समुद्रकिनारा (भाग ५)

Submitted by नंदिनी on 31 October, 2013 - 05:23

लिहायला आज वेळ मिळाला मला. घटनाच अशी आहे....

भाऊंना जाऊन महिना झाला. आज जाणार उद्या जाणार करत करत भाऊ गेले शेवटचा श्वास घेऊन. जाताना फ़ार त्रास झाला त्यांना, माझ्यामधेच जीव अडकला असणार त्यांचा...भाऊचे दिवस म्हटले तर घातले आणि म्हटले तर नाही. काकाने सगळं करायचं म्हणून केलं पण काकूची धुसफ़ुस चालूच होती. चौदाव्याला जेवायला मोजून पाच ब्राह्मण बोलावले होते.

भाऊ गेल्यापासून या घरामधे आता मी कायमची अनाथ झाले होते. घरकामाची आयती मोलकरीण. काकू मला आता शाळेत जायची काही गरज नाही हे आडून आडून सांगतच होती. त्यात परत काकाने...

मघाशीच काका-काकूचं चाललेलं बोलणं ऐकलं.

"काय मुलगी आहे.. बाप गेला तर डोळ्यातून पाणी नाही. आईवर गेली आहे असंच येणारे जाणारे म्हणत होते.” काकाने ऐकवलं.

"आता पुढे काय?" जयाकाकूनी काकाना विचारलं.

"काय पुढे? ते ओझं तर आपल्यालाच वहावं लागणार आहे. अठराची होईपर्यंत सांभाळू.. पुढे उजवुन देऊ.." काका विचार करून म्हटल्यासारखा म्हणाला, पण त्याच्या मनातले विचार वेगळेच चालू होते.

"तवर ठीक राहील ना? उद्या आईशीसारखे गुण उधळायला गेली तर काय घ्या.. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर घालवून टाका घरातून.." काकूने नवर्‍याला ठणकावुन सांगितलं.

माझ्या डोळ्यातुन नकळत पाणी आलं. माझं काय झालं होतं ते माहित असून काकू असं म्हणू कशी शकली? मला कुणी घालवायची गरज नाही, मी जाते इथून.....इथून कुठेतरी लांब या सगळ्यापासून लांब..... आज माझे वडील असते तर... आज माझी आई इथे असती तर... कुशीत शिरून रडण्यासाठी, भाऊ हवे होते. डोक्यावरून हात फ़िरवण्यासाठी. पण आज ते दोघं तर नव्हते म्हणून हे ऐकून घ्यायची वेळ माझ्यावर आली होती.

आज मी अंगण झाडत होते. कुणीतरी आल्याची चाहूल आली म्हणून वर पाहिलं. माझी आई आली हे सांगायची गरजच नव्हती. निळा सलवार कमीझ घातलेली, डोक्यावर दुपट्टा ओढून घेतलेली. तिच्या पाठोपाठ तो उस्मान...
त्या दोघांना बघताच विश्वाकाका आणि जयाकाकू दोघे पुरते गांगरले.
आई म्हणवत नाही मला तिला... तिचं बदललेलं नाव काय माहित नाही... लक्ष्मी…..मात्र शांतपणे पडवीत आली. एकदाच तिने पाठी वळून माझ्याकडे पाहिलं आणि ती हलकेच हसली.

आज पहिल्यादा मी माझ्या आईला पाहिलं. मी दोन वर्षाची असताना ती मला सोडून गेली. त्या उस्मानशी लग्न करायला.

"इथे कशाला आलीस?" जयाकाकूने तिला तिखटपणे विचारले.
"तुला माहीत आहे." लक्ष्मीने शांतपणे उत्तर दिलं.
"हे बघ, विश्वनाथ गेला. त्या आधी तू या घरातून गेलीस. तुला इथे काहीही मिळणार नाही. या घराशी तुझा संबंध नाही." वासुकाका म्हणाला.
"मला माहीत आहे की त्यानी माझ्यासाठी काही सोडलं नाही. माझा या घराशी पण काही संबंध नाही. मला घरातलं काही नको. पण मला माझी मुलगी हवी.." लक्ष्मी म्हणाली.

माझी आई मला न्यायला आली होती! हे ऐकून दुसर्‍या कुणाचा नाही पण वासुकाकाचा मात्र संताप अनावर झाला.

