जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

Submitted by अभय आर्वीकर on 27 August, 2013 - 07:56

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

              या आधीच्या लेखांकामध्ये मी साप-विंचू चावल्यानंतर करण्यात येणारी पारंपरिक उपचारपद्धती कशी असते, या विषयी लिहिले. ह्या उपचारपद्धती जश्या आहे तशाच स्वरूपात पिढोनपिढ्या चालत आल्या असाव्यात. उपचार करणार्‍या व्यक्ती स्वतः प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या नसल्याने व रोगी त्याचे म्हणणे ऐकत नसल्याने त्याने "हे मी करत नाही, माझ्या हातून देव करून घेतो" अशी भूमिका घेऊन उपचाराच्या सोबतीला पुजा-अर्चा करण्याचा देखावा निर्माण केला असावा. रोग्याची श्रद्धा देवावर असल्याने रोग्याला मानसिक बळ यातून आपोआपच मिळून उपचार अधिक प्रभावी होण्यास नक्कीच मदत झाली असावी.

              हे पारंपरिक उपचार आहेत. त्यात बदलत्या काळानुरूप संशोधन झालेले नाही. प्रयोगशीलता नसल्याने हे शास्त्र अविकसित राहिले. जे शास्त्र काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकत नाही, ते फार काळ स्वतःचे उपयोगमुल्य शाबूत राखू शकत नाही. आज अ‍ॅलोपॅथीच्या तुलनेने पारंपरिक उपचार शास्त्र मागे पडले किंवा प्रभावहीन झाले, त्याचे प्रयोगशीलता नसणे, हेच प्रमुख कारण आहे. साप चावला तर पारंपरिक उपचार पद्धतीचा उपयोग करणे धोकादायक आहेच, मात्र याचा अर्थ असाही नाही की सर्पदंशावर वैद्यकियशास्त्र फारच प्रभावी आहे. साप चावलेला रोगी ताबडतोब दाखल होऊन वेळेच्या आत उपचार सुरू झाले नाहीत तर रोग्याला हमखास वाचवू शकेल असे औषध आधुनिक वैद्यकशास्त्राकडे नाही. येथे औषधीपेक्षा आणि उपचारपद्धतीपेक्षा रोगी वेळेच्या आत उपचारस्थळी दाखल होणे, हेच सर्वाधिक महत्त्वाचे असते हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे. सर्पदंश झाला तर उपलब्ध सर्व पर्यायांमध्ये वैद्यकीय उपचार हाच एकमेव पर्याय परिणामकारक आहे, यात दुमत नाही. आधुनिक वैद्यकियशास्त्र आता सर्वमान्य झालेले आहे पण सर्पदंश झाला तर इस्पितळात पोहचण्याचा पर्यायच उपलब्ध नसेल तर तेथे जो कोणता पर्याय उपलब्ध असेल तो स्वीकारणे रोग्याची अपरिहार्यता असते, हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे वैद्यकियशास्त्र वगळता अन्य पारंपरिक उपचार करून घेण्याचे व्यक्तीचे पर्यायस्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. या कलमामुळे विनामूल्य पारंपरिक उपचार करणार्‍यांमध्ये भितीचे वातावरण तयार होईल आणि काळाच्या ओघात ही पारंपरिक उपचार पद्धती नामशेष होईल. सरकार जर जनतेला आहे त्यापेक्षा चांगला पर्याय उपलब्ध करून देऊ शकत नसेल तर उपलब्ध असलेला पर्याय हिसकावून घेण्याचा हक्क सरकारला असूच नये आणि तो जनतेने मान्य करू नये. 

हास्यास्पद कलम : जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम नऊ मध्ये लिहिले आहे की, "कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे." येथे "यासारखे उपचार करणे" हा शब्द फारच संभ्रम निर्माण करणारा आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार वगळता अन्य सर्व उपचार कायद्याने बेकायदेशीर ठरण्याची भिती निर्माण झाली आहे. कुणी कितीही म्हणोत की हा कायदा केवळ बळजबरीने अघोरी उपचार करणार्‍या मांत्रिकासाठी आहे, तर त्यात अजिबात तथ्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. या कलमाच्या संदर्भात विचार केला तर असे दिसून येते की, "घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून" हे शब्द निव्वळ कुचकामी आहेत, कारण कोणताही मांत्रिक हातात तलवार, कट्यार, बिचवा, चाकूसारखे धारदार शस्त्र किंवा AK-47 अथवा स्टेनगनचा धाक दाखवून ज्याला दंश झाला आहे त्याव्यक्तीस बळजबरीने अडवून (बलात्कार करावा तसा) मंत्रतंत्र, गंडेदोरेचा उपचार करणार नाही तोपर्यंत "रोखणे/प्रतिबंध करणे" या सारखे कलमच लागू पडणार नाही, त्याअर्थी या कायद्यातले हे कलम हास्यास्पदच म्हणावे लागेल. येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कायदा अपराध्यास शिक्षा करत नाही, न्यायाधीश करत असते. शिक्षा न्यायाधीशाच्या स्वमर्जीने ठरत नसते, तर ते वकिलांच्या ऑर्ग्यूमेंटवर ठरत असते. कायदा किंवा कायद्याचे कलम अस्पष्ट किंवा संदिग्ध असेल तर न्यायप्रक्रियेत जो वकील अधिक चांगल्यातर्‍हेने युक्तिवाद करेल त्याच्या पक्षाने न्याय झुकण्याची शक्यता असते. कायदा किंवा कायद्याच्या कलमाच्या अस्पष्ट किंवा संदिग्धपणामुळेच निष्णात वकील न्याय आपल्या बाजूने झुकवून घेण्यास यशस्वी ठरत असतो. 

