माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग पाच

Submitted by किंकर on 1 July, 2015 - 09:37

भाग एक - http://www.maayboli.com/node/54368

भाग दोन - http://www.maayboli.com/node/54425

भाग तीन - http://www.maayboli.com/node/54450

भाग चार - http://www.maayboli.com/node/54489

डायरीतील नोंद -- असलेली
आमची आई तशी लवकरच वारली तिच्या मागे आमच्या थोरल्या बहिणीने आम्हा लहान भावंडांना आईचे प्रेम दिले.ती तर गावातच राहत होती.आमच्या सबंध घरादाराशी जवळीक राखून होती ती, तिची मुले एक बंडखोर,तर एक अबोल त्यागी तर एकाचा स्वभाव माझ्या मोठ्या मुला सारखा गूढ, त्यांचा जिव्हाळा.पावले आपोआप नकळत तिच्या घराकडे वळली.

तीच घर तर मला परक नव्हतच. आई गेल्यावर एकाकी पोरकेपणावर तीनच फुंकर घालून दुखः हलक् केलेले. पण तिच्याशीही मोकळेपणे बोलावयाची चोरी. "जगावेगळा विक्षिप्तपणा" अशा शेलक्या शब्दात ती माझी संभावना करायला मागे पुढे पाहणारी नव्हती. जितकी प्रेमळ तितकीच शिस्तीची भोक्ती. ती रागावणे शक्य होते नव्हे तो तिचा हक्क होता.

आणि मुख्य म्हणजे तिला हुकमत गाजवायची नसली तरी तिच्या प्रेमळ परंतु हुकमतीच्या शब्दापुढे मी पांगळा होतो. तिचे सामर्थ्य शब्दातले नसून त्यागातले, आपलेपणातले.भावाचे कल्याण व्हावे या शुद्ध हेतूतून निर्माण झालेले.

मी अशावेळी काय करणार? मी एकटा आहे,निर्णयात कोणी सहभागी नाही तुझा तू एकट्याने घ्यावयाचा म्हणजे जबाबदारी अधिकच वाढलेली.त्यातून ती एक स्त्री. ती माझ्या पत्नीचीच बाजू घेणार,मग चक्क उरावर धोंडा ठेवून तथाकथित मोकळ्या वातावरणात हवापाण्याच्या गप्पा मारून,क्षेमकुशल विचारून,तिची मूर्ती भक्ती युक्त अंतकरणाने डोळ्यात साठवून निरोप घेतला.

जाये तू जाये कहां ? उपनगरातून नगरात आलो होतो. जावयाचेहि होते परंतु कोठे? याच नगरात बालपण गेले. त्याच्या खुणा ठायीठायी विखुरल्या होत्या.आज निर्जीव वास्तु देखील सजीव झाल्या सारख्या वाटत होत्या हितगुज करीत होत्या. कारण सर्वांपासून निरोप घेवून दूर जायचे होते.

माझी शाळा असंख्य जुन्या आठवणी मनात डोकावत होत्या. या दगडमातीच्या वास्तुत हि शक्ती आली कोठून ? हसणारी फुले , वाऱ्याच्या झुळके बरोबर डोलणारी बाग उडणारे कारंजे क्रीडांगण, आईनंतर काही पवित्र संस्कार या शालामातेने माझ्यावर केले. आदर्शवादाची परंपरा जोपासली. “Factu non verba-"क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे" हे ध्येय वाक्य मिरवणारी हि माऊली कृती वीरांचा गौरव,तर वाचावीरांकडे पाहून हसत होती.बोल तू कोण? तिचा पुत्र म्हणवून घ्यावयास लायक आहेस ?

नाटकातला ट्रान्सफर सीन प्रमाणेंच,मी शिशुपणातून बालपणात केंव्हा प्रवेश केला,ते कळलेही नाही मात्र वातावरणात फरक जाणवणारा होता.कालचा राजा आजचा भिकारी, कालचा राजा आजचा गुलाम, कालचा अमीर आजचा फकीर,जमीन अस्मानचा फरक.

'गृहराज्यावर चिमणा राजा राज्य करी ,
आईची मृदुल कटी सिहासंन त्याचीया परी'

एखाद्या राज्यक्रांतीने सिहांसन उध्वस्थ व्हावे आगदी तसेच.आर्थिक आघाडीवर आमच्या वडिलांचा,सपशेल पराभव झाला होता व या पराभवाची हाय वडिलांआधी,माझ्या आईने खाल्ली. होते कसे? झाले कसे? हे दोन प्रश्न तिला सतावित होते. आणि इहलोकी हे प्रश्न सुटले नाहीत म्हणून कि काय तिने परलोकी धाव घेतली.

