मुलीचा बाप! - भाग २ (अंतिम भाग)

Submitted by आशयगुणे on 31 May, 2012 - 04:01

" तुला आठवतंय? आज बरोबर चार वर्ष झाली मी तुला प्रोपोज केलं होतं . चार वर्ष कशी गेली कळले देखील नाही. काय काय झाले रे ह्या वर्षात.... माय्क्रोबायोच्या कचाट्यातून आपण दोघेही सुटलो. मग माझे वर्षभर जॉब करणे आणि MBA साठी तयारी करणे. मग दोन वर्षांचं MBA आणि आता मी देखील नोकरीला तयार. आणि माझा बच्चू अजून फिरतोच आहे. तुझे हे फिरणे कधी कमी होणार रे?" मला ही बच्चू म्हणायची हे जाता जाता सांगायला हरकत नाही.
मला रोमेंटिक वगेरे होणे जमत नाही. त्यामुळे एकदम लाडात येऊन फिरतीचीच नोकरी करणाऱ्या माणसाला फिरणं कधी कमी होणार असं विचारल्यावर तो त्याचे काय उत्तर देईल? तरीही उत्तर अपेक्षित असतेच. पण आज मी जरा गंभीर मूड मध्ये होतो. जसा जसा माझा व्यवसाय वाढत होता तसा त्यात माझा खर्च देखील वाढू लागला होता. दूर कुठेतरी अमेरिकेत मंदी आल्यामुळे इकडे आमच्या देशात महागाई वाढली आहे असं सांगत होते. पेट्रोल आणि डीझेलचे भाव वर चढत होते. खाद्यपदार्थ तरी कुठे स्वस्त होते? एकाएकी माझा मासिक खर्च वाढतो आहे आणि बचत दिवसेंदिवस कमी होत चालली आहे ह्याची जाणीव मला आता होत होती. अख्ख्या देशाची तीच परिस्थिती होती म्हणा. माझ्या contacts कडून पैसे उशिरा येणं माझ्या पुढील यात्रांसाठी तापदायक ठरत होतं. शिवाय एकंदर भाव वाढल्यामुळे मला प्रत्येक यात्रेसाठी लागणारी किंमत वाढवावी लागत होती. मी जिथे राहायची सोयकरायचो तिथे देखील किमती वाढल्या होत्या. काही ठिकाणी मला संबंध चांगले ठेवायसाठी नफ्याची 'margin 'कमी ठेवायला लागत होती. पर्यायाने माझ्याकडे येणारे उत्पन्न हे घटत होते. चांगल्या 'customer base ' मुळे कंपनी नफ्यात तर होती. पण कमी 'margin ' मुळे मला धंदा पुढे वाढवता येत नव्हता. नवीन ऑफिस बांधायची योजना पुढे ढकलली जाणार होती. आणि मी मनात योजलेल्या सर्वगोष्टी ...मग ते नवीन ठिकाणी फिरायला जाणं असो किंवा नंतर कधी आंतरराष्ट्रीय यात्रा काढणं असो. मध्ये लग्न देखील करायचं होतं. लग्नात मला नटायची आणि पैसे खर्च करायची हौस नसली तरी हिला होती. एकदाच लग्न होतं म्हणून ते थाटामाटात पार पडलं पाहिजे असा तिचा विचार होता. आणि आपण कितीही तत्व बाळगणारे असलो तरीही होणाऱ्या बायकोचे मन आपल्याला मोडवत नाहीच! आणि ह्या पार्श्वभूमीवर ही मला फिरणं कमी कधी होणार असं विचारात होती. किती स्वप्नाळू असतात ह्या मुली. पण तरीही फोनवर वैतागलेले भाव कुठे दिसतात? त्या भावांना विसंगत असणारा माझा आवाज सौम्य ठेवत मी बोलू लागलो.

" फिरणं कमी करून कसं चालेल? आपल्याला पुढे हे वाढवायचे आहे ना. आपण सारं जग फिरणार आहोत की नाही? आठवतोय ना तुला कॉलेजला जाताना झालेला आपला संवाद? आता तर तुला पण नोकरी लागली आहे. म्हणजे आपल्याला पुढे विचार करायला हरकत नाही. दोघेही कमवणारे होणार आहोत आपण. मला वाटतंय आपण आता हे घरी सांगायला हवं. " उत्तरं द्यायचं सोडून ती फक्त खदखदली.

" हसू नकोस! मी तुला खरं ते सांगतोय. अजून किती दिवस आपण फोनवर बोलत राहायचं? घरचे समोरासमोरच राहत असल्यामुळे आपल्याला कुठे जाता पण येत नाही. एकदा सगळं सांगून टाकूया. घरच्यांची परवानगी मिळाली तर एक लेवल पार!"

