प्रत्येक वेळी मीच का म्हणून माघार घ्यायची ?

Submitted by सौ. वंदना बर्वे on 23 November, 2012 - 21:39

"प्रत्येक वेळी मीच का म्हणून माघार घ्यायची"
मोबाइलमधून जो तारस्वरात प्रश्न आला तो मेंदू भेदून ह्या कानापासून त्या कानापर्यंत झिणझिणला. विचारणारी अर्थातच माझी मैत्रिण पार्वती. "सखी पार्वती अंबिके" मधली नव्हे. ही आधुनिक युगातील पार्वती. खात्यापित्याघरची देहयष्टी. देहयष्टीला साजेसाच निसर्गदत्त खणखणीत आवाज. चिडली की तो मूळ आवाजाच्या कितीपट होइल हे काय घडलय ह्यावर अवलंबून असतं.

अगदी लहानपणापासून पार्वतीची व माझी ओळख. सत्य बोलणे, चालणे वागणे हे अगदी बालवयातच अंगिकारलेले गूण. त्यामुळे अनेकदा तिची त्रेधातिरपीट व्हायची. तिच्याबरोबरीनं इतरांचीदेखिल. माझ्या माहेराशेजारीच तिच्या आत्त्याचं घर. ती तिथं सुट्टीत यायची. तिथून आमची ओळख. आजतागायत आमची प्रचंड मैत्री टिकून आहे. मैत्रीला दिलेलं हे विशेषणदेखिल तिचच आहे. आम्ही खूप खेळायचो, भांडायचो, नाचायचो, हसायचो. बालपण फुलपाखरासारखं होतं. फुलपाखरासारखच उडूनही गेलं. राहता राहीले आठवणींचे रंग. हेच निरागस रंग घेवून पुढचं आयुष्य रंगवता आलं असतं तर? पण आयुष्याच्या कॅनव्हासवर ते काही केल्या चढतही नाहीत अन टिकतही नाहीत. बालपणीच्या रंगांची जागा फक्त अंतरंगात.

आज काल प्रत्येक गोष्ट बाटलीबंद होतेय. तुळस, काटेकौर ही घराच्या पुढे मागे असणारी, आता साहेबी नावं धारण करून बाटलीत जावून बसली आहेत. आंबा हा आंब्याच्या मोसमातच खाण्यात जी गंमत आहे ती बाटलीतून पिण्यात नाही. लहानपणी आम्ही यथेच्छ आंबे खायचो. आमचे कपडेदेखील. मला आठवतय, एक दिवस आमच्या यथेच्छ खादाणपणामुळे आम्हा मुलींना आंबे दिले नव्हते. त्याच दिवशी कुणीतरी आंबे खावून साली वाटेवरच टाकल्या होत्या. पार्वतीच्या आत्त्याबाई भडकल्या.

"चोरून आंबे खाता आणि साली वाटेवरच टाकता? उचला आधी"
मी घाबरट लगेच साली गोळा करायला गेले. आत्तेने पार्वतीकडे पाहिले. पार्वती ढिम्म हलली नाही.
"तू काढ ना" आते पुन्हा गरजली.
"मी आंबा खाल्ला नाही, मी साली काढणार नाही" पार्वतीचं खणखणीत उत्तर.
"बाईच्या जातीला असं वागून चालत नाही. आंबे कुणीही खाल्ले साली कुणीही टाकल्या तरी उचलायच्या बायकानीच"
पार्वती जागची हलली नाही, सालीही काढल्या नाहीत. एव्हाना माझ्या साली काढून बादलीत टाकून झाल्या होत्या.

