खोडदची रेडिओ दुर्बीण

Submitted by श्रावण on 8 June, 2008 - 00:00

********************************************
......................................खोडदची रेडिओ दुर्बीण ........................
.................जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप - (जी. एम. आर. टी.)........
********************************************

जुन्नरचं एक वैज्ञानीक महत्व म्हणजे खोडदला असलेली महाकाय रेडिओ दुर्बीण! खगोलशास्त्रात भारताने जी काही आपली ओळख निर्माण केली आहे त्यामध्ये या शक्तीशाली रेडिओ दुर्बीणीचे महत्वपुर्ण योगदान आहे. जागतीक पातळीवर ही दुसर्‍या क्रमांकाची शक्तीशाली रेडिओ दुर्बीण मानली जाते.

या अफाट विश्वाबद्दल मानवाला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे आणी या अथांगतेचा शोध अखंडपणे सुरुच आहे. यातूनच खगोलशास्त्र विकास पावत गेले. प्रथमतः ऑप्टिकल दुर्बिणीचा (डोळ्यांनी निरिक्षण करता येणार्‍या) वापर याकामी केला जात असे मात्र पुढे रेडिओ दुर्बिणीचा शोध लागला. प्रत्येक ग्रह, तारा स्वतःमधून विविध तरंगलांबीच्या चुंबकीय लहरी सर्वत्र सोडतात हे काही शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. व या लहरींच्या अभ्यासावरुन त्या ग्रहाच्या वा तार्‍याच्या निरीक्षणाची अचुकता कित्येक पटीने वाढते हे लक्षात आल्यावर पुढे या लहरी पकडणार्‍या दुर्बिणीचा वापर अवकाश निरीक्षणासाठी वाढला. त्यामध्येही इतर तरंगलांबी पेक्षा रेडिओ तरंगलांबी (१ मीटर) असलेल्या लहरींचे संकलन व अभ्यास अधिक सोयीस्कर ठरला.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांनी भारतातील डॉ. विक्रम साराभाई यांना अंतराळ संशोधनासाठी, डॉ. सिद्दिकींना मुलभूत संशोधनासाठी तर डॉ. गोविंद स्वरुप यांना रेडिओ एस्ट्रॉनॉमीसाठी योगदान देण्याविषयी आवाहान केले. डॉ. गोविंद स्वरुपांनी पुढे अतिशय महत्वकांक्षी अशा या शक्तिशाली दुर्बिणीची संकल्पना तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसमोर मांडली व त्याला मान्यता मिळविली.

प्रकल्पासाठी खोडदची जागा निवडताना मुख्य बाबी महत्वपुर्ण ठरल्या त्या म्हणजे या भागामध्ये रेडिओ लहरींना प्रभावीत करु शकेल अशा इतर चुंबकीय लहरींचे अस्तित्व अतिशय नगण्य होते. म्हणजे चुंबकीय लहरींचे संकलन सोपे व अचूक होऊ शकणार होते. हा भाग भुकंपप्रवण क्षेत्राच्या बाहेर होता. तसेच पुण्यापासून दळणवळणासाठी सुलभ होता. व तांत्रीकदृष्ट्या पृथ्वीच्या ठराविक भागावर चुंबकीय लहरी विखुरण्याचे प्रमाण कमी असते हे लक्षात आले आहे. हा परिसर याच प्रकारामध्ये मोडतो.

प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष १९८२-८३ च्या सुमारास चालू झाले व १९९४ च्या सुमारास पुर्ण झाले. या प्रकल्पाअंतर्गत अवकाशातून येणार्‍या रेडिओ लहरी पकडण्यासाठी ४५ मीटर व्यास डिश असणार्‍या एकूण ३० अँटेना उभारल्या गेल्यात. लहरींचे संकलन समजावून घेणे अतिशय सोपे आहे. सर्व अँटेनाच्या डिशेस ज्या तार्‍याचे, ग्रहाचे वा लहरीच्या स्त्रोताचे निरिक्षण करायचे आहे त्या स्थानाकडे वळविल्या जातात. अँटेनाची मोठी डिश ही अवकाशातून येणार्‍या चुंबकीय लहरी परावर्तीत करुन डिशच्या वर जोडलेल्या रिसिव्हरकडे पाठवते. व या रिसिव्हरद्वारे त्या ग्रहण करुन फायबर ऑप्टिकल केबलद्वारे मुख्य प्रयोगशाळेत संगणकाकडे पुढील संशोधनासाठी पाठवल्या जातात.

