रसग्रहण स्पर्धा- 'समुद्र' : लेखक- श्री. मिलिंद बोकील

Submitted by पूनम on 16 August, 2011 - 05:46

कादंबरीचे नावः 'समुद्र'
लेखक: श्री मिलिंद बोकील
प्रकाशन संस्था- मौज
प्रथम आवृत्ती- मार्च २००९

समुद्र

लग्न हा टप्पा दोन व्यक्तींचं आयुष्य कायमस्वरूपी बदलून टाकतो. ह्या नंतरच्या प्रत्येक मोठ्या टप्प्यावरचे ते साक्षीदार असतात. लग्न झाल्यानंतर एकमेकांची खरी ओळख- शरीराची आणि मनाची हळूहळू होत जाते. त्या ओळखीच्या खुणा साठवत प्रवास चालूच राहतो- लग्न, नंतर मुलं, त्यांचं मोठं होणं, त्याच बरोबर नोकरी-व्यवसायात स्थिरावणं, वाढणं, मध्यमवर्गातून उच्चमध्यमवर्गाकडे वाटचाल- सगळं कसं आखीवरेखीव रेषेवरून एकमेकांच्या संगतीनं घडतं. लग्नाला साधारण वीसबावीस वर्ष झाली, की नवरा बायकोला एकमेकांबद्दल परिचित नसलेलं काहीच नसतं बहुधा- का तरीही काहीतरी असतंच? एकमेकांमध्ये शब्दश: विरघळून गेलेले दोघं जेव्हा भूतकाळात त्यांच्यापैकी एकाला व्यक्तिश: आलेल्या अनुभवाला अचानक सामोरे जातात, तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात? जोडपं म्हणून? व्यक्ती म्हणून? त्यानंतर त्यांच्या दांपत्यजीवनावर त्याचा काय आणि कसा फरक पडतो? मिलिंद बोकीलांची ’समुद्र’ ही छोटेखानी कादंबरी आपल्याला ह्या सर्व प्रवासातून घेऊन जाते.

भास्कर आणि नंदिनी ही दोनच मुख्य पात्रं कादंबरीत आहेत. सर्व कथा त्यांच्याभोवतीच घडते. हे दांपत्य खूप वर्षांनी एका समुद्रालगतच्या रिसॉर्टवर निवांत सुट्टी घालवायला आले आहे. ह्या रिसॉर्टच्या समोर अथांग समुद्र आणि मागे मोठा डोंगरकडा आहे. अतिशय रम्य अशा ह्या ठिकाणी भास्कर त्याच्या आणि नंदिनीच्या आयुष्याचा वेध घेतो. समुद्र आणि डोंगर ह्या स्थळांचा वापर लेखकाने सुरेख करून घेतला आहे. पुस्तकाच्या उत्तरार्धात ह्या जागा रूपकं म्हणूनही खुबीनं वापरल्या आहेत.

भास्कर एक बर्‍यापैकी मोठा उद्योजक आहे. पुष्कळ वर्ष केलेल्या कष्ट आणि धडपडीनंतर आता त्याचा ’पाणी शुद्धीकरण यंत्रणा’ तयार करण्याचा व्यवसाय बर्‍यापैकी स्थिरावला आहे. व्यवसायाच्या निमित्ताने घरी समृद्धी आली आहे. भास्कर एक सरळ माणूस आहे. काहीसा अबोलही. नंदिनीवर त्याचं मनापासून प्रेम आहे. तो एक टिपिकल नवरा आहे. नवरा-बायकोत लपवण्यासारखं काही नसतं अशी त्याची पक्की धारणा आहे. जे काही आहे, ते माहीतच असतं आणि जे नसतं ते हक्काने सांगायचं किंवा मागायचं असतं असं त्याचं साधं लॉजिक आहे. त्याची बायको नंदिनी ही गृहिणी आहे. मनानी अतिशय सरळ, पारदर्शी आणि काहीशी मनस्वी. तिचंही आयुष्य भास्करभोवती केन्द्रीत आहे. तो जसं म्हणेल तसं ती नेहेमीच करते, अगदी समरसून करते. पण ती स्वत:हून कशातच पुढाकार घेत नाही, हे शल्य भास्करला कायम टोचत असतं. नंदिनीला एकटं सोडलं, तर पुस्तक वाचनात ती स्वत:ला उत्तम रमवू शकते. तिचा विरंगुळा भास्करवर अवलंबून नाही, कारण भास्कर आजूबाजूला असण्याचीच तिला सवय नाही. मात्र निवांतपणे नुसतं पडून राहण्यासाठीसुद्धा भास्करला नंदिनीची गरज लागते. सुरुवातीच्या काही पानातच हा पात्रपरिचय लेखक छोट्या प्रसंगांमधून करतो, तेव्हाच लेखनाचा वेगळेपणा समजायला लागतो.

