गुरुजिंचे भावं विश्व! भाग-५

Submitted by अत्रुप्त आत्मा on 13 January, 2014 - 04:00

मागिल भागः- http://www.maayboli.com/node/45162 ...पुढे चालू

धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी, यांच्या घरी केटरर कडून पायात चपला घालून आणलेलं(पार्सल) जेवण सोवळ्यात देवाला नैवेद्य दाखवून आंम्ही(ही) जेवतो.. हा काळानुसार केलेला बदल, ते कसा विसरले ते काही कळलं नाही.....!
==========================================

आपण धार्मिकपणा फारच पाळतो असा दृढं (गैर)समज असणार्‍या अश्या लोकांची काही व्यवच्छेदक लक्षण आहेत. त्यात प्रचंड तात्विक असणं.. हे आद्य लक्षण.. म्हणजे तत्व पाळलं गेलं कि व्यवहार आपोआप पाळला जातोच! असा एक हटकून गैरसमज. सोवळं ओवळं, हा जरी यांचा बालेकिल्ला असला,तरी स्वतःच्या धार्मिक समजुतिंचा ३/४ वर्षांच्या लहानग्यां पासून ते इतर कुणावरही त्या समजुती लादण्याचा यांचा अट्टाहास असतो.बरेचदा घडणारा प्रसंग. पात्रः- तेच वरच्या प्रसंगातलं परिचयाचं! स्थळः- कुठलंही सर्वसामान्य घर.

आंम्ही आपली पुजेची मांडणी करत असतो. आणी आमच्याशी अगदी छान सूत जमणारं ते बारकं पोर मागनं येऊन पाठिला हात लावतं.
पोर- गुल्जी...
मी-काय रे भंप्या? जानवं नै हां ओढायचं... बस कडेला.
पोर- गुल्जी ..... जान्व कदी घाल्तात?
मी-मुंज झाल्यावर.
पोर-कुनाची?
मी-ज्याला जान्व घालायचं असतं..त्याची!
पोर-पन..गुल्जी..त्याचीच मुंज का कल्तात?
मी-कारण आपल्यात करतात म्हणून!
पोर-आपण कोण?
मी-(क्लीन-बोल्ड!)
इथे संवाद थांबतो...आणी ते द्वाड पोरगं,त्याच्या शेवटच्या प्रश्नातनं माझ्यासाठी मानवीजीवनातल्या खर्‍या ज्ञानाचं द्वार उघडून जातं.

पण हे असे खरे संवाद आपल्याला फार काळ अंगी लागत नाहीत. पोर गुरुजिंकडे गेलं याची वार्ता लागलेला तो कोपेश्वर अजोबा ,त्या पोराला बाजूला ओढतो... ''ए sssssssssss गुर्जींना शिऊ नको,सोवळ्यात असतात ते" हे सांगताना ते आपल्या अंगाला शिवतात. ते चालतं! वास्तविक हा सगळा धार्मिक मेक-अप करूनही जेव्हढे पवित्र विचार आपल्या मनाला-शिवत नसतील,त्यापेक्षा त्या लहान मुलांचं निरागस मन हे शंभर पटीनी जास्त पवित्र असतं. अहो जिथे अजून अपवित्रताच(शिरली) नाही,तिथे तरी निदान पावित्र्याचे निकष असू नयेत! हे ही या(नुस्त्याच वयानी वाढलेल्यां)ना कळत नाही. त्यात पुन्हा.. देवासमोर नमस्कार हा काय सोपस्कार आहे हे कळत नसताना त्यां छोट्यांचं डोकं धरून ..आत्मसमाधानासाठी ते असं "टिक् टिक् टिक्" करून तिनदा अपटवण्यातही यांना धन्यता वाटते. लहान मुलांना हसण्या/खिदळण्याच्या बालधर्म न पाळू देता ह्या असल्या धर्मबाल्यावस्थेत ढकलण्यात यांचं काय सुख दडलय ते देवच जाणे! खरतर देव नाही,हेच जाणोत. कारण ते आपण जाणायला गेलं की,त्याच लाहान पोरांसारखे निरागस होऊन आपल्यालाच कोड्यात टाकतात.

असो..!

