भाग २ वरुन पुढे-
काही वर्षांपूर्वी:
"अभि, तुला परीक्षेचे मार्क कळणार होते ना?" बाबांनी घरी पोहोचल्या पोहोचल्या अभिषेकला विचारलं.
"हो बाबा कळले" त्याने प्रगतिपुस्तक आणून बाबांना दाखवलं आणि तो अपेक्षेने वडिलांकडे बघत तिथेच उभा राहिला.
"अभ्यास झाला नव्हता का? गणित, विज्ञानात इतके कमी मार्क्स?"
"बाबा मी मराठीत हाय्येस्ट आहे"
"हे बघ,मराठीत हाय्येस्ट वगैरे ठीके…पण म्हणून गणित, विज्ञान दुर्लक्षित झालं हे चालायचं नाही! पुढे जाउन करीअर करताना तुम्हाला तुमची मातृभाषा चांगली येते यासाठी कुणी काहीच किंमत देत नाही…तुझं खेळणं कमी कर, टीव्ही बघू नकोस! पुढच्या परीक्षेत तुझे मार्क्स वाढलेले मला बघायला आवडतील…दहावीत तू बोर्डात आलास तर आपण कॉम्प्युटर घ्यायचाय…आहे ना लक्षात? क्लास होता का आज?"
"हो…आलो जाऊन"
"तुझ्या त्या क्लासवाल्या सरांशीपण एकदा बोललं पाहिजे…" अभि मान खाली घालून निघून गेला.
मनात धुसफूस केव्हाच सुरु झाली होती! I आणि Meचं भांडण सुरू व्हायला हा एवढा छोटासा प्रसंग पुरेसा होता-
I: मी एवढा मराठीत हाय्येस्ट आलो त्याचं जराही कौतुक नाही…उलट गणित आणि विज्ञानात कमी का? म्हणून ओरडले. माझा निबंध बाईंनी वर्गात वाचून दाखवला पण ह्यांना कोण सांगणार?
Me: असा विचार करून, त्यांच्यावर चिडून काही निष्पन्न होणार नाहीये! वडील आहेत ते! ते मुलाकडून अपेक्षा करणार नाहीत तर कुणाकडून करणार? आणि मग अपेक्षाभंग करतं कोण?
I: मुद्दाम कुणी करेल का अपेक्षाभंग? कोण स्वतःचं नुकसान व्हावं म्हणून प्रयत्न करेल? आणि मी काही नापास झालो नाहीये! गणित आणि विज्ञान हा कदाचित माझा पिंड नाही…
Me: साहित्य वाचून 'पिंड' वगैरे बोजड शब्द वापरता येतात पण मोठ्यांचं ऐकायचं असतं, त्यांना आपल्यापेक्षा अक्कल असते, त्यांना मनातल्या मनातसुद्धा काही बोलण्यापुर्वी शंभरदा विचार करावा हे कळत नाही!
I: ओके…चुकलं माझं! पण मी खरंच अभ्यास करतोय! इतर सर्व मुलं करत असतील तेवढाच…तेवढाच खेळतोय…मार्कही बरे मिळवतोय!
Me: तुझं हे 'इतर मुलासांरखा' असणंच अपेक्षित नाहीये त्यांना…कमी खेळ,जास्त अभ्यास कर असंच म्हणतायत ते!
I: बरं…करेन प्रयत्न…पण एक प्रश्न पडलाय मला…हे नेहमी सांगत असतात अमिषांना भुलू नका वगैरे…हे वेगळं काय करतायत? दहावीत बोर्डात आलो तर कॉम्प्युटर, बारावीत बोर्डात आलो तर बाईक…
Me: तू विषय बदलतो आहेस!
I: तू मला ते कसे बरोबर आहेत हे सांगण्याचा जो प्रयत्न मांडलायस त्यावर माझा प्रश्न!
