रमन राघव २.० - Welcome back Anurag Kashyap ! - (Movie Review - Raman Raghav 2.0)

Submitted by रसप on 25 June, 2016 - 02:40

इतर लोकांनी काय व कसं लिहिलं आहे मला माहित नाही. पण ह्या सिनेमाबद्दल लिहित असताना मी जाणीवपूर्वक त्याच्या कथानकाबद्दल लिहिणे टाळणार आहे. कारण जर कथानकाची तोंडओळख जरी करून दिली, तरी सिनेमाचं वेगळेपण समजून येऊ शकेल आणि ते होऊ नये, प्रत्यक्षात पाहत असतानाच हे वेगळेपण आश्चर्याचा धक्का देऊन जावं, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे जर कुणाला स्टोरी जाणून घ्यायची असेल, तर मी आधीच क्षमा मागतो !

वरील प्रास्ताविकातून हे तर समजून आलंच असेल की 'रमन राघव २.०' म्हणजे अनुराग कश्यप व कंपनीने टाकलेली कुप्रसिद्ध सिरीयल किलर रमन राघव उर्फ सिंधी दलवाई वर बेतलेली बायोपिक टाईप पाटी नाही. ती तशी नसणार हे मला त्याचे ट्रेलर पाहूनच वाटलं होतं. ट्रेलरमध्ये नवाझुद्दिन एका लहान मुलाला बांधून ठेवून त्याला बोलत असतो की, 'क्या नाम है तेरा ? 'पाकिट !' तू छोटा है ना, इस लिये पाकिट. कल आपन कोई पुछेगा की तेरेकू क्यू मारा. तो आपन बोलेगा, आपन ने सिरफ पाकिट मारा!' १९६५-६६ च्या आसपास मुंबईत अनेक खून केलेल्या रमन राघवने कधी कुणाला ओलीस धरलं नव्हतं. सिनेमा मूळ रमन राघवपेक्षा वेगळा आहे ह्याचा ह्याहून मोठा क्ल्यू हा की ट्रेलरमधून समजून येतं की ही कहाणी जुन्या काळातली नसून आजची आहे आणि सिनेमाच्या शीर्षकात '२.०' सुद्धा आहे.

मग 'रमन राघव २.०' काय आहे ? कशाबद्दल आहे ?

हा सिनेमा म्हणजे केवळ एक कथन नाही. ते एक विश्लेषण आहे. एक थिअरी त्यात मांडली आहे.
मानसिक अस्थैर्यामुळे खून करत सुटणे, ही आपल्या अंत:प्रेरणेसमोर आपल्याच सद्सद्विवेकाने पत्करलेली बिनशर्त शरणागती असते. ही प्रेरणा जितकी प्रखर असेल, तितकंच तिला शरण जावं लागणं हे अटळ असतं. तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाची एक अंत:प्रेरणा (Drive) असतेच. ती जर सकारात्मक, कलात्मक, रचनात्मक, विधायक वगैरे असेल आणि वेळीच तिला ओळखलं तर उद्धार होतो. पण जसं प्रकाशाचं अस्तित्व मान्य करणं म्हणजेच अंधाराचंही अस्तित्व स्वीकारणं आलं, तसंच हीच अंत:प्रेरणा नकारात्मक, विध्वंसक वगैरेही असू शकते, हेही मान्य करायला हवं. भले, ते अमानुष असेल, मानसिक अस्थैर्य असेल, तरी 'आहे' व 'असू शकतं' हे सत्य बदलत नाही. मग अश्या अज्ञात, अनाकलनीय, विचित्र प्रेरणेपासून दूर जाण्यासाठी एक दुबळं मन इतर काही पर्याय शोधत राहतं. नशा, सेक्स, वगैरे. ते मन खरं तर 'आपली प्रेरणा काय आहे' ह्याचा शोध घेत असतं.

कई चेहरे हैं इस दिल के न जाने कौनसा मेरा

अशी काहीशी त्याची अवस्था, समस्या असते.
सरतेशेवटी, अटळ विधिलिखिताप्रमाणे जेव्हा आपली अंत:प्रेरणा समजून येते आणि तिला मन शरण जातं, तेव्हा कुणी 'ऑटो शंकर' बनतो, कुणी स्टोनमॅन आणि कुणी 'रमन राघव'.

'रमन राघव २.०' ह्या मानसिकतेचा ठाव घेतो. Which is like never before.

raman_raghav02_1c.jpg

अनेक कारणं, वैशिष्ट्यं आहेत, ज्यामुळे 'रमन राघव २.०' एक खूपच वेगळा सिनेमा ठरतो.

