बेइमानी जीवनाची काय मी सांगू कहाणी..

Submitted by प्राजु on 30 July, 2012 - 01:36

बेइमानी जीवनाची काय मी सांगू कहाणी
जायचे होते कुठे ते पोचले कुठल्या ठिकाणी

एकटी रडता कधी मी तीच येते सांत्वनाला
काय सांगू वेदना माझी किती आहे शहाणी!!

मांडती सार्‍या मुलींना लग्न-बाजारी कशाला?
'लोक म्हणती वाजवूनी घ्यायची असतात नाणी!!'

आठवांच्या धुसरलेल्या दर्पणी डोकावताना
ओळखीचा चेहरा वा ना दिसे कसली निशाणी!

कोवळी होती कथा झाली पुरी ना ती कधीही
बेगडी वचनास राजाच्या पुन्हा भुललीच राणी!

सप्तरंगी सोहळ्यातच रंगले आयुष्य आता
'ऊन्ह' जीणे रोजचे अन दाटते डोळ्यात पाणी

सांज होता तोल डळमळतो असा माझ्या मनाचा
परवचा गाता कुणी मज भासते तीही विराणी

-प्राजु

गुलमोहर: 

गझलेत खयाल अधिक सुस्पष्ट व प्रभावी यायला हवे होते असे वाटते. 'ऊन्ह जिणे' येथील जिणे हा शब्द 'जीणे' असा करावा लागेल.

काही ओळी आवडल्या. पण आपल्या एकुण गझलांसमोर ही गझल उजवी आहेच

शुभेच्छा

-'बेफिकीर'!

अतिशय सुंदर. आवडली गझल. Happy

बेइमानी जीवनाची काय मी सांगू कहाणी
जायचे होते कुठे ते पोचले कुठल्या ठिकाणी .......
...................................................... इथे 'ते' ए॓वजी..'अन' हा शब्द असावा असे वाटते.

बेइमानी जीवनाची काय मी सांगू कहाणी
जायचे होते कुठे ते पोचले कुठल्या ठिकाणी

एकटी रडता कधी मी तीच येते सांत्वनाला
काय सांगू वेदना माझी किती आहे शहाणी!!

आठवांच्या धुसरलेल्या दर्पणी डोकावताना
ओळखीचा चेहरा वा ना दिसे कसली निशाणी!

कोवळी होती कथा झाली पुरी ना ती कधीही
बेगडी वचनास राजाच्या पुन्हा भुललीच राणी!

हे सगळे शेर आवडले प्राजु.