मोरपीस.....

Submitted by भुंगा on 14 September, 2012 - 00:11

जे दिसतेय ते महाभयंकर आहे.......

मुठभर राजकारणी, धनदांडगे उद्योगपती, महागाई, भ्रष्टाचार, नाकर्ती जनता सगळेच मिळून एकट्या पडलेल्या असहाय, अबला लोकशाहीचे धिंडवडे काढतायत...... एका अंधार्‍या खोलीत तिला एकटीला डांबून अक्षरशः तिचे लचके तोडण्याचं काम या झुंडीतल्या गुंडांनी चालवलय........ सगळ्यांचे चेहरे निर्विकार आहेत, विकट हास्य करत एक एक जण तिचं एक एक वस्त्र फेडत तिला ओरबाडतोय, विवस्त्र करतोय आणि लोकशाहीचा आक्रोश त्या चार भिंतींच्या बाहेर मात्र जात नाहिये...!!!

पण इथे एखाद्या घटनेचा ईव्हेंट केला गेला नाही तरच नवल...
म्हणूनच ह्या लोकशाहीच्या धिंडवड्यांचे थेट प्रक्षेपण जगभर दाखवलं जातय...... जगताली सर्वोच्च आणि सन्माननिय म्हणून मानली लोकशाही इतकी हतबल कधीच नव्हती........ आपली अब्रू वाचवताना तिला आलेलं अपयश हे अत्यंत बोलकं पण पाहणार्‍या प्रत्येकाला अंतर्मुख करणारं आहे.......

आणखी किती काळ तिची होत असलेली विटंबना, निर्भत्सना उघडे डोळे आणि शून्य नजरेने आपण मिटक्या मारत पाहायची.....!!!
रक्त सळसळतं, विचार गरगरतात पण पुन्हा एकदा आपण "एका श्रीकृष्णाच्या" वाटेकडे डोळे लावून रहातो.
सगळं बिघडलेलं पुन्हा घडवायला एक "अवतारी पुरुषच" लागतो हे जणू आपल्या नसानसात भिनलेलंच आहे........."ते आपले काम नव्हे" हा आपला एक सार्वत्रिक गोड गैरसमजच जणू.
श्रीकृष्णाचा धावा करताना लोकशाहीचा आवाज फुटेनासाच झालाय आणि आपण निव्वळ बघ्यांच्या भुमिकेत शिरून "चमत्काराच्या" अपेक्षेत रांगेत उभे आहोत......... एकामागे एक....... !

पण मग श्रीकृष्ण आहे तरी कुठे??????

बहुधा लोकशाही या जन्मी त्याच्या बोटाला चिंधी बांधायचं विसरून गेली असावी.......
की मग या बलात्कार्‍यांनी आज श्रीकृष्णालाही विकत घेतलाय????

एव्हाना श्रीकृष्ण आपल्या राजमहालात लोकशीहीच्या बलात्काराचा "MMS" येण्याची वाट पहात बसला असेल......... आणि याबदल्यात त्याला काय मिळालय, तर सर्व राज्यातील दूध उत्पादन महासंघांची संचालक पदं, त्याच्या "वेणूनाद कॉर्पोरेशन" या ईव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला देशातल्या सगळ्या मोठ्या सरकारी कार्यक्रमांची आयोजनाची कामं, तीही विदाऊट टेंडर....... आणि प्रत्येक सरकारी सल्लागार समितीत शासनातर्फे विशेष राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती...... पोटापाण्याची सोय झाली, दोन पिढ्यांची भ्रांत सुटली.... आणि काय हवं असतं एका देवत्व हरवलेल्या सामान्य माणसाला....!!!

खरंच विचार करायची वेळ आलीये......
प्रत्येक युगात आता देवत्व मिरवणार्‍या मानवी अवताराची वाट पाहायची की आपल्यातलाच "देव" शोधून जागोजागी होणार्‍या विटंबना रोखायला स्वतःच सज्ज व्हायचं......
जगातल्या सर्वोच्च मानल्या गेलेल्या लोकशाहीला जिथे अब्रू वाचवता आलेली नाही तिथे सामान्य स्त्रियांचं काय होणार???? किती काळ द्रौपदीला वाचवायला श्रीकृष्णाचाच धावा करावा लागणार??? आणि किती वेळा तो तरी त्या एका बांधलेल्या चिंधीची परतफेड करायला वस्त्रं पुरवत राहणार????

मानवी अवतारातला "अवतार" संपला की मग तिथेही उरतो तो यःकश्चित मानवच ना....!

"कर्मयोगी" व्हायची हीच खरी संधी आहे, फक्त आपल्यातलंच देवत्व आपल्याला समजण्याची गरज आहे.

यादवी माजून हे सर्व संपलं तरी हरकत नाही, पण निदान उघड्या डोळ्यांनी अशा विटंबना पहात रहायची "षंढवृत्ती" तरी नष्ट होऊ द्या.

