सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - ६.

Submitted by Suyog Shilwant on 28 June, 2016 - 10:35

काया बेशुद्ध पडुन अजुनही शुद्धीवर आलेली नसते. चैतन्य वल्हव मारत होडीला पुढे नेत होता. आता रात्रीचे दोन वाजले होते. थोड्याच तासांनी सकाळ होणार होती. चैतन्यला त्याच मन खात होत की; त्याने जर विश्रांतीसाठी होडी काठावर नेली नसती तर कायाला ही दुखापत झालीच नसती. पण त्याच प्रसंगामुळे सुयुध्दला त्याची शक्ती जागृत करता आली. त्याने एवढ्या मोठ्या दानवाला सहज मारुन टाकले होते. आज पर्यंत त्याच्या वयाच्या कोणत्याही मुलाला हे अशक्यच होते. जी उडण्याची शक्ती अजुन मला प्राप्त नाही हे त्याने सहज करुन दाखवलं. ह्या सगळ्या गोष्टीला चमत्कारच म्हणावं लागेल. एवढा विचार करुन तो वल्हव मारत राहिला.

सुयुध्द होडीत अजुनही उभाच होता त्याने हातातली तलवार काठीत रुपांतरीत करुन आपल्या कमरेला खोचुन ठेवली. काया एका बाजुला पडलेली होती. चिरंतर तिचं डोक मांडीवर घेऊन तिच्या बाजुला बसलेला. आज्जी कायाच्या पायाशी बसुन विचारात मग्न होती. अभिनव आजोबा होडीच्या पुढच्या टोकाला जप करत बसलेले. सगळ्यांचेच चेहरे काळजीने भरलेले. सुयुध्दच्या शक्तीचा प्रभाव आता कमी झालेला तो आता सोनेरी प्रकाशात न्हाऊन चमकत नव्हता.

होडीला वल्हव मारत चैतन्य आपल्याला लागलेल्या मुक्या माराच दुखनं सहन करत विचार करु लागला. त्या दानवाने मला जोरात झाडावर आपटले होते. त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही. जेव्हा मी शुध्दीवर आलो तेव्हा सुयुध्द चमकत होता आणि काया जमिनीवर जखमी अवस्थेत पडली होती. सुयुध्दच्या उपचारक शक्तीचा वापर करता आला म्हणुन कायाच्या डोक्यावरची जखम अगदी बघता क्षणी भरली; पण त्रिनेञी परिवाराच्या रक्षणात मी आपल्या जबाबदारी पासुन मुकलो. ऐन वेळी आलेल्या संकटात मी काही करु शकलो नाही. गुरु विश्वेश्वरांनी किती विश्वासाने ही जबाबदारी मला दिली होती. अशा अनेक विचारांनी चैतन्य त्रस्त झालेला.

सुयुध्द दक्ष होऊन सगळी कडे नजर ठेवत होता. कायाला झालेल्या दुखापतीने त्याला हादरवुन टाकलेले. त्याला आपण आपल्या आईला पहिलेच का वाचवु शकलो नाही ह्याचे जास्त दु:ख वाटलेले. रात्रीच्या भयान शांततेत सुयुध्द आता विचारात हरवु लागला. जेव्हा दानव समोर आला तेव्हा मला खुप भिती वाटली. पहिले तर कळलच नाही काय कराव पण…. जस त्याने पप्पांना आणि मम्मीला पकडलं. तेव्हा अचानक माझ्या शरिरात एक शक्ती संचारु लागली अशा शक्तीचा मी कधीच अनुभव केला नव्हता. त्याच शक्तीमुळे मला साहस आलं; कि मी कशाचाच विचार न करता दानवाचा सामना करायला तयार झालो. काय असेल ती शक्ती आणि माझ्याकडे कशी आली ती? मम्मीला लागल्यावर तर मला भानच राहिलं नाही. मी कधीच असा रागवलो नव्हतो. मी त्या दानवाला मारलं. मी माझ्या हातानी ती तलवार त्याच्या डोक्यात घुसवली. माझ्या हातुन पहिल्यांदा कोणीतरी मेलं. पण… मी जर त्या भयानक दानवाला मारलं नसतं तर….तर त्याने सगळ्यांनाच मारुन टाकलं असतं. त्यावेळी हे करनंच मला योग्य वाटल. पण मी उडु कसा शकलो दानवाने जेव्हा मला फेकल तेव्हा माझ्या डोक्यात त्याला मारण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता. बाबा खरचं बोलत होते का? मी सुमन्यु पंजोबांसारखा अदभुत दिव्य शक्ती प्राप्त करु शकलो असेन का? मग ह्याच शक्तीने मला साहस दिलं असेल. मी चमकत का होतो? त्याने आपल्या हातांकडे बघितलं आता तो चमकत नव्हता.

