अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम : लेखांक - २

Submitted by अभय आर्वीकर on 20 August, 2011 - 00:19

अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम - लेखांक - २

                              भ्रष्टाचाराचा मुद्दा आता व्यापक प्रमाणावर ऐरणीवर आला असला तरी माणसाची भ्रष्टाचारी वृत्ती आता इतक्यातच किंवा गेल्या काही वर्षातच जन्माला आलेली नाही. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचार अस्तित्वातच नव्हता असेही समजण्याचे कारण नाही. आमचे पूर्वज अत्यंत चारित्र्यवान होते, असे जर कोणी सांगत असेल तर ती सुद्धा लबाडी आहे कारण आर्थिक भ्रष्टाचार हा मनुष्य जातीच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून किंवा मनुष्य जातीच्या जन्माच्या आधीपासूनच अस्तित्वात होता, याचे पुरावे आहेत. देवदेवता लाचखोरीच्या मूर्तिमंत उदाहरण आहेत. एखादा शासकीय अधिकारी स्वतःची नैतिकमुल्ये जपण्यासाठी एक छदामही न घेता जनतेची कामे करतो, असे दृश्य तुरळक असले तरी दुर्मिळ नाही. मात्र बिना धूप-दीप-आरतीशिवाय प्रसन्न होणारी देवता सापडणे कठीण आहे. एखाद्याजवळ देवाला देण्यासारखे काहीच नसेल, अगदी फूल-अगरबत्तीही देण्याची परिस्थिती नसेल तर निदान भक्तिभाव तरी अर्पण करावाच लागतो, त्याशिवाय देव काही प्रसन्न होत नाही.

                         काही देवतांना प्रसन्न करण्यासाठी कोंबडी, बकरी किंवा डुक्कर यासारख्या प्राण्यांचा बळी देऊन नैवेद्य दाखवावा लागतो. त्यातल्या त्यात काही देवता तर फारच अडेलतट्टू असतात. नरबळीखेरीज त्यांना दुसरे काहीच चालत नाही. देवतांची कृपादृष्टी हवी असेल तर त्यांना हे सगळे द्यावेच लागते. नाही दिले तर त्या प्रसन्न होत नाहीत आणि याचकाचे कल्याणसुद्धा करत नाहीत. मात्र या तर्‍हेच्या देवता पुजा अर्चना न केल्यास प्रसन्न होत नाही पण याचकाचे निष्कारण वाईटही करत नाही. अशा तर्‍हेच्या "प्रसन्न किंवा मंगळ देवता" या वर्गवारीत मोडणार्‍या देवतांचे गणित साधेसुधे असते. त्यांचे भक्तांना एकच सांगणे असते "आशीर्वाद हवा असेल तर खिसा सैल करा, नाही तर हवा खा." 

                             मात्र काही देवता वेगळ्याच म्हणजे "ओंगळ किंवा अमंगळ देवता" या वर्गवारीत मोडणार्‍या असतात. अशा देवतांचे स्वरूप फारच वेगळे असते. इथे याचकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याला किंवा मर्जीला अजिबात स्थान नसते. ठरल्याप्रमाणे वर्षातून एकदा तरी त्यांची पुजा करावीच लागते. दहीभात, मलिंदा, कोंबडी, बकरी यापैकी काहीना काहीतरी त्यांना द्यावेच लागते. नाहीतर त्या कोपतात. अशा देवतांना समाजही खूप घाबरतो. कारण या ओंगळ देवतांचा जर क्रोध अनावर झाला आणि त्या कोपल्या तर घरातल्या व्यक्ती आजारी पडणे किंवा मरणे, नैसर्गिक प्रकोप होणे, रोगराई येणे अशा तर्‍हेची संकटे येतील, अशी भिती त्यांच्या मनात दबा धरून बसलेली असते. देव आहे की नाही, तो प्रसन्न होतो की नाही, असा हा मुद्दा नाही पण पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीमध्ये अशाच तर्‍हेने समाजाची उत्क्रांती झाली असल्याने लाचखोरी आणि भ्रष्टाचार मनुष्यजातीच्या रक्तात पुरेपूर भिनलेला आहे, हे महत्त्वाचे आहे. 