प्रत्येकाच्या कोमेजलेल्या, बुरसटलेल्या, कुजलेल्या मनावर गरज आहे ती फक्त एक मोरपीस फिरण्याची...... फक्त एक मोरपीस....!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

दुसर्‍यांदा वाचल्यावर थोडा झेपला.
एक अन एक अक्षर खरंखुरं लिहिलंयस. सद्य परिस्थिती तशीच आहे, आणि ती अजून खालावू शकते अशी चिंता ही वाटतेय. Sad लोकशाही अक्षरश: त्या असहाय्य द्रौपदीसारखीच आहे.. Sad

>>"कर्मयोगी" व्हायची हीच खरी संधी आहे, फक्त आपल्यातलंच देवत्व आपल्याला समजण्याची गरज आहे.

यादवी माजून हे सर्व संपलं तरी हरकत नाही, पण निदान उघड्या डोळ्यांनी अशा विटंबना पहात रहायची "षंढवृत्ती" तरी नष्ट होऊ द्या.

प्रत्येकाच्या कोमेजलेल्या, बुरसटलेल्या, कुजलेल्या मनावर गरज आहे ती फक्त एक मोरपीस फिरण्याची...... फक्त एक मोरपीस....!!! >> ही वाक्य विशेष आवडली.

भिडलं मनाला...

यादवी माजून हे सर्व संपलं तरी हरकत नाही, पण निदान उघड्या डोळ्यांनी अशा विटंबना पहात रहायची "षंढवृत्ती" तरी नष्ट होऊ द्या. >>>> सहमत

थेट पोचलं. भिडलं.
<<<<<<<यादवी माजून हे सर्व संपलं तरी हरकत नाही, पण निदान उघड्या डोळ्यांनी अशा विटंबना पहात रहायची "षंढवृत्ती" तरी नष्ट होऊ द्या. >>>>>>>>
<<<<<प्रत्येकाच्या कोमेजलेल्या, बुरसटलेल्या, कुजलेल्या मनावर गरज आहे ती फक्त एक मोरपीस फिरण्याची...... फक्त एक मोरपीस....!!! >>>>>>>>>>>अत्यंत गरज आहे याची.

द्रौपदीचे वस्त्रहरण का झाले? तिला द्यूतात पणाला लावायचा आपला हक्क आहे असे वाटलेया पांडवांना तिच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडता आली नाही.
तिथे प्रमाण १००: ५ होते. आता काय आहे? कोणी पांडव आहेत की सगळेच (तुमच्यामाझ्यासकट) कौरव?

मला वाटतं...
प्रत्येकात कृष्ण असतो...प्रत्येकात कंस.
आपण आपल्यातला कृष्ण आता प्रत्येक क्षणी जागा ठेवायला हवा. नाहीतर कंस कायम जागाच असतो.

लेखकांनो लेखण्या ठेवा आणि रत्यावर उतरा ( लोकशाही मार्गाने ) भर्‍ष्टाचार, महागाईला कारण असणार्‍या सरकारला जाब विचारा.

यादवी माजून हे सर्व संपलं तरी हरकत नाही,.....

>>>> भिती ईतकिच आहे की हे जेंव्हा संपेल तेंव्हा सध्याच्या सरकारची जागा घेण्यास सक्षम कोण असु शकेल?

प्रत्येकाच्या कोमेजलेल्या, बुरसटलेल्या, कुजलेल्या मनावर गरज आहे ती फक्त एक मोरपीस फिरण्याची...... फक्त एक मोरपीस....!!! >>>>

भूत उतरवणार्‍या (सो कॉल्ड) बाबाच्या हातातला मोरपीसांचा गट्ठा फिरवलास तरी कोडगेपणाचं हे भूत उतरणार नाही इतक्या सहजा सहजी.
तू लिहीलंस ते सारं सत्य आहे, ह्या लिखाणातील सत्याचीची जाणीव असणंही मोठी गोष्ट आहे, पण त्या दिशेने पाऊल उचलले जाणार असतील तरंच.

लिहीलं/ वाचलं पटलं, झालं काम- ही सुद्धा ह्या कोडगेपणाची माया.

मी, माझं कुटुंब सुरक्षित ना, मग देशावर तिकडे कुणी का राज्य करेना 'की फरक पेंदा यार" हे पुरेपूर भिनलंय.

"बदलायला हवं" असं म्हणणार्‍या कॅटेगरीतला एक लेख आहे हा मिलिंद.....
वाचणार्‍यां सार्‍यांची मनही खूप पूर्वीच कोडगी झालीयेत "आपण फार काही बदलू शकणार नाही, इवल्याश्या ६० वर्षांच्या आयूष्यात, तेव्हा आहे तो जीव का त्रासात घालवा?" ही वृत्ती आहे, कदाचित आपल्या सर्वांचीच.

लेख चांगला आहे नाही, प्रतिसाद काय, किती?
ह्याही पे़क्षा, हा विचार चांगलाच आहे, पण पुढे काय?, इतकेच मनात घोळत राहिले.

शुभेच्छा

लेख आवडला,विचार पटले पण पुढे काय?
लेख वाचून, सुस्कारे सोडत पुढच्या कामाला आपण सुरुवात करणार, काही दिवसांनी विसरून जाणार.
मोरपिस येणार कुठुन?
लाख प्रश्न उत्तर नाहीच