आम्हा दोघीनाही हे "बाईची जात" प्रकरण तेंव्हाही समजलं नव्हतं आणि आजतागायत समजलही नाही. गंमत म्हणजे "बाईची जात" शिकविणारी बाईच असते. मग ती आई असो वा सासू. एक पाठीवरून मायेने हात फिरवून शिकवते तर दुसरी हिणकस तुसडेपणाने. शिकवण्याच्या पध्दतीत फरक होतो, शिक्षणात नाही. कायम पडतं घ्यायचं. नवरा चूक असला तरी किंवा नसला तरी. स्त्रीने कसे वागावे ह्याचे परिपाठ सगळीकडे घालून दिलेले असतात. कसं बोलावं, कसं चालावं, कसं वागावं. निर्बंध काय ते फक्त स्त्रीलाच. लहानपणापासून हेच बिंबवलं जातं, तुला सासरी जायचय, संसार करायचाय. आधीच्या काळी एकवेळ ठीक असेल. जेंव्हा सगळं घर स्त्रीवर चालायचं व पुरुषाचा संबंध "कमावून आणणे" ह्यापलिकडे संसारात अपेक्षित नसायचा तेंव्हा हे असं शिकवणं योग्य होतं. आता सर्वार्थाने चूक आहे अशातलाही भाग नाही.

आज स्त्री पुरुषाच्या बरोबरीने संसाराचा भार उचलते. पुरुषापेक्षा काकणभर अधिकच. आजच्या काळात स्त्रीबरोबर पुरुषालादेखिल लहानपणापासूनच संसारात घरात, त्याच्या बदलत्या स्वरूपाची जाणीव नको करून द्यायला? पार्वतीचे यजमान शंकरराव तर विचारायलाच नको. ही माहेरी चार दिवस गेली तर मोजून आठ वेगवेगळ्या लहान मोठ्या पातेल्यात महाराजांनी चहा करून घेतला होता. तेच चहाचं भांडं धुवून घ्यायचं. पण नाही. सगळ्या पातेल्यांची रास मोरीत पार्वतीची वाट बघत उतू जात होती. त्यात त्यांचीही चूक नाही म्हणा. त्याच्या लहानपणी पुन्हा आई नावाची स्त्रीच शिकवते तू चहा पिलेला कप जिथे पिउन झालं तिथेच ठेवायचा. धुणं विसळणं बाजूलाच. ते बायकांचं काम, तू पुरुष आहेस. मुलीच्या बरोबरीने मुलाला घरकाम शिकवायला हवं. पुरुषाने घरात स्त्रीला मदत करण्यात कसली आली आहे लाज? बाईची जात, बाईची जात म्हणत बाईच पुरुषाचा अहंकार जन्माला घालते, वाढवते, पोसते आणि जोपासतेदेखिल.

पार्वती आणि शंकर ह्यांचं भांडण तसं क्षुल्लक कारणावरूनच झालं होतं. नवीन फ्लॅट घेतला होता. त्याच्यासाठी सामानखरेदी करायला जाण्यासाठी पार्वती गेला आठवडा मागे लागली होती. वेळ नाही हे कारण पुढे करून शंकररावानी टाळलं. त्याच दरम्यान मित्रांनी फिरायला बोलावलं. लगेच त्यांची विनंती मान्य करून शंकरराव तीन दिवस फिरून आले. आपल्या संसारासाठी द्यायाला वेळ नाही रिकामटेकड्या मित्रांसोबत फिरायला वेळ आहे हे भांडणाचं मूळ कारण. प्रकरण बरच तापलं होतं. इतक्या खेपा तडजोडीनं घेणारी पार्वती आता मात्र बिथरली होती. कायम आपणच नमतं घ्यायचं. एकदा तरी त्यालाही समजू दे. अशा भावनेने तिने अबोला धरला होता.

एक आठवडा दोघही एकमेकांशी अजिबात बोलली नाहीत. पार्वतीला त्यानं आपलं चुकलं म्हणावं असं वाटायचं व त्यावर ती अडून बसली होती. तिचा कर्णभेदक, मेंदूभेदक प्रश्न मला गुंग करून गेला. मी भानावर येइपर्यंत मधले तिचे शब्द पोचलेच नाहीत. कानावर फक्त आवाज आदळत होता.

