नवरसरंग-काव्यमहास्पर्धा - 'रौद्र'रस

Submitted by सारंग भणगे on 8 July, 2009 - 13:19

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या समुद्रा, डळमलु दे तारे !
विराट वादळ हेलकाउदे पर्वत पाण्याचे ढळुदे दिशाकोन सारे !

या कुसुमाग्रजांच्या ओळीतील भव्यता आणि वीरश्री, किंवा

डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये,
शंख फुंकत ये, येई रुद्रा!
प्रलयघनभैरवा, करीत कर्कश रवा
क्रूर विक्राळ घे क्रुध्द मुद्रा !

या ओळीतील भा.रा.तांबे यांनी गुंफ़लेला रौद्रावेश!

अशा वाचुनच काळजात धडकी भरवणा-या किंवा धमन्यांमधुन वाहणा-या रूधिराला आव्हान देणा-या कवितांचे रूद्रस्वर आता आकाशात निनादु देत.
------------------------------------------

प्रत्येक रसस्पर्धेला वाढत असलेला प्रतिसाद हा सुखावणारा आहे. अशाच भरघोस काव्यसंखेने आणि उत्कृष्ट रचनांचे अक्षरश" तांडव करूयात. काव्यकाळभैरवाला कवितेच्या प्रसादाने संतुष्ट करूयात.

या महिन्याचा रस आहे 'रौद्र'

तुमच्या एक /दोन "रौद्ररसपूर्ण" कविता आम्हाला १ जुलै ते १५ जुलै २००९ पर्यंत

marathikavitamarathispardha@gmail.com वर पाठवा.

सोबत ओर्कुट प्रोफाइलची व ब्लॉग असल्यास त्याची लिंक नक्की पाठवा.

गुलमोहर: 

स्पर्धेचे काही नियमः

१. प्रत्येक महिन्याचा सुरुवातीला, त्या महिन्याचा 'रस' ( विषय ) देण्यात येईल. त्या महिन्यात त्याच विषायवरच्या कविता घेतल्या जातील. कविता दर महिन्याच्या १५ तारखे पर्यंत पाठवाव्यात.

२. त्या रसावर आधारीत तुमच्या एक किंवा दोन कविता शुद्ध टंकलिखित स्वरूपात आम्हाला marathikavitamarathispardha@gmail.com या ईमेल वर पाठवायची. कविता थेट समूहावर पोस्ट केली तर स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. कविते बरोबर आपले नाव, ओर्कुट आइडी पण पाठवा.

३. कविता प्रकाशित / अप्रकाशित असल्या तरी चालतील.

४. ही कविता स्पर्धा केवळ ओर्कुट साठी मर्यादीत नाहीये. तेव्हा ओर्कुट न वापरणारे तुमचे मित्र आम्हाला त्यांच्या कविता ईमेल करू शकतील.

५. परीक्षक म्हणून समुहा बाहेरच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात येईल. दर महिन्याला वेगवेगळे परीक्षक असतील. निवड प्रक्रीये बदद्ल सविस्तर माहिती लवकर इथेच कळवु.

६. १५ तारखे नंतरचा एक आठवडा परीक्षणाचा असेल आणि त्यानंतर ( महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ) त्या महिन्याचे निकाल प्रसिद्ध केले जातील.

स्पर्धेचा उद्देश लक्षात घ्यावा. कुणावर अन्याय झाला; आयोजनात चुका झाल्या तर त्या क्षम्य असाव्यात. हा एक प्रयोग आहे हे ही लक्षात घ्यावे. स्पर्धे बाबत, स्पर्धेतील प्रवेशा बाबत आणि कविता ग्राह्य / अग्राह्य ठरवण्या बाबत चे सर्व हक्क आयोजक अबाधित ठेवत आहेत.

सारंग_काव्यसाधक

महाराष्ट्राच्या, मराठि मायभूच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये नवरसरंग या माध्यमातुन दर महिन्याला एक अशी काव्यस्पर्धा घेतली जात आहे. प्रत्येक महिन्याला एक रस अशा त-हेने नऊ रसांवर नऊ महिने स्पर्धा घेतली जात आहे.

मराठि कवितेचा उत्कर्ष या व्यतिरिक्त कुठलाही लाभ अपेक्षित नाही. तरी मायबोलीकर कवि मंडळींनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी अपेक्षा आणि आवाहन.

सारंग_काव्यसाधक

रौद्र रस : रुद्र म्हणजे शंकर. कायम डोक्यात राख घातलेला. त्याचं सारं स्वरूप रौद्र. त्याचं नृत्यही तांडव.
रौद्र रसाचा संबंध अनेकदा विनाशी, संतापाशी लावला जातॊ. ते बरोबर असेलही. मला व्यक्तिशः रौद्र रुपात प्रचंड उत्साह आणि उफ़ाळून येणार्‍या भावनांचं प्रतिक दिसतं. मग ते ऐतिहासिक प्रसंग असो वा नैसर्गीक अभिनिवेश. उफ़ाळणार्‍या लाटांत , वीजेच्या कडकडाटात मला रूद्र दिसतो. जी एं च्या कथांमध्ये जमिनीत रोवलेला शेंदूर फ़ासलेला रूद्र असतो. लाल डोळे. कडकडाट. घनघोर पाऊस. भडकलेली आग. मोकळे केस... या सार्‍यांत मला रूद्र दिसतो.

