अंड्याचे फंडे ८ - हरवलेले आवाज

Submitted by अंड्या on 15 February, 2013 - 23:28

बरेच दिवसांनी अंड्याचे कॉलेजला जाणे झाले जे तो कधीच मागे सोडून आला होता. होस्टेलला चक्कर मारली पण शुकशुकाट वाटला. बरेच वर्षांनी एखाद्या ओळखीच्या जागी जावे आणि तिथे कोणी आपल्या ओळखीचे दिसू नये की मग एकतर तेथील गजबजाट तरी अंगावर येतो किंवा शुकशुकाट तरी वैताग आणतो. तिथून बाहेर पडलो आणि कॉलेजच्या मुख्य इमारतीकडे वळलो. रात्रीचे साडेदहा वाजले होते. सिनेमा बघून परतत होतो. सोबतीला कॉलेजमधीलच मित्र होते. सारे एकाच कॉलेजचे माजी विद्यार्थी, म्हणून रात्री घरी परतण्याऐवजी कॉलेजलाच मुक्काम टाकून मैहफिल जमवायचा बेत आखला. कॉलेजच्या मुख्य इमारतीचा एक मजला रात्रभर जागत असतो हे सवयीने माहीत होते. दोन वर्षे अभ्यासाच्या नावावर तिथेच झोपण्यात गेली आमची.. अच्छा चला, पत्ते कुटण्यात गेली हे देखील कबूल करतो. तर ते बाकडे आजही ओळखीच वाटले. त्यावरच आडवेतिडवे पसरून गप्पा कुटायला सुरुवात केली. कारण यावेळी पत्ते बरोबर नव्हते, गरजही नव्हती म्हणा.

कॉलेजच्या आठवणी कॉलेजच्या मित्रांबरोबर कॉलेजमधील आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर, ज्यांनी हा अनुभव घेतला तेच काय ते जाणोत की आमची रात्र कशी रंगली असावी. मध्येच एक सिक्युरीटी मामा डोकाऊन गेले. कोणी ओळखीचे भेटो न भेटो हे ओळखीचे असणे फार गरजेचे होते. शैलूने हात दाखवला आणि काम झाले. पहाटेपर्यंतची रात्र अशीच जागून काढायचा विचार होता. पण सर्वांच्याच डोळ्यांवर आलेल्या झापडीने अंदाज चुकवला. कॉलेजात असताना असे कधी व्हायचे नाही. कदाचित बदललेली जीवनशैली कारणीभूत असावी. सध्या सर्वांची लाईफ फुल्ल ऑफ वर्किंग स्ट्रेस झाल्याने सुट्टीचे दिवस म्हणजे झोपा काढायचे हे ठरलेलेच असते. चलता है, मला मात्र त्या लाकडी बाकड्यांवर कधीच झोप आली नव्हती म्हणून मी माझ्या फेव्हरेट व्हरांड्यात पसरलो. डोक्याखाली एखादे पुस्तक नाहीतर अंगातलेच काढून त्याची छानशी घडी करून बनवलेली उशी. म्हणजे उशीची उशी झाली अन अंगदेखील फुल्ल एअर कंडीशन. ते ही काय कमी म्हणून वर चमचमणारे तारे. सकाळी उठायचे म्हणून सवयीने अलार्म लावायला मोबाईल काढला अन स्वताशीच हसायला आले. त्याची तेव्हाही कधी गरज पडली नव्हती, तर आज उठायची अशी काय घाई होती. मुळात तेव्हा मोबाईल नावाचा प्रकारच बाळगायचो नाही. सकाळी त्या व्हरांड्यात जाग यायची ती पाखरांच्या मंजुळ किलबिलीनेच. वाटले आज इथून रेकॉर्डच करून जावे अन रोज अलार्म म्हणून मग तेच वापरावे. आईच्या लाडिक हाकेनंतर साखरझोपेतूनही प्रसन्नतेने डोळे उघडावेसे वाटावेत असा तो दुसरा आवाज.

