तिरंगा

Submitted by फारएण्ड on 19 April, 2013 - 03:25

कलाकारांची ओळखः हीरो लोकः
हीरो-१: नाना- सतत वैतागलेला. उसूल "पहले लात (लाथ), फिर मुलाकात, फिर बात"
हीरो-२: राजकुमार - चेहरा व मिशी यांच्या अलाइनमेंटमधे पृथ्वीच्या अक्षासारखा फरक. मेकअप टीमने डोळ्यावर पट्टी बांधून त्याच्या चेहर्‍यावर मिशी लावण्याचा खेळ खेळलेला केलेला आहे (चित्रातील गाढवाला शेपटी लावतात तसे) असे सतत वाटणारा. उसूल "पहले मुलाकात, फिर बात, फिर जरूरत पडे तो लात"
हीरॉइन्स - हरीश, ममता,कुलकर्णी आणि वर्षा उसगावकर ("इसे समझो ना रेशम का तार भैय्या")
चरित्र ई. अभिनेते - आलोक नाथ व सुरेश ओबेरॉय तर
व्हिलन्सः
दीपक शिर्के ("जंग के मैदान मे कोई भी परमवीर चक्र चटकही लेता है, लेकिन मेरी तलवार की धार के आगे..."), मनोहर सिंग, बॉब क्रिस्टो व इतर अनेक वाईट लोक

हरीश व ममता कु. यांचे एक रोमँटिक गाणे. आधी मला वाटले दोन मैत्रिणींची गाणी असतात, "सुन री ओ सहेली, तू चंपा मै चमेली" तसे काहीत॑री असेल. पण हे खरे डुएट निघाले. यात एकाच गाण्यात ते सुमारे २५ ड्रेस बदलतात (म्हणजे तेवढे ड्रेस दिसतात. गाण्यात ते बदलत नाहीत. नंतर अपेक्षाभंग होऊ नये म्हणून मुद्दाम खुलासा). प्रत्येक कडव्यात वेगळा ड्रेस सगळ्याच गाण्यांत असतो पण येथे तर एकाच शॉट मधे हवेत उडी मारताना एक, तर हवेतून खाली येताना दुसरा असाही प्रकार आहे.

कोठेही दोन लोक बोलत असताना मधे विविध थोर लोकांचे फोटो ठेवून दिग्दर्शकाने लोकांना "थोरांची ओळख बिंगो/हाउझी" खेळायची संधी दिलेली आहे. मी गांधीजी, नेहरू, इंदिरा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन एवढे मी ओळखले. पोलिस स्टेशन वगैरे सोडा, पण मुख्य व्हिलन प्रलयनाथच्या घरी सुद्धा नेहरू व गांधींचे फोटो आहेत. याखेरीज प्रमुख नेपथ्य म्हणजे सर्किट बोर्ड्स व पिवळे-लाल लुकलुकणारे दिवे.

हिन्दी चित्रपटात सगळे ब्लॅक अॅण्ड व्हाईट असते. ग्रे शेड्स नसतात अशी टीका होत असते. त्याला चोख उत्तर देण्याकरिता दीपक शिर्केचे केस तसे ग्रे केले आहेत.

तर नेपथ्य, कॉस्च्युम व मेकअप या बाबी कव्हर केल्यावर आता कथेकडे वळू.