                            निसर्गाने किंवा देवाने जेव्हा माणूस घडविला तेव्हा एक भलीमोठी मेख मारून ठेवलेली आहे. माणसाव्यतिरिक्त इतर सर्व प्राण्यांना स्वबळावर जगण्यासाठी काहीना काहीतरी असा एक शारीरिक विशेष गूण किंवा अवयव दिले आहे की त्यामुळे त्याला स्वसामर्थ्यावर जगता येऊ शकेल. जसे की वाघ-सिंहाला तीक्ष्ण नखे आणि दात, हरणाला पळण्याचा प्रचंड वेग, हत्तीला शक्तिशाली सोंड, सापाला विष, जिराफाला उंच मान, काही प्राण्यांना झाडावर चढण्यायोग्य शरीररचना, मगरीला पाण्यात पोहण्यासाठी खवले, पक्षांना आकाशात उडण्यासाठी पंख वगैरे वगैरे. त्यामुळे त्या-त्या पक्षी-प्राण्यांना कुठलाही भ्रष्टाचार न करता जगणे सोयीचे झाले. त्यांना निसर्गाकडूनच स्वतःचे जीवन जगण्याचे हत्यार आणि ते वापरण्याचे कौशल्य मिळाले असल्याने त्यांना त्यांचे आचरण भ्रष्ट करण्याची गरजच भासत नाही. एका सावध प्राण्याने दुसर्‍या बेसावध प्राण्याची शिकार केली तर त्याला खून किंवा प्राणीहत्या मानली जात नाही आणी त्यांना निसर्गानेच तशी मुभा दिली असल्याने ते कायद्याचे उल्लंघनही ठरत नाही. म्हणूनच प्राण्यांना पाप-पुण्याच्या कसोट्याही लागू होत नाही. 

                       मात्र निसर्गाने माणसाला असा कोणताच अवयव दिलेला नाही की तो त्याच्या साहाय्याने स्वतःची शिकार स्वतःच मिळवून आपले पोट भरू शकेल. माणसाला देवाने वाघासारखे तीक्ष्ण नख, हत्तीसारखे दात किंवा सोंड, मगरीसारखी प्रचंड ताकद यापैकी जरी काहीही दिले नसले तरी त्याऐवजी बुद्धिसामर्थ्य दिले आहे. बुद्धिसामर्थ्य देताना बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे स्वातंत्र्य सुद्धा देऊन टाकले आहे आणि इथेच खरी मेख आहे. बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे व्यक्तीनिहायस्वातंत्र्य हेच मानवजातीच्या संबंध वर्तनाचे आणि गैरवर्तनाचे कारण ठरले आहे. मनुष्याने बुद्धीचा वापर कसा करावा याचे नियंत्रण जर मनुष्याऐवजी निसर्गाच्या स्वाधीन असते तर माणुसकी, सज्जनता, नैतिकता यांच्या व्याख्या करून त्याचा जाणीवपूर्वक अंगिकार करण्याची गरजच भासली नसती. तसेच माणसाने नीतिनियमाने वागावे म्हणून कायदे करण्याची गरजच भासली नसती. माणसाचे आचरण निसर्गाने नेमून दिलेल्या चौकटीतच राहिले असते. 

                           माणसाच्या वर्तणुकीचे नियमन निसर्ग करत नसल्याने व आपापल्या बुद्धीचा वापर कसा करावा याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा असल्याने मानवीजीवाच्या व्यक्तीगत हालचालींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक मानवी जीवांच्या समुच्चयातूनच समाज बनत असल्याने प्रत्येक मानवी जीवाने व्यक्तीगत पातळीवर समाजाला पोषक हालचाली करणे म्हणजे नैतिकता आणि समाजाला नुकसान पोहचेल अशी हालचाल करणे म्हणजेच अनैतिकता, अशी एक ढोबळमानाने व्याख्या तयार झाली असावी. समाजरचना ही परिवर्तनशील असल्याने मग नैतिकतेच्या व्याख्याही त्यानुरूप बदलत गेल्या असाव्यात. 

                            एखाद्या व्यक्तीने केलेले वर्तन जर उर्वरित समाजासाठी व एकंदरीत समाजाच्या उत्क्रांतीच्या दिशा ठरण्यासाठी अहितकारक ठरत असेल तर त्याचे ते वर्तन गैरवर्तन ठरत असते. या गैरवर्तनाचेच दुसरे नाव भ्रष्टाचार असे आहे. मोह आणि स्वार्थ हा सजीवांचा स्थायीभाव असल्याने आणि मनुष्य प्राण्याच्या बाबतीत ज्याचा निर्णय त्यानेच घ्यायचा असल्याने, जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे लपतछपत चौर्य कर्म करून, घेता येईल तेवढा लाभ पदरात पाडून घेणे, ही मानवी प्रवृत्ती बनली आहे. ही प्रवृत्ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणारच आहे. गैरवर्तन किंवा भ्रष्टाचार ही न संपवता येणारी गोष्ट आहे. मात्र समाजहिताच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या मार्गाने अनावश्यक व अहितकारक व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने लादून भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य आहे. 