पण का कोणास ठाऊक, नव्हता नशिबी तो आवाज यावेळी. सकाळी जाग आली ती अभ्यासाच्या निमित्ताने कॉलेजला लवकर येणार्‍या मुलांच्या गोंगाटानेच. घरी परतताना मित्रांमध्ये विषय निघाला आणि काय आश्चर्य, त्यांच्याही ते लक्षात आले होते. पक्ष्यांची किलबिल त्या दिवशी झालीच नाही म्हणे. किंबहुना हल्ली ती होतच नाही म्हणे. कॉलेजच्या परिसरातील झाडे किंचित कमी झाली होती हे खरे, मात्र हे कारण काही मनाला पटत नव्हते. कोण म्हणाले प्रदूषण वाढलेय, तर कोणी वाढत्या लोकसंख्येला आणि ट्राफिकला जबाबदार धरले. कोणी मोबाईल टॉवरमधून निघणार्‍या अदभुत लहरींवर खापर फोडले तर कोणी थेट ग्लोबल वार्मिंगलाच हात घातला. पाखरे हरवली होती एवढे मात्र नक्की, अन त्यांच्याबरोबर हरवला होता तो त्यांचा आवाज... बस इथेच अंड्याचे विचारचक्र सुरू झाले. आधुनिक राहणीमान, सतत बदलणारी जीवनशैलीमुळे आणि झपाट्याने प्रगत होणार्‍या तंत्रज्ञानामुळे आज कित्येक आवाज आपल्यातून हरवले आहेत, कित्येक दुरावले आहेत. अश्याच काही विसर पडलेल्या आवाजांचा अंड्याच्या मनाने सहज आढावा घेण्यास सुरुवात केली.

भायखळ्याला माझी मावशी राहायची. या अंड्यावर लहानपणापासूनच फार जीव तिचा. दिवाळी अन उन्हाळी सुट्ट्या पडल्या कि माझा मुक्काम तिथेच. आईशिवाय अंड्या राहू शकेल असे पृथ्वीतलावरील एकमेव घर. ‘माय मरो अन मावशी जगो’ अशी अचरट म्हण बनवणार्‍याच्या बोलण्यातही काही तथ्य होते हे तिथे जाणवायचे. मामे-मावस-आत्येभावांची टोळी जमली की रात्री लवकर झोपणे काही व्हायचे नाही. मग मध्यरात्रीच्या निरव शांततेत दोन हमखास ऐकू येणारे आवाज टिपायचा खेळ सुरू व्हायचा. त्यातील पहिला आवाज म्हणजे जवळच असलेल्या राणीबागेतील वाघ-सिंहाची डरकाळी. तो नक्की वाघ डरकाळायचा, सिंह गर्जना करायचा की अस्वलाची गुर्रगुर्र असायची हे तेव्हा समजायचे नाही. पण निदान कुत्रे भुंकल्यासारखा आवाज नसल्याने आणि आवाज राणीबागेतूनच येत असल्याने आम्ही त्या आवाजाचे बिल नेहमी वाघसिंहांवरच फाडायचो. दुसरा आवाज म्हणजे बाहेरगावी जाणार्‍या ट्रेनचा आवाज. हा आवाज भायखळा स्टेशनवरून न येता थेट मुंबई सेंट्रल स्थानकाहून येतो असे मावशी सांगायची. खरेही असेल, तेव्हा मोठे सांगतील तेच प्रमाण मानायचे वय. पण जसे वयात आलो तसे मावशीच घर सुटले अन ते आवाजही. मध्यंतरी कित्येक वर्षांनी मावशीकडे जाणे झाले होते तेव्हा ना सिंह गरजला ना ट्रेनने भोंगा दिला. कदाचित राणीबागेत आता दोनचार घुबडं अन माकडं सोडून फारसे वन्यजीव उरले नसावेत, आणि वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीने वाढत्या ट्राफिकच्या कर्णकर्कश्य हॉर्नमुळे लांबवरून येणारे ट्रेनच्या भोंग्यांचे आवाज दबले जात असावेत. त्या रात्री गप्पांमध्ये त्या दोन्ही आवाजांची आठवण मात्र काढली गेली ज्यांच्याशी आम्हा भावंडांच्या बालपणीच्या आठवणी देखील निगडीत होत्या.

त्या ट्रेनच्या भोंग्यासारखाच आठवणीतील एक आवाज गिरणीच्या भोंग्याचा. हा आवाज देखील फार जुना. सकाळी नऊ वाजता न चुकता कानावर पडणारा. आमचे घड्याळ किती पुढे आहे की मागे पडले आहे हे या भोंग्याच्या वाजण्यावरून ठरायचे. आईसाठी तर ती नऊची वेळ एक बेंचमार्क होती. तो भोंगा कानावर पडला की नऊ वाजले हे तिला समजायचे आणि तसे ती सकाळची तयारी शेड्युलनुसार चालू आहे की नाही हे ठरवायची. जर तयारी वेळेत नसेल तर, "अरे देवा नऊ वाजले. अजून कपडे धुवायचे बाकी आहेत. आज पाणी देखील मेले हळूहळू येतेय. ए चल आनंदा, तू चहा घे तोपर्यंत आपल्या हाताने, मला वेळ नाही आता..." हे तिचे ठरलेले पुटपुटने. तो भोंगा ही कुठे हवेत विरला देव जाणे. कोणत्या गिरणीचा वाजायचा ते ना आजवर मला कळले ना तेव्हा माझ्या आईला माहित होते. तरीही तो आमच्या दैनंदिनीचा एक भाग बनून होता.