पण हा चित्रपट वेगवेगळ्या पातळ्यांवर समजून घेण्याकरिता एक क्विझ घेणे आवश्यक आहे. यातून तुमचा सिनेमा-आयक्यू तुम्हाला समजेल.
काही प्रसंग व संवाद.
१. सूर्यदेवसिंग, शिवाजीराव वागळे व प्रलयनाथ गेंडास्वामी. यातील व्हिलन कोण असेल? यातले नानाचे नाव काय असेल?
२. राखी का दिन. तीन भाऊ, एक बहीण. आधीच्या अन्यायामुळे त्यातील एक दोन जण रागावले आहेत. तिसरा त्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व पटवून देतो. तो त्या तिघातील कोण असेल? (हिंटः त्यातील एक मुस्लिम आहे). नंतर एकजण मरतो. तो कोण असेल? (हिंटः मागची हिंट पाहा).
३. तीन "ऐटम बम" वाले शास्त्रज्ञ. त्यांना व्हिलन धमकावतो "सिक्रेट" देण्यासाठी. त्यातील एकजण 'आमच्या रक्तात बेइमानी नाहीये' असे सांगून ते साफ नाकारतो व मरतो. तो कोण असेल? (हिंटः बाकीचे दोन हिंदू आहेत).

खालील संवाद कोण म्हंटले असतील ते ओळखा. नाना पाटेकर (चिडलेला), दीपक शिर्के (चिडलेला), राज कुमार (चिडलेला असावा. चेहर्‍यावरून पत्ता लागत नाही). हे संवाद कोणास उद्देशून व का म्हंटले ते चित्रपटातील इतर अनेक बाबींप्रमाणे इररिलेव्हंट आहे:
१. "जिस दिन भी मुझे तेरे खिलाफ एक भी सबूत मिला, तुझे ऐसी मौत मारूंगा, कि तेरी पापी आत्मा अगले सात जनम तक किसी दूसरे के शरीर मे घुसने के पहले काँप उठेगी" (हे म्हणजे पुढच्या पन्नास वर्षात तुला अधूनमधून भीती वाटेल अशी धमकी देण्यासारखे आहे. कारण आत्म्याला भीती फक्त एका शरीरातून दुसरीकडे जातानाच्या ट्रान्झिशन मधे वाटेल. what will it do at other times – live happily ever after? )
२. "नौकरी करते हो १५०० रूपयोंकी, और बात करते हो...."
३. "हमारा ये हथियार आग उगलता है, अगर तुमने something something नही किया तो हमारा ये हथियार तुम्हे जला देगा"

यावरून तुम्हाला एकूण कथेचा अंदाज आला असेल. दीपक शिर्केला कोणत्यातरी 'विदेशी ताकत' ला भारतात राज्य करण्यास मदत करून स्वतःचे जुगार, दारू, ड्रग्स व इतर अवैध धंदे चालू ठेवायचे असतात. पण एका शहरातील एक डीआयजी (रूद्रप्रताप चौहान उर्फ "नामुमकिन को मुमकिन करनेका दूसरा नाम". पण ते अशा नावाच्या लोकांना "ना" सुनने की आदत नसल्याने असावे) त्यांच्या मधे येत असतो.

यावर व्हिलनच्या अड्ड्यावर एक हाय लेव्हल मीटिंग चालू आहे. त्यात मुख्य विदेशी ताकद बॉब क्रिस्टो व इतर फुटकळ विदेशी ताकदी आलेल्या आहेत. तेथे प्लॅन्स आखले जात आहेत. मधे एक पोलिस अधिकारी काहीतरी बोलतो. बॉब क्रिस्टोचे कुतूहल वाढते:
"आप की तारीफ?"
बॉब क्रिस्टो ने हिन्दीच्या अनेक परीक्षा दिल्याने त्याला कोणत्याही लहेजासकट ती बोलता येते. आणि ज्या देशावर कब्जा करायचा आहे तेथील फुटीर लोकांशीसुद्धा तो आदबीने बोलतो, "आप की तारीफ?"
दीपक शिर्के: "पोलिस ऑफिसर सत्यवादी, लेकिन ये सिर्फ नाम के सत्यवादी है"
यातील विनोदही बॉ.के. ला कळतो.