उपद्रवी कलम : या कलमान्वये कायदेशीर कारवाई करूनही पुरावे गोळा करणे अशक्य आहे असे पोलिस खात्याला वाटले आणि कायदेशीर कारवाई करूनही पुरेशा पुराव्याअभावी न्यायालयात खटला दाखल करणे उपयोगशून्य आहे अशी खात्री झाली तर लाचलुचपत घेऊन तिकडेच निपटारा केला जाईल. त्यामुळे पोलिस खात्याचा अशा केसेसमध्ये उपद्रव वाढीस लागेल.

सूडबुद्धीने वागणारे कलम :  कलम ११ (क) बघा "स्वतःत विशेष शक्ती असल्याचे अथवा कुणाचातरी अवतार असल्याचे वा स्वतःत पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून, अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे"

या तर्‍हेची वर्तणूक करणार्‍याला शिक्षेची कायद्यात तरतूद असणे समर्थनीयच आहे पण;

- तुला माझ्या संस्थेत नोकरी देतो असे सांगून, जर एखाद्या स्त्री उमेदवाराशी संस्थाचालक लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून शिक्षणमहर्षी घोषित करायचे? 

- एखादा राजकीय नेता तुला निवडणुकीचे तिकीट देतो असे सांगून, जर एखाद्या स्त्री उमेदवाराशी तो राजकीय पुढारी लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून मंत्रिपद देऊन त्याचे हात अधिक मजबूत करायचे? 

- एखादा प्रशासकीय कर्मचारी तुझे काम करून देतो असे सांगून, जर एखाद्या गरजू स्त्री सोबत तो कर्मचारी लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून राष्ट्रपतिपदक देऊन त्याचे सत्कार करायचे? 

              गुन्हा जर समान असेल तर असा गुन्हा करणार्‍यापैकी निवडून एखाद्याला शिक्षा देणारा कायदा बनविणे, हे "समान न्याय तत्त्वाला" छेद देणारे ठरते. अशा स्वरूपाच्या कायदा निर्मितीमुळे कायदा आपल्याशी समान न्यायाने नव्हे तर सूडबुद्धीने वागतो, अशी भावना काही निवडक जनवर्गाच्या मनात उत्पन्न होऊन त्यांचा कायद्यावरचा विश्वास उडून कायद्याबद्दल चीड आणि द्वेष उत्पन्न होऊ शकते. हा फार गंभीर धोका आहे.

अव्यवहार्य कलम 

माझा या कायद्याच्या कलम नऊला विरोध आहे कारण;

१) त्यामुळे उपचार निवडीचे स्वातंत्र्य धोक्यात येते.

२) रोग्याने उपचार पद्धती कोणती निवडावी, हा प्रबोधनाचा विषय आहे, सक्तीचा नाही.

३) या कलमामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन पारंपरिक उपचारपद्धतीचे अस्तित्व धोक्यात येईल.

४) हे कलम लागू करण्यामागे सरकारचा उद्देश जनहिताचा नसून सवंग लोकप्रियता मिळविण्याचा आहे.

              हा कायदा केवळ शहरी किंवा जेथे वैद्यकीयसेवा सहज उपलब्ध आहे अशा शहराच्या आसपासच्याच जनतेसाठीच लागू नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर जनसंख्या ग्रामीण भागात राहते. तेथे अजून पिण्याचे पिण्यायोग्य पाणीसुद्धा पोचलेले नाही. काही गावात रस्तेच नाहीत. अनेक दुर्गम भाग असे आहेत की, जेथे बारमाही संचार सुविधा उपलब्ध नाही. पावसाळा सुरू झाला की काही गावात पायदळ चालत जाणे ही एकमेव संचार सुविधा उपलब्ध असते. पुर आला की काही गावांचा अन्य गावांशी आणि शहरांशी संपर्क तुटून जातो. महाराष्ट्राचा विचार केला तर असे दिसेल की शेतात जायला पक्के रस्ते नाहीत. केवळ पांधनरस्ते, शीवरस्ते किंवा पायवाटाच आहेत. पावसाळाभर चप्पल नावाची वहाण जेथे चालत नाही तेथे अन्य वाहने चालण्याचा प्रश्नच येत नाही. गावाकडून शहराकडे जायला शेतक्र्‍यांजवळ स्वतःचे वाहन नाही. बर्‍याच गावांना अजून एसटीचे दर्शन झालेले नाही. ज्या गावात एस टी जाते तेथे एक किंवा दोनच टायमिंग आहेत. आपण २०१३ मध्ये जगत असलो तरी खेड्यातील रोग्यास घ्यायला अ‍ॅम्बुलन्स येणे, ही सुविधासंस्कृतीच अजून जन्माला यायची आहे.