आता आपण पूजेची यादी नावाच्या महा(न) घोटाळ्यात शिरणार आहोत. हा तो काळ की जो प्रत्येक भिक्षुकाच्या व्यावसायिक आयुष्यात येतो,,,तो म्हणजे लिखित याद्या द्यायचं सोडून,सर्वसमावेशक छापिल याद्या देणे.बाकी भिक्षुकजिवन काय आणी सामान्य जिवन काय? लिखितातून छापिलात जाण्याची एक पायरी येतेच प्रत्येकाच्या आयुष्यात! त्याच पायरीचा हा किस्सा.

धार्मिककृत्याच्या सुरवातीचं महत्कार्य म्हणजे पूजेची यादी देणे व सूचना देणे. मी सूचनाही यादीच्या मागच्या बाजुला लिहून देणार होतो.पण तो विचार बदलाला. तो का? याचं निराकरण पुढच्या कांडात येइलच. मी यादी सुद्धा अत्यंत साधी आणी सुबोध छापली.अगदी नव्व्याण्णव टक्के लोकांना सहज कळेल अशी.पण तो उरलेला एक टक्का कधीकधी आपल्या नशिबी येतोच.
इतरांना सहज कळणारी यादी या श्रीयुत एकट्क्क्यांना कध्धिह्ही कळत नाही. आपण यांच्याकडे कामाला गेल्यावरंही आपल्या संयमाची कसोटी लागते. अता काळानुसार 'आचमन' म्हणजे काय? हे न कळणं. जानवं म्हणजे काय हे ही माहित नसणं..इथपर्यंतचं सर्व धार्मिक अज्ञान मी ग्राह्य धरतो.पण डावा हात/उजवा हात ह्या स्वतःच्याच अवयवांची स्वतःलाच माहिती नसणं. याला तुंम्ही काय म्हणाल??? तुंम्हाला प्रश्न पडेल,"खरच अशी माणसं असतात का?" पण खर्रच सांगतो...आहेत! एकवेळ मंत्र म्हणणं फार सोपं.पण तंत्र??? ते सांगणं भलतच अवघड. तंत्र या शब्दातच तो अवघडलेपणा दडलेला आहे.
.......... अता प्रसंग असा. हे श्रीयुत एकटक्के पूजेला स्थानापन्न होतात. समोर पळीभांडं/ताम्हन इत्यादी सर्व पुजा-तयारी जय्यत लागलेली आहे! (यातली कंसातली वाक्ये मनात वाचावीत,त्या शिवाय या पूजेचं फळ मिळणार नाही =)) )
आंम्ही---
आचमन करा..डाव्या हतानी पाणी घेऊन तीन वेळा पाणी प्या-ओम केशवाय नमः... पण पुढे काहिच होत नाही. मी थंड! मग काही सेकंदात या कंदाला ओळखून,,, "डाव्या हतात पळी घ्या(हे सर्व मंत्र म्हणतो त्याच टोन मधे..) ..अहो यजमान तो उजवा हात... हा डावा... (परत) डाव्या हातानी पळी घ्या.तिनी समोरच्या भांड्यातलं पाणी घ्या..अता ते उजव्या हतावर ओता..नंतर उजवा हात तोंडाशी नेऊन (एकदाचे) प्या!!!!" अता पुन्हा असच दोन वेळा प्या... आणी आणी आणी... (काय होतय याची वाट न पहाता) तिसर्‍यांदा समोरच्या पसरट तांब्याच्या थाळीत (जीला बाकिची गाढव लोकं ताम्हन म्हणतात) त्यात सोडा. (एकदा एका अश्या'च एकटक्क्यांनी एका गुरुजिंच्या कालच गुळगुळीत केलेल्या-डोक्यावर ते पाणी सोडल्याचं ह्या आत्मंभट्टानी स्वतःच्या डोळ्यांनी पाह्यलय!) इतकं बाळबोधाच्या तयारीनी ते तंत्र सांगूनही हे एकटक्के कधिकधी पळी हातात घ्या म्हटल्यावर तांब्या हतात घेतात. आमच्या मनात शंका.. सकाळी बहुतेक "साफ" झाली नसावी... पण असं साफ..साफपणे बोलता मात्र येत नाही.. मग पुन्हा (त्याच मंत्र म्हणयच्या टोन मधे..) अहो अहो यजमान ,, हा जो तांब्याचा जाड चमचा (डोक्यात मारल्यावर झोपेतनं जाग येइल इतका जाड दिसतो..) दिसतो ना.. तो म्हणजे पळी (आणी मी आजच्या पुजेचा बळी!) ती पळी हतात घ्या....(इथे पार वैतागल्यामुळे..उघड..) ह्हांssssssss! आता ती समोरच्या भांड्यात घाला.. बुद्कन आवाज आला की तिनी पाणी उचला... (आणी मग ते आपल्या दोघांपैकी जमेल त्याच्या) तोंडात घाला.. इत्यादी इत्यादी...

