२३ जून १९८५ : कनिष्क - एअर इंडिया फ्लाईट १८२...

Submitted by सेनापती... on 22 June, 2012 - 04:48

उद्या कदाचीत पोस्ट करायला जमणार नाही म्हणुन एक दिवस आधीच पोस्ट करतोय...

एअर इंडिया फ्लाईट १८२ चा शेवटचा फोटो..

२३ जुन १९८५. आजपासुन बरोबर २७ वर्षापुर्वी एअर इंडिया फ्लाईट १८२ उर्फ एम्पेरर कनिष्कला (बोईंग ७४७) आयरिश समुद्राच्या हद्दीत ३१,००० फुटांवर बॉम्बने उडवुन देण्यात आले होते ज्यात सर्वच्यासर्व ३२९ प्रवासी मारले गेले होते. यात ३०२ प्रवासी आणि २७ कर्मचारी होते. मरणार्‍यांत २८० कॅनडियन, २७ ब्रिटिश आणि २२ भारतीय नागरिकांचा समावेश होता. सामानात असलेल्या एका बॅगमध्ये हा ब्लास्ट झाल्याने विमान हवेतच फुटले. मुळात प्रवासी विमानात चढला नसताना त्यांचे सामान विमानात का चढवले गेले हा मुख्य प्रश्न आजही अनुत्तरित राहतो. ही फ्लाईट माँट्रेयल वरुन लंडन मार्गे दिल्ली येथे जात होती. ह्यामागे बब्बर खालसा म्हणजेच खलिस्थान मुव्हमेंट्चा हात सिद्ध झाला आणि त्या संबंधीत ट्रायल्स २७ वर्षानंतर अजुनही कॅनडामध्ये सुरु आहेत. ही कॅनडामधील सर्वात खर्चिक केस ठरली असुन ह्यावर आतापर्यंत १३० मिलियन कॅनडियन डॉलर खर्च झाले आहेत. ९/११ सोडले तर आतापर्यंत झालेल्या सर्व विमान अपघातांमध्ये हा सर्वात भयानक आणि भीषण घातकी हल्ला होता. आयरिश समुद्रात इतरस्र विखुरलेले विमानाचे उरले सुरले अवशेष ज्या जहाजाला प्रथम दिसले ते म्हणजे ल्युरेण्टियन फॉरेस्ट. (Laurentian Forest)

दुसरीकडे जपानच्या नरिता विमानतळावर अजुन एक बॉम्बब्लास्ट झाला होता जो खरेतर एअर इंडिया फ्लाईट ३०१ उडवण्यासाठी ठेवण्यात आला होता. सुदैवाने विमानतळावर ब्लास्ट झाल्याने प्रवाशी सुखरुप राहिले पण दुर्दैवाने सामान हाताळणारे २ कर्मचारी म्रुत्युमुखी पडले.

मला ह्या प्रसंगाबद्दल लिहावेसे का वाटले किंवा अधिक माहिती करुन का घ्याविशी वाटली ह्यामागे कारण म्हणजे बॉब. बॉबला मी गेल्यावर्षी दुबईमध्ये भेटलो होतो. माझ्या नव्या कंपनीत तोही माझ्यासारखाच नव्याने दाखल झाला होता. मला भेटताच पहिल्याच दिवशी त्याने ह्या हल्ल्याचा उल्लेख केला. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला ह्या अपघाताबद्दल 'असा अपघात झाला होता' ह्या व्यतिरिक्त काहीही ठावुक नव्हते. बॉब मुळचा आयरिश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यावेळी ल्युरेण्टियन फॉरेस्टने विमानाचे अवशेष पाहिले तेंव्हा तो त्या बोटीवर होता. त्यावेळी तो अवघ्या २२ वर्षाचा होता. आज २७ वर्षांनी ४९ वर्षाचा बॉब मला त्या दिवशी जे पाहिले ते सांगत होता.

'३२९ पैकी फक्त १३२ म्रुतदेह हाती लागले ते सुद्धा ल्युरेण्टियन फॉरेस्टने त्वरित हालचाल केली म्हणुन. बाकी १९७ म्रुतदेह समुद्रात बुडाल्याने हाती लागले नाहीत. मिळालेले बहुतेक म्रुतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आम्ही कसे उचलुन आणले हे आमचे आम्हालाच ठावुक. काहींची फक्त धडेच होती तर काही फक्त हात-पाय. समुद्रावर तरंगणार्‍या अनेक प्रेतांवर समुद्री पक्षी तुटुन पडले होते. हे सर्व घेउन आम्ही किनार्‍यावर गेलो ते गाव होते बॅन्ट्री. आम्हाला 'बॅन्ट्री' (Bantry) मधल्या लोकांनी खुप मदत केली.'