माझी दोन दिवसानंतर उत्तर कर्नाटक यात्रा होती. त्या भागाबाद्दलची माहिती वाचून रात्री मी तिला फोन केला होता. उद्याचा एक दिवस होता आणि नंतर परत मी एक आठवडाभर बाहेर. ह्या यात्रेसाठी म्हणावे तितके लोक आले नाहीत ह्याची एक चिंता होतीच. आणि त्या नंतर लगेच दीड आठवड्याने जयपूर योजले होते. ह्या दोन ट्रिप्स वर पुढचा बिझिनेस अवलंबून होता. कर्नाटकात माझं काही लक्ष लागेना! सकाळी फिरणं झालं की दुपारच्या जेवणावेळेस, संध्याकाळी चहा प्यायला थांबलो की....किंवा रात्री जेवणं झाल्यावर लोकं झोपायला गेली की...सतत एकाकी वाटत होतं. सारखा 'पुढे काय' हा विचार मनात येत होता. मी एकट्याने ३ वर्षात ही छोटीशी कंपनी इथपर्यंत तर आणली. पण आता मला गरज होती आधाराची. माझ्या खांद्यावर कुणाचा हात नसला तरी चाललं असतं पण खांद्यावर अनुष्काने डोकं जरी ठेवलं असतं तरी बरं वाटलं असतं. महागाई वाढली नसती तर ज्या पद्धतीने मी कंपनी पुढे नेत होतो ....लग्नाला उभं राहता आलं असतं. आणि पुढील आयुष्यात कुणीतरी आपल्या बरोबर आहे ह्या खात्रीनेच मी पुढची पावलं बिनधास्तपणे टाकू शकलो असतो! आता तर हिला नोकरी पण लागली होती. माझं बऱ्यापैकी नाव झालं होतं हे खरं. फक्त बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे लोकं एकूणच साशंक होते! आणि ३ दिवसात जरी मुंबईला घरी परत जाणार असलो तरीही त्या रात्री हुबळीला मला अनुष्काची आठवण येऊ लागली....

वास्तविक तिला मी आधी आवडलो. कॉलेजच्या सुरुवातीला कदाचित वर्गातील मुलं चिडवतील म्हणून आम्ही एकत्र जायचो नाही. पण कॉलेज मधून येताना तिचे इशारे सुरु होयचे. मी आणि माझा एक मित्र असे यायचो. ट्रेननी येत असल्यामुळे रेल्वे स्टेशन पर्यंत त्याची सोबत असायची. ही आमच्या पुढेच चालत असायची. पण आम्ही मागून येतो आहे ह्याची तिला कल्पना असायची. त्यामुळे मध्येच थांबून बुटाची लेस बांध, हातातली बाटली खाली पाड आणि ती उचलायला उगीच जास्त वेळ लाव असल्या गोष्टी सुरु होयच्या. मला आहे कधीच लक्षात आले नाही. पण माझ्या मित्राला हे सारे इशारे लगेच समजले. " साल्या, लाईन देते आहे बघ तुला", असं त्याच्या तोंडून येऊ लागले. मला देखील आता संशय येऊ लागला होता. वर्गात तोपर्यंत मित्रांना हे देखील माहिती नव्हते की ही मुलगी माझ्या घरासमोरच राहते आणि हिच्या बापापर्यंत माझी पोच आहे! ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी झाल्या. कॉलेजच्या पहिल्या वर्षी अगदी सुरुवातीला झालेल्या ह्या गोष्टी आहेत. एक- दीड महिना असंच चाललंय हे लक्षात घेऊन एकदा घरी चालत येताना मीच तिला हाक मारली आणि आपण चालत एकत्रच जाऊया असं सांगितलं. त्या दिवशी तिच्या चेहऱ्यावरचे ते 'लाजून हासणे' मला अगदी काल झाल्याप्रमाणे लक्षात आहे. मग हे एकत्र चालणे आम्ही पुढे वर्षभर सुरु ठेवले. वर्गातील मुलं काय म्हणतील ह्याची आता मला परवा नव्हती....तिला तर केव्हाच नव्हती! ह्याच दरम्यान माझे दादांबरोबर चर्चा रंगवणे सुरु झाले होते. आणि तिच्या घरी येणे-जाणे वाढले होते. घरी असताना ती आमच्या चर्चा कान देऊन ऐकायची. मधून मधून बोलायची देखील. मग मध्येच किचन मध्ये जाऊन चहा, सरबतआण वगेरे सुरु असायचं. असं करत करत एस.वाय उजाडलं. आणि एके दिवशी दुपारी घरी येताना तिने मला सांगितले, " मला तू आवडतोस. एका मित्रापलीकडे. तू जवळ नसलास की सारखं तुझ्याबद्दल कुतूहल असतं...तू काय करतो आहेस ह्याबद्दल माहिती करून घ्यायची इच्छा सारखी मनात असते. माझे इतर खास मित्र आहेत. पण कॉलेज संपवून ते घरी गेले की त्यांच्याबद्दल जाणून घ्यावेसे नाही वाटत. तू समोर राहतोस तरी लांब असल्यासारखे वाटते. तू काय करत असशील हा विचार मनात असतो." होकारार्थी उत्तर द्यायला मी तब्बल दोन महिने लावले. आणि त्यानंतर सगळ्या प्रसंगी अनुष्का माझ्या बरोबर उभी राहिली होती.