आजुबाजुचं उपस्थित पब्लिक देखिल इथे हसून हसून लोळतं. कोणत्याही कारणानी असो- पण या खर्‍या अर्थानी मती मंद आणी मेंदू बंद जाहलेल्या या एकटक्क्यांना आपण सांगितलेल्यातलं काही म्हणजे काही कळत नाही. पुजेच्या यादितली "हळद" वाचल्यावरंही " ती कुंकू मिळतं,तिथेच मिळेल ना?" असं आपल्याला फोन करून विचारायचं मानसिक धैर्य दाखवतात! हे लोक सिग्नलला सुद्धा लवकर हलत नाहीत. तांबडा सिग्नल सुटून हिरवा झाला,आणी मागे आपला हॉर्न वाजवून वाजवून पारवा झाला..तरी "हे" आपले तिथेच! अगदी सिग्नल सुटून २५ वर्ष उलटली तरी!!!.. पण यांच्यावर मला उपाय दिला तो आमच्या त्या काकानीच.. एकदा मी त्याला वैतागून माझ्यावरचा हा असला एक अति-प्रसंग सांगितला.. हो.. अहो अति झालं आणी हसू आलं असं खरोखरी होणारा अतीप्रसंग'च तो! तर तो त्याला सांगितला, काकाचं उत्तर तयार, '' आत्म्या तुला लेका अक्कल नै! अरे... आपण डाक्टरासारखं औषध किती वेळा घ्यायचं ते सांगून मोकळं व्हायचं..मग ते तो नाकातून घेवो वा तोंडातून.. तो दोष आपणास लागाचा नाही.. कसं समजलास?... "
पुढे पुढे व्यावसायिक शहाणपण आल्यावर मी ही ते समजलो...पण पौरोहित्यामधे काम नीट करवून घेतल्याचं मानसीक समाधान हे यजमानां इतकच गुरुजिंनाही हवं असतं. अगदी दक्षिणा सुद्धा नाही मिळाली..तरी चालेल. असं वाटतं..... म्हणजे 'नुस्त वाटतं'!

अता यादीच्या मागील सूचना:-सर्व सूचना, हे नियमच असतात. पण नियम हे कधिच पाळण्यासाठी नसतात म्हणून त्यांना सूचना म्हणायच. आणी नियमाच्या त्या यमाला असं नियमीत करायचं! अता ही सूचनांची माहिती नसून प्रत्यक्ष म्हणजे ऑन-फिल्ड त्यांची अंमलबजावणी कशी होते त्याचा हा वृत्तांत....
==============================================
क्रमशः
==============================================
"बिझ्झी" सिझन मधे आल्यामुळे लेखमालेत बरीच गॅप पडली...याबद्दल क्षमस्व! Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या भागापासून वाचायला सुरुवात केली. लेखमाला फारच भन्नाट लिहिलीय! पहिले चारही भाग आवडले.

या भागातला आचमनाचा प्रसंग भारी आहे. गेल्या जन्मीची काहीतरी थकबाकी चुकवावी लागणं बाकी असल्यामुळे भटजीबुवांच्या नशिबी इतके मठ्ठं यजमान आले असावेत. Proud वैतागयोग समजला, पण तुफान हसायला आलं.

! वास्तविक हा सगळा धार्मिक मेक-अप करूनही जेव्हढे पवित्र विचार आपल्या मनाला-शिवत नसतील,त्यापेक्षा त्या लहान मुलांचं निरागस मन हे शंभर पटीनी जास्त पवित्र असतं. अहो जिथे अजून अपवित्रताच(शिरली) नाही,तिथे तरी निदान पावित्र्याचे निकष असू नयेत! हे ही या(नुस्त्याच वयानी वाढलेल्यां)ना कळत नाही>>

सही आहे!