कॅनडा सरकरने बॅन्ट्री येथे उभारलेले स्मारक.

जिथे मला ऐकतानाच कसेसे होत होते (आणि तुम्हाला नक्कीच वाचताना होईल) तिथे बॉब आणि ल्युरेण्टियन फॉरेस्टच्या क्रुने हे काम कसे केले असेल ठावुक नाही. विमानाचे बुडालेले अवशेष शोधुन वर काढण्यासाठी गार्डलाईन लोकेटर (Guardline Locator) ह्या ब्रिटिश आणि लिओन थेवेनिन (Léon Thévenin) या फ्रेंच बोटीला पाचारण करण्यात आले. त्यांचे मुख्य काम होते flight data recorder (FDR) आणि cockpit voice recorder (CVR) शोधणे. १६ दिवस अथक शोध घेतल्यावर अखेर एके ठिकाणी ६,७०० फुट खोलीवर विमानाचे अवशेष सापडले. दुसरीकडे कॅनडामध्ये तपासाला वेग आलेला होता आणि संशयाची सुई थेट बब्बर खालसाकडे वळली होती. ब्लास्ट एका सानयो स्टिरिओ वापरुन केल्याचे तपासात उघड झाल्यावर तपासाची चक्रे अजुन वेगाने फिरु लागली आणि काही दिवसात ईंद्रजित सिंग रेयात याला सी.एस.आय.एस.ने Canadian Security Intelligence Service (CSIS) ब्रिटिश कोलंबिया मधुन अटक केली.

ह्या सर्वाची सुरुवात ३-६ जुन १९८४ रोजी अमृतसर येथे जे काही घडले तिथुनच झाली होती. ऑपरेशन ब्लु स्टार. त्यानंतर ४ महिन्यात इंदिरा गांधी यांची हत्या आणि शीख विरोधी दंगली याने फक्त भारतात नव्हे तर कॅनडामध्ये देखील वातावरण तंग झाले. अजितसिंग आणि परमार अमेरिका-कॅनडा येथे एकत्र आले. ह्या दोघांनी संपुर्ण कॅनडामध्ये फिरुन प्रचार करुन पैसे उभे केले आणि शीख समुदायाला भारत सरकार विरुद्ध लढण्यास उभे केले. दोघांनी काही महिन्यात २००,००० कॅनडियन डॉलर उभे केले आणि रेयातला सोबत घेउन बॉम्ब बनवायला सुरुवात केली.

१९८१ साली परमार २ पंजाब पोलिस ऑफिसर्सना मारुन कॅनडा येथे पळुन गेला होता. त्याच्या आमच्या ताब्यात द्यावे ही भारताची मागणी कॅनडाने फेटाळली होती. भारताने मग त्यावर इंटरपोल मार्फत दबाव टाकायला सुरुवात केली. १९८२ साली त्याला अवैधरित्या जर्मनीमध्ये शिरताना अटक झाली आणि १ वर्षाची शिक्षा भोगल्यावर त्याची रवानगी पुन्हा भारताऐवजी कॅनडाला केली गेली होती.

********************

अजित सिंग बाग्री (ह्याने १९८४ साली न्युयोर्क येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शीख परिषदेत 'हिंदुंनी कैक शिखांना नाहक ठार मारले आहे. आम्ही ५० हजार हिंदु मारत नाही तोवर शांत बसणार नाही.' असा सज्जड दम भारत सरकारला दिला होता.)

तलविंदरसिंग परमार (हा कॅनडामध्ये बब्बर खालसाचा प्रमुख होता)

लखबिरसिंग ब्रार रोडे (हा ईंटरनॅशनल सिख युथ फेडरेशन संस्था चालवत होता आणि ह्या हल्ल्या मागचा मास्टर माईंड समजला जातो). लखबिरसिंग हा जरनैल सिंग भिंद्रावाले याचा भाचा.

हरदयालसिंग जोहाल (तलविंदरसिंग परमारचा उजवा हात. विमानाचे तिकिटे ह्याचा फोन नंबर देउन बुक केली गेली होती.)

