भारत पाकिस्तान युद्ध होईल का?

Submitted by Atul Patankar on 13 January, 2013 - 11:31

गेल्या ६-७ दिवसांपासून पुंछ् सीमेवर गोळीबार , धुसफुस चालल्याच्या बातम्या आल्यापासून हा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावतो आहे. विशेषत: भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची विटंबना झाल्याच्या बातम्या ऐकल्यापासून तर ‘आज आत्ता ताबडतोब’ लढाईला सुरवात करून पाकिस्तानची राखरांगोळी करण्याची अनेकांची इच्छा उफाळून आली आहे. आजही सीमेवर फौजांची जमवाजमव चालू आहे, व्यापारी माल नेणारे ट्रक अडवले आहेत, अनेक मध्यस्थांची याच्यात पडायची इच्छा झाली आहे, वगैरे नेहमीच्या बातम्या येताहेत.
या संदर्भात, काही घटनांची आठवण करून, या विषयाकडे थोडं गंभीरपणे बघण्याचा हा प्रयत्न आहे.
१९९८ – भारताने, आणि पाठोपाठ पाकिस्तानने सुद्धा अणुचाचण्या केल्या, आणि अधिकृतपणे अण्वस्त्र धारक देशांच्या यादीत नाव नोंदवले.
मे ते जुलै १९९९ – कारगिलमध्ये पाक लष्कराने घुसखोरी करून भारतीय ठाण्यावर ताबा मिळवला. भारतीय सेनेने खूप प्रयत्नानंतर ही सर्व ठाणी परत जिंकून घेतली. भारत ही ठाणी आता परत मिळवणार, हे नक्की झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दडपण वाढले – आणि भारताने शेवटच्या काही ठिकाणच्या पाक सैनिकांना सुरक्षित परत जावू दिले.
११ सप्टेंबर २००१ – अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अन्य जागी अल कायदा कडून हल्ले.
२० सप्टेंबर २००१ - अमेरिकेच्या अध्यक्षांनी ‘वॉर अगेन्स्ट टेरर’ ची घोषणा केली. अफगाणिस्तानातले तालिबानचे राज्य संपवणे, तिथे लोकशाही स्थापन करणे, ओसामा बिन लादेन, अहमदशहा मसूद वगैरे अमेरीकेवरच्या हल्ल्यांना जबाबदार अतिरेक्यांना संपवणे वगैरे उद्दिष्टे जाहीर केली
७ ऑक्टोबर २००१ – अमेरिकेच्या, आणि अन्य काही मित्र राष्ट्रांच्या फौजा अफगानिस्थानात उतरल्या.
१३ डिसेंबर २००१- दिल्लीत संसदेवर अतिरेकी हल्ला.
यानंतर बरेच महिने दोन्ही सीमांवर फौजांची जमवाजमाव, आंतरराष्ट्रीय दडपण, वगैरेमुळे आता युद्ध होणारच, अशी सामान्य भारतीयांची समजूत, इच्छा होती. पण प्रत्यक्षात हा तणाव निवळला!
१९ मार्च २००३ अमेरिकेचा इराकवर weapons of mass destruction शोधण्यासाठी हल्ला
१५ जानेवारी २००४ – समझौता एक्सप्रेस चालू करून भारत पाक मैत्रीचा अजून एक प्रयत्न.
मे २००४ – भारतात लोकसभा निवडणुका होवून यूपीए सरकार स्थापन.
७ डिसेंबर २००४ – अफगाणिस्तानात हामिद करझाई अध्यक्षपदावर स्थानापन्न.
या काळात नाटो फौजांचे नियंत्रण जवळ जवळ देशभर निर्माण झाले होते. अमेरीकेनी लष्करी शक्तीबरोबरच प्रचंड पैसाही या भागात ओतला होता. २००१पुर्वी ३ वर्षात पाकिस्तानला ९० लाख डॉलरची मदत करणाऱ्या अमेरीकेनी, २००१ नंतरच्या १० वर्षात जवळजवळ १२०० कोटी डॉलरची तर लष्करी मदत केली आहे. शिवाय ६००कोटी डॉलरची इतर आर्थिक मदत.
पाकिस्तानच्या राजकीय/ लष्करी नेतृत्वाची या सगळ्या काळात गोची झाली होती. एकीकडे अमेरिकेशी सहकार्य, निदान तोंडदेखलं, करत राहणं भाग होतं. तर दुसरीकडे यामुळे देशांतर्गत इस्लामी गट सरकार किंवा लष्करी नियंत्रण झुगारून देऊन अतिरेकी कारवाया वाढवत होते. अमेरिकन इतक्या जवळ असताना उघडपणे काश्मिरातल्या अतिरेक्यांना मदत करता येत नव्हती. अमेरिकन अधिकारी पाकिस्तानवर आरोप करत होते, कि पाकिस्तानातले लष्कर गुप्तपणे तालिबानला मदत करतंय. पाकिस्तान सरकार हे नाकारत तर राहिली, पण त्यांनाही स्वत:च्या लष्कराबद्दल तेवढा विश्वास नव्हता.
अमेरिकेला, आणि विशेषत: नवीन अफगाण सरकारला पाकिस्तानबद्दल जो अविश्वास वाटत होता, त्यामुळे अफगाणीस्थानात आपला प्रभाव वाढवायला भारताने काही प्रमाणात सुरवात केली, आणि त्याला प्रतिसादही मिळाला.
२६ नोव्हेंबर २००८- मुंबईत मोठा फिदाईन हल्ला. ताज, ओबेरॉय, नरीमन हाउस वगैरे ठिकाणी लपलेले अतिरेकी ठार करण्यासाठी कमांडोंना ४ दिवस लागले.
पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचा थेट सहभाग उघड झाल्यामुळे देशभर संतापाची लाट. भारत पाक चर्चा स्थगित – आधी या हल्ल्याचे आरोपी भारताच्या ताब्यात देण्याची मागणी. भारताकडून मोठ्या कारवाईच्या अपेक्षेने पाकिस्तानने फौजा सीमेकडे सरकवल्या – पण भारताने त्यांचा अपेक्षाभंग केला!
फेब्रुवारी २००९ - अमेरिकेचे नवीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराकमधून फौजा काढून घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले.
अमेरिकेची अंतर्गत आर्थिक स्थिती, आणि अन्य कारणांमुळे यापुढे अफ्गानिस्तानातली कारवाई पुढे रेटणे शक्य नसल्याचं अमेरिकेला लक्षात आलं. मग ‘कमी वाईट तालिबान’ नावाची संकल्पना निर्माण करून, त्यांच्या ताब्यात अफगाणिस्तान देवून या झंझटीतून सुटका करून घ्यायचं धोरण त्यांनी अवलंबल. अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी कमांडो एक्शन मध्ये ओसामा बिन लादेन ला मारून ‘मानसिक’ विजय मिळवल्यावर तर हे धोरण कदाचित अधिक सोपं झालं असेल. त्यामुळे येत्या अगदी थोड्या काळात अमेरिकन फौजा अफगाणिस्तान सोडणार, हे नक्की
१६ जुलै २००९- मनमोहनसिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांचे शर्मअल्शेख येथल्या बैठकीत एकत्री निवेदन – भारतासाठी मोठा राजनैतिक धक्का. मुंबई हल्ल्याच्या आरोपींना ( हाफिज सैद, झाकी उर रेहमान लखवी, वगैरे) पकडण्याची पूर्व अट भारताने सोडून दिल्याची भावना.
या सर्व घटनांव्यातिरिक्त, या गेल्या १०-१२ वर्षांच्या काळात लष्कर ए तोयबा/ तालिबान/ वगैरे इस्लामी गटांनी भारतात किमान ३५ अतिरेकी हल्ले केले आहेत. यातले बळी, जखमी, त्यांचे कुटुंबीय, आणि ‘आपण वाचलो या वेळी – पण पुढच्या वेळी काय’ असा प्रश्न पडणाऱ्या सामान्य नागरिकांना दिसत असं, कि भारत सरकारची भूमिका काहीच नाही. दर वेळी कडक शब्दात निषेध करायचा, कारवाईच्या धमक्या द्यायच्या, आणि प्रत्यक्षात काहीच करायचे नाही. थोडे दिवस चर्चा बंद ठेवायच्या, आणि मग काहीच नवीन नं घडता, त्या परत चालू करायच्या. कधी क्रिकेट सामन्यांवर बंदी घालायची, तर आधी ‘खेळ आणि राजकारण वेगळ’ असं म्हणून पुन्हा सुरु करायचे. यातून भारतातल्या सामान्य नागरिकांना संदेश मिळतो, कि हे सरकार तुमचे संरक्षण करु शकत नाही, किंवा त्याला तुमच्या संरक्षणापेक्षाही तुमच्यावर हल्ला करणाऱ्या देशाशी मैत्री जास्त महत्वाची वाटते.
अमेरिकन सरकारने ‘वॉर अगेन्स्ट टेरर’ च्या काळातल्या भारत सरकारच्या सहकार्याचे तोंड भरून कौतुक केले असले, तरी आत्ता तरी त्यांचे धोरण भारतापेक्षा पाकिस्तानलाच झुकतं माप देत. चीनच्या वाढत्या प्रभावाखाली जाणारा एक देश थांबवायचा, तर पाकिस्तानला फार दुखावून चालणार नाही, असा काहीतरी त्यांचा अंदाज असू शकेल.
पण आता ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती पालटते आहे, आणि या नाटकातली सगळी पात्र नव्या भूमीकेसाठी सज्ज होताहेत. पाकिस्तान सरकारला आणि लष्कराला नव्या अफगाणीस्थानची व्यवस्था ठरवताना स्वत:साठी स्थान नक्की करायचय. त्या निमित्त्याने या भागात ओतला जाणारा पैसा, आणि शस्त्रास्त्रे यांचे नियंत्रण मिळवायचे आहे. म्हणून त्यांना आत्ताच ‘आम्हाला कमी लेखू नका’ हा संदेश जगाला, आणि अमेरिकेला द्यायचा आहे. शिवाय पाकिस्तानातल्या निवडणूकांचाही विचार राज्यकर्ते करत असतीलच.
पाकिस्तानी इस्लामी अतिरेकी गट (तेहरीक ए तालिबान) इतके दिवस ‘पाकी सरकार हे अमेरिकन सैतानाचे अपत्य आहे’ अशी भूमिका घेवून सरकारच्या विरोधात अतिरेकी कारवाया करत होते. अफगाणिस्तानातील तालिबान त्यांना मदतही करत असेल. पण जर सरकारने आणि अमेरिकेने अफगाणी तालीबानांशी जुळवून घेतलं, तर आपण पोरके होणार, हे या गटाच्या लक्षात आलाय. त्यामुळे ‘आमचा शत्रू नंबर १ पाक सरकार नसून भारत सरकार आहे’ असं घोषित करून त्यांनी पाकिस्तानी फौजांशी एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली आहे. शिवाय “१९७१च्या अपमानाचा बदला घ्यायची वेळ आली आहे” अशी आरोळी ठोकून त्यांनीही भारत विरोधी कारवायांसाठी कंबर कसली आहे.
