मला मुलगीच हवी ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2014 - 06:24

मला मुलगीच हवी ..

......

सन २००८ !
एक काळ होता जेव्हा मला वाटायचे की मला मुलगाच झाला पाहिजे.
हो, त्याकाळी जेव्हा मला एक साधी गर्लफ्रेंडही नव्हती, (वा किमान होत्या त्या मैत्रीणींबाबत सिरीअस तरी नव्हतो) तेव्हाही कॉलेजमधील मित्रांशी चर्चा करताना, वा एकांतात बसून स्वत:च्या भविष्याचा विचार करताना मला असेच वाटायचे की येस्स, मला मुलगाच झाला पाहिजे.

......

एक काळ होता, (अर्थात आजही जिथे सुशिक्षितपणा किंबहुना त्यापेक्षाही सुसंस्कृतपणा आला नाही तिथे तो काळ अजूनही आहेच)

असो, तर एक काळ होता जेव्हा प्रत्येक मातापित्यांची अशी इच्छा असायची, आपले होणारे संतान, हि दुसर्‍याचे घर प्रकाशाने उजळवणारी ज्योती नसून एखादा आपल्याच अंगणात टिमटिमणारा दिपक असावा, आपल्या वंशाचा दिवा असावा. आणि या विचारामागे प्रामुख्याने आणि ढोबळमानाने खालील कारणे असायची :-

१) मुलगा म्हातारपणाची काठी असतो.

२) मुलगी लग्न करून सासरी जाते.

३) मुलगा हुंडा घेऊन येतो, तर मुलीला हुंडा द्यावा लागतो.

४) मुलगा घराण्याचा वारस असतो, तर आपला जमीन-जुमला जावयाला देण्याऐवजी मुलाकडेच जावा.

५) मुलगा आपला वंश आणि आपले नाव पुढच्या पिढीत नेतो.

६) मुलीची अब्रू जपणे हि एक जबाबदारी असते.

वगैरे वगैरे

.......

तर या कारणांची आजच्या जमान्यात साधारण अश्या प्रकारे वाट लागली आहे.

१) मुलगा म्हातारपणाची काठी मानले तरी तोच कधी लाठी मारून वृद्धाश्रमात हाकलवेल किंवा जबाबदारी घेण्यास नकार देईल हे सांगता येत नाही. जिथे दोन किंवा अधिक मुले असतात तिथे प्रॉपर्टीचे वाटे पडताना आपला हक्क कोणीही सोडत नाही, मात्र म्हातारपणी आईवडीलांचा सांभाळ करण्याचा कर्तव्य निभावायची वेळ आली की मात्र टाळाटाळ करण्याची शक्यता असते. (आठवा चित्रपट बागबान) किंवा हल्ली पेंन्शन प्लॅन आणि त्याच्या ‘ना सर झुका है कभी, ना सर झुकायेंगे कभी" वगैरे जाहीराती यामुळेच बघायला मिळतात. थोडक्यात आपल्या म्हातारपणाची सोय आपली आपणच करायची आहे हा विचार रुजतोय.

२) मुलगी लग्न करून सासरी गेली तरी हल्लीच्या काळात ती कमावती आणि स्वतंत्र विचारांची असल्याने लग्नानंतरही ती आपल्या मातापित्यांच्या प्रती आपली जबाबदारी उचलू शकते. एकवेळ तिचा नवरा त्याच्या आईवडिलांना म्हणजे तिच्या सासू-सासर्‍यांना सोडून स्वतंत्र राहत असेल, पण मुलगी मात्र माहेरच्यांशी असलेली आपली नाळ कधीच तोडत नाही.

३) हुंडा वगैरे प्रकार हल्ली फारसे उरले नाहीयेत. लग्नाचा खर्चही बरेच ठिकाणी अर्धा अर्धा उचलला जातो. प्रेमविवाहांचे वाढते प्रमाण हे याला पोषकच आहे.

४) आपल्यापाठी आपली प्रॉपर्टी मुलगा आणि सून उपभोगतेय की मुलगी आणि जावई याचा आता कोणी फारसा विचार करत नाही, कारण मुळात प्रॉपर्टी अशी काही सोडूनच जायची नसते. आपण उभारलेला उद्योगधंदा कोणाच्या हाती सोपवून जायचा असेल तर तो आजच्या जमान्यात मुलीही सुशिक्षित असल्याने त्यांच्याही हाती सोपवून जाता येतो. तसेच मुलगा नालायक निघाला तर नाईलाज होण्यापेक्षा कर्तबगार जावई शोधण्याचा पर्याय तरी आपल्या हातात उपलब्ध राहतो.

