भिस्त आणि शिस्त ह्यांचा समतोल हवा

Submitted by रसप on 24 February, 2015 - 07:09

हा लेख आधीच लिहिला होता. पण प्रकाशित केला नाही कारण सामन्याच्या निकालावर माझा पुढील उत्साह अवलंबून असणार होता. पाकिस्तानसोबतच्या सामन्यानंतर मला वेळ मिळाला नाही, आज मिळाला आहे, म्हणून प्रकाशित करतो आहे. ह्यानंतर अन्युक अरब अमिरातीसोबतच्या सामन्यापूर्वी भारत-पाक व भारत- द. आफ्रिका ह्या सामन्यांवर लिहून बॅकलॉग भरून काढण्याचा विचार आहे.

# क्रिकेट हा माझा धर्म आहे आणि कसोटी, वनडे व ट्वेंटी२० हे देव. विश्वचषक हा एक सोहळा. हा साजरा करायलाच हवा ! पण माझं धर्मपालन एका मर्यादेपर्यंत आहे. जोपर्यंत खेळात भारत आहे, तोपर्यंत मी जीव ओवाळतो, त्यानंतर मात्र माझा जीव घुसमटतो. ही एक शृंखला सुरु करतो आहे, जी ह्या विश्वचषकातील भारताच्या प्रवासावर पूर्णपणे अवलंबून आहे. तो जितका चालेल, तितकीच माझी शृंखला. #

ICC-Cricket-World-Cup-2015-ticket-price-640x336.gif

~ ~ भिस्त आणि शिस्त ह्यांचा समतोल हवा ~ ~

फार पूर्वीपासून भारताची भिस्त कायम फलंदाजीवरच राहिलेली आहे. पण ह्या विश्वचषक संघातले बहुतेक भारतीय फलंदाज चांगल्या गोलंदाजीसमोर तितकीच चांगली फलंदाजी करण्यापेक्षा तिच्यासमोर त्रेधा उडण्यासाठीच जाणले गेलेले आहेत. विराट कोहलीवर भारत सगळ्यात जास्त अवलंबून दिसतो. पण ह्याच कोहलीला इंग्लंडमध्ये ऑफ स्टंपबाहेरील स्विंग गोलंदाजीने नाचवलं होतं. कोहली फलंदाजीला आल्यावर इंगलंडचे स्लीपमधील क्षेत्ररक्षक लाल सिग्नल पडल्यावर त्याच्या उतरत्या काउंटरवर नजर लावून उभ्या राहिलेल्या मोटारसायकलस्वारांप्रमाणे असत. पहिली संधी मिळताच त्याचं सोनं करून त्याला प्रत्येक वेळी पॅव्हेलियनमध्ये त्वरित माघारी पाठवत. आखूड टप्प्याचे चेंडू खेळण्याची शिखर धवनची कुवत आणि मुद्राभिनय करण्याची सलमान, कतरिना वगैरेंची कुवत सारखीच आहे, हे आता सर्वश्रुत झालंय. रोहित शर्मा म्हणजे मुंबईच्या मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनसारखा आहे. दोघांना नियमितपणे मेगा ब्लॉक असतात आणि दोघेही नियमितपणे अनियमित असतात. रैना व धोनी हाणामारीच्या षटकांत उपयुक्त आहेत. जाडेजा हा फलंदाज आहे की गोलंदाज की दोन्हीत कामचलाऊ, हे त्याचं त्यालाही समजत नसावं. त्याच्या नावावर तीन त्रिशतकं असणं मला हास्यास्पदच वाटतं. राहता राहिला रहाणे. अजिंक्य रहाणे ह्या विश्वचषकात कसा खेळतो, ह्यावर भारताचा ह्या स्पर्धेतीलच नव्हे तर त्यानंतरचाही प्रवास अवलंबून आहे. द्रविडनंतर एक अत्यंत भरवश्याचं तंत्र असलेला रहाणेशिवाय दुसरा खेळाडू अजून तरी दृष्टीपथात आलेला नाही. कसोटीत चेतेश्वर पुजाराला बरेच जण 'नेक्स्ट द्रविड' म्हणतात. मात्र त्याच्या बॅट आणि पॅडमधली विस्तीर्ण मोकळी जागा चेंडूने वारंवार हेरली आहे आणि तो वनडेसाठी अजून तरी तितकासा उपयुक्त वाटलेला नाही कारण वनडेसाठी आवश्यक मोठे फटके व धावा पळण्यातली चपळाई त्याच्यात नाही. असंही ह्या संघातही तो नाहीच. त्यामुळे मला तरी रहाणेमध्येच पुढचा द्रविड दिसतो आहे. तो खरोखर आहे की मला भास होतो आहे, हे ही स्पर्धा ठरवेल.

