बोललो मी काय मजला याद नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 2 February, 2013 - 01:55

गझल
बोललो मी काय मजला याद नाही!
जीवना, माझा तुझ्याशी वाद नाही!!

काजव्यांना का म्हणावे सूर्य आम्ही?
आज गझलेचा कुणी उस्ताद नाही!

मागतो प्रस्तावना तू पुस्तकाला....
एवढा अद्याप मी वस्ताद नाही!

सारखा कानास मोबाईल आहे!
मात्र कोणाशी कसा संवाद नाही?

रोग हृदयाचा कसा त्यांनाच होतो?
ज्या बिचा-यांना कशाचा नाद नाही!

पोटची पोरे भलेही ना विचारो....
शिष्यप्रेमाला अम्ही मोताद नाही!

कालचक्राचे नियम असतात काही;
तू फुला, त्याला कुणी अपवाद नाही!

मायबोली काय ही मुर्दाड झाली?
चांगल्या शेरास सुद्धा दाद नाही!

वाहवा मी सांग त्यांची का करावी?
रंग नाही, गंध नाही, स्वाद नाही!

काय तुज कळणार गोडी अमृताची?
घेतला अद्याप तू आस्वाद नाही!

साद हृदयातून मी देवून सुद्धा....
एकही आला कसा प्रतिसाद नाही?

मी जिवाचे कान केलेले कधीचे.....
यायला होती हवी, ती साद नाही!

श्वास सरले, खेळ जन्माचा न सरला....
जीवना! जन्मेन मी! मी बाद नाही!!

व्हायचे ते एकदा होवून गेले....
ह्या मढ्याची एकही फिर्याद नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाहवा मी सांग त्यांची का करावी?
रंग नाही, गंध नाही, स्वाद नाही! <<< खरे आहे >>

रोग हृदयाचा कसा त्यांनाच होतो?
ज्या बिचा-यांना कशाचा नाद नाही! <<< व्वा ! स्वानुभव अमुचा >>

काही सुटे मिसरे खूप छान्,सहज आहेत...जसे---

जीवना, माझा तुझ्याशी वाद नाही!!

काजव्यांना का म्हणावे सूर्य आम्ही?

पोटची पोरे भलेही ना विचारो....

आताच फेसबुकावर वाचली मायबोलीचा शेर वाचून दाद द्यायलाच आलो आहे

अरविंदजी म्हणत आहेत त्याच्याशी सहमत
उस्ताद ,संवाद ,नाद, मोताद.. हे सर्वाधिक आवड्ले इतरही आवडलेच

तू फुला, त्याला कुणी अपवाद नाही!>>>"तू फुला" का वापरले आहे ? त्याचा शेरातील इतर भागाशी संबंध तुम्ही काय व कसा जोडला आहे ? त्यातून काय नेमका अर्थबोध काय होतो?..... हे अजिबात समजले नाही समजावून सांगाल का ? (मलातरी तो शब्दसमूह भरीचा व असंबंध वाट्ला -वैयक्तिक मत )

धन्यवाद

वाहवा मी सांग त्यांची का करावी?
रंग नाही, गंध नाही, स्वाद नाही!

काय तुज कळणार गोडी अमृताची?
घेतला अद्याप तू आस्वाद नाही!

मस्तच

प्रतिसाद दात्यांचा आभारी आहे!

अवांतर: फूल हे एक माणसाचे/व्यक्तीचे/वस्तूचे किंबहुना सर्व चराचराचे प्रतिक आहे!
जन्म, जीवन, मृत्यू हे आवर्तन चराचराला लगू होते! कोणीही त्याला अपवाद नाही!
सूर्य, तारे, ग्रह, आकाशगंगा , पर्वत, खडक, खनिजे, इतकेच काय हे संपूर्ण विश्व यांना या जन्म-जीवन-मृत्यूच्या आवर्तनातून जावेच लागते! कुणाचीही त्यातून सुटका नसते हे एक भूशास्त्रीय अंतिम सत्य आहे!
म्हणून या सर्व चराचराला या कालचक्राचे नियम हे पाळावेच लागतात, कुणीही त्याला अपवाद नाही.....हे सत्य आहे!
आपण राहतो ते सद्ध्याचे विश्व सुमारे १३-१४ बिल्लिअन वर्षांपूर्वी जन्माला आले, असे भूगर्भशास्त्रज्ञ मानतात!
सद्ध्याचे विश्व हे जीवन जगत आहे(एक्स्पांडिंग युनिव्हर्स) , कालांतराने हे विश्व नष्ट होवून दुस-या विश्वाचा जन्म होईल, हे वैज्ञानिक/भूशास्त्रीय सत्य आहे! म्हणजेच या पूर्वी कितिक विश्वे जन्मली, पुढे किती विश्वे जन्मणार हे सर्व माणसाला सांगता येणार नाही! पण बहुधा ते अनादी, अनंत असावे असे शास्त्रज्ञ समजतात!
भूशास्त्रीय दृष्ट्या, हे सिद्ध झालेले सत्य आहे!