रौद्ररसाचा पाया संताप. यातही मला वाटतं गीतेत सांगितल्याप्रमाणे संताप सात्विक, राजस आणि तामस असू शकतो. एखाद्या तत्त्वाच्या आड काही आल्यानंतर येतो तो सात्विक संताप. एखाद्या उद्दीष्टाच्या आड काही आल्यावर येतो तो राजस संताप आणि स्वतःच्या सुखाआड काही आल्यावर येतो तो तामस संताप अस्णं थोदक्यात म्हणता येईल. यातला सात्विक संताप अर्थातच उच्च असेल. त्यामुळे त्यातून उत्पन्न होणारा रौद्र रस अधिक उच्च असेल.

जेवणात जसे अनेक रस असतात तसेच कलाकृतीत असावेत . हा रस निर्माण करायला अनेक घटक असतात.
उदा . तिखट रस : मिरची, मिरी, लवंग, दालचिनी, आलं, इत्यादी
गोड रस : साकर, गुळ, मध, केसर, वेलची इत्यादी
आंबट रस : चिंच, आमसोल, कैरी इत्यादी
कडू रस : कडु निंब, कार्ले, इत्यादी

तसेच हे साहित्यातले रस. आता मटणाचा तिखट्पणा वेगळा आणि लोणच्याचा वेगळा. पुरण्पोळीचा गोडवा वेगळा आणि श्रीखंडाचा वेगळा.

तसेच काव्यात किंवा नाट्यात वेगवेगळ्या रसांचा परिपोष आणि मिश्रण अपेक्षित आहे.

नाम गुम जायेगा.

रौद्र रसाचा स्थायी भाव आहे क्रौर्य. आणि तुम्ही जो उत्साह म्हणता, किंवा सात्विक संताप म्हणता, तो वीररसाचा स्थायी भाव आहे. रौद्ररस दाखवणारे जे नायक आहेत, ते सगळे तामसी वृत्तीचे असले पाहिजे असा दंडक आहे. तसे पाहिले तर शंकर किंवा कालीसुद्धा असे तामसीच आहेत.
तुम्ही जे जेवणाचे उदाहरण दिले आहे, तसेच भरतमुनींनी दिलेले आहे. रस निर्माण करणे म्हणजे काय? तर अनुभव घेणे. हा अनुभव जितका उत्कट तितकी कलाकृती उत्तम! आपण कांदेपोहे खाताना त्यात साखरसुद्धा घालतो चवीपुरती.... पण पोह्यांची मूळ चव कोणती, तर ती खारट- तिखट! असेच सगळे रस मिळून एखाद्या रसाला मदत करतात.
काव्यामधील नवरस वेगळे आहेत, असे मला वाटत नाही. कारण काव्य ही नाट्याचीच एक बाजू आहे. मात्र त्याच्या मांडणीमध्ये फरक असु शकतो. कारण नाट्यामध्ये, एखादी गोष्ट दाखवण्यासाठी जास्त वेळ मिळतो. त्यामुळे एखाद्या करुणरसाच्या चित्रपटातसुद्धा एखाद विनोदी गाणं किंवा प्रणयगीत असू शकते. मात्र जेव्हा आपण कविता लिहितो, तेव्हा तिच्यामध्ये प्रकर्षाने तो रस दिसावा लागतो किंवा निदान तो रस त्या कवितेने सुचवावा लागतो. आपल्याकडे फक्त काही ओळी असतात आणि सर्व भावभावना त्या काही ओळींमधून व्यक्त करायच्या असतात.

रौद्रमध्ये एक शक्ती आहे. तांडव आहे. ते निर्मितीचे प्रतीक आहे. विनाशाखेरीज निर्मिती घडत नसते. पण तो क्षण आहे तो मात्र निव्वळ क्रौर्याचा. अशोकाने रणांगणावर गाजवले, ते शौर्य होते की क्रौर्य? तसे पाहिले, तर रामाने युद्ध केले आणि रावणानेही युद्धच केले. पण राम क्रूर होता असे नाही म्हणत आपण. क्रोर्यामध्ये सौंदर्य आहेच! लाल रंग सुंदरच आहे. पण त्याचे सौंदर्य कशाबरोबर खुलून दिसते? तसेच रौद्र सुंदर आहेच, पण त्याचे सौंदर्य दानवांबरोबर खुलून दिसते. (असे मी नाही म्हणाले, तर भरत म्हणाला!)

- आसावरी

वीरश्रीयुक्त कविता म्हणजे नेमक्या कोणत्या? कारण वीर रस आणि रौद्र रस यांत तशी सीमारेषा फार पुसट आहे. परंतु वीररस ही वृत्ती आहे असे माझे स्वतःचे मत आहे. ही भा. रा. तांबेंची कविता वाचली, की रौद्रचा नेमका बाज कळतो. वीरश्रीमध्ये उत्साह आहे, एक प्रकारची टक्कर देण्याची वृती आहे. पण विध्वंस असेलच असे काही नाही. शक्ती आहे, शक्तीची प्रचीती आहे, पण शक्तीचे प्रदर्शन असेलच असे काही नाही. रौद्र मध्ये मात्र ते आहे. मला तरी भीमरूपी महारुद्रा हे वीररसपूर्ण वाटते. आणि रौद्रमध्ये एखादे वर्णन किळसवाणे वाटले, आणि ते त्या कवितेसाठी आवश्यक असले, तर ते योग्यच आहे. आपण पूर्वी विचार केला आहे, तसे साखर ही कांदेपोह्यांची चव वाढवत असेल, तर जरूर घालावी. पण तिच्यामुळे पोह्यांची मूळ चव बिघडता कामा नये. तसेच मूळ रस तोच ठेवून जर त्यात बीभत्सची छटा येत असेल, आणि त्यामुळे रौद्ररसाची अजून चव वाढत असेल, तर बीभत्स चवीपुरता जरूर घालावा.