ह्या विश्वचषकात सहभागी संघांत सगळ्यात बेभरवश्याची गोलंदाजी कुणाची असेल तर ती भारताची. खरं तर 'बेभरवश्याची' नाहीच. उलटपक्षी 'भरवश्याचीच'. भरवसा हाच की, हे कुठलीच अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. भारत कधीच स्वत:च्या गोलंदाजीसाठी जाणला गेला नाही. संघात काही चांगले गोलंदाज असत, मात्र अशी गोलंदाजांची फळी जी हमखास सामना जिंकून देईल, कधीच भारताकडे नव्हती. गेल्या काही महिन्यांत भारतीय जलदगती गोलंदाजांनी स्वत:च्या खेळामुळे जे चित्र निर्माण केलं आहे ते उरात धडकी भरवणारं आहे, भारताच्याच ! भुवनेश्वर कुमार वगळता सगळेच जण बहुतेकदा सामना सुरु होऊन संपेपर्यंत अचूक टप्प्याच्या शोधातच दिसतात. भुवनेश्वरलासुद्धा त्याच्या वेगाच्या मर्यादा आहेत आणि त्यात तो सध्या १००% तंदुरुस्तही नाही. इशांत शर्माचं दुखापतग्रस्त होऊन विश्वचषकातून बाहेर पडणं, हे भारतासाठी चांगलं आहे की वाईट ह्याचा विचार करावा लागणे आणि गेले काही महिने तो भारतीय गोलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ म्हणवला गेला असणे हे नैराश्यजनक आहे. फिरकी गोलंदाजीची धुरा अश्विन सांभाळत असला, तरी ते 'सांभाळणे' आहे की नुसतंच 'खांदा देणं' आहे, कुणास ठाऊक ! उपखंडाबाहेरील अश्विनची गोलंदाजी इतकी बोथट असते की त्या टोकावर एखादा चेंडू टप्पा घेऊ शकेल. जाडेजा, रैना, रोहित शर्मा, बिन्नी हे सगळे मिळून माझ्या मते एक पाचवा गोलंदाज आहे.

भारताच्या गोलंदाजीची अशी अवस्था असताना गोलंदाजीत दादा संघ राहिलेल्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेशी पहिले दोन सामने खेळायचे आहेत. ही सुरुवात अत्यंत कठीण जाणार आहे निश्चितच. गेल्या तीन महिन्यात ऑस्ट्रेलियात ह्या संघाने जवळजवळ प्रत्येक सामना हरलेला आहे. त्यातही विश्वचषकापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया व इंग्लंडसोबतच्या तिरंगी स्पर्धेत तर ह्या संघाच्या मर्यादा अधिकच उघड्या पडल्या आहेत.
पाकिस्तानला भारतासोबत आजतागायत एकही विश्वचषक सामना जिंकता आलेला नाही, ही सांख्यिकी जर त्यांना बदलायची असेल, तर त्यांना ह्या वेळी खूपच चांगली संधी आहे; असं म्हणावं लागेल. कारण कदाचित भारताचा हा संघ आत्तापर्यंतचा सगळ्यात दुबळा डिफेंडिंग चॅम्पियन असावा.