जयपूरला जायच्या आधी मी तिला मेसेज पाठवला होता. 'आल्यावर आपण घरी सांगायचे का? आता सर्वांना कळलेले बरे. मग आपल्याला पुढची पावलं उचलताना एकत्र निर्णय घेता येतील '. जयपूरचा माझा दौरा होता १२ दिवसांचा. जयपूर आणि राजस्थानची प्रमुख शहरं बघायची होती. आणि दुसऱ्याच दिवशी माझा फोन वाजला. भर दुपारी कुणाचा मेसेज आला हे बघायला मी फोन हातात घेतला. बघतो तर अनुष्का! आज हिची ऑफिसला दांडी दिसते आहे असं म्हणून मी मेसेज वाचायला घेतला आणि हादरलोच! ' आपल्या बद्दल दादांना कळले आहे. ते माझ्यावर प्रचंड भडकले आहेत. तुला हे सांगण्यासाठी मला त्यांनी फोन दिला होता . पण आता फोन त्यांच्याकडे असणार आहे. म्हणून मेसेज करू नकोस. सांगायचं हे आहे की दादांनी माझ्यासाठी मुलगा बघितला आहे. पुण्याचा आहे. एका सोफ्टवेर कंपनीत कामाला आहे. माझ्या मावशीनी घरी सुचवलं. इतके दिवस त्यांच्या फक्त मनात होतं पण तुझा मेसेज वाचल्यापासून त्यांनी आता घाई करायला सुरुवात केली आहे. कदाचित २ दिवसात ते घरी येतील. मला बघायला. तू आल्यावर भेटू....लव यु ...मिस यु .....

प्रथमच इतक्या निरुत्साहात यात्रा संपवून मी घरी आलो. अशा प्रसंगी आपल्या आवडीच्या गोष्टी देखील आपली साथ देत नाहीत.

आलो आणि तडक दादांकडे गेलो. चेहऱ्यावर स्मित ही न ठेवता त्यांनी मला खुणेने आत जाऊन बसायचा इशारा दिला. आणि मी आत जाऊन बसल्याक्षणी मला प्रश्न केला, " मी काय ऐकतो आहे ते खरं आहे का?"

" नाही...म्हणजे....", मी शब्दांची जुळवाजुळव करू लागलो. " मला नीट उत्तर हवं आहे", दादा गरजले. " आणि नीट उत्तर नसेल तर मी तुला सांगतो. आम्ही अनुष्कासाठी मुलगा बघितलेला आहे. पुण्याचा आहे. आणि आम्ही त्याच्याशी तिचे लग्न लाऊन देणार आहोत." असं म्हणून दादा मागे वळले. आणि ताड-ताड पावले टाकीत ते जेव्हा आत जाऊ लागले तेव्हा मी धैर्य गोळा करून म्हणालो, " पण का? तिला मी आवडतो. मग मी का नाही? मला देखील ती.....", आणि तेवढ्यात ते झपकन मागे वळले आणि मी परत शांत झालो.

" अरे लग्न म्हणजे काय गम्मत वाटली का तुला?" ( कुठल्याही मराठी सीरिअल मध्ये शोभेल अशा वाक्याने दादांनी सुरुवात केली) " लग्नाआधी किती तरी पूर्वतयारी करावी लागते. हे एवढं सोपं नाही आहे."

" माझी तयारी आहे दादा. तुम्ही सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत. आम्ही एकमेकांना आता चार वर्षापासून ओळखतो. मला खात्री आहे मी जे बोलतो आहे ते अनुष्काला देखील पटेल. आम्ही तुमची आणि माझ्या घरच्यांची परवानगी घेणार होतोच.....म्हणजे तुम्हाला सांगणार होतोच. ( परवानगी हा शब्द वापरल्याबद्दल मी मनातल्यामनात डोकं आपटून घेतलं!)

