अचानक एखादा गुप्त धनाचा साठा समोर यावा आणि त्यातल्या रत्नजडीत दाग-दागिन्यांनी डोळे दिपून जावेत तशी अवस्था एकदा आचर्य प्रल्हाद केशव अत्रे यांची झाली होती. त्याला कारणही तसेच होते. आपल्या अशिक्षित आईच्या तोंडून ऐकलेल्या काव्य रचनांच्या हस्तलिखिताची वही भीतभीतच अभिप्रायासाठी सोपानदेव चौधरी यांनी त्यांच्या समोर ठेवली होती.
त्यातील निसर्ग, पाऊस, मानवी नातेसंबंध अशा विविध विषयांवरील रचना पाहून अत्रे सोपनदेवांना उत्स्फूर्तपणे म्हणाले होते - "अरे हे तर बावन्न कशी सोने आहे, का इतके दिवस आपण ते दडवून ठेवलेत?" त्या रचनांमधून जीवन विषयक अर्थगर्भ तत्वज्ञान इतक्या सहज-सोप्या शब्दात मांडलेले होते कि अत्रेंचे भारलेपण संपायलाच तयार नव्हते. खरेतर प्र.के.अत्रे यांच्या सारख्या जाणत्या माणसाच्या हाती आले म्हणुन तर हे साहित्य अवघ्या जगाचे झाले.
अत्र्यांना भारावून टाकणाऱ्या त्या रचना होत्या खानदेशच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या. लौकिकार्थाने अशिक्षित असलेल्या या कवयित्रीच्या प्रत्येक रचनेमधून त्यांची अफाट निरीक्षण क्षमता, बहुश्रुतता आणि जीवनाबद्दलच्या निर्मळ, सकारात्मक आणि स्पष्ट दृष्टीकोनाचा प्रत्यय येतो.
१९६१ च्या 'मानिनी' ह्या चित्रपटाने रसिकांवर घातलेली मोहिनी आजही तशीच आहे ती कर्णमधुर संगीत आणि थेट मनाला भिडणाऱ्या बहिणाबाईंच्या गीत रचनांमुळे! "अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर" या गीताने 'बहिणाबाई' या मुळच्या अहिराणी/मराठी भाषेतील थोर कवयित्री सर्वदूर पोहचल्या.
बहिणाबाई नथुजी चौधरी ह्यांचा जन्म जळगावातल्या असोदे इथे १८८० साली महाजन घराण्यात झाला. वयाच्या ५व्या वर्षी विवाह, ९व्या वर्षी कौटुंबिक अडचणीतून स्थलांतर, आणि वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी वैधव्य असा काहीसा अस्थिर जीवनप्रवास असूनही त्यांनी त्या खडतर वाटचालीकडे नेहमीच सकारात्मक वृत्तीने पहिले.
बहिणाबाई अशा उत्स्फूर्तपणे बोलत कि त्यांच्या रचना हमखास मनाचा ठाव घेत. जगाच्या बिन भिंतीच्या शाळेतील अनुभव त्यांच्या काव्यातून उतरत. त्यामुळे शब्दोचार, नातेसंबंध, मन, निसर्ग इथपासून समाजनीती सारख्या विविध विषयांवरील त्यांच्या रचना अजरामर झाल्या आहेत. त्यांच्या या सहज काव्य वृतीने चकित होवून त्यांच्या ओळखीच्या बायकांनी त्यांना विचारत "तुंम्हाला हे सारे सुचते कसे?" तेव्हा त्यांचे उत्तर काव्यमयच असे, त्या उत्तरादाखल म्हणत -
"माझी माय सरसोती, माले शिकविते बोली, लेक बहिणाचे मनी किती गुपिते पेरली."