भारताच्या एका राज्यातील तिसर्‍या-चौथ्या रँकचा पोलिस अधिकारी त्रासदायक आहे. मग त्यावर तोडगा काढण्याचे खालील मार्ग असू शकतातः
१. आपले उद्योग दुसर्‍या एखाद्या राज्यात हलविणे.
२. गृहमंत्री आपलेच प्यादे असल्याने त्याला त्या डीएसपीची बदली करायला लावणे.
३. तो डीएसपी त्याच्या मुलाबरोबर बीचवर घोडेस्वारी करत असताना मुख्य व्हिलनने स्वतः दुसरा घोडा घेउन हेल्मेट घालून हातात तलवार घेऊन जाऊन त्याला मारणे. त्याचा मुलगा बघत असताना हेल्मेट चा पुढचा भाग उघडून हॉ हॉ हॉ करून हसणे.
यातील तिसरा मार्ग सर्वात सोपा व बिनधोक असल्याने तोच पत्करला जातो.

मग आता सरकारच्या बाजूने एक हाय लेव्हल मीटिंग होते. प्रमु़ख आलोक नाथ असतो, म्हणजे तो मंत्री करप्ट नसणार हे उघड होते. आता प्रलयनाथला कसा आवर घालायचा यावर सुझाव मागितले जातात. आर्मीशिवाय पर्याय नाही असे ठरते. आर्मी चा ही वेळ जात नसल्याने ते ही लोक तेथेच बसलेले असतात. पण तेथे पूरी फौज पाठवण्याऐवजी एकच असा माणूस पाठवू की जो "शेरो मे शेर है व आणखी काय काय आहे" असे ते सांगतात. कारण त्याने १९६५ च्या युद्धात एकटाच मशीन गन घेऊन पुढे शत्रूच्या हद्दीत जाऊन चार ठिकाणी तिरंगा लावलेला असतो. बहुधा तो एक ८-१० झेंडे सुद्धा बरोबर घेऊन युद्धात लढत असावा. ६२ च्या युद्धातील कामगिरीमुळे त्याला परमवीर चक्र तर मिळालेले असतेच पण मेजर चा ब्रिगेडियर ही तो झालेला असतो. नंतर मात्र तीसेक वर्षे तो ब्रिगेडियरच राहिलेला असतो हे मात्र आश्चर्यच आहे. कारण तशीच जोरदार कामगिरी त्याने ६५ व ७१ च्या युद्धात केलेली असते, त्यामुळे कथेच्या काळापर्यंत तो किमान राष्ट्रपतीतरी व्हायला हवा.

त्याची एक मिलीटरीने बनवलेली "इण्ट्रो" फिल्म एक करप्ट पोलिस ऑफिसर प्रलयनाथच्या खाजगी थिएटर मधे त्याला दाखवतो. मग प्रलयनाथ माझ्या तलवारीपुढे त्याचे काही चालणार नाही वगैरे वल्गना करतो. तेव्हाच मोठे ब्याकग्राउंड म्युजिक वाजल्याने सगळे मागे बघतात (नाहीतर त्या सीन मधे त्यांना दचकून मागे बघायला दुसरे काहीच कारण नव्हते). तर मागच्या दारात राजकुमार उभा. गुरूत्वाकर्षणाची गडबड असलेल्या ठिकाणच्या गोष्टींप्रमाणे तो तिरपा उभा असतो. व "ना तलवार की धार से, ना गोलियोंकी बौछार से..." चालू होते.

तसे सगळे देशभक्त लोक. हीरोच नव्हे तर व्हिलन्सही. व्हिलन्सच्या अड्ड्यातही भारताचा नकाशा पूर्ण आहे. म्हणजे व्हिलन्सही "काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे" हे मान्य करतात. मात्र अवघ्या भारताच्या रक्षणाची काळजी असलेल्या राजकुमारच्या बंकर मधे फक्त महाराष्ट्राचा नकाशा असतो. नशिबाने सगळे व्हिलन्स जेव्हा राजकुमारने ट्रान्स्मिटर लावलेल्या गाडीतून जातात ते महाराष्ट्राच्या आसपासच फिरतात. नाहीतर याला ते कोठून सापडणार होते माहीत नाही.

