नाटक - कुछ मिठा हो जाये

Submitted by वेल on 24 April, 2016 - 08:04

तसं बर्‍याच दिवसांनी नाटक पाहायला गेले होते. खरं तर मी नाटक सिनेमा कितीही पाहिले तरी त्याबद्दल फारसं लिहित नाही, पण ह्या नाटकाबद्दल जरा खासच वाटतय म्हणून म्हटलं तुम्हालाही सांगावं.

"कुछ मिठा हो जाये" ह्या नाटकाने सुरुवात एका अभिनव जाहिरातीने केली. नाटकांच्या आणि सिनेमांच्या जाहिरातीत नेहमी अभिनेत्यांचे फोटो असतात पण ह्या नाटकाच्या पहिल्या काही जाहिरातींमध्ये त्यांनी नाटकाच्या लेखकांचे फोटो छापले. आणि ह्या संकल्पनेचं श्रेय निर्मात्याचं. निर्माता संतोष घाणेकर आणि सहनिर्माती मोनिका धारणकर ह्यांचे समस्त लेखक मंडळींकडून आभार. त्यांनी लेखकांचा चेहरा पुढे आणला. मला वाटतं मराठी रंगभूमीवरचं, कदाचित भारतीय रंगभूमीवरचंही, हे पहिलंच नाटक असेल ज्याच्या पहिल्या काही जाहिरातींमध्ये केवळ लेखकांचे फोटो होते आणि हो, लेखकाचे नव्हे तर लेखकांचे.. ह्या नाटकाचे पाच लेखक आहेत.

पाच वेगवेगळ्या जॉनरच्या लेखकांनी एकत्र येऊन व्यवस्थित ठरवून मगच प्रेम ह्या संकल्पनेवर आधारित पाच नाट्यप्रवेश लिहिले आणि ह्या नाटकाद्वारे पुढे आणले आहे. असा हा प्रयोगही मला वाटतं मराठी रंगभूमीवर प्रथमच झाला आहे. गणेश पंडित, शिरिष लाटकर, अंबर हडप, आशिष पाथरे आणि अभिजीत गुरु हे पाचही लेखक वेगवेगळ्या वयोगटामधलं, वेगवेगळ्या टप्प्यावरचं प्रेम अगदी आपल्या हृदयापर्यंत पोहोचवतात.

ह्या पाचही नाट्यप्रवेशांना एकमेकांशी आणि प्रेक्षकांशी बांधून ठेवण्यासाठी दिग्दर्शक गणेश पंडित ह्यांनी फ्री फॉर्म वापरलाय. नाटकातले इन मिन चार कलाकार चिन्मय उद्गीरकर, केतकी चितळे, पूर्णिमा तळवलकर आणि अभिजीत चव्हाण प्रेक्षकांशी खूप सहजपणे संवाद साधत, ब्लॅक आऊट्स टाळत, पाचही नाट्यप्रवेशांना एकमेकांशी खूप छान जोडत नाटकाला पुढे घेऊन जातात. नाटकातले काही प्रसंग तर अरे, हे तर माझ्याही सोबत झालय अस्से गोडगोड.

ह्या नाटकातले संगीताचे तुकडे गोडगोड आणि आपणही थिरकावं अशी वाटणारी छोटी छोटी नृत्य गोडगोड आणि त्यासोबत प्रेम ह्या गोडव्याला हवं असणारं ताजंतवानं नेपथ्य आणि प्रकाशयोजना.

मुळात नाटक आहे प्रेम ह्या विषयावर आणि नाटकाचं नावही आहे कुछ मिठा हो जाये, पण ह्या गोडव्याची विटी नाही येत तोंडाला.

