नमुने होते. दुर्दैव असं की, त्यांची वर्तमानपत्रांतून बरीच प्रसिद्धीही झाली. 'प्रेशस अ‍ॅण्ड होली अ‍ॅनिमल' असे शब्द सर्वत्र वापरल्यानं प्रयोगांमध्ये कंट्रोल एक्सपेरिमेंट्सच नव्हते किंवा चुकीचे होते, निष्कर्ष अपुरे होते इत्यादी बाबींकडे लक्ष देण्यास वेळ कोणाला आहे?

गाय हा एक उपयुक्त पशू आहे. जसे की वृक्षांमध्ये नारळ. गायीचे मलमूत्र, मांस, हाडे, चरबी सर्वच गोष्टींवर संशोधन व्हायला हवे. कुठल्याही धर्माने कुठलेही जनावर केवळ भावनिक आधारावर चांगले वाईट ठरवणे यात काही तथ्य नाही.

¶¶आयआयटीचा शिक्का बसतो आणि काहीही आणि कसंही संशोधन केलं तरी शोधनिबंध न वाचणार्‍यांकडून मान्यता मिळते.

>>>> हेच उद्दिष्ट आहे. बाकी काही नाही. त्यासाठी इतका द्राविडी प्राणायम..

In the reports I have mentioned, the constant use of the word 'validation' instead of 'investigation' is also an issue.

माने गुर्जी ,संशोधनाचा हेतू तुमच्या लक्षात आलेला नाही.अडगळीतल्या हिंदू संकल्पना पुन्हा लोकांच्या माथी मारण्यासाठी मोदी सरकार हे धंदे करत आहे.इथे चार लिंका फेकून तुमचा लेख अभ्यासू झालेला नाही हे लक्षात घ्या.परदेशात असे संशोधन होते कारण धार्मिक नसून त्यांची विज्ञानवादी वृत्ती आहे.
उद्या भारतीय न्यायव्यवस्था कशी कूचकामी आहे हे ठरवून हे लोक शंकराचार्यांना न्यायाधीश करतील.मग बसा ओरडत.

आपल्याला हवे असलेले रिझ्ल्टस देणारे संशोधन करायला लावण्याचे प्रकार होतच नाहीत असं कुणाला सुचवायचं आहे का?

प्रायोजक खासगी भांडवलदार असलील अथवा त्यांना मदत करणारी सरकारे.
परदेशातले खाद्यपदार्थांचे संशोधन पाहा.

आपल्याला हवे असलेले रिझ्ल्टस देणारे संशोधन करायला लावण्याचे प्रकार होतच नाहीत असं कुणाला सुचवायचं आहे का?

>> होते म्हणून आपण जाणून बुजून करायचे काय? तेही आधीच ढोलताशे बडवून दवंडी फिरवून की काय निष्कर्ष असणार आहेत आणि ते कशासाठी वापरले जाणारेत... Happy

मुददा क्र २ हा आयसर च्या डॉ अपुर्वा बर्वे यांनी मराठि परिशदे च्या एका कार्यक्रमात सांगितला होता. आपल्या शरीरातील जीवजंतु या विषयावर व्याखान होते

गाईच्या शेणाचे प्रामाणिक संशोधन करण्यात काय गैर आहे? >>>> काहीच गैर नाही. परंतु आपले हे संशोधन अगदी सायन्समध्येच पाहिजे असे नाही पण हाय इंपॅक्ट फॅक्टर असणार्‍या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जर्नल्स मध्ये प्रकाशित करावे. अथवा पेटंट घेता असेल तर तसे करावे. तिथे पीयर रिव्ह्यूमधून हे संशोधन अ‍ॅक्सेप्ट होत असेल तर कोणत्याच प्रश्नाला जागाच रहाणार नाही. आपलीच लॅब, आपलाच पैसा आणि आपलेच जर्नल असेल तर सगळा आनंदच आहे

चिनुक्स पोस्ट मस्त आहे.