सासरी आणि माहेरी शेती हेच प्रमुख उपजीविकेचे साधन. त्यामुळे काम करताना भोवतालचा निसर्ग, पक्षी त्यांच्याशी संवाद साधत. निसर्गाच्या प्रत्येक रुपात, शेतात, पिकात, पावसात, तसेच समोरच्या माणसात आणि स्वतःत त्यांना देव दिसे. नजरेस दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत त्यांना काव्य दिसे. मग शेतकऱ्याला आपल्या कष्टाचे मोल उमजावे म्हणून त्या प्रेमाने सांगतात-
“काया काया शेतामंदी घाम जीरवं जीरवं, तवा उगलं उगलं कायामधून हिरवं.”
मात्र शेतातून धान्य रुपात येणारी समृद्धी ही दैवी देणगीच आहे म्हणून त्याचे ऋण मानतात -
“कशी वाऱ्याने डोलती, दाने आले गाडी गाडी, दैव गेले रे उघडी, देव अजब गारुडी.”
शेतकरी आणि निसर्गचक्र यांचे अतूट नाते, त्यातील नजाकत त्यांनी सहजतेने टिपली आहे. ऋतुचक्र आणि जीवन ह्यावरील त्यांचे भाष्य थक्क करून सोडते. पहिलेपणाचा आनंद, त्यातील भारलेपण अदभुत असते. पण बहिणाबाईंना पहिल्या पावसाच्या थेंबात मायेचा गहिवर दिसतो..तापलेल्या भूमीवर पहिल्या शिडकाव्याने पसरणारा मृदगंध मनात साठवताना त्या म्हणतात -
"आला पहिला पाऊस, शिपडली भुई सारी, धरित्रीचा परमय, माझं मन गेलं भरी.”
सहज सुंदर सोपी भाषा वापरताना उपमा, अतिशोयोक्ती या सारखे अलंकार वापरताना किंवा मोजक्या शब्दात व्यक्तीचित्र रेखाटताना त्यांची शब्दावरील अफलातून पकड दिसते. सासर माहेरच्या अनेक नात्यातील नाजूक पदर उलघडत त्यातील चांगुलपणा टिपताना आई बाबत म्हणतात-
"माय भिमाई माउली, जशी आंब्याची सावली, आम्हा इले केले गार, स्वतः उन्हात तावली".
तितक्याच सहजतेने सासू बाबत -
"नावे ठेवे अवघ्याला करी सर्वांची नक्कल, हसविता हसविता शिकविते रे अक्कल"
असे प्रांजळपणे काबुल करतात.
जीवन जगताना त्यांनी देव आणि दैव ह्यातील मात्रेचा फरक अक्षर ओळख नसून देखील पुरेपूर जाणला होता. वयाच्या ३०व्या वर्षी वैधव्याची कुऱ्हाड कोसळल्यावर सांत्वनास आलेल्या बायकांची समजूत काढताना त्यांचा डोळसपणा थक्क करून सोडतो –
“माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडलं, माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं.”
खरी सौभाग्य लेणी कोणती हे सांगताना, त्या म्हणतात - "कुकू पुसलं तरी गोंदण शाबूत आहे. बांगड्या फुटल्या तरी मनगटात ताकद आहे. मंगळसूत्र गेले तरी त्याची शपथ स्मरते आहे"
भागवत धर्माची शिकवण जगताना त्यांनी सकारात्मक वृत्ती जोपासली. जीवनात अनेक घाव जिव्हारी बसले,पण काव्यातला जिव्हाळा थोडाही घटला नाही. कधी इतरांच्या वागण्याचे वैषम्य वाटलेच तर त्यावर उपहासात्मक टीका करताना सहज म्हणतात –
“'पाहीसनी रे लोकांचे व्यवहार खोटेनाटे, तेंव्हा बोरी बाभळीच्या आले अंगावर काटे.”
रोजच्या दिनचर्येतून त्यांना काव्यरचनेचे विषय सापडत. कधी सकाळी जात्यावर पीठ दळताना त्या गुणगुणत -
"देवा घरोट घरोट, तुझ्या मनातील गोट. अरे घरोटा, घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी"
कशाला काय म्हणू नये यातील आदर्शवादातून त्यांनी माणसाला सन्मार्गाची कास आणि जगण्याची आस दिली –
“आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये,
धावा ऐकून आडला त्याले पाय म्हणू नये.