                          विविधता हा निसर्गाचा मुख्य गूण असल्याने जन्माला येणार्‍या व्यक्तीही जन्मताच नानाविध प्रवृत्तीच्या असतात. काही व्यक्ती निष्कलंक चारित्र्याच्या असतात. त्यांना नैतिकतेची चाड असते आणि त्यांच्या मनात समाजाविषयीचा सन्मानही असतो. काही व्यक्ती समाजाला व सामाजिक कायद्याला जुमानत नाहीत पण नैतिकतेला सर्वोच्च स्थान देतात, काही व्यक्तींच्या आयुष्यात नैतिकतेला अजिबात स्थान नसते पण कायद्याला अत्यंत घाबरणार्‍या असतात मात्र व्यक्तींचा एक वर्ग असाही असतो की तो कशालाच जुमानत नाही. ना नैतिकतेला ना कायद्याला. नैतिकतेला आणि कायद्याला न जुमानणारा वर्ग कायमच स्वार्थ साधण्यासाठी संधीच्या शोधात असतो. नानाविध कॢप्त्या लढवीत असतो, कायद्यातील पळवाटा शोधून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. 

                        मानवी प्रवृत्ती निसर्गदत्त भ्रष्टाचारधार्जिणी असल्याने व प्रवृत्ती व्यक्तीनिहाय विविधतेने नटलेली असल्याने केवळ कायदे करून किंवा निव्वळ नैतिकतेचे धडे देऊन भ्रष्टाचार काबूत येण्यासारखा नाही, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. एवढा विचार केला तर भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी किती व्यापकपणे पावले टाकण्याची गरज आहे, हे सहज समजून येईल.

(क्रमशः)                                                                                                          गंगाधर मुटे
-------------------------------------------------------------------------------------------------------------
सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : लेखांक-१
प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३

-------------------------------------------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

छान

देवदेवता लाचखोरीच्या मूर्तिमंत उदाहरण आहेत<< आजकालच्या म्हणजे मानवाने स्वतःच्या स्वार्था साठी निर्माण केलेल्या असे म्हणायचे आहे का इथे.
देव म्हणजे काय हा विषय या पुर्वी अनेकदा झालेआ आहे. देवाला बळी दिला म्हणजे तो कोपत नाही वैगैरे या मानवानेच निर्माण केलेल्या गोष्टी आहेत मग त्या मागे कारणे काही असू शकतील चांगली किंवा वाईटही.

देवाने माणसाला बुद्धी दिली ज्याच्या मदतीने आणि केवळ त्याचाच जोरावर तो जगतो आहे. काही जण जगण्यासाठी भ्रष्टाचार करतात तर काही पुढचे सामाजिक आयुष्य चांगले जगण्यासाठी भ्रष्टाचाराला विरोध करतात.

बेफी अनुमोदन......... नेमके कशावर बोट ठेवले आहे कळाले नाही......
सकाळी पुजा-अर्चा करतात का तुम्ही..? का करतात..? रामनाम का जपतात..? देवाच्या नावाने वेगळेच काही लिहिले आहे....

मला लेख फारसा कळला नाही आणि जे काय थोडेफार कळले ते पटले नाही.

आपल्या स्वार्थासाठी माणसांनी देवांना लाच द्यायला सुरवात केली. पण असे असुनही लाचेने देव प्रसन्न झाल्याचे मी तरी अजुन पाहिले/ऐकले नाही. ज्याला जे काही मिळते ते त्याच्या श्रमांनी आणि कर्माने. त्यात देव काय करणार?

अगदी वेदांमध्येसुद्दा 'अमुक अमुक देव असे करतो, तर त्याप्रित्यर्थ त्याला हा पदार्थ आपण द्यावा' अशा आशयाचे लिहिलेले आहे असे इथेच माबोवर वाचले. पण कुठेही 'आपण हा पदार्थ त्याला द्यावा म्हणजे तो अमुक गोष्ट करेल' असे लिहिल्याचे वाचले नाही. Happy सुर्य,चंद्र, इंद्र, वरुण जे काही करत होते ते त्यांची ड्युटी म्हणुन करत होते आणि माणसाचा पृथ्वीवर उगम व्हायच्या आधीपासुनच ते त्या गोष्टी करत होते. माणुस येऊन तो लाच देणार आणि मग आपण प्रकाश पाडु, पाउस पाडु इ. विचार त्यांनी केला होता असे काही वाटत नाही. Proud

स_सा, साधना यांना अनुमोदन. देवांचा यात काही संबंध नाही.