" तुम्ही लाख सांगाल रे....पण ह्याचा अर्थ आम्ही परवानगी द्यायची का? आम्ही पण आमच्या मुलीसाठी काहीतरी विचार केलेले असतातच ना. असं उद्या कुणीही परवानगी मागायला आलं तर काय आम्ही हो म्हणायचं का?"

" अहो पण दादा....मी कुणीही आहे का? तुम्ही मला ओळखता. मी गेली अनेक वर्ष तुमच्याकडे येतो आहे. आपलं बोलणं होतं. तुम्ही माझा स्वभाव जाणता....मी काय करतो...कसा आहे....हे सगळं तुम्हाला माहिती आहे...", मी माझी बाजू मांडायला सुरुवात केली. पण माझे वाक्य मधेच तोडून दादा म्हणाले.

" नुसतं तुला ओळखून काय फायदा? मी कसा विश्वास ठेवू की तू लग्नाला पात्र आहेस? तुमच्या घरी आमची मुलगी देऊन तिच्या सुखी राहण्याची काय हमी आहे? ओळख तर माझी इथल्या दहा बिल्डींग मधल्या मुलांशी आहे!" दादा बऱ्यापैकी आक्रमक स्वरात बोलत होते. " अहो, पण तिला मी आवडतो...."

४-५ सेकंद का होईना पण माझ्या ह्या विधानाने दादा शांत झाले. आणि मला समजावू लागले. " लग्न हे केवळ तिला तू पसंत आहेस म्हणून लावून देऊ का मी?"

"म्हणजे?" मी विचारले.

" हे बघ....लग्न व्यवस्थित पार पाडायला सर्व निकषांनी विचार करावा लागतो. आम्हाला आमची मुलगी द्यायची आहे....ते आम्ही विचार केलेल्या कुटुंबातच देणार ना. त्यातच तिचा फायदा आहे...तिला सुख आहे...सगळीकडून विचार करावा लागतो त्यासाठी."
" पण दादा...आमच्या घरी कुणीतरी आम्हाला मुलगी देत आहे असा नाही माझा विचार...नाही माझ्या आई-बाबांचा! आम्ही तिला नक्कीच एक सदस्याप्रमाणे वागवू...नव्हे...वागवलेच पाहिजे ", मी स्पष्टपणे सांगितले.
" हे बघ...ही पुस्तकी वाक्य माझ्यासमोर नको आळवू...मी तुझ्या घरच्यांना ओळखतो. त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. तुझे विचार पण मला माहिती आहेत. पण तो माझा मुद्दा नाही", दादा म्हणाले. मुळात ह्या माणसाचा मुद्दाच काय आहे हे मला कळत नव्हते. ह्यांना माझ्याशी प्रोब्लेम नव्हता....माझ्या घरच्यांशी नव्हता...अनुष्काला मी आवडतो हे माहिती होते....पण मग ह्यांची अडचण काय होती? हे अशे इतका वेळ कोड्यात का बोलत होते? मी त्यांच्याकडे पाहत राहिलो. शेवटी तेच पुढे बोलले.
" माफ कर...मी जरा स्पष्ट बोलतो. आतापासून ३-४ वर्षानंतर माझ्या मुलीला तू जगातील परिस्थितीप्रमाणे सुखी ठेवू शकशील? ते तर सोड....तुझे मनसुबे काय आहेत...लग्न करायला निघाला आहेस...पुढचा काहीतरी विचार तरी केला असशील ना?"

" दादा, मी लगेच लग्न करायचं असं म्हणताच नाही. मी आमच्या प्रेमाची कबुली द्यायचे केवळ म्हणतोय. पण पुढचं विचारलंत तर... तुम्हाला देखील माहिती आहे की पुढील ३-४ वर्षात मी माझे स्वतःचे ऑफिस उघडणार आहे...."