असाच तेव्हा घराघरातून येणारा एक आवाज म्हणजे कूकरच्या शिट्ट्यांचा. सकाळची किंवा संध्याकाळची एक ठराविक वेळ झाली की थोड्याफार फरकाने वाडीतील प्रत्येक घरातून हा आवाज यायचा. सोबतीला असायचा तो एक मंदसा दरवळणारा वास. रविवारी हा वास तसा खासच असायचा आणि हे आवाजही त्या दिवशी आपली वेळ चुकवून किंचित उशीराच ऐकू यायचे. कपडे धुताना धोक्याने बडवताना होताना आवाजही याच कॅटेगरीतील, अन याच्या सोबतीलाही एक सुकत घातलेल्या कपड्यांचा वास असायचा. पण आज मात्र फ्लॅटच्या बंद दरवाजापाठी हे आवाज देखील अडकून राहिलेत.

हा संस्कृतीबदल केवळ चाळसंस्कृती अन फ्लॅटसंस्कृती पुरता मर्यादीत नसून सर्वच क्षेत्रात घुसला आहे. पैकी एक म्हणजे मंगलकार्ये. एकेकाळी लग्नसराईत हमखास ऐकू येणारा सनई चौघड्यांचा आवाजही लोप पावलाय. तेव्हा मात्र तेच तेच पॅंपॅपॅ काय सार्‍या लग्नात म्हणून अंड्या चिडायचाच, पण हल्ली काही लग्न समारंभ पाहता ते नुसते रिसेप्शन अन जेवणाच्या पार्टीपुरता असतात की काय असे वाटते तेव्हा त्या पारंपारीक सनई चौघड्याची कमतरता जाणवतेच.

या पिढीत हरवल्यासारखा वाटणारा अजून एक आवाज म्हणजे मुलांचा कल्ला. एक जमाना होता जेव्हा सुट्ट्या पडल्या की क्रिकेट फूटबॉल अन पतंगबाजी, खोखो कबड्डी अन भोवरापाणी, सकाळी उठल्यापासून दिवस मावळेपर्यंत या मैदानी खेळांच्या नावावर वाडीभर नुसता कल्ला कल्ला अन कल्ला कान किटवायचा. आज मात्र मोबाईल विडीओगेम अन ईंटरनेट यांचाच बोलबाला. मुलांचा आवाज चिडीचूप अन या उपकरणांतून बाहेर पडणारे चित्रविचित्र बींप बींप पीब पीब चे आवाज. या आवाजावरून आठवले हल्लीच्या सिनेमांनी ध्वनीमुद्रणात अशी मजल मारली आहे की जुन्या सिनेमातील हाणामारीच्या प्रसंगांमध्ये येणारा ढिशुम ढिशुमचा आवाज आणि ठो करून सुटणारा बंदूकीचा बार देखील इतिहासजमा झालाय. त्या आवाजाने आम्हा बच्चे कंपनीला हिंदी सिनेमाशी एवढे एकरूप करून ठेवले होते की मारामारी म्हटले की आम्ही ढिशुम ढिशूम असेच बोलायचो.