एखाद्या सुगरणीने मैदा, तूप, साखर, दूध आणि खायचा रंग अगदी योग्य प्रमाणात घेऊन आपल्या कुशल हातांनी गुलाबाचे चिरोटे बनवावेत आणि ते योग्य तापमानावर तापलेल्या तेलात तळावेत आणि त्यावर बदाम पिस्ता काजू किसून घालावेत तसं हे नाटक. चिरोटा मोडून खाताना त्याचा खुसखुशीतपणा आवडावा आणि त्या चिरोट्याचा एक एक पदर जिभेवर विरघळताना त्यातला हलका गोडवा जाणवावा आणि बदाम पिस्ता काजूने एक श्रीमंती थाट यावा तसं हे नाटक. लेखकांची परफेक्ट रेसिपी, दिग्दर्शकाने घेतलेली तळण्याची मेह्नत आणि संगीत नृत्य नेपथ्य आणि प्रकाशयोजना ह्यांचा ड्रायफ्रुट्सवाला श्रीमंती बाज.

हा चिरोटा खाल्याशिवाय नाही समजणार तुम्हाला त्यातली गम्मत. तो चलो, कुछ मिठा हो जाये...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय..कथेची आणि कलाकारांची आणखी थोडी ओळख करुन द्यायला हवी होती.
वेगवेगळ्या लेखकांनी नव्हे पण वेगवेगळे प्रवेश असणारे नाटक चार दिवस प्रेमाचे येऊन गेलेय. त्यात प्रशांत दामले, कविता लाड ( नंतर वीणा जामकर ) अरुण नलावडे आणि सविता प्रभुणे काम करत असत. नंतरही असेच एक नाटक येऊन गेले त्यात स्वाती चिटणीस आणि राजन भिसे होते. पण असा अनेक लेखकांनी एकत्र येऊन केलेला प्रयोग पहिलाच असावा.

चिरोटे रेसिपीपेक्षा नाटकासंदर्भात अधिक लिहिलं अस्तं तर बरं झालं अस्तं.

पाच नाट्यप्रवेश वेगवेगळ्या लेखकांनी लिहिले आहेत तर ते एकत्र कसे सांधले जातात? पाचही प्रवेश एकाच नाट्यकथेचा भाग आहेत की वेगवेगळ्या कथा आहेत?

दिनेशदा, धन्यवाद.

अडीच तासाच्या नाटकात पाच वेगवेगळे नाट्यप्रवेश आहेत प्रेम ह्या संकल्पनेवरचे. त्यांच्या कथांबद्दल मी अधिक सांगितलं तर नाटक पाहण्यातली मजाच निघून जाईल. ह्या कथा वेगवेगळ्या असूनही एका नाट्यप्रवेशातून दुसरीकडे जाताना आपण अडखळत नाही कारण कथांना एकत्र बांधण्यासाठी ह्याच चार कलाकारांचा सूत्रधार म्हणून वापर केलाय आणि त्या कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्या कथांना खूप छान एकत्र बांधलय.

कलाकार -
चिन्मय उद्गीरकर - स्वप्नांच्या पलिकडले, नांदा सौख्यभरे नायक
केतकी चितळे - आंबट गोड मधली अबोली
पूर्णिमा तळवलकर - होसूमीयाघ मधली बेबीआत्या
अभिजित चव्हाण - अस्सं सासर सुरेख बाई मधला नायकाचा काका

लेखक -
गणेश पंडित आणि अंबर हडप - मराठी चित्रपट - येलो आणि बीपी इ.
शिरिष लाटकर - बडे अच्छे लगते है, पवित्र रिश्ता, स्वप्नांच्या पलिकडे, वहिनीसाहेब इ.
अभिजित गुरु - लक्ष्य, क्राईम डायरी, पुढचं पाऊल, देवयानी, कशाला उद्याची बात इ.
आशिष पाथरे - दिल दोस्ती दुनियादारी

आभार वेल... मराठी नाटकांबद्दल कितीही वाचले तरी मला ते कमीच वाटते.
चार दिवस प्रेमाची थीम पण अशीच होती. मी त्याचा मूळ संचातला प्रयोग बघितला होता. सर्वच प्रवेश स्वतंत्र भाग म्हणूनही छान होते. हे चारही कलाकार वेगवेगळ्या भुमिका करत असत. कविता लाड ने केलेल्या भुमिकेनंतर वीणा जामकर ने त्यात अधिक रंग भरल होते. मला आठवतेय त्याप्रमाणे काही जास्तीचे प्रवेशही नंतर होते.