कचर्‍यातून फुलवा बगीचा व करा नंदनवन - अर्थात जैविक बगीचा (बायो कल्चर)

Submitted by प्रमोद् ताम्बे on 13 April, 2014 - 01:46

कचर्‍यातून फुलवा बगीचा व करा नंदनवन - अर्थात जैविक बगीचा (बायो कल्चर)
 एरियल व्हयू xxx.jpg
ग्लोबल वार्मिंगच्या विनाशकारी प्रलय संकटापासून समस्त मानवजातीला वाचवण्यासाठी जगभर चालू असलेल्या “ वसुंधरा बचाव “ चळवळीत सहभागी होऊन पर्यावरणास पूरक असा आम्ही चालू केलेला आणखी एक अभिनव उपक्रम म्हणजे आमच्या घरातील रोजचा निर्माण होणारा ओला कचरा ( शिळे किंवा खराब झालेले अन्न व भाजीपल्याचा टाकाऊ भाग) महानगरपालिकेच्या कचाकुंडीत न टाकता त्याचा पुर्नवापर करून पर्यावरणास हातभार लागावा या उद्देशाने आम्ही नोव्हेंबर २००९ पासून आमच्या जुन्या घराच्या १४ फूट x १०फूट आकाराच्या गच्चीत, बायो-कल्चर निर्मिती म्हणजेच जैविक बगीचा फुलवला असून ओल्या कचर्यारपासून (ह्यामध्ये निर्माल्य,फळांच्या साली व बिया,चहाचा चोथा,कोथिंबीर,पालक,शेपू, मेथी, चाकवत, अंबाडी,माठ,चुका, मुळा,करडई इत्यादि पालेभाज्यांची देठे,शिळे,खरकटे वा आंबलेले अन्न,टाकाऊ धान्य व पोरकिडे झालेले धान्य, कोंडा,बुरशी आलेला पाव, मटाराच्यासाली, बिरड्यांचीसाले, कलिंगड, फणस,केळी,आंबा,संत्रे, मोसंबी, लिंबू इत्यादि फळांच्या साली,मटन व चिकनची हाडे,केसांचे गुंतवळ, नखे,खराब काळा गूळ इत्यादि जैविक विघटन होणारे काहीही ) या बगीच्यात आत्तापर्यंत आम्ही आंबा,पेरु,चिक्कू, डाळिंब, अंजीर,पपई,केळी,लिंबू इत्यादी) विविध प्रकारची फळझाडे लावली असून (वर्षाच्या आत त्यांचे नियमित उत्पादनही सुरू झाले आहे.तसेच आम्ही बागेत भाजीपाला (वांगी,टोमॅटो,पालक,मेथी,कोथिंबीर,पुदिना,अळू,शेवगा, हादगा, मिरच्या,कार्ली, गवतीचहा, भेंडी, ओवा)लावला असून त्याचेही नियमीत उत्पादन चालू झाले आहे. याखेरीज या जैविक मातीविरहित बागेत आम्ही फुलझाडे(अबोली,मोगरा,गुलाब,शेवंती,जाई,जुई,मदनबाण,कुंद, जास्वंद, झेंडू, निशिगंध ,पारीजातक,रातराणी, अँस्टर,सोनचाफा, ब्रम्हकमळ,डबलमोगरा,हजारी मोगरा, सदाफुली, तगर, ब्राम्हकमळ इत्यादी.) लावलेली असून त्याचे नियमित उत्पादनही घेत आहोत .सोबत आमच्या प्रती नंदनवन अशा जैविक बागेचे काही फोटो नमुन्यादाखल खाली दिलेले आहेत.
To day's harvest  from my teraace Bio-Garden 02.10.2013 xxx_0.jpg फ्लॉवर xxx.jpg शेवग्याला आलेल्या शेंगा xxx_0.jpg  xxx.jpg टोमॅटो xxx.jpg