राजाच्या रंकाला, अमीराच्या फकिराला मग राजवाडा कुठला? हुमायुना तुझे स्थान दिल्लीत नाही. चाहु बाजूनी तुझी पारध होणार आहे. राजवाडा रिकामा करावाच लागणार आहे. कस्तुरीमृगाप्रमाणे या कस्तुरीचा सुगंध दश दिशात पसरो असेच आपले बाळ जन्मताना प्रत्येक पित्याचा आशीर्वाद आसतो.मात्र दैवे लाभला चिंतामणी तसे हे भाग्य लाखात एखाद्याचे वाट्याला येते. वडिलांचे आशीर्वाद पाठीशी घेवून जन्मग्राम सोडले आणि शिक्षणाकरींता पुणे गाठले.

डायरीतील नोंद-मला समजलेली –

वडील घराबाहेर पडले.कोथरूड येथून ते सर्वात प्रथम गणेशवाडी,डेक्कन जिमखाना येथे,माझ्या आत्याकडे गेले. आणि मग त्यांनी पुणे सोडले.घर सोडणे हा निर्णय मनी झाला.पण पुढील प्रवास नक्की केलेला नाही.

या दोलायमान मनस्थितीत,त्यांनी वरील नोंद केली आहे.त्यामुळे ते आईच्या आठवणीने उदास होतात.आईच्या अकाली मृत्यूस कारणीभूत झालेली परिस्थिती,पुण्यात व्यतीत केले बालपण,त्यांच्या डोळ्यासमोरून सरकते.

जीवनातील चढ उतार आणि प्राप्त परिस्थिती,याची सांगड घालताना ते ऐतिहासिक दाखले देतात.निर्णय अवघड असला,तरी पुढेच जावयाचे आहे,या मनाच्या खंबीरतेवर ते येतात,आणि त्यामुळे शाळा तिचे घोषवाक्य, शाळेने केलेले संस्कार यात देखील ते रममाण होतात. (क्रमशः)

भाग सहा - http://www.maayboli.com/node/54566

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखमालेचा कमी होत गेलेला प्रतिसाद लक्षात घेत या लेखमालेचा ' तडका ' होवू नये म्हणून हि लेखमाला इथेच थांबवतो . भाग एक ते चार करिता दिलेल्या प्रतिसादांसाठी सर्वांचे मनपूर्वक आभार !

अरेरे,
प्रतिसाद मिळत नाहीत म्हणून तुमचा लिहिण्याचा हुरूप कमी झालाय हे समजू शकते.
पण आम्ही वाचतोय.

खरं तर डायरी 'अशी' असेल असं मला वाटलं नव्हतं.
डायरीच्या अनुशंगाने एक जुना काळ उलगडत जाईल अशी माझी कल्पना होती.
पण ही डायरी सांसारिक जबाबदार्‍या सोडून अव्यक्त आणि अनिश्चिततेच्या शोधात जाणार्‍या माणसाची आहे.
अशी माणसेही असतातच.
पण त्यांच्या त्या अनिश्चिततेच्या प्रवासाचं ग्लोरिफिकेशन केव्हा होतं तर त्या प्रवासाच्या शेवटी काहीतरी भव्यदिव्य यश/ध्येय गाठलं गेलं असेल तर.
सिद्धार्थ बायको मुले सोडून वनवासात गेला असता आणि ओंजळभर ज्ञान स्वतःपुरते मिळवून बसला असता तर खचितच त्याच्या गृहत्यागाचे कौतुक झाले नसते. शेवटी तो भगवान बुद्ध झाला म्हणून आता त्याच्या गृहत्यागाचे आम्हाला कौतुक.
कित्येक मुले गाण्यासाठी /सिनेमात येण्यासाठी घर सोडतात. त्यांच्या संघर्षमय आयुष्याची 'स्टोरी ' केव्हा होते तर जेव्हा ती कुणी मोठा गायक/ नट म्हणून प्रसिद्धं होतात.
तुमच्या वडिलांच्याबाबतीत पुढे नेमके काय झाले ते माहित नसल्यानेही त्यांच्या घर सोडण्याच्या प्रसंगातील घालमेलीचे वर्णन इतके अपील होत नसणार. थोडक्यात मला एखाद्या लबाड वाचकासारखं ह्या डायरीचं शेवटचं पान गुपचूप पहिल्यांदा वाचायचंय.