आपल्याला कोणत्याही व्यक्तीला तिच्या सर्व गुण-दोषांसकट स्वीकारणं हे खरोखर अवघड जातं. त्या व्यक्तीची एखादी सवय, एखादी लकब- जी आपल्याला आवडत नाही, ती तिने केली की जरासं खट्टू व्हायला होतंच की नाही? या आपल्याला न आवडणार्‍या सवयी आपण सतत आपल्यापरीने सुधारायचा प्रयत्न करत असतो. भास्करचं नंदिनीवर प्रेम असलं तरी तिचं स्वत:तच रमणं, एकटीनेच पुस्तक वाचणं, वा समुद्राकडे टक लावून बघत बसणं त्याला सतत टोचत राहतं. तो अबोल असला, तरी आत्ममग्न नाही. निवांत सुट्टीला आल्यावर फिरणं, जेवणं हे दोघांनी एकत्रच केलं पाहिजे, तिथे परत एकेकट्याने सूर्यास्त बघणे वा चक्कर मारायला जाणे वगैरे त्याला पसंत नाही. तो प्रौढ वयातही शरीर कमावण्याची हौस असलेला आहे. त्याला नंदिनीचं थोडं चाललं तरी दमून जाणं फारसं पसंत नाही. असे हे एकमेकांचे छोटे छोटे दोष, किंवा एकमेकांच्या न आवडणार्‍या गोष्टी मनाच्या तळात नकळत साठवलेल्या असतात; आणि एखाद्या वादाचं निमित्त झालं, की मात्र तेच दोष उग्र स्वरूप धारण करून समोरच्यावर वार करायला बरोब्बर वापरले जातात. माणसाच्या ह्या स्वभावविशेषांचा असा समर्पक वापर जागोजाग केलेला आहे.

रिसॉर्टवरच्या निवांतपणात दोघांमध्ये एका छोट्याश्या वादाचं निमित्त होतं आणि अचानक नंदिनी एक गौप्यस्फोट करते- तिच्या आणि तिच्या एका मित्राच्या आलेल्या संबंधांबद्दल. भास्करला ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत असा अंदाज असतो, पण अर्थातच प्रकरण तिथवर गेले असेल, ह्याची कल्पना नसते. बायकोने स्वतःच्या तोंडाने असशी कबूली दिल्यानंतर कोणत्याही नवर्‍याची काय प्रतिक्रिया होईल? वाचक म्हणून आपल्या मनात जे जे येईल, ते ते पुस्तकात बरोब्बर पकडले आहे. रागाचा स्फोट, पराकोटीचा संताप, स्वामित्वाची भावना, उद्विन्गता, स्वत:वरचाच अविश्वास, फसवलं गेल्याची भावना- सगळं भास्करला टप्प्याने जाणवतं. ’तिला घालवून देऊ घरातून’ इथपर्यंत त्याचे विचार पोचतात. नंदिनीची ह्या घटनेवरची आणि आता भास्करला सांगितल्यानंतरची प्रतिक्रिया काय आहे? भास्करची प्रतिक्रिया बघून अर्थातच ती घाबरते. विमनस्क होऊन भास्करने स्वत:चे बरे वाईट करून घेऊ नये ही तिची प्रमुख चिंता आहे. पण भूतकाळातल्या घटनेबद्दल तिचं मन स्वच्छ आहे. एकापरीने ती त्याबद्दल तटस्थ आहे आणि त्याला काही कारणंही आहेत. ती पुस्तकात योग्य वेळी आणि योग्य प्रकारे उलगडत जातात. ती कारणं समोर आली की नंदिनीचा पारदर्शकपणा अधिकच भिडतो. नुसता गौप्यस्फोट करणं किंवा कबूली देणं हे तिला करायचंच नाहीये, तिचं त्यामागचं कारण कितीतरी वेगळं आहे- ह्या सर्वाचा भेद हळूहळू सुरेख केला आहे.