५) आपले नाव पुढच्या पिढीत जावे, आणि आपला वंश वाढावा या मरणोत्तर खुळचट आणि मनाला खोटा खोटा दिलासा देणार्‍या कल्पनांमधून बहुतांश समाज बाहेर आलाय. आपण मेल्यानंतरही आपले फेसबूक अकाऊंट या जगात तसेच राहणार आणि आपले नाव गूगलसर्च केल्यास ते सापडणार हे आजच्या पिढीला पुरेसे आहे.

६) या सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजाच्या जोडीनेच, याच समाजाच्या एका हिश्श्यात वाढीस लागलेली विकृत मानसिकता पाहता दुर्दैवाने शिशू वयात मुलांचा सांभाळ हे सुद्धा मुलींइतकेच जबाबदारीचे काम झाले आहे.

वगैरे वगैरे

.......

असो, तर मी देखील या बदललेल्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजाचा भाग आणि तश्याच आधुनिक विचारांचा असलो, तरीही मला मात्र मुलगाच हवा होता. यामागे कुठलेही संकुचित विचार नसून मला माझ्या मुलामध्ये स्वत:ला बघायचे होते. आयुष्यात मला जे आजवर बनता आले नाही, वा पुढेही बनता येणार नाही, ते माझ्या मुलाने बनावे अशी माझी सुप्त इच्छा होती. अर्थात, कोणतीही जबरदस्ती नाही, तर त्याच्या मर्जीनेच. मला आयुष्यात जी मौजमजा करता आली नाही ती त्याने करावी आणि मी त्यात मला बघावे. अगदी डिडीएलजेमधील अनुपम खेर सारखे मला माझ्या मुलाला सांगायचे होते, "मैने तो अपनी सारी जिंदगी ऐसेही यहा वहा टुक्कार पोस्ट डालने मे बिता दी बेटा, लेकीन तू जी ले अपने मर्जी की झिंदगी, मै समझूंगा मैने अपनी जिंदगी जी ली" .. आणि एवढेच नव्हे तर मला माझ्या मुलाचे नाव ‘आर्यन’ ठेवायचे आहे, असेही मी त्यावेळीच फायनल केले होते. मला माझा मुलगा माझा बेस्ट बडी म्हणून तेव्हाच माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला होता..

वगैरे वगैरे

.......

पण आज ३० ऑक्टोबर २०१४ उजाडता उजाडता ... मला पुन्हा एकदा मुलगीच हवी झाली आहे.. ते सुद्धा एक नाही तर दोन-दोन मुलीच!
आता याची कारणे काही अश्याप्रकारे,

१) आजवर मला माझ्या आईने मोठ्या लाडात वाढवले. मला काहीही काम करू न देता सारे काही आयते दिले. अगदी च् म्हटले की चहाचा कप हातात. जिथे आई कमी पडली तिथे ती कसर ताई माई अक्कांनी पुर्ण केली. बाहेर आता माझे हे आरामाचे लाड माझी गर्लफ्रेंड पुरवते. पुढे जाऊन बायको हे करेन. अर्थात याच कारणासाठी मी माझ्या गर्लफ्रेंडशी कधीही ब्रेकअप होऊ न देता तिच्याशीच लग्न करणार. मॉरल ऑफ द स्टोरी - ज्या घरात स्त्रियांची संख्या जास्त असते त्या घराला घरपण येते आणि पुरुषांची ऐश मौज मजा सारे काही होते. खास करून माझ्यासारख्या आळशी पुरुषांची जरा जास्तच.

२) स्वत: मुलगा असल्याने आणि आसपासचे मुलांचे जग पाहिल्याच्या अनुभवावरून सांगू शकतो, मुलगा एका ठराविक वयाचा झाला की तो त्याच्या समवयीन मित्रमंडळींमध्येच जास्त रमतो आणि एका वयानंतर तर जेवायला आणि झोपायलाच घरी येतो. मुलीसाठी मात्र तिचे कुटुंब हे सुद्धा तिचे एक मित्रमंडळच असते, किंबहुना सर्वात आवडीचे असे. साधी पिकनिक काढायची म्हटले तरी मुलगा आपल्या मित्रांबरोबर जाणे पसंद करेन, पण मुलगी मात्र फॅमिली पिकनिकलाच पहिले प्राधान्य देईल. फेसबूकावरही मुलांपेक्षा मुलींचेच सहकुटुंब पिकनिकला गेलेल्याचे फोटो जास्त अपलोड होताना दिसतात हा याचा पुरावाही म्हणू शकता.