"काय? तुझी मुलगी? कुठे आहे ती? सोडून जाताना आठवली नाही का ती?" जोरात ओरडत त्याने विचारलं.
"हे बघा भावोजी, तुम्ही विनाकारण आवाज चढवू नका. तेव्हापण तुम्ही आणि तुमच्या भावाने मला तिला नेऊ दिलं नव्हतं. माझी मुलगी मला कधीच जड झाली नव्हती. पण त्यांनी मला सांगितलं की ते तिला सांभाळतील म्हणुन मी गेले होते. का गेले होते ते तुम्हाला चांगलंच माहित आहे... त्या माणसाने माझ्या जाण्याचा दोष या लेकराच्या माथी मारला. खुदा गवाह आहे, मी घर सोडून गेले त्याला सरस्वतीची काही चूक नाही. पण तरीही तिने न केलेल्या गुन्ह्याची सजा तिने का भोगावी? मी आज तिला घेऊन जाणार.." ती शांतपणे म्हणाली.

"कशाला? तुमच्यात नेऊन बाटवायला. तू एक धर्म बुडवलास. बाजारबसवी झालीस म्हणून लेकीलाही विकणार.." जयाकाकू म्हणाल्या.

"वहिनी, तोंड सांभाळून बोला. तुमच्या घरात मला काय भोगायला लागलं याची पूर्ण कल्पना आहे तुम्हाला. मी माझ्या आयुष्याचा मार्ग स्वत्: निवडला. माझी लेकसुद्धा तेच करेल. तिच्या बाजूने तुम्ही बोलायची गरज नाही. आज मी इथे आले कारण तिच्या बापानंतर तुम्ही तिला विकून टाकाल कुठेतरी." लक्ष्मी अजूनही शांतपणे बोलत होती.

मी हे सगळं ऐकत होते.

"मी सरस्वतीला तुझ्याबरोबर पाठ्वणार नाही. जे काही व्हायचं ते होऊन जाऊ दे. एवढी पंधरा वर्ष सांभाळली आहे आम्ही... " वासुकाका निर्धाराने म्हणाले.

लक्ष्मीने वळून माझ्याकडे पाहिलं.

"सरस्वती.. " पहिल्यान्दाच मी माझ्या आईच्या तोंडून माझं नाव ऐकलं. का कुणास ठाऊक वेगळंच वाटलं. लक्ष्मीकडे बघताना मला “हीच माझी आई का?” असा प्रश्न पडला. ल्क्ष्मी गोरीपान, तेजस्वी. मी माझ्या भाऊंच्या रूपाची. सावळी!

"तू येणार माझ्याबरोबर?" तिने हसत विचारलं.

आता निर्णय मला घ्यायचा होता. भाऊ कायम म्हणायचे, तुझी आई पैशापाठी त्या उस्मानच्या मागे गेली. तसं आपण पण करायचं????

"अगं, मी तुला खूप खुश ठेवीन. तुझ्या काकाकाकूपेक्षाही. तुला खूप शिकवीन. मोठ्या शाळेत घालेन..." लक्ष्मी माझ्याकडॆ आशेने बघत म्हणाली.
"पण मी नाही येणार.. " मी हळू आवाजात म्हणाले.

"अगं पण.. " ती काही बोलायच्या आत वासुकाका पुढे आले.
"ऐकलस ना? असे आमचे संस्कार दिलेत आम्ही तिला. तुझ्यासारखी लाज विकणारी नाही. समजलं? आता चालती हो तुझ्या या दुसर्‍या नवर्‍याला घेऊन." काकानी उस्मानकडे पाहिलं. तो शांत उभा होता. न बोलण्याची शपथ घेतल्यासारखा.

"बेटा, असं करू नकोस. तुझ्या बाबानी मला तुला कधी भेटू दिलं नाही. आता तू तरी असं वागू नकोस. " लक्ष्मी च्या डोळ्यात पाणी तरारलं.

मी काही न बोलता शांत उभी राहिले.
“हं” तिरस्काराने जयाकाकू म्हणाली. “आता तुला मुलगी आठवली का ग? या तुझ्या दुसर्‍या नवर्‍याकडून पोट पिकलं नाही ना.... कळतात हो मोहल्ल्यातल्या गोष्टी आम्हाला. म्हणून ही इतकी माया उतू चालली होय तुझी...”

"सरस्वती..." लक्ष्मी आता मात्र रडायला लागली. उस्मान लक्ष्मीजवळ आला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. "चलो." इतकंच म्हणाला.

