कुठे गुंतवू मनास माझ्या?

Submitted by निशिकांत on 21 April, 2014 - 01:12

तू गेल्याने रंग उडाले
किती अवकळा घरास माझ्या !
सोडुन गेल्या आठवणीही
कुठे गुंतवू मनास माझ्या ?

निशिगंधाचे, प्राजक्ताचे
दरवळ होते जिथे पसरले
त्याच अंगणी निवडुगांचे
रान माजले, गंध हरवले
"पूस आसवे" कसे म्हणावे
भळभळणार्‍या उरास माझ्या ?
सोडुन गेल्या आठवणीही
कुठे गुंतवू मनास माझ्या ?

ग्रिष्म ऋतूचे स्तोम माजले
वसंत इकडे फिरकत नाही
काळ चालतो हळू एवढा
सूर्य सरकता सरकत नाही
कधीकाळच्या रंगबिरंगी
रात्री झाल्या उदास माझ्या
सोडुन गेल्या आठवणीही
कुठे गुंतवू मनास माझ्या ?

चालत असता काळोखी मी
कसा अचानक उजेड पडला ?
तुझा मखमली खयाल बहुधा
काळजास हळुवार स्पर्शला
रोमांचांच्या आवरणाने
सर्व वेदना खलास माझ्या
सोडुन गेल्या आठवणीही
कुठे गुंतवू मनास माझ्या

नसे भावना स्वतःची तरी
शब्द बोलती सदैव माझे
खांद्यावरती त्यांच्या असते
माझ्या सुखदु:खाचे ओझे
लिहितो, गातो विरह गीत पण
लाख चरे काळजास माझ्या
सोडुन गेल्या आठवणीही
कुठे गुंतवू मनास माझ्या ?

हिशोब करता ध्यानी आले
जीवन अवघे गेले वाया
पुनर्जन्म दे नकोच मुक्ती
नको कावळा पिंड शिवाया
नवजोमाने नवीन आशय
देइन मी जीवनास माझ्या
सोडुन गेल्या आठवणीही
कुठे गुंतवू मनास माझ्या ?

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users