मोप्रकॉतको पंतप्रधान झाल्यास …

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

(लमाल १६ जून २०१२ ओळख)
आशिष महाबळ

निर्विचारी: मोदी पंतप्रधान झाल्यास ..
अविचारी: मोदीच का?
निर्विचारी: वाक्य तर पूर्ण करु देशील?
अविचारी: बरं, बोल.
निर्विचारी: मोदी पंतप्रधान झाल्यास देशात बरेच बदल होतील.
अविचारी: गुजरातची झाली तशी देशाचीही भरभराट होईल.
निर्विचारी: मी तसं म्हणणार नाही. माझा रोख मोदीच्या हिंदुत्ववादी अजेंड्याकडे आहे.
अविचारी: मोदी केवळ कॅपिटलीस्ट आहे. म्हणूनच हिंदुत्ववादी मोदीच्या विरोधात आहेत. कॅपिटलीझमच भारताला तारु शकेल.
निर्विचारी: अचानक कॅपिटलीझमचे गुणगान? ठिकाय, हिंदुत्ववादी नाही तर मुस्लीमविरोधी मताबद्दल मला बोलायचं आहे.
अविचारी: तशी प्रतीमा त्या कॉंग्रेसवाल्यांनी बनवली आहे.
निर्विचारी: असेलही …
अविचारी: आहेच.
निर्विचारी: ठिक. मोदी पंतप्रधान झाल्यास असे म्हणण्याऐवजी 'मोदीची प्रतीमा कॉंग्रेसवाल्यांमधे आहे तसा कोणी' पंतप्रधान झाल्यास असे म्हणु या.
अविचारी: थोडक्यात, मोप्रकॉतको पंतप्रधान झाल्यास.
निर्विचारी: मोप्रकॉतको?
अविचारी:'मोदीची प्रतीमा कॉंग्रेसवाल्यांमधे (आहे) तसा कोणी'. हा बदल ठिक आहे, बोल तू.
निर्विचारी: ओह. तर तसा कोणी पंतप्रधान झाल्यास ती व्यक्ती देशाचं बरंच नुकसान करु शकते.
अविचारी: कॅपिटलीझम …
निर्विचारी: कॅपिटलीझम गेली खड्ड्यात. पश्चिमात्य देशांचे हाल काय आहेत ते दिसत नाही का? तसही भारतियांना थोडीच पचणार आहे कॅपिटलीझम. तसं असतं तर मेड ईन इंडिया गुड्स नसते दिसले?
अविचारी: कॅपिटलीझम नाही तर तुला म्हणायचं तरी काय आहे?
निर्विचारी: मला मानवी हक्कांबद्दल बोलायचं आहे.
अविचारी: पुन्हा घसरणार तर तू धर्मावर. तुला काय वाटतं मोप्रकॉतको पंतप्रधान झाल्यास इस्लामचे भारतातुन उच्चाटन होईल?
निर्विचारी: तसंच काही नाही. समूळ नाश झाल्यास त्याविरुद्धचा उठावही तितकाच असेल. मला जरा वेगळ्या अंगानं बोलायचय.
अविचारी: म्हणजे कोणत्या?
निर्विचारी: लोक सतत जास्त सजग बनताहेत. टिम अण्णांच्या घोषीत उद्दीष्टांमुळे, सत्यमेव जयतेच्या कोणत्या ना कोणत्या भागामुळे.
अविचारी: लगेचच तर सर्व विसरतात लोक.
निर्विचारी: काही लोकांच्या मनात या कल्पनांनी घर केलं तरी सर्वांचा त्यामुळे फायदा होतो.
अविचारी: मोप्रकॉतकोचा काय संबंध?
निर्विचारी: जर काही विपरीत प्रकार झालेच तर अशा एलीमेण्ट्स उफाळून यायला मदत होईल.
अविचारी: स्युडोसेक्युलर लोकांचं फावेल.
निर्विचारी: वाईटाबरोबर चांगले भरडले जाणे जो कोणी थांबवेल तो चांगलाच, त्याला काहीही लेबल दिलं तरी.
अविचारी: पण वाईटाबरोबर चांगलं असतंच का?
निर्विचारी: कोणतीच गोष्ट केवळ काळी-पांढरी नसते.
अविचारी: व्हायरस? कोणते व्हायरस चांगले असतात?
निर्विचारी: व्हायरस हे जिवंत असण्या-नसण्या पलिकडे असतात. पण मी बॅक्टेरीयांचे इतक्यातीलच एक उदाहरण देऊ शकतो. ऐक:
"वैज्ञानिकांनी दाखवले आहे की आपल्या पोटात एका प्रकारचे बॅक्टेरीया असतात जे की आपल्याला आपले पोट भरले आहे की अजून भूक आहे ते एका केमीकल सिग्नलनी दर्शवतात. आजकाल मात्र अनेक अॅंटीबायोटीक्स घेतल्या जातात आणि त्यामुळे अनेकांमधे हे बॅक्टेरीया आढळत नाहीत. त्याचा परीणाम लठ्ठपणा वाढण्यात झालेला दिसतो".
अविचारी: खरं सांगतोयस?
निर्विचारी: हो तर. जून २०१२ च्याच सायंटीफीक अमेरीकनच्या अंकात यावर एक लेख आहे. प्रॉब्लेम हा आहे की हे चांगले बॅक्टेरीया काय आणि चांगली माणसं काय, हात वर करुन 'आम्ही चांगले आहोत' असे नाही ना सांगत! सोंगं घेतलेली माणसं मात्र थोडं काही केलं की त्याचा गवगवा करतात. वाईटाबरोबर चांगलं भरडणारे आपणच. आपल्याला चांगल्याची पारख करता यायला हवी.
अविचारी: आपली ओळख देणे बॅक्टेरीयांना कठीण जाऊ शकेल. पण वाईटातील चांगल्या लोकांना तर स्वत:ची ओळख देता येईल ना?
निर्विचारी: ज्याप्रमाणे एखादा धर्म पूर्ण चांगला किंवा वाईट नसतो त्याचप्रमाणे कोणतीच व्यक्ति पूर्ण चांगली किंवा वाईट नसते. प्रत्येक धर्मात चांगले आणि वाईट लोक असतात, निधर्मीयांमधे सुद्धा.
अविचारी: वाइट प्रथा न आवडणारे पुढे यायलाच हवे.
निर्विचारी: हिंदुंमधील पण असे लोक पुढे आले की त्यांनाच स्युडोसेक्युलर म्हंटल्या जातं ना?
अविचारी: असं आडून नको बोलु. मोप्रकॉतको पंतप्रधान झाल्यास काय होईल असं तुला वाटतं ते सांग.
निर्विचारी: (१) मुसलमान भरडले जातील, (२) डेमोक्रॅटीक तत्वं पुढे येतील आणि ते अत्याचार थांबवायचा प्रयत्न होईल, आणि (३) मॉडरेट मुसलमान पुढे येतील आणि मॉडर्नायझेशनला मदत करतील.
अविचारी: आणि मॉडरेट मुसलमान कट्टरतेकडे वळल्यास?
निर्विचारी: तोच तर धोका आहे मोप्रकॉतको पंतप्रधान होण्यात. पण ते कट्टरतेकडे वळणार नाहीत अशी आशा करायला हवी. स्युडोसेक्यलरीझमच्या, किंवा नास्तिकतेच्या, लेबलला न घाबरता जसे हिंदु वाईट प्रथा मोडीत काढायला सरसावतात तसे सगळ्यांनी करायला हवं. मानवाला स्वत:ची ओळख देता येते आणि ती त्याने द्यायलाच हवी.