लगेच, डिसेंबर २०१२ च्या शेवटच्या आठवड्यात भारतातले ‘काश्मिरी अलागाववादी’ नेते अब्दुल गनी भट, बिलाल गनी लोण, मौलाना अब्बास अन्सारी, वगैरे पाकिस्तानात जावून तिथले पंतप्रधान, लष्कर प्रमुख, मुंबई हल्ल्यातला आरोपी हाफिज सैद वगैरेंना भेटून आले. आणि त्यांनीही २०१४ मध्ये काश्मीर मुक्त करण्यासाठी ‘जिहाद’ करण्याची घोषणा करून टाकली.
आणि यानंतरच्या आठवड्यात सीमारेषेवर गडबड सुरु झाली. आधी पाकिस्तानने आरोप केला कि भारतीय सैनिकांनी एका पाकिस्तानी बंकरवर हल्ला करून १ पाक सैनिक मारला. लागोपाठ दुसऱ्या दिवशी भारताच्या सीमेत अर्धा मैल आत शिरुन, राजपुताना रायफल्सच्या २ सैनिकांना मारून पाकिस्तानने त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली. गोळीबार, सीमा रेषेचे उल्लंघन बऱ्याच वेळा घडते. विशेषत: हिवाळ्यात अशी काहीतरी खोडी काढून, त्याच्या आडून नवीन अतिरेकी दर वर्षीच काश्मीरमध्ये घुसवले जातात. पण सीमेत आतपर्यंत शिरणे, मृतदेहाची विटंबना हा काही नेहमीचा प्रकार नाही. हाफिज सैद भारत सरकारला ज्या धमक्या देतो आहे, त्यावरून ही सगळी मोठ्या, दीर्घकालीन योजनेची लक्षणे दिसतात. यात पाक सरकारची भूमिका किती, त्यांचे नं ऐकणाऱ्या अतिरेक्यांची किती, हे प्रश्न शिल्लकच राहतात. पण आपण काही केलं, तरी भारत फक्त डोळे वटारून दाखवेल, हा विश्वास या दोघांनाही आपण, आपल्या सरकारनेच दिला आहे. गेल्या वर्ष २ वर्षांच्या काळात भारतात जिथे जिथे निरनिराळ्या इस्लामी संघटनांनी पूर्णपणे कायदा झुगारून द्यायची भूमिका घेतली, नव्हे कायद्याच्या रक्षकांवर सरळ समोरासमोर हल्ले केले, तेव्हा केंद्र सरकार किंवा वेगेवेगळी राज्य सरकारे कशी कोमात जातात, हे ही या सर्वांनी पहिलच आहे. त्यामुळे भारत सरकारची कुरापत काढायला कारण, आणि संधी दोन्ही पाकिस्तान मधल्या सरकारी आणि खाजगी अशा अनेक संघटनांना उपलब्ध आहेच.
पण मग युद्ध होईल का? युद्ध करायला २ बाजू लागतात. त्यामुळे भारतालाही अशीच करणं आणि संधी, दोन्ही उपलब्ध आहे का, हे बघायला पाहिजे.
खरं म्हणजे कारण तर पाकिस्तानने पुरवल आहेच. पण युद्धाचा निर्णय ज्या राज्यकर्त्यांनी घ्यायचा, ते तो घेण्याची शक्यता फार कमी वाटते. त्यांना, का कोणाला माहिती, पण पाकिस्तानविरुद्ध काही करणे, किंवा नुसते बोलणे सुद्धा, यामुळे आपल्या सेक्युलर प्रतिमेला तडा जातो, असं वाटतं. त्यामुळे ६५ किंवा ७१ साली जशी युद्ध झाली, तसं काही तरी होण्याची शक्यता मला जवळजवळ शून्य वाटते.
शिवाय आपल्या आजच्या राज्यकर्त्यांना अमेरिकेची मर्जी फार महत्वाची वाटते. मनमोहनसिंग ज्या दोनच ठरावांच्या वेळेला मैदानात उतरले, सरकार पणाला लावायची भाषा बोलले, ते म्हणजे अणु करार आणि FDI. त्यामुळे त्यांना काय वाटेल, याचा अंदाज घेत घेत धोरण ठरवायचं म्हणजे युध्द करणं अशक्यच.
आणि समजा युद्ध करायचं, तर त्यासाठी अनेक पातळ्यांवर तयारी करावी लागते. गुप्तहेर खात्याकडून शत्रूच्या शक्तीची, भूभागाची, तयारीची माहिती मिळवावी लागते. शत्रू किती किंमत मोजायला तयार होईल, याचं अंदाज घ्यावा लागतो. आपली आर्थिक स्थिती बघावी लागते. आपली जनता या सरकारच्या पाठीशी किती काल किती विश्वासाने उभी राहील, ते पाहावं लागत. फौजा हलवाव्या लागतात, आणि त्यांना रसद पुरवायची तयारी करावी लागते. अनेक कटू राजकीय, आर्थिक निर्णय घ्यावे लागतात. राजकीय स्पर्धकांना विश्वासात घ्यावे लागते. हे सगळं करण्याची कर्तबगारी, चलाखी, आणि नैतिक बळ आज राज्यकर्त्यांमध्ये आहे कि नाही, याची मला शंकाच आहे.
शिवाय,पाकिस्ताननी सीमेवर आगळीक केल्यावर लगेच, ‘आज आत्ता ताबडतोब’ लढाई करणे याला लष्करी भाषेत शत्रूच्या वेळापत्रकानुसार, शत्रूने निवडलेल्या ठिकाणी लढाई करणे असे म्हणावे लागेल. कुठलाही लष्करप्रमुख याला तयार होणार नाही. २ उदाहरणे कदाचित उपयोगी होतील
(१) जनरल सॅम माणेकशॉ यांनी १९७१ च्या युद्दसंदर्भात पंतप्रधानांना ऐकवले होते – कसही करून लढाई करायची तर लगेच सुरु करु. पण ती जिंकायची असेल तर मला वेळापत्रक ठरवू द्या. इंदिरा गांधींनी त्यांच ऐकलं, आणि पूर्ण तयारी झाल्यानंतर युद्ध सुरु केले. अर्थातच भारतानी दैदिप्यमान (लष्करी) विजय मिळवला.