"म्हणजे तुझे ऑफिस सुद्धा नाही सुरु झाले अजून. आणि हो....१-२ वर्षांची ३-४ वर्ष कशी झाली? तुला काय वाटतं....आम्ही आमच्या मुलीला अशा मुलाकडे सुपूर्त करावं ज्याच्याकडे स्वतःचे साधे ऑफिस पण नाही? उद्या आम्हाला कुणी विचारले तर आम्ही काय सांगणार? " ( ह्या एवढ्या बोलण्यात 'मुलीला सुपूर्त करणे' ही गोष्ट मला कमालीची खटकली! जर मुलीला दुसऱ्या कुटुंबात देणे हीच भावना असेल तर तिला स्वातंत्र्य देणं ह्या गोष्टीला काय अर्थ आहे? परवा पर्यंत पंजाबी ड्रेस घालणारी मुलगी आज जीन्स घालू लागली म्हणजे ती स्वतंत्र झाली असं नाही.....असो..असा विचार करणारा मुलगा तरी मिळेल का तुम्हाला दादा?)
" दादा तुम्हाला माहिती आहेच. सध्या मार्केट जरा डाऊन आहे...मला माझ्या सगळ्या योजना थोड्याशा पुढे ढकलाव्या लागत आहेत. मलाच काय...महागाईमुळे सर्वांची हीच परिस्थिती आहे. आणि मी...."
" हेच....हेच तर मला म्हणायचे आहे. तू ऑफिस बांधशील नंतर..मग घर कधी घेशील....गाडी कशी घेशील...पुढचे खर्च कशे manage करशील? आणि केव्हा करशील?" कालपर्यंत माझी व्यावसायिक मजल ठिकठिकाणी पोहोचल्यामुळे माझ्या पाठीवर थाप मारणाऱ्या दादांना अचानक काय झाले हे काही मला कळेना! आणि ह्या गोष्टी मी कधीच विकत घेणार नाही असं देखील नव्हत. मी थोडक्यात समाधान मानणारा असतो तर एके दिवशी भारताबाहेर यात्रा काढीन असं ठरवलं तरी असतं का?
" दादा.....माझं ऐका. ती वेळ येईल. सध्याची परिस्थिती बघता थोडी उशिरा येईल...पण येईल...मी प्रयत्न करतो आहेच...आणि हे तुम्हाला देखील माहिती आहे ना! आता अनुष्काचे पण MBA झाले आहे. ती पण नोकरी करत आहे. काही वर्षात तिची पण growth होईलच. आम्ही दोघे मिळून संसार करू. माझा तर customer base पण तयार आहे....फक्त आताची एक phase आहे...."
" ती MBA आहे रे...पण तुझे काय? तू तर graduate आहेस. म्हणजे तिच्यापेक्षा एक डिग्री कमी. असं कसं चालेल. उद्या लोकांनी विचारले तर आम्ही काय सांगायचे? मुलगा फक्त graduate आहे?"
" अहो पण दादा! माझा travel and tourism चा बिझिनेस आहे. त्यात मी MBA करून कसं चालेल....त्यापेक्षा परदेशी भाषा शिकून माझा पुढे समृद्ध होण्याचा विचार आहे. पुढे शिकणार नाही असं नाही....पण जे उपयोगाचे आहे...तेच शिकायचे आहे मला... "
" पुढे कुणी बघितलं आहे? आमच्याकडे जे स्थळ चालून आलंय त्यात आम्हाला ह्या त्रुटी दिसत नाहीत. त्याला चांगला पगार आहे....शिवाय पुण्यात मोठे घर आहे. पगार चांगला असल्यामुळे अजून एक घर घेण्याचा मनसुबा आहे...गाडी आहे." ( चालून कसलं आलंय स्थळ...मावशीने तर सुचवलं आहे....मला काय माहिती नाही काय?)
" काय करतो तो?" मला माहिती असूनसुद्धा मी विचारले. " पुण्यात जोमेट्रिक सोफ्टवेर मध्ये कामाला आहे", दादांनी सांगितले. " म्हणजे दुसऱ्यांची कामं करणारच ना?" मी दादांना दोन मिनिटांसाठी त्यांचच तत्वांनी का होईना मात दिली होती. पण शेवटी काकू त्यांच्या मदतीला आल्या.