"लेकीन मै.. सरस्वती... बेटा.. मी आई आहे तुझी "

त्याच गोष्टीचा तर मला राग होता...

कसं सांगणार मी आईला.... लक्ष्मीला? ती मला सोडून गेली याचा राग नव्हता, तिने धर्म बदलला याचा राग नव्हता... पण सगळ्यांत मोठा राग मला जन्म दिला होता त्याचा होता, तिला जर भाऊंबरोबर संसार करायचाच नव्हता, त्यांच्या पोस्टमनच्या नोकरीत तिला रहायचंच नव्हतं तर मग मला कशाला जन्म दिला? जन्म देऊन मोठं कशाला केलं? आज मी या जगात एकटी आहे. भाऊ नाहीत. काकाने दोन दिवसापूर्वी मी घरात एकटी आहे ते बघून मला.... नको नको ते केलं. काकूला सांगितल्यावर तिने मला “गप्प बैस. कुणाहीपुढे काही बोलू नकोस” एवढंच ऐकवलंय.


या सर्वाला कोण जबाबदार? तर मला जन्म दिलेली आणि जन्मानंतर दोन वर्षांनी सोडून गेलेली माझी आई. आणि मी... एकटी या जगामधे हरवण्यासाठी फ़िरत असलेली.... भाऊ जोपर्यंत होते तोपर्यंत मला कित्येकदा चेष्टामस्करीत म्हणायचे, “मुली, कसलाही नवरा कर... तुझ्या आईने केलंस तसा मात्र करू नकोस. एक मी तिच्यालेखी कर्तुत्वशून्य,. आणि दुसरा तो... उस्मान दुबईवाला. आधी तू खूप शिक, मोठी हो... आणी मग नवरा कर. तुझ्यासारखाच हुशार आणि बुद्धीमान”


“आणी मुख्य म्हणजे आपल्याच धर्मातला” मी त्यांना हसत उत्तर द्याय़चे...
.

आज आयुष्याचा फ़ार मोठा निर्णय घेतला. मी आईसोबत जाणार नाही. जे आईने केलं ते मी करणार नाही. मी आयुष्यात कधीही “त्या” धर्माच्या माणसांशी ओळखदेखील करून घेणार नाही.

माझ्या भाऊंसाठी मी एवढं नक्कीच करू शकते.

==================================================

“आज एवढ्या पहाटे? तेही चक्क बांद्र्याच्या समुद्रकिनारी? सूर्योदय बघायला आलीस का? पश्चिमेकडून?” बेंचवर मागे टेकून ती डोळे मिटून बसले होते तेव्हा अगदी कानाशीच आवाज आला. डोळे न उघडताच तिच्या चेहर्‍यावर त्या आवाजाने हसू आलं.

“वीर म्हणाला की थोडाफ़ार तरी एक्सरसाईझ करत जा. तब्बेतीला चांगला असतो” तिने तसंच डोळे मिटून उत्तर दिलं.

“मग जा, ऊठ. जॉगिंग कर. बसून काय राहिलीस?” तो तिच्या केसांतून हात फ़िरवत म्हणाला.

“दहा मिनिटे धावले, तेवढंच बास. आता कंटाळा आला, इथे आले तेच मुळात तुला भेटायला. मी सात वाजता ये असा मेसेज केला होता ना?” ती डोळे उघडत त्याच्याकडे बघत म्हणाली. “उशीर का केलास?” तोच चेहरा, , तेच हसरे ओठ, तेच कुरळे केस, तीच अंतरात्म्याचा डोह शोधणारी नजर असं कसं मी याला माझ्या आयुष्यातून कायमचं घालवायचं? तिच्या मनात विचार येऊन गेला.

“एवढ्या सकाळी रिक्षा मिळाली नाही. त्यातून आज रविवार..” तो तिच्याकडे बघत म्हणाला. “का इतकी थकलेली दिसतेस? खूप काम आहे का?”

“साहिल, तसं काम फ़ारसं नाही, पण गेले दोन तीन महिने... फ़ार प्रॉब्लेम चालू आहेत...” सारा हलक्या आवाजात म्हणाली.

“मग मला साधा एक फोन पण का केला नाहीस? जग सोडून गेलो नव्हतो मी” साहिलने चिडून विचारलं.
“प्लीज असलं काही बोलू नकोस... मला काहीच समजत नाही, साहिल! वीर म्हणतो की तुझ्याशी कसलाही संबंध नको. माझं स्वत:चं मन मला सांगतं आता झालं तितकं पुरे झालं. माझ्या आयुष्यामधे मी निर्णय घ्यायलाच हवा... पण ते शक्य होत नाही...”