३) मला स्वत:ला नटण्याची, नीटनेटके राहण्याची आणि छान छान फोटो काढण्याची, काढून घेण्याची जरा जास्तच आवड आहे. हि आवड मुलापेक्षा मुलीबरोबर जास्त चांगल्या प्रकारे जपता येईल असे मला वाटते कारण मुलांच्या तुलनेत मुलीला विविध प्रकारचे ड्रेसेस आणि अलंकारांनी छानपैकी नटवता येते.

४) वडील आणि मुलाचे नाते हे जरासे कॉम्प्लिकेटेड असते. ते योग्य प्रकारे जमले तर ठिक अन्यथा समजे उलगडेपर्यंय आयुष्यातील एक काळ निघून जातो. पण मुलगी हि लहानपणापासूनच अगदी शेवटपर्यंत, सहजगत्या आणि नैसर्गिकरीत्या, वडिलांशी भावनिकरीत्या खूप चांगली जोडली जाते, वडिलांची लाडकी लेक होते.

वगैरे वगैरे

.........

अर्थात हि माझे मते आहेत. माझ्या अनुभवांवरून आणि त्या अनुभवांच्या आकलनावरून बनवली आहे. बहुतांश बाबतीत, बहुतांश जणांनी, एकमत व्हायला हरकत नसावी. तरीही न पटल्यास, धागा चर्चेला खुला आहे. चॉईस इझ युअर्स, पण मला मात्र बाबा मुलगीच हवी Happy

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचा खुप हेवा वाटतो...सगळ्याच विषयांवर कसे लिहु शकता तुम्ही? तेही एवढ्या कमी वेळात?:हाहा:

लेख मुळिच आवडला नाहि...आळशी लेखकाची कामे स्त्रीया करतात म्हणुन मुली आवडतायेत यांना...उद्या कामे करायची बंद केली तर नाहि आवडनार का? आपल्याला आई,होणारी बायको सगळ करुन देते म्हनून ह्यांना मुलगी पाहीजे उद्या तीने पन हेच केले पाहिजे अस ह्यांना वाटत...

लेखकराव - तुमचे लग्न झाले आहे का?
नसेल झाले तर तुमचे माबो वरचे लेखन होणार्‍या बायकोला किंवा gf ला दाखवू नका.
जर बघितले तर तुम्हालाच भरपूर हुंडा द्यायला लागेल लग्न होण्यासाठी.

आणि लग्न झाले असले तर - अजुन तुम्हाला आई ने आठवण करुन द्यावी लागते आंघोळीसाठी. कधी जबाबदार होणार तुम्ही? स्वताची आंघोळ वेळेवर करत नाही आणि म्हणे मला मुलगा/मुलगी पाहीजे Happy

लेखकराव - तुमचे लग्न झाले आहे का?>>>
टोच्या राव लेखकाला जिएफ आहे, (तसं ते जवळ जवळ प्रत्येक लेखात आणि प्रतिक्रियेत लिहितात :दिवा:)
मग हुंड्याचा प्रश्न मिटला.. Proud

स्वताची आंघोळ वेळेवर करत नाही आणि म्हणे मला मुलगा/मुलगी पाहीजे
>>
+१११११ ज्या माणसाला स्वतः चहाचा कप बनवता येत नाही ...तो मुलगी लहानाची मोठी करु शकतो याची शंका आहे...

टोच्या राव लेखकाला जिएफ आहे, (तसं ते जवळ जवळ प्रत्येक लेखात आणि प्रतिक्रियेत लिहितात )
मग हुंड्याचा प्रश्न मिटला.. >>>>>>>

मी त्याबद्दल पण लिहीले आहे. जर जीएफ नी ह्यांचे माबो वरचे लेखन बघितले तर एक कोटी रुपये तरी हुंडा मागेल लग्ना ला तयार होण्यासाठी.

तसं ते जवळ जवळ प्रत्येक लेखात आणि प्रतिक्रियेत लिहितात >>>>>>> ह्या मागचे कारण काय ? एखाद्याला जहीरात का करावीशी वाटते? विचार केला तर बर्‍याच शक्यता दिसतात.

