अंधेर नगरी चौपट राजा

Submitted by जयनीत on 2 October, 2011 - 03:37

अंधेर नगरीत एका महान योगीराजांचे आगमन झाले .

चौपट राजाने त्यांचे अगत्याने स्वागत केले .

योगीराजांना भूत , वर्तमान , भविष्य त्रिकालात सर्वकाही बघू शकण्याची सिद्धी प्राप्त होती .

राजाने त्यांना सन्मानपूर्वक दरबारात विराजित करून आपले भविष्य विचारले .

योगीराज क्षणात समाधिस्थ झाले .

जागृत होऊन त्यांनी राजाच्या कानात सांगितले " हे राजा लवकरच तुझा सर्वनाश अटळ आहे , प्रजा तुझ्या कुशासनाला कंटाळली आहे . तुझ्या दरबारातसुद्धा षडयंत्र शिजत आहे , अनेक लोक तुझे सिंहासन उलथून पाडण्याची स्वप्ने बघत आहेत ."

राजा हादरला .

यथोचित बिदागी घेऊन योगीराज मार्गस्थ झाले .

राजाने त्वरीत सर्व संशयितांना जेरबंद केले , आणि वरुन प्रजेत कुणीही स्वप्ने बघू नये असा हुकुम काढला .

सर्वत्र एकच कल्लोळ माजला .

लहान मुले सगळ्यात जास्त अस्वस्थ झालीत . आभ्यासाचा ताण आणि मोठया लोकांच्या रागवण्या कडे दुर्लक्ष करून सुखस्वप्नात रंगून जाणे हाच मुलांचा एकमात्र विरंगुळा होता .

आता त्यांची सतत चीडचीड अन रडारड सुरु झाली .
त्यांच्या आई बापांना आपली कारटी मोठी होऊन उतारवयात आपला संभाळ करतील अशी स्वप्ने दिसेनात ,
तेही निराश झाले .

म्हाता-या , कोता-यांची आयुष्यात एकदा तरी तीर्थयात्रा ( काशी , रामेश्वर अथवा युरोप , अमेरिका काळानुरूप ) घडण्याचे स्वप्न नष्टं झाले .

ती आता नवीन पिढीच्या नावाने कडाकडा बोटे मोडून उरलेले दिवस कंठू लागली .

निम्नवर्गीयांचे मध्यमवर्गीय होण्याचे मध्यमवर्गीयांचे उच्चवर्गीय होण्याचे आणि उच्चवर्गीयांचे निरंकुश सत्ता प्राप्त करण्याचे स्वप्न भंगले .

सर्वात खालची बहुसंख्य निर्धन प्रजा तर अनादीकाळा पासून आपल्याला नाही तर आपल्या मुलाबाळांना तरी कधी पोटभर जेवण मिळेल ह्या स्वप्नाच्या भरवश्यावर पिढयानपिढया अर्धपोटी जगुन मरून जात होती .

त्यांचा तर शेवटचा आधारही खुंटला .

सर्वत्र हाहाकार उडाला .

विदेशी शक्ती तर असल्या संधीची वाट पहात टपून बसलेल्या होत्याच .

शत्रूराष्ट्राचे आक्रमण झाले .

चौपट राजाचा पाडाव करून त्याला कठोर शासन करण्यात आले .

नवीन राजाने राज्यरोहणा नंतर लगेच स्वप्ने बघण्या वरची बंदी उठवली .

तो तर स्वत:च पुढाकार घेउन प्रजेला मोठमोठी स्वप्ने दाखवू लागला .

लवकरच सर्वकाही सुरळीत झाले .

दाहक वास्तवाची जाणीव कमी कमी होउ लागली .

प्रजा पुन्हा स्वप्नात तरंगू लागली .

नवीन राजानेच नव्हे तर त्याच्या घराण्यानेही चिरकाल सुखनैव राज्य केले .

( समाप्त )

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

न कळायला काय झालं?? Proud ... जनतेला स्वतःच्या मर्जीप्रमाणे स्वप्ने बघू देणारे सरकार हवे असते... मग ते सरकार चालवणारे विदेशी इटलीचे का असेनात, जन्तेला ते चालते!! एवढा सोपा अर्थ तर आहे ! Proud

Proud

जबरदस्त जयनीत जबरदस्त!
जेंव्हा देशात एखाद्याला प्रगतीची स्वप्ने बघणेही अशक्य होते तेंव्हा राज्यकर्त्यांचा नाश अटळ असतो.
लोकांना सतत आशा दाखविणे ही जुलमी राजवटीचीही गरज आहे. हेच आता मध्यपुर्वेत वसंत येण्यास कारणीभुत झाले.