गझलेची जमीन (लेख)

Submitted by बेफ़िकीर on 17 June, 2014 - 00:11

मायबोलीवर गेल्या काही दिवसांत मराठी गझलकारांनी रचलेल्या गझलांच्या जमीनींवर इतरांनी गझला रचणे, त्यावर शाब्दिक टीका, थट्टा किंवा विडंबनकाव्य होणे व गझलशी विशेष नाते न ठेवणार्‍यांनीही हिरीरीने चर्चेत सहभागी होणे असे काही प्रकार घडले. हे सगळे एक प्रकारे जिवंतपणाचेच लक्षण आहे. ह्या लेखात आपण काही गंमतीशीर उदाहरणांसकट हे विचारात घेऊयात की गझलेची जमीन गझलकाराला महत्वाची का वाटते आणि असे काही झाल्यास त्याचे परिणाम काय होऊ शकतात.

आधी एक मजेशीर उदाहरण घेऊ:

हुस्ने-मह-गरचेब हंगामे कमाल अच्छा है
उससे मेरा महे-खुर्शीदो जमाल अच्छा है

उनको देखेसे जो आजाती है मुंहपे रौनक
वो समझते है के बीमारका हाल अच्छा है

बेतलब दे तो मजा और सिवा मिलता है
वो गदा जिसका न हो खूं-ए-सवाल अच्छा है

खिज्र सुलतान को रख्खे खल्के=अकबर सर सब्झ
शाहकी बागमे ये ताजा निहाल अच्छा है

- गालिब (१७९६ ते १८६९)

(तिथीनुसार बदलणार्‍या चंद्राच्या हंगामी सौंदर्याचे महत्व आहे हे ठीक आहे, पण त्यापेक्षा माझ्या प्रेयसीचा चंद्र आणि सूर्यासारखा - सतत उजळलेला- रंग अधिक चांगला आहे)

(मी आजारी आहे म्हणून ती भेटायला आली तर ती आलेली पाहून माझा चेहरा उजळतो आणि तिला वाटू लागते की हा तर बरा झालेला आहे, आजारी नाही आहे)

(न मागताच काही मिळाले तर त्याची लज्जत काही औरच असते. ज्या भिकार्‍याला काहीही मागायची सवय नाही तो चांगला!)

(बहादूरशहा जफरचा नवजात पूत्र खिज्र सुलतान ह्याला अल्लाह नेहमी भरभराटीस आणो, बादशहाच्या बागेतील हे ताजे रोपटे छान आहे)

आता ह्याच जमीनीतले दुसर्‍या एका उस्ताद कवीचे शेर पाहू:

नंग-हिम्मत है अगर दौलते कौनेन मिले
जो न पूरा हो किसीसे वो सवाल अच्छा है

बागे-आलममे कोई खाक फलेफुलेगा
बर्क गिरती है उसीपर जो निहाल अच्छा है

आप पछताये नही, जोरसे तौबा न करे
आप घबराये नही 'दाग' का हाल अच्छा है

- उस्ताद दाग देहलवी (१८३१ ते १९०५)

(जगातील सगळी दौलत मिळणे लांच्छनास्पद आहे, कोनीच पूर्ण करू शकत नाही अशी एक इच्छा असणे चांगले असते)

(ह्या बागेत थोडीच फळेफुले उगवणार? येथे तर नेमक्या त्याच रोपावर - झाडावर - वीज पडते जे चांगले आहे)

(तुम्ही पस्तावू नका, केल्या चुकांसाठी तौबा करू नका, तुम्ही घाबरू नका, दागची तब्येत बरी आहे)

आता मजा बघा! गालिब ची शेवटची अडतीस आणि दागची पहिली अडतीस वर्षे एकाच कालावधीत व साधारण एकाच भूप्रदेशात! दोघांची ख्याती एकमेकांपर्यंत नुसती पोचलेली नाही तर दोघांनी अनेक मुशायरे सोबतच गाजवलेले! त्यामुळे एका ठिकाणी असा संदर्भही आहे की वरील दोन्ही गझलांची जमीन तरही गझलचा मिसरा (एक ओळ) म्हणून दिली गेली होती आणि त्यावर दोघांनी वरीलप्रमाणे आपापल्या गझला रचल्या. (पण मग इतर कोणत्या समकालीन शायराची ह्या जमीनीतील गझल का आढळत नाही ते समजले नाही).

पण आज? आज जर एखाद्या वाचकाने योगायोगाने दोन्ही गझला वाचल्या तर त्यातून काय काय विचार मनात येण्याच्या शक्यता आहेत?