Me कडे तूर्तास तरी युक्तिवाद नव्हता, यावेळी I जिंकला होता. पण स्वतःशीच जिंकण्यात आपण स्वतः हरतोसुद्धा. अभिला थोडसं रडायला आलंच! बाबांचा आलेला राग गेला नव्हता. आपला राग निवळेपर्यंत त्यांच्यासमोर जाणं टाळायचं त्याने ठरवलं.
दुसऱ्या दिवशी श्रीनिवासने कामावरून आल्या कधी नव्हे ते बाहेर जेवायला जायचं अनाउन्स केलं. एरव्ही अभिषेक खुश झाला असता पण वडिलांशी न बोलण्याचा संकल्प अगदीच ताजा होता. नाराजीतच तो सगळ्यांबरोबर बाहेर पडला. हॉटेलमध्ये प्रियाने काहीतरी घ्यायला हट्ट केल्यावर चटकन श्रीनिवास म्हणाला-
"प्रिया, असा हट्ट करायचा नसतो बाळ…दादाला बघ! तो कधी हट्ट करतो का?"
प्रियापुढे कौतुक झाल्यावर I सुखावला. कितीही झालं तरी तो अभिषेकचा अहंकार होता, आदल्या दिवशी त्याच्यावर आसूड ओढले गेले होते. खूप इम्पल्सिव्ह, मानी वृत्तीचा I…पण तसा सरळसुद्धा होता बिचारा! जरा कौतुक झालं की खुश व्हायचा, जरा प्रेमाने बोललं की झाल्या गोष्टी विसरायचा.
"बरं का अभिषेक, मी दहावीत होतो तेव्हाची गोष्ट. तुझे आजोबा गेले आणि सगळी जबाबदारी माझ्यावर येउन पडली. तुझी आजी खूप शिकलेली नव्हती, मग एकमेकांना सांभाळत जबाबदारी घेत मी शिकलो. या सगळ्यात चांगलं शिकायचं, मार्क मिळवायचं राहूनच गेलं बघ! तुझ्याकडे मी आशेने बघतो ते यासाठीच. माझा मुलगा माझी स्वप्न पूर्ण करेल"
I विचारात पडला-
"पाहिलंस अभि, किती हळुवार झालेत बाबा? हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची! असं काहीतरी वाग की पुढच्या वेळी तुला काही बोलण्यापूर्वी त्यांनी शंभरदा विचार केला पाहिजे. आपणच आपल्या वडलांची स्वप्नं पूर्ण केली पाहिजेत…."
Me नेहमीसारखा न्युट्रल होता-
"आरडाओरडा करून सांगितलं की तुला वाईट वाटतं…आंजारून-गोंजारून सांगितलं की उत्साह येतो. एकूण काय? मुद्दा तोच पण परिस्थिती हाताळण्याची पद्धत बदलली की परिस्थितीच बदलली आहे असं तुला वाटायला लागतं"
"पण कायम धुसफूस होण्यापेक्षा हे बरं नाहीये का? उलट त्यांनी असं प्रेमाने सांगितलं म्हणून मला आता त्यांच्या मनासारखं वागवासं वाटतंय" I ने उत्तर दिलं.
"तू खुश, बाबा खुश तर मी पण ओके" Me ने विषय थांबवला.
एकूणच आपले वडील विक्षिप्त आहेत याची त्याला कळायला लागल्यापासून कल्पना आली होती. कराटेचा क्लास आठवीत बंद होण्यापासून ते दहावीच्या सुरुवातीला त्याला एका परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून त्याच्या क्लासच्या सरांना भेटून जाब विचारण्यापर्यंत इतक्या घटना घडत होत्या श्रीनिवासच्या स्वभावाची कल्पना त्याच्या आजूबाजूच्या सगळ्यांना आली होती. मोठी माणसं अभिला काही जाणवू द्यायची नाहीत. 'मुलगा हुशार आहे, धड अभ्यास करतोय, उद्दामपणे वागत नाहीये' यामुळे त्याचं कौतुकच व्हायचं. उलट त्याचे मित्र त्याला टाळायला लागले. दहावीत त्याच्या मित्रांनी त्याला न सांगता पिकनिकचा बेत आखला आणि त्याला जाउन आल्यावर सांगितलं-
"लोणावळा??अबे, मला सांगायचं ना? मी आलो असतो"
"अरे सांगणार होतो, पण मग वाटलं की तू नाही म्हणशील, गेल्या वेळी सगळं ठरलं होतं, ऐन वेळी तुझे पप्पा नाही म्हणाले आणि सगळा प्लान रद्द झाला…सॉरी यार"
अशी परिस्थिती आली की त्याला प्रश्न पडायचा- चिडायचं कुणावर? समोरच्यावर? स्वतःवर? वडिलांवर?
