अस्थी कृषीवलांच्या

Submitted by अभय आर्वीकर on 11 June, 2014 - 09:10

अस्थी कृषीवलांच्या

पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे

होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे

माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे

देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे

रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?

धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे

अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला
करतात आत्महत्त्या का देश पोसणारे?

मस्तीत चालतो मी तुडवीत कूप-काट्या
करतील आमरस्ता मागून चालणारे

देतो 'अभय' कशाला भगवंत या पिलांना
शेतीस काळ ठरती, शेतीत जन्मणारे

                              - गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मा. पंतप्रधान मोदींचे आजचे संसदेतील भाषण ऐकले.

अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला
करतात आत्महत्त्या का देश पोसणारे?

या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही, हे मला अपेक्षितच होते. शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.

मात्र

शेती सोडून अन्य बर्‍याच क्षेत्रांना ’अच्छे’ दिवस येतील, याची झलक त्यांच्या भाषणात जाणवली. विकासाचा मुद्दा आणि सामोपचाराने निर्णय घेऊन धोरण राबवायचे हा त्यांचा मुद्दा अत्यंत प्रामाणिक आणि देशहितासाठी प्रगल्भ राजकारण कसे असू शकते, हे अधोरेखित करणारा होता. आजचे त्यांचे भाषण अनेक क्षेत्रात क्रांतीकरक बदल घडवून आणणे शक्य आहे, याची ग्वाही देणारे आणि राष्ट्रासमोर सकारात्मक आशादायी चित्र निर्माण करणारे आहे. शिक्षण क्षेत्राविषयीचा त्यांचा मुद्दा ऐकताना माझ्या "वांगे अमर रहे" पुस्तकातील "प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती" या लेखाची आठवण झाली.

बर्‍याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला
आणि
या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे.

- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------

4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या ४ महिन्यांच्या कालावधीत ५५९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली..

विधानपरिषदेत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या मदतीवर चर्चा होती. त्याला उत्तर देताना पतंगराव कदम यांनी ही आकडेवारी जाहीर केली.

हे सर्व शासकिय धोरणाचे बळी आहेत, म्हणून शेतकरी आत्महत्त्यांना शासकियबळीच म्हटले गेले पाहिजे.

4 महिन्यात 559 शेतक-यांनी आत्महत्या केल्या असतील तर दिवसाला जवळपास तीन शेतक-यांनी आपले प्राण गमावलेत असा त्याचा अर्थ पण ...

पण ही समस्या इतकी थोडी गंभीर आहे कि,.......

- देश हादरून जावा,
किंवा
- सभ्य आणि सुशिक्षित समाजाला लांच्छनास्पद वाटून त्यांच्या माना खाली जाव्यात,
किंवा
- मुख्यमंत्र्यांची झोपमोड व्हावी,
किंवा
- पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू यावेत......

अरे! यह करोडोका देश है. इस विशाल जनसंख्यावाले देश मे ५५९ का आकडा क्या मायने रखता है?
चलो, इस बहाने आबादी तो घट रही है!
.
.
है ना दोस्तो??????????
-----------------------------------------------------------------------------

"धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे"

खूप सुंदर शेर, अगदी भारत देश्याचे वास्तव मांडतो, मोदी साहेब या वास्तवा कडे दुर्लक्ष करून देश पुढे न्हेण्याचे स्वप्न पहात आहेत. कालच्या त्यांच्या भाषणावरून तरी तसेच वाटते आहे. मुटेजी फार सुंदर , अभिनन्दन. शुभेछ्या ! पूर्ण गझल आवडली.

मुटेजी - शेतकर्‍यांना समस्या आहेत हे मान्य, पण देशातल्या दुसर्‍या वर्गांना समस्या नाहित असे तुम्हाला वाटते का?

अनेक कोटी बेरोजगार लोक आहेत, त्यांना ना रहायला घर ना कसायला जमिन.

टोच्या,
समस्या सर्वांसमोरच असतात. त्या सुटायसाठी प्रयत्न व्हायलाच हवे. पण इतरांनाही समस्या आहे असे स्वतःला समजाऊन शेतकर्‍यांनी सुद्धा दारिद्रातच आणि आत्महत्त्या करतच राहिले पाहिजे, असे नाही.

त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न होत नाहीत, हीच मोठी समस्या ठरत आहे.

दिनांक १९/१०/२०१२

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने २०११ सालच्या शेतकरी आत्महत्येची अलीकडेच आकडेवारी जाहीर करताना देशभरात १४ हजार ४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ३३३७ शेतक र्‍यांनी मृत्यूस कवटाळल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली असली तरी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटनांत घट झाल्याचे विधान करून या आकडेवारीला शह दिल्याने आकडेवारीच्या नेमक्या सत्यतेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी हा आकडा ३१४१ एवढा होता. आत्महत्याग्रस्त महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतक र्‍यांची संख्या जवळजवळ ७० टक्के आहे.
महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक र्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने संसदेच्या मागील पावसाळी अधिवेशनात १९९५ ते २०११ या कालखंडादरम्यान देशभरात २ लाख ९० हजार ७४० शेतकरी आत्महत्या झाल्याची आकडेवारी सादर केली आहे. दिवाळखोरी किंवा आर्थिक चणचण आणि दारिद्रय़ या कारणांनी या आत्महत्या झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

--------------------------------------------------------------------
आत्महत्या असो की दुर्घटना, सरकारी मृतांचा आकडा हा वास्तवापेक्षा १/३ ने तरी कमीच असतो.
.
त्या हिशेबाने हा आकडा किमान ५ ते ६ लाखाच्या घरात असू शकतो.
---------------------------------------------------------------------