कुल्फीवाल्याचा आवाजही हल्ली मिस करतो हा अंड्या.. कुल्फिय्ये SSS.... करत त्याने दिलेली बांग.. अन मग उगाच आईच्या आसपास घुटमळणे जे तिने माझे मन ओळखून दोन रुपये काढून द्यावेत.. अगदी यासारखीच आणखी एक बांग.. भांडीय्ये SSS.... ही ऐकल्यावर मात्र आजीच्या पदरामागे लपणे.. कारण ही भांडीवाली मस्ती करणार्‍या लहान मुलांना उचलून नेते अशी घातलेली भिती.. कुठे गेले हे सारे आवाज म्हणून शोधायचे म्हटल्यास आधी ते परत हवे आहेत का हा प्रश्न अंड्याला स्वत:च्या मनाला विचारावा लागला. अन याचे उत्तर त्यावाचून काही अडले नाही असेच मिळाले. काही गोष्टी आठवणी सजवायलाच चांगल्या वाटतात. पण एक आवाज मात्र या अंड्याला परत आणायला आवडेल, अन तो म्हणजे त्याचा स्वत:चा आवाज. मोठा होता होता तो देखील कुठेतरी दबला आहे. समाजाने प्रौढांसाठी बनवलेले शिष्टाचार पाळायच्या नादात या अंड्याने शेवटची दिलखुलास आरोळी केव्हा ठोकली होती हे आता तोच विसरला आहे. भारतीय संघ क्रिकेटचा सामना हरताना बघून टीव्ही समोर उभे राहून आपल्याच खेळाडूंना हलक्याश्या आवाजात घातलेली एक कचकचीत शिवी, तोच सामना जिंकल्यावर फटाक्यांनाही लाजवेल असा केलेला जल्लोष, तसाच काहीसा किंवा त्यापेक्षाही भारी असा जल्लोष जो शेजारच्या वाडीतील पतंग गुल केल्यावर व्हायचा, त्याच पतंग उडवायच्या गच्चीतून खालच्या हॉटेलवाल्या सदूशेठला दोन कटींग वरती पाठवायचा दिलेला आवाज, सबंध वाडीतील बत्ती गुल झाल्यावर उत्स्फुर्तपणे होणारा मुलांचा एकच कल्ला ज्यात अंड्याचाही एकेकाळी सिंहगर्जनेचा वाटा होता. हे सारे आवाज एकदा गवसले की मग कानांवर पडणारे इतर नवेजुने आवाज पुन्हा तसेच उपभोगता येतील, अन त्यापैकी कुठलाही हरवलेला आवाज चुटपुट लाऊन जाणार नाही याची अंड्याला खात्री आहे. तुम्हीही बघा तुमच्या आयुष्यातून स्वत:चा असा एखादा आवाज हरवला आहे का, अन असल्यास त्याला परत आणने शक्य आहे का..!

- आनंद उर्फ अंड्या

--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------

अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://www.maayboli.com/node/41484
अंड्याचे फंडे २ - फर्स्ट क्लास - http://www.maayboli.com/node/41751
अंड्याचे फंडे ३ - छंद - http://www.maayboli.com/node/41925
अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद - http://www.maayboli.com/node/42171
अंड्याचे फंडे ५ - शर्यत - http://www.maayboli.com/node/42319
अंड्याचे फंडे ६ - शॉपिंग मॉल - http://www.maayboli.com/node/42594
अंड्याचे फंडे ७ - खादाडी - http://www.maayboli.com/node/40225

--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.
माझी सकाळ होते ती दोन-तीन ठिकाणच्या बांग ऐकून. मग त्याबरोबरच थोडे कुत्रे आणि कावळे-कबुतर-घारींचे आवाज.

जिओ मेरे अंड्या.. सहीये..

कुल्फीवाल्याचा आवाजही हल्ली मिस करतो मी...
कुल्फिय्ये SSS.... करत त्याने दिलेली बांग.. अन मग उगाच आईच्या आसपास घुटमळणे जे तिने माझे मन ओळखून दोन रुपये काढून द्यावेत..

सेम अशीच आणखी एक बांग.. भांडीय्ये SSS.... ही ऐकल्यावर मात्र आजीच्या पदरामागे लपणे.. कारण ही भांडीवाली मस्ती करणार्‍या लहान मुलांना उचलून नेते अशी घातलेली भिती.. Happy

वाह!! सुंदर लिहिलंयस.. तुझा लेख वाचून जाणीव ही झाली कि कित्येक आवाजांना मुकले आहे.. इथे तर इतकी शांतता असते कि रविवारी दुपारी बारा,एक वाजेपर्यंत ही जाग येऊ नये!!!
कमला हासन च्या 'पुष्पक' सिनेमात तो कसा त्या गजबजलेल्या वस्तीतले आवाज टेप करून आणतो आणी मग ते ऐकता ऐकता त्याला गाढ, शांत झोप लागते.. तसंच पक्ष्यांच्या आवाजाची टेप आणून वाजवाविशी वाटतेय Happy

वर्षू दी... आंबेवाले असतात पण ते आंबे वरिजिनल हापूस असणे दुर्मिळ गोष्ट..