" दुसऱ्यांची कामं करतो का नाही तो आमचा प्रश्न आहे. पण मिळणाऱ्या पैशात तो अनुष्काला सुखी ठेवू शकेल ही आम्हाला खात्री आहे." आम्ही पै पै साठवले आणि संसार पुढे नेला असं म्हणणाऱ्या काकूंनीच जेव्हा हा पवित्रा घेतला तेव्हा मला पुढे काहीच बोलवेना. मी काहीही न बोलता परत घरी आलो. रात्री अनुष्काला फोन लावला. सुदैवाने फोन तिच्याकडे होता. झाला प्रकार तिला माहिती होताच. पण मी पुन्हा सांगितला. मला शांत करत ती पुढे बोलू लागली. तिच्या आवाजात एक वेगळाच खंबीरपणा होता त्या दिवशी. " हे बघ. आपण खूप स्वप्नाळू असतो. प्रेमात पडताना आपल्याला नाही समजत की आपण पुढे काय करणार आहोत. पण पुढे विचार केला की हेच समजतं की लग्न करणं इतका सोपं नाही. त्यात पुढे खूप गोष्टी plan कराव्या लागतात. आपल्या ह्या rate ने आपण settle कधी होणार? ह्याचा तू विचार केला आहेस का? मी तरी विचार नव्हता केला. पण चालू परिस्थिती जगत राहिलो तर मला नाही वाटत आपण settle होऊ. कारण हे बघ, प्रेम वगेरे त्या ५० वर्षांपूर्वीच्या concepts आता नाही राहिल्या. आता आपल्याला जास्त practical होण्याची गरज आहे. मला माझ्या बाबांचे बोलणे पटले आहे. आणि हीच practical गोष्ट मानून मी तुला सांगते मला विसरून जा. आपण पुढे एकत्र नाही राहू शकत......"
मी केलेले सारे विचार व्यर्थ होते. घेतलेला प्रत्येक निर्णय तिच्याशी share केल्याच्या आठवणी मात्र मनात होत्या. मी माझे ऑफिस बांधण्यासाठी बाजूला ठेवलेली रक्कम व्यर्थ? तिच्या इच्छेने लग्न व्हावे म्हणून साठवून ठेवलेले पैसे व्यर्थ? पुढे हिला बरोबर घेऊन सारे जग फिरुया....समृद्ध होऊया...असे केलेले विचार व्यर्थ? सतत हिला, हिच्या आई-वडिलांना समोर ठेवून घेतलेले निर्णय व्यर्थ? उगीच माय्क्रोबायोला admission घेतली. गेलो असतो १२ वी नंतर I.T ला आणि झालो असतो इंजिनिअर. काय ते काम केले असते आणि मिळवला असता लठ्ठ पगार! माझ्याही मागे मुली आल्या असत्या...नव्हे...मुलीचे बाप आले असते! मुलीचा बाप खरच एक अजब व्यक्तिमत्व आहे. मुलीचे लग्न होईपर्यंत बाळगलेली तत्व एकदम शिथिल करणारा आणि त्याला 'practical'पणा ह्याचे गोड कवच बांधून मिरवणारा एक दुष्ट प्राणी! आणि मुली काय वेगळ्या असतात? त्या पण तसल्याच. शेवटी त्यांना घरच्यांचेच ऐकावे लागते. बिघडलेली मुलं सोडा. पण ह्या जगात जो मुलगा इमानदारीत प्रेम करतो..आणि खरोखर कुणाच्यात 'involve ' होतो त्याला स्वतःला सावरून घ्यायला खूप वेळ लागतो. मुलींचं तसं नसतं. त्या पाण्यासारख्या असतात. ज्या रंगात मिसळतात त्या रंगाच्या होऊन जातात.
अनुष्का आता पुण्यात असते. ती तिच्या नवऱ्याबरोबर खुश आहे हे माझ्या मित्राकडून समजलं. रोज तो तिला गाडीने ऑफिसला सोडतो. मग तो स्वतः ऑफिसला जातो. संध्याकाळी pick - up ' करायला देखील येतो. विकेंडला अस्सल पुणेरी लोकांप्रमाणे हॉटेल मध्ये जेवण होतं. अमेरिकन कंपन्या खूप दयाळू आहेत. त्याच्याकडून भरपूर काम करून घेतलं तरी पैसे देखील तितकेच देतात. भरपूर! हे सगळं मी देऊ शकलो असतो का? नक्कीच नाही!
काही महिन्यांनी काश्मीरला यात्रा नेली होती. शिकारयात बसले होतो सगळे. काश्मिरी संतूरचा आस्वाद घेत असल्यामुळे लोक पण खुश होते. तेवढ्यात दोन गृहस्थ ( जे माझ्या बरोबरच आले होते) बोलताना मी ऐकलं. दोघेही software मधले आहेत हे काही क्षणातच मला कळले. " च्यायला...महागाई वगेरे ठीक आहे...पण रुपये आणि डॉलरचा दूरचाच संबंध बरा ...५६ रुपये डॉलर ....पगार चांगला मिळतोय. उगीच देशाच्या सुधारणेने डॉलर यायचा ४६ वर आणि आपले वांदे होयचे! जागतिक अर्थकारणामुळे माझ्यासारख्या सामान्य माणसावर किती 'खोलवर'चा परिणाम झाला आहे हे माझ्या लक्षात आले आणि किंचित हसून मी वाजत असलेल्या संतूरला दाद देऊ लागलो!