दलजित संधु (विमानाची तिकिटे ऑफिसमधुन जाणारा)

मनमोहन सिंग (तलविंदरसिंग परमारचा डावा हात. )

स्रुजन सिंग गिल. (आयत्यावेळी ऑपरेशन मधुन हात काढुन घेउन लंडन येथे पळुन गेला)

रिपुदमनसिंग मलिक

************************

रिपुदमनसिंग मलिक आणि अजित सिंग बाग्री यांना कॅनडा सरकारने २००० साली (घातपाताच्या १५ वर्षांनी) अटक केली आणि २००५ मध्ये म्हणजे ५ वर्षांनी त्यांना पुराव्याअभावी सोडुन दिले. मलिक आणि बाग्री यांनी कॅनडा सरकारवरच मानहानीचा दावा ठोकत अनुक्रमे ६.४ मिलियन आणि ९.७ मिलियन कॅनडियन डोलरची मागणी केली आहे.

ट्रायल मध्ये ईंद्रजित सिंग रेयात याने मी परमारला ओळखत नाही असे सांगितले होते पण CSIS कडे दोघांना एकत्र पाहिल्याचे पुरावे होते. मुळात परमारने रेयातला बॉम्ब बनवण्यासाठी योजले होते. ह्यानंतरही भक्कम पुरावे न मिळाल्याने CSIS कोणालाही अटक करुन ठेवु शकले नाही. रेयात कॅनडा सोडुन ईंग्लंड मध्ये निघुन गेला जिथे तो जॅग्वार कंपनीत कामाला लागला. २ वर्षांनी त्याला पुन्हा कॅनडामध्ये आणुन त्याच्यावर केस सुरु केली गेली. १९९१ मध्ये त्याला फक्त १० वर्षाची शिक्षा झाली. २००१ साली तुरुंगातुन सुटल्यावर त्याच्यावर पुन्हा केस उभी करुन त्याला ५ वर्षांकरिता पुन्हा जेल मध्ये टाकले गेले. त्याच्यावर विविध गुन्ह्यांसाठी एका मागुन एक केसेस केल्या गेल्या. गेल्या वर्षी म्हणजे ७-१-२०११ रोजी त्याला पुन्हा ९ वर्षांकरिता जेल मध्ये टाकले गेले आहे.

परमार कॅनडा मधुन गायब झाला तो कुठे गेला त्याचा पत्ता कोणालाच लागला नाही. तो पाकिस्तानात लपुन भारताविरुद्ध नव्या योजना आखत आहे अशी गुप्त बातमी १९८८ मध्ये मिळाली होती. १९९२ मध्ये अचानक पंजाबमध्ये तो पोलिस चकमकीत मारला गेल्याची बातमी आली. तो भारतात कसा आला, कधी आला, त्याला जिवंत पकडायचे प्रयत्न का केले गेले नाही याची उत्तरे अर्थात गुलद्स्त्यातच आहेत. म्रुत्युपुर्वी परमारने Punjab Human Rights Organisation (PHRO)ला दिलेल्या एका ईंटरव्ह्युमध्ये म्हटले आहे की, लखबिरसिंग ब्रार, ईंद्रजित सिंग रेयात आणि मनजितसिंग (हे नाव वरच्या यादीतही नाहिये) यांनी कट रचला आणि २ विमानांमध्ये बॉम्ब ठेवले. लखबिरसिंग याने व्हँकुव्हर - टोकयो - बँगकॉक विमानाचे तिकिट घेउन त्यात बॅग ठेवली तर मनजितसिंगने माँट्रेयल - लंडन - दिल्ली विमानात बॅग ठेवली.

लखबिरसिंगला १९९८ मध्ये नेपाळमध्ये २० किलो आर.डी.एक्स. बाळगल्यावरुन अटक झाली. त्यावेळी याला भारताच्या ताब्यात का घेतले गेले नाही माहित नाही पण २००१ साली तो पुन्हा पाकिस्तानात आहे याची पक्की बातमी आली. आज तो कुठे आहे याची माहिती नाही. असेही एक मत होते की हे सर्व त्यावेळच्या काँग्रेस सरकारने शीख समुदायाविरुद्ध जागतिक मत तयार होण्यासाठी नाटक रचले. खुद्द लखबिरसिंग हा रॉ (RAW)चा अंडर कव्हर एजंट होता आणि त्याला वाचवण्यासाठी १९९२ मध्ये परमारला ठार मारले गेले. खरे खोटे ठावूक नाही कारण आज २७ वर्षांनी देखील अनेक गोष्टी गुलदस्त्यातच आहेत.

बॉब म्हणतो तेच बरोबर असावे... लुक्स लाईक इट्स ऑल डर्टी पॉलिटिक्स...

त्या घटनेत मृत पावलेल्या सर्व ३२९ व्यक्तींना मनःपुर्वक श्रद्धांजली...