त्याने वळुन वल्हव मारत असलेल्या चैतन्यकडे पाहिलं. चैतन्य एकटक त्याच्याकडेच पाहत होता. चंद्राच्या प्रकाशात त्याला चैतन्यच्या चेहऱ्या वरील कोतुहल स्पष्ट दिसत होतं. त्याला आठवतं कि कस चैतन्यने त्याला उपचारक शक्ती वापरुन मम्मीला बरं करायला सांगितलं होतं. तिची जखम पाहता क्षणी बरी झालेली. चैतन्यवरुन नजर हटवत त्याने होडीच्या एका कोपऱ्यात झोपवलेल्या आपल्या आईला पाहिलं. बाजुला त्याचा बाप तिच्या डोक्याशी बसलेला. बाबा होडीच्या पुढच्या टोकाजवळ बसुन जप करत होते. कायाला पहिल्यावर त्याच्या मनात भरलेला राग पुन्हा एकदा उफाळून आला. आज त्याने जर तिला वाचवल नसत तर….त्याला आता तो विचार सहन होईना. त्याने हाताच्या मुठ रागात कसल्या आणि मनाशी ठरवल कि पुन्हा कुठलही संकट आलं तरी तो त्याच्या परिवाराला काहीच होऊ देणार नाही. मग त्याला कोणाशीही लढावं लागल तरी बेहद्द.

बराच वेळ निघुन गेला होता ते आता आश्रमाजवळ पोहचणारच होते. पहाटचे पाच साडे पाच झालेले. हवेत गारवा जाणवु लागलेला. नदी ठिक ठिकाणी वळणं घेत होडीला संथ प्रवाहात वाहवत होती. पहाटेचं धुकं नदी भोवतालच्या परिसरात पसरलेलं. हवेतील गारव्यामुळे ऊनी कपड्यांचा सोस आता सर्वांनाच जाणवत होता. विचार करण्यात कसा सुयुध्दचा वेळ गेला होता हे त्याला कळलच नाही. अंगावर लागणाऱ्या थंड वाऱ्यानी तो शहारला तसा काया जवळ येऊन बसला. ती अजुनही बेशुध्दच होती. मागुन आज्जीने त्याच्या अंगावर शाल ओढवली. त्याला जवळ घेत ती बोलली.

' बाळा चिंता नको करुस आपण आश्रमात पोहचल्यावर तिला गुरु बरं करतील. तु तिला वाचवुन खुप शौर्य दाखवलस.'

एवढा वेळ जो धीर त्याने धरला होता तो आता तुटला आणि सुयुध्द ओक्साबोक्षी रडु लागला. रडतच त्याने आज्जीला मिठी मारली. आज्जीने त्याला गोंजारत मायेने जवळ घेतलं. रडता रडताच तो बोलला.

' आज्जी खरंच बरी होईल ना मम्मी. तिला काही झालं तर माझ काय होईल. मला आग्रह करुन कोण चारणार. मी खोड्या करुन सुध्दा मला लाडाने कोण जवळ घेणार.'

हे ऐकताच आज्जीला पण भरुन आलं. ती त्याला बिलगुन रडु लागली. चिरंतर दोघांना रडतं जाणुन काया जवळुन उठला आणि त्यांच्या जवळ गेला. आजोबांनी जप करन आता बंद केले. चिरंतरने सुयुध्दला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला.