"आता बाईच्या जातीवरून पकवू नकोस" पार्वती पुन्हा ठणाणली.
"तुझा इतका त्रागा का चाललाय? त्याच्याशी न बोलून त्रास तुलाच होतोय ना?"
ती गप्प. बहुतेक मी दुखरी नस बरोब्बर पकडली होती.
"अबोला धरून, दूर जावून स्वत:ला त्रास करून घेण्याऐवजी बोलावं सरळ. जसा तुला त्रास होतोय तसाच, किंबहूना जास्त त्रास त्याला होत नसेल का? नवरा बायकोच्या नात्यात हे असे प्रसंग यायचेच. ते फार ताणू नयेत. बोलावं कुणी, माघार कुणी घ्यावी ह्याला अवास्तव महत्व आपापला अहंकारच देतो. जसं रागावून त्याला त्याची चूक दाखवता येते तशीच प्रेमानेही दाखवता आली पाहिजे. वादातून संवादाकडे जाता आलं पाहिजे. वादाने विसंवाद वाढता कामा नये. नवरा बायको हे जगात पहिलं व शेवटचं नातं असं आहे ज्यात परस्पर विरोधी घटक एकमेकात विरघळतात. पार्वती, प्रश्न माघार कुणी घ्यायची हा नसून दोन पावलं पुढे कुणी जायचं हा आहे. कुणीही माघार न घेणं किंवा दोन पावलं पुढं न सरकणं म्हणजे एकाच घरात अनेक त्रिकोण निर्माण करणं आहे."
"वंदना, तुला असं नाही वाटत, कायम मीच पडतं घेतल्याने मी गृहीत धरली जातेय. त्याला सवयच होतेय. आपण काहीही केलं तरी, कसाही वागलो तरीही बायको काहीही करू शकणार नाही. रागावेल चार दिवस, अबोला धरेल. पाचव्या दिवशी येइल पायाकडे. संसार टिकवणं ही त्याची जवाबदारी नाहिये का?"
"जवाबदारी तर दोघांचीही आहे. भांडण होणे हेच तर निकोप संसाराचं लक्षण आहे. भांड खूप भांड. पण मिटवदेखिल. त्याला तू रागावली आहेस, तो चुकलाय ह्याची जाणीव होणं महत्वाचं आहे. एकदा ती झाली की मग तू त्याचाशी असलेला अबोला संपवणे हे माघार घेणे होत नाही. उलट ते तुझ्यातल्या समंजस, प्रगल्भ व्यक्तिमत्वाचच प्रकट दर्शन होतं."
ती पुन्हा गप्प झाली. तिला पटलं असावं. खरच असं माघार घेणं, माघार घेणं असतं?
तुम्हाला काय वाटतं?

सौ. वंदना बर्वे,
वेळगे - गोवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचले. वाईट वाटले. companionship, love या सारख्या शब्दांचा खरा अर्थ सगळयाना नीट कळायला हवा. btw, तुमची शब्दसंपत्ती आवडली.

पुरुषांऐवजी हॅवेल्स अ‍ॅप्लायन्सेसशी लग्न करा म्हणाव आता बायकांना! रिस्पेक्टच रिस्पेक्ट!

त्या व्यक्तीने पड खावी ज्या व्यक्तीला अबोल्याने त्रास होतो आणी तो पचत नाही किंवा तत्सम.

प्रगल्भता ही relative आहे. आपण ज्या frame of reference मधून बघतो अशी आपल्याला दिसते.

मुळात लग्न झाल्यावर नाव आडनाव आणि सौ इत्यादी लावून आपलं मूळ अस्तित्व मिटवून टाकायला मान्यता का द्यावी?

हा लेखिकेला वैयक्तिक प्रश्न नाही आहे पण हा माझ्या आजूबाजूच्या सर्वांनाच प्रश्न आहे.

Like

पुरुषांऐवजी हॅवेल्स अ‍ॅप्लायन्सेसशी लग्न करा म्हणाव आता बायकांना! रिस्पेक्टच रिस्पेक्ट!>>>म्हणजे पुरुषानी स्त्रीयाना रिस्पेक्ट द्यावा हे मान्य नाही का तुम्हाला? Wink

>>>> त्याला तू रागावली आहेस, तो चुकलाय ह्याची जाणीव होणं महत्वाचं आहे. एकदा ती झाली की मग तू त्याचाशी असलेला अबोला संपवणे हे माघार घेणे होत नाही. उलट ते तुझ्यातल्या समंजस, प्रगल्भ व्यक्तिमत्वाचच प्रकट दर्शन होतं."
ती पुन्हा गप्प झाली. तिला पटलं असावं. खरच असं माघार घेणं, माघार घेणं असतं? <<<<