(२) अफजलखान राज्यावर चालून येत असताना शिवाजी महाराज प्रताप गडावर घट्ट बसून राहिले होते. त्याने प्रजेवर जुलूम केले तरी, हिंदू मंदिरे लुटली, फोडली तरी. शेवटी अफजलखानाला जावळीच्या जंगलात यावं लागल, आणि त्या अफाट फौजेचा मराठ्यांच्या सैन्यांनी अगदी कमी वेळात, शक्तीत संपूर्ण पराभव केला.
त्यामुळे भारताचे हवाई दल प्रमुख जर खरच (फेसबुकवर प्रसिद्ध झाल्याप्रमाणे) म्हणाले असतील, कि पंतप्रधानांनी आम्हाला स्पष्ट आदेश द्यावेत, पाकिस्तानला अर्ध्या तासात रिकाम मैदान करून टाकू, तर तो प्रकार केवळ बेटकुळ्या फुगवून दाखवण्याचा होता हे लक्षात घातला पाहिजे. त्याचा उपयोग आहेच. पण पंतप्रधान असा काही आदेश देणार नाहीत याची खात्री करून घेवून मगच ते बोलले असतील.
पण मग युद्ध नाही तर काय? निव्वळ चीडचीड, वांझोटा संताप, हेच भारतीयांच्या नशिबी आहे का? खरं म्हणजे अशी आवश्यकता नाही. पारंपारिक युद्ध सोडूनही अनेक प्रकारे पाकिस्तानला समजेल अशा भाषेत उत्तर देणे शक्य आहे.
इस्त्राएल अगदी उघडपणे, आणि अमेरिकेसारखे अनेक देश गुप्तपणे पण अधिकृत धोरण आखून देशाच्या शत्रूंना संपवण्यासाठी गुप्तहेरांच्या तुकड्या पाठवून सरळ खून पडत असतात. इस्त्राएलच नाव घेतल्यावर विटाळ होणाऱ्या सेक्युलर मित्रांसाठी, हा उपाय करणाऱ्यांमध्ये इराणचे नाव मोठे आहे. त्यांनी दिल्लीत इस्त्राएल राजदूत कार्यालयावर केलेला हल्ला लक्षात असेलच. इतक्यात तुर्कस्थान सरकारने म्हणे अशाच काही नकोशा लोकांना पॅरिसच्या रस्त्यावर ठार केलं. भारतातल्या न्यायालयांनी ज्यांना फरार आरोपी म्हणून जाहीर केलं, त्यांच्यातल्या काही जणांवर नेम धरला, तर अनेक पक्षी मरू शकतील. मग जागतिक पातळीवर आरोप आणि इन्कार हा खेळ बरेच दिवस चालत राहील.
कमांडो कारवाई किंवा क्षेपणास्त्र हल्ला करून काही महत्वाची ठिकाणे वेगाने नष्ट करणे, ही एक उपाय आहे. कालच भारताच्या संरक्षण खात्याने म्हणाले आहे कि १०००० अतिरेकी काश्मीरमध्ये शिरायच्या तयारीत आहेत. जर त्यांचे तळ कुठे आहेत, याची योग्य माहिती मिळाली, तर हा उपाय अनेक प्रश्न एका झटक्यात सोडवेल. आंतरराष्ट्रीय दडपण वगैरे निर्माण करायला जो वेळ लागतो, तो मिळणारच नाही. कदाचित अमेरिका वगैरे देशांना हे आवडणार नाही, पण ते जेव्हा पाकिस्तानात ड्रोन हल्ले करतात तेव्हा जी स्पष्टीकरणं देतात, तीच त्यांच्या तोंडावर टाकता येतील.
अगदी लष्करी कारवाई नाही, तर निदान आर्थिक नाकेबंदी करता येईल का, अमेरिका जी मदत पाकिस्तानला करते, त्यात कशी खीळ घालता येईल, या गोष्टी करण्यासारख्या आहेतच.
पण या सगळ्यात आपला नेमका शत्रू कोण, हे लक्खपणे दिसल पाहिजे. दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांना अशी भीती वाटते, कि पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली, तर त्याचा राजकीय फायदा भाजपा घेईल. आणि त्यामुळे त्या भानगडीत पडायलाच नको.
त्यामुळे ‘भारत पाकिस्तान युद्ध होईल का’ याचं माझ्या दृष्टीने उत्तर ‘सध्या नाही’ हे आहे. पण जर एकूण भारतीय जनतेला एकदा पाकिस्तानला धडा शिकावावासा वाटला, तर ते अशक्य तर नाहीच, फार अवघडही नाही. पण त्यासाठी समाजाची इच्छाशक्ती आवश्यक आहे. फक्त राणा भीमदेवी आरोळ्या पुरेशा नाहीत. ही इच्छाशक्ती आपण भारतीयांनी गेल्या हजार बाराशे वर्षात मोजके अपवाद सोडले तर दाखवलेली नाही. आजच्या सरकारवर टीका करणे सोपे आहे, अवशाकाही आहे. पण जर पाकिस्तान सारखे दिवाळखोर, आणि मोडकळीला आलेले राष्ट्र आपल्याला डिवचत असेल, आणि त्याला आपली भीती वाटत नसेल, तर त्याला तुम्ही – मी- आपण सगळे मिळून जबाबदार आहोत. जर सरकार असे असेल, तर त्यालाही आपणच जबाबदार आहोत. जोवर आपण बदलत नाही, त्याची किंमत मोजायला तयार होत नाही, तोवर या परिस्थितीत बदल होणार नाही, हे नक्की.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युद्ध होणार नाही. व्हावे अशी इच्छा नाहिये. ह्यात आपली देखील खुप हानी होते.

