मी, कॅन्सल झालेलं रिझर्व्हेशन आणि नुरिया

Submitted by Omkar Deshmukh on 23 August, 2013 - 14:10

दिवाळीनिम्मित पुण्याहून कोकणात यायचे ठरले होते. वोल्व्होचे आरक्षण करणे म्हणजे छ्या , एरवी ३०० मध्ये नेणारा तो आता ६०० सांगत होता. ह्यापेक्षा मग एशियाड काय वाईट म्हणून एशियाडने जायचे ठरवले. माझी एक मानलेली बहिण कम मैत्रीण जी माझ्याच गावी राहते तिच्या बाबांनी मला सांगितलं की ती एकटी येतेय रात्रीची, दोघ या त्यापेक्षा.ठीक आहे म्हणत तीच पण माझ्याच जोडीला रिझर्व्हेशन करून टाकल, सीट नंबर १३ खिडकी,१४. पणजी गाडी होती. म्ह्टल चला, १० तासांच्या प्रवासात कोणीतरी बडबड करायला आहे,गाणी तरी ऐकून ऐकून किती ऐकणार ? अगदीच निरस प्रवास होणार नाही असे वाटले होते.
सगळी तयारी आटपून स्वारगेटला पोहोचलो आणि मैत्रिणीचा फोन आला की अरे आज येऊ शकत नाही, प्रॉब्लेम आहे. आता मी ठीक आहे म्हणण्याशिवाय दुसर काय करू शकणार होतो? तोंडावर आलेली 'स्तुतीसुमने' महत्प्रयासाने थांबवत फोन कट केला. E - Reservation असल्याने तिकिटावर नाव गाव फळ फुल होते त्यामुळे तिच्या जागेवर मी ते दुसऱ्याला विकू देखील शकत नव्हतो. पैसे तिचेच गेले असल्याने मला फारशी हुरहूर वाटली नाही. मी गाडी येईपर्यंत स्थानकातल्या बाकड्यावर ठाण मांडले. बाजूला एक प्रौढ बाई आणि तिचा मुलगा बसला होता. त्या बाईने अत्तर लावलं होत की कुंभमेळा समजून त्यात डुबकी मारली होती ते कळायला मार्ग नव्हता पण त्या तीव्र घमघमाटाने माझं डोकं पार उठलं होत एवढ निश्चित.
तेवढ्यात बस आली. रिझर्व्हेशन असताना मी मुद्दाम सगळ्यात उशिरा चढतो, कारण आधी कोणीतरी सीटवर जाऊन बसतात आणि सगळ्यांना नीट बसवून सामान लावतात आणि "हे लगेच चढले पुढे म्हणून जागा मिळाली हा" असं करत महिलावर्ग कौतुक करतो, आणि पुरुषवर्ग जरा कॉलर ताठ करत असतानाच मी एन्ट्री घेतो आणि "माफ करा, पण मी रिझर्व्ह केलेल्या जागेवर तुम्ही बसला आहात, हे पहा माझे तिकीट" असे वाक्य टाकले की त्यांचे चेहरे बघण्यालायक होतात. कौतुक संपून "काय हो, आधी रिझर्व्ह आहे की नाही ह्याची खात्री का नाही केलीत? " असा क्रोधावेशाने ओतप्रोत भरलेला प्रश्न पुरुषवर्गावर फेकला जातो आणि पुरुषवर्ग दुसरी सीट शोधत असतो, अश्यावेळी यांची चिमणी स्टाईल तोंड बघायला खूप मजा येते.
मी आपली सामानाची बॅग वर ठेऊन लॅपटॉपची बॅग मांडीवर ठेवली. इतक्यात कंडक्टर तिकीट चेक करत माझ्याकडे आला तेव्हा मी म्हटलं "बाबारे, बाजूची सीट कॅन्सल झालीय, घे कोणाला तरी", तो मान डोलवित पुढे गेला. गाडी जवळपास पूर्ण भरली होती, दोन तीन रिझर्व्हेशनच्या सीट्स यायच्या बाकी होत्या. एव्हाना कंडक्टर आणि ड्रायव्हर कुठे तरी गायब झाले होते. आता बाजूला कोण पात्र येणार आहे देवास ठाऊक असं म्हणत कानात इअर फोन सारून किशोर कुमारची भक्ती सुरु केली. तेवढ्यात एक मुलगी गाडीत प्रवेश करता जाहली,
मी झटक्यात इयर फोन काढत तिच्याकडे बघत होतो, त्या रिझर्व्हेशनच्या दोन सीट रिकाम्या होत्या तिथे ती गेली तर तिथली काही मंडळी ऑलरेडी आलेली होती, त्यांनी लगेच तिथे रुमाल टाकल्यावर तिने मोर्चा माझ्या सीटकडे वळवला, मी जरा सावरून बसलो.ती, "यहापर कोई है ?" मी, "हा जी मेरे दोस्त का रिझर्व्हेशन है" , ह्यावर तिने ओठांचा चंबू करत निराश चेहऱ्याने माझ्याकडे पाहीले.