मग राजकुमारला अडकवण्यासाठी शहीद स्मारक कार्यक्रमाला त्याला बोलावले जाते. तेथे त्याच्यावर हल्ला करणार्‍या माणसाला मारण्याकरिता कमांडोज गोळी झाडतात तेव्हा तेथे असलेले तोतये पोलिस सर्वत्र गोळीबार करतात. हा आदेश राजकुमारने दिला असे ठरवून त्याच्यावर खटला भरला जातो.

हा खटला चित्रपटसृष्टीतील खटल्यांच्या इतिहासात लॅण्डमार्क समजला जाईल. राजकुमारने फायरिंगच्या ऑर्डर दिल्या, तोतया पोलिसांनी फायरिंग चालू केले, मंत्र्यांसकट सर्वांनी बघितले. या आरोपाचा इन्कार राजकुमारने कोर्टात केला नाही. हे सगळे पहिल्या पाच मिनीटांत होते. मग बाकीचा खटला नक्की कशासाठी चालू होता? एकामागून एक लोक येउन राजकुमारकडे बोटे दाखवून दाखवून काहीतरी सांगत होते. पोलिस त्यांचा अधिकारी तेथे उपस्थित असताना एका मिलीटरी ऑफिसरच्या आदेशानुसार फायरिंग करतात. आधी ते पोलिसच तोतया. त्यांचा जाबजबाब वगैरे? बहुधा आवश्यक नाही. ते पोलिस होते का महत्त्वाचे नाही, त्यांनी कोणाच्या आदेशानुसार फायरिंग केले हे महत्त्वाचे.

त्यात एक ऐसा गवाह जिसकी सच्चाई पर कोई शक नही कर सकता, म्हणून नाना येतो. म्हणजे कोर्टाच्या दृष्टीने पोलिसांमधील लोकांचे सच्चाईनुसार एक विश्वासार्हता रँकिंग असावे जबाब ग्राह्य धरण्यासाठी. नानाही राजकुमारलाच जबाबदार धरतो. मग राजकुमारचे निलंबन ई. पायर्‍या न होता त्याला थेट तुरूंगात टाकले जाते. पण नंतर कळते की हा सगळा राजकुमारचाच बनाव होता. "हम यहॉ आये थे अपने हुकूम से, और जायेंगे..." ई.ई.

आता राजकुमार व नापा यांचे मुख्य काम सुरू होते. ते म्हणजे बराच वेळ डॉयलॉगबाजी करणे (व प्रत्येक पंचला इफेक्ट साठी पूल टेबलच्या पॉकेट मधे एक बॉल मारणे. त्यात दोन तीन वेळा तो पांढरा Cue Ball ही पॉकेटमधे जातो) व त्यातून वेळ उरलाच तर व्हिलन्सचे अड्डे शोधणे. एक क्लू मिळतो. "शहर के बाहर, काली पहाडीके पीछे" एवढ्यावर अचूक पत्ता सापडणार्या एका आमराईत बॉम्ब बनवायचे काम चालू असते. आमराईची निवड बरोबर आहे - कारण आंबा हे बारमाही पीक असल्याने वर्षभर तेथून पेट्या बाहेर जात असलेल्या बघून कोणालाही संशय येणार नाही. तसेच तेथे पोलिस वगैरे येउ नयेत म्हणून ठिकठिकाणी बॉम्ब पेरून ठेवलेले असतात व जरा कोणी इकडेतिकडे पाय ठेवला तर स्फोट होत असतात. मात्र एरव्ही तेथून हातगाड्या, ट्रक आरामात फिरत असतात. तसेच प्रत्येक झाडावर आंबे लगडलेले असतात, जे कधीही पडू शकतात. सॉलिड प्लॅन.