असे काही झालेच तर हवाईदलाचा वापर करुन मुझ्झफराबाद आणि आसपासच्या तमाम अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांचा सफाया करून टाकणे दुरदर्शीपणाचे ठरेल. Happy

ण जर पाकिस्तान सारखे दिवाळखोर, आणि मोडकळीला आलेले राष्ट्र आपल्याला डिवचत असेल, आणि त्याला आपली भीती वाटत नसेल, तर त्याला तुम्ही – मी- आपण सगळे मिळून जबाबदार आहोत. जर सरकार असे असेल, तर त्यालाही आपणच जबाबदार आहोत. जोवर आपण बदलत नाही, त्याची किंमत मोजायला तयार होत नाही, तोवर या परिस्थितीत बदल होणार नाही, हे नक्की.
सह्मत आहे

भारत वि पाकिस्तानच का पण अगदी मालदिव्ह सारख्या छोट्या देशाविरुद्द्ही भारत कधीही युद्द पुकारणार नाही.

याच कारण स्पष्ट आहे, आपण नपुंसक आहोत. स्वता:च्या देशाची व देशाच्या लोकांची सुरक्षा प्रश्न जर युनो ठरवणार असेल तर देशात सरकारची काय गरज आहे ?

हा देश पार बुडाला आहे. याला जवाबदार आपण सर्व (म्हणजे सरकार+जनता+सरकारी अधिकारी) आहोत.

पाकिस्तानला धडा वगैरे शिकविण्याकरता युद्ध कदापी होणार नाही. सध्याचे राजकारण्यान्कडून तर नाहीच नाही. मात्र २०१४ मधे वा त्या आधीही येऊ घातलेल्या "विलेक्शन" बघता, आणि जर अन जरच पब्लिकच्या भावना या प्रश्नावरच पेटलेलया असतील तरच राजकारण्यान्कडून भारत पाक दरम्यान छोटेखानी युद्ध जरुर छेडले जाऊ शकते. "युद्ध करणे" ही सेनादलान्ची जबाबदारी असली तरी "युद्ध केव्हा करावे/कसे कितपत तीव्रतेने करत रहावे/केव्हा थाम्बावे" हा पूर्णतः "राजकीय" पुढार्‍यान्च्या अखत्यारीतील विषय असतो.

मात्र इथे एक मान्य करावेच लागते की स्वर्गीय इंदिरा गांधी यान्नी अतुलनीय धाडस व निश्चय दाखवित पूर्व बंगाल व खलिस्तानचे प्रश्न ज्या ताकदीने व तडाख्याने सोडविण्याकरता सैन्यदलाच्या कृति घडवुन आणल्या तसे राजकीय निर्णय घेण्याची धमक सध्याचे राजकारण्यात नाही. त्यान्नी या दोन्ही निर्णयावेळेस व्होटब्यान्केचा विचार केला नव्हता, जो केल्याशिवाय सद्याचे राजकारणी एकही कृति करीत नाहीत.

धडा शिकवणे म्हणजे युद्धाच्या एण्ड रिझल्ट मधे नेमके काय घडायला हवे याचे चित्रण कुठेही स्पष्ट नाही, व असूही शकत नाही जसे ते पूर्व बन्गालच्या प्रश्नाचे वेळेस होते. सबब शक्यतोवर युद्ध टाळणे, काट्याने काटा काढणे वगैरे उपायच योग्य ठरतात असे माझे मत.

यापेक्षा खरे तर नक्षलवाद्यान्चा प्रश्न सर्वाधिक बिकट आहे, पण तिथे कारवाई करुन मतान्चे - वोटब्यान्केचे कोणतेही फायदेशीर राजकारण साधत नाही, सबब तो प्रश्न या ना त्या निमित्ते गेली कित्येक वर्षे दुर्लक्षिलेलाच आहे. मात्र जर आज इंदिरा गांधी असत्या, वा त्यान्ना अधिक वेळ मिळाला असता तर नक्षलवाद्यान्चा प्रश्न शिल्लक राहिला नसता.
किंबहूना मी असेही म्हणू शकतो की पूर्व बन्गालचा व खलिस्तानचा प्रश्न सोडविण्यातील कठोरता/ सुनिश्चितता याबद्दल स्वर्गिय इंदिरा गांधींचे तमाम भारतीयांवर उपकारच आहेत, त्याचबरोबरीने, स्वर्गीय राजिव गांधी यांनी चालना देऊन आणलेल्या आयातीत तंत्रज्ञानविषयक क्रांती बद्दल ते देखिल आदरणीयच आहेत.

ही माझ्या अल्पबुद्धीची मते आहेत, कुणी फारशी मनावर घ्यावित असे नाही.