"अब बस कबकी है ? ८ बजेकी बस भी मिस हो गयी, अब मै क्या करू" असे तिने म्हणाल्यावर क्षणार्धात डोक्यात होती नव्हती तेवढी चक्र वेगाने फिरवत तिच्याशी बोलायला सुरुवात केली. त्या जागेवरचा रिझर्व्हेशन कॅन्सल झालंय हे मी तिला सांगून टाकायला मी काय अलिबागवरून आलो नव्हतो. लगेच बोलून टाकलं की "अगर आप कहो तो आपके बैठना का इंतझाम कर सकता हु" , तर मोट्ठे डोळे करत ती माझ्याकडे आशेने बघायला लागली. तिला लास्ट स्टेशन अर्थात पणजीला जायचं होतं , जवळपास ४७० रुपये तिकीट आहे. मी तिच्याकडून पैसे घेतले (ती कितीही गोड असली तरी ४७० रुपयाला मी कश्याला खड्यात पडू असा विचार केला) आणि "आप यहापे बैठीये और मेरी लॅपटॉप की बॅग जरा संभालना" असं जरा अधिकारवाणीच्या सुरात बोलत मी पैसे घेऊन बसच्या खाली उतरलो, मोबाईल रिचार्जच्या शॉपकडे कंडक्टर दिसला, तातडीने त्याला गाठत परिस्थिती सांगितली आणि पैसे देत तिकीट मिळवलं. आणि लगबगीने गाडीत आलो, आधी चेहऱ्यावर काही भाव न दाखवता खिडकीजवळ बसलो. ती माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती, "क्या हुआ,बताओ ना" असं म्हणत तिने माझा दंड पकडला तेव्हा सप्तसूर झंकारीत बोले च्या तालावर माझं शरीर थरारल. मी दचकून दंड हलकेच सोडवून घेतला. छातीचे ठोके जरा नॉर्मल झाल्यावर, "मैने बडे अच्छे तरीकेसे बातचीत की है, कोई टेन्शन नही,जगाह मत छोडना नई तो प्रॉब्लेम हो सकता है, ये लीजिये आपका तिकीट" असं म्हणत तिच्या हातात तिकीट दिलं तेव्हा तिने परत परत ते तिकीट वाचून बघितलं आणि परत माझा दंड धरत "शुक्रिया जी" म्हणायला लागली तेव्हा परत सप्तसूर झंकारायला लागले आणि "पाया पडतो ग बाई , हात नको ग धरू, कसं तरी होतंय" असं मनात म्हणत होतो, ती माझ्या हाताला धरून ते तिकीट परत वाचत होती, ह्या सगळ्यात एवढ निश्चित झालं होत की तिची माझ्यावर जबरी श्रद्धा बसली होती, आणि ४०० किमी पार पडेपर्यंत तिची श्रद्धा तुटू द्यायची नही एवढचं मला सांभाळायच होतं.तो कंडक्टर देखील कोल्हापूरला उतरणार असल्याने मी केलेला गोंधळ तिला तसा समजणार नव्हता ही गोष्ट वेगळी होती.