अरे वाटेच्या दोरीला कधी साप म्हणू नये,
इले पोटच्या पोरीला, त्याले बाप म्हणू नये"
माणसाच्या मनाचे वर्णन करताना उपमा अलंकाराचा चपखल वापर करून बहिणाबाई म्हणतात-
'मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात'
मग शेवटी या अगम्य मनाच्या रचनेचे श्रेय अज्ञात शक्तीला देत म्हणतात -
"देवा, असं कसं मन असं कसं रे घडलं, कुढे जागेपणी तुले असं सपान पडलं."
वाट्याला आलेले दैव बिन-तक्रार स्वीकारून प्रत्येक क्षणी "डोळसपणे" जगणाऱ्या बहिणाबाई त्यांचे सारे आयुष्य खडतर,कष्टप्रद असून देखील जीवनाच्या क्षणभंगुरतेचे त्रिकालाबाधित सत्य पुरेपूर ओळखून होत्या.त्यामुळेच हि अनिश्चितता काव्यात उतरवताना त्या सहजतेने म्हणतात-
"आला सास, गेला सास, देवा तुझं रे तंतर, अरे जगणं मरणं एका सासाचं अंतर"
म्हणूनच की काय, दिनांक ३डिसेंबर १९५१ या दिवशी त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. आज त्यांना आपल्यातून जावून एकसष्ठ वर्षे झाली तरी त्यांच्या रचनांचे गारुड जराही कमी झालेले नाही. म्हणून त्यांच्याच शब्दांचा आधार घेत म्हणावे वाटते-
" दैव गेल रे उघडी
देव अजब गारुडी."
वा काय सुर्रेख लेख
वा काय सुर्रेख लेख लिहिलाय..... बहिणाबाईंच्या जीवनाचा, साहित्याचा सुंदर आढावा घेतलाय....
अनेक धन्यवाद, किंकरजी.
बहिणाबाई खरंच "सरस्वती कन्यकाच" - त्यांच्यासारख्या त्याच. त्यांच्या सर्व अजरामर काव्याने त्या सर्व रसिकांच्या हृदयातच स्थानापन्न झाल्या आहेत.
किंकर, बर्याच दिवसांनी
किंकर, बर्याच दिवसांनी लिहिलंत, पण सुरेख लिहिलंत.. बहिणाबाईंच्या वापरलेल्या ओळी खासच!
अजून चालला असता थोडा मोठा लेख...
खूप सहजसुंदर लेख !
खूप सहजसुंदर लेख !
वा छान
वा छान लेख!!
************************
सोन्यारुपान मढला, मारवाड्याचा बालाजी |
शेतकर्याचा इठोबा, पानाफुलामदी राजी | अरे बालाजी-इठोबा, दोन्ही एकज र देव |
गरिबींन, सम्रंतीन, केला केला दुजाभाव |
खुप सुरेख लेख!!!!
खुप सुरेख लेख!!!!
धन्यवाद आठवण
धन्यवाद आठवण केल्याबद्दल.
अश्या श्रद्धेने काढलेल्या आठवणीलाच श्राद्ध असे म्हणतात ना हो?
पुरंदरे शशांक -
पुरंदरे शशांक - धन्यवाद!
आनंदयात्री - खरेतर खुपखुप लिहावे वाटत होते पण काव्याने येणारी अंतर्मुखता लेखणीचा हात जड करीत होती.
प्रज्ञा १२३,विजय आंग्रे, कुसुमिता १२३४,इब्लिस - प्रतिक्रियेसाठी आभार .
छानच लिहिलय. या ओव्या वाचताना
छानच लिहिलय. या ओव्या वाचताना आपसूक लयीतच वाचल्या जातात.
किंकर, अप्रतिम लेख! असेच आजून
किंकर, अप्रतिम लेख! असेच आजून वाचायला आवडतील.
आ.न.,
-गा.पै.