एकूण ३० पैकी चौदा अँटेना खोडदमध्ये तर इतर १६ अँटेना इंग्रजी वाय शेपमध्ये आजूबाजूच्या २५ किमी च्या परिसरात उभारल्या आहेत. (पहा खालील आकृती क्रं. ०१). या सर्व डिश एकाच वेळी लहरी ग्रहण करण्यासाठी एकाच दिशेने वळविण्यात येतात. होते काय की त्यामुळे सुमारे २५ किमी. व्यासामध्ये त्या स्त्रोताकडून येणार्‍या लहरी एकाच वेळी पकडता येतात. म्हणजे अशा वेळी या सर्व डिश वेगवेगळ्या नव्हे तर एकच अँटेना म्हणून अप्रत्यक्षरित्या वापरल्या जातात. लहरी पकडण्यासाठीची डिश जेवढी मोठी तेवढ्या जास्त लहरी पकडता येणार व संशोधनातली अचुकता वाढणार हे ओघाने आलेच. व त्यामुळे ही दुर्बीण जागतीक पातळीवर दुसर्‍या क्रमांकाची शक्तीशाली ठरली आहे.

या प्रकल्पातील एक वैशिष्ट्यं म्हणजे अँटेनाच्या डिशसाठी प्रथमच वापरले गेलेले मेश (जाळी) तंत्रज्ञान! यापुर्वी अशा प्रकारचे अँटेना उभारताना डिशमध्ये लहरी परावर्तीत व्हाव्यात म्हणून सलग धातूची शीट (पत्रा) वापरली जात असे. डॉ. स्वरुपांनी इथे त्याऐवजी धातूची जाळी वापरली आहे. या जाळीची घनता अशी आहे की जाळीच्या मोकळ्या भागातून रेडिओ तरंगलांबीच्या लहरी आरपार जावू शकणार नाहीत व पर्यायाने त्या परावर्तीत होतील. या तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी साध्य झाल्यात. जसे की डिशचे वजन कमी झाल्याने अर्थातच तो फिरवण्यासाठी कमी शक्ती लागते. वार्‍याचा अवरोध कमी होतो. एकंदरीतच उभारणीचा खर्चही खुप कमी होतो. या तंत्रज्ञानाचे पेटंट सध्या भारताकडे आहे.

या प्रकल्पाच्या उभारणी बरोबरच भारताने खगोलशास्त्रीय संशोधनामध्ये महत्वाचा टप्पा गाठला. डॉ. स्वरुपांच्या या अजोड कामगिरीमुळेच ते भारतातील खगोलशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जावू लागले. आजही ८० वर्षे वयाच्या आसपास असतानाही हा माणूस तेवढ्याच उत्साहाने मार्गदर्शकाची भुमिका बजावतो आहे. त्यांच्याबरोबरच डॉ.कपाही, प्रो. अनंथकृष्णन अशा इतर अनेक शास्त्रज्ञांनी पण या प्रकल्पामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे.

.........................................................................................

हा प्रकल्प दुसर्‍या व चौथ्या शनिवारी सगळ्यांना भेटीसाठी खुला असतो.

भेटीची वेळ घेण्यासाठी संपर्क : ०२१३२ - २५२११२, २५२११३, २५२११४.
स्थान : खोडद, ता.जुन्नर, जि.पुणे. पुणे नाशीक महामार्गावरील नारायणगावपासून ९ किमी पुर्वेकडे.
वाहन व्यवस्था : पुण्याच्या शिवाजीनगर एस.टी.स्थानकावरुन नाशिककडे जाणार्‍या गाडीने नारायणगाव (७६ किमी) येथे उतरावे. तेथून खोडदला जाण्यासाठी दर तासाला एस.टी. ची सोय आहे.

जी.एम.आर.टी. च्या अँटेनांचा स्थलदर्शक नकाशा.
टिंबांनी जोडलेला गोल हा सगळ्या अँटेनांचा कसा एकच मोठी डिश म्हणून वापर होतो ते स्पष्ट करतो.
GMRT1.jpg

जी.एम.आर.टी. अँटेना.
डिशसाठी वापरलेली जाळी व डिशच्या वर चुंबकीय लहरी ग्रहण करण्यासाठी लावलेला रिसिव्हर स्पष्ट दिसत आहेत.
antenas_GMRT.jpg

प्रकल्पाचे संस्थापक जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप.
GSwarup.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार फार धन्यवाद श्रावण. खुपच अभ्यासपुर्ण लेख लिहिला आहे.

मस्त लिहिलं आहे एकदम. अजून माहिती वाचायला आवडेल. शिवाय हा लेख मराठी विकी पिडीया वर पण द्यायला हवा.

