पाकिस्तानी अणू बाँबचे पिताश्री डॉ. खान यांचे २००३ साली लिहिलेले, २००४ पासून डच गुप्तचरसंघटनेला मिळालेले पत्र आता उघडकीस आणण्यामागे काय हेतू असेल?

Submitted by sudhirkale42 on 2 October, 2009 - 01:51

डॉ. अब्दुल कादीर खान यांच्या पत्राच्या प्रकाशनाने भारतीय वृत्तपत्रें, नियतकालिकें व टेलीव्हिजनसारखी सर्व माध्यमें यांच्यात सध्या एकच खळबळ माजली आहे. दि. २० सप्टेंबरच्या संडे टाइम्समध्ये श्री. सायमन हेंडरसन यांचा लेख प्रकाशित झाला आहे. (पहा http://tinyurl.com/mm3ll6 हा दुवा). डॉ. खान हे एकेकाळी सर्व पाकिस्तानी जनतेच्या गळ्यातला ताईत असलेले, पाकिस्तानी अण्वस्त्राचे जनक समजले जाणारे शास्त्रज्ञ! त्यांना नीशान-इ-इम्तियाज़ हा उच्चतम पाकिस्तानी मुलकी सन्मान दोनदा व हिलाल-इ-इम्तियाज़ हा द्वितीय क्रमांकाचा मुलकी सन्मान एकदा वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांकडून मिळालेला आहे. असे असूनही त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी स्वत:ची पापे लपविण्यासाठी त्यांना बदनाम करून आज गृहकैदेत टाकले आहे. एका कोर्टाने जरी त्यांना मुक्त केले असले तरी ते आता खरोखर मुक्त झाले आहेत कीं नाहींत याबद्दल शंका घेण्यास जागा आहे.
प्रसिद्ध झालेल्या लेखात त्यांनी आपल्या पत्नीला लिहिलेल्या चार पानी हस्तलिखित पत्रातील मजकूर जाहीर झाला आहे. जेंव्हां आपल्याला जिवे मारले जाईल अशी भीती त्यांना वाटू लागली तेंव्हां त्या पत्राच्या अस्तित्वाच्या भीतीमुळे कदाचित त्यांचा जीव वाचेल किंवा कमीत कमी जगाला ते कसे निर्दोषी होते हे कळेल या उद्देशाने आपल्या डच पत्नीला (हेनीला) घाई-घाईत लिहिलेले पण बर्यापैकी तपशीलपूर्ण असे हे पत्र आहे. या पत्रात त्यांना ज. इम्तियाज यांनी (कदाचित) बेनझीर भुत्तोच्या इशार्यानुसार इराण, उत्तर कोरिया, चीन व लिबिया या देशांना अण्वस्त्रनिर्मितीचे तंत्र व कांहीं महत्वाची यंत्रे विकायला सांगितले. त्यानुसार डॉ. खान यांनी कृतीही केली. पण ही गोष्ट प्रसिद्ध केल्यास सार्या पाकिस्तानची उरली-सुरली इज्जतही जाईल या भीतीने ही विक्री डॉ. खान यानी वैयक्तिक लोभापोटी केली असा अपप्रचार मुशर्रफ यांच्या कारकीर्दीत सुरू केला गेला व त्यांच्या कुटुंबियांनाही त्रास दिला जाईल अशी धमकी देऊन जुलूम-जबरदस्तीने त्यांना पाकिस्तानी चित्रवाणीवर असा कबुलीजबाब द्यायला भाग पाडले गेले व लगेच मुशर्रफ यांनी त्यांना मोठ्या मनाने माफीही देऊन टाकली!
संडे टाइम्समध्ये हा लेख प्रसिद्ध होताच अमेरिकेतील दूतावासाचे प्रवक्ते श्री. नदीम कियानी यांनी डॉ. खान यांची या पत्रातली विधाने अधिकृत नसून वैयक्तिक आहेत व त्यांचा पाकिस्तान सरकारशी काहीही संबंध नाहीं असे जाहीर केले आहे.