दिनेशदा - बहिणाबाईंच्या रचनाच
दिनेशदा - बहिणाबाईंच्या रचनाच अश्या आहेत कि सहजता आणि लयबद्धता यांचा सुरेख संगम त्यांच्या रचनेत दिसून येतो. आणि त्यामुळेच त्या लयीत वाचल्या जातात.खरतर त्यांच्या रचनेतील विविधतेमुळे लेख जमून गेलाय.
गामा _पैलवान - धन्यवाद,
खूप छान लिहीले आहे. आवडले.
खूप छान लिहीले आहे. आवडले.
अनघा - मनपूर्वक धन्यवाद
अनघा - मनपूर्वक धन्यवाद
'अ' व्यक्तीने एखादे काम केले
'अ' व्यक्तीने एखादे काम केले म्हणून 'ब' त्या व्यक्तीशी कृतज्ञ राहते असे म्हटले जाते. ही कृतज्ञता कदाचित एक वर्ष, दोन वर्षे अकलंकीत अशी राहू शकते. काळाच्या ओघात हे अ आणि ब दूर झाले तर त्या कृतज्ञतेचे पापुद्रेही हवेत विरून जातात. उरल्या आठवणी तर उरल्या ना उरल्या तर त्याबद्दल दोन्ही पक्षी खंतही नसते. पण 'बहिणाबाई नथुजी चौधरी' नामक एका लोकविलक्षण प्रतिभेची आचार्य अत्रे यानी तात्काळपणे जी दखल घेतली आणि त्यांचे 'जादूमय' वाटू शकणारे भाषा साहित्य पुस्तकरुपाने प्रकाशित करण्यास जो पुढाकार घेतला, त्याबद्दल उभा महाराष्ट्र देश त्यांच्याशी आजन्म कृतज्ञ राहील आणि ती कृतज्ञता बावनकशीच राहील यात तीळमात्र संदेह नाही....इतकी महती आहे बहिणाबाईंच्या साहित्याची.....जिचा रास्त उल्लेख श्री.किंकर यांच्या वरील लेखाच्या गारुडात प्रतिबिंबीत झाल्याचे दिसते.
चारच ओळी....
"बिना कपाशीने उले, त्याले बोंड म्हनु नये
हरिनामाविना बोले त्याले तोंड म्हनू नये
नाही वार्याने हाललं त्याले पान म्हनू नये
नाही ऐके हरिनाम त्याले कान म्हनू नये"
....आणि यातील तत्वज्ञानाने वाचणारा स्तब्धच होऊन जातो. जे ज्ञान शेकडो पानांचे पारायण करूनही सापडू शकणार नाही ते बहिणाबाईंनी किती अल्पस्वल्प ओळीतून प्रखरपणे पसरले आहे आपल्यासमोर, हे जाणवले की लक्षात येईल की या 'अडाणी' स्त्रीला प्रत्यक्ष सरस्वतीने दैवी देणगीच बहाल केली असणार. कवी सोपानदेवांनी वा त्यांच्या ज्या कुणी अज्ञात नातेवाईकांनी बहिणाबाई जात्यावर दळता दळतात तसेच चूल फुंकता फुंकता म्हटलेली ती अफाट अर्थाची गाणी टिपून घेतली असतील त्यांच्या कल्पकतेला सलामच केला पाहिजे.
"येहरीत दोन मोटा
दोन्ही मधी पानी एक
मोट हाकलतो एक
जीव पोसतो कितीक..."
व्वा....झटदिशी हे जे खानदेशच्या या निसर्गकन्येने शब्दबद्ध केलेले निसर्गचित्र समोर येऊन ठाकते....'विहीर, मोट, पाणी, वाट, हिरवेगार होऊ पाहाणारे शेत....आणि पाणी रिचवल्यावर छानपैकी ढेकर देवून वार्यासोबत डोलणारे ते पीक...." का नाही मग ते कितीक जीव पोसणार ? आणि हे पोसणारे-पोसलेले जीव पाहूनच बहिणाबाईंच्या प्रतिभेला जो फुलोरा आला तो आजही किती लोकप्रिय आणि तितकाच हिरवागच्च आहे हे श्री.किंकर यानी वर यथार्थपणे दर्शविले आहे.