या जैविक बगीच्या पद्धतीत कोरडा कचरा उदा. कागद,कांच,धातूचा पत्रा किंवा तार वगळता ज्याचे विघटन होऊ शकते असा घरातील कोणताही नैसर्गिक ओला कचरा अगदी केसांचे गुंतवळ किंवा नखे आगर मेलेली झुरळे किंवा उंदीर-घुशी सुद्धा टाकू शकता.
बाजारात मिळणारी बायो-कल्चर पावडर म्हणजे एक प्रकारचे ओल्या कचर्या चे जलद गतीने विघटन होण्यासाठी आवश्यक असे एक प्रकारचे विरजण आहे. (जसे आपण घरी दुध्यापासून दही करतांना दुधाला विरजण लावतो तसे)
विघटन होऊ शकेल असा ओला कचरा उसाचा रस काढून झाल्यावर उरणारी चिपाडे,नारळाच्या शेंदया व करवंट्यांचे बारीक तुकडे,वाळलेला पाला-पाचोळा,विटांचे २’ आकारातील तुकडे व बायो-कल्चर पावडर (विरजण) यांचा वापर करून कुंडीत (मातीविरहित) आपण रोपे किंवा झाडे लाऊ शकता. माती वापरलीच तर फक्त एकदाच तीही कुंडीच्या तळाच्या थरातच वापरावी. एकदा कचरा व कल्चर वापरण्यास सुरुवात केली की मध्ये मध्ये पुन्हा पुन्हा मातीचा वापर करू नये.
कुंडी : कुंडी म्हणून बाजारात मिळणार्या मातीच्या आगर प्लास्टिकचा विविध आकाराच्या कुंड्या,पत्र्याचे गोल.चौकोनी आकारातील डबे,ड्रम्स,प्लास्टिकचे डबे,ड्रम्स,थर्मोकोलचे चौकोनी खोके काहीही चालू शकते.माझ्या मते थर्मोकोलचे आयताकृती आकाराचे खोके सर्वात उत्तम ! आजकाल मेडीकलच्या डिस्ट्रिब्युतरकडून / दुकानातून असे रिकामे खोके मिळू शकतात. यात मातीचा वापर नसल्याने व थर्मोकोल वजनाने हलके असल्याने या कुंड्या बागेत हाताळनणे सोपे जाते हे एक महत्वाचे कारण व दुसरे असे की थर्मोकोल हे पाण्याने सडत आगर कुजत नाही,किंवा याचेवर कसलाही रासायनिक परिणाम होत नाही.
कुंडीत रोप लावण्याची पद्धत : ज्या कुंडीत झाड / रोप लावायचे असेल त्यांच्या तळात व सर्व बाजूंनी तळा पासून दोन इंच उंचीवर १० मी.मी. आकाराची मध्ये ४ “ अंतर ठेऊन भोके पाडावीत त्यामुळे पाण्याचा व्यवस्थित निचरा होऊन रोपांच्या मुळांना प्राणवायू मिळू शकतो.
 तळाला पाडलेली भोके.jpg बाजूला पाडलेली भोके.jpg
नारळाच्या शेंड्या,विटांचे तुकडे व ऊसाची चिपाडे यांचेमुळे ओलावा टिकून रहाण्यास मदत होते. प्रथम कुंडीच्या तळाच्या थरात ४ ‘ उंचीचा विटांचे छोटे छोटे तुकडे,करवंट्यांचे तुकडे व पाला-पाचोळा किंवा या एकाच थरात वापरायची असेल तर माती यांचा थर देऊन त्यावर एक मूठ बायो-कल्चर पावडर ( विरजण) पसरून पुन्हा ४ ‘ उसाही चिपाडे ,नारळाच्या शेंड्या,भाज्यांची देठे असा थर हाताने दाबून द्यावा व त्यावर पुन्हा एक मूठ बायो-कल्चर (विरजण) पावडर घालावी.
 चिपाडे.jpg