              सर्पदंश झालेल्या व्यक्तीस अत्यंत तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. अनेक गावांची स्थिती अशी की, सर्पदंश झालेल्या व्यक्तीस रुग्णालयात पोचवायला किमान ४-५ तास लागू शकतात. समजा जेथे सर्पदंशावर वैद्यकसेवा उपलब्ध आहे अशा आरोग्य केंद्रापासून ७०-८० किलोमीटर दूर असलेल्या खेडेगावात श्याम नावाच्या व्यक्तीला गावापासून ३-४ किलोमीटर अंतरावरील शेतात सर्पदंश झाला तर दवाखान्यात न्यायचे वाहन उपलब्ध होईपर्यंत श्यामने किंवा त्याच्या नातेवाइकाने काय करायचे? जर वैद्यकीय उपचार उपलब्धच नसेल तर अन्य पर्यायी उपचार नाही करायचे? देवाचा धावा केल्याने मरणारा माणूस वाचत नाही, हे माहीत आहे म्हणून "देवा वाचव" असा धावा करण्यास मनाई करायची? पारंपरिक उपचार करायचेच नाहीत? 

              चावा घेण्यासाठी साप माणसावर चाल करून बाहेर मोकळ्या जागेत येत नसतो. झुडुपात, जमिनीच्या भेगांत, कचरा टोपलीत, कचर्‍याच्या ढिगात किंवा एखाद्या वस्तूच्या खाली बुडाशी बसलेला असतो. माणसाच्या ज्या भागाचा स्पर्श त्याला होईल त्या भागाला तो चावा घेत असतो. कधी कधी तो दिसतच नाही. अंधार असेल तर अजिबातच दिसत नाही. अशावेळी साप विषारी की अविषारी हा मुद्दाच गौण असतो. साप विषारी असेल तरीही त्याने किती मात्रेत विष शरीरात टाकले, हे कसे ठरवणार? सापाचे वजन, दंश झालेल्या व्यक्तीचे वजन यावर सुद्धा बरेच अवलंबून असते. अशावेळी दंश झालेल्या व्यक्तीस मानसिक आधार दिला तर तो कदाचित वाचेल सुद्धा. आमच्या भागात डोम्या नाग व गव्हाळ्या नाग प्रसिद्ध आहेत. हे साप चावले तर माणसाला "पाणी सुद्धा मागू देत नाही" अशी म्हण आहे. या प्रजातीचा मोठ्या आकाराचा साप चावला तर दोन तासात सर्वकाही संपून जाऊ शकते. वैद्यकीय सेवा उपलब्ध होईपर्यंत जर त्याच्यावर पारंपरिक उपचार केले तर कदाचित हा काळ आणखी वाढण्यास मदत होऊ शकते. केवळ अंधश्रद्धा निर्मूलन झाले पाहिजे म्हणून काय अशा प्रसंगी हातावर हात ठेवून बसायचे? वेळेच्या आत वैद्यकीय सेवा जर उपलब्ध झालीच नाही तर डोक्यावर हात ठेवून त्याला मरताना उघड्या डोळ्यांनी पाहत राहायचे? 

              अनेकजण यावर युक्तिवाद करतात की, पारंपरिक उपचारांना बंदी घातलेली नाही. पण माझ्या मते ही बंदीच आहे. समजा श्यामवर पारंपरिक उपचार सुरू केले आणि श्याम दगावला. त्याला दोन मुले आहेत एक पुण्याला आणि एक मुंबईला. ते दोघेही येणार पण तो पर्यंत बाप मेला असणार. या मुलांनी जर का बापाच्या मृत्यूपश्चात ठाण्यात तक्रार नोंदवली की, माझ्या बापावर मांत्रिकाने जबरदस्ती करून उपचार केले तर पुढे काय होईल कल्पना करा. शिवाय प्रत्येक गावात गटबाजी असते. ते अशावेळी एकमेकावर सूड उगवू शकतात. सत्ताधारी पक्ष गैरफायदा घेऊ शकतो.