म्हणून आम्ही लिहिले.................
कालचक्राचे नियम असतात काही!
तू फुला, त्याला कुणी अपवाद नाही!!....
...जेवढा शेराच्या अर्थाचा आवाका होता, तेवढा कथिला!
..............प्रा.सतीश देवपूरकर

प्रतिसाद, साद व बाद या तीन काफियांचे अतिरिक्त शेर लिहून गझल संपादित केली आहे!
पहा कसे वाटतात हे तीन शेर!
.......प्रा.सतीश देवपूरकर

क्षमस्व आपला प्रतिसाद मूळ प्रश्नास भलतीकडेच भरकटवतो आहे

आपण भूगर्भशास्त्राचे नियम शेरात सांगताहात की कालचक्राचे

मुळात नियम तरी काय आहे जो शेरात माण्डू पाहत आहात.... की तोच अव्यक्त राखला आहेत

फूल हे एक माणसाचे/व्यक्तीचे/वस्तूचे किंबहुना सर्व चराचराचे प्रतिक आहे!>>>>>>> हे वाक्य कुठल्या सुविचारसंग्रहातले वगैरे आहे काय ....की कोणत्या शब्दसंग्रहात असा अर्थ दिला आहे

असो आपला हा शेर कामयाब आहे अशी मी माझी समजूत घालून घेत आहे

माझ्या विचारणेस मान देवून सविस्तर सांगीतलेत त्याबद्दल आभारी आहे

असाच लोभ असूद्यात (पण राग नको Happy )

सतीशजी,
गझल किंवा त्यातील शेर आवडले - न आवडले म्हणण्यापेक्षा तुमच्या गझला एकसुरी वाटतात. जवळपास प्रत्येक शेरात काहीतरी "मी" चे महत्व असतेच. त्यामुळे फारसा रंग भरत नाही. त्या मी मध्येसुद्धा फारशी ताकद दिसत नाही आहे. जरा जास्त तीव्र तुम्ही लिहायला हवेत असे वाटते.
"बिनधास्तपणा" हाच तर मुळात प्राण आहे.

धन्यवाद...!

जोशी साहेब....... मला हे प्रश्न प्रांजळ पणे पड्ले आहेत ते प्रामाणिकपणे सांगू इच्छितो आहे
उत्तर द्याल का ?

१)"तू फुला" बद्दल जो प्रश्न मी वर उपस्थित केलाय त्याबद्दल आपणास काय वाट्ते?
२)प्रा. साहेबांचे उत्तर समर्पक आहे का?

कळावे आपला नम्र
वैवकु

वैभवजी,

>>>
"तू फुला" बद्दल जो प्रश्न मी वर उपस्थित केलाय त्याबद्दल आपणास काय वाट्ते? <<<

मलाही अचानक आलेला "तू फुला" चा प्रयोग योग्य वाटला नाही.

@ सतीशजी,

सर्व शेरात "तू फुला" तसे कुठेच संबंधित वाटत नाही. फुला म्हणण्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. पण तू फुलामुळे प्रॉब्लेम येतो आहे. म्हणजे एखादा माणूस काहीतरी आकर्षक सांगत असतो आणि अचानक पचकन थुंकतो आणि पुन्हा सांगायला लागतो, तसे वाटते आहे.

माझ्यामते "तू फुला" ऐवजी "हे फुला..! ....." असे हवे होते.

धन्यवाद..!

सर्व प्रतिसाद दात्यांचे, सल्लागारांचे, प्रशस्तीपत्रक वाटणा-यांचे व शंकेखोरांचे आभार!

गझलेतील 'मी' म्हणजे स्वत: शायर असतो असा भाबडा समज आहे का?
गझलेतील मी हा तू/तो/ती/ते कुणीही असतात!

सतीशजी,
>>>>> गझलेतील 'मी' म्हणजे स्वत: शायर असतो असा भाबडा समज आहे का? <<<< Lol

कारण केवळ टीका करण्यापलिकडे बर्‍याच शेरात विशेष काही दिसत नाही आहे. असो. मी काही पानेच्या पाने भरभरून वाद घालणार्‍यापैकी नाही. माझे मत तुम्हाला पटले नसेल. ठीक आहे.

अ.अ.जोशी.
आपले काव्यातील सूर कोणते?
सर्व सूर आपल्याला एकाच सूरात वाटतात काय?
शब्दांच्या शारिरीक अर्थापलीकडेही काही असते याचा आपणास पत्ता आहे काय?

शब्दांच्या शारिरीक अर्थापलीकडेही काही असते याचा आपणास पत्ता आहे काय?<<< Lol

श्वास सरले, खेळ जन्माचा न सरला....
जीवना! जन्मेन मी! मी बाद नाही!!

व्हायचे ते एकदा होवून गेले....
ह्या मढ्याची एकही फिर्याद नाही!

<<<

शेर आवडले. (मायबोली शेरासारखे काही शेर अनावश्यक वाटले हे वैयक्तीक मत आहे, चु भु द्या घ्या)

धन्यवाद भूषणराव!
कधी कधी मनाची उद्विग्नता अशी उफाळून येते खरी!
पण बाहेर गझल पेश करताना असले शेर आम्ही कटाक्षाने टाळतो! आपल्या मताशी पूर्णपणे सहमत!