' हे बघ सुयुध्द तु कायाची अजिबात काळजी करु नको आणि रडतो कशाला आपण आश्रमात पोहोचलो कि तुला कळेलच. ती कशी बरी होते बघ पटकन.'

हे बोलुन त्याला सुयुध्दला रडण्यापासुन थांबवण्यात थोडफार यश आलं होतं. आपल्या बापाच्या बोलण्याने सुयुध्दला आता थोडा धीर आला होता. त्याला माहीत नव्हत आश्रम कसं आहे पण आश्रमाबद्दल इतकं ऐकुन त्याला आपल्या आईला पुन्हा बरं झालेल पाहायची ओढ लागली. सुरुवातीला बाबा मग आई आता पप्पा तिघेही आश्रमाबद्दल एवढ्या निष्ठेने बोलताना ऐकून त्याची उत्सुकता अजूनच वाढू लागली. ह्या आधी कधीच त्याने घरापासुन इतका लांब प्रवास केला नव्हता.

सकाळचे सहा वाजत आलेले आकाशात तांबडं फुटु लागलेलं. पक्षी आकाशात किलकिलाट करत इकडे तिकडे उडत होते. झाडांवर धुक्याचे दव पडलेलं सुयुध्दला दिसत होतं. होडी हळुहळु किनाऱ्याकडे जाऊ लागली. कायाच्या बाजुला बराच वेळ बसुन त्याच्या डोळ्यांवर आता झोप येऊ लागलेली. त्याचा डोळा लागतो न लागतो तोवर होडी किनाऱ्याजवळ येऊन थांबली. चैतन्यने हातातील वल्हव होडीतल्या काट्यावर अडकवुन ठेवले आणि म्हणाला.

' चला.…आश्रमाच्या प्रवेश दाराजवळ आपण पोहचलो आहोत.'

एवढ बोलुन तो होडीतुन उतरला व जवळच्या एका दगडाला दोरी बांधली. सुयुध्दने आपली झोप झटकुन चैतन्यकडे पाहिलं तो काठावर उभा राहून समोर उगवत्या सुर्याला नमस्कार करत होता. चैतन्यच्या मागे त्याला दोन खुप मोठी दोन झाडं दिसली ज्यांच्या मधोमध एक प्रवेश द्वार दिसत होत जे झाडांच्या पारंब्यांनी भरलं होतं. आजुबाजुला नजर फिरवली तर सगळीकडे झाडांनी भरलेलं घनदाट जंगल दिसत होतं. सुयुध्द हे सगळं पाहतच होडीतुन उतरला. सुर्याचे पहिली किरणं त्याच्या चेहऱ्यावर पडली तस त्याने सुर्याला हात जोडुन नमस्कार केला. सुर्याच्या उबदार किरणांनी त्याच्या शरिरात नवी उर्जा भरली. त्याचा थकवा जणु गायबच झालेला. पहिल्यांदाच सुयुध्दने एवढा निसर्गाने भरलेला नजारा पाहिला होता. चहुबाजुला त्याला नजर जाईल तिथ पर्यंत झाडांनी भरलेले पर्वत दिसत होते. हे पाहुन त्याने एक नजर पुन्हा एकदा त्या प्रवेश द्वारावर टाकली. या आधी त्याने असे प्रवेश द्वार कधीच पाहिले नव्हते. दोन्ही झाडांच्या पारंब्या मिळुन ते द्वार तयार झाल असाव. पारंब्या एकमेकात अशा गुंतल्या होत्या कि एक मोठ द्वार तयार झालेलं स्पष्ट दिसत होतं.

चैतन्य होडीजवळ जाऊन उभा राहीला. होडीत बसलेल्या चिरंतरच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला.

' आपण पोहचलोय प्रवेश द्वारा पर्यंत. तुम्ही काया वहिनींना उचला आणि माझ्याकडे द्या.'