              वास्तवाची एवढीशी जाणीव नसणे हा दुर्गम भागातील ग्रामीण लोकजीवनाशी राज्यकर्त्यांची नाळ तुटली असल्याचा पुरावा आहे. राजकारणाबाहेरील व्यक्तींना समाजसुधारणा करायची असेल तर त्यांनी प्रबोधन करावे, सक्ती करणे म्हणजे विचारसामर्थ्याचा पराभव मान्य करण्यासारखे आहे. सामाजिक सुधारणांच्या अनुषंगाने विचार केला तर ज्यांना स्वतःच्याच विचारावर भरवसा नाही तेच सक्तीची भाषा वापरत असतात, असेही म्हणता येईल. 

सरकारला जर खरेच अंधश्रद्धा निर्मूलन करायचे असेल आणि सर्पदंशामुळे होणारे मृत्यू थांबवायचे असतील तर;

१) प्रत्येक गावात पक्का रस्ता तयार करावा.

२) प्रत्येक गावात अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करावी.

३) किमान दहा गावासाठी एक M.B.B.S निवासी डॉक्टर नेमावा. त्याला ग्रामीण भागातच मुख्यालयात २४ तास हजर राहण्याची सक्ती करावी.

४) सर्पदंश झाल्याचा संदेश पोचल्याबरोबर स्वतः डॉक्टरनेच त्या स्थळी पोचावे आणि उपचार सुरू करावे. (जसे पोलिस खाते घटनास्थळी पोहचते.)

कायदाच करायचा असेल तर असा करावा;

"सर्पदंश झाल्यानंतर त्या दंश झालेल्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या नातेवाइकाकडून फोनवरून सूचना मिळाल्याबरोबर त्या प्रभागासाठी नेमलेला डॉक्टर तातडीने स्वतः दंश झालेल्या व्यक्तीकडे जाईल आणि उपचार सुरू करेल. जर उपचार सुरू होण्यास दिरंगाई किंवा हयगय झाली आणि सर्पदंश झालेला व्यक्ती जर दगावला तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येईल."

              या तर्‍हेचा कायदा जर अस्तित्वात आला आणि लागू झाला तर पुरोगामी महाराष्ट्रातील बर्‍याचशा अंधश्रद्धा संपुष्टात येतील. डॉक्टर नेमणुकीच्या प्रक्रियेत अंधश्रद्धा निर्मूलनाला स्वेच्छेने उत्सुक आणि कटिबद्ध असलेल्या डॉक्टर मंडळींना प्राधान्य देण्यात यावे, जेणेकरून अंधश्रद्धा निर्मूलनाची मोहीम आणखी गतिमान करता येईल.

                                                                                                                           - गंगाधर मुटे
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही काय लिहत आहात तेतरी तुम्हाला समजत आहे का?

उगाच विरोध करायचा म्हणून चार लेखामधे तुम्ही तेच मुद्दे उग्गळून लिहत आहात. हास्यास्पद झालंय हे सर्व काही. जादूटोणा कायदा आहे तो. सर्पदंश कायदा नव्हे, हे सांगून पण तुम्ही तीच टकळी वाजवताय मागच्या लेखात तुम्हाला पाच प्रश्ने विचारले होती. त्यांची तरी किमान उत्तरे द्या.

तर्‍हेची वर्तणूक करणार्‍याला शिक्षेची कायद्यात तरतूद असणे समर्थनीयच आहे पण;

- तुला माझ्या संस्थेत नोकरी देतो असे सांगून, जर एखाद्या स्त्री उमेदवाराशी संस्थाचालक लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून शिक्षणमहर्षी घोषित करायचे?

- एखादा राजकीय नेता तुला निवडणुकीचे तिकीट देतो असे सांगून, जर एखाद्या स्त्री उमेदवाराशी तो राजकीय पुढारी लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून मंत्रिपद देऊन त्याचे हात अधिक मजबूत करायचे?

- एखादा प्रशासकीय कर्मचारी तुझे काम करून देतो असे सांगून, जर एखाद्या गरजू स्त्री सोबत तो कर्मचारी लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून राष्ट्रपतिपदक देऊन त्याचे सत्कार करायचे?

वर उल्लेखलेले सर्व गुन्हे हे शिक्षेस पात्र आहेत. भारतीय कायद्यांचा जरा अभ्यास करा. प्रत्येक गुन्ह्याला वेगवेगळे कायदे असतात. जादूटोणा कायद्यामधे सगळेच लैंगिक अत्याचारांच्या मुद्द्यांचा संबंध कसा येइल???

उगाचच "मॅजा विरोध आहॅनॅ, मॅग तो कॅयॅदाच चुकीचॅ"

निष्कर्ष : १) श्वान-सर्प-विंचू दंशावर पारंपरिक उपचार परिणामकारक असतात असे सांगणारे एकही वाक्य चारही लेखांत मिळून नाही. उलट तसे काही होत असेल असा दावा नाही हे स्पष्ट केलेले आहे.
२) कावीळ व अर्धांगावर पारंपरिक उपचारांचा उपयोग होतो असा दावा आहे. त्याप्रमाणेच श्वान-विंचू-सर्पदंशावर उपयोग होतो असे सांगण्याचा हेतू असावा. पण स्पष्टपणे तसे लिहिलेले आढळले नाही.

