अद्भुत (भाग 4 )

Submitted by Mandar Katre on 7 February, 2013 - 13:59

4

रोहन थोडा उदास होवून म्हणाला ……. गुरुजी ,मी इतका प्रवास करून आपल्या मठात आलो ,आणि इथे आल्यावर मला माझ्या सगळ्या श्रमांचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आश्रमात आल्यापासून मला कसलीच भीती,चिंता जाणवत नाहीये. मला तर स्वर्ग गवसल्याचा आनंद झालाय ,आणि तुम्ही मला लगेच इथून जायला सांगताय? गुरुजी म्हणाले...........बेटा ,तुला आत्ता जे जाणवते आहे,तो मठातील आध्यात्मिक वातावरणाचा पुण्यप्रभाव आहे. इथून बाहेरच्या जगात गेल्यावर तुला पुन्हा पहिल्यासारख्याच भीती आणि चिंता सतवायला लागतील. यासाठी तू विपश्यनेला जा. माझी तिथल्या आचार्यांशी ओळख आहे. आणि तुला लगेच निघायचे नाहीये काही . तिथल्या आश्रमात प्रवेश मिळण्यासाठी काही वेळ लागेल, आपण त्यांना तार करू गावातून. मग ते लवकरात लवकर तुला प्रवेश देतील. तोपर्यंत तू इथे मठातच थांब, आणि हो... मी सांगतो ती पुस्तके मन लावून वाच.

रोहनचे समाधान झाले . त्याला गुरुजींनी T Lobsang Rampa या लेखकाने लिहिलेली काही पुस्तके दिली. ती पुस्तके वाचताना वेळ कसा निघून गेला ते कळलंही नाही. दहा-बारा दिवसात त्याने सगळी पुस्तके वाचून काढली . गुरुजींनी धरमशालेला विपश्यना विद्यापीठात तार केली होतीच. तिचे उत्तर आले आणि रोहनला आणखी दोन दिवसानंतरची प्रवेशाची तारीख मिळाली. आता त्याला मठ सोडून प्रवासाला निघायचे होते. सकाळी निघताना गुरुजींची अनुमति घ्यायला रोहन गेला तेव्हा गुरुजी म्हणाले…….. तू इथे जे अनुभवलेस, वाचलेस ... त्यात आणि विपश्यनेच्या शिकवणुकीत फरक आहे,हे लक्षात ठेव. पण विपश्यना मन शुद्ध करणारी एक उच्च आध्यात्मिक साधना आहे. विपश्यना करताना इतर कोणत्याही गोष्टींचा ,अगदी हा मठ ,मी आणि तू इथे वाचलेली पुस्तके यांचा अजिबात विचार करू नकोस. नाहीतर तिथे तुझा आणखी गोंधळ होईल,हे लक्षात असू दे....

गुरुजींचा निरोप घेवून रोहन पर्वतावरून खाली उतरू लागला. जसजसा तो गावाकडे येवू लागला तशीतशी त्याला बाह्य जगाची, मुंबईची ,प्रियाची आणि आपल्या कोकणातल्या गावात राहणार्याग आईची आठवण येवू लागली. गेल्या पंधरा दिवसात त्याने कुणाला साधा फोनही केला नव्हता. मठात विजेची सोय नसल्याने त्याच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाली होती. सुदैवाने पर्वताच्या पायथ्याशी असणार्यार गावात वीज होती आणि मोबाईलला रेंजदेखील होती. गावात पोहोचायला दुपारचे बारा वाजले. गावात पोचल्यावर प्रथम एका दुकानात त्याने मोबाइल रीचार्जला लावला. अर्ध्या तासात बॅटरी थोडी चार्ज झाली. त्याने पहिला फोन आईला लावला.

मुंबईत असताना तो आठवड्यातून एकदोन वेळा कोकणात आईला फोन करत असे. त्याचे वडील लहानपणीच वारलेले.आईने जिद्दीने कष्ट उपसून एकुलत्या एक रोहनला बी.कॉम पर्यन्त शिकवले. मग काही दिवस मुंबईच्या काकांकडे राहून रोहनला चांगली नोकरी मिळाली. त्यानंतर काकांशी पटेना म्हणून भाड्याने रूम घेवून रोहन नोकरी सांभाळत होता. आईला दर महिन्याला न चुकता पैसे पाठवत असे. मग त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणार्यास प्रियाकडे रोहन नकळतच ओढला गेला. मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नव्हता....