तेथे दोन व्हिलन्स जी माहिती त्यांना तोपर्यंत "कॉमन नॉलेज" असायला हवी ती केवळ प्रेक्षकांना माहीत व्हावी म्हणून एकमेकांना मोठ्याने सांगत असतात. उदा: एक बॉम्ब, जो २५ मीटर लांबच्या ट्रकला उडवू शकतो, तो दाखवायला तो एक जण तो लांब टाकून दाखवतो. मग एक स्फोट व "हॉ हॉ हॉ". पण यावर दुसर्‍या व्हिलनचे समाधान होत नाही. तो म्हणतो हा बॉम्ब यूपी व आसाम साठी ठीक आहे, पण मला असा एक बॉम्ब दे जो ब्रिगेडियर सूर्यदेवसिंगला उडवू शकेल (यावर यूपी व आसाममधे निदर्शने कशी झाली नाहीत हे एक आश्चर्यच आहे). मग यावर एक दुसरी कैरी दाखवली जाते जी म्हणजे असा बॉम्ब असतो की जो जो ५० दूरच्या माणसाच्या हाडाचा भुगा करू शकतो. मग तो व्हिलन तो बॉम्ब थ्रो करतो ते दाखवायला.

तर त्या दिशेने फक्त एका कोकिळेचा आवाज येतो. दोन मिनीटे शांतता झाल्यावर निष्पन्न होते की राजकुमारने तो कॅच केला आहे. असे दोन रॅण्डम लोक एका रॅण्डम टाईमला डेमॉन्स्ट्रेशनसाठी एखादा बॉम्ब कोणत्या दिशेने फेकतील हे राजकुमारला बरोबर माहीत असते, तेथे कोठेतरी लपून तो बॉम्ब कॅच करायचे व नंतर व्हिलन्स जे संवाद म्हणत आहेत त्याला योग्य प्रत्युत्तर देत तेथून बाहेर यायचे याचेही प्रशिक्षण त्याला मिळालेले असते.

कल्पना करा. तुमच्या कडे आंब्याच्या अनेक पेट्या भरून बॉम्ब आहेत, समोरच्या जमिनीत काही पुरलेले आहेत. अशा वेळेस ज्याला मारायचे आहे तो डुलत डुलत समोरून येतो आहे, तुम्ही काय कराल? तेच ते करतात. एकजण राजकुमारच्या मागून त्यावर बॉम्ब फेकायला येतो. पण राजकुमारची पेरिफेरल व्हिजन ३६० अंशाची असल्याने त्याला ते दिसत असते, व तो बॉम्ब बरोबर मागे फेकून त्याला उडवतो (५० मी रेंजवाला तो आधी कॅच केलेला व इतका वेळ स्पिनर सारखा हातातल्या हातात उडवत असेला बॉम्ब. तो मागे फेकण्याची पॉवर इतकी की हिन्दी सिरीयलमधल्या स्त्रिया लग्नानंतर मैका सोडताना ते तांदूळ का काय मागे टाकतात ते सुद्धा जास्त जोरात टाकत असतील). आता राजकुमारकडे एकही बॉम्ब नाही. व्हिलन्स कडे हजारो आहेत. आणखी काही जमिनीतही आहेत. राजकुमारला मारायचे आहे. काही सुचते का? बरोब्बर! ते सगळे फायटिंग करतात.

असे करत करत रखडत शेवटी सगळे प्रलयनाथच्या अड्ड्यावर क्लायमॅक्ससाठी पोहोचतात. नमनाचे डॉयलॉग, मारामारी ई. होउन स्टेलमेट अवस्था येते तेव्हा प्रलयनाथ, तांडेल, बॉके हे सर्व सुटे उभे असतात. नाना, राजकुमार, व त्यांच्या कमांडोज च्या मागे गन्स घेऊन प्रलयनाथचे लोक उभे असतात, आणि हरीशची आई, वर्षा व इतर दुर्बल लोक बांधलेले असतात व त्यांच्या केबिनच्या बाँबचा रिमोट प्रलयनाथकडे असतो.