पण एरवी शिकारी कुत्र्यासारखे टपून असणारी व कुठल्याही सनसनाटी बातमीवर हिंस्त्र श्वापदासारखी तुटून पडणारी अमेरिकत वृत्तपत्रे व अन्य मीडिया "अळीमिळी गुपचिळी"च्या पवित्र्यात अगदी गप्प कां आहेत? आयबीएन या ’सीएनएन’च्या भारतीय अपत्याने ही बातली अगदी "हेडलाईन न्यूज"सारखी दिली असली तरी ’सीएनएन’ गप्पच! असे का?
२००३ साली लिहिलेल्या या पत्राची प्रत आय.एस.आय. या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेला डॉ. खान यांच्या पाकिस्तानातील घराच्या झडतीत सापडली. त्यावेळी त्यांना कळले की त्या पत्राच्या प्रती त्यांनी आपल्या पत्नीखेरीज त्यांच्या लंडनस्थित दीना या मुलीला व ऍम्स्टरडॅमस्थित कौसर खान या पुतणीलाही पाठविली होती. खूप दमदाटी करून त्यांनी डॉ. खान यांना दीनाला फोन करायला भाग पाडले व त्या पत्राची तिच्याकडे असलेली प्रत नष्ट करविली. कौसर खानच्या घरी डच गुप्तहेर संघटनेचे अधिकारी आले, त्या पत्रासकट कौसर खानला गुपचुपपणे त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले व तिच्यादेखत त्यांनी तिने अद्याप न उघडलेले पत्र फोडले, मजकूर वाचला. कौसर खानला या मजकुराबद्दल माहिती होती का असे विचारले असता तिने नकारर्थी उत्तर दिले व ते पत्र तिला फक्त सांभाळून ठेवायला सांगितले होते असे तिने सांगितले. मग तिला जाऊ देण्यात आले.
हे पत्र मग डच गुप्तहेर संघटनेने नक्कीच अमेरिकन गुप्तहेर संघटनांना दिले असणार. मग आतापर्यंत त्यावर काहीच कारवाई का झाली नाही व बेनझीरच्या मृत्यूनंतर ते आज का प्रसिद्ध करण्यात येत आहे? संडे टाइम्सच्या लेखानुसार जन. इम्तियाजही कालवश झाले आहेत. म्हणजे दोन्ही आरोपी (बेनझीर व जन. इम्तियाज) आज हयात नाहींत म्हणून हे आता फोडण्यात आले?
कीं अण्वस्त्र बनवण्यात गुंतलेल्या पण ते नाकारणार्या इराणबरोबर लवकरच एक बैठक संयुक्त राष्ट्रांच्या विद्यमाने भरत आहे. त्या बैठकीच्या ऐन तोडावर त्यांची जगभर नाचक्की करण्यासाठी ही वेळ शोधण्यात आली? पाकिस्तानला अण्वस्त्रें बनविण्याचे तंत्रज्ञान कुठून मिळाले? हे तंत्रज्ञान अमेरिकेनेच रेगन/(थोरले)बुश यांच्या कारकीर्दीत पाकिस्तानला बहाल केले असण्याची दाट शक्यता आहे. कारण अफगाणिस्तानचे युद्ध चिघळ्ल्यास व रशियाबरोबर समोरासमोर अणुयुद्ध पेटल्यास पाकिस्तानी भूमीवरून अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्रे डागणे सोपे होईल अशी कल्पना या दोन राष्ट्राध्यक्षांच्या जहाल गटातील सल्लागारांच्या/मंत्र्यांच्या सुपीक डोक्यात आली व त्यानुसार अमेरिकन विधिमंडळांना (congress) न कळविता व प्रसंगी त्यांना खोटी माहिती हेतुपुरस्सर देऊन हे तंत्रज्ञान पाकिस्तानला देण्यात