>>>मात्र जर आज इंदिरा गांधी असत्या, वा त्यान्ना अधिक वेळ मिळाला असता तर नक्षलवाद्यान्चा प्रश्न शिल्लक राहिला नसता.
किंबहूना मी असेही म्हणू शकतो की पूर्व बन्गालचा व खलिस्तानचा प्रश्न सोडविण्यातील कठोरता/ सुनिश्चितता याबद्दल स्वर्गिय इंदिरा गांधींचे तमाम भारतीयांवर उपकारच आहेत, त्याचबरोबरीने, स्वर्गीय राजिव गांधी यांनी चालना देऊन आणलेल्या आयातीत तंत्रज्ञानविषयक क्रांती बद्दल ते देखिल आदरणीयच आहेत.<<<

पगार मे क्या करते हो फिर? असा एक प्रश्न आमच्या कंपनीतील एक अधिकारी नेहमी विचारायचे. वरील स्व. इंदिरा गांधी व स्व. राजीव गांधी यांच्याबाबतची विधाने पटली. पण ते तर त्या पदावर बसलेल्या व्यक्तीचे कर्तव्यच होते ना? की काम करण्यासाठी तेथे आरूढ झालेल्याने काम केले म्हणून त्याला आदरणीय मानण्याच्या पातळीला आपण आलो आहोत? म्हणजे सेल्स मॅनेजरने या महिन्यात विक्री केली म्हणून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात काय अर्थ आहे? अगर इस चीजका इन्सेन्टिव्ह लेते हो तो पगारमे क्या करते हो?

(अवांतर - लिंबूभौ, तुम्ही पोस्टचे शेवटचे वाक्य पहिल्यांदाही टाकू शकता. आणि हो, " - - " हे अवतरण चिन्ह कोणी कोणाला काही म्हणाले तर वापरले जाते, उगीचच वापरले गेले की रसभंगही होऊ शकतो).

खलिस्तान चा प्रश्न आधी निर्माण कोणी केला होता त्याचे आधी उत्तर शोधा!!!

नक्षलवादी त्रास इंदीरा गांधी च्या वेळेला पण होता. नक्षलवादी कारवाया १९६७ पासुन सुरु आहेत. काही केले नाही १९८४ पर्यंत.

प्रसाद१९७१,
खलिस्तानचा प्रश्न निर्माण कोणी केला इत्यादी तपशीलात मी मुद्दामहून जात नाही. कारण, "प्रश्न निर्माण केला" या विवादापुढे तो सोडविण्यातील खमकेपणा नाकारावा हे (माझे मते तरी) अनुचित आहे.
त्याचप्रमाणे, १९६७ पासूनचा पुढे नव्वदच्या दशकापर्यंतचे नक्षलवादाचे स्वरुप व गेल्या साताठ वर्षातील त्याची व्याप्ती/अम्मल/स्वरुप यात बराच फरक आहे व तो समजुन घ्यायलाच हवा.
फक्त नाकावर सूत धरायची पाळी येईस्तोवर प्रश्न कुजवण्याची कॉन्ग्रेसी नितीही मला ठाऊक आहे, त्याबरहुकूम चालले आहे. नक्षलवादी सोडाच, त्यान्चेच पावलावर पाऊल टाकून चाललेले ब्रिगेडीन्चे चाळेही कोणाच्या आशिर्वादाने चालले आहेत ते उघड गुपित आहे, पण या धाग्याचा तो विषय नाही.

अन तरीही, स्वर्गीय इंदिरा गांधीन्नी वा राजिव गांधीन्नी जे चान्गले केले त्याला चान्गलेच न म्हणण्याइतका "ब्रिगेडी" मी झालेलो नाहीये.

अहो प्रश्न मुद्दाम करायचे आणि ते सोडवले असे दाखवणे हे मला मान्य नाही.
नक्षलवादाचे स्वरुप आता वाढले आहे कारण त्याच्या वर वेळीच इलाज केला नाही. हे cancer सारखे आहे. तेंव्हाच इलाज करणे शक्य होते आणि रोग कायमचा गेला असता. आता 4th stage ला गेले आहे दुखणे, त्याची जबाबदारी त्यांचीच आहे.

पगार मे क्या करते हो फिर>>>>> +१०००००००
पाकिस्तानशी युद्ध करुन काहि उपयोग नाहिये... तो तसा मरतोच आहे... तेथिल + येथील नेत्यांना उडविले पाहिजे.... एड्स ग्रस्तान्ची फौज उभारा म्हणावं त्यासाठी... संख्या वाढतीये त्यांची...

स्वर्गीय इंदिरा गांधीन्नी वा राजिव गांधीन्नी जे चान्गले केले <<<

स्वर्गीय व स्वर्गवासी या शब्दांचा वापरही अनेकदा चुकीचा केला जातो. (अवांतर प्रतिसाद आहे)

स्वर्गीय = मधुबालाचे सौंदर्य, लताचा आवाज, सचिनची फलंदाजी

स्वर्गवासी = निधन पावलेली व्यक्ती

प्रतिक्रिया, प्रोत्साहनाबद्दलधन्यवाद.

लिंबूटिंबू, प्रसद१९७१,....
नक्षलवाद हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहेच. पण या धाग्यावर आपण पाकिस्तानशी युद्ध, ते केले पाहिजे का, कसे, कधी, कोणी, वगैरेबद्दल बोललो तर जास्त बर, नाही का? अर्थात ही केवळ विनंती आहे. बाकी आपण ज्येष्ठ मायबोलीकर सुज्ञ आहातच.

इथे कोणी संरक्षण तज्ञ किंवा लष्करी अधिकारी असले, तर त्यांची मते वाचायला आवडेल. किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा या भागातल्या शांततेवर होणारा परिणाम, यासारख्या क्षेत्रात अभ्यास असलेल्याचे मत वाचायला आवडेल.

भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशात मॅक्डोनाल्ड्स आहेत. त्यामुळे फ्रिडमनच्या गोल्डन आर्चेस सिद्धांतानुसार भारत - पाकिस्तान युद्ध आता होणे नाही. Happy गंमत बाजूला ठेवली तरी गेल्या वीस वर्षात युद्धाचा संदर्भ शीतयुद्धांच्या काळाच्या तुलनेत जबरा बदलला आहे. तेल सोडल्यास बाकी कुठलेही युद्ध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हितास बाधक ठरणार असेल तर ते होण्याची शक्यता खूप कमी आहे. अगदी तेलाची युद्धेसुद्धा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या संमतीनेच होत आहेत असे म्हणायला वाव आहे.

आता ह्या घडीला सिमारेषेवर ब्रिगेडीयर लेव्हलची फ्लॅग मिटींग चालु आहे.

गेल्या ५०-६० वर्षांत बर्याच वेळा अशा मिटींगा घेतल्या गेल्या आणि त्या सर्व मिटींगाचा अनुभव तितकासा चांगला नाही, कारण मिटींग संपे पर्यंत पाकिस्तानचे कुरापती काढणे चालु होते.
बहुतांशी अश्या मिटींगाची विचारणा भारत सरकार कडूनच होते.
तरी सुद्दा अश्या मिटींगा का घेतल्या जातात?

ह्या वेळेला पाकिस्तानी सैन्याला चिथवायला हाफीझ सईद ( जमाते ऊद दावा) स्वता:
सिमारेषेपार(पाकिस्तानच्या बाजुने) १५-२० होता. जमात ऊद दावा, लष्कर सारख्या
अतिरेकी संघटनाना अतिरेकी भारतात घुसवण्यासाठी पाकिस्तान सेनेची गरज लागते आणि अश्याच कारणासाठी हाफीझ सईद सिमारेषेवर पाकिस्तानी सेनेला चिथवायला आला होता.

पाकिस्तान काश्मिरमध्ये ४२ अतिरेकी कँप चालु आहेत, ह्या सर्व कँप मधुन येणारे अतिरेकी हेच भारताची डोकेदुखी आहे, भारत सरकारला हे सर्व माहीती आहे पण भारत सरकार काही करत नाही
ना करण्याची योजना आखत आहे. या ऊलट सरकारी अधिकारी ज्यांनी सरकारला अ‍ॅक्शन घ्यायला भाग पाडले पाहीजे ते ही स्वस्थ बसुन आहेत, आपली टर्म पुरी करत.

मग अश्या फ्लॅग मिटींगाची मागणी भारत सरकार कडून होते, लोकांच्या डोळ्यात धूळ झोकण्यासाठी काहीतरी करायला पाहीजेना !

आपल घर जळत असताना कोणी अहिंसा, सहीष्णूताच्या गमज्या करत नाही, सरळ अ‍ॅक्शन घेणे अपेक्षित असते.

टण्या,

भारत पाकिस्तान युद्द होणे नाही.... १००% अनुमोदन

पण अमेरीकेने जसे लादेनला संपवले अगदी घरात घुसुन तेही अमेरीका-पाकिस्तान भाई भाई अस म्हणत असताना !!

पाकिस्तानला अमेरीकेला साधा जाबही विचारता आला नाही. का ?

कारण लादेन पाकिस्तानातच मिळाला हेच पाकिस्तानला लज्जास्पद झाले,

भारता चे तर कित्येक अपराधी पाकिस्तान ऊजळ माथ्याने फिरत आहेत. मग भारताने अशी मोहीम का राबवु नये.

पाकिस्तानशी युद्ध करणे केवळ मुर्खपणा ठरेल.
त्यापेक्षा त्यानी आपले दोन मारले कि रात्री हळूच शिरून त्यांचे वीस मारा... पण आंतरराष्ट्रिय पातळीवर आम्हीच शोषित आहोत हे दाखविण्यासाठी युद्धा बिद्धाच्या भानगडीत पडू नये.

ते धोक्याने व लपून येऊन मारतात. आपणही तेच करावे. मग बघा कसं सरळ होतील ते पाकडे........

त्यामुळे फ्रिडमनच्या गोल्डन आर्चेस सिद्धांतानुसार भारत - पाकिस्तान युद्ध आता होणे नाही.>> हे भारीये.

भारत-पाकिस्तान युद्ध झालंच तर सर्वात जास्त फायदा कुणाचा होइल? चीन की अमेरिका??

>>>> भारत-पाकिस्तान युद्ध झालंच तर सर्वात जास्त फायदा कुणाचा होइल? चीन की अमेरिका?? >>>>
महत्वाचा प्रश्न आहे हा नन्दिनी! Happy
शस्त्रास्त्रान्च्या बिझनेस्च्या दृष्टीने व भारतीय उपखण्डात या ना त्या कारणाने पाय रोवण्याचे द्रुष्टीने अमेरिकेचा फायदा होईल, तर काहीही न करताच युद्धामुळे गलितगात्र झालेल्या भारतपाकचा घास घेण्याची सन्धी चीनला उपलब्ध होऊन तो त्यान्च्या फायदा असेल.
१०० कोटी लोकसन्ख्येन्ची बाजारपेठ गमावल्याचे नुकसान मात्र दोघान्चेही होईल
भारत पाक युद्ध झालेच तर ते कसे लढले जाईल यावर अंदाज बान्धणे अवघड आहे.