डॉ. गोविंद स्वरुपान्बद्दल वाचुन काही महिन्यापुर्वी हातात पडलेले एक क्षोटेसे पुस्तक आवर्जुन आठवते. समुद्रकिनार्‍यावरील एका चिमुकल्या गावतील अशिक्षीत नावाड्याच्या पोटी जन्मलेल्या मुलाचे ते आत्मचरित्र. मला तर
अतिशय आवडले. अन पट्ले पण ,आपण तन्त्रज्ञानात जगाचे नेत्रुत्व करु शकतो.( त्यासाठी आजच्या आपल्या सर्व राजकीय नेत्यान्ना त्यान्च्या सर्व पिडीसमवेत एका मन्गळयानात बसवुन पाचारन करावे लागेल ते वेगळ !)
ते पुस्तक म्हणजे भारतरत्न आणी आपले माजी रास्ट्रपिता डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यान्चे एकप्रकारचे रेखाचित्रच होय.

गजानन, पुस्तकाचे नाव सांगा ना ,वाचायला नक्किच आवडेल.

हो नाव सान्गायला विसर्लोच कि. वर्षा, अग्निपन्ख ,राजहन्स प्रकाशन्चे हे पुस्तक मुळ लेखक आहेत अरुण तिवारी,
आणी मराठी अनुवाद माधुरी शानभाग यान्चां. नाही मिळाले तर मी जरुर पाठ्वुन देइन.
आणि हो नेटवर आपन सर्व समान नाही का,
दुसरे म्हणजे आता वारापण पाठ्विण्याची गरज नाही कारण तिकड्याच एका राज्यातुन वळवला तर तिकडे हानीही होनार
नाही व दुसरीकडे कामी लागेल!

खूपच छान माहिती दिली आहे. अजून वाचायला आवडेल. डीशचा फोटोही छान आहे.

छान लिहिल आहेस रे. Happy
लगे रहो.
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

वा! अभ्यासपूर्ण लेख! आवडला.

कल्याण हून माळशेज मार्गे अहमदनगर ला जाताना ह्या पैकी काही डिशेस रस्त्याच्या उजव्या बाजूला दिसतात. बरेचदा पाहिल्या, विचारपूस करता प्रत्येक वेळा वेगवेगळी उत्तरे मिळली.

आपल्या ह्या माहितीपूर्ण लेखासाठी धन्यवाद.

शाळा / महाविद्यालयाच्या शैक्षणिक सहली घेऊन जाण्या साठी चान्ङ्गले ठिकाण आहे.

भोजन / उपाहाराची काही चान्गली सोय जवळपास आहे का हो ?

मस्त! अभ्यासपुर्ण लेख , अजुन वाचायला आवडेल.

आम्ही पण ट्रेक ला जाता येता छत्र्या तर बघितल्या होत्या. आता प्रत्यक्ष जाउन बघायलाच हवे. छान माहिती श्रावण.

चला, पुस्तकांच्या लिस्ट मधे अग्निपंख अँड करुन टाकले. धन्यवाद गजानन.

खूपच योग्य आणि समर्पक माहिती थोडक्यात दिली आहे. लेख आणि फोटो आवडले.
--------
वर्षा -- मूळ इंग्लिश पुस्तकाचे नाव 'विंग्स ऑफ फायर' असे आहे. त्याचा अनुवाद 'अग्निपंख'. अवश्य वाचा.
पायाभूत सुविधांची (इन्फ्रास्ट्रक्चर) गैरसोय असूनही भारतीय शास्त्रज्ञांनी जी कमाल केली आहे ते वाचून थक्कायला होतं Happy

प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद लोकहो !!!
शालेय सहली आल्यास जेवणासाठी आजुबाजूच्या मोठ्या गावांमध्ये (नारायणगाव, आळेफाटा परिसरातील) हॉटेल्स मध्ये सोय होऊ शकेल. अथवा विद्यार्थी जर प्रमाणात असतील तर तशी व्यवस्था प्रकल्पाच्या कँटीनमध्ये होण्यासाठी संबधीत अधिकार्‍यांशी बोलता येऊ शकेल. फोन नंबर लेखामध्ये दिलेले आहेत.
आर्च, तू दिलेल्या कडी मध्ये राजाराम नित्यानंदांच्या स्लाईड्स आहेत. ते जी.एम.आर.टी. प्रकल्पाचे सध्याचे डायरेक्टर आहेत.

याशिवाय, डॉ.गोविंद स्वरुप, डॉ. अनंथकृष्णन यांनी केवळ प्रकल्पापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता ज्या गावची (खोडदची) जमीन प्रकल्पासाठी वापरली गेली आहे त्या गावासाठी ते स्वखर्चाने (प्रकल्पातील पैशाने नव्हे) विज्ञान केंद्र उभारुन देत आहेत. अशी उदाहरणे फार विरळा असतात!