मच्छीवाले भैय्ये मात्र फिरत असावेत.. कारण मच्छी मार्केट हे भाजीमार्केटसारखे गल्लोगल्ली नसते ना..
आमच्याकडचा मच्छीवाला बिल्डींगच्या गेटपाशी येऊन घरी फोन करतो, मग काही हवे असल्यास आम्ही खाली जातो..

लसूनवाली... डब्बा बाटली भंगार वाले.. काही जण तर काय हाळी ठोकतात ते शब्दच समजत नाहीत.. Sad

अभिषेक, इडलीवाल्याच्या हातभोंग्याचा पाँकपाँक आवाज पूर्वी ठाण्यात दुपारी ऐकू येत असे. हल्ली कित्येक वर्षांत ऐकला नाहीये! मुंबईत काय परिस्थिती आहे?
आ.न.,
-गा.पै.

छान लेख.
९ वाजता पुर्वी सायरन पण वाजायचा. १९७१ च्या युद्धाच्या वेळी सुरु केला होता.
तो सनईचा आवाज ( सा ग म ध नि सा ) हल्लीच कुठल्यातरी गाण्यात ऐकला होता, पण विचित्रच वाद्य वापरले होते. बहुदा शाहिद कपूरचा होता चित्रपट.

धन्यवाद ऑल प्रतिसादक

दिनेशदा, शाहिदचा लग्नाचा चित्रपट म्हणजे विवाह असावा, पाहिला नसल्याने नो कॉमेंट.

वर्षूदी, पुष्पक.. कबूतरांची गूटरगू.. अगदी अगदी..

वा! खुप सुंदर लिहिलय अंड्या.

गादीचा कापुस पिंजुन देणार्या माणसाच्या खांद्यावर असणार्‍या त्या दोर्‍याचा आवाज.
पाटा-वरवंट्याला टाकी मारुन देणार्‍या बाईची हाकाळी.

मस्त लिहिलयसं..

ह्या सर्वांचा आवाज आता बंद झाला ...

१. गादीचा कापुस पिंजुन देणार्या माणसाच्या खांद्यावर असणार्‍या त्या दोर्‍याचा आवाज.
२.कुल्फिय्ये....
३. भांडीय्ये ...
४. ह्हा प्पू स....
५. इडलीवाल्याच्या हातभोंग्याचा पाँकपाँक
६. डब्बा बाटली भंगार वाले
७. आयुष्यातून स्वत:चा एखादा आवाज (जो आता परत आणणे आवश्यक आहे.)

वा आनंद, छान लिहिलयसं!
आम्ही सुद्धा सुट्टित आजोळी जायचो तेव्हा असाच एक आवाज ऐकु यायचा, रेल्वे फाटकाचा आणि मग जाणार्‍या ट्रेनचा. आजी-आजोबांचे घर रेल्वे-स्टेशनच्या अगदी जवळ अस्ल्याने दिवसा-रात्री कधीही अगदी स्पष्ट ऐकु यायचे हे आवाज. रात्री झोप लागत नसेल तर मनातल्या मनात आम्ही मोजायचो कितीदा गेट लागले आणि किती गाड्या गेल्या ते. अजूनही ते आवाज येतात आजीकडे गेलं की. पण आता तिकडे जाणचं खुप कमी झालयं... Sad

खुप छान लिहीले आहे... आवडले !

आम्ही लहान असताना दररोज सकाळी एक आज्जी काहीतरी विकायला घेवुन यायच्या..
"एssssssss मटईssssस्सैssssssssss" असं काहीसं ओरडायच्या. काय ओरडताहेत तेच कळायचं नाही. शेवटी एकदा विचारलं तेव्हा कळाले की त्या 'मटकी' विकायला येतात आणि 'मटकी उसळ' म्हणून ओरडतात...

तीच तर्‍हा 'गारेssssगाssss' ची. त्याच्याकदे सायकलवर मागे पत्र्याचा डबा असायचा मोठा, म्हणून ओळखु तरी यायचं की 'गारेगार' वाला आहे ते...