- आशय गुणे

भाग १ - http://www.maayboli.com/node/35339

माझे इतर लेख: http://relatingtheunrelated.blogspot.in/
http://www.innercirclemates.com/

गुलमोहर: 

आशयगुणे,

दोन्ही भाग वाचले. कथा चांगली खुलवली आहे. मानवी स्वभावाचे कंगोरे पुरेशा स्पष्टपणे व्यक्त झालेत.

लेखकाला वाटतं तसा आधार त्याला अनुष्काकडून कधीच मिळाला नसता. तिच्याशी लग्न न झाल्याबद्दल लेखकाने स्वत:ला भाग्यवान समजलं पाहिजे. दादांचं एक वेळ आपण समजू शकतो. ते वधूपिता आहेत. मात्र अनुष्काचं पाठ फिरवणं अनाकलनीय आहे. ज्या मुलीचे विचार एव्हढ्या कमी कालावधीत दोलायमान होतात ती विश्वासार्ह नाही. शिवाय लग्न हौसेने झालं पाहिजे असा आग्रह कायम आहेच तिचा.

नवरा वा बायको धंद्यात असेल तर पैशाच्या पलीकडलं आजून काहीतरी बघायला लागतं. ते बघता आलं नाही तर जोडीदाराने ते दाखवायला लागतं. निदान तसा प्रामाणिक प्रयत्न तरी करावा लागतो. ते काहीतरी बघण्याचं कसब अनुष्काकडे नाही. आणि मुख्य म्हणजे ते काहीतरी नक्की काय आहे हे जाणून घेण्यातही तिला रस नाही.

सबब बालंबाल बचावल्याबद्दल लेखकाचं अभिनंदन! Happy

आ.न.,
-गा.पै.

मुलीचे लग्न होईपर्यंत बाळगलेली तत्व एकदम शिथिल करणारा आणि त्याला 'practical'पणा ह्याचे गोड कवच बांधून मिरवणारा एक दुष्ट प्राणी.
>>
काही मुली स्वतःच अशा बाजारात कशा विकल्या जातात देव जाणे. गोष्ट माहितीतली खरी आहे का?

तुमच्या दिलखुलास प्रतिक्रियांबद्दल तुमचा आभारी आहे. Happy मला ह्या प्रतिक्रिया अजून पुढे लिहायला नक्कीच प्रोत्साहित करतील. Happy
सहज सांगावेसे वाटते:
प्रस्तुत कथा ही मुलींच्या विरोधात वगेरे लिहिलेली नाही. फक्त स्थळ बघताना वापरले गेलेले typical निकष मला दाखवून द्यायचे आहेत....माझ्या वयाच्या मुलांमध्ये हल्ली बोलले जाणारे विषय, settlement चे टेन्शन ( इंजिनिअर नसल्यामुळे अधिक!) , एकंदर मुलाकडून प्रचंड अपेक्षा (घर आणि गाडी असल्याची) + माझ्या एक, दोन मित्रांचे अनुभव = ही कथा.
आता ही मुलाच्या बाजूने विचार केलेली असल्यामुळे त्यात काही वाक्य आली आहेत....माझ्या इतर लेखांमध्ये मी मुलीच्या बाजूनेही विचार केला आहे! Happy

ह्म्म्म वास्तविक पहाता कोणतीही लग्नाळू मुलगी आणि तिचे आईबाप यांना असेच वाटत असते की आधीपासुनच मुलाची परिस्थिती एकदमच ओके असावी म्हणजे मुलीला फार सुखात रहाता येईल. ही अपेक्षा चूक आहे असे तरी कसे म्हणणार आणि पुर्णपणे बरोबर आहे असेही म्हणवत नाहीये. Sad

अनघा, सावली : धन्यवाद!
महेश: संभ्रम तर आहेच. पण मला मांडायचा मुद्दा जरा वेगळा आहे. प्रस्तुत लेखात मुलाची परिस्थिती अगदीच वाईट नव्हती. तो स्वतःच्या पायावर उभा आहे. झगडतो आहे. आणि त्याच्या जबाबदारीची जाणीव त्याला आहे. शिवाय व्यासंगी आहे...फरक इतकाच आहे...त्याला 'start ' तेवढा नाही जेवढा एका 'software engineer ' ला असतो. आणि त्यांना लठ्ठ पगार हा डॉलर-रुपये किमतीमुळे असतो ही वस्तुस्थिती आहे. मला कुणाच्याही विरोधात बोलायचे नाही...कुठल्याही 'profession ' च्या तर नाहीच नाही. पण 'non - engineers ' ना सुरुवातीलाच लठ्ठ पगार नसल्यामुळे ह्या परिस्थितीला सामोरे जायला लागू शकते! Happy Sad

महेश | 31 May, 2012 - 23:18
ह्म्म्म वास्तविक पहाता कोणतीही लग्नाळू मुलगी आणि तिचे आईबाप यांना असेच वाटत असते की आधीपासुनच मुलाची परिस्थिती एकदमच ओके असावी म्हणजे मुलीला फार सुखात रहाता येईल. ही अपेक्षा चूक आहे असे तरी कसे म्हणणार आणि पुर्णपणे बरोबर आहे असेही म्हणवत नाहीये.