अभिनंदन अन् आभारही.
अशोक पाटील
वा ! खूप, खूप छान ! अगदी
वा ! खूप, खूप छान ! अगदी मनातून उतरल >>>काव्याने येणारी अंतर्मुखता लेखणीचा हात जड करीत होती.<<< अगदी पटलच
अशोकमामा, छानच !
अशोक., नेहमीप्रमाणे उत्तम
अशोक., नेहमीप्रमाणे उत्तम संदेश!
आ.न.,
-गा.पै.
@ अवल.... तुमच्याशी इथे
@ अवल....
तुमच्याशी इथे जालावर परिचय झाल्या क्षणापासून मला सातत्याने जाणवत आहे की तुम्ही साहित्य आणि अभिजात संगीत यांच्या प्रेमात आकंठ बुडाला असून त्यातून मिळणारा स्वर्गीय आनंद तुम्हाला नेहमीच हर्षभरीत करीत असतो. श्री.किंकर यांच्या लेखाचे शीर्षक वाचताना मला नक्की वाटत होते की तुमची अनुकूल प्रतिक्रिया इथे प्रकटणार.
@ गामा_पैलवान....
धन्यवाद. काही विषयच इतके मधुर आणि आपलेसे वाटणारे असतात की त्यावर कधीच काळ का़जळी धरू शकत नाही. जालावर धाग्याच्या रुपात असे विषय अवतरले की मूळ लेखकापेक्षा मलाच किंबहुना जास्त आनंद होतो. तुम्हाला आवडलेली माझी प्रतिक्रिया वास्तविक पाहाता श्री.किंकर यांच्या लेखणीच्या करामतीमुळे झाली आहे ती.
अशोक पाटील
अतिशय सुंदर लिहिलंत किंकर!
अतिशय सुंदर लिहिलंत किंकर! भावलं.
अशोकजी-प्रतिक्रियेतील तन्मयता
अशोकजी-प्रतिक्रियेतील तन्मयता भावली. अर्थात श्रेय बहिणाबाईंच्या शब्द रचनांनाच जाते.आपण म्हणता त्या प्रमाणे सोपनदेवजी आणि त्याआधी ज्या कोणी त्या रचना लिहल्या त्यांच्या आभारास तर शब्दच नाहीत.
अवल - धन्यवाद
मृण्मयी - विषयच असा आहे कि आपोआप उतरलय ते शब्दात.मनपूर्वक धन्यवाद.
वाह!!! फार सुंदर.
वाह!!! फार सुंदर.
अतिशय सुंदर लेख. आजच
अतिशय सुंदर लेख. आजच बहीणाबाईंच्या सर्व कविता वाचल्या. काय प्रतिभा आहे.
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A...
माझी माय सरसोती माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !!
माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता --भागवत
पावात समावत आणि मातीमधी उगवत !!
आरे देवाचं दर्सन झालं झालं आपसुक
हिरीदात सुर्याबापा दाये अरूपाच रूप !!
तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी
देवा तुझ येनजान वारा सांगे कानामधी !!
फुलामधी समावला धरत्रीचा परमय
माझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय !!
किती रंगवशी रंग रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरिरंग रंग खेये आभायात !!
- साहित्यिक बहिणाबाई चौधरी
धरत्रीच्या कुशीमधीं बीयबियानं
धरत्रीच्या कुशीमधीं बीयबियानं निजलीं वर्हे पसरली माटी जशी शाल पांघरली
बीय टरारे भुईत सर्वे कोंब आले वर्हे गह्यरलं शेत जसं आंगावरतीं शहारे
ऊन वार्याशीं खेयतां एका एका कोंबांतून पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन
टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनीं जसे करती कारोन्या होऊं दे रे आबादानी
दिसामासा व्हये वाढ रोप झाली आतां मोठी आला पिकाले बहार झाली शेतामधी दाटी
कसे वार्यानं डोलती दाने आले गाडी गाडी दैव गेलं रे उघडी देव अजब गारोडी !
ही माझी सर्वत आवडती कविता.