तर एका अर्थाने हे पारंपरिक उपचार निरुपयोगी आहेत असाच निष्कर्ष निघतो. लेखकालाही तो मान्य असल्याचे दिसते. त्यामुळे आधुनिक वैद्यकीय उपचारही परिपूर्ण नाहीत असा युक्तिवाद केलेला आहे. आधुनिक वैद्यकीय उपचारांनुसार सर्पदंशानंतर तासाभरातच उपचार केल्यानेच रुग्ण वाचवता येतो, मात्र पारंपरिक उपचारांनी मेलेला माणूसही जिवंत करता येतो असा दावा असता तर त्या युक्तिवादात काही तथ्य होते. तर जे उपचार निरुपयोगी आहेत त्यांच्या समर्थनार्थ इतका खटाटोप करण्यात काय हशील?

३) आधुनिक वैद्यकीय उपचार घेणे शक्य नसते म्हणूनच केवळ ग्रामीण जनता पारंपरिक उपचारांचा अवलंब करते असा लेखाचा सूर आहे. कायदा सुचवणार्‍या, करणार्‍या आणि हे लेख वाचणार्‍यांपैकी कोणालाही महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाबद्दल काडीचीही माहिती नाही असा लेखकाचा समज आहे का?

लेखांक क्रमांक दोनमधील स्वतःच्या वर्तनाचे दाखले अन्य लेखांतील भूमिकेशी मेळ खात नाहीत. उक्ती आणि कृती यांतील अशा प्रकारचा विरोध प्रथमच पाहण्यात आला. आणि तो कसाही असला तरी स्वागतार्ह आहे. (लेखांतून आधुनिक गोष्टींच्या अपुरेपणावर बोट ठेवत आरंपरिक गोष्टींचे समर्थन, तर प्रत्यक्षात आधुनिक गोष्टींचीच कास धरणे)

४) आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ व्यक्तिगत कार्याची माहिती दिली गेली. जादूटोणा विरोधी कायच्या समर्थनार्थ डॉ. दाभोलकरांच्या जीवन आणि कार्याची माहिती द्यायला काही हरकत नसावी.

क्रमशः

नंदिनी, भरत मयेकर ... उत्तम पोस्टस.

१) प्रत्येक गावात पक्का रस्ता तयार करावा.

२) प्रत्येक गावात अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करावी.

३) किमान दहा गावासाठी एक M.B.B.S निवासी डॉक्टर नेमावा. त्याला ग्रामीण भागातच मुख्यालयात २४ तास हजर राहण्याची सक्ती करावी.

>> हे नक्कीच व्हायला हवंय. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षं झाली तरी हे अजून होत नसेल तर सरकार बरोबर गावकर्‍यांनाही प्रयत्न केले पाहिजेत.

४) सर्पदंश झाल्याचा संदेश पोचल्याबरोबर स्वतः डॉक्टरनेच त्या स्थळी पोचावे आणि उपचार सुरू करावे. (जसे पोलिस खाते घटनास्थळी पोहचते.)
>>> हा मुद्दा प्रॅक्टिकल आहे का? एकाच डॉक्टरनं दवाखान्यातले पेशंट पहावे की दवाखाना सोडून वेळीअवेळी धावत सुटावं? (पारंपारिक उपचार करणारे धावाधाव करून सर्पदंश झालेल्या स्थळी जाऊन उपचार करतात का?) दवाखान्यात उपचार अधिक व्यवस्थित होतील ना?

त्यापेक्षा गावातील लोकांना सर्पदंशावरच्या प्राथमिक उपचारांबद्दल प्रशिक्षित करता येऊ शकते.

<(पारंपारिक उपचार करणारे धावाधाव करून सर्पदंश झालेल्या स्थळी जाऊन उपचार करतात का?)>

ज्जे बात!

आपले विचार पटत नसले तरी आपले कार्य व हेतू या विषयी शंका नाही. आपण काय लिहिल आहे हे आपल्याला तरी कळते का? अस मी म्हणणार नाही. आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. ते पट असल्याचे वा नसल्याचे असे म्हणण्याचे स्वातंत्र्य इतरांना आहे. आपल्या शेवटच्या दोन मुद्द्यांच्या आशयाशी सहमत आहे. सक्षम वैद्यकीय सेवा लोकांना परवडेल अशा खर्चात उपलब्ध करुन दिली तर या विषयावरील अंधश्रद्धांचे प्रमाण वेगाने कमी होईल. सरकार ने देवीनिर्मुलना बाबत अशी मोहिम उत्तम राबवली होती