निश्चल चिरंतर आता जागेवरुन हलला त्याने हळुच कायाचं डोक आपल्या मांडीवरुन खाली ठेवलं. तिला उचलुन त्याने अलगद चैतन्याच्या हातात सोपवल. एव्हाना आज्जी होडीतुन खाली उतरली होती मागे तिच्या खांद्यावर हात ठेवून आजोबाही खाली उतरले.
चिरंतरने आपली काठी उचलली आणि सुयुध्दला हाक मारत जवळ बोलावलं. त्याच्या हातात आपली काठी देत तो खाली उतरला. सुयुध्दने त्याला जवळ उभ्या चैतन्य जवळ नेऊन उभ केलं. चैतन्यने कायाला परत त्याच्या जवळ दिलं.
आपली काठी व झोळी होडीतुन घेत त्याने दगडाला बांधलेली दोरी खोलली. होडी आता काठावरुन पुन्हा नदित जाऊ लागलेली बघता बघता होडी पाण्यात बुडाली आणि नजरेतुन गायब झाली.

सर्वजण प्रवेशद्वारा समोर उभे होते. चैतन्यने दोनदा काठी आपटली आणि झोळीतुन एक छोटा खडा बाहेर काढला. मंत्र पुटपुटत त्याने तो खडा द्वाराच्या उजव्या बाजुला असलेल्या झाडाजवळ फेकला आणि मागे सरकला. खडा पडताच द्वाराच्या पारंब्या हळुहळु करुन जिवंत असल्या सारख्या हलु लागल्या आणि द्वार उघडलं. सुयुध्द डोळे फाडुन दोन्ही झाडांकडे पाहु लागला. आजपर्यंत कोणत्याही झाडाला त्याने असं हलताना पाहिलं नव्हत. त्याच्यासाठी हे सर्व नविन आणि चमत्कारिक होतं. द्वारा पुढे त्याला एक पायवाट दिसली. तसा कोतुहल न आवरता सुयुध्द चैतन्यला बोलला.

' ते झाड आपोआप कसं काय हललं?'

चैतन्यने त्याच्या कडे न बघताच झाडाजवळ जाऊन तो फेकलेला खडा उचलला व बोलला.
' आपोआप नाही हलल सुयुध्द. हे झाड ह्या प्रवेश द्वाराच आणि आश्रमाच्या गुप्त वाटेचं रक्षक आहे. हे तेव्हाच उघडत जेव्हा त्याच्या मुळाला हा डिंकाचा अभिमंत्रित खडा टाकला जातो.'

सुयुध्दने चैतन्यच्या हातातल्या खड्याकडे निरखुन पाहिले. तपकिरी रंगाचा तो खडा अगदी साधारण वाटत होता पण त्याच महत्व आता सुयुध्दला समजलेलं. चैतन्य पायवाटेवर चालता झाला. पुढे जाता जाता त्याने म्हंटले.

' चला…आपल्याला अजुन एक तास तरी लागेल आश्रमात पोहचायला.'
झाडाकडे आश्चर्याने बघत असलेला सुयुदध जागेवरुन हलला
तसे एक एक करुन सर्वजण चैतन्यच्या मागे चालु लागले. जस ते पायवाटेवर चालु लागले मागे द्वार पुन्हा पारंब्यांनी बंद झालं. सुयुध्द चिरंतरला वाट सांगत त्याच्या पुढे चालत होता. मागे आजोबा आज्जी एकत्र चालु लागलेले. कायाला चिरंतर ने हातात उचलुन घेतलेले ती अजुनही बेशुध्द होती. चिरंतर च्या मनात तिच्या बद्दल खुप काळजी दाटुन आलेली पण ती आता लवकरच बरी होणार होती असा त्याचा पक्का मनोग्रह झालेला. एकदा का आश्रमात गेले कि गुरु लगेच तिला बरं करणार. आपल्या मनाशी अशे विचार बांधत तो वाटेवरुन लगबग चालु लागला.