उगाच आपण मूर्खपणा करायचा नि देवाकडे बोट दाखवायचे!! मुळात भयानक आळशी, दुर्बळ स्वभाव! स्वतःचे स्वतः काही करायचे नाही, नि दुसर्‍याकडे बोट दाखवायचे. देव, सरकार, इतर लोक, कुणीहि चालते!! नुसते भारतातच नाही तर सर्व जगात असे अनेक लोक आहेत नि ते असेच करतात.

पण भारताच्या इतिहासात मात्र, अगदी श्री. छत्रपति शिवाजीमहाराजांच्या वेळेपासून लाचलुचपत, भ्रष्टाचार यांची उदाहरणे आहेत, असे इथेच वाचल्याचे आठवते. तत्पूर्वीहि असेल तर मला माहित नाही. म्हणजे ब्रिटिशांनी ही सवय लावली असेहि म्हणता येणार नाही. ते स्वतःच्या देशात कसे वागतात माहित नाही पण परदेशात अत्यंत हीनतेने, निर्लज्जपणे वागतात याची अनेक उदाहरणे वाचली आहेत.

भ्रष्टाचाराचे म्हणाल तर अगदी मुगल काळापासुन तो कसा बोकाळला होता यावर कोणीतरी जाडजुड ग्रंथ लिहिलाय. लिहिणारा निवृत्त सनदी अधिकारी होता, त्याला भ्र.ची अगदी फर्स्टहँड इन्फो होती, मग त्याने पुर्वसुरींचा शोध घेत पार ११-१२ व्या शतकापर्यंत मागे जाऊन शोधकार्य केले Happy

चाणक्यनीतीतही भ्रष्टाचाराचा उल्लेख असल्याचे वाचल्याचे आठवते.

हे वरचे लेखन वाचून कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या नाहीत म्हणजे मिळवली Happy

सर्वच प्रतिसाद आवडलेत. Happy

माझा मुद्दा फक्त "आर्थिक भ्रष्टाचार" (आणि त्याचा उगम) एवढाच आहे. लेखात आलेले सर्व संदर्भ केवळ "आर्थिक भ्रष्टाचार" या विषयापुरतेच मर्यादीत आहे.

हा स्वतंत्र लेख नसुन भाग - १ चा पुढील भाग आहे.

मला नाही वाटत यात देवांना दोष दिला आहे. मनुष्यालाच दोष दिला आहे, कारण सगळे मनुष्याने केले. त्यालाहि पुरावे त्यांनी दिले आहेतच, त्यांच्या मते. पण माझ्या मते वरील लेख लिहीणार्‍यांचा रोख शेवटी लेख लिहीणार्‍याच्या मते जी वाईट माणसे असतात ते असे करतात.
कारण कुण्णाला ज्याबद्दल काहीहि कळत नाही तो देव. मग माणसाने काहीही करावे, लिहावे, म्हणावे!

पुनः खरे तर चांगले, वाईट धंदे करणार्‍यांना स्त्री, पुरुष, तमीळ, मराठी, हिंदू, मुस्लीम, ब्राह्मण, शूद्र असा भेदभाव जात, पात, धर्म इ. गोष्टी मुद्दामून मागे लावल्या तर लागतात. ते लोक त्यांना काय वाटते ते करतात. इतर लोक नुसतेच त्यांच्या बद्दल लिहीतात.

छान

हा लेख फक्त भारतीय परिस्थितीबद्दल आहे का?

वरील गोष्टी न करणारे लोकहि जगात असंख्य आहेत, नि तेहि भरपूर आर्थिक भ्रष्टाचार करतात. तेहि अशीच काही काही कारणे सांगून स्वतःच्या वर्तनाचे समर्थन करतात!

उगम फक्त एका गोष्टीमुळे झाला नाहीये. अनेक लहान नद्या, नाले, ओहोळ, पाऊस हे सर्व मिळून महानदी झाली. त्यात सर्वांनी घाणच टाकली आहे, आता उगाच एकमेकांकडे बोटे दाखवणे, नि त्याहि पेक्षा त्याचे समर्थन करणे असे चालू आहे!

देवादिकांनी भ्रष्टाचाराला सुरुवात केली, असे मला म्हणायचे नाही. अगदी त्या काळापासून हे सर्व सुरू आहे, असे मला म्हणायचे.

<< उगम फक्त एका गोष्टीमुळे झाला नाहीये. अनेक लहान नद्या, नाले, ओहोळ, पाऊस हे सर्व मिळून महानदी झाली. त्यात सर्वांनी घाणच टाकली आहे, आता उगाच एकमेकांकडे बोटे दाखवणे, नि त्याहि पेक्षा त्याचे समर्थन करणे असे चालू आहे! >>>>

सहमत. अगदी निलाजरेपणाने समर्थन केले जातेय.