नित्याचे वादी-संवादी

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

नित्याचे वादी-संवादी
आशिष महाबळ
LAMAL, 14 April 2012
विषय: संवाद

नचिकेत: आई, नचिकेत बोलतोय.
नचिकेत: का ग? पेशंटला पहायला जाते आहेस का?
नचिकेत: शिव मंदिरात? अर्ध्या तासाने करतो मग.
नचिकेत: अरे वा, कोणता मोबाईल?
नचिकेत: सांग.
नचिकेत: ठिक, करतो लगेच त्यावर.
...
नचिकेत: हं, बोल आता.
नचिकेत: तुला नकाशे वाला हवा होता ना पण?
नचिकेत: तरीही जुनाटच की!
नचिकेत: माझा? ड्रुड नाही, ड्युड, ड्रॉइड.
नचिकेत: तुसड्यासारखा बोलत नाही, सवय करतो आहे.
नचिकेत: तुसडे बोलण्याची नाही ग, तिखट संवादाची. संवाद कसे लिहायचे, किंवा खरेतर कसे लिहायचे नाहीत यावर आत्ताच एक भाषण ऐकून येतो आहे.
नचिकेत: कुणामधले संवाद असा फरक करायची गरज नसते, कुणाही दोन व्यक्तिंमधील संभाषण काही ठरावीक प्रकारांमधे मांडता येते म्हणे.
नचिकेत: आपला संवाद? म्हणून तर तुला खोडू पहात होतो.
नचिकेत: समोरच्याच्या 'हो'त हो मिळवला तर संवाद मुळमुळीत होतो.
नचिकेत: लग्गेच 'काहितरीच' म्हणालीस, जमले की तुला!
नचिकेत: आईवडील म्हणणारच की संवादासाठी वेव्हलेंग्थ जुळायला हवी, एकवाच्यता हवी वगैरे, पण त्यांना हे तेंव्हाच सुचते जेंव्हा त्यांचे पाल्याशी वाजले असते.
नचिकेत: वाट्टेल तितकी देता येतील उदाहरणे. या वादातुनच संवादाची निर्मिती होते. जग संगितमय होते.
नचिकेत: संगीतावर कसा घसरलो? संवादाला अशी कलाटणी देणे हे पण एक महत्वाचे हत्यार आहे. पण मला असे सांगायचे होते की संगीतातील वादी आणि संवादी पण याच प्रकारात मोडतात, आपल्या मनात तणाव निर्माण करतात आणि त्याच्या resolution करता आपण तन्मयतेने ऐकत राहतो.
नचिकेत: त्याची देईनच उदाहरणे पण त्याही वर एक मजला चढून असे म्हणता येईल की विज्ञान आणि समाज एका टॅंगोमय संगितीकेत रममाण असतात.
नचिकेत: नाही ग, म्हणजे त्यांच्यातही टेन्शन असते. विज्ञान हा समाजाचाच भाग, पण एकप्रकारे एका टोकाशी असलेला. समाजोपयोगी गोष्टींचे शोध लावले जात असतात पण जगाला पुढे नेण्याकरता अनेक शास्त्रज्ञ अनेक प्रयोग करत असतात. यातील बहुतांश फसतात पण प्रत्येक नवा शोध आपल्या तोकड्या ज्ञानात भर घालतो.
नचिकेत: मी? मी समाजशास्त्रज्ञ आहे. आम्ही लोकांबद्दल विचार करतो.
नचिकेत: मनानी तरी कशाला गाभाऱ्यात येऊ? तु जाऊन ये आत, बाहेर आलीस की बोलु पुन्हा.