आता तीन मिसाईल ("प्रलय-१, २, ३") भारताच्या इस्ट, वेस्ट व नॉर्थ ला जाउन पडणार (उपस्थित सर्वांच्या दिशाज्ञानाबद्दल शंका आल्याने येथे भारताचा नकाशा दाखवून इस्ट, वेस्ट व नॉर्थ म्हणजे कोठे ते ही दाखवले जाते) आणि याचे थेट प्रक्षेपण सर्वांना दाखवले जाणार असे जाहीर होते. तेव्हा मग राजकुमार एक ओढण्याचा पाईप तोंडात धरतो व पेटवणार, एवढ्यात प्रलयनाथ पुढे होऊन "खडे हो बारूद के ढेर पे, और पी रहे हो पाईप" हे "कोनाड्यात उभी व्हिंदमाता" च्या तोडीचे यमक जुळवलेले वाक्य म्हणतो, व तो पाईप फेकून देतो. मग धूरच धूर होतो. पाच मिनीटे कोणालाच कोणी दिसत नाही. नंतर राजकुमार व नानापुढचा धूर क्रमाक्रमाने क्लिअर होऊन ते तेथेच आहेत हे निष्पन्न होते.

आता दोन तीन वेळा हॉ हॉ हॉ झाल्यावर मिसाईल उडवण्याची ऑर्डर दिली जाते. काउंटडाउन होऊन मिसाईल उडणार म्हणून सगळे श्वास रोखून बघू लागतात. पण...

एकदम शंभरएक कोकिळा गाउ लागल्याचा आवाज होतो. मशीन मधले प्रत्येक रंगाचे दिवे लुकलुकू लागतात. मिसाईल्स मधून धूर बाहेर येतो, आणि पुढे काहीच होत नाही. मग निष्पन्न होते की इतका वेळ राजकुमार हातात तीन "फ्युज कंडक्टर" धरून बसला होता. त्यात ते बर्‍यापैकी मोठे तीन फ्यु.कं. स्क्रीन वर आपल्याला तोपर्यंत दिसत नसल्याने चित्रपटसृष्टीच्या नियमानुसार आजूबाजूच्या गार्ड्सनाही ते दिसले नव्हते (नियम #१: "स्क्रीनवर क्लोजअप मधे आपल्याला जेवढे दिसते तेच त्या सीनमधे वेगवेगळ्या दिशांना व अंतरांवर उभ्या असलेल्या इतरांनाही तेवढेच दिसते"). ती मिसाईल लाँच सिस्टीमही इतकी प्रगत असते की फ्यु.कं नसताना "फ्युज मिसिंग" असा मेसेज देण्याएवजी सगळे दिवे कलात्मकरीत्या लुकलुकतात व वेगवेगळे आवाज येतात. हे म्हणजे कारमधले पेट्रोल संपल्यावर तसा इंडिकेटर येण्याऐवजी गाडीचे सगळे हॉर्न, बीपर्स व ब्लिंकर्स एकदम वाजू/लुकलुकू लागले तर कसे होईल तसे होते. तो शास्त्रज्ञही "बहुतेक हे पिवळे बटण... हा, हेच असेल" असा चेहरा करून असतील नसतील तेवढी सगळी बटने दाबून पाहतो.

तरीही चित्रपटात या क्षणी परिस्थिती फारशी बदललेली नसते. जे बांधलेले लोक आहेत ते तसेच आहेत, प्रलयनाथ चे लोक अजूनही राजकुमार व नाना च्या मागे गन्स धरून उभे आहेत. फक्त राजकुमार कडे आता फ्युज कंडक्टर आहेत. मग जुनीच धमकी परत देऊन ते फ्युज कंडक्टर परत घेऊन पुन्हा बसवायचे, की फायटिंग पुन्हा सुरू करून काही निष्पन्न होते का पाहायचे? साहजिकच प्रलयनाथ दुसरा मार्ग पत्करतो.