दोन आठवडे फोन न आल्याने आई काळजीत होती.... मी खुशाल आहे,माझी काळजी करू नकोस, फक्त आणखी काही दिवस पैसे पाठवता येणार नाहीत, नंतर फोन करतो … असे समजावून त्याने फोन ठेवला. नोकरी गेल्याचे किंवा आपण कुठे आहोत त्याबद्दल एक अवाक्षरही त्याने आईला संगितले नाही .... उगाच त्या म्हातार्याो जीवाला काळजीचा घोर कशाला?

नंतर प्रियाला फोन लावला. तिने उचललाच नाही. तीन वेळा रिडायल केल्यावर चौथ्या वेळेला फोन उचलला गेला... ती अजूनही नाराज आहे ,हे त्याने ओळखले. त्याने फोन न केल्याबद्दल माफी मागून मी आणखी काही दिवस मुंबईत येणार नाही,असे मोघम संगितले. मग तिने ऑफिसमधल्या नवीन घडामोडीबद्दल माहिती दिली, आणि तुझ्या नवीन जॉबचे काय ? असे विचारताच एकदोन ठिकाणी ट्राय करतोय ,असे सांगून फोन ठेवला.

एक वाजत आला होता. धरमशालेला जाणारी बस लेह वरुन दुपारी तीन वाजता होती. गावातून लेहला जायला एक तास आणि पुढे आणखी सहा तास असा एकूण सात-आठ तासांचा प्रवास होता. गावातून दीड वाजता बस मिळाली,आणि बरोबर अडीचला तो लेहला पोचला. तिथे थोडेसे खाऊन त्याने तीन वाजता धरमशालेची बस पकडली. सभोवतालचे निसर्ग-सौन्दर्य अप्रतिम होते. उंचच उंचच बर्फाच्छादित पर्वतरांगा , उंच सुळक्यासारखी वाढलेली हिरवीगार झाडांची जंगले, मध्येच फुलांचे ताटवे ,आणि पाण्याचे प्रवाह.... आपण नंदनवनात आलो आहोत का? असे क्षणभर वाटले.

रात्री साडेनऊला बस धरमशालेला पोचली. तिथून रस्ता विचारत रिक्षाने तो विपश्यना आश्रमात पोहोचला तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते. नशिबाने आश्रमातील काही मंडळी जागी होती, त्यांना गुरुजींचे पत्र दाखवताच त्याचे स्वागत करून एका छोट्याशा खोलीमध्ये त्याची व्यवस्था करण्यात आली. ती खोली दोन साधकांसाठी होती , खोलीत अगोदरच एक जर्मन युवक होता.त्याचे नाव अॅलेक्स . त्याच्याशी ओळख करून घेण्यात आणि गप्पा मारण्यात रात्रीचे बारा कधी वाजले ते कळलेच नाही. शेवटी आश्रमातील स्वयंसेवकानी त्यांना झोपायला संगितले,तेव्हा कुठे ते झोपले......

विपश्यना शिबीर सुरू व्हायला अजून एक दिवस होता. तोपर्यंत रोहन आणि अॅलेक्स यांनी अनेक विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांची एकदम जिगरी दोस्तीच झाली म्हणाना ...! अॅलेक्स एक इंजिनियर होता. जर्मनीतील बर्लिन शहरात वाढलेला. इंजिनियरिंग पूर्ण केल्यावर त्याला ट्रेनी म्हणून जॉब मिळाला. गेली दोन वर्षे तो ट्रेनी म्हणून काम करत होता. पण कुठल्यातरी मैत्रिणीने भारतात येवून योग आणि ध्यानधारणेचे धडे घेतले. आणि मग त्या मैत्रिणीने अॅलेक्सलाही भारतीय अध्यात्माची गोडी लावली. तिचे अनुभव ऐकून अॅलेक्सच्या मनातही भारताबद्दल आकर्षण निर्माण झाले .... आणि त्या ओढीपायी तो भारतात आला होता. ...

(क्रमश:)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंदार ,राग मानू नका .पण गोष्ट वाचायला लागल्यावर काय घडणार आहे हे सगळे कळते .अरुण साधूंची शोध यात्रा ,साद देती हिमशिखरे,वाचली असतीलच .आशा आहे काही वेगळे समोर येईल .ले.शु.

@विक्रांत प्रभाकर जी , आपण वर उल्लेख केल्यापैकी एकही पुस्तक मी अजूनतरी वाचलेले नाही. ही पूर्णपणे नवीन कथा आहे,जी मी लिहीत आहे. धन्यवाद !

व्वा फारच छान कात्रे भाऊ......... मस्त रंगत चाललीये कथा!

माला वाटते तुम्ही संपूर्ण कथा /कादंबरी एकत्र प्रकाशित केलीत तर बरेच वाचक आवर्जून प्रतिक्रिया देतील..........

पू ले शू............!