१. वर सांगितल्याप्रमाणे त्या मानसिकतेचा ठाव घेणं.

२. हे कथानक त्रयस्थ व तटस्थपणे केलं गेलं आहे. सांगणारी व्यक्ती कोण चांगलं, कोण वाईट हे सांगत बसत नाही. कोण कसं आहे, हे फक्त दाखवून दिलं जातं.

३. सिनेमा थरकाप उडवेल, पण त्यासाठी नग्न हिंसाचार दाखवत नाही. जसा अनुराग कश्यपनेच 'गँग्स ऑफ वासेपूर १ आणि २' मध्ये दाखवला होता.

४. 'कहानी'मध्ये बकाल कोलकाता जितकं प्रभावीपणे दाखवलं होतं, तितक्याच प्रभावीपणे इथे 'मुंबई' दिसते. 'आमीर'मध्ये मुंबईचा हे कळकट चेहरा दाखवला होता. इथलं मुंबई चित्रण फक्त कळकटपणावर न थांबता कळकटपणाच्याही आत शिरुन त्याची व्याप्ती दाखवतं. ही मुंबई ह्या कथानकातलं एक महत्वाचं पात्र आहे. ती नसेल, तर ही कहाणीही नसेल.

५. 'बॉम्बे वेलवेट' मधून अनुराग कश्यपला नक्की काय म्हणायचं होतं, ते समजलं नव्हतं. तो एक धक्काच होता. फियास्को होता. त्यानंतर 'रमन राघव २.०' येतोय. पीछेहाट होत चाललेल्या सैन्याने निकराने जोरदार मुसंडी मारुन शत्रूची दाणादाण उडवावी, त्या जिद्दीने अनुराग कश्यपने पुनरागमन केलं आहे.

६. 'बॉम्बे वेलवेट'चा सहलेखक 'वासन बाला' इथलाही सहलेखक. कश्यपप्रमाणे 'बाला'चंही हे एक प्रकारे रिडम्प्शनच. सिनेमात मांडलेल्या थिअरीची कल्पना करणं, तिच्यावर बुद्धीनिष्ठ विचार करुन तिला मूर्त स्वरुपात आणणं ह्यासाठी कश्यप-बाला ह्या लेखकद्वयीला सलाम !

७. हा सिनेमा एक जबरदस्त थ्रिलर असला तरी मांडणीत कुठलीही गुंतागुंत नाही. सुटसुटीत मांडणी नेहमीच बाळबोध नसते आणि क्लिष्ट मांडणी नेहमीच वैचारिक नसते. कथा वाहत्या पाण्यासारखी अगदी नैसर्गिक प्रवाहीपणे पुढे सरकत जाते.

८. नवाझुद्दिन सिद्दिकी जेव्हा वाईट काम करेल तेव्हा ती बातमी असेल. ट्रेलरमधूनच त्याने त्याच्या भूमिकेची सायकोगिरी दाखवून दिली आहे आणि सिनेमातून तर सप्रमाण दाखवून देतो की 'आत्तापर्यंत जे पाहिलंत ते तर फक्त ट्रेलरच होतं !' त्याची भूमिका अमानुष, कपटी आणि विकृत व्यक्तीची आहे. हे सगळं सादर करताना he leaves no stone unturned.

९. 'मसान'मधून आपली छाप सोडलेला 'विकी कौशल' आपल्या दुसऱ्या सिनेमात पुन्हा एकदा दमदार काम करतो. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या नवाझुद्दिन सिद्दिकीसारख्या ताकदीच्या अभिनेत्यासमोर ह्या अननुभवी नवोदिताचा कसा टिकाव लागेल, ह्याचं उत्तर सिनेमा देतो. लोक बहुतेक तरी ह्या सिनेमाला 'नवाझुद्दिनचा सिनेमा' म्हणून लक्षात ठेवतील आणि विकी कौशल अनसंग राहील. पण माझ्या मते 'रमन राघव २.०' चे नवाझुद्दिन आणि विकी हे दोन पाय आहेत आणि सिनेमा लंगडा नाही.

१०. बॉक्स ऑफिसवर जमवलेला गल्ला हे दर्ज्याचं द्योतक असत नाही. कुठलाही पुरस्कारसुद्धा दर्ज्याची हमी देत नाही. 'खानावळी'चे आचरट चाळे बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमवत असले आणि अनाकलनीय व कंटाळवाणे 'कोर्ट'सारखे रटाळ सिनेमे पुरस्कारांची लूट करत असले तरी इथेच अगदी वेगळा विचार करुन त्यालाही प्रभावीपणे मांडणारे कलंदरही आहेत. असे सिनेमे खोऱ्याने पैसा ओढणार नाहीत किंवा पोत्यात पुरस्कार भरून घेऊन जाणार नाहीत. ते फक्त बराच काळ लक्षात राहतील आणि ते लक्षात राहावेत इतकीच त्यांची अपेक्षाही असेल.