एकंदरीतच अभ्यास पूर्ण न करता परीक्षेला बसणाऱ्या पोरासारखा भारतीय संघ ह्या विश्वचषकासाठी दाखल होतो आहे असं मला वाटतंय. अर्थात, ह्या संघातील काही खेळाडूंत चमत्कार करवून आणण्याची क्षमता आहे आणि त्यांच्या त्या क्षमतेच्या जोरावर ते संपूर्ण संघाचं मनोबल दुप्पट, चौपटही करू शकतात आणि संघप्रदर्शन उंचावू शकतात. एक निस्सीम भारतीय क्रिकेटप्रेमी म्हणून माझी इच्छाही असंच काही व्हावं, अशी आहे आणि विश्वचषकापूर्वी भारतीय संघालाही हीच शुभेच्छा आहे. महत्वाच्या खेळाडूंवर प्रत्येकच संघ अवलंबून असतो. पण त्या खेळाडूंना इतर खेळाडू कितपत शिस्तीने साथ देतात ह्यावर संघाचं दीर्घकालीन यशापयश अवलंबून असतं. त्यामुळेच आता जी काही उपलब्ध साधनं आहेत, त्यांचा शिस्तबद्ध वापर करणं हेच महत्वाचं आहे. कुणावर किती भिस्त असावी आणि कुणी कितपत शिस्त पाळावी, ह्याचा सारासारविचार व पालन करायला हवे आहे.

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/02/blog-post_24.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोलंदाजीची गणिते पलटली आहेत हां., लेख लिहायला उशीर झाल्याने.. मात्र तरी प्रकाशित केले जसेच्या तसे हे कौतुकास्पद! लेख छान!

हा लेख आत्ताच्या परिस्थितीत प्रकाशित करणे हे एक धाडस आहे.

पण संघ स्पर्धेत दाखल होण्याआधीच्या अवस्थेत हा लेख व्यवस्थित पटणेबल होता. त्यातही प्रामुख्याने जडेजा, धवन व ईशांत शर्मा ह्यांच्यावरील टिपण्णी खास!

मात्र आता हा लेख सद्यस्थितीत तरी अयोग्य वाटत आहे. शमीने चांगली गोलंदाजी केलेली आहे. किंबहुना असे म्हणायला वाव आहे की जेथे ३५० धावा आपण सहज करत होतो तिथे जेमतेम ३०० धावाच करणारे आपले फलंदाज असतानाही सामना जिंकून देण्यात खरी कामगिरी आपल्या गोलंदाजांनीच बजावलेली आहे.

पण हे झाले दोन सामन्यांवरूनचे मत!

इब्तिदा-ए-कप है ये, रोता है क्या
आगे आगे देखिये होता है क्या

जाडेजा हा फलंदाज आहे की गोलंदाज की दोन्हीत
कामचलाऊ, हे त्याचं त्यालाही समजत नसावं.>>>>
हा हा हा

हा लेख आत्ताच्या परिस्थितीत प्रकाशित करणे हे एक
धाडस आहे.>>>>
+१

दोन सामने तरी चांगले खेळले आहेत.
आता पुढे बघूया काय होते ते.
पण आता आत्मविश्वास वाढलेला आहे.
उपांत्य सामन्यापर्यंत तरी नक्की जातील.

>> हा लेख आत्ताच्या परिस्थितीत प्रकाशित करणे हे एक धाडस आहे. <<

सपशेल मान्य !
'ह्यावर लिहायला हवं' अशी खुमखुमी आली तेव्हा दुसरा सामना होत आलेला होता. मला भारताच्या आत्तपर्यंतच्या दोन्ही सामन्यांवर लिहायचं आहेच आणि त्या नंतरही लिहायचं आहे. त्यामुळे बॅकलॉग भरून काढणं आवश्यक वाटलं.

हा लेख आधी लिहिला होता म्हणजे पूर्णपणे नाही. साधारण ४०-५०% लिहिला असेन. पण त्यावेळी मला तो प्रकाशित करण्यासारखा वाटला नाही म्हणून ते लिखाण तसंच ठेवलं होतं. काल त्यात काही सुधारणा करून व भर घालून त्याला अंतिम स्वरूप दिलं.

पुढील दोन्ही लेख नव्याने लिहिणार आहे. ते लिहिताना, त्या त्या वेळची मानसिकता जागवून लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.