शेणावर किंवा पंचगव्यावर आजवर संशोधन झालं नाही, या संशोधनासाठी निधी मिळाला नाही, हे चूक आहे. >>> हो मीही ऐकले आहे. इतरही अनेक "जुन्या भारतीय गोष्टींबद्दल" च्या संशोधनाबद्दलही वेळोवेळी वाचलेले आहे.

सध्या असा समज प्रचलित होत आहे की आपल्याकडे ज्या गोष्टी आयुर्वेदिक आहेत म्हणून किंवा परंपरेने आलेल्या म्हणून वापरल्या जातात त्याबद्दल अजिबात संशोधन होत नाही. वैज्ञानिक संस्था या डावे किंवा भोंदू पुरोगामी छाप लोकांनी भरलेल्या असून त्यांना भारताबद्दल काही आस्था नाही. किंवा हे सगळे फंडिंग एनजीओज परकीय देशांच्या स्वार्थाकरता करतात. असे मेसेजेस व्हॉट्सॅप पासून इतर नेटवर्क्स वर फिरत असतात. लोकही तसेच फॉरवर्ड करतात.

याचे निराकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर अमेरिकेत कोणत्याही बातमीकडे जशी ट्रम्प सपोर्टर्स कडून संशयाने पाहिले जाते तसे होईल.

>>गाईच्या शेणाचे प्रामाणिक संशोधन करण्यात काय गैर आहे? >>>> काहीच गैर नाही. परंतु आपले हे संशोधन अगदी सायन्समध्येच पाहिजे असे नाही पण हाय इंपॅक्ट फॅक्टर असणार्‍या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जर्नल्स मध्ये प्रकाशित करावे. <<

आयाआयटिडि ने हा प्रकल्प घेतलेला असल्याने हे वरचे प्रश्न निकालात निघतील अशी आशा आहे. पण या आक्षेपा मागची नेमकि कारणं काय आहेत?
१. पंचगव्यावर संशोधन आणि त्याला मिळत असलेलं अवाजवी महत्व, फंडिंग?
२. लायकि नसताना (काहिंच्या मते) आयआयटिडि सारख्या संस्थेने संशोधन करण्यास दिलेली संमती?
३. पुढे या संशोधनातुन एखादं रत्न बाहेर पडलं तर सिद्ध होणारा मोदि सरकारचा दूरदृष्टिपणा? Wink

पण या आक्षेपा मागची नेमकि कारणं काय आहेत? >>> माझ्या मते ह्या संशोधनाला मिळत असलेलं अवाजवी महत्व आणि फंडिंग. निधी पुरविण्यासाठी इतर संशोधनात जे निकष लावले जातात ते इथे लावले गेले आहेत काय?

या संशोधनातुन एखादं रत्न बाहेर पडलं तर सिद्ध होणारा मोदि सरकारचा दूरदृष्टिपणा?>>>> क्वलिटी संशोधनातून चांगलेच रिझल्ट्स मिळतात. फक्त ते आपल्याच मनाप्रमाणे असतील असे नाही Happy
"पंचगव्यात काहीही तथ्य नाही " पासून "पंचगव्य हा एक अमूल्य ठेवा आहे" पर्यंत काहीही निकाल आले तर ते स्वीकारण्याची सरकारची आणि लोकांची तयारी आहे का? वरती म्हटल्याप्रमाणे जर मूलभूत संशोधनासाठीचा निधी इकडे वळवला जात असेल तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे. संशोधनाबद्दल आधीच प्रचंड अनास्था असताना अशा संशोधनासाठी पैसे वापरले तर इतर संशोधकांवर (जे पंचगव्यावर संशोधन करत नाहीत) तो अन्याय आहे. मी अँटी बीजेपी (मोदी) किंवा अँटी-काँग्रेस वगैरे काहीही नाही. मी एक संशोधक आहे आणि त्याच चष्म्यातून ह्या बातमीकडे बघत आहे.

Pages