ह्या निमित्ताने लेखाकाने वैवाहिक आयुष्यातल्या शारीरिक संबंधांचा होणारा प्रवास वेगवेगळ्या प्रसंगामधून दाखवला आहे. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला असलेली एकमेकांची झपाटल्यागत ओढ आणि नंतर शरीरं ओळखीची झाल्यानंतरचं आलेलं माधुर्य ह्या प्रवासातले चढ-उतार पुस्तकात संयतपणे टिपले आहेत. अनेकदा नकळत हे शारीरिक व्यवहार काहीतरी सिद्ध करण्यासाठीही वापरले जातात- नवर्‍याला वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ह्यांचा वापर करणं सोयिस्कर असतं, कधीकधी तर त्याला हाच एक मार्गही ठाऊक असतो, कधीकधी गैरसमज दूर करण्यासाठी, कधी केवळ प्रेमापोटी तर कधी सवय म्हणून.. आधी केवळ शारीर पातळीवर असलेला हा व्यवहार, हळूहळू मनांचीही गुंतवणूक करतो. एक वाचक म्हणून भास्कर-नंदिनीचा हा प्रवास आपल्याला अंतर्मुख करून जातो.

हादरलेल्या भास्करच्या सर्व प्रतिक्रिया एक वाचक म्हणून आपल्याला योग्य वाटतात. त्याच्याबरोबर आपणही मनाच्या विविध अवस्थेतून जातो. माणसाचं मन ही फार विचित्र गोष्ट आहे. मन कणखर असलं, उत्साही असलं की समोर काहीही आलं तरी झेलू शकतं. व्यवसायातले चढ-उतार लीलया पचवलेला भास्कर अशा प्रकारच्या धक्क्याला सामोरा जायला सक्षमच नाहीये. साहजिकच ही कबूली त्याच्या मनावर आघात करते, तो हेलपाटतो. समुद्राच्या साक्षीने विचारांच्या आवर्तनात एक संपूर्ण दिवस आणि रात्र घालवतो. समुद्राच्या लाटांसोबतचा त्याचा प्रवास, हळूहळू निवत गेलेलं त्याचं मन आणि त्याचे सुसंगत विचार, दृष्टीकोनात हळूहळू घडलेला बदल हे खूपच सुरेख टिपलंय. ’मन’ ह्या अदृश्य शक्तीचं आपल्या शरीरावर असलेलं निर्विवाद आधिपत्य एकदा मान्य केलं की अनेक घटना, त्यांच्यामागची सत्यता, आपल्या प्रेमाच्या माणसाला समजून घेणं किती सुकर होतं. विषण्ण मन:स्थितीत असलेला भास्कर त्या संध्याकाळी त्याच्या शरीराला सवयीचा असलेला व्यायामही करू शकत नाही.. संपूर्ण शरीर त्याच्यासाठी एक ओझं बनतं. मात्र मनातल्या शंकांचं मळभ दूर झाल्यानंतर काही तासांनंतरच तो पहिल्याच जोमानं व्यायाम करू शकतो- मनाच्या सामर्थ्याचं वर्णन करणारी ही अगदी छोटीशी गोष्ट आहे, पण अचूक पकडली आहे.

भास्करची व्यक्तिरेखा जरी जास्त स्पष्ट असली तरी मनस्वी नंदिनी चांगलीच लक्षात राहते. काहीशी पॅसिव्ह, फक्त प्रतिक्रियांमधून व्यक्त होणारी नंदिनी सुरेख रंगवली आहे. तिचे विचार, तिचं भास्करवर असलेलं प्रेम अगदी स्वच्छ आहे. त्यात कोणताही अभिनिवेश नाही. एक पाऊल मागे राहणे, पण ज्यात सहभाग घेऊ, त्यात पूर्णपणे समरस होणे ही तिची वृत्ती आहे. भास्करवर ती पूर्ण अवलंबून आहे, आणि हे ती त्याला अनेकदा बोलून, कृतीतून दाखवतेही. तिच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटनेबद्दल तिच्या मनात कोणतांही अपराधीपणा नाही. भास्करला हे सगळंच पचवायला जरासं अवघडच जातं, पण त्याला इतक्या वर्षाची ओळखीची बायको ह्या तीन दिवसात अगदी नव्याने कळत जाते. तिच्या चेहर्‍यापासून तिच्या स्वभावाचे अनेक कंगोरे ह्या सगळ्यांकडेच तो एका नव्या दृष्टीने बघू लागतो. हा प्रवास खूप रोचक आहे. पुस्तक ज्या प्रसंगाने सुरू होतं, त्याच प्रसंगाने संपतं. पण दोन्हीतला फरक इतका ठळक आणि लोभसवाणा आहे, की आपण नकळत लेखकाला दाद देऊन टाकतो. आपल्याला वाटत असतं की आपल्या जीवनसाथीला आपण चांगलंच ओळखतो, मात्र त्याच्या अंतरंगापर्यंत पोचणं हे समुद्रात डुबकी मारण्यासारखं आहे- आत काय दडलेलं आहे, ते खूपच वेगळं आणि आश्चर्यचकित करणारं असू शकतं. त्यातून जे हाती लागतं ते अतिशय सुंदर असं काहीतरी असतं- आपल्या मनात आपणच निर्माण केलेल्या प्रतिमेला एखादा सुखद धक्का देणारं!