याप्रमाणे थरावर थर द्यावे व कुंडी वरुन २ ” मोकळी ठेऊन भरून घ्यावी व शेवटचा थर भरून झाल्यावर ३ मुठी बायो-कल्चर पावडर पसरावी.
 भरलेला पहिला थर व पाला-पाचोळा.jpg
भरलेल्या कचर्‍यात मधोमध एक खड्डा करून बाजारातून आणलेले रोप बाहेरची प्लास्टिकची काळी पिशवी मुळांना धक्का न लावता फाडून टाकून ते रोप बुंध्यासह व मातीसकट त्या खड्ड्यात ठेऊन बाजूला केलेला कचरा पुन्हा वर ओढून घ्यावा. वर एक मूठ निंबोळ्यांची पेंड घालावी. रोज एक वेळ पानी देत जावे. आठ दिवसांनंतर भाजीपाल्याचा कचरा फळांच्या साली,टरफले ,भाज्यांची देठे व शिळे-पाके अन्न घालायला सुरुवात करावी. सुरूवातीस ४-६ महीने तरी कोबी व फ्लॉवर याचा पाला टाकू नये कारण त्यामुळे आळयांचा प्रादुर्भाव होतो.
कचर्यास दुर्गंधी , कचर्‍यातून घाण पाणी , आळया , किंवा कचर्‍यावर माशा बसणे असा त्रास / समस्या उद्भवल्यास वरुन आणखी बायो-कल्चर घालावे.
या पद्धतीचे फायदे : कचर्‍यास कसलीच दुर्गंधी येत नसल्याने ओल्या कचर्याामुळे प्रदूषणात होणारी भर टाळता येते. कचरा पाणी जास्त शोषून ठेवत असल्यामुळे पाणी कमी लागते. अन्य कुठल्याच खताची जरुरी लागत नाही. जास्ती तंत्राची जरूरी नसते. एक-दोन दिवस गावाला गेलात तरी काही फरक पडत नाही. मुळांना वाढीस लागणारे अन्न-पानी जवळच मिळत असल्याने झाडाची वाढ लवकर होऊन फळे,फुले,भाज्या,शेंगा यांचे उत्पादन मातीच्या तुलनेत लवकर व मुबलक सुरू होते. ( मला शेवग्याची ‘बी’ लावल्यापासून एका वर्षाचे आत शेवग्याच्या शेंगा खाता आल्या)
टीप : बायो-कल्चर (विरजण) हे सुरूवातीस फक्त एकदाच वापरायचे लागते ,पुन्हा-पुन्हा वापरावे लागत नाही.
रासायनिक खतांचा वापर टाळावा. किडीसाठी हळदीचे पाणी,तिखटाचे पाणी,कडूलिंबाची पाने घालून उकळून घेतलेले पाणी,तंबाखूचे पाणी यांचा वापर फवारणीसाठी करावा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी माहिती. धन्यवाद.
आमच्या बाल्कनीतही कुंड्यांमध्ये शेवगा, चाफा,पपई, आंबा इ. लावले आहेत. त्यासाठी बाजारात मिळणार्‍या प्लास्टिकच्या मोठ्या कुंड्या वापरल्या आहेत. घरात गांडूळखतांचा पिंजरा तयार केलेला आहे. त्यात ओला कचरा उत्तम वापरला जातो. दर ३ महिन्यांनी जवळजवळ १५ किलो गांडूळखत तयार होते. ते घातल्यानंतर चारच दिवसात झाडांना नवी तकाकी आल्याचे दिसते. फुलझाडे बहरतात. नवे धुमारे फुटतात. ते पाहतानाचे समाधान काही आगळेच असते.
सध्या सावलीत वाढणार्‍या भाज्या कोणत्या ते शोधतेय. Happy