अग जाऊ दे ग सीमा. जबाबदारी पडली ना, की सगळ आपोआप करायला लागेल तो. मला कुठे लग्नाच्या आधी पूर्ण स्वयम्पाक येत होता. लग्न झाल्यावर मी पहिली रेसेपी काय बनवली तर छोले आणी भात. छोले बनवले ते पण कान्दा+ टॉमेटो बारीक वाटुन.:खोखो:

ऋन्मेष तुझी जी एफ आळशी नाही ना रे बाबा?:दिवा:

लग्न होऊन एक मुलगी आहे बहुतेक म्हणून दुसरीपण मुलगी हवीये

अभि अंडन

सध्या त्याला माबोवारच कोणीतरी चावालाय सारखे धागे वीणतोय Wink

लग्न होऊन एक मुलगी आहे बहुतेक म्हणून दुसरीपण मुलगी हवीये >>>>>> लग्न पण झालय, एक मुलगी पण आहे आणि सध्या एक जीएफ पण आहे. मजाच आहे.

पुन्हा एकदा मुलगीच हवी झाली आहे.. ते सुद्धा एक नाही तर दोन-दोन मुलीच! >>>>>>

हे साहेब ह्यांना काय पाहीजे ह्या बद्दल च बोलतात. होणार्‍या बायकोला मुलगा/मुलगी कोण आवडेल ह्याच्याशी काही घेणे देणे नाही. १ पाहीजे का २ पाहीजे हे पण साहेबच ठरवणार.
कठीण आहे.

वा वा काय उदात्त्त विचार आहेत !! तुमच्या त्या "उत्तम ब्लॉग वर " "बदाम " नावाने सेव्ह करा Happy

पण चहा - खाणे जागेवर मिळावे म्हणून इतके कष्ट का घेता ? त्यापेक्षा ३ काय ५ मोलकरणी ठेवा की कामाला !!

हे साहेब ह्यांना काय पाहीजे ह्या बद्दल च बोलतात. होणार्‍या बायकोला मुलगा/मुलगी कोण आवडेल ह्याच्याशी काही घेणे देणे नाही. १ पाहीजे का २ पाहीजे हे पण साहेबच ठरवणार.
कठीण आहे. >>

टोचा Lol

पण चहा - खाणे जागेवर मिळावे म्हणून इतके कष्ट का घेता ?

>> मोलकरीण बहुदा लाडाने करत नसेल त्यांचे काम. शिवाय पैसेपण मागते.
तिला तिचे स्वतःचे पर्सनल लाईफपण असते. त्यापेक्षा आई बरी.

Grow up!

पण आज ३० ऑक्टोबर २०१४ उजाडता उजाडता ... मला पुन्हा एकदा मुलगीच हवी झाली आहे.. ते सुद्धा एक नाही तर दोन-दोन मुलीच!

>> ह्या वाक्याच्या आधीपर्यंतचा लेख अतीशय व्यवस्थित आणि मुद्देसुद झाला आहे ऋन्मेष. अभिनंदन !!!
त्यापुढच्या तुमच्या वैयक्तीक कारणमिमांसा मात्र गंडल्या आहेत.

साहेब, मग इथे का चर्चा करताय ? बाकी काही करण्यापुर्वी ( म्हणजे आधी लग्न करा, पण पुढचं काही करण्या आधी ) एखाद्या गायनिकला भेटा. मुलगीच होण्यासाठी काय करायचे याचे शास्त्रीय आणि कायदेशीर उपाय सांगतील ते वा त्या.

सन २००८ !
एक काळ होता जेव्हा मला वाटायचे की मला मुलगाच झाला पाहिजे. >>>> बापरे !!! खेळण्या बागडण्याच्या वयात असे विचार तुमच्या मनात येतात . Proud Proud
बाकी तुमचा लेख अर्धा बराय "मुलगी हवी" याविषयीची मतं अजुन चांगल्या पद्ध्तीने मांड्ता आली असती.पण हा विचार तरी करताय हेही नसे थोडके .
तुमची " दोन-दोन मुलीच! आता याची कारणे काही अश्याप्रकारे",>>>>यानंतरची क्र.१ व २ ची कारणे खरच धन्य आहेत. आता तरी तुम्हाला समजेल नक्की मुलींना कश्याप्रकारची मुलं आवडतात.
बाहेर आता माझे हे आरामाचे लाड माझी गर्लफ्रेंड पुरवते. पुढे जाऊन बायको हे करेन. अर्थात याच कारणासाठी मी माझ्या गर्लफ्रेंडशी कधीही ब्रेकअप होऊ न देता तिच्याशीच लग्न करणार. >>>> कहर आहे हे वाक्य ,जरा परत विचार करा काय लिहिलय ते.

Pages