I: हट…या लोकांची मित्र म्हणवून घ्यायची लायकी नाही! या ट्रीपचं जाऊ देत पण आता हे नेहमीचंच झालंय! त्यात हे माझ्या वडिलांबद्दल डायरेक्ट तोंडावर इतक्या कमेंट करतात तर माझ्यामागे किती करत असतील? आणि राहता राहिले माझे वडील…ते तर बोलून-चालून विक्षिप्तच! खरंच कधीकधी पळून जावसं वाटतं या सगळ्यातून! मी का भरडला जातोय?
Me: अरे जगात प्रॉब्लेम्स कुणाला नसतील असं वाटतंय तुला? 'सुखी माणसाचा सदरा' वाली गोष्ट आठवतेय ना? आणि तू मित्रांना, बाबांना वाईट ठरवून मोकळा होतोयस…हे बघ- जगात बरं-वाईट अशी टोकाची माणसं नसतात! प्रत्येकात भले-बुरेपणा असतोच. जगातला प्रत्येकजण तुला हवं तसं वागेलच कशावरून? तुला वाटतं जग तुझ्या पद्धतीने चालावं, तसं बाकीच्यांना वाटतं त्यांच्या पद्धतीने चालावं एवढंच. बरं हे शक्य नाहीये हे बहुतेक सर्वांनाच कळत असतं, पण कुणीच नीट वागत नाही! आपण बरोबर वागत राहूया हे खरं!
अभ्यास जोरात सुरु होता. मित्रांना भेटणं, खेळणं जवळपास बंद झालं होतं. I चे विचार लक्षात घेता जगरहाटीशी आपल्याला जुळवून घेता येईल की नाही ही शंका Meला यायला लागली होती. निव्वळ एकलकोंडेपणामुळे आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडायला नको अशी त्याला मनोमन इच्छा होती. एखाद्या परीक्षेत बरे मार्क मिळाले, आईने कौतुक केलं, नेहमीपेक्षा पन्नासेक जोर जास्त मारले की I खुशीत यायचा. आपण आयुष्यात सगळ्यांना अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखवू असा विश्वास वाटायचा त्याला. Me या विश्वासाचं कौतुक करून शांत असायचा. अभिने वेळ घालवण्याचा एक अजब मार्ग शोधला. तो अभ्यासाबरोबर घरात रमायला लागला. घरात ट्यूब फिट कर, आईला भाजी चिरून देणे, वाण्याला सामानाची यादी देऊन येणे वगैरे कामं तो वेळ घालवायला करायला लागला. सीमा आणि श्रीनिवास या बदलाने चकित आणि आनंदित झाले होते. आत्तापर्यंत मित्रांमध्ये, खेळात, पुस्तकांत रमणारा अभिषेक घरात होता. अभ्यास करत होता. हा बदल श्रीनिवासच्या दृष्टीने फार सकारात्मक होता. त्याचं त्याच्या मुलाशी कधीच नीट जुळलं नव्हतं. आपला मुलगा आपल्यासारखाच हट्टी आहे याचा त्याला अंदाज होता आणि तो आपल्याला घाबरतो हेही तो जाणून होता. याच गोष्टीचा तो फायदा घ्यायचा. त्याच्या मते ते अभिषेकच्या भल्यासाठी होतं.