@ मुटे

तुम्ही कायद्याचा काढला जाणारा कीस या भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. शहरी भागातल्या लोकांपेक्षा ग्रामीण भागातले लोक या कलेत निष्णात असतात असं आपलं अनुभवाने वाटतं. कायदा झाल्यानंतर त्याचा शाब्दीक कीस काढून काय होईल हे सांगता येणं कठीण आहे. पण कायद्यामुळे जिथे वैद्यकीय व्यवस्था नाही तिथे पर्यायी उपचार घेतले तर कारवाई होईल ही भीती निराधार आहे. जेव्हां एखादा कायदा खूपच कडक असतो तेव्हां न्यायालय नैसर्गिक न्यायत्त्वाचा भंग तर होत नाही ना याविषयी संवेदनशील होते. खटला सरकारपक्षातर्फे चालवला जाईल. कुठलीही सुविधा दिलेली नसताना जर रोग्याला नाईलाजाने इतर उपायांचा विचार करावा लागला हे सिद्ध झालं तर न्यायालय सरकारची खरडपट्टी काढेल असं नाही का वाटत ?

आपण तुमच्या विरोधाच्या चार कारणांचा इथे विचार करूयात.

माझा या कायद्याच्या कलम नऊला विरोध आहे कारण;

१) त्यामुळे उपचार निवडीचे स्वातंत्र्य धोक्यात येते : असं दिसत नाही हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे. शांतपणे पुन्हा एकदा प्रतिक्रिया वाचा.

२) रोग्याने उपचार पद्धती कोणती निवडावी, हा प्रबोधनाचा विषय आहे, सक्तीचा नाही. : अगदी बरोबर. रोग्यावर उपचारपद्ध्तीची सक्ती नको असंच कायदा सांगतो. रोग्याला वैद्यकीय सुविधा मिळत असतानाही देवीचा कोप होईल अशी भीती घालून त्याला तिकडे जाण्यापासून रोखणे याला कायदा विरोध करतो. या सुविधा नसताना रोगी केला तर अर्थातच कारवाईचा प्रश्न येत नाही. ते अपयश सरकारपक्षाचं असेल.

३) या कलमामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन पारंपरिक उपचारपद्धतीचे अस्तित्व धोक्यात येईल. : कुठेही असं दिसत नाही. धाकामुळे आधुनिक वैद्यकशास्त्राचा लाभ घेता न येणं हे बंद होईल. तुम्ही दोन्ही उपचार एकाच वेळी करू शकता.

४) हे कलम लागू करण्यामागे सरकारचा उद्देश जनहिताचा नसून सवंग लोकप्रियता मिळविण्याचा आहे. : तसं असतं तर चौदा वर्षे विधेयक लटकवण्यामागे सरकारची मानसिकता काय असेल ?

खटा Proud

मागच्याच भागात तुमचंच म्हणणं अतिसंक्षिप्त स्वरुपात मांडलं होतं.
जर एखादा अंधश्रद्धांना विरोध करणारा साप अंधश्रद्ध माणसाला चावला किंवा याउलट (अंधश्रद्ध साप अंधश्रद्धाविरोधी माणसाला चावला) तर काय करायचं यावर हे विधेयक काहीच म्हणत नाही. कोर्टात वकील या मौनाचा सोयीस्कर फायदा घेतील का ? तसच अंधश्रद्ध माणसाला त्याच जातीचा साप चावला पण त्या माणसाला देवीकडे न नेता डॉक्टरकडे नेलं आणि तो मेला किंवा उलट झालं तर काय यावर देखील कायद्यात उहापोह नाही. साप श्रद्धाळू, अंधश्रद्धाळू किंवा अंधश्रद्धाविरोधी आहे याचं प्रमाणपत्र असायला हवं किंवा नाही आणि ते कुणी द्यायचं याबद्दल देखील कायद्यात काहीच म्हटलेलं नाही. कोर्टात गारुडी म्हणेल तेच सत्य मानावे लागेल का ?

हलकेच घ्याल ना मुटे ? Wink

देवा धाव रे!

मुटे,
तुमचे शेतकरी हितासंबंधीचे लेखही जरा नीट वाचून पहायला हवेत.
शेतकरी संघटनेत आहात म्हणून जे लिहिले ते बरोबर लिहिले असेल असे वाटले होते.

पण या लेखमालेत पाजळले आहे, असलेच लॉजिक लावून तुम्ही शेतकर्‍यांचे हितासाठी म्हणून कामे/मागण्या करीत असाल, तर नो वंडर शेतकरी संघटना ही आजकाल हास्यास्पद झाली आहे. व सरकार तुमच्या मागण्यांना हसण्यावारी नेते आहे.