कोणत्याही नात्यात, समोरच्याला शिक्षा व्हावी, अद्दल घडावी हा हेतू असेल, तर अशी माघार घेणे अशक्य असते. पण मूळ हेतूच शिक्षा/अद्द्ल हा नसेल, तर माघार सहजासहजी होते. Happy कदाचित त्यालाच (शिक्षा/अद्दलीचा हेतू नसण्याला) (नात्यानात्यातील) प्रेमाचे बंधन म्हणत असावेत.
अन अशा या माघार घेण्यात लेखात दर्शविला आहे तसा "स्त्रीपुरुषभेद" नसावा.
अन तरीही जर भेद मानायचा असेल तर तिथे "प्रेमच" नसावं असे मानण्यास जागा आहे.
(कारण पुरुष घेत असलेल्या माघारीबद्दल इतक्या अचूकपणे लिहिणारा लेखकु विरळाच). असो.

दुर्योधन कानतोडे नुकतेच फेसबुकवरुन इकडे आलेले दिसतात.
लाईक चे बटन सापडले नाही म्हणुन लाईक लाईक असं टाईप करत आहेत.
अनुमोदन तरी लिहा.

दुर्योधनाचे कान तोडून आले का हे आणि कशाबद्दल स्वतः दुर्योधनासारखंच लिहित आहेत. ह्यांचा आयडी मी दुर्योधन असा हवा होता.

उत्तम लेख.. पण "कायम मीच पडतं घेतल्याने मी गृहीत धरली जातेय. त्याला सवयच होतेय. आपण काहीही केलं तरी, कसाही वागलो तरीही..." हा प्रश्न खरोखरीच अवघड आहे सोडवायला...

आज स्त्री पुरुषाच्या बरोबरीने संसाराचा भार उचलते. पुरुषापेक्षा काकणभर अधिकच. आजच्या काळात स्त्रीबरोबर पुरुषालादेखिल लहानपणापासूनच संसारात घरात, त्याच्या बदलत्या स्वरूपाची जाणीव नको करून द्यायला? >>>>>> वंदना ताई , तुमचे हे म्हणने अजिबातच पटले नाहि.

आज स्त्री पुरुषाच्या बरोबरीने संसाराचा भार उचलते. पुरुषापेक्षा काकणभर अधिकच. आजच्या काळात स्त्रीबरोबर पुरुषालादेखिल लहानपणापासूनच संसारात घरात, त्याच्या बदलत्या स्वरूपाची जाणीव नको करून द्यायला?>> हे तुमचे म्हणणे अगदी पूर्णपणे पटले.

आज स्त्री पुरुषाच्या बरोबरीने संसाराचा भार उचलते. पुरुषापेक्षा काकणभर अधिकच. आजच्या काळात स्त्रीबरोबर पुरुषालादेखिल लहानपणापासूनच संसारात घरात, त्याच्या बदलत्या स्वरूपाची जाणीव नको करून द्यायला?>> हे तुमचे म्हणणे अगदी पूर्णपणे पटले. >>>>> वेल, नुसते पटवुन काय घेतेस तस वागायला शिक आधि.

.

हिंबो भाऊ - तुम्ही मला असे कितीसे ओळखता तुम्हाला माझ्याबद्दल कितीसे माहित आहे की तुम्ही माझ्यावर अशी पर्सनल कमेंट करावी? आता भाऊ म्हटले म्हणून लगेच तुम्हाला मला काहीही बोलायचा अधिकार मिळेल असे समजू नका.

वर लिहिलेला प्रतिसाद मी लेखामधल्या एका वाक्यावर लिहिला आहे. तुमच्यावर पर्सनल कमेंट केलेली नाही. तेव्हा ह्या पहिल्या आणि शेवटच्या पर्सनल कमेंट बद्दल तुमचे आभार. कळावे, वर ठेवलात तसा लोभ असू नये ही विनंती.