मिलिंद बोकीलांची ही तिसरी प्रकाशित कादंबरी. ’समुद्र’च्या आधी त्याच्या ’शाळा’ आणि ’एकम’ ह्या कादंबर्‍या आल्या आहेत. ’शाळा’शी आपण सगळेच परिचित आहोत. शालेय विद्यार्थ्यांची, त्यातूनही वयात येणार्‍या विद्यार्थ्यांची अचूक नस त्यांनी त्या कादंबरीत पकडली होती. व्यक्तीरेखा उभ्या करणे, त्या रंगवणे, त्यांच्या आजूबाजूचे प्रसंग वाचकाला आपलेसेच वाटतील असे लिहिणे, आणि खूप काही लिहूनही शेवटी वाचकाला विचार करायला प्रवृत्त करणे ही ह्या लेखकाची वैशिष्ट्य. ही वैशिष्ट्य पुरेपूर जपत बोकीलांनी ’समुद्र’ लिहिली आहे. नव्वद पानांचीच असलेली ही छोटीशी कादंबरी आशयात कुठेही कमी नाही. मानवी मन आणि समुद्र, संसार आणि डोंगरकडा हे दृष्टांत कादंबरीला एक सुरेख उंची देतात. मानवी मनाइतके गुंतागुंतीचे काहीच नसेल. त्याच्या एका कंगोर्‍याचा कानोसा आपण ही कादंबरी वाचता वाचता घेऊ शकतो, हे नक्की.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
अतिशय उत्कृष्ट रसग्रहण.
ही कादंबरी नक्की वाचणार.

मायबोलीचे पुन्हा एकदा आभार. 'मी वाचलेले पुस्तक'वर एवढी विस्तृत आणि विविध विषयांवरची रसग्रहणे आली नसती, जी आता या स्पर्धेच्या निमित्ताने येत आहेत आणि आमची वाचावयाच्या पुस्तकांची यादी वाढते आहे. Happy

मायबोलीचे पुन्हा एकदा आभार. 'मी वाचलेले पुस्तक'वर एवढी विस्तृत आणि विविध विषयांवरची रसग्रहणे आली नसती, जी आता या स्पर्धेच्या निमित्ताने येत आहेत आणि आमची वाचावयाच्या पुस्तकांची यादी वाढते आहे. >>> अनुमोदन. Happy

सुरेख रसग्रहण. Happy

छान रसग्रहण पुनम! नक्की वाचणार!

मंजुडीला अनुमोदन. या स्पर्धेमुळे पुस्तकांचा खुप चांगला परिचय होतोय.

मी वाचलीय ही कादंबरी. बोकिलांच्या कडून खुप अपेक्षा ठेवत असेन कदाचित, पण मला हि इतकी नाही आवडली.
कालच त्यांचे समुद्रापारचे समाज, हे पुस्तक वाचून संपवले. आणि ते खुपच आवडले.

मंजुडे, अनुमोदनच तुला Happy

छान लिहिलंयस पूनम. मागे एकदा या पुस्तकाचा '(प्र)दीर्घ कथा' असा उल्लेख वाचला होता कुठेतरी.

आपल्याला वाटत असतं की आपल्या जीवनसाथीला आपण चांगलंच ओळखतो, मात्र त्याच्या अंतरंगापर्यंत पोचणं हे समुद्रात डुबकी मारण्यासारखं आहे- आत काय दडलेलं आहे, ते खूपच वेगळं आणि आश्चर्यचकित करणारं असू शकतं. त्यातून जे हाती लागतं ते अतिशय सुंदर असं काहीतरी असतं- आपल्या मनात आपणच निर्माण केलेल्या प्रतिमेला एखादा सुखद धक्का देणारं! >>> हे आवडलं. Happy

छान ओळख करून दिली आहेस. बोकीलांची अनलंकृत आणि प्रचंड ताकद असलेली भाषाशैली खूप आवडते. त्यांनी दैनंदिन जीवनातूनच शोधलेल्या साध्या सोप्या रूपकांचे अस्सलपण- हेही वैशिष्ठ्य. हे पुस्तक वाचलं नाही अजून. आता वाचेन.