मुळात त्याचा प्लॅन नक्की काय असतो?. तीन मिसाईल. ऐटम बम वाली. ती बनवायला ते हेवी वॉटर, युरेनियम, मोठे रिअॅक्टर्स ई. लागत नाहीत, फक्त शास्त्रज्ञांकडून "सिक्रेट" मिळाले की झाले. ती इस्ट, वेस्ट व नॉर्थला कोठेतरी जाऊन पड्णार. व देशावर विदेशी हुकूमतचा झेंडा लहरायेगा. कोण विदेशी ताकत? फक्त बॉब क्रिस्टो ला पुढे पाठवून उर्वरित सैन्य नंतर येणार का? काही पत्ता नाही. फक्त मिसाईल आडव्याचे उभे झाले, आकाशात कोठेतरी नेम धरला, आणि "हॉ ह्हॉ ह्हॉ ह्हॉ ह्हॉ"

तेव्हा मला कळाले मिलीटरीने एकच माणूस का पाठवला ते!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पैली. आता वाचते Proud

राजकुमारचे वर्णन, २५ ड्रेस! Rofl
मुख्य व्हिलन प्रलयनाथच्या घरी सुद्धा नेहरू व गांधींचे फोटो >> Lol काँ संस्कृतीचा पाईक असेल तो!
उत्तरे-
१. शिवाजीराव वागळे? २. मुस्लिम? मुस्लीम? ३. प्रश्न २ चे उत्तर पहा.

मस्त चिरफाड! आता ह्या लेखाची प्रिंट बरोबर ठेवून लेख वाचत पाहणार हा सिनेमा! Lol

हीरॉइन्स - हरीश, ममता,कुलकर्णी >>. Lol

सगळंच महाखतरनाक लिहिलं आहे. मस्त !

फा Lol

राजकुमारचे संवाद ऐकणे ही खरंच एक कौतुकाची गोष्ट असते. कसलाही संवाद एकाच सुरात म्हणणं ही त्याची खासियत.

तु भेट एकदा मी तुझे चरणस्पर्श करणार आहे Lol
धन्य आहे तुझी.. इतक्या पेशन्स नी सिनेमा पाहिलास? आणि इतकं ब्लॉकबस्टर लिखाण केलंस...
खूप हासले. खास करून त्या आमराई विषयीचा पॅरा अफलातून आहे. Rofl

फारेण्ड इज बॅक Lol
हेल्मेट चा पुढचा भाग उघडून हॉ हॉ हॉ करून हसणे.>>
२५ ड्रेस>>
कथेच्या काळापर्यंत तो किमान राष्ट्रपतीतरी व्हायला हवा>>
गुरूत्वाकर्षणाची गडबड असलेल्या ठिकाणच्या गोष्टींप्रमाणे तो तिरपा उभा असतो>>
आंबा हे बारमाही पीक>>
अशक्य हसलेय या सगळ्याला Rofl

फारेंडा, वेड्यासारखी हसतेय. Rofl हा खरंच अशक्य सिनेमा आहे. त्या पाईपच्या सीननंतर -
'ये तो हमारे एक मामूली पाईप का कमाल था, अगर तुम हमारा ये रुमाल छू लेते तो जलकर भस्म हो जाते..' वगैरे आहेच. असा स्फोटक रूमाल हा खिशात घेऊन फिरतोय, त्याला काहीच होत नाही.

हीरॉईन्स: हरीश .. हे अशक्य आहे. Lol

खतरनाक Lol

आंबा हे बारमाही पिक>> तुफान हसले.
खडे हो बारूद के ढेर पे, और पी रहे हो पाईप" हे "कोनाड्यात उभी व्हिंदमाता" च्या तोडीचे यमक जुळवलेले वाक्य म्हणतो>>

हे राम!!

