मी वटवाघूळ का होतो , फांदीला झोके घेतो

Submitted by Kiran.. on 22 March, 2012 - 23:09

सांगलीचा धगधगता निखारा नागनाथ अण्णा नायकवडी गेल्याची बातमी ऐकली. संपूर्ण आयुष्य झोकून देऊन संघर्ष केलेली अशी व्यक्तिमत्त्वं पाहिली कि त्यांच्यासारख्यांच्या जीवावर स्वातंत्र्य उपभोगणा-या अंगास तोशीस लावून न घेता चर्चा, वादविवादात डुंबणा-या माझ्या सुरक्षित आयुष्याची शरम वाटल्याशिवाय राहत नाही..
क्रांतिसिंह नागनाथ अण्णांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !
__________________________________________

मी वटवाघूळ का होतो
फांदीला झोके घेतो
मी कोषामध्ये जातो,
मी डबक्यामध्ये जगतो

म्हमईत फिरती गोरे
मागूनी भिकारी पोरे
नोट दहाची मिळते
फोटोची सोयही होते
आणिक भिकारी जमता
मी कासावीस मग होतो
निषेध, खलिते पत्रे
मटाला लिहीत बसतो
याउप्पर माझे काही
डोकेही चालत नसते
अंगाला लावून घ्यावे
ही तयारीही नसते

मग डबक्यामध्ये येतो
मी कोषामध्ये जातो
मी वटवाधूळ का होतो
फांदीला झोके घेतो...

ही मॅडम गोरी गोरी
मुक्त आजची नारी
ती समारंभातून दिसते
भाषणामधुनी कळते
घराच्या मागे आहे
झोपडीपट्टी मोठी
कुंकवाला प्यारी दारू
गाडा ओढीते जोरू
आणि वरती मारही खाते
हासत कामावर येते
तिची मॅडम गोरी गोरी
लिपस्टिक ल्येऊनी फिरते
मग झोपडपट्टीत येते
कॅमेरा घेवुनी शिरते
कुंकवाला घेरुन तिच्या
कायदाकानू दावते
माईकचे जजमेंट घेते
मेक अप सावरुनि घेते
ब्रेकिंग न्यूजमध्ये येते
मॅडम सुखावुनि जाते

मग नारी मुक्ती संपते
आणि चर्चा चालू होते
अंगाला लावूनि घ्यावे
ही तयारीही नसते

आणि चक्रं चालू -हाते
कुंकवाला दारू गिळते
मी कासावीस मग होतो
निषेध खलिते लिहीतो

मग डबक्यामध्ये येतो
मी कोषामध्ये जातो
मी वटवाधूळ का होतो
फांदीला झोके घेतो...

- किरण

गुलमोहर: 

..

छान कविता प्रस्तावनेसह!

क्रांतिवीर नागनाथ नायकवडी म्हणजे आपल्या आधुनिक इतिहासातील एक धगधगते क्रांतिपर्वच म्हणावे लागेल. स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी बालवयातच आपल्या कोवळ्या मुठीत क्रांतीचा अंगार आणि धगधगता निखारा घेऊन ते घराबाहेर पडले ते घरात पुन्हा पाऊल न ठेवण्याची शपथ घेऊनच.
क्रांतिकारकांच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. कॉम्रेड नाना पाटलांचे शिष्यत्व पत्करले आणि इंग्रजांना हुसकून लावण्यासाठी ते लढत राहिले. इंग्रजांचे खजिने लुटणे, त्यांच्या कार्यालयावर हल्ले करणे, त्यांच्यावर हल्ले करणे अशी जिवावर बेतणारी कृत्ये ते करत राहिले. गांधीजींच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळेल यावर विश्‍वास ठेवणारा एक वर्ग होता, तर क्रांतीच्या मार्गानेच स्वातंत्र्य मिळेल असे समजणाराही एक वर्ग होता. नागनाथअण्णा क्रांतिकारी गटातले. धुळ्याजवळ चिमठाण्याचा खजिना लुटण्यात त्यांचा सहभाग. साताऱ्यात नानांच्या नेतृत्वाखाली जन्माला आलेल्या पत्री सरकारमध्ये त्यांचा सहभाग. पत्री सरकार नावाची गोष्ट जगाच्या पाठीवर कोठेच जन्माला आलेली नसावी. दरोडेखोर पकडा आणि त्यांच्या पायात पत्री ठोका, असा हा प्रकार होता. स्वभावाने धाडसी, करारी, असलेल्या अण्णांनी रस्त्यावर राहून आमने-सामने लढाया केल्या आणि भूमिगत राहूनही. शौर्य, साहस आणि प्रखर देशभक्तीचे प्रतीक म्हणून त्यांना महाराष्ट्र ओळखू लागला. संसारावर तुळशीपत्र ठेवून आणि आई लक्ष्मीबाईची प्रेरणा घेऊन ते लढत राहिले. घरात पाऊल न ठेवण्याची आणि आयुष्य समाजसेवेला अर्पण करण्याची प्रतिज्ञा त्यांनी शेवटपर्यंत पाळली. क्रांतिकारी विचार त्यांनी पर्यावरणात रुजवला. असंख्य कार्यकर्ते तयार केले. वाळवा हे छोटेसे गाव कदाचित असे एकमेव असेल, की तेथील सकाळ भक्तिगीतांनी नव्हे, तर स्फूर्तिगीतांनी, युद्धगीतांनी सुरू व्हायची. समूहाच्या जीवनात वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी अशा लढ्यांच्या प्रेरणा भरल्या होत्या.

क्रांतीसिंह नाना पाटलांबरोबर पत्री सरकार मध्ये महत्वाची भुमिका बजावलेल्या अण्णांना माझी श्रद्धांजली !

सांगलीला नागनाथ अण्णांच्या स्मृतीदिनानिमित्त एक कार्यक्रम झाला. या ही वेळी आपंण उदासीन राहिलो. भगतसिंह, राजगुरू आबि सुखदेव या क्रांतिकारकांचा स्मृतीदिन २३ मार्च, याच दिवसात लागूनच येत असल्याने या दिवसांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

या नायकांना आपण कधीही विसरू शकत नाही.