>>

महेश ही अपेक्षा चुकच आहे आणि माझ्या दोन्ही मुलींची लग्ने करायची वेळ येइल तेव्हा मी तरी ही निग्रहाने टाळीन. आम्ही शाळेत असताना आमच्यापैकी काही मैत्रिणींची अशीच प्रकरणे होती पण त्यातिल एकीनेच असे धाडस दाखविले. तिचे वडिल दुबईला होते आणि पार्ल्यात ५ रुमचा फ्लॅट होता. तिने ज्याच्यशी प्रेम आणि लग्न केले त्याच्यापेक्षा शिक्षण (१०, १२ मेरिट लिस्ट व्हॉलीबॉल स्टेट टीम आता डेन्टल सर्जन ) , या सर्व बाबतीत ती हुशार होती. लग्न तिने चाळीत रहाणार्या मुलाशी केले. आता तो गेमिंग टेक्नॉलोजीत आहे आणि स्वतःची छोटी कंम्पनी चालवतो.
मुलगा नेकीचा / कष्टाळु आहे आणि स्वभाव चांगला आहे हे पहाणे ठीक. एकवेळ शिक्षण पण पहा.
पण मुलगी नेहेमी शक्य तेव्हढ्या श्रीमंत घरात द्यायची आणि सुन धाकात रहावी म्हणुन गरीब घरची (आणि स्वभावाची) आणायची हे योग्य का?
अमिर च्या कार्यक्रमात सांगितले नाही पण अशी विचारसरणी ही शिकलेल्या लोकातच जास्त असते आणि या हव्यासापाइ बरेच लग्नखर्च हुंडा प्रकार चालु रहातात. अमेरिकेत आल्यावर हा फरक मला लगेच आणि फारच जाणवला कारण त्याकाळात घरुन अशीच स्थळे येत असत पण माझ्या इकडच्या जवळ जवळ सर्व (मोठ्या प्रमाणावर)अमेरिकन मैत्रिणी नवर्यापेक्षा जास्त शिकलेल्या आणि चांगल्या हुद्यावर असत.
सासु सासर्यांचा लोभीपणा सिद्ध करण्या अगोदर आपल्या आई वडिलांना पण फटकारले पाहिजे. याउलट मुलगा ताब्यात रहावा म्हणुन त्याला शक्यतो गरीब घरची आणि गरीब स्वभावाची मुलगी आणायची म्हण्जे तिला पण घालुन पाडुन बोलायला आणि तोरा मिरवायला मोकळे.
माझी एक मैत्रिण गायनॅक तिचा अगदी शाळेपासुन बॉयफ्रेंड होता. फक्त आई आणि मुलगा (वडिल नव्हते) अत्यंत देखणा, उंच. त्याने Msc केले पण हिच्या घरचाना ते पसन्त नाही. तिचे लग्न लाउन दिले. मुलाचे
क्वालिफिकेशन काय तर सासर्याचे हॉस्पिटल आहे. मुलगा चक्क टकलु होता (आता माझा नवरा पण होतोय Happy म्हणुन मी टक्कल विरोधी नाही पण सांगायचे हे की नक्की तिची पहिली पसंद नव्हती) पण डोनेशन देउन का होइना डॉक्टर झाला होता. ही एक केस नाही तर शिक्षित समाजात हे एकदम नॉर्मल आहे. तुम्हाला पण अशी माणसे माहित असतील. (माझे आई वडिल पण याला अपवाद नाहित). जर आपण सर्वत्र लग्नासारख्या पवित्र गोष्टीचा व्यवहार का करायचा म्हणतो तर या गोष्टी मुळापासुन टाळल्या पाहिजेत.
पैसे देउन मुलगा विकत घ्यायला वधुपित्यानी पुर्ण नकार द्यावा. सुन ही केवळ धाकात ठेवण्याची व्यक्ती नसुन माया लावायला मुलगी मिळाली आहे हे सासु, सासर्याने लक्षात घ्यावे तरच समाज बदलेल.
शेवटी काय समाजात मुलीचे प्रश्ण, मुलाचे प्रश्ण असे वेगळे नसते तर समाजाचे प्रश्ण असतात. केंव्हा कळणार.
अगदी खुपच आर्थिक तफावत असेल अशा गरिब मुलाशी लग्न लाउन द्या असे म्हणत नाही मी पण जर बर्याच मध्यमवर्गातील मुले मुली (आणि त्यांचे पालक) आपल्या आजुबाजुला पण बघतील आणि आपल्या समान परिस्थितील पार्टनर निवडतील तर बरेच प्रश्ण एकदम नाहिसे झाले नाहित तरी कमी तरी होतिल.

Godey , मवा, स्वाती२ - धन्यवाद! Happy
निलिमा : तुमच्या प्रतिक्रियेतून बरेच काही शिकायला मिळेल आम्हाला! धन्यवाद! Happy