'रमन राघव २.०' एक असा थरार आहे, जो मी विसरू इच्छित नाही. बहुतेक तरी मी परत तो पाहणार नाही कारण पहिल्यांदा पाहतानाचा जो जबरदस्त धक्का आहे, तो दुसऱ्यांदा पाहताना कदाचित बसणार नाही.
मला डायल्युशन नकोच आहे.

रेटिंग (द्यायचंच असेल तर) - * * * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/06/welcome-back-anurag-kashyap-movie...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुराग कश्यपचा माहित नाही. पण नाना पाटेकर असलेला हिंदी आणि मराठी चित्रपट तेव्हा लगेचच आलेला. ते हत्याकांड अतिशय भयंकर होते.

जोशी/अभ्यंकर खुन प्रकरण - जक्कल, सुतार, इ. - पुणे>> हो पांच व माफीचा साक्षीदार असे दोन चित्रपट आले होते. येस आय अ‍ॅम गिल्टी असे पुस्तक पण आहे. खतरनाक दहशत होती पुण्यात. कर्फ्यू लागल्यासारखे रस्ते असायचे. आमच्या वाड्याचा दिंडी दरवाजा बंद करुन चुपचाप बसायचे लोक. त्याच सुमारास बहूतेक किंवा नंतर आणीबाणी पण होती. तेव्हाही असेच सुनसान रस्ते असायचे. आम्हाला ताकीद होती ७ च्या आत घरात टाईप.

एक अमोल पालेकरांचा मराठी सिनेमा होता.... नरबळी बद्दल. आक्रित नाव होते बहुतेक त्याचे. ती सुद्धा सत्य घटना होती.

येस, आय अ‍ॅम गिल्टी मुनव्वर शाहने लिहीले होते, तो यातला एक आरोपी. मी वाचले होते ते पुस्तक. स्वतःला जस्टीफाय करण्याव्यतीरीक्त काही नव्हते त्यात.

हो मानवत हे गाव आहे, मराठवाड्यात आहे. बहुतेक बीडच्या पुढे.

Why details of Manwath mass murders are hidden?
Manwathh mass murders took place in 1974 to 1977 but there are no details on the internet. Also Amol Palekar made his directorial debut with movie 'Akriet' on this issue. But the information about the movie is also not available. The book based on the incident Manwath mass murders by Rajguru Deshmukh is not available anywhere.

मानवत बद्दल मी पण लहानपणी ऐकले होते, पण डिटेल्स माहीत नाहीत, मात्र अमानुष हत्याकांड झाले होते की ज्याने थरकाप उडेल.

सर्वसाक्षीमध्ये मुळ कथेला हत्याकांडाचा रेफरन्स होता. आक्रित प्रत्यक्ष त्या घटनेवर होता. मानवत जेव्हा बाहेर आले तेव्हा तेही तितकेच भयानक वाटले होते. नक्की आकडा आठवत नाही पण त्यांनी खुप लहान मुले मारलेली.

गुप्तधन आणि संततीप्राप्तीच्या लालसेने लहान मुलांचे बळी दिलेले. हा प्रकार २-३ वर्षे चालु होता बहुतेक, ज्या मुलांचे बळी दिले गेले ते मांत्रिकांकरवी दिले गेले, मंत्र तंत्र वगैरे, त्यामुळे मुलांचे अवयव कापणे वगैरे अघोरी प्रकार झालेले. खुप वर्षे झालीत पण तेव्हाच्या पेपरात आलेले डिटेल्स आठवताहेत कारण ते प्रकरण खुपच गाजलेले.

आक्रित मध्ये वरिल भाग आलाय, तर सर्वसाक्षीमध्ये गावात नवा आलेला एक डॉक्टर असल्या अंधश्रद्धा दुर करायचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळी अपत्यासाठी आसुसलेली त्याची बायको या मंडळींच्या जाळ्यात अडकते याची कथा आहे.

रामन राघवचे ऐकलेले... जक्कल सुतार यांच्या वेळी रोज बातम्या यायच्या रेडिओवर पेपरात त्यामुळे अनुभवलेले म्हणावे ... त्यातला माफीचा साक्षीदार संगमनेरचा त्यामुळे खूप वेळा बघितलेला जवळून...
मानवतच्या देखिल बातम्या असायच्या पेपरात... अत्यन्त भयप्रद वातावरण तेंव्हा...