आले असे मानायला जागा आहे. असे असल्यास या गौप्यस्फोट आता करून हे तंत्रज्ञान पाकिस्तानला चीनने दिले असा कांगावा करत "तो मी नव्हेच"चा प्रयोग करायला अमेरिका मोकळी राहील. पण पाकिस्तानला अण्वस्त्रें बनविण्याचे तंत्रज्ञान कुठून मिळाले? ते तंत्रज्ञान पाकिस्तानने 'down-the-line' कसे विकले? ज्याने पाकिस्तानला दिले त्या राष्ट्राने पाकिस्तानवर कसे काय कांहींच निर्बंध घातले नाहींत? आणि जर घातले असूनही ते न जुमानता पाकिस्तानने अण्वस्त्रप्रसाराला असा हातभार लावला असेल तर या बेलगाम वारूसारखे उधळणार्या व दहशतवादाविरुद्ध तोंडदेखले लुटपुटे लढणार्या पाकिस्तानला आजही अमेरिका पाकिस्तानला दहशतवादाविरुद्धच्या युद्धातील सच्चा मित्र या नात्याने अजूनही का वागवीत आहे व त्यांच्यावर पैशाचा पाऊस पाडत आहे? आजही पाकिस्तान अमेरिकेशी दुटप्पीपणे वागत आहे. इकडे अमेरिकेचा पैसा घ्यायचा व तिकडे दहशतवाद्यांना आतून मदत करायची असा पाकिस्तानचा दुटप्पी डाव अमेरिकेला अद्याप कसा कळत नाहीं?
अमेरिकेच्या या वागण्याने भारताचे अतोनात नुकसान होत आहे. पाकिस्तान एका बाजूला अमेरिकेकडून व दुसर्या बाजूला तिचा नजीकच्या भविष्यकाळातला कट्टर शत्रू चीन या दोन्ही बाजूंकडून आपले उखळ पांढरे करून घेत आहे. व अशा तर्हेने मिळालेले पैसे दहशतवादाविरुद्ध न वापरता भारताला त्रास देण्यासाठी वापरत आहे हेही आता उघड आहे. हे सारे अमेरिकेला कधी व कसे समजणार? आणि कोण समजावून सांगणार?
थोडक्यात खालील प्रश्न अनुत्तरित आहेत:
१) डच गुप्तहेरखात्याने (नक्कीच) दिलेल्या माहितीवर आधारित कारवाई पाकिस्तानविरुद्ध वेळेवर का केली गेली नाहीं?
२) ही माहिती आता उघड करण्याच्या मुहूर्तामागे काय कारणे आहेत? त्या पत्रातील मुख्य आरोपी बेनझीर भुट्टो व जन. इम्तियाजचा झालेला मृत्यू? कीं इराणबरोबर लवकरच सुरू होणार्या अण्वस्त्रविरोधी वाटाघाटींआधी इराणला बदनाम करणे? कीं डॉ. खान यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून इराणची थापेबाजी उघडी करणे? कीं पाकिस्तानला आम्ही अण्वस्त्रतंत्रज्ञान दिलेच नव्हते, ते चीनने दिले अशी जगाची दिशाभूल करणे?
भारतीय वृत्तपत्रांनी याच्या मुळावर घाव घालून सत्य परिस्थिती जगापुढे मांडली पाहिजे व पाकिस्तानचा पर्दाफाश करून भारतावरचे ओझे कमी केलेच पाहिजे. असे न केल्यास fourth Estate या संदर्भातल्या कर्तव्याला ते खरे उतरले नाहींत असेच सारे जग म्हणेल.
सुधीर काळे, जकार्ता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेचे भारतविरोधी धोरण सर्वज्ञात आहे, पर्याय नसल्याने गप्प बसणे इतकेच भारताच्या हाती आहे. कुणला बर्फी तर कुणाला शीळी भाकर का? हे विचारायचा अधिकार याचकाला नसतो.