सुयुध्दने वाटेवर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे नजर फिरवायला सुरुवात केली. पायवाट घनदाट जंगला मधुन जात असल्यामुळे आजुबाजुला उंचच उंच झाड दिसली. सकाळच्या उजेडात ही तिथे झाडांच्या सावलीचा अंधार होता. पाच दहा फुटा पुढे तर काही दिसतही नव्हत. वाटेवर निर्धास्तपणे चैतन्य पुढ चाललेला. त्याचा हा रोजचा पाया खालचा रस्ता असावा. पटापट पावलं टाकत तो पुढचं काही दिसत नसताना ही वाट काढत निघालेला. चटकन सुयुध्दच्या लक्षात काही आलं अन तो म्हणाला.

' आपण नक्की कुठ चाल्लोय कारण पाच दहा मिनटापुर्वी आपण ह्याच झाडाच्या बाजुने गेलो होतो.'

हे वाक्य ऐकल्यावर चैतन्य हसला. सुयुध्दला हे पाहुन नवलच वाटलं तसा तो पुन्हा बोलला.

' तुम्ही का हसलात? आपण वाट चुकलो तर नाही ना? तुम्हाला आश्रमाचा रस्ता नक्कि माहीत आहे का?'

' आश्रमात जायला नुसते डोळे नाही तर अक्कल पण लागते.'

'म्हणजे?'

' म्हणजे ही भुलभुलया आहे. जर डोळ्यांनी पाहिल तर ही वाट कधीच आश्रमापर्यंत नेणार नाही. पण जर खऱ्या श्रध्देने चाललात तरचं आश्रमात पोहचु शकता. इथे दर दोन चार मिनिटाला ही वाट बदलते पण अस जाणवणार नाही. जो डोळ्यांनी पाहतोय त्याला ही झाड एका अंतरावर एक सारखीच दिसतील चकवा लागेल त्याला आणि आजन्म वाट शोधत तो इथे हरवुन जाईल. म्हणुन आश्रमात जायला नुसते डोळे नाही तर अक्कल सुध्दा लागते.'

हे ऐकल्यावर सुयुध्दने गपचुप चैतन्यच्या मागे कोणताही प्रश्न किंवा शंका न करता चालण्याचे ठरवले.

चालत चालत बराच उशिर झालेला जाणवला. चैतन्य चालता चालता अचानक थांबला. सुयुध्द त्याला धडकता धडकता वाचला त्याने वर मान करुन चैतन्य कडे पाहिले. चैतन्यने पुन्हा एकदा झोळीतुन तो खडा बाहेर काढला आणि हात सरळ धरुन ठेवला. समोर एका झाडामागुन त्याला प्रकाश दिसला. हळुहळु त्याला कोणाच्या बोलण्याचा ही आवाज आला. चैतन्य आता त्या प्रकाशाच्या दिशेने चालु लागलेला. तसा सुयुध्दही त्याच्या मागे चालु लागला. अचानक अंधारातुन उजेडात आल्याने त्याचे डोळे दिपले. त्याने पटकन डोळे बंद केले. आजुबाजुला पक्षांचे आवाज येत होते हळु हळु त्याने डोळे उघडले आणि पाहत एका जागी स्तब्ध उभा राहिला.

जंगलाच्या बाहेर तो एका टोकावर येऊन थांबला समोर एक भली मोठी दरी दिसत होती. त्या पलिकडे दुरवर नजर टाकता त्याला एक खुप उंच भिंत दिसली. त्याने दरीत वाकुन बघितल तर खुप खोलवर त्याला नदी दिसली. दरी किती खोल आहे हे कळताच तो मागे सरकला. चिरंतर कायाला हातात घेऊन सुयुध्दच्या बाजुला उभा होता. आजोबा आज्जी ही सोबतच उभे होते. चैतन्य पुन्हा एकदा चालु लागला. तसे सगळे त्याच्या मागे निघाले. चालता चालता त्याने सुयुध्दच्या खांद्यावर हात ठेवला व बोलला.