<<कारण आंबा हे बारमाही पीक असल्याने वर्षभर तेथून<<
<<प्रलयनाथ पुढे होऊन "खडे हो बारूद के ढेर पे, और पी रहे हो पाईप" हे "कोनाड्यात उभी व्हिंदमाता" च्या तोडीचे यमक जुळवलेले वाक्य म्हणतो<<
<<हरीशची आई, वर्षा व इतर दुर्बल लोक<<
<<कोण विदेशी ताकत? फक्त बॉब क्रिस्टो ला पुढे पाठवून उर्वरित सैन्य नंतर येणार का?<<
अवघडै Rofl

Rofl अफाट अल्टीमेट Rofl
त्याला चोख उत्तर देण्याकरिता दीपक शिर्केचे केस तसे ग्रे केले आहेत.>>> खास फारेंड ट्च
आणि तो जोगिंदर 'सत्यवादी दुबे' आहे! मेहूलकुमारला सत्यदेव दुबेंचा काही राग होता का ते माहिती नाही!!!!!

Rofl

लहानपणी घरी केवळ दुरदर्शन असताना जवळपास सगळ्याच २६ जानेवारी/ १५ ऑगस्ट ला हा सिनेमा बहुन देशप्रेम उफाळून वगैरे यायचं... त्या काळात माझा जुन्यांपैकी सगळ्यात आवडता सिनेमा होता हा! मोठी झाल्यापासुन पुन्हा पाहीलाच नाही म्हणून अजुनही आवडता होताच Proud

आता जेंव्हा जेंव्हा हा सिनेमा पाहिला जाईल तेंव्हा तेंव्हा हे परिक्षण आठवेल Rofl
महान आहात Lol

हे भगवान... एण्डा अशक्य हसलेय...
Rofl

अ आणि अ सिनेमा बद्दल लिहायचे परत मनावर घेतल्याबद्दल लै लै थँक्यू Happy

एफ बी वर लोकांनी स्ट्रेसबस्टर वगैरे म्हणून लिंक्स दिल्यात म्हणून वाचायला आले.
धन्य आहेस बाबा तू. Lol

>> ३. तो डीएसपी त्याच्या मुलाबरोबर बीचवर घोडेस्वारी करत असताना मुख्य व्हिलनने स्वतः दुसरा घोडा घेउन ...
...
...
यातील तिसरा मार्ग सर्वात सोपा व बिनधोक असल्याने तोच पत्करला जातो.

>>पोलिसांमधील लोकांचे सच्चाईनुसार एक विश्वासार्हता रँकिंग असावे जबाब ग्राह्य धरण्यासाठी.
>> मेकअप टीमने डोळ्यावर पट्टी बांधून त्याच्या चेहर्‍यावर मिशी लावण्याचा खेळ खेळलेला केलेला आहे (चित्रातील गाढवाला शेपटी लावतात तसे) असे सतत वाटणारा.

अरे काय हे? Rofl

अमोल, Lol

प्रतिसाद देताना लेखातली तुफान लिहीलेली वाक्ये अधोरेखीत करण्यासाठी कॉपी करता करता लक्षात येतं की अरे हे सगळंच तुफान आहे, असं ज्या लेखांबद्दल वाटलंय त्यात हा लेख!

हीरॉइन्स - हरीश>>
तेवढे ड्रेस दिसतात. गाण्यात ते बदलत नाहीत.>>
आंबा हे बारमाही पीक असल्याने>>
हिन्दी सिरीयलमधल्या स्त्रिया लग्नानंतर मैका सोडताना ते तांदूळ का काय मागे टाकतात >>
"खडे हो बारूद के ढेर पे, और पी रहे हो पाईप" हे "कोनाड्यात उभी व्हिंदमाता" च्या तोडीचे यमक >>
Rofl Rofl Rofl सगळेच भन्नाट.

Pages