प्रकार: 
शब्दखुणा: 

चांगले लिहीलेय..
तो शेवटचा धोका मात्र आहे. आणि तो एकदा (स्वातंत्र्य मिळवताना ) भारताने अनुभवला आहे.
>> स्युडोसेक्यलरीझमच्या, किंवा नास्तिकतेच्या, लेबलला न घाबरता जसे हिंदु वाईट प्रथा मोडीत काढायला सरसावतात तसे सगळ्यांनी करायला हवं. मानवाला स्वत:ची ओळख देता येते आणि ती त्याने द्यायलाच हवी.
अगदी..

एकदा तिसरं महायुद्ध व्हायला हवं, अणूबाँबच्या वर्षावांनी ऑलमोस्ट ऑल बेचिराख व्हायला हवेत. मग उरलेले लोक बंधूभावाने एकोप्याने सामंजस्याने राहतील आणि पुढची प्रगती का अधोगती काय ती होईपर्यंत ५-१० हजार वर्षे शाम्तता राहिल असाही एक दृष्टिकोन असणारे लोक आहेत. मन्वंतर का कायसं म्हणतात म्हणे त्याला. Happy

तोच तर धोका आहे मोप्रकॉतको पंतप्रधान होण्यात. पण ते कट्टरतेकडे वळणार नाहीत अशी आशा करायला हवी. स्युडोसेक्यलरीझमच्या, किंवा नास्तिकतेच्या, लेबलला न घाबरता जसे हिंदु वाईट प्रथा मोडीत काढायला सरसावतात तसे सगळ्यांनी करायला हवं. मानवाला स्वत:ची ओळख देता येते आणि ती त्याने द्यायलाच हवी.<<<
सहमत.