अजून एक हाकामारीची वदंता त्या काळात पसरलेली ती घरावर फुली मारून जाते...

{{{ रश्मी.. | 27 June, 2016 - 19:16 नवीन

येस, आय अ‍ॅम गिल्टी मुनव्वर शाहने लिहीले होते, तो यातला एक आरोपी. मी वाचले होते ते पुस्तक. स्वतःला जस्टीफाय करण्याव्यतीरीक्त काही नव्हते त्यात. }}}

असे काय करता? याउप्परही काही होते की त्यातही ....

त्याने लिहिल्याप्रमाणे ही टोळी आधी कोल्हापुरात असला प्रयोग करायला गेली आणि तिथे घरातल्या मंडळींचा (अगदी बायकांचाही) मार खाऊन पराजित होऊन आली. मग हाच प्रयोग पुण्यातही केला आणि तो मात्र अनेकवेळा यशस्वी झाला. त्यावरून पुणेकर आणि त्यातही ब्राह्मण जातीची मंडळी ही दुर्बल असतात असा निष्कर्षदेखील त्या मुनव्वरने आपल्या पुस्तकात नमूद केला आहे. एखाद्या समाजाच्या संयमाचा, सुसंस्कृततेचा असा अर्थ लावणारा तो इथल्या विशिष्ट मायबोलीकरांपैकीच होता की काय अशी शंका येते.

पिक्चर पाहिला ! बरा आहे. पण खुप स्लो आहे. काही काही भाग उगीच लांबवलेले वाटतात.

म्हणजे सगळे सरळ रेषेत चालते. कुठलाही धक्का बसत नाही. आंगावर येणारे वास्तव आहे पण ५ * इतका चांगला निश्चितच नाही. फार फार तर ३ देता येतील नवाझचा अभिनय चांगला आहे म्हणून.

अनुराग कश्यपची जितकी हवा आहे तितके काही तो चांगले चित्रपट देत नाही. चित्रपटामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे तो पहाणार्‍याला खिळवून ठेवायला हवे. आणि इथे तर इतका ताकदीचा विषय असून हा चित्रपट मध्येच कुठे तरी घसरतो. म्हणजे मी तर एक दोन ठिकाणी जांभया दिल्या आणि तिथेच माझ्या दृष्टीने चित्रपट नापास झाला Wink

@बिपीन जी,

जोशी खूनानंतर त्यांचा एक प्रयत्न पुण्यातही अयशस्वी झाला. एका बाई व तिच्या दोन नोकरांनी त्यांना कडाडून विरोध केल्यावर त्यांना कम्पाऊण्डवरून उडी मारुन पळ काढावा लागला.

त्याआधीच कोल्हापुरात प्रयत्न केला व तिथे डाळ शिजली नाही, हे बरोबर आहेच.

पण पुण्यात जो त्यांचा प्रयत्न हाणून पाडला गेला, तो नंतर तपासकार्यात महत्त्वाचाही ठरला.

{{{ पण पुण्यात जो त्यांचा प्रयत्न हाणून पाडला गेला, तो नंतर तपासकार्यात महत्त्वाचाही ठरला. }}}

खरं आहे. शेवटी शेवटी तर त्यांनी चटक लागल्याप्रमाणे अतिरेक केला होता. ते पोलिसांच्या नजरेत संशयित आहेत हे माहीत असूनही वेड्यासारखे थांबायचे नावच घेत नव्हते. जोशी प्रकरणानंतर त्यांनी गुन्हे थांबविले असते तर कदाचित ते पकडले गेलेही नसते.

जोशी अभ्यंकरची केस क्रॅक झाली हा एक किस्सच आहे. रोज कट्ट्यवर बसणार्‍या आपल्या मित्राचा त्यानी ( हेगडे) खून सारस्बागेत केला आणि त्याचे प्रेत भर दिवसा मोटारसायकल्वर अख्ह्या पुण्यातून बंड गारडनला नेऊन टाकला. तपास लागत नाही म्हणून पुणे कर, पुणे पोलीस हैराण झाले होते पेपरमधून पोलीसांवर रोज टीका केली जाई आणि तेवढ्यात आणखी एक खून पडे. ही पोरे डेक्कन पोलीस स्टेशनला जाऊन मधून मधून पोलीसाना दम देत की आमच्या मित्राच्या ( हेगडे) खुनाचा तपास का लागत नाही. कामे करता की काय असे उलट पोलीसाना दमात घेत. बिचारे पोलीस सगळ्या जगाची बोलणी खात होते आणि सहन करीत होते. त्यात एका अनुभवी हवालदाराला यांचा संशय आला की यांना काय एवढा इंटरेस्त आहे बुवा यात म्हणून एकदा त्याने साध्या वेषात त्याना पोलीस स्तेशनमधून बाहेर पडल्यावर नकळत थोडे अंतर राखून फॉलो केले. त्यांच्या गपा चालल्या होत्या की अजूनही पोलीसाना आपला संशय आलेला नाही आपण सेफ आहोत वगैरे मग हवालदाराची खात्रीच पटली . मग त्याना रीतसर ताब्यात घेण्यात आले. मग काय पोलीसांच्या ताब्यात माणसे न केलेल्या खुनाची कबुली देतात तर हे तर खरेच गुन्हे गार होते...::फिदी:

त्यांना पहिल्या दोन खुनानंतर पोलिसांनी रात्रीचे भटकत असताना ताब्यात घेतलेले, पण त्यांनी खिशातले दोरी वगैरे सामान खिडकीतुन बाहेर टाकले, पोलिसांनीही नेहमीची जुजबी चौकशी केली आणि सोडले. त्यानंतर त्यांनी अभ्यंकर वगैरेना मारले.

त्यांना फासावर चढवल्यादिवशी पुणेकरांनी फटाके वाजवुन आनंद व्यक्त केलेला, त्यावर भरपुर टीकाही झालेली.

चित्रपट पाहीला. बोर्डात येण्याची हमी असणार्‍याने कसेबसे फर्स्ट क्लास मध्ये पास व्हावे असे काहीसे वाटले.

कश्यपचा एक हार्ड फॅन ह्या नात्याने मला तरी असे वाटते की त्याने एखादा मोठा ब्रेक घ्यावा काही दिवस.

नवाजुद्दीनला नावे ठेवायला मात्र कसलीच संधी नाही.

ते अभिनव चे विद्यार्थी होते म्हणून पुढे कितीतरी दिवस अभिनवच्या मुलाना पेइन्गगेस्ट /भाडेकरु म्हणुन जागा मिळत नव्हत्या.

चित्रपट पाहिला पण आवडला नाही. ..... चित्रपटात एकाद दोन सीन वास्तव्यास धरून नाहीये रामन राघव ने भर वस्तीत व खुलेआम मर्डर केले नव्हते जस तो येथे आपल्या बहीणीचा खुन करतो. चित्रपटाची पुलिस सुध्दा खरी वाटत नाही जी अग्ली मध्ये वाटली. अग्ली मध्ये जस वास्तवाला प्रेक्षक चटकन रिलेट होतो तो येथे होत नाही. ..एक चांगला विषय वाया गेलाय.

>>४. 'कहानी'मध्ये बकाल कोलकाता जितकं प्रभावीपणे दाखवलं होतं, तितक्याच प्रभावीपणे इथे 'मुंबई' दिसते. 'आमीर'मध्ये मुंबईचा हे कळकट चेहरा दाखवला होता. इथलं मुंबई चित्रण फक्त कळकटपणावर न थांबता कळकटपणाच्याही आत शिरुन त्याची व्याप्ती दाखवतं. ही मुंबई ह्या कथानकातलं एक महत्वाचं पात्र आहे. ती नसेल, तर ही कहाणीही नसेल.<< +१

आजच पाहून आलो. नवाज आणि विकी दोघांनी फोडलयं. ही कळकट्ट मुंबई अंगावर येते. क्रौर्य दाखवताना थेट दाखवलयं, अजिबात भेदभाव केला नाही. शेवट तर जबरदस्त केलाय.

नवाजुद्दिनचे कित्येक संवाद , स्व्तःशी/दुसर्‍यांशी सुरु असताना लोक हसत होते आजूबाजूचे. जणू विनोदच सुरु आहेत, पण तो ज्या थंडपणे बोलत असतो ते बघण्यासारखं आहे.

'अ' प्रमाणपत्र आहे. संवाद, द्रुश्यं 'अ' प्रमाणपत्रानुसारच आहेत.

>>हा चित्रपट वास्तवातल्या रामन राघवबद्दल नाही.<<चित्रपटाच्या सुरुवातीलाच हे डिस्क्लेमर टाकलयं.

ओ प्रतिसादकर्त्यांनो .. प्लीज स्पॉयलर लिहित जा ना लोकहो लिहिताना..
निदान पिच्चर थेटरात असेपर्यंत तरी लिहित जा..
काय ते बघायला याव अन कथा फोडलेली असली कि जाम डोक्यात जाते :रागः

Pages