सर्पदंश झाल्यानंतर त्या दंश झालेल्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या नातेवाइकाकडून फोनवरून सूचना मिळाल्याबरोबर त्या प्रभागासाठी नेमलेला डॉक्टर तातडीने स्वतः दंश झालेल्या व्यक्तीकडे जाईल आणि उपचार सुरू करेल.
>> महाराष्ट्रात जसे अनेक गावात रस्ते, दवाखाने नाहीत तसेच अनेक गावात नेटवर्क पण मिळत नाही. फोनच्या लाईनीच नाहीत. मग फोन कसा करायचा?

जर उपचार सुरू होण्यास दिरंगाई किंवा हयगय झाली आणि सर्पदंश झालेला व्यक्ती जर दगावला तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येईल.
>> डॉक्टरकडे त्याचवेळी एखादी महत्त्वाची केस असेल किंवा
तो ओपरेशन करत असेल किंवा
यायला उशीर झाला (गाडी पंक्चर होणे, बिघडणे इ.) किंवा
एकाच वेळी दोन वेगळ्या गावांत सर्पदंशाच्या घटना घडल्या असतील किंवा
डॉक्टरला स्वतःलाच साप चावला असेल तर मग काय करणार?

किमान दहा गावासाठी एक M.B.B.S निवासी डॉक्टर नेमावा. त्याला ग्रामीण भागातच मुख्यालयात २४ तास हजर राहण्याची सक्ती करावी.
>>
डॉक्टरला काही वैयक्तिक जीवन आहे की नाही?
गाई-गुरांसारखे दवाखान्यात बांधून ठेवायचे की काय?

मुटेजी,
हा लेख परत एकदा नीट वाचा. त्यातील मुद्दे तपासा. नीट सर्व बाजूंचा विचार करा. अनेक त्रुटी तुम्हालाच आढळून येतील.

च्च, राहुल,

ते कविमनाचे मोठ्ठे शेतकीसंबंधी विषयाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना त्यांच्या मुद्द्यांचा पुनर्विचार करायला सांगताहात तुम्ही? अर्र! बोटे कशी रेटतात तुमची असे टंकताना?

यांच्या पहिल्या धाग्यापासून यांना काही विचारतो आहे मी.
एकाचे उत्तर येइल तर शपथ Happy

@ नंदिनी

तुम्ही काय लिहत आहात तेतरी तुम्हाला समजत आहे का?

होय. Happy

मागच्या लेखात तुम्हाला पाच प्रश्ने विचारले होती. त्यांची तरी किमान उत्तरे द्या.

सर्वच पाचही प्रश्नांचे उत्तर "नाही" असे आहे.

उगाचच "मॅजा विरोध आहॅनॅ, मॅग तो कॅयॅदाच चुकीचॅ"

हॅ नॅय श्यॅमॅजॅलअ‍ॅ.

मागच्या लेखात तुम्हाला पाच प्रश्ने विचारले होती. त्यांची तरी किमान उत्तरे द्या.

सर्वच पाचही प्रश्नांचे उत्तर "नाही" असे आहे.

<< सविस्तर उत्तरे द्या. एका वाक्यात नको.

@ भरत मयेकर

१) श्वान-सर्प-विंचू दंशावर पारंपरिक उपचार परिणामकारक असतात असे सांगणारे एकही वाक्य चारही लेखांत मिळून नाही. उलट तसे काही होत असेल असा दावा नाही हे स्पष्ट केलेले आहे.

बरोबर.

२) कावीळ व अर्धांगावर पारंपरिक उपचारांचा उपयोग होतो असा दावा आहे.

नाही. ते फक्त तुलनात्मक उदाहरण आहे. समर्थन अथवा दावा नाही.

लेखांक क्रमांक दोनमधील स्वतःच्या वर्तनाचे दाखले अन्य लेखांतील भूमिकेशी मेळ खात नाहीत. उक्ती आणि कृती यांतील अशा प्रकारचा विरोध प्रथमच पाहण्यात आला.

असे होण्याचे काहीच कारण नाही. तरी नेमके सांगीतले कळायला तर बरे पडेल.

@ प्रकाश घाटपांडे

आपले विचार पटत नसले तरी ..............

विचार पटलेच पाहिजे असे आवश्यक नसते. मी जे लिहितो, गद्य किंवा पद्य ते मला जे वाटत असते तेच लिहितो. वाचणार्‍यांना वाचून काय वाटेल, हा विचार माझ्या मनात नसतो.
वाचकांच्या आवडीनिवडी बघून तर अजिबात लिहित नाही. Happy

@ बेफ़िकीर

नुसतेच हसता राव. बोला की काहीतरी. Happy

मनातून असे वाटते की, तुम्ही बोलुच नये. या प्रतिसादांच्या महापूरात माझ्यासोबत तुम्ही पण वाहून जायचे. पुराचा कायबी भरवसा नसतो. त्यो चांगलं वाईट काय बी जाणत नाय. सरसकट सारंच खड्डून नेतो. Wink
---------------
@ खटासि खट

न्यायालय सरकारची खरडपट्टी काढेल असं नाही का वाटत ?