फूप मस्त...
फुलांचा ताजेपणा काहि औरच आहे
मला विचारायचे होते :
१. जर कल्चर मिळण्याचि सोय नसेल तर काय करावे?
२.मातित लावलेल्या झाडांना चहाचा चोथा किवा भाज्यांचे देठं खत म्हणुन चालतिल का??

अवांतर : मला एकाने सांगितले होते कि शेवंति चा रोपाला खरकटे पाणि म्हणजे,जेवलेया ताटात हात धुवायचे व ते पाणि घालायचे.त्याचा बरोबर थोडिफार भाताचि शित वगरे जातातच.मि करुन पाहिले.आणि खरच खुप फरक पडला होता...चान टुमदार रोप झालि आणी कळ्या हि आल्या Happy

खुपच छान. मी हि घरी असा प्रयोग केला होता. पारिजातकाला हे जैविक खत घालुन ३ पत मोथि पाने आलि होती. पण बायो-कल्चर मिलाले नाहि. कचरा कुजवला होता फक्त....कुथे मिळ्ते हे बायो-कल्चर? कोलहापुरात मिळॅल का?

मस्त माहिती.
घरात कमी जागा असली तरीही करता येण्याजोगे आहे असे वाटते.
नक्कीच करुन बघेन.
बायो-कल्चर पावडर रासायनिक खतांच्या दुकानात मिळू शकेल ना?

मातीत लावलेल्या झाडांना चहाचा चोथा किवा भाज्यांचे देठं ,निर्माल्य,केसांचे गुंतवळ,नखे,बिरड्यांची साले,मटाराची साले घातली तरी चालतिल.

अगदी खरे आहे मितान ! आपणच कष्टाने फुलवलेल्या बागेतील फळझाडे / फुलझाडे जेंव्हा बहरतात , त्यांना नवे धुमारे फुटतात. तजेलदार होतात ते पाहतानाचे समाधान काही औरच ! शब्दांनी नाही त्याचे वर्णन करता येणार.

बायोकल्चर न मिळाल्यास आंबट दही, ताक किंवा आंबवलेले डोशाचे पीठसुद्धा वापरता येते.>>>पिंगू तुम्ही ही मस्करी तसर करत नाही आहात ना ? कारण जर हे खरे असेल तर माझाही येथे काहीतरी नवीन व उपयुक्त शिकायला मिळाले असे मी म्हणेन. माझाही बायो कलचरवरचा नाहक खर्च वाचेल व इतरांनासुद्धा त्याचा वापर करता येईल. कृपया हे खरे आहे का ? याचा खुलासा करावा.

तांबेकाका, मस्करी अजिबात नाही. दही आणि ताक यामध्ये बायोडिग्रेडेशनसाठी आवश्यक जीवाणु भरपूर असतात.
तसा हा स्वानुभव आहे, म्हणून सांगितले..

मस्त उपकरम तांबे काका
लिंबाच्या झाडाला ताक दही टाकले तर लिंब चांगली येतात.

अभिनंदन तांबे सर . हे खूप छान आहे.

तुमची गच्ची खूप मोठी असेल ना हे सगळे करण्यासाठी... आजकाल बिल्डिंग मध्ये अशी गच्ची मिळणे मुश्किल आहे.

लिंबाला ताक दही यावरून थोडी कल्पनाशक्ती पळू लागली आणि काही इतर झाडांचे आहार काय असतील याचा विचार सुरु झाला

१. प्राजक्त : इटालियन पास्ता आणि वाईन (मुलखाचा रोमँटीक)
२. बकुळी : फोडणीचे वरण, तूप, भात (मी बाई साधी)
३. गुलाब : डार्क चॉकोलेट, शँपेन , कॅव्हियार ( हौशी एकदम)
४. वड, पिंपळ : कोल्हापुरी सुके मटण, भाकरी ( आम्ही खात नाही पण आमच्यावर वसलेल्या भुतावळीस आवडते)
५. जाई, जुई तमाम नाजूक साजूक फुलझाडे : ऑर्गेनिक ग्रीन सलाद, मोडाची धान्ये, योगर्ट (डाएट करतो म्हणून तर इतके बांधेसूद मेंटेन करता येते)
६. तुळस : मुलेबाळे घरदार खाऊन जे उरेल ते माझे (सात्विक)

लिंबाच्या झाडाला ताक दही टाकले तर लिंब चांगली येतात>>>>> कढीलिंबाच्या झाडाला म्हणे ताक घालावे म्हणजे वाढ चांगली होते.

जास्वंद, गुलाब, प्राजक्ता,अनंता,चाफा,सोनटक्का, चमेली ह्या सर्व झाडांना चहा-कॉफी मात्र खूप आवडते. हो पण साखरेशिवाय द्या सकाळी सकाळी. मस्त होतात झाडे टवटवीत.

तांबेकाका, मस्करी नाहि करत आहे. तुम्ही पहाटे चहा घेता ना, त्यातलाच थोडा चहा(साखरेशिवाय) उरला तर झाडांना द्या. मात्र रोज नका पाजू. कॉफी पाजलीत तर आणखी खुष होतील(झाडं हो).
जमलच तर कधी कधी काकवी पण पाजा. आता तुम्ही म्हणाल मग, साखरेने काय घोडं मारलय? तर साखरेपेक्षा काकवी आवडते ह्या वर लिहिलेल्या झाडांना. Happy