अण्वस्त्र प्रसार करण्यात तत्कालीन पाक सरकारचा (लष्कराचा) संपुर्ण हात होता. हा व्यवहार उघडकीला आल्यावर, देश बदनाम होण्यापेक्षा एका व्यक्तीवर (कादर खान) बालंट ढकलणे पाकला तसेच अमेरिकेला जास्त सोयीचे होते. म्हणुन मग कादरखान हे बकरा बनवले गेले... पाकधुन लिबीया तसेच कोरिया कडे अण्वस्त्र सामग्री वाहुन नेणार्‍या विमानांच्या फेर्‍या पाक लष्कराच्या नजरेच्या तावडी मधे येत नाही यावर लहान मुलगा पण विश्वास ठेवणार नाही.

मुशर्रफ यांनी हा सर्व प्रकार चांगल्या पद्धतीने हाताळला होता, त्यांनी पाक हित जपले. सुरवातीला कुठल्याही देशाला कादरखान यांना भेटण्यास सक्त मनाई होतो...

अमेरिका स्वत:ची सोय पहाणार. पाक मधे कुठे तेल सापडणार आहे म्हणुन कारवाई करणार ?

<<अमेरिका स्वत:ची सोय पहाणार.>> तेहि स्वतःची (नसलेली) अक्कल वापरून. हे वरील सर्व त्यांना कळले तरी वाळूत मान खुपसून बसलेल्या शहामृगासारखे ते तिकडे दुर्लक्ष करतात. शिवाय अमेरिका हा अत्यंत खोटा देश आहे. इथल्या मूर्ख जनतेला जे काय ऐकायला आवडेल तेच येथील पुढारी सांगतात व करतात. हे वरील सर्व पुरावे जर भारताने अमेरिकेला अधिकृत रीत्या दिले तरी ते लपवून ठेवले जातील, 'आता काय त्याचा उपयोग, झाले गेले होऊन गेले. आमच्यापुढे सध्या इतर उद्दिष्टे आहेत, त्यात पाकीस्तानशी मैत्रि करणे आम्हाला जरुरीचे वाटते' असे सांगून त्याची ते वाट लावतील.

अमेरिकेचे भारतविरोधी धोरण सर्वज्ञात आहे,>> मला वाटते अमेरिकेचे धोरण हे त्यांना उपयोगी पडेल अशा सोयिस्करतेने द्रुष्टीने बनवलेले असते. ते भारत्विरोधी किंवा पाकिस्तानच्या बाजूने etc असे काही नसते.

वरची बातमी मी फोर्बस मधे वाचली होती. नि ABC/NBC च्या international news मधे पाहिली होती.

सारखे सारखे म्हणायचे की अमेरिकेचे धोरण भारतविरोधी आहे. भारताचे तरी धोरण अमेरिकेशी मैत्रीचे आहे का? (देव करो नि नसो, वाट्टोळे करतील ते भारताचे)

हे असले उघडकीला आणण्यात काय मिळाले भारताला? अमेरिकेला माहित आहे नि ते त्याला किंमत देत नाहीत. अमेरिकेच्या परदेशी धोरणावर इस्राएलचा प्रचंड प्रभाव आहे, अगदी तेच अमेरिकेचे धोरण ठरवतात म्हंटले तरी फारशी अतिशयोक्ति होणार नाही. बरेचसे लोक तसे म्हणतातच. याचे कारण अर्थात, इस्राइली ज्यू लोक अमेरिकेत बराच पैसा बाळगून आहेत, नि बरीचशी अमेरिका त्यांच्या 'मालकीची' आहे.

भारताची तेव्हढी परिस्थिती तयार होईस्तवर भारताबद्दल अमेरिकेचे दुर्लक्षच होइल. भारताच्या बाजूने म्हणजे पाकीस्तानच्या विरुद्ध व पाकीस्तानच्या बाजूने म्हणजे भारताविरुद्ध असे फक्त भारत-पाकीस्तान या देशांचे मत आहे. अमेरिकेचे तसे नाही!

इराणने जर आपले तेल अमेरिकन कं च्या ताब्यात दिले, तर अमेरिका आपणहून त्यांना अण्वस्त्रांचे तत्वज्ञान देईल. सौदी अरेबिया, इराक इ. नी तसे केले, म्हणून त्यांच्याशी अमेरिकेची मैत्री. ९/११ मधील लोक बव्हंशी सौदी अरेबियातले असले तरी हल्ला इराकवर झाला! कारण बुशचे वैयक्तिक कारण, नि तिथले तेल अमेरिकेला स्वस्तात व स्वतःच्या ताब्यात हवे होते.

अमेरिका फक्त आज व उद्या एव्हढेच बघते, पर्वा काय होईल वगैरे त्यांना काळजी नसते.

प्रत्येक देश आपआपली सोय बघतो... उगा पाक अन अमेरिका अन डच अन इराण च्या नावे का खडे फोडायचे. आपण पण आपली सोय पहायची. अणु कार्यक्रमाबाबत अमेरिकेने मांडलेल्या ठरावावर इराण विरुद्ध वोटींग करताना आपण पण आपली सोय पाहिलीच होती की!
आपले प्रश्न आपण्च सोडवायचे, उगा कटोरे हाती घेउण लोकाच्या दारात जाणे का?