दुसरं असं की किमान मला तरी स्वतःची जबाबदारी झटकून चाललेल्या माणसाबद्दल मनात चटकन आदर निर्माण होत नाही आहे. तुम्ही जे मागच्या एका भागात लिहिलंय की 'पण हे नक्की कि,त्यांची ती कृती म्हणजे, जबाबदारी झटकून केलेला भ्याड पणा नक्कीच नव्हता. त्या बाबतीत मी,माझ्या वडिलांची एक धाडसी पुरुष म्हणून कायमच बाजू घेईन. '
- तर त्यातला धाडसीपणा नेमका काय याचं उत्तर जोपर्यंत मला नेमकं मिळत नाही तोपर्यंत डायरी वाचेनच पण त्यावर नेमकी प्रतिक्रीया देता येणार नाही.

अर्थात याचा अर्थं मी ही डायरी वाचत नाही असा नसून पहिल्या एकदोन भागांनंतर उत्स्फूर्तपणे प्रतिक्रीया द्याविशी का वाटली नाही याचा माझाच मी घेतलेला धांडोळा आहे.

असो. आपल्या निर्णयाचा आदर आहे. कधी तुम्ही पूर्ण डायरी आपल्या ब्लॉगवर लिहिलीत तर मला नक्की कळवा. मी पुढचे भागही तिथे येऊन नक्की वाचेन.

अरेरे,
प्रतिसाद मिळत नाहीत म्हणून तुमचा लिहिण्याचा हुरूप कमी झालाय हे समजू शकते.
पण आम्ही वाचतोय. >>>> +१००.

साती, सुरेख प्रतिसाद!
काल डायरीतील हे पान मी वाचले आणि किंकर यांचा प्रतिसाद वाचला . एखादे पुस्तक आपण वाचायला घेतो आणि मिटून ठेवतो त्यावेळी काही भावना मनात नसतात.तसं काहीसं मला याभागाबद्दल वाटलं.असो.

साती - सविस्तर प्रतिसादा करिता आभार !

मी सुरवातीस लिहल्या प्रमाणे संपूर्ण लेखमाला दोन पातळ्यांवर लिहली जात आहे .' डायरीतील नोंद -असलेली ' हा भाग जसा आहे तसा लिहणे हे मी माझे नैतिक बंधन मानले आहे .

'डायरीतील नोंद मला -समजलेली ' - हा भाग म्हणजे मला मुळ डायरी वाचून काय वाटले त्या भावना आहेत . सर्व लिखाण सर्वांना आवडलेच पाहिजे असे माझे मत नक्कीच नाही .

आपण म्हणता तसे - 'पण त्यांच्या त्या अनिश्चिततेच्या प्रवासाचं ग्लोरिफिकेशन केव्हा होतं तर त्या प्रवासाच्या शेवटी काहीतरी भव्यदिव्य यश/ध्येय गाठलं गेलं असेल तर.' हे काय किंवा 'दुसरं असं की किमान मला तरी स्वतःची जबाबदारी झटकून चाललेल्या माणसाबद्दल मनात चटकन आदर निर्माण होत नाही आहे.' या आपल्या मताचा पण मी नक्की आदर करतो .

कारण शेवटी मी माझ्या बाबांची डायरी एक वाचक आणि मुलगा अश्या दुहेरी भूमिकेतून वाचत आहे. संपूर्ण डायरीचा विचार केला तर 'देव ' संकल्पनेच्या शोधार्थ केलेला एक अनिश्चित प्रवास जितका रोमांचकारक मला वाटला तसा प्रत्येकास वाटेलच असे नाही .

पण लेखमाला वाचली जाते आहे कि नाही हेच लक्षात न आल्याने मी माझा प्रतिसाद या भागाच्या अखेरीस नोंदविला होता . आपण वाचत आहात हा एक मुद्दा माझ्या साठी महत्वाचा आहे. लेखमाला आवडणे न आवडणे या वाचकांच्या दोन्ही मतांचा मला समान आदर आहे आणि राहील

पुरंदरे शशांक , देवकी हर्पेन पीनी स्वाती२ - धन्यवाद आणि आभार -या नंतर लेखमाला पूर्ण करीन आणि प्रत्येक भागावर प्रतिक्रियेची स्वतंत्र वाट पाहणार नाही. पण लेखमाला संपल्यावर आपले मन मोकळे अभिप्राय समजावून घ्यायला नक्की आवडेल . पुढील भाग लवकरच पूर्ण करून देत आहे

धन्यवाद कि़ंकर. लिहित रहाताय त्याबद्दल.

अनेकदा मी तरी लेख'माला' असेल तर ती पुर्ण झाल्यावरच वाचायला सुरु करतो. असेही अनेक वाचक असतीलच