पौर्णिमा, छान परिचय करून दिला आहे पुस्तकाचा. मिलिंद बोकील माझे आवडते लेखक, हे पुस्तक निश्चित वाचणारच आता Happy

रसग्रहण खूपच छान केलं आहेस तु पौर्णिमा. व्यक्तिरेखांचे मनोव्यापार छान उलगडले आहेस.

मिलिंद बोकिलांचं लेखन मलाही एरवी आवडतं पण 'समुद्र' मला आवडली नव्हती. एकतर खरंच ही कादंबरी वाटत नाही. बीजच तेव्हढं सशक्त नाही. बोकिलांनाही दीर्घकथांच्या बाजामधून बाहेर पडता आलेलं नाही. त्यांची एरवी विस्तारीत वर्णन शैली मला आवडते. ते सानियाच्या शैलीचं खूपच अनुकरण करतात तेही ठीक आहे पण समुद्र मधे ही शैली चक्क कंटाळा आणते. खूप एकसुरीपणा आहे वर्णनात. नंदिनीची व्यक्तिरेखा मात्र सुरेख उतरलीय.

अर्थात कादंबरी आवडणे, न आवडणे हा वैयक्तिक भाग. तुझे रसग्रहण, आणि बारकावे टिपण्याची शैली मात्र आवडलीच.

बोकिलांचे सध्या काहीच वाचावेसे वाटत नव्हते. पण आता तू लिहीलेले वाचून मोह होणारच आहे. Happy
तू सुरेख लिहीले आहेस.

"...पण त्याला इतक्या वर्षाची ओळखीची बायको ह्या तीन दिवसात अगदी नव्याने कळत जाते."

~ पौर्णिमा यांच्या सुंदर परिक्षणातील वरील वाक्य म्हणजे कथानकाची पताका आहे. मी वाचली आहे बोकिलांची ही कादंबरी. पत्नीची ओळख आता नव्याने व्हावी यासाठी 'समुद्र' चा मेटॅफर म्हणून केलेला वापर पाहून लेखकाची तडजोडीसदृश्य विचाराकडे असलेली ओढ स्पष्ट करते. भास्कर म्हणतो, "इतकी वर्षं समुद्र पाहिला पण आता पहिल्यांदाच हे लक्षात आलं आपल्या की लाटा म्हणजे समुद्र नाही. लाटा हा केवळ पृष्ठभाग आहे. खरा समुद्र निराळा आहे. तो दिसत नाहे, फक्त जाणून घेता येतो. ढग येतात, पाऊस पडतो, वादळे उठतात, तारे तुटतात, गलबतं लहरतात; या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत. समुद्र आतमध्ये जसा आहे तसाच आहे; स्थिर, अविचल. हे रहस्य आज आपल्याला समजले ती फार चांगली गोष्ट आहे. हे कळण्यासाठीच कदाचित आपण इथे आलो असणार... उद्या जाऊ आपण इथून, पण सोबत हे घेऊन जाऊ."

~ समुद्र किनार्‍याला सुट्टीसाठी येताना आणि ती सुट्टी संपल्यानंतर भास्करच्या कार ड्रायव्हिंगमधील झालेला बदलही लेखकाने छान टिपला आहे.

दोन-तीन दिवसात घडणार्‍या कथानकाचा पौर्णिमा यानी करून दिलेला परिचय इतराना कादंबरी वाचण्यासाठी उद्युक्त करील हे नक्की.

आपल्याला वाटत असतं की आपल्या जीवनसाथीला आपण चांगलंच ओळखतो, मात्र त्याच्या अंतरंगापर्यंत पोचणं हे समुद्रात डुबकी मारण्यासारखं आहे- आत काय दडलेलं आहे, ते खूपच वेगळं आणि आश्चर्यचकित करणारं असू शकतं. >>> प्रचंड अनुमोदन!!!

मस्त रसग्रहण! वाचावस वाटत.

वर कुणीतरी लिहल्याप्रमाणे अलिकडे मिलिंद बोकिलांच लिखाण वाचवत नव्हत. "एकम" तर अगदी बोअर आणि कंटाळवाणी वाटली! शाळा, कातकरी मधून भेटलेले बोकील नव्हतेच ते.

Pages