“तू ऑलरेडी निर्णय घेतला आहेस, सरस्वती. तुला आता तो निर्णय निभवायचा आहे फ़क्त” साहिल दूर समुद्राकडे बघत म्हणाला. “मी मीडीयामधे वाचत होतो. वीरचं अचानक दुसर्‍याच कुठल्या मुलीबरोबर अफ़ेअर वगैरे... आधी वाटलं पब्लिसिटी स्टंट असेल... पण मग लग्नाची अनाऊन्समेंट वगैरे ऐकली, म्हणून त्या दिवशी तुला फोन केला.. तू म्हणाली होतीस, करू नको.. तरी राहवलं नाही…… एवढं सगळं घडत असताना तुला माझी एकदापण आठवण आली नाही?”

“साहिल, आयुष्यातला एक क्षण असा जात नाही जेव्ही मी तुझा विचार करत नाही. तू युकेला गेल्यापासून सतत सतत तुझाच विचार करत होते आठ दिवस... आणि मग माझं आणि वीरचं भांडण झालं एके दिवशी. खूप वादावादी... मी त्याने दिलेली रिंग काढून फ़ेकली, त्याने मला मारलं...”

“सरस्वती!!! त्याची हिंमत कशी झाली?” त्याने अविश्वासाने विचारलं.

“नातं तुटलंच होतं आमचं. पण समहाऊ गेल्या चार पाच दिवसात परत... वीर परत आला माझ्याकडे. हे काय घडतंय ते मला माहित नाही. असं काहीतरी होइल असं वाटलं पण नव्हतं.... सगळं नॉर्मल झाल्यासारखं वाटत होतं. आणि......”

“आणि तू वीरला सांगितलंस की मी तुला फोन केला होता... का? सरस्वती. वीरला आवडत नाही, हे माहित असूनसुद्धा!!”

“मग मी काय करू? त्याच्याशी खोटं बोलू? मी नाही बोलू शकत... त्याच्याशी अथवा तुझ्याशी...” तू जितक्या मोकळेपणाने माझा निर्णय स्विकारलास.... माझं आणि वीरचं नातं स्विकारलंस. तसं वीर का नाही करू शकत?”

“प्रत्येक माणूस वेगळा असतो.. वीर खूप पझेसिव्ह आहे... मी आधीच सांगितलं होतं तुला हे.. आणि का असू नये? आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने उलटपक्षी फ़क्त आपल्यावर प्रेम करावं अशी अपेक्षा चूक थोडीच आहे का?” तो शांतपणे म्हणाला.

“मी तशी अपेक्षा कधी केलीच नाही... केली असती तर!! तर आपलं नातं कदाचित वेगळं असतं का रे साहिल?”

“माहित नाही... मी कधीच तितक्या लांबचा विचार करत नाही. आज आणि आत्तामधे जगणारा माणूस आहे मी. सरस्वती, जास्त विचार करू नकोस. वीर तुझ्या आयुष्यामधे फ़ार महत्त्वाचा आहे. तो प्रेम करतो तुझ्यावर. त्याला असं वारंवार दुखवत जाऊ नकोस. मी स्वत:हून त्याच्याशी बोलेन एकदा. नाही आवडत त्याला तू माझ्याशी बोललेलं. पण मग मला तुझी खुशाली त्याच्याचकडून समजत राहू देत. मी त्यालाच फोन करत जाईन”

“प्लीज!” सारा घाबरून म्हणाली. “असं काही करू नकोच. तो उलट अजून चिडेल. मी तुला ऑफ़िसमधूनच कॉल देत जाईन. वीरला काय सांगायचं ते मी सांगेन.”

“तू एवढी घाबरतेस त्याला?” तो किंचित हसत म्हणाला.

“नाही, पण तो परत निघून जाईल याची मात्र भिती वाट्ते. साहिल, तुझ्याइतकाच वीरपण माझ्यासाठी जगण्याचा भाग होत चाललाय. कधीकधी भिती वाटते... तुला मी माझ्या स्वत:च्या हातांनी आयुष्याबाहेर लोटलं तसंच वीरने पण...”