<< प्रॉब्लेम हा आहे की हे चांगले बॅक्टेरीया काय आणि चांगली माणसं काय, हात वर करुन 'आम्ही चांगले आहोत' असे नाही ना सांगत! सोंगं घेतलेली माणसं मात्र थोडं काही केलं की त्याचा गवगवा करतात. वाईटाबरोबर चांगलं भरडणारे आपणच. आपल्याला चांगल्याची पारख करता यायला हवी. >>

राजकारणात शून्य गती आहे. पण ही वाक्ये पटली आणि आवडली. Happy

>>बघा बॅक्टेरियाचं उदाहरण दिलं तर तीन तीन डॉक्टर
तेच म्हणणार होते! Happy

>> मग उरलेले लोक बंधूभावाने एकोप्याने सामंजस्याने राहतील
असं नाही वाटत. जरा शंभरेक लोक झाले की पुन्हा टोळ्या, टोळ्यांत मारामार्‍या, मग प्रथा, श्रद्धा वगैरे सगळे साग्रसंगीत येईल. खरे तर आता एकूण लोकसंख्येच्या जितके % लोक गुण्यागोविंदाने रहात आहेत तितके पूर्वी क्वचितच राहिले असतील.

मोदी एकमात्र मुख्यमंत्री आहेत ज्यांनी १००च्या वर हिंदू दंगेखोरांना गोळीने उडविले होते. अन्य कुठल्या ही तथाकथित धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्या मुख्यमंत्र्याने मुसलमानांना वाचविण्यासाठी हिंदू दंगेखोरांवर कधीच गोळ्या झाडल्या नव्हत्या. आज मुस्लीम उद्योजक गुजरात मध्ये मोठ्याप्रमाणावर निवेश करतात आहे त्याचे कारण हेच.  

अणूबाँबच्या वर्षावांनी ऑलमोस्ट ऑल बेचिराख व्हायला हवेत. मग उरलेले लोक बंधूभावाने एकोप्याने सामंजस्याने राहतील>>> साफ खोटे. दोन माणसे एकत्र आली की ती एकमेकांकडे पाहून गुरगुरायला सुरुवात करतात. तसेच दोन राज्ये आणि दोन देशांचे ही (इतकेच काय दोन आय डी देखील एकमेकांचे वाचून गुरगुरायला सुरुवात करतात.)

पुण्यासारख्ता ठिकाणी दोन माणसे एक्त्र आली की तीन संस्था निघतात आणि त्या अमीबासारख्या लगेच फुटून आणखी नवीन संस्था तयार होतात.
तेव्हा तुम्ही म्हणता तशी de novo मांडणी होण्याची सुतराम शक्यता नाही.... Proud

प्रॉब्लेम हा आहे की हे चांगले बॅक्टेरीया काय आणि चांगली माणसं काय, हात वर करुन 'आम्ही चांगले आहोत' असे नाही ना सांगत!

खूप आवडले.

स्युडोसेक्यलरीझमच्या, किंवा नास्तिकतेच्या, लेबलला न घाबरता जसे हिंदु वाईट प्रथा मोडीत काढायला सरसावतात तसे सगळ्यांनी करायला हवं. मानवाला स्वत:ची ओळख देता येते आणि ती त्याने द्यायलाच हवी.

सहमत आहे.
माझ्या मते अशी 'न घाबरता पुढे येणारी' माणसे टक्केवारीने सगळ्यात जास्त ख्रिश्चन धर्मात आहेत. हिंदू अजूनही बर्‍यापैकी कंजर्वेटिव्ह आहेत. (नेटवरच्या मारामार्‍यांवर जाऊ नका.) बाकीच्या धर्मांबद्दल न बोललेलेच बरे !

खरे तर आता एकूण लोकसंख्येच्या जितके % लोक गुण्यागोविंदाने रहात आहेत तितके पूर्वी क्वचितच राहिले असतील.

मृदुला यांचे हे विधान अगदी खरे आहे. सगळे दोष स्वीकारूनही आजचा मानव हा पृथ्वीवरचा आजवरचा सर्वोत्तम मानव आहे असे म्हणता येईल.

-------------------------

लेख आवडला, हेवेसांनल.

छान लेख आहे, आवडला.

पक्षिय राजकारण बाजुला ठेऊन देशाला विचार करणारा लेख, मायबोलीवर अभावानेच वाचायला मिळणारे विचार.... Happy

<<माझ्या मते अशी 'न घाबरता पुढे येणारी' माणसे टक्केवारीने सगळ्यात जास्त ख्रिश्चन धर्मात आहेत. हिंदू अजूनही बर्‍यापैकी कंझर्वेटिव्ह आहेत. >>

तात्विक विवेचनाचा बुरखा पांघरून हिंदू धर्मीयांना कमी लेखून त्या तूलनेत ख्रिश्चन धर्माचे श्रेष्ठत्व दाखवण्याचा प्रयत्न करू पाहणारी वाक्ये Sad
निषेध!!

@aschig | 19 June, 2012 - 07:17
आवडले.

निर्विचारीच्या विचारात ढोबळमानाने स्युडोसेक्युलर गोंधळ, आणी अविचारीचे विचारात ठासून हिंदुत्ववाद भरलेला दिसतोय.
तुमचा निर्विचारी, विचार करीत नाही असे दिसत नाही आणि अविचारी अयोग्य विचार करणारा वाटत नाही आहे. कि निर्विचारी विचार न करणारा व अविचारी अविचारीच आहे असेच तुम्हाला म्हणायचेय?