' ती जी दुरवर भिंत दिसतेय ना. तो आपला आश्रम आहे. इथे जवळच एक पुल आहे तो पार करुन आपण आश्रमात जाऊ.'
सुयुध्द त्याच्याकडे बघतच राहिला. त्याला आजपर्यंत असे अनुभव आले नव्हते. एका मागोमाग एक नविन रहस्य त्याच्या समोर येत होती.

चालता चालता ते आता पुलावर पोहचले. दरी वरचा तो पुल लाकडाचा एक उत्तम नमुना होता. हा पुल कसा बांधला असावा असा प्रश्न ही सुयुध्दला आला पण तो प्रश्न आता न विचारण्याचे त्याने ठरवले. पुल पार करुन ते आता दगडी भिंती च्या दिशेने चालु लागलेले. आश्रम जवळ येऊ लागला तस त्याला त्या दगडी भिंतीत एक भला मोठा लाकडी दरवाजा दिसला. आश्रमाच्या दारावर दोन मानसं उभी दिसली. त्यांचा पहिराव थोडा विचित्रच वाटला. मोठे झालरदार झब्बे खाली पायजमे, हातात भाला, डोक्यावर टक्कल, कंबरेला तलवारी आणि चेहऱ्यावर मोठ मोठ्या मिशा चाळीशी पन्नाशी तले वाटावे अस काहीस त्यांच रुपड होतं. त्या भिंती अगदी प्राचीन काळच्या वाटत होत्या. भिंत मजबुत आणि भक्कम दिसत होती. लांबच लांब आणि चाळीस फुट उंच भिंतीत् तो लाकडी दरवाजा पंधरा फुट उंच होता. खाली दाराशी जे दोघे उभे होते ते आता ह्यांच्या कडेच पाहत होते.

नदीच्या प्रवेश द्वारापासुन ते इथ पर्यंत येता येता तासभर निघुन गेला होता. सर्वजण त्या दोन मानसांन जवळ पोहचले. तसा त्यातला एक जण चैतन्य कडे बघत बोलला.

' नमस्कार बंधु. गुरु आपलीच वाट पाहत आहेत.'

' नमस्कार त्रिनेत्री. खुप वर्षांपासुन आपली भेट नाही. आपल्याला पुन्हा एकदा पाहुन आनंद झाला पण…. काय झाल तुमच्या सुनेला? ' त्यातला दुसरा बोलला.

अभिनव आजोबा जे आता पर्यंत गप्प होते बोलले.
' इथे येताना दानवाच्या हल्ल्यात ती जखमी झाली आहे. '

हे ऐकताच दुसऱ्याने एका बाजुचे दार पटकन उघडले आणि सर्वजण आश्रमात गेले...

-----------------------------------------------------------------------
चॅप्टर दुसरा ' रक्षण ' समाप्त.

चॅप्टर तिसरा लवकरच…..

क्रमशः ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद तृष्णा. वाचत रहा. कामाच्या गडबडीत लिखान करण्यात वेळ होतो. पण प्रत्येक भाग मायबोलीवर प्रकाशित केल्यावर आपल्या सारख्या प्रतिसादामुळे उत्साहात वाढ होते. जे वाचक वाचुन सुध्दा प्रतिसाद देत नाहित त्यांना एकच विनंती आपले मत मोकळे पणाने नोंदवा. चांगल्या वाईट सर्व प्रकारच्या प्रतिसादांचे स्वागतच केले जाईल.

कथा उत्तम चालू आहे.. सगळी कथा पूर्ण झाली की मग परत एकदा वाचून त्यातल्या काही गोष्टीत बदल करावा लागेल तो करा.. काही ठिकाणी वाक्यांचा काळ नीट नाहीये.. पण तो दुरुस्त करता येईल..

धन्यवाद ....! खास करुन टिकाकरांना; चुका सांगितल्या बद्दल. आपल्या मुळेच लिखाण सुधारण्यासाठी अथक प्रयत्न केले. खास त्यासाठी म्हणुन मराठी व्याकरण अलंकार पुस्तक चाळुन काढले. तरीही झालेल्या चुका निक्षुण सांगाव्यात.