१. दोघांपैकी एकाने दुसर्‍याची कल्पना उचललेली आहे
२. एकापेक्षा दुसरा अधिक चांगले लिहितो पण तो मूळ लिहितो की कॉपी करतो ते माहीत नाही
३. पूर्वी गझलकारांमध्ये इतकी तीव्र स्पर्धा असायची एकसारखेच लिहून दोघे रसिकांना जिंकायला बघायचे
४. दोघांनीही कोणा तिसर्‍याच्याच गझलेवरून आपापल्या गझला रचलेल्या आहेत.

असे काय काय व इतरही काही! अर्थातच, दोन्ही गझलांपैकी गालिबची गझल (मत्ला व मक्ता धरून एकुण १० शेर) ही दागच्या गझलेपेक्षा (मत्ला व मक्ता धरून एकुण ९ शेर) खूपच उजवी आहे.

आता गझलेची जमीन म्हणजे काय ते पाहू:

गझलच्या सर्व ओळी एकाच वृत्तात असतात. दोन सुपरिचित ओळी उदाहरणार्थ घेऊ:

तुम इतना जो मुस्कुरारहे हो (लगा लगागा लगा लगागा)
क्या गम है जिसको छुपारहे हो (लगा लगागा लगा लगागा)
क्या हाल है क्या दिखारहे हो (लगा लगागा लगा लगागा)

ह्या ओळी पाहिल्या तर शेवटचे अक्षर 'हो' हे कॉमन अक्षर आहे हे तर लक्षात येईलच पण ते मुस्कुरारहे, छुपारहे, दिखारहे ह्या शब्दांचा भाग नसून वेगळे अक्षर आहे हेही समजेल. ती रदीफ आहे. त्याचप्रमाणे मुस्कुरारहे, छुपारहे, दिखारहे हे काफिये आहेत. (गझलेत दोन यमके असू शकतात, काफिया हे पहिले यमक व रदीफ हे अंत्ययमक किंवा दुसरे यमक)! त्याचप्रमाणे मुस्कुरा, छुपा, दिखा ह्या शब्दांंमधील शेवटचा 'आ' हा स्वर ही त्या गझलेची अलामत आहे. (अलामत = स्वरचिन्ह)!

तर जमीन म्हणजे:

वृत्त (लगा लगागा लगा लगागा)) + काफिया (मुस्कुरारहे, छुपारहे, दिखारहे) + (अलामत = आ) + रदीफ (हो)

ह्या सर्वांचे काँबिनेशन!

हे असेच्या असे काँबिनेशन जो कोण वापरेल तो नेमकी वरच्या गझलेसारखीच गझल रचेल. त्याची गझलही त्याच चालीत, त्याच लयीत, त्याच ठेक्यात म्हणता येईल.

आता गंमत अशी आहे की कोणाला काय सुचेल ह्यावर कोणी नियंत्रण ठेवूच शकत नाही. अजिबात मनात नसतानाही एखाद्याला दुसर्‍याची जमीन अगदी जशीच्यातशी सुचू शकते व ती त्याला नैसर्गीकपणे सुचली आहे ह्या त्याच्या दाव्याचा प्रतिवादही करता येणे शक्य नसते.

आपल्याला सुचलेल्या जमीनीचे आपण पेटंट घेऊ शकत नाही की ती कोठे रजिस्टर करू शकत नाही. तिला प्रताधिकार कायदा लागू होऊ शकत नाही. दुसर्‍याला तीच जमीन सुचणे नैसर्गीक होते की अनुकरण हे सिद्ध करू शकत नाही. त्यात पुन्हा इंटरनेट आणि फेसबूकच्या युगात तर आपण लिहिलेली कोणती गझल कोठे, कोणाच्या नावाने आणि कोणत्या स्वरुपात पोचेल हेही सांगता येत नाही. त्यामुळे अलाहाबादला राहणार्‍या एखाद्या मराठी माणसाने त्याच जमीनीत दुसरी गझल रचली तर कोणी आता हेही म्हणू शकत नाही की एक कवी पुण्यात आणि दुसरा अलाहाबादला असतो, चोरी होईलच कशी?

पण मग जर कोणताच कायदा, कोणताच दावा, कोणताच ताशेरा ह्या प्रकाराला आळा घालू शकत नसेल किंवा ह्या प्रकाराचा पुरेसा प्रतिवाद करू शकत नसेल तर ही गझलेची जमीन नावाची कटकट गझलकाराला एवढी पझेसिव्ह का बनवते?