>>पारंपारिक युद्ध सोडूनही अनेक प्रकारे पाकिस्तानला समजेल अशा भाषेत उत्तर देणे शक्य आहे>><<
१००% सहमत.
साधे क्रिकेट, खेळ, कलाकार यांना नाही म्हणायला आपली जनता तयार नाही. युद्ध ही फार दूरचि आणि भयानक परिस्थिती निर्माण करणारी गोष्ट आहे. कट्टरता वादाने अफगाणिस्थन, इराक, पाक अशा देशांत चालू असलेला विध्वंस आपण टीव्हीत पाहातोच. तो विध्वंस आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून इझरेलसारखे सतत सजग राहायला हवे आहे. त्या छोट्या देशाकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे. एवढ्या मोठ्या सैन्यबळाच्या देशाची प्रतिमा सध्या दयनीय आहे. ती कणखर व्हायला हवी आहे. एक देखील आतंकवादी, घुसखोर, विश्वासघातकी या देशात असणार नाही याची खबरदारी आवश्यक आहे. असे लोक हुडकून काढण्यासाठी लागणारा कणखरपणा आपल्या नेत्यांजवळ नाही त्यालाही आपणच जबाबदार आहोत.
खरे तर युद्ध हा अगदी शेवटचा उपाय आहे. शिवाय एकदा युद्ध सुरु केले कि त्यासाठीचे डावपेच वगैरे
आखण्याचे स्वातंत्र्य सैन्यदलांना द्यायला हवे. मतपेट्या राखण्याच्या बाबीला बिल्कुल स्थान असु नये.

>>>> मतपेट्या राखण्याच्या बाबीला बिल्कुल स्थान असु नये. <<<<< Lol
कित्ती विनोदी अपेक्षा करता हो तुम्ही? अन तिकडे तर गृहमन्त्री सुशिलकुमार शिन्दे म्हणताहेत की "हिन्दू संघटना अन आरेसेस" हिन्दू दहशतवाद पसरवताहेत.... मतपेट्याराखण्याकरता किती त्या खोट्यावर आधारीत याचना/लाळघोटेपणा? त्यान्च्याकडून कस्ली अपेक्षा करता तुम्ही?

भारत पाकिस्तान युद्द होणे नाही !!
भारतात ती धमकच नाही,

बघा हफीज सईदने देखील भाजपा आणि रासंस या दोन्हीना अतिरेकी संघटना म्ह्णुन ठरवण्याबद्द्ल भारत सरकारला सुचवल आहे.

दुसरीकडे ओवेसी साहेबांना जेल मध्ये बंद केल्याबद्द्ल अभुतपुर्व बंद हैदराबादेत व आध्रं प्रदेशात पाळला गेला आहे.

आता तुम्हाला आमची ताकत कळेल. पोलिस हटवा आणि मग बघा !!

अवांतर..ज्या राष्ट्राला सुशीलकुमारांसारखा गृहमंत्री आहे त्याला शत्रूची गरज काय ? आज तर हफीज सईद ''साहेबांनी'' भारताला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करायची मागणी केलीय.

मतपेट्या राखण्याच्या बाबीला बिल्कुल स्थान असु नये.
मतपेट्या राखण्याचा आणि पाकिस्तानशी युद्ध करण्याचा संबंध बादरायणदेखिल नाही. १९६५ आणि १९७१ ही दोन्ही युद्धे मतपेट्या राखणारा पक्ष सत्तेवर असतानाच झाली होती!!

>>>>> मतपेट्या राखण्याच्या बाबीला बिल्कुल स्थान असु नये.
>>>>> मतपेट्या राखण्याचा आणि पाकिस्तानशी युद्ध करण्याचा संबंध बादरायणदेखिल नाही. १९६५ आणि १९७१ ही दोन्ही युद्धे मतपेट्या राखणारा पक्ष सत्तेवर असतानाच झाली होती!! <<<<<<
संबंध नसावा हे रास्त तार्किक, पण तसे होत नाहीये. दोघांकडूनही (राजकीय पक्ष कॉन्ग्रेस व अल्पसंख्यान्क) असा संबंध ठेवला जातोच आहे.
६५ नि ७१ ची युद्धे जेव्हा गळ्याशी आले तेव्हाच झालीयेत, अन गळ्याशी येईस्तोवर भिजत घोन्गडे ठेवण्यास मतपेटीकरता तुष्टीकरणाची नितीच कारणीभूत आहे. खलिस्तान चळवळिबाबतही तेच झाले होते. अति झाले, डोक्यावर बसू लागले तेव्हाच उतरवले, पण फार मोठी किम्मत मोजून. Sad

@limbutimbu | 23 January, 2013 - 07:54नवीन
६५ नि ७१ ची युद्धे जेव्हा गळ्याशी आले तेव्हाच झालीयेत, अन गळ्याशी येईस्तोवर भिजत घोन्गडे ठेवण्यास मतपेटीकरता तुष्टीकरणाची नितीच कारणीभूत आहे. खलिस्तान चळवळिबाबतही तेच झाले होते. अति झाले, डोक्यावर बसू लागले तेव्हाच उतरवले, पण फार मोठी किम्मत मोजून
.<<

१९६५ च्या युद्धात आयुबखानाने आक्रमण केल्याने युद्धाला उभे राहाणे भागच होते. ६२ च्या मानाने शास्त्रीजींनी ते चांगले हाताळले पण दुर्दैवाने त्यांचा अकालीच गूढ अन्त झाला.

बाकी लिंबुटिंबू म्हणतात तशीच वस्तुस्थिती आहे.
आता तर दिग्विजयांच्या खांद्याला खांदा लावून गृहमंत्रीच दहशतवाद्यांच्या गळ्यातले ताईत झाले आहेत. निवडणुकीच्या आधी आर एस एस वर बंदी आणून मतपेट्या घट्ट करण्याचा काँगी-प्लॅन असावा असे दिसते.

Pages