आजकाल सोसायट्यांमधुन या लहान-लहान फिरत्या विक्रेत्यांना मनाई झाल्यापासून या आवाजांना मुकलोय खरा Sad

आमच्याकडे एक भेळवाला यायचा. तो भई असं ओरडायचा. आम्ही नेहमी दही ऐकायचो. Happy
ट्रेनमधे एक बाई वेफर्स, चकली, चिवड्याची छोटी पाकिटं विकते. ती जे काही ओरडते ते आम्हाला- ए वेफरअत्ती- असं ऐकु येतं Uhoh

माझ्यामते फेरीवाल्यांचे आवाज अन उचार काही समजत नाही ते त्यांच्या आरोळी फेकायच्या विशिष्ट लकबीमुळे असावे.. आणि ती लकब का? तर सतत दिवसभर रोजरोज एकाच एनर्जीत ओरडायचे म्हणून खास तसे असावे..

अर्थात हा माझा अंदाज आहे, बाकी जावे त्यांच्या धंद्यात तेव्हा कळे.

आमच्याकडेही १० चा भोंगा वाजत असे. तो वाजला की जेवण करून शाळेला निघायची तयारी सुरु .
खरच हरवून गेल्या त्या गोष्टी.
काही आवाजाबरोबर काही शांतता सुद्धा हरवली आहे. दुपारच्या वेळची एक वेगळीच शांतता. शाळेला सुट्टी असेल की हि शांताता अनुभवता यायची. घरातील बायकाची सकाळची कामे उरकून आराम करायची ती वेळ असे. सकाळची गडबड संपली की दुपारी शांतपणे रेडिओ ऐकत काम करणे. एक संथ प्रवाही आवाज असे त्या शांततेला.
आता सारा दिवसच गडबडीत जातो.

नारीयल पानीSSS, मूळावाला...........
हा नारळपाणी वाला सव्वा आठला आला की मग माझी भुणभुण सुरु व्हायची पप्पांचा मागे. माझी सकाळ काहि तो आल्याशिवाय व्हायची नाही. आणि कधी तो यायचा हुकला कि मग मी अती हट्टाने पेटायची, मग पप्पा कोणाला तरी नारळपाणी आणायला पिटाळायचे.

खूप आवडलं हे लेखन. काय सुरेख आठवणी असतात ना एकेक. आणि खरंच हे आवाज मनात घर करून राहीले आहेत.
आमच्या गल्लीत एक बोहारीण यायची ती "तये घ्याच्ये डब्बा भांडेय्य्य्य्या" असं काहीतरी ओरडायची, तो आवाज (नंतर तिच्याशी बोलल्यावर समजलं की ती "ताई घ्यायची का डबा भांडी असं म्हणत आहे. :))
एक बुढ्ढा-बुढ्ढीके बाल वाला माणूस नेहमी यायचा तेव्हा त्याची देवपूजेतील घंटेपेक्षा जरा मोठी घंटा असायची तिचा आवाज, गारे गार, कल्हईवाला पण एक आरोळी ठोकत जायचा तो आवाज.
हे सारं आठवून मस्त वाटलं.

मस्त लेख! Happy खुप सार्‍या आठवणी जाग्या झाल्या...

लहानपण मुंबईत गेल्याने गिरणीच्या भोंग्याचा आवाज, डब्बा बाटलीवाला, कापुस पिंजणारा करणारा तो एक अजबच टिर्र टिर्र आवाज, भाजीवाला, मच्छिवाला, कावळ्यांची कावकाव, कडकलक्ष्मी (लहानपणी भयंकर भिती वाटायची त्या फटके मारण्याची), डोंबारी.. इ इ अगदी आठवतात. त्यात अजुन म्हणजे ... 'पाट्याSSSSलाSSS टाक्कीएSSSS' म्हणणारा आवाज....आणि कल्हई वाल्याचा आवाज...

यंदाच खुप वर्षांनी मुंबईत डोंबारी कम कडकलक्ष्मी असा खेळ बघितला...

इथे इतके शांत असते की पहिल्या दिवशी आले तेव्हा रात्री झोप लागली नाही.....

सगळे प्रतिसाद अगदी अगदी, खास करून मुंबईतले फेरीवाले, मी सुद्धा लिहून झाल्यावर एकाला हे दाखवले आणि विचारले तुला हे वाचून कुठले आवाज आठवतात का, तर त्याने देखील कुल्फी वाल्यापासून डब्बाबाटलीभंगारवाल्यापर्यंत एकेक फेरीवाले गिणवले, मलाही वाटले, अरेच्चा आपण हे कसे नेमके विसरलो, पण मग मूळ लेखात टाकण्याऐवजी विचार केला की प्रतिसादासाठी ठेऊया, पण इथे तर एकेक करत सारेच कवर झाले.. Happy

शाळेच्या घंटीचा आवाज खूप मिस करतोय. Sad

Pages