वाटतं. पण न्यायाधीशाच्या खरडपट्टीला सरकार कुठे घाबरतं?
सरकारला सरळ फक्त जनताच करू शकते.

१) ते ३) - तुमच्या मताशी मी सहमत नाही.

४) चौदा वर्षे विधेयक लटकवण्यामागे सरकारची मानसिकता काय असेल?

- बहुधा अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी विधेयक आहे, असे वाटत असावे म्हणून लटकले असावे. आता सुद्धा मंत्रीमंडळाने कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली असावी, असे वाटत नाही.

अजून किती भाग आहेत....????
मी पॉपकार्नचा अजून एक डबा मागवण्याच्या तयारीत आहे म्हणून विचारले...:)

@ Kiranu | 27 August, 2013 - 19:17

नागाचं जाऊ द्या. पण नागिनीला काय वाटेल त्याचाही विचार करा. नागाने मनुष्यरूप धारण केल्यावर जर त्या मनुष्यरुपी नागाला जर कोणी अंधश्रद्धा म्हणून हिनविले तर नागीन खवळणारच. जर ती शक्तिधारी नागिन आणि या कायद्यामुळे खवळलेला मांत्रिक, या दोन शक्ती जर एकत्र आल्या तर आपल्याला पळायला चंद्र आणि मंगळावर सुद्धा लपायला जागा मिळायची नाही. चला आपण सुर्यावर जाऊन लपुयात का? Happy

@ इब्लिस | 27 August, 2013 - 19:41

तुमचे शेतकरी हितासंबंधीचे लेखही जरा नीट वाचून पहायला हवेत.

नक्की बघा. चलो, इस बहाणे तुम्हे मेरे लेख तो याद आये!

-------------------
@ राहुल१२३ | 27 August, 2013 - 19:48

<<< फोनच्या लाईनीच नाहीत. मग फोन कसा करायचा?
डॉक्टरकडे त्याचवेळी एखादी महत्त्वाची केस असेल किंवा
तो ओपरेशन करत असेल किंवा
यायला उशीर झाला (गाडी पंक्चर होणे, बिघडणे इ.) किंवा
एकाच वेळी दोन वेगळ्या गावांत सर्पदंशाच्या घटना घडल्या असतील किंवा
डॉक्टरला स्वतःलाच साप चावला असेल तर मग काय करणार? >>>

काहीच करायचे नाही. शेतकरी मरतोय त्याला मरू द्यायचे. सरकारने सुद्धा शेतकर्‍याला वाचवण्यापेक्षा मांत्रिकाने "जर अडथळा" निर्माण केला तर त्याला पहिले तुरूंगात डांबण्यासच प्रायोरिटी दिली आहे. सर्प दंश झालेल्याचे पुढे काय करायचे हा सरकारचा एजेंडाच नाहीये.
-------------
@ इब्लिस | 27 August, 2013 - 23:01

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

श्री. मुटे, एकामागे एक लेख टंकण्यापूर्वी एकदा खरच विचार करावा ही नम्र विनंती!

अवांतरः मागील तीन लेख आणि प्रतिक्रिया वाचल्यानंतर या लेखातील फक्त प्रतिक्रिया वाचल्या आणि चांगलीच करमणूक झाली!

मुटेजी तुम्हाला ती गोष्ट माहित असेलच. ती नाही का, ज्यामधे एक माणुस त्याची घरात हरवलेली वस्तू बाहेर रस्त्यावर शोधत बसलेला असतो. का तर , घरामधे अंधार असतो आणि रस्त्यावर दिव्याचा उजेड असतो म्हणुन. पण जी गोष्ट घरातच हरवली आहे , ती उजेड असला तरी रस्त्यात शोधून काय उपयोग ?
तुमचे तसे चाललेय , वैदू , मांत्रिकाचे उपाय शेतकृयांना सहज उपलब्ध आहेत आणि परवडणारे आहेत. अरे पण त्या उपायांनी सर्प दंश बरा होणारच नाहीये ना. मग ते उपचार फुकट जरी असले तरी काय उपयोग ? ? जसे की रस्त्यात उजेड असला तरी घरात हरवलेली वस्तू रस्त्यात सापडणारच नाही.

ह्म्म , अता घरातली वस्तू शोधण्यासाठी घरात उजेड आणणे आवश्यक आहे. म्हणजे गावोगावी परवडण्याजोगी आणि सहज उपलब्ध आरोग्यसेवा पुरवणे गरजेचे आहे , हे अगदी बरोब्बर. पण मग त्यासाठी प्रयत्न करा ना , किंबहुना या कायद्याच्या निमित्ताने गावोगावी आरोग्यसेवा पोचवण्याच्या मागणीला आणखी जोर येणार नाही का? . पण आरोग्यसेवा उपलब्ध होत नाही म्हणुन मांत्रिक , वैदूची भलावण करणे अयोग्यच आहे.

Pages