श्रावण,
एकदम छान आणि माहितीपुर्ण लेख.
मी पुणे विद्यापीठीत शिकत असतांना आम्हाला काही प्रॅक्टीकल साठी जी.एम.आर.टी ला जावे लागले होते.
jayamol आम्ही प्रॅक्टीकल साठी जायचो तेव्हा तिथल्या कँटीन मध्ये आमची जेवण्याची सोय केली जायची. पुर्वसुचना दिली तर कदाचित बाकीच्यांची पण केली जावु शकेल.
डॉ. अनंतकृष्णन आम्हाला गेस्ट लेक्चर द्यायचे. Apart from being a good scientist he is a very good and inspiring teacher. This article reminded me all those days. Thanks.

खूप छान लेख. मुलांनाही वाचून दाखवायला हवा.
आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो अस काही वाचताना.

मी काढलेला फोटो नारायणगडावरुन. ह्या गडाची माहिती देखील श्रावण लिहिलच. Happy

.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

हा एक.

.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

झकासराव फोटो सहीच एकदम..!!!
लेख टाकला तेव्हा तुझे फोटो सापडले नाहीत नेमके. बरे झाले तुच टाकलास तो.
नारायणगडाबद्दल लिहीलच लवकर..!!! Happy

श्रावण
छान माहीती लिहीलि आहेस.

झकास फोटोपण छानच

श्रावण उत्तम माहीतिपुर्ण लेख. जाउन बघायलाच पाहीजे.

आता एवढी लोक येणार म्हणजे आता एक तम्बु ठोकायला हवा त्यान्च्या सोयीसाठी.

खुपच छान लेख. या नारायणगावातच मी एक रात्र अलिकडे मुक्काम केला होता.

श्रावण चांगली माहिती लिहीलीस. आम्ही १९९० मधे गेलो होतो तेव्हा हा प्रकल्प पूर्ण व्हायचा होता. पण नारायणगाव वरून जुन्नर ला जाताना उजव्या बाजूस अशी एक डिश बर्‍याच आधीपासून दिसायची.
येथे वाय च्या वरच्या दोन्ही रेघा जेथे मिळतात तेथे खोडद आहे का? सर्वात दक्षिणेला असलेली डिश पार घोडनदीपलिकडे मंचर जवळ दिसते. तसेच डावीकडची सर्वात वरची जवळजवळ जुन्नर मधे? आणखी त्या चित्रात न दिसणारे अँटेना त्या मधल्या चौकानात असावेत.
पुण्याहून सकाळी निघून जुन्नर, शिवनेरी, लेण्याद्री, ओझर आणि खोडद हे सर्व कदाचित एकाच दिवसात होऊ शकेल.

अनेक धन्यवाद प्रतिक्रीयांबद्दल!!!
बर्‍याच मान्यवरांकडून प्रतिक्रिया आल्यात. दिनेशदा, नारायणगावला काय काम काढले होते?
अमोल, नारायणगाववरुन जुन्नरकडे जाताना डावीकडे जी डिश दिसते ती आर्वी या गावी आहे व या प्रकल्पापासून वेगळी आहे. तसल्या दोन डिशेस आहेत. त्या केंद्राचा वापर दुरसंचार व इतर कारणासाठी जे उपग्रह आपण प्रक्षेपीत केलेले आहेत त्यांच्या नियंत्रणासाठी केला जातो.मुख्य फरक म्हणजे तिथे डिशमध्ये सलग धातूची शीट वापरली आहे. जाळी नव्हे. त्या बर्‍याच आधीपासून तिथे आहेत.
बरोबर ओळखलेस तू. वायच्या रेषा जेथे मिळतात तेथे खोडद आहे व न दिसणार्‍या अँटेना त्या चौकोनात आहे. वायचे आर्म्स आग्नेय, वायव्य व ईशान्य दिशेत गेलेत. पैकी वायव्य चा शेवटचा अँटेना जवळजवळ जुन्नरमध्ये आहे तर ईशान्येचा शेवटचा अँटेना कल्याण-नगर मार्गावरील बेल्हे गावच्या पुढे आहे. आग्नेय चे अँटेना नारायणगाव शिरुरच्या मार्गावर आहेत त्यामुळे ते पुणे-नाशिक महामार्गावरुन मंचर परिसरातून पुर्वेला दुरपर्यंत बारीक निरीक्षण केल्यासच ते दिसू शकतात.

श्रावण खुप चांगली माहीती. धन्यवाद.

खूपच समग्र आणि विशेष माहिती दिल्याबद्दल धन्यवाद श्रावण!! अजूनही अशी नवीन गोष्टींविषयी सचित्र माहिती वाचायला आवडेल.

Pages