टोरँटो येथील स्मारक...

स्टॅनली पार्क, व्हँकुव्हर येथील स्मारक... म्रुत्युमुखी पडलेले बहुतेक प्रवाशी ह्या शहरातील होते.

माहिती आणि फोटो.... विकिपेडिया वरुन साभार.

गुलमोहर: 

मस्त माहिती दिलीस.
एअर इंडिया फ्लाईट १८२ बद्दल डिस्कव्हरी/नॅट जिओ वर फिल्म बघितली होती ... पण तुला बॉब च्या तोंडुन ते सगळ ऐकतांना काय फिल झालं असेल याची कल्पनाच करवत नाही Sad

Sad

बॉब तुला भेटला आणि हा विषय निघाला म्हणजे खरंतर जरा नवलच म्हटलं पाहिजे. कदाचित तू 'इण्डिया'चा आहेस हे कळल्यावर त्याच्या आठवणी चाळवल्या गेल्या असतील.

वर्तमानपत्रात ही बातमी मी अगदी बारकाईने फॉलो केली होती. ब्लॅक बॉक्स, फ्लाईट डेटा रेकॉर्डर यांसारख्या संज्ञा तेव्हा प्रथम कळल्या होत्या. या उपकरणांच्या मदतीने अपघाताच्या आधीची काही मिनिटे काय काय घडामोडी झाल्या हे समजतं - हे कळल्यावर खूप अचंबा वाटला होता.

कनिष्कचा ब्लॅक बॉक्स सापडल्यावर त्याचाही फोटो पेपरमधे आला होता. तो अजून आठवतोय मला. (ब्लॅक-बॉक्स हा काळ्या रंगाचा नसतो हे ही त्या फोटोवरूनच कळलं होतं. कनिष्कचा केशरी रंगाचा होता.)

मलिक आणि बाग्री यांची सुटका झाल्यावर लोकसत्ताने अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांच्या मुलाखतींवर आधारित एक फीचर केलं होतं. उत्फुल्ल चेहर्‍याने कोर्टाच्या बाहेर पडणार्‍या त्या दोघांचा फोटो त्यात दिला होता. तो पाहून तेव्हाही मनात चीडच दाटून आली होती.

लले.. तुला विपु करणारच होतो कारण हा तु लिहिलेल्या गोल्डन टेंपल धाग्याशी सुसंगत आहे ना. Happy

जुन्या लोकसत्ता किंवा इतर पेपर मधील कात्रणे मिळु शकतील का?

लुक्स लाईक इट्स ऑल डर्टी पॉलिटिक्स... Sad
त्या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना मनःपुर्वक श्रद्धांजली.
या सार्‍या माहीती बद्द्ल धन्यवाद सेनापती.

रोहन .. काय काय आठवणी जाग्या झाल्या तुझ्या या लेखामुळे..
मुंबई ला आमच्या शेजार च्या बिल्डिंग मधे एअर इंडिया चा एक पर्सर राहायचा. ऑफ ड्यूटी असला की तो ,त्याची बायको आणी त्यांचा लहानसा सव्वा वर्षाचा ,भुरक्या रंगाचे केस असलेला अति गोंडस पोरगा आणी बरोबर एक भला मोठा गोल्डन रिट्रायवर असे रस्त्याने रेग्युलरली वॉक ला जायचे.. तेंव्हा बालकनीत चहा पिताना हे दृष्य आमच्या इतकं सवयीचं झालं होतं..
आणी या काळ्या दिवसानंतर हे देखणं कुटुंब नाहीसं झालं.. या फ्लाईट वर हे तिघं सुट्टीवरून परत येत होते.. Sad
मागे म्हातारी नानी एकटीच उरली होती.. तिची एकुलती एक पोरगी ,तिच्या कुटुंबासमवेत अचानक हरवून गेली..

वर्षु... Sad

जे मृतदेह मिळाले त्यात २ लहान मुलांचा समावेश होता.
तो बिचारा पोरगा... आणि त्याचे आई-वडील.

आणी या काळ्या दिवसानंतर हे देखणं कुटुंब नाहीसं झालं.. या फ्लाईट वर हे तिघं सुट्टीवरून परत येत होते..>>>>

वर्षु ताई ही म्रुतांची लिस्ट. त्यात पॅसेंजर इंडिया मध्ये फक्त ३ अकडा आहे. म्हणजे हेच तिघे असतिल.