नचिकेत: झाले दर्शन? हं, तर काय म्हणत होतो मी? राईट, गायक गुरु बदलतात तसे शास्त्रज्ञ पण कधिकधि त्यांचे क्षेत्र बदलतात. भलत्याच क्षेत्रात घुसलेल्या वैज्ञानिकांवर अजाणतेपणी तुझ्यासकट अनेक लोक विश्वास ठेवतात म्हणुन हे आठवले. जेष्ठ पण वयस्कर शास्त्रज्ञांबद्दल आर्थर सी. क्लर्कचे एक मस्त वाक्य आहे.
नचिकेत: हो, तो श्रिलंकावालाच - बरे लक्षात राहीले तुझ्या.
नचिकेत: तर तो म्हणतो: 'जर एखादा जेष्ठ पण वयस्कर वैज्ञानिक एखादी गोष्ट शक्य आहे असे म्हणाला तर तो हमखास बरोबर असतो. पण तेच जर त्याने एखादी गोष्ट अशक्य आहे असे म्हंटले तर मात्र तो बहुदा चूक असतो'.
नचिकेत:'ती' वैज्ञानिक असे का म्हंटले नाही? अगं, हे १९६२ चे आहे.
नचिकेत: उदाहरण? उदाहरण रुदरफोर्डचे देता येई. अणूची संरचना समजण्याकरता त्याचे संशोधन लाखमोलाचे होते. पण अणुशक्तिचा उपयोग करता येऊ शकेल हे मानायची त्याची अजीबात तयारी नव्हती.
नचिकेत: तु असे भलतेच मत बनवणार हे मला माहीत होते म्हणुन तर हा खटाटोप करतो आहे. आणि नाही, वैज्ञानिकांना त्यांच्या क्षेत्राबाहेरील समजत नाही असे नाही.
नचिकेत: क्लार्कचे बरोबरच आहे, पण त्याला एक उपसुत्र आहे.
नचिकेत: मनुस्मृती? ही उपसुत्रे त्या उपसुत्रांप्रमाणे नाहीत. खरेतर एकच उपसुत्र आहे, आसिमोव्हने १९७७ साली मांडलेले.
नचिकेत: तुला त्याचेही नाव आठवले? फॉर्मात आहेस आज.
नचिकेत: मी पारायणे करायचो म्हणुन? आहेच तर तो माझा आवडता विज्ञानकथा लेखक, पण तो विज्ञानावरही लिहायचा. क्लार्कच्या सुत्राप्रमाणेच त्याचेही उपसुत्र विज्ञानकथेमधील नाही.
नचिकेत: तु फाटे नाही फोडले तर मी सांगणार ना?
नचिकेत: क्लार्कच्या सुत्राचा उतरार्ध घेऊन आसिमोव्ह म्हणतो: 'जर एखाद्या जेष्ठ पण वयस्कर वैज्ञानिकाने एखादी गोष्ट अशक्य आहे असे म्हंटले तर तो बहुदा चूक असतो. पण जर आम जनता उत्साहाने आणि भावनिकतेने त्या गोष्टीला उचलून धरत असेल, तर मात्र तो जेष्ठ आणि वयस्कर शास्त्रज्ञ बरोबर असायचीच शक्यता अधिक.'
नचिकेत: आमची गाडी काय घसरणार? सारा समाजच उतरंडीला लागला आहे, आमच्या गाडीचाही रस्ता समाजाला बांधलेलाच आहे.
नचिकेत: नवीन बोलू? २०१२ चेच घे. जग नष्ट होणार नाही असे वैज्ञानिकांनी सांगीतले तरी खूप लोक ते नष्ट होणारच असे मानतात.
नचिकेत: तु नाही मानत? अभिनंदन. पण शिव घडवून आणणार आहे त्या प्रलयाचे काय? तुझ्या बोटांमधील ग्रहांच्या अंगठ्यांचे काय? वैज्ञानिक तर त्याही बद्दल नाहीच म्हणतात ना?
नचिकेत: बाकी धर्माचे लोक का मानतात? पण सगळे वेगळ्या गोष्टी मानतात. त्या वरूनच नको का कळायला की त्यातील काहीच सत्य नाही. मृत्यु कुणालाच चुकत नाही. म्हणुनच स्वर्ग, पुनर्जन्म अशा पळवाटा लोक काढतात आणि इतर लोक त्यावर विश्वास ठेवतात.
नचिकेत: पोचलीस ध्येयाला? आवरतो मी माझी जीभ मग, तु ही तुझ्या पेशंट्सचे तोंड गोड कर.
---------------
* Clarke's law was proposed by Arthur C. Clarke in the essay "Hazards of Prophecy: The Failure of Imagination", in Profiles of the Future (1962).
** Asimov's corollary: https://groups.google.com/group/rec.arts.sf.misc/msg/e4185210a85826fc?hl...

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

पण जर आम जनता उत्साहाने आणि भावनिकतेने त्या गोष्टीला उचलून धरत असेल, तर मात्र तो जेष्ठ आणि वयस्कर शास्त्रज्ञ बरोबर असायचीच शक्यता अधिक.'>>> हम्म्म, ग्लोबल वॉर्मिंगच्या भाकितांना हे उपसूत्र लागू पडेल!
लेखाची शैली झकास!

Happy

धन्यवाद.

थोडे प्रश्न जरा जास्त झाले आहेत असे वातते, खास करुन शेवटी. ते कसे कमी करता येतील त्याचा विचार करायला हवा ...