"अभिषेक, अभ्यास कर"
"अभिषेक टीव्ही पाहू नकोस"
"अभिषेक, कोपऱ्यावरून दुध घेऊन ये"
वगैरे वगैरे….
पण सध्या त्याला काही बोलायला जागाच नव्हती. अभिषेक हेच सगळं तर करत होता. श्रीनिवासला राहून राहून एकच भीती होती- 'ही वादळापूर्वीची शांतता तर नव्हे?'
आज दुपारी:
मंत्रालयाच्या पायऱ्या उतरत असताना प्रशांतचा फोन वाजला. हा त्याचा 'वर्क मोबाईल' नव्हता. त्याने नंबर पाहिला आणि त्याचे डोळे त्या अफाट गर्दीत शांत जागा शोधायला लागले. जवळपास सातेक मिनिटं चालल्यावर त्याला एक मोकळा बस स्टॉप दिसला. त्याने फोन पहिला. 'मास्तर' नावाच्या व्यक्तीचे दोन मिस्ड कॉल्स होते. त्याने आजूबाजूला बघून फोन लावला.
"जय हिंद मास्तर, प्रशांत बोलतोय"
"जय हिंद प्रशांत, एक काम होतं…आत्ता कुठे आहेस तू?"
"मंत्रालय"
"बरं…ताबडतोब निघायचं. हिंदुजाला जा. तिथे अभिषेक कुरतडकर नावाचा पेशंट आयसीयूत आहे. त्याची चौकशी कर आणि त्याची हॉस्पिटलची बिलं तू भरायची आहेस, तुला तुझे पैसे 'विवेक'कडून रोख मिळतीलच"
"हरकत नाही मास्तर. निघतोच मी"
"आणि हो, काही कमी जास्त झालं असेल तर मला लागलीच कळव"
"होय मास्तर. अजून काही?"
"सध्या एवढंच. काही इतर बातमी असेल मेसेज करून कळव"
फोन बंद झाला. प्रशांत गेली तीन वर्षं 'विवेक'चा सदस्य होता. अर्थात विवेकचा सदस्य ही ओळख मिरवायची काय पण साधी दाखवायचीसुद्धा त्याला परवानगी नव्हती. तो त्याला सांगितलं जाइल ते काम निमूट करायचा. त्याचे त्याला पैसेसुद्धा मिळायचे. 'मास्तर' या व्यक्तीला त्याने कधीच पाहिलं नव्हतं.फक्त कधीतरी फोन यायचा-
'प्रशांत, मास्तर बोलतोय.' हा फोनसुद्धा 'विवेक'ने दिलेला!
मग काम सांगितलं जायचं. तो त्याच्या वार्ताहराच्या नोकरीबरोबर हे काम एन्जॉय करत होता.
'अभिषेक कुरतडकर? विवेक अशा कामांमध्ये कधीपासून रस घ्यायला लागलं? काय भानगड आहे ते हिंदुजाला गेल्याशिवाय कळायचं नाही' तो स्वतःशीच पुटपुटला.
समोर आलेल्या पहिल्या टॅक्सीला त्याने हात केला-
"हिंदुजा चलोगे?"
क्रमशः
वाचतोय.
वाचतोय.
मीही वाचतूया!
मीही वाचतूया!
बर्याच दिवसाने आला हां भाग
बर्याच दिवसाने आला हां भाग
मस्त चालली आहे कथा
पुढचे भाग पटापट टाका
जरा पटापट टाका कि नविन भाग
जरा पटापट टाका कि नविन भाग
बर्याच दिवसाने आला हां भाग
बर्याच दिवसाने आला हां भाग >>>> +१
पटापट टाका भाग.
पटापट टाका भाग.
पटापट टाका भाग.
"विवेक" माणुस नसुन संस्था आहे
"विवेक" माणुस नसुन संस्था आहे का?