गाडीने स्वारगेट सोडलं होतं, तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. मला सारखे फोन येत होते, आता मला फोन वापरावासा वाटत नव्हता, तो मी सायलेंट करत गप्पा कंटिन्यू केल्या. ती उत्तर प्रदेशची लखनौ मधली होती,amity मध्ये शिकायला होती. तिने तिचे नाव नुरिया असं सांगितलन. मी विचारला नसताना तिने तिच्या नावाचा अर्थ देखील सांगितला पण ते मला काही नीट समजलं नाही आणि परत विचारण प्रशस्त वाटलं नसतं. मध्यम उंची, बाळसेदार बांधा, चेहरा गोल होता, गोरा रंग, काळेभोर केस. हरणीसारखे मोठ्ठे डोळे, किंचित गरुडी बाक असलेले नाक (ह्या अश्या नाकाच्या मुली शक्यतो aggresive असतात आणि यांच्याबरोबर भांडायला खूप मजा येते पण प्रेमळ देखील असतात हेही तितकच खर.), लालचुटुक ओठ आणि चेहऱ्यावर ५ तिळ होते पण ते सौंदर्यात भर घालत होते, एकदम गोग्गोड दिसत होती. T-Shirt आणि पटीयाळा तत्सम वेश परिधान केला होता,त्यातलं फारसं मला काही कळत नाही,आपल्याकडच्या मुली काहीतरी घालतात हेच खूप आहे. तिचं निरीक्षण करताना मी हजारवेळा इकडे तिकडे बघत एक कटाक्ष हळूच तिच्याकडे टाकत तो लोभसवाणा चेहरा मनात साठवला, थेट रोखून तरी कसं बघणार ना (शेवटी संस्कार आहेत म्हटलं) !
कंडक्टरने दिवे मालवून टाकले आणि तेवढ्यात समोरून गाडी येत असताना साईड घेण्याचा नादात ड्रायव्हरने जोरात स्टेरिंग वळवले ( पूर्ण प्रवासात त्याने फार काळ स्टेअरिंग सरळ धरून ठेवले असल्याचे मला स्मरत नाही,पण त्याच्या ड्रायव्हिंगमुळे मला गोड गुदगुल्या खूप झाल्या, मी एवढा खुश होटो त्याच्यावर की त्याचा ऑटोग्राफ घ्यावा असे पण वाटून गेले असो) आणि तिने स्वाभाविक रित्या माझा हात आधारासाठी घट्ट पकडला. तिच्या मुलायम हाताचा स्पर्श झाल्यावर शॉक लगा शॉक लगा असं व्हायचं. ड्रायव्हर फुल मूड मध्ये होता आणि ही काही "आधार" सोडत नव्हती, डोळे मिटून व्याडेश्वराचा धावा केला पण तो काय डोळ्यासमोर येईना ,एक मन म्हणालं की " अरे मेल्या तू धर्म काय बुडवतोस ? पाप लागेल ना ? दुसर म्हणालं "हाड तेच्या आयला, बाजीरावाचा वारसा सांगता ना रे ? हिचा बिचारीचा काय दोष, गोड पोरगी आहे!" अशी मनात आंदोलने सुरु होती आणि मी अभावितपणे "जरा संभालके बैठीये" असं म्हणत तिने माझ्या हातावर हात ठेवला होता त्यावर मी परत हात ठेवला . "उससे अच्छा है की आप मेरे जगाह पे बैठ जाओ, यहासे पडोगी नही"(सत्यानाश, माझं हिंदी म्हणजे कहर आहे. तिचं हिंदी खूप सफाईदार होत. माझी घोडचूक तिच्या लक्षात आली नाही की तिने तस दाखवलं नाही हे देवाला माहित). तिने पडत्या फळाची आज्ञा मानून माझ्या जागेवर खिडकीजवळ बसली. ११च्या सुमारास शिरवळ स्थानक आलं, "१५ मिनिट गाडी थांबेल" असा पुकारा कंडक्टरने केल्यावर तिने विचारले की "बाहर जायेंगे क्या?" मग मी म्ह्टल " इसी टाईम शराबी होंगे, आपको कोई परेशान करेगा तो , आप यहापे बैठीये, मै लाता हु" ,तिने म्ह्टल "तो क्या हुआ? तुम तो हो ना साथ मे " असं म्हणत हात धरलान आणि परत माझ्या high bp -low bp चा खेळ सुरु झाला. ही सारखी सारखी हात धरून माझं bp का वाढवते ते मला समजत नव्ह्त.