हे समजून घेण्यापूर्वी आणखीन एक मजेशीर उदाहरणः

एका उर्दू शायराचा जन्म आणि मृत्यू - १९२८ ते १९७४
दुसर्‍या उर्दू शायराचा जन्म आणि मृत्यू - १९०५ - (मृत्यूचे साल मिळाले नाही)

पहिल्या शायराचे नांव - मुहम्मद अख्तर
दुसर्‍या शायराचे नांव - मुहम्मद समद यार खाँ

पहिल्या शायराचे तखल्लुस (उपनाम) - 'सागर'
दुसर्‍या शायराचे तखल्लुस (उपनाम) - 'सागर'

पहिल्या शायराला म्हणायचे - सागर सिद्दीकी
दुसर्‍या शायराला म्हणायचे - सागर निजामी

आता काय करणार?

बरं ह्यांच्या गझलाही बघा:

मुहम्मद अख्तर 'सागर'चा मत्ला:

है दुवा याद मगर हर्फे-दुवा याद नही
मेरे नगमातको अंदाजे नवाँ याद नही

मुहम्मद समद यार खाँ 'सागर'चा मत्ला:

दश्तमे कैस नही, कोहपे फरहाद नही
है वहीं ईश्ककी दुनिया मगर आबाद नही

(वृत्त तेच, अलामत तीच, पहिल्याची रदीफ 'याद नही' आणि दुसर्‍याची रदीफ 'नही'. पहिल्याचे काफिये 'आ'कारान्त स्वरकाफिये तर दुसर्‍याचे आबाद, बरबाद असे)

(म्हणजे कानाला तर एकच गझल ऐकल्यासारखे वाटणार, जमीनीत तर फरक आहे, पण म्हणावा तितका खणखणीत फरकही नाही).

आता ह्याच गझलांचे मक्ते पाहा:

मुहम्मद अख्तर 'सागर'चा मक्ता:

आओ इक सज्दा करे आलमे मदहोशीमें
लोग कहते है के सागरको खुदा याद नही

मुहम्मद समद यार खाँ 'सागर'चा मक्ता:

लाओ! इक सज्दा करूं आलमे मदहोशीमे
लोग कहते है के सागरको खुदा याद नही

एकाच पुस्तकात ह्या दोन गझला पाठोपाठ छापल्या गेल्या आहेत कारण त्या पुस्तकात शायरांची नावे अल्फाबेटिकली घेतली गेली आहेत. मला तर वाटते की हा एकच शायर असावा बहुधा! पण दोन असले तर? त्यांचा बराचसा आयुष्यकाळही कॉमन असेल! १९०० नंतरचा काळ असल्याने एकमेकांना ते माहीतही झालेले असणारच!

दोघेही एकच असले तर काही प्रश्नच नाही.

आता जर एकाच्या समोर दुसर्‍याने रचलेली समान जमीनीतील गझल आली तर हृदयातून एक कळ जाणे, एक आवंढा गिळणे, उचकी लागणे असे अनेक प्रकार होऊ शकतात. कारण जमीन निर्माण करताना प्रसूतीवेदनांसारख्या वेदना होतात आणि जमीन निर्माण झाल्यानंतर अपत्याप्राप्तीचा आनंद होतो.

गझलेची जमीन ही अशी बाब असते जी गझलेला इतर सर्व काव्यप्रकारांपासून पूर्णतः वेगळे ठरवते. इतर बहुतांशी काव्यप्रकारांमध्ये आधी आशय आणि मग तो शब्दबद्ध करणे असाच क्रम असतो. पण गझलेच्या जमीनीत, थोडक्यात ताजाताजा गझला निर्माण करणार्‍या साच्यात अशी अद्भूत ताकद असते की ती कवीला चक्क नवनवे खयालच सुचवून जाते. माझ्या मनातील अनुभुतींना शब्दात बसवणे हे काम मी इतर कविता रचताना करतो, पण गझल रचताना कित्येकदा सुचलेल्या ओळींमध्ये माझ्या अनुभुती प्रामाणिकपणे आणि शक्य तितक्या सहजतेने बसवण्याचे गोड आव्हान पार पाडावे लागते. ह्या ओळी कोण सुचवते? तर मतल्यात किंवा एखाद्या शेरात तयार झालेली गझलेची जमीन! आपण आपल्या अपत्याप्रमाणेच ह्या जमीनीत उत्तमोत्तम खयाल पेरतो आणि ते कसकसे अधिक देखणेपणाने, अर्थपूर्णपणे उगवतील हे पाहतो. वरवर वाचताना हे विचित्र वाटेल की आधी साचा आणि मग आशय? पण हेच तर प्रमुख आव्हान आहे. अश्या अश्या विचारांना शब्दबद्ध करा म्हंटल्यावर कोणीही सोम्यागोम्या करू 'धजेल', पण अश्याअश्या साच्यात विचार शब्दबद्ध करा म्हंटल्यावर मनातच गुणगुणणे, जगात लक्ष न लागणे, निराळीच धुंद येणे, यशापशांचे हेलकावे सोसणे असे सगळे सुरू होते. आणि एखादा शेर परीपूर्ण झाला की होणारा आनंद अवर्णनीय असतो.