Nationality Pass Crew Total
 Canada 268 0 268
 United Kingdom 27 0 27
 India 3 21 24
 Soviet Union 3 0 3
 Brazil 2 0 2
 United States 2 0 2
 Spain 2 0 2
 Finland 1 0 1
 Argentina 0 1 1
Total 307 22 329

>>> मुळात प्रवासी विमानात चढला नसताना त्यांचे सामान विमानात का चढवले गेले हा मुख्य प्रश्न आजही अनुत्तरित राहतो.

या घातपाती हल्ल्यावर पूर्वी एक वृत्तांत पाहिला होता. त्या वृत्तांतानुसार, हे विमान निघण्याच्या एक दीड तास आधी एक पगडी व केस नसलेला शीख प्रवासी घाईघाईत चेकिंग काऊंटरपाशी आला. त्याने आपले सामान चेकइन केले व बोर्डिंग पास घेतला. ५ मिनिटांनी तो परत आला व काहीतरी महत्त्वाचे विसरल्याची बतावणी करून १५-२० मिनिटांत ते घेऊन परत येतो असे सांगून तो विमानतळावरून निघून गेला. दरम्यान त्याच्या चेकइन केलेल्या बॅगा विमानात पोचल्या होत्या. विमानोड्डाणाची अंतिम घोषणा झाली तरी तो परत आला नव्हता. त्याची काही काळ वाट पाहून शेवटी त्याला न घेताच त्याच्या सामानासकट विमानाने उड्डाण केले व त्यानंतर काही वेळाने त्याच्या सामानात असलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन विमान अटलांटीक समुद्रात कोसळून सर्व प्रवाशांचा मृत्यु झाला. त्यानंतर काही वर्षांनी त्याला पकडले तेव्हा त्याचे सामान चेकइन करणार्‍या महिला कर्मचार्‍याने त्याला बरोबर ओळखले.

त्या घातपातानंतर विमान कंपन्यांनी एक नवीन नियम केला. त्या नियमानुसार, जर सामान चेकइन करून बोर्डिंग पास घेतलेला प्रवासी प्रत्यक्ष विमानात हजर झाला नाही तर विमानातील सर्व प्रवाशांना उतरवून त्या प्रवाशाचे चेकइन केलेले सामान विमानातून बाहेर काढले जाते व नंतरच विमानोड्डाण होते. या प्रकारात विमान उड्डाण व्हायला खूप उशीर होतो, पण सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यावश्यक आहे.

आई गं मोकिमी..हो गं तेच असतील.. Sad
इतक्या वर्षानंतर ही काटा आला सर्र् कन ही लिस्ट पाहताना

वर्षू Sad

रोहन, त्या अपघाताची आणि संबंधित खटल्याची माहिती तू लिहिलीस ते चांगलंच केलंस. पण बॉबचं आणि तुझं काय-काय संभाषण झालं, त्याच्या अपघाताबद्दलच्या काय प्रतिक्रिया होत्या हे ही लिहिणं शक्य आहे का? म्हणजे त्याच्या दृष्टीकोनातून या सर्व घटना - असं काही?
त्यानंही कदाचित नंतर हा खटला फॉलो केला असेल. (आयरिश जनता त्यांच्या अंतर्गत राजकीय समस्यांनी ग्रस्त असली तरी) खलिस्तान/बब्बर खालसा/पंजाब/भारत या दृष्टीकोनातून एक आयरिश व्यक्ती म्हणजे बर्‍यापैकी "न्यूट्रल" म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय दहशतवाद ही संज्ञा जेव्हा बर्‍यापैकी अज्ञात होती, तेव्हा घडलेली ही घटना आहे. अशा वेळी परकीय पण तुलनेने अलिप्त राष्ट्रे त्या बाबीबद्दल काय विचार करत होती हे समजायला थोडाफार वाव आहे.

अपघातात नाहक मारल्या गेलेल्यान्ना श्रद्धान्जली Happy
माहितीपूर्ण लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद

Sad

मी सुद्धा कनिष्कबद्दल पेपरातुन फॉलो केलेले तेव्हा.

आज परत सगळे वाचताना मनात चीड दाटुन येत होती. कोणाचे राजकारण आणि कोणाला शिक्षा Angry

पण बॉबचं आणि तुझं काय-काय संभाषण झालं, त्याच्या अपघाताबद्दलच्या काय प्रतिक्रिया होत्या हे ही लिहिणं शक्य आहे का?
>>> ह्याविषयावर आमचे बोलणे झाले ते खुपच त्रोटक असे मी म्हणीन. पण मी पुन्हा त्याच्याशी या विषयावर बोलु शकीन. त्याचे 'न्युट्रल' मत नेमके काय आहे हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करु शकतो.