“असं काहीही होणार नाही” त्याने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवून म्हटलं. “मी होऊ देणार नाही... घड्याळ बघ, साडेसात वाजलेत. वीर वाट बघत असेल ना तुझी?” तो विषय बदलत म्हणाला.

“नाही... तो जिमला गेला असेल. साडेनऊनंतरच येईल. तू किती दिवस आहेस इथे? गावाला गेला होतास?”

“परवाच गेलो होतो. तुझ्या आश्रमात पण जाऊन आलो. सगळे ठिक आहेत. तुझी फ़ार आठवण काढतात.”

सारा हसली. “मला पण त्यांची फ़ार आठवण येते...... लेलेआज्जी जायच्या आधी त्यांना एकदा भेटायचं होतं मला!”

“मग चल ना एकदा, तुला कितीवेळा सांगितलं की माझ्यासोबत चल. तुझा काका मेला तेव्हापण गेली नाहीस.”

“काका मेल्यावर महिन्याने समजलं मला...."

“कसं समजणार? तू काही संबंधच ठेवले नाहीस.” बोलता बोलता तो थबकला. “मी... मी गावाला गेलो होतो तेव्हा उस्मानचाचाच्या घरी पण गेलो होतो..”

अचानक सारा चिडली. “का? काही गरज होती का?”

“उस्मानचाचाच्या मयतीला.” तो शांतपणे म्हणाला. “सरस्वती, ज्याच्यासाठी तुझ्या आईने घर तोडलं, तुला अनाथ केलं तो माणूसच या जगात राहिला नाही.”

“मरेल नाहीतर काय? त्या बयेपेक्षा वीस वर्षाने मोठा होता तो” सारा दूरवर बघत म्हणाली.

“तुला जरापण काही वाटत नाही का? रक्ताचं नातं आहे तुमचं. आता ती एकटी आहे, तिला कधीतरी जाऊन भेट.. ती वागायची कशीही चुकली असेल, तिचे निर्णय चुकले असतील... पण तू? तू तर बुद्धीमान आहेस, मग तिला माफ़ करू शकत नाहीस?”

“साहिल. परत एकदा सांगते. सुलतानाची... तेच नाव आहे ना तिचं? बाजू घेऊन माझ्याशी प्लीज बोलू नकोस. आधीच मला माझे गोंधळ निस्तरताना माझा जीव मेटाकुटीला आलाय.” सारा अजूनच्च चिडली.

“बरं.. राह्यलं. पण तरी एकदा गावाला ये माझ्यासोबत. मनामधला हा कडवटपणा काढून टाक. किती चिडत राहशील प्रत्येकावर? माझ्यावर? स्वत:वर? कधीतरी मनामधून या सगळ्यांनाच माफ़ करून टाक. खूप खुश होशील!”

“तू माझ्या आनंदाची आणि खुशीची बात करूच नकोस. माझी जर इतकीशी पर्वा असती तर असा माझा हात अर्ध्यावर सोडला नसतास...”

“सोडणं भाग आहे. सरस्वती. किस्मत की बात है... बदकिस्मती तर किती माझी? तुझ्यापासून एवढा लांब गेलो तरी तुझ्याजवळच राहिलोय...”

“मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही...” साराचा आवाज भरून आला.

“तेच तर तुला करायचं आहे...” उत्तर देताना त्याचापण आवाज तितकाच भरून आला.

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी, ही कथा तू पूर्वीपण लिहीली होतीस का?
१ला डायरीतला भाग आधी कुठल्यातरी कथेत (तुझ्याच) वाचल्यासारखे आठवते आहे.

हं.. Happy

प्राची, जुन्या माय्बोलीवरती एक अर्धवट कथा मी लिहिली होती. त्याचंच हे एडिटेड वर्जन आहे. यामधे पात्रे सेम आहेत, पण घटनाक्रम वेगळा आहे. बर्‍याचशा घटनापण वेगळ्या आहेत.

छान Happy

नंदिनी, खूप छान interesting आहे. मलाही ह्या कथेचे ६,७,८ भाग मिळत नाही आहेत... लिंक देशिल का?

नंदिनी, खूप छान interesting आहे. मलाही ह्या कथेचे ६,७,८ भाग मिळत नाही आहेत... लिंक देशिल का? +१

नंदिनी, खूप छान interesting आहे. मलाही ह्या कथेचे ६,७,८ भाग मिळत नाही आहेत... लिंक देशिल का?