एक वेगळी माहिती म्हणून, गझलकार खरे तर गझल न रचणार्‍या कवींना कधीच कमी मानत नसतात, पण ते तसे मानतात असे बाकीचे मात्र मानतात. पण असे का मानले जाते? त्याचेही कारण गझलेची जमीनच असते. अत्यंत कडक अटींचे पालन करून आपले खयाल अजिबात वृत्तानुसारी वाटणार नाहीत अश्या नैसर्गीक प्रवाहीपणे गझलेत मांडणे ह्यासाठी जे कसब असते तेच कसब तर मिळवण्यात बाकीचे अनेक कवी अपयशी ठरलेले असतात,.जो खरी गझल रचतो त्याला 'आपण गझल रचतो' ह्याचा दुराभिमान नसतोच, पण जो रचू शकत नाही त्याला मात्र जो रचू शकतो त्याला दुराभिमान असेल असे वाटत राहते. हा प्रकार गझलेच्या जमीनीमुळे घडतो.

आता एकाच व्यासपीठावर बिनदिक्कतपणे दुसर्‍यांच्या गझलांच्या जमीनी अगदी सहज लक्षात येईल ह्याप्रमाणे स्वतः वापरताना, वर म्हंटल्याप्रमाणे, कोणीच प्रताधिकार कायदा लागू करू शकत नाही. पण जो माणूस असली, सच्चा गझलकार असतो, तो मुळात अतिशय दिलदार असावा लागतो. त्याच्यात नैसर्गीकरीत्याच ही वृत्ती असावी लागते जिच्यामुळे तो स्वतः आधी घोषित करेल की 'मला ह्यांच्या ह्या ह्या जमीनीत थोडे स्फुरले आहे, म्हणून त्यांची क्षमा मागून मी माझे धाडस सादर करतो'. ही एकमेकांना दिली जाणारी अदब, हा उर्दूचा थाट मराठीने नाहीच स्वीकारला. आपण धन्यता मानतो 'जमीनीवर कोनाची मालकी थोडीच असते' असे ठणकावून म्हणण्यात!

ह्या लेखाद्वारे कोणावरच वैयक्तीक टीका करायचा मुळीच हेतू नाही. पण मराठीने उर्दूची ती अदब स्वीकारली तर किती माहौल बनेल नाही गझलेचा?

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे लिहिताना एक चुकले ते म्हणजे मला संगीतकार म्हणायचे होते व मी गीतकार म्हणून गेलो.

पण तरीही वृत्ताला जमीन म्हणणे किंवा तुलना म्हणून रागाला जमीन म्हणणे हे चूक आहे.

वृत्त हे निव्वळ तांत्रिक आहे. जमीनीमध्ये तंत्र व मंत्र दोन्ही येतात. तसेच राग निव्वळ तांत्रिक आहे, चालीत तंत्र व मंत्र दोन्ही येतात.

जगात वेगवेगळ्या दोन ठिकाणी एकाच प्रकारचा शोध लागू शकतो.अगदी एकसारखा विचार, ओळ, जमीन सुचणे शक्य आहे.कधी कधी आपापल्या आवडत्या लेखक,कवी,गझलकार यांचा नवीन लोकांवर प्रभाव असू शकतो. क्वचित वेळा एखाद्या थोर व्यक्तीची ओळ जशीच्या तशी लिखाणात येऊ शकते.पण हे अजाणतेपणी घडते. कवयित्री शांताबाई शेळके यांनी सदर प्रकारास 'स्मृतीयोजन' असा शब्द वापरला आहे.

बेफिजी धन्यवाद , लेख आवडला !

एकच शोध जगात वेगवेगळ्या दोन ठिकाणी एकाच वेळी लागू शकतो.एकच विचार ,ओळ, जमीन दोन वेगळ्या व्यक्तींना सुचू शकते.काही वेळा नवीन लोकांवर त्यांच्या आवडत्या कवी लेखक गझलकाराचा प्रभाव असतो. अशा थोर व्यक्तीची एखादी ओळ जशीच्या तशी नवीन लोकांच्या लिखाणात येऊ शकते; पण हे अजाणतेपणी घडते. या प्रकारास कवयित्री शांताबाई शेळके यांनी 'स्मृतीयोजन' असा शब्द वापरला आहे!

धन्यवाद बेफिजी, एक चांगला लेख !

Pages