आमच्या स्वाऱ्या तिथल्या हॉटेल मध्ये एका बाकावर स्थानापन्न झाल्या, आधी मी समोर बसलो आणि मग हात धुवत परत येऊन तिच्या बाजूलाच बसलो. ऑर्डर घ्यायला आलेला वेटर तर बाराचाच दिसत होता, खांद्यावर एक कळकट्ट फडका अडकवून कराकरा दाढी खाजवत वटारलेल्या डोळ्यांनी तो आमच्याकडे बघत होता. मी म्ह्टल बाबा रे, दोन राईस प्लेट दे . तिथे काही दुसर मिळणार पण नव्ह्त आणि असलं तरी ते खावसं देखील वाटत नव्ह्त. जिंदगी मिलेगी ना दोबारा देखा है क्या तुने ? असं तिला विचारल्यावर " mi naai buva " अश्या अर्थाने तिने मान हलवली. चला बर झाल असं म्हणत , "जब जब दर्द का बादल छाया, जब गम का साया लहराया, जब आंसू पलको तक आया, जब यह तनहा दिल घबराया, हमने दिल को यह समझाया की दिल आखिर तू क्यू रोता है,दुनिया मे यही होता है" ही इम्रान खान ने म्हटलेली शायरी हळू आवाजात गुणगुणली, तिने डोळे विस्फारून विचारलं "तुम शायरी लिखते हो"? मी सस्मित चेहऱ्याने "देवाची कृपा" अश्या थाटात खांदे उडवले. मी खरे तर होय असेही म्हटले नाही आणि नाही असं पण म्ह्टल नाही त्यामुळे कोणी माझ्यावर दावा नाही ठोकू शकत. एक और करो ना , प्लीज प्लीज प्लीज असं म्हणत तिने माझ्या मागे धोशा लावला. झालं आता कल्याण ?
माझ्या मोबाईलमध्ये ९ रुपये होते, ते मी सकाळी घरी फोन करून बोलवण्यासाठी ठेवले होते, पण आता त्याचा झक मारत मला GPRS प्लान सुरु करावा लागला. लगेच तिची नजर चोरत मिर्झा गालिबच्या शायऱ्या गुगलून काढल्या. "वह फिराक और वह विसाल कहा? वह शब ओ रोझ ओ माह ओ साल कहा ?(आयशपथ, तेव्हा मला घंटा देखील कळत नव्ह्त मी काय वाचतोय ते, कुठून उर्दूत शिरलो असं झालं मला.) पण मी आपलं ऐकवत होतो आणि ती ऐकत होती. ती लखनौची आहे शिवाय मुस्लीम आहे म्हटल्यावर तिचे उर्दू चांगले असणार ह्याची मला खात्री होती. शायरी संपल्यावर ती एवढी गोड हसली की त्या हास्यासाठी मिर्झा गालिबला थडग्यातून परत बाहेर ओढून आणावं असं वाटत होत. "आपको उर्दू आती है?" असं तिने प्रश्न टाकल्यावर "आप जैसे बेहतरीन तो नाही आती है" असं म्हणत कॅरम बॉलला द्रविड जसा टुक्क करून खेळतो तसा सेफ गेम खेळला, दरवेळा होय म्हणायला येडा आहे का मी ? जेऊन झाल्यावर पानं खायेंगे आप असं म्हटल्यावर ती आढेवेढे घेत हो म्हणाली, अर्थात हिंदीत. कलकत्ता पानं खाऊन तिचे ओठ छान रंगले होते.
दोघजण परत गाडीमध्ये येऊन बसलो. थंडी वाढायला लागली होती, तिच्याकडे एक स्टोल टाईप काहीतरी होतं. त्याने थंडी काय वाजायची थांबणार होती म्हणा? मी मनात "येस्स" म्हणून लॅपटॉपच्या बॅगमधून शाल काढली आणि म्हटलं "लीजिये" , तिने आधी नकार दिला आणि "फिर आपको भी थंड लगेगी" असं विचारलन. धत्त तेरी ,तू बाजूला असताना थंडी वाजायची काय बिशाद असं मी पुटपुटलो आणि "बाद मे देखेंगे,अभि आप पहन तो लो" असं सांगितलं. तिने शाल स्वतःभोवती गुंडाळून घेतली,मध्ये मध्ये खांद्याला खांदा लागून होणारा तो नाजूक स्पर्श सुखावून जात होता. खिडकीच्या बाबतीत झोल असा झाला होता की खिडकी पूर्ण बंद होत नव्हती आणि त्यातून थंड वाऱ्याचा झोत वेगाने येत होता आणि खिडकीजवळ बसल्यावर साधारण आपण खिडकीवर डोकं ठेवतो तो बार आणि खिडकीची खिट्टी तिथे डोकं टेकवल तर डोक्याला टोचत होत, ह्याचा परिणाम हा झाला की ती त्या बाजूला न झुकता थोडी माझ्यावर भार टाकून बसली होती. ह्यामुळे माझ्या रक्तदाबाचं आंदोलन जोरात सुरु झालं. गाडी अंधार कापत मागर्क्रमण करत होती, सातारा मागे पडत कोल्हापूरच्या वेशीवर आलो. एवढ्यात आमच्या बाईसाहेब (ही संज्ञा वापरताना मनास गोड गुदगुदल्या जाहल्या आहेत) गाढ झोपल्या होत्या. ड्रायव्हर का एवढा चेकाळला होता ते माहिती नाही पण तो दात ओठ खात गाडी हाकत होता आणि बसणाऱ्या धक्यांमुळे तिचं डोकं त्या बारवर आदळत होत, तिची झोपमोड होऊ नये म्हणून तिच्या पाठीमागून हात डावा हात नेत तो बार पकडला. आता तिचं डोकं बारऐवजी माझ्या हातावर आदळत होत म्हणजे तिला त्रास झाला नसता पण तिचं डोकं एवढ जड असल्याची मला कल्पना नव्हती त्यामुळे माझ्या हाताले ते हादरे नंतर सहन होईनात. तर मी थोडा चावटपणा करत बारवरचा हात काढून तो तिच्या डाव्या खांद्यावर ठेवत तिला जरास कुशीत ओढून घेतल्यासारख केलं, आणि हात तसच ठेवत थोडीशी पकड घट्ट केली, आता ती जवळजवळ माझ्या मिठीत शांत झोपली होती. तिला बहुदा हे समजत होत कारण तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य चमकून गेल्याचा भास झाला. हळूहळू मला देखील झोप अनावर होत मी देखील तिच्या डोक्यावर डोकं टेकवून झोपी गेलो. तीन चार तास तिला तसच कवटाळून शांत झोपलो होतो. एवढी छान झोप आणि सुद्धा राज्य परिवहनच्या बस मध्ये आजन्मात लागली नव्हती. जेव्हा जाग आली आणि डोळे किलकिले करत तिच्याकडे पाहिलं तेव्हा तिचं डोकं माझ्या छातीवर टेकलेल होत आणि मी दोन्ही हातानी तिला मिठी मारली होती, एवढी प्रगती मी झोपेत केली होती हे मला आता माहिती पडलं.
घड्याळात बघितलं तर ४.४५ वाजले होते. आता फक्त अर्ध्या पाउण तासाची सोबत होती. ती तर अजून तैशीच छातीवर डोकं घुसळत झोपलेली. त्या स्पर्शाने मनात भावनांच्या लाटा उंचबळून येत होत्या. वाऱ्यावर तिचे केस भुरूभुरू उडून माझ्या चेहऱ्याला स्पर्शत गोड संवेदना जागवित होते. तिचा गरम श्वास हातावर जाणवत होता. तिच्या मऊ शरीराचा स्पर्श खूप सुखावत होता, त्यावेळी मनात शायरींच्या तारा छेडल्या गेल्या "भूल सकता है भला कौन ये प्यारी आंखे, रंग मे डुबी हुई नींद से भारी आंखे, जागती रातो को सपनो का खजाना मिल जाये, तुम जो मिल जाओ जिने का बहाना मिल जाये,अपनी किस्मत पे करे नाझ हमारी आंखे" .फोंडा सोडून बस कणकवलीच्या दिशेने निघती झाली. आता दोघ कदाचित परत कधीच भेटणार नाही ह्या जाणीवेने मन व्याकूळ झालं अगदी प्रभाकर जोग यांची "ही वाट दूर जाते" ही चीज ऐकताना मन जस आर्त व्हायचं तसच. तिची झोपमोड होणार नाही ह्याची काळजी घेत हळूच तिच्या हातातला माझा हात सोडवून घेतला. तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव बघून सोडून जावेसे वाटेचना.
कंडक्टर ने "कणकवली आलंय,उतरायला घ्या" अशी हाळी देताच लगेच सामान सावरून घेतले. तिच्या अंगावर शाल तशीच राहू दिली. तिच्या कपाळावर ओठ टेकवत काही क्षण स्तब्ध होतो. नंतर अचानक मन भानावर येत सामान घेऊन उठलो आणि मागे न वळून बघता बसमधून खाली उतरलो. मागे वळून बघितलं तर उतरावस वाटणार नाही अशी भिती वाटली. अतिशय जड अंतकरणाने बसच्या पायऱ्या उतरत झटपट बस बाहेर आलो. ही ओळख माझ्या प्राक्तनातच लिहिली होती. ह्या भेटीत जे झालं ते नकळत पण घडत गेलं, त्यात वासना नावाचा प्रकार नव्हता म्हणून मला त्याची अजिबात खंत वाटत नाही. अचानक पारीजातकासारखी येऊन आयुष्य क्षणभरासाठी का होईना पण प्रफुल्लीत करून जाणारी नुरिया आजपावेतो मला कुठेच भेटली नव्हती. प्रवासात अशी बऱ्याचदा चटका लावून जाणारी माणसे भेटतात .
बेटा, चेहरा मायुस हो गया है तुम्हारा,लो खाना खाव असं म्हणत आग्रह करणारी हावडा ट्रेन मधली म्हातारी, आई वडील वारलेत ह्याची काहीच कल्पना नसताना डान्स इंडिया डान्स मे हिस्सा लेनेवाली हु असं ओरडत कम्पार्टमेंट मध्ये धिंगाणा घालणारी चिमुरडी अर्चना आणि डोळे पुसत तिला प्रोत्साहन देणारे तिचे दादाजी, सुरत ट्रेन मध्ये जागा मिळवताना भांडण करता करता अमित शाहबरोबर झालेली ओळख, त्रिवेंद्रमला जाताना एका मुलाची गर्लफ्रेंड जी जर्मन होती ,ती ह्याच्यावर नाराज झाली असता "अपने लोगोंपे कभी रूठना नही जाहीये जानू" असं त्याला तिला इंग्लिश मध्ये पाठवायचे होते आणि त्याच इंग्लिश म्हणजे हरे राम होत. तेव्हा "sweetu,never get angry on your closer ones" हे वाक्य त्याला सुचवले आणि ते त्याने पाठवले तेव्हा पूर्ण कम्पार्टमेंट तिचं उत्तर काय येत होत ते ऐकायला आतुर होता आणि तिचा हसरा स्मायली आला तेव्हा सगळ्यांनी मिळून केलेला जोश आणि बरेच जण आणि आज ही नुरिया. वाटून गेलं की नंबर मागायला हवा होता, पण नंतर वाटलं की ठरवून झालेल्या भेटीत काय मजा? बघू, नशीब चांगलं असेल तर परत कधीतरी एकत्र येउच. चुकलंच ते , तेव्हाच तिच्या खांद्याला धरून गदागदा हलवत सांगायला हव होत की "I like you Nooriya" पण धाडस झालंच नही.
"एक बात होटो तक है जो आई नही
बस आंखोसे है झाकती
तुमसे कभी,मुझसे कभी
कुछ लब्ज है वो मांगती"
कुठल्या तरी अनाहूत जाणीवेने मन थरारून उठलं आणि अंगावर रोमांच उभे राहिले, चटकन वळून बघतोच तर तीच शाल स्वतःभोवती गुंडाळून घेतलेली नुरिया बस मधून डोकं बाहेर काढून माझ्याकडे बघत होती , एक हात बाहेर काढत तिने तिचा रुमाल माझ्याकडे फेकला, तो धुळीत पडू नये म्हणून धावत जाऊन तो हवेतल्या हवेतच पकडला. ती माझ्याकडे बघून गोड हसली, माहित नाही भास होता की खरंच हसली ते !

साभार- रोहित भिडे , आयटी तज्ज्ञ

लेखकाच्या पुर्व अनुग्रहित *

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

आवडले Happy

चांगला किस्सा आहे.

तुमच्या या बस प्रवासात तुम्ही निर्णय घ्यायला उशीर केलात तर माझ्या या लेखात मी घाईघाईने घेतलेला निर्णय बदलताना येणारा ताण व्यक्त केलाय.